गेल्या दोन दिवसांत क.डों.म.पा. क्षेत्रात परदेशी जाणाऱ्या ३४४ विद्यार्थ्यांचे झाले लसीकरण

क.डों.म.पा. क्षेत्रात दि. २ व ३ जून रोजी परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष लसीकरण करण्यात आले होते. कल्याण पश्चिम लाल चौकी येथील आर्ट गॅलरीमध्ये ३४४ विद्यार्थ्यांना कोविशिल्डची पहिली लस देण्यात आली.

कोरोना लसींचा तुटवडा पाहता सध्या लसीकरण अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. बऱ्याच वेळेस लस उपलब्ध न झाल्याने क.डों.म.पा. प्रशासनाला लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. महानगरपालिका क्षेत्रात बरेच विद्यार्थी हे परदेशात शिकायला जातात. ज्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत व ते परदेशी जाणार आहेत अश्या विद्यार्थ्यांसाठी बुधवार दि २ जुन व गुरुवार दि. ३ जून रोजी आर्ट गॅलरी येथे लसीकरण ठेवण्यात आले. या विद्यार्थ्यां व्यतिरिक्त इतर कुणालाही लस मिळाली नाही. कोवीशिल्डचा पहिला डोस या विद्यार्थ्यांना देण्यात आला. महापालिका क्षेत्रातील ३४४ विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला आणि लसीकरण करून घेतले.

– संतोष दिवाडकर

६ महिन्यांत बारावे वर्गीकरण केंद्रावर ओला कचरा टाकणे होणार बंद ; केवळ सुख्या कचऱ्याचे होणार वर्गीकरण

येत्या ६ महिन्यांत कल्याणमधील बारावे येथील कचरा वर्गीकरण केंद्रावर ओला कचरा टाकणे पूर्णपणे बंद होणार असून याठिकाणी केवळ सुख्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येणार असल्याचे आश्वासन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांनी बारावे प्रकल्पाविरोधात लढणाऱ्या नागरिकांच्या शिष्टमंडळास दिले आहे.

बारावे कचरा वर्गीकरण केंद्रावर ओल्या कचऱ्याचा ढीग साचला असल्याने या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत गोदरेज हिल परिसरातील नागरिकांनी याठिकाणी धडक देत केडीएमसी घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना काही दिवसांपूर्वी जाब विचारला होता. त्यानंतर याठिकाणी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कोर्टाने दिलेल्या आदेशांची अमलबजावणी करण्यासाठी काही दिवसांची मुदत मागीतली होती. यावर चर्चा करण्यासाठी येथील नागरिकांना देखील बोलविण्यात येणार होते. त्यानुसार मंगळवारी  दुपारी  मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनिल घेगडे आणि इतर सदस्यांनी घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी कोकरे यांनी या शिष्टमंडळाला सर्वप्रथम एन.जी.टी कोर्टाच्या नियमाप्रमाणे लवकरात लवकर तेथे उंच भिंत बांधण्यात येईल. एन.जी.टी कोर्टाच्या नियमाप्रमाणे ५ जून २०२१ पासून उंच झाडे लावण्यात सुरूवात करण्यात येईल. ओल्या कचऱ्यातून निघणाऱ्या लिचड वर लवकरात लवकर प्रक्रिया चालू करणार. आत्ता जो कचऱ्याचा ढीग आहे त्याचे स्क्रिनिंग करून स्टेप बाय स्टेप संपवणार तो पर्यंत तेथे नवीन कचरा टाकण्यास बंद करणार. आत्ता जो दिवसा व रात्री जास्त दुर्गंधी येते त्यासाठी दोन शिप मध्ये कल्चर फवारणी केली जाणार जेणे करून दुर्गंधी येणार नाही.

२ ते ३ महिन्यात महानगरपालिकेचा प्रयत्न असेल की ओला कचरा बारावे प्रकल्प येथे पूर्णतः टाकण्यास बंद करणार व फक्त सुख्या कचऱ्याचे वर्गीकरण तेथे केले जाणार, जो कचरा रिसायकल करण्यासाठी बाहेर मार्केट मध्ये विकला जाणार. जास्तीत जास्त ६ महिन्यात १०० टक्के ओला कचरा बारावे येथे टाकायचे बंद करणार असल्याचे आश्वासन उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिले.

कोकरे यांचा इतर नगरपालिका व महानगरपालिकांचा अनुभव पाहता ते नक्कीच बारावे, गोदरेज हिल रहिवासी यांना या दुर्गंधीतून मुक्त करतील अशी खात्री बाळगत असल्याची माहिती बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनिल घेगडे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

गुणे सर आणि एक आठवण…

३ जून २०२१…. गुणेश डोईफोडे सरांनी सकाळी सकाळी या जगाचा निरोप घेतला. सकाळी उठल्यानंतर ऐकलेल्या या दुःखद बातमीवर विश्वास करणे खूप कठीण होऊन बसले. हृदयविकाराच्या झटक्याने अचानक त्यांना देवाज्ञा झाली आणि संपूर्ण विद्यार्थी वर्ग हळहळला.

शाळेत असताना व्हिलन प्रमाणे वाटणारे परंतु प्रत्यक्ष जीवनात हिरो असणारे आमचे गुणेश सर आज आमच्यात नाहीत. खरं तर अजूनही वाटत नाही की त्यांचं असं झालं आहे. चालता बोलता ते निघून गेलेत. रोज त्यांचे स्टेट्स पाहायला मिळायचे. विद्यार्थी मोठे झाले पण रोज काही ना काही ज्ञानात भर पाडणे त्यांनी सोडले नाहीत. व्हॉट्सऍप ग्रुप असो किंवा पर्सनल बोलणं. सरांनी प्रत्येक क्षणाला काही ना काही नवीन शिकवण्याचा प्रयत्न सोडला नाही.

आजपासून १७ वर्षांपूर्वी… चौथ्या इयत्तेत शिकत होतो. आणि वर्गातल्या मुलांमध्ये एक चर्चा सुरू होती. त्यातील दोघा तिघांनी गुणेश सरांचा मार खाल्ला होता. असे असे सर आहेत त्यांचा पासून सावध रहा असे सर्व पोर म्हणत होती. हे गुणे सर कोण ? तेव्हा सरांना मोस्ट ऑफ गुणे सर म्हणत. शाळा सुटताना चौथ्या माळ्यावरून गोंगाट करत खाली येणारे आम्ही पहिल्या माळ्यावर शांतपणे चालायचो. कारण इथेच गुणे सर उभे असायचे. आणि मी पहिल्यांदा त्यांना पाहिले. डोळ्यावर चष्मा आणि त्यातून करडी नजर, फॉर्मल राहणी. पुढच्या वर्षी पासून ते आपल्याला शिकवणार याची भीती आम्हाला लागलेली. ते आमच्या वर्गाला नकोत असे त्यावेळी वाटे. पाचवी झाली सहावी झाली. पण नेमके सातवीत गेल्या नंतर विज्ञान शिकवायला ते आम्हाला आले. त्यावेळी परीक्षा म्हणजे ट्वेन्टी ट्वेन्टी. म्हणजेच 20 गुणांच्या चाचणी परीक्षा. पहिल्याच चाचणी परीक्षेत बरेच विद्यार्थी विज्ञान विषयात फेल झाले. मी कसाबसा काठावर पास झालो. पण सगळ्या वर्गाने हातावर छड्या खाल्ल्या. पुढे आम्हाला त्यांची सवय बनली. त्यांचा तास सुरू झाला की वर्ग शांत होत असे. ते वर्गात येऊ न येऊ वर्ग शांत होत असे. एक तास संपलेले शिक्षक बाहेर पडले की गुणे सर दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला वर्गात येत असत. सहामाई परीक्षा संपली आणि इतिहास हा विषय देखील ते शिकवू लागले. तसा हा विषय आम्हाला शाळेच्या मुख्यध्यापिका शिकवायच्या. पुढे त्यांनी तो ही विषय गुणे सरांना दिला.

एके दिवशी मधली सुट्टी संपलयाची घंटा कानावर पडली. आता गुणे सरांचा तास. वर्गातली पोर धावपळ करीत जागेवर बसली. इतिहासाची पुस्तक दप्तरातुन बाहेर पडून बेंचवर आली. जो धडा आज सर शिकवणार तो ही काढून ठेवला. दाराला डोळे खिळले. ५ मिनिटे झाली सर येईना. १० मिनिटे झाली सर येईना. म्हणजे हा ऑफ पिरेड दिसतोय. वर्गात हळूहळू आवाज सुरू झाला. आमच्या बेंच वर हळूहळू मस्ती सुरू झाली. मी त्या दिवशी कडेला बसलो होतो. मध्य भागी माझा मित्र सागर आणि भिंतीकडे धीरज. पाठीमागे तीन मुली बसल्या होत्या. मी खिशातला रुमाल काढून तो डोक्यावर ठेवला आणि अरबी लोकांसारखा डान्स करू लागलो. या पाचही जनांनी मला प्रोत्साहन दिलं. आणि मला आणखी एकदा नाचायला सांगितलं. मी पुन्हा नाचायला लागलो तोच अचानक वाऱ्याच्या वेगाने सर वर्गात शिरले आणि खुर्चीवर बसले. डोळ्यावर रुमाल असल्याने मला काही दिसले नाही. पण सरांनी मला पाहिले हे सर्वांना माहीत होते. आजूबाजूला कुजबुज सुरू झाली. एकसाथ नमस्ते म्हणत सरांचे स्वागत झाले. आणि आम्ही बसलो.
“ते दोन बेंच उभे रहा” सर म्हणाले.
बापरे ! आता काय खरं नाय… आम्ही हळूहळू घाबरत घाबरत उभे राहिलो. आणि ते बाहेर निघून गेले. ते पट्टी आणायला गेलेत हे आम्हाला कळलं. आणि ते वर्गात आले आणि खुर्चीवर बसले.
“चला या लवकर लवकर पुढे या” सरांनी आम्हाला पुढं बोलवलं.
या पाचही जणांनी मजा घेतली आणि सगळं माझ्यावर ढकलून मोकळे झाले.
“सर मी फक्त हसले हा दिवाडकर नाचत होता” त्यातली एक मुलगी म्हणाली.
सरांनी तिघींना चार चार छड्या ओढल्या ते पण वेताच्या काठीने.
“हम्म काय मग कसा होता डान्स ?” सागर आणि धिरजला विचारत दोघांना बिब्बार चार चार फटके ओढले. बिचारे हात चोळत जागेवर गेले. आता माझी बारी होती. मला माहित होतं मुख्य आरोपी असल्याने माझं काय खरं नाही. समोर गुणे सर. काही होण्या आगोदरच मी लटपट लटपट करू लागलो. हात थरथर कापायला लागले. चौथीत असल्या पासून ज्यांच्या पासून स्वतःला वाचवत राहिलो. आज शेवटी त्यांच्या समोर उभा आहे. मी पुरता घाबरलो.
“अरे तू तर… त्यांचा मेन रिमोट कंट्रोल आहे.” सर असं म्हणतात मी जाणले की मला लय बेदम मारतील वाटत.
मी एकदम गरीब आणि निरागस चेहरा केला. माझा चेहरा पाहून सरांचा मूड बदलला त्यांना मला मारावेसे वाटेना. पण बाकीच्या पोरांना मारलं आणि मी मुख्य आरोपी मग मला कस सोडावं. अक्खा वर्ग बिनपैशाचा तमाशा बघत होता.
“काय रे काय झालं ? रडतो काय ? मघाशी कसा नाचत होतास ?” सर बोलले.
“सर नाय मला ते लोक बोलले डान्स कर.. म्हणून मी केला” मी पण खरं काय ते सांगितलं. माझ्या कडे पाच बोट केलीत म्हणल्यावर मला पण त्या पाच बोटांकडे एक बोट नको होय करायला. तसे आम्ही सगळे तितकेच सामील होतो.
“काय नाव काय तुझं ?” सरांनी विचारले.
मला आठवतंय मला नाव पण सांगता येत नव्हतं इतका मी घाबरलो होतो.
“काय रे ?” सर पुन्हा बोलले.
“संतोष दिवाडकर…” खाली मान घालून हळूच बोललो.
“चांगला नाचतोस रे… हात पुढे कर” फार वेळ न घालवता बोलले.
आता काय करावं सहन पर्याय नाही. असे म्हणत मी हात पुढे केला. खरं सांगतो मी मुख्य आरोपी असून मला सरांनी मारायचं म्हणून वरच्या वर चार फटके मारले. एक फॉर्मलिटी बाकीच्यांना दाखवायचं म्हणून त्यांनी मला मारलं हे मला समजलं. जागेवर गेलो आणि शांत बसलो.

पुढे त्यांच्या सोबतची ही आठवण मी शाळा संपल्या नंतर २०१६ मध्ये शेअर केली. जेव्हा एका कार्यक्रमात माझी त्यांच्याशी भेट झाली. काही माजी विद्यार्थ्यां समवेत माझी ओळख करून दिली. आणि आमच्या जनशक्ती स्टुडिओ मध्ये त्यांच्या ग्रुपचा एक प्रोग्रॅम आयोजित केला होता. तो त्यांनीच विद्यार्थ्यांसाठी करून घेतला होता. यानंतर सर माझ्या संपर्कात कायम राहिले.

२०२१ च्या एका सकाळी सरांबाबतची बातमी ऐकून विश्वासच बसला नाही. रोज त्यांना स्टेट्स मागायचो. आणि ते ही कंटाळा आला असला तरी पाठवायचे. शाळेत असल्या पासून शाळेतील विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन ते आतापर्यंत करीतच होते. विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या बद्दल एक आदरपूर्वक दरारा आजही कायम आहे. सर फार लवकर सोडून गेले हेच दुःख.

भावपूर्ण श्रद्धांजली…

– तुमचाच आजी माजी विद्यार्थी

एम.आय.डी.सी परिसरातील रस्त्यांना येणार अच्छे दिन ; खासदार श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला यश

कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली येथील निवासी व औद्योगिक विभागातील भागातील रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने पाठपुरावा करत होते. महापालिका, ग्रामपंचायत आणि एमआयडीसी यांच्या हद्दीच्या वादात या रस्त्यांची दुरुस्ती व काँक्रिटीकरणाचे काम रखडले होते. अखेरीस खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे एमआयडीसी आणि महापालिका यांनी या रस्त्यांच्या कामासाठी प्रत्येकी ५०% टक्के खर्च करणार असून हा पेच सुटला आहे. आता निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून रस्त्यांच्या प्रत्यक्ष कामांनालवकरच सुरुवात होईल, असा विश्वास खा. डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला आहे

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळाच्या परीसरातील, तसेच निवासी क्षेत्रातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेली ५ वर्षे सदर रस्ते व्हावेत म्हणून सातत्याने विविध स्तरावर प्रयत्न चालू होते. त्यानुसार दि. २५ जानेवारी २०२० रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांच्या दालनात कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर अभियंता सपना कोळी यांच्या नियोजित बैठकीमध्ये औद्योगिक वसाहत टप्पा क्र. १ व २ या विभागातील रस्ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करणार असून उर्वरित निवासी वसाहतीमधील रस्ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हाती घ्यावे असा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला.

महापालिका व एमआयडीसी या दोन्ही प्राधिकरणांनी या रस्त्यांसाठी खर्च करावा, अशी भूमिका घेत खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच, त्यानुसार त्यानुसार सदर रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येऊन सुमारे ११० कोटी रुपयांच्या प्रस्तावास एमआयडीसीने मंजुरी दिली.

महापालिकेने ४० टक्के रस्त्यांसाठी निविदा काढल्यानंतर महामंडळही उर्वरित ६० टक्के रस्त्यांची कामे हाती घेणार होते. त्यानुसार, ५५.१५ कोटी रुपये एमआयडीसीकडे वर्ग करण्यासाठीच्या प्रस्तावास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. परंतु, महापालिकेची आर्थिक अवस्था लक्षात घेऊन नगरविकास विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यास यश येऊन श्री. शिंदे यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून विस्तारित नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत ५७.३७ कोटी रुपये अर्थसहाय्य अनुदान स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले.

सदर रस्त्याच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे खा. डॉ. शिंदे यांनी सांगितले. याबद्दल महापालिका व खा. डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि एमएमआरडीए व सर्व संबधित प्रशासनाचे आभार मानले आहेत.

– कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांना मिळणार गती ; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुलभूत सोयीसुविधांचा विकास या लेखाशीर्षअंतर्गत (२२१७-०९१३) सुमारे १५.५५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. सदर कामांची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध होणार असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.

खासदार शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मुलभूत सुविधांसाठी पाठपुरावा करत विविध विकासकामे मंजूर करून घेतली. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्ते आणि पाणीसारख्या पायाभूत सुविधा पुरवण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. परंतु, कोरोना सारख्या महामारीच्या संकटात महापालिकेची आर्थिक परिस्थिती बघता प्रभागातील कामे करण्याकरिता लोकप्रतिनिधी यांचा नगरसेवक निधीचा अभाव पडत असल्यामुळे या शहरांमधील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे नगरविकास विभागाच्या माध्यमातून व्हावीत, यासाठी खासदार डॉ. शिंदे सातत्याने पाठपुरावा करत होते.

खा. डॉ. शिंदे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून कल्याण डोंबिवलीसाठी १५.५५ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी मिळाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेची आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे महापालिका क्षेत्रातील विकासकामे थांबू नये यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी शासन दरबारी रु. १५.६५ कोटीचीमागणी केली होती. क.डों. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना या निधीतून मुलभूत सुविधा मिळण्यास मदत होईल.

येणाऱ्या काळातही विविध योजनाअंतर्गत महापालिका क्षेत्रासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून आणण्यात येईल, त्यासाठी शासनाकडे अनेक प्रस्ताव सादर केले असून त्यासाठी सुद्धा लवकरच निधी मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती खा.डॉ. शिंदे यांनी दिली. त्यामुळे मंजुरी मिळालेल्या विकासकामांची निविदा प्रक्रिया सुरु केली असून प्रत्यक्ष कामास लवकरच सुरुवात करून ती कामे पूर्णत्वास येतील असा विश्वास हि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

-कुणाल म्हात्रे

पुण्यात वाढदिवसा निमित्त युवकाने शेकडो गरजूंना केले अन्नदान

अलीकडल्या काळात वाढदिवसाला केकचा सत्यानाश करण्याची प्रथा अलीकडे खूप वाढू लागली आहे. ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या अंगावर कसलेही द्रव्य ओतून अभिषेक घातला जातो. त्याचबरोबर अंडी फोडून त्याला माखवले जाते. या सगळ्या गोष्टी एकाबाजूला ठेवून पुण्यातील एका तरुणाने स्वतःचा वाढदिवस अन्नाची नासाडी न करता गरिबांना अन्नदान करून साजरा केला आहे.

शुभम शिंदे या तरुणाचा १ जून रोजी २१ वा वाढदिवस होता. त्याने त्याच्या मित्रांच्या मदतीने अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. आधल्या दिवसा पासूनच त्याने लागणारे साहित्य जसे की पेकिंग बॉक्स, बिसलेरी, कच्च्या भाज्या, मसाले, तांदूळ असे साहित्य आणायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळ पासूनच शुभम आणि त्याचे मित्र कामाला लागले. एकत्र बसून त्यांनी आणलेल्या भाज्या कापायला सुरुवात केली. काही मित्रांनी भात घातला. असे करून उत्तम आचारी मित्रांच्या मदतीने व्हेज बिर्याणी बनवली. या बिर्याणीचे जवळपास शंभर पेकेट्स त्यांनी पेक केले.

दुपार पासूनच शुभम आणि त्याचे मित्र पुण्यातील शनिवार वाडा आणि आसपासच्या परिसरात फिरू लागले. कोरोना उपासमारीच्या काळात रस्त्यावर उपाशीपोटी दिसणारे बेघर, गोर गरीब, दोन वेळच्या अन्नासाठी भटकणारे कष्टकरी, लहान मुले या सर्वांना शुभमने हे अन्नाचे पेकेट्स वाटले. त्यानंतर मात्र एक केक कापून थोडासा एन्जॉयमेंट केला गेला.

“केक कापून थोडासा एन्जॉयमेंट केला. काही उत्साही मित्र असतात. माखवा माखवी होतेच थोडीफार. परंतु अति नासाडी टाळून तेच अन्न गरिबांच्या पोटात गेलं याच मला समाधान आहे. माझ्या मित्रांनी यासाठी मला खूप मदत केली. मला याचा कुठं गवगवा करायचा न्हवता. नायतर लोक म्हणतील देखावा करतोय. पण माहीत नाही मित्रांनी व्हडीओ काढलीच थोडीशी. हे अन्नदान करून मला खूप समाधानी वाटलं. कदाचित असंच इतरांनी देखील करावं. आणि पुण्या सारख्या सुसंस्कृत शहरात वाढदिवस असाच साजरा व्हावा असं मलाही वाटत.”

– शुभम शिंदे

अलीकडे तरुणाई मध्ये केक खाणारे कमी आणि माखवुन वाया घालवणारे आपल्याला अधिक मिळतात. बऱ्याचदा अक्खाच्या अखा केक तोंडावर मारून वाढदिवस साजरा करतात. यात कोणते समाधान आहे हे समजणे कठीणच. पण केक आणि अंड हा एक अन्नाचा प्रकार असल्याने ती एक उतमात आहे हे निश्चित. आपण मात्र गरिबांना अन्नदान करावं असं शुभमने ठरवलं. यासाठी त्याला त्याचे कुटुंबीय आणि मित्रांचे देखील सहकार्य लाभले. करण गायकवाड, साहिल शेलार, आकाश खरात, आकाश जाधव, हर्षद भिकुले, सचिन वाघमारे,अभिषेक ठोंबरे, देवा गाडे, संकेत जोरी, तेजस साठे, प्रतीक आरसकर या मित्रांनी पुढाकार घेतला होता. यानंतर सर्व स्तरातून शुभमची व त्याच्या मित्रांची स्तुती होत असून इतर तरुणांनी ही असा आदर्श घ्यावा असे अनेक समाजसेवक म्हणत आहेत.

“गेल्या अनेक वर्षांत मी हजारो केक बनवले असतील. प्रत्येक केक हा आम्ही मनापासून बनवत असतो. अर्थात आम्हाला कस्टमर पैसे देतात खरे परंतु त्या केकची नासधूस झालेली आम्हाला खरोखर आवडत नाही. ते एक अन्न आहे ते एखाद्याच्या मुखी लागणे उत्तम. काही लोक आपला वाढदिवस आश्रम अथवा आदिवासी पाड्यावर जाऊन साजरा करतात. त्यासाठी मला केकच्या ऑर्डर येतात. अशावेळी मी बऱ्याचदा त्यांना डिस्काउंट देत असतो. कारण ज्या लोकांसाठी ते करणार आहेत त्याबद्दल आम्हालाही आपुलकी आहे. नासधूस करण्यापेक्षा अन्नदान केव्हाही श्रेष्ठ”

– महेश बनकर (रोसो कॅफे,कल्याण)

– संतोष दिवाडकर

परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क.डों.म.पा. क्षेत्रात दि.२ व ३ जून रोजी लसीकरणाची विशेष सुविधा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या परंतु परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश निश्चित झालेल्या १८ ते ४४ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्रपणे कोविशिल्ड लसीकरणाची व्यवस्था उद्या दि.२ जून व ३ जून रोजी आर्ट गॅलरी, लालचौकी कोविड लसीकरण केंद्र कल्याण (प.) येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे.

परदेशात शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झालेल्या विदयार्थ्यांनी कोविशिल्ड लसीकरणासाठी येताना काही कागदपत्रे सोबत आणावयाची आहेत.

  • शासकीय ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/वोटर आयडी/पासपोर्ट यापैकी एक)
  • कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रहिवासी असल्याचा पुरावा (ॲड्रेस प्रुफ)
  • १२० फॉर्म अथवा डीएस १६० फॉर्म किंवा प्रवेश निश्चित झाल्याचे परदेशी विदयापीठाचे/ शिक्षण संस्थेचे पत्र यापैकी एक.

वरील नमुद केलेल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणि मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी लसीकरण केंद्रावर आणावयाची आहेत. झेरॉक्स प्रती लसीकरण क्रेंदावर जमा करुन घेतल्या जाणार आहेत. परदेशी शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झालेल्या पात्र विदयार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे क.डों.म.पा. तर्फे आवाहन करण्यात येत आहे.

महापालिकेत लस उपलब्ध न झाल्यामुळे परदेशी शिक्षण घेण्यासाठी प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर सर्व नागरिकांना आणि इतर सर्व केंद्रांवर उद्या लसीकरण बंद असणार आहे.

– संतोष दिवाडकर

दुर्गाडी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात कोरोना नियमांचे उल्लंघन ; संबंधीतांवर कारवाई करण्याची आम आदमी पार्टीची मागणी

सोमवारी दुर्गाडी येथील नविन पुलाच्या उद्दघाटन सोहळया दरम्यान जमाव बंदीचे आदेश असतानाही शिवसेना भाजपाच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून संचारबंदी, जमावबंदी नियमांचे उल्लघन केल्याने त्यांच्यावर कोरोना माहामारी नियम कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

देशात, राज्यात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव संसर्ग मोठया प्रमाणावर वाढत असून त्यामुळे मृत्यु होणाऱ्यांची संख्या देखील मोठया प्रमाणावर आहे. कोरोनाची साखळी मोडण्या करीता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बध लावलेली आहेत. राज्यात संचारबंदी, जमावबंदी असताना देखील मुख्यमंत्री यांच्या मंत्रीमंडाळातील मंत्री, खासदार आमदार, पक्षाचे पदाधिकारी हे सर्रास्स पणे संचारबंदी व जमावबंदीचे नियम मोडताना दिसत आहेत.

लॉकडाऊनमुळे नागरीक घरा बाहेर निघु शकत नाहीत. अनेक नागरीकांचे, व्यावसायीकांचे रोजगार तसेच उद्योग धंदे बुडालेले आहेत. काहींवर उपासमारीची वेळ ओढवलेली आहे. जर एखादा व्यक्ती काही कारणस्तव घरा बाहेर आला तर त्याच्यावर पोलीस, पालीका यंत्रणे मार्फत कारवाई केली जाते. तसेच अनेक व्यावसायीक दुकानांवर कारवाई करून सिल केली आहेत.

असे असतांना दुर्गाडी नविन पुलाचे उद्घाटन करते वेळी त्या ठीकाणी राजकीय मान्यवराची गर्दी झाली. तसेच त्यांच्या सरंक्षणा करीता पोलीस कर्मचारी, महा नगरपालीका तसेच ईतर प्रशासकीय कर्मचारी यांची गर्दी झाली होती. यांच्यापैकी एखाद्याला जरी कोरोनाची लागण झाली तर त्याला जबाबदार कोण राहणार असा सवाल आप ने उपस्थित केला आहे.  

 कायदा नियम हे फक्त सामन्य जनतेसाठीच असतात, राजकीय नेत्याना त्यातून वगळले जाऊन सूट दिलेली आहे का असा संभ्रम सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. तरी कायद्या हा सर्वासाठी एकच आहे हे जनतेला दाखवून देण्यासाठी सबंधितांवर संचारबंदी, जमावबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

– कुणाल म्हात्रे

दुर्गाडी पुल लोकार्पण दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या भोवती सेना भाजपच्या झेंड्यांचा वेढा ; शिवप्रेमींमध्ये नाराजी

कल्याण भिवंडी रोडवरील नवीन दुर्गाडी पुलाच्या मार्गीकेचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपा मध्ये चांगलीच चढाओढ रंगली होती. यासाठी पुलाच्या परिसरात दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील केली होती. श्रेय घेण्याच्या अट्टहासात शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दुर्गाडी चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती पक्षाच्या झेंड्यांची झालर लावली होती. महाराजांच्या पुतळ्याच्या आसपास अशाप्रकारे राजकीय प्रदर्शन केल्याने शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.  

अवघा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांना आपल्या श्रध्दा स्थानी मानतो. अशा युग पुरुषांच्या स्मारका ठिकाणी आपल्या पक्षीय प्रेमा पोटी विद्रुपीकरण करणे कदापी  महाराष्ट्रातील शिवप्रेमी सहन करणार नाही. या प्रकाराचा, निष्क्रिय प्रशासनाचा आणि शासनाची  यासंबंधी नियमावली असताना काम चुकारपणा करणार्या केडीएमसी प्रशासनाचा जाहीर निषेध असल्याची प्रतिक्रिया शिवप्रेमी सुभाष गायकवाड यांनी दिली.

महाराजांच्या पुतळ्याभोवती अशाप्रकारे राजकीय झेंडे लावणे हे निंदनीय असून, या प्रकाराबाबत संबंधित प्रभाग अधिकारी आणि पालिका आयुक्तांकडे तक्रार केली असल्याची माहिती शिवप्रेमी श्याम आवारे यांनी दिली.

– कुणाल म्हात्रे

क.डों.म.पा. क्षेत्रात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काहीशी शिथिलता

महाराष्ट्रभरात लोकडाऊन १५ जून पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. क.डों.म.पा. क्षेत्रात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही अंशी शिथिलता देण्यात आली असून मॉल आणि शॉपिंग सेंटर वगळता इतर दुकाने सुरू ठेवण्यास पालिका आयुक्तांनी परवानगी दिली असून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकाने सुरु राहणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमालीची घटलेल्या कल्याण डोंबिवलीतील व्यापारी वर्गासाठी केडीएमसीने मोठा निर्णय घेतला आहे. मॉल्स आणि शॉपिंग सेंटर वगळता इतर दुकाने सुरू ठेवण्यास केडीएमसीने परवानगी दिली आहे. आठवड्यातून केवळ ५ दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत ही दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तर शनिवार आणि रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णयही केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोवीड रुग्णसंख्या कमी असणाऱ्या शहरांबाबत अनलॉकचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते. तसेच ज्याठिकाणी कोवीड रुग्णसंख्या १० टक्क्यांपेक्षा कमी असेल तिकडे कोवीड निर्बंधांमध्ये सूट देण्याचे संकेतही दिले होते. त्यानूसार आता केडीएमसी आयुक्तांनी हे नविन निर्बंध लागू केले आहेत. १ जुन सकाळी ७ वाजल्यापासून लागू होणार हे निर्बंध १५ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.

यामध्ये सर्व अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक वस्तू वितरणासोबत अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचे वितरण ई कॉमर्स (ऑनलाइन पध्दतीने) करता येईल. दुपारी ३ नंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगाव्यतिरिक्त येण्या-जाण्यावर निर्बंध असणार. कोरोना विषयक कामे करणाऱ्या कार्यालयाव्यतिरिक्त इतर शासकीय कार्यालये २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. यापेक्षा अधिक उपस्थितीसाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मंजुरी देईल.

कृषी विषयक दुकाने आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यँत सुरू राहतील. दुपारी २ नंतर दुकाने आणि कार्यालयात माल वाहतुकीद्वारे वितरण करण्यासाठी मुभा राहील. त्यामुळे २  नंतर कोणत्याही दुकानात किंवा कार्यालयात ग्राहकांना थेट काउंटर विक्री करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणारे दुकान-कार्यालयावर दंडात्मक कारवाई केली जाईल.  अत्यावश्यक नसलेली केवळ इतर एकल दुकाने (मॉल्स आणि शॉपिंग सेंटर वगळता) सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील.अत्यावश्यक नसणारी सर्व दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहणार असून  यापूर्वी लागू केलेले इतर सर्व निर्बंध तसेच लागू राहतील असे आदेश केडीएमसी प्रशासनाने काढले आहेत.

  • कुणाल म्हात्रे