‘कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणचा’ कोकणातील आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात; भाग २

कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणने केलेली मदतीची सुरुवात आणि त्यांच्या टीमचा पहिल्या दोन दिवसांचा प्रवास तर आपण जाणून घेतलातच आता पहा पुढे नेमकं काय घडलं ? परंतु ज्यांनी पहिला भाग वाचला नाही त्यांनी पुढील लिंकवर आधी तो वाचावा. https://mhmarathi.in/?p=954

शनिवार दि.३१ जुलै… मदतकार्याचा तिसरा दिवस. खेड तालुक्यातील संजय मोरे यांच्या निवासस्थाना पासून मदतीसाठी संपूर्ण ताफा पुढील ठिकानी रवाना झाला. सुसेरी अलसुरे मोहल्ला, शिव, भोसते येथील पूरग्रस्तांच्या भेटी घेऊन त्यांना अन्नधान्य किट व इतर वस्तुंचे किट देण्यात आले. जगडुबी नदीच्या पुराने या लोकांचे प्रचंड नुकसान झाले होते. काहींची भातशेती वाहून गेली होती. रस्ते उखडले, घरे कोसळली. या सर्व भागात मदत दिल्यानंतर संपूर्ण ताफा खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागात जायला निघाला.

उपाशीपोटी अतिदुर्गम भागाकडे रवाना :- दुपारचे तीन वाजले होते. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांच्या समवेत अतिदुर्गम भागाकडे निघाले आणि प्रवास सुरु झाला. काही लोकांनी सकाळचा नाश्ता केला नव्हता. शिवाय दुपार झाली असल्याने पोटात भुकेचे कावळे ओरडू लागले होते. मदतकार्य करता करता पोटात भुकेने गोळा उठला होता. मात्र आता प्रवास सुरु झाला होता. खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या बिरमिनी गावाकडे हा ताफा निघाला होता. येथीलच मु.पो.वडगाव गावात दरड कोसळून एका दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यावेळी कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण तसेच आमदार गणपत गायकवाड यांनी नातेवाईकांची भेट घेतली. त्याचप्रमाणे मदतीचा हात पुढे केला.

मोबाईल टॉवर साठी करणार आमदार प्रयत्न :- गावखेड्यातील संपूर्ण प्रवासात मोबाईलला कसलेही नेटवर्क आढळले नाही. येथील लोक एका मोठ्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. ही बाब त्यांनी आमदार गणपत गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली. आपण मोबाईल टॉवर लावण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी यावेळी गावकऱ्यांना सांगितले. यानंतर ताफा निघाला आणि येथील एक जागृत देवस्थान देवी इवराई मानाई देवीच्या दर्शनासाठी काहीवेळ थांबला. देवदर्शन करून पुन्हा ताफा खेडकडे जिथे वास्तव्य होते त्या ठिकाणी निघाला. सायंकाळचे सहा वाजत आले होते. शनिवारचा निरंकार उपवास घडल्याने सर्वजन जेवणावर तुटून पडले.

दोन दिवसांच्या मदतकार्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्या समवेत आलेला ताफा पुन्हा कल्याणकडे निघाला. दुसऱ्या दिवशी रविवारचा जनता दरबार आणि इतर नियोजित कार्यक्रम असल्याने ते आपल्या मतदारसंघात परतण्यासाठी सर्वांचा निरोप घेऊन जाणीव संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश सावंत यांच्या समवेत निघाले. यानंतर रात्री थोडेफार जेवण करून सर्वजण झोपी गेले.

दिवस चौथा – चिपळूण :- रविवार दि. १ ऑगस्ट … मदतकार्याचा चौथा दिवस. सकाळी आवरून उर्वरित मालाच्या टेम्पोसह दोन गट करून चिपळूण येथे मदत वाटण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी निघाले. चिपळूण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याची आर्थिक राजधानीच. वाशिष्ठी नदीच्या पुरामुळे येथील पूल देखील वाहून गेला. मात्र डागडुजीनंतर आता वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. परशुराम घाटापासून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. यामुळे काही गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. १९६५ नंतर आलेल्या भयावह पुरामुळे तालुक्यातील बाजारपेठ, जवळपास असणाऱ्या वसाहती साधारण १२ फूट पाण्यात गेल्या होत्या. काही ठिकाणी नदी प्रवाह बदलल्याने पूर परिस्थिती ओढावली असल्याचे तेथील लोक सांगत होते. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणने त्या ठिकाणी जाऊन मदतीचा एक हात पुढे केला.

खेर्डी येथील दत्तवाडी, विकासवाडी, सती, समर्थ नगर, बाजारपेठ मोहल्ला वस्ती, माप, खिंड, वाणी, आळी, कलबसते अश्या ठिकाणी जाऊन जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले गेले. चिपळूण तालुक्यातील दुर्गम भागातील पोसरे गावच्या बौद्ध वाडीवर दरड कोसळून जिवीतहानी झाली होती. याही ठिकाणी अध्यक्ष मोरे यांनी सहकाऱ्यांसमवेत जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याचबरोबर जवळपास असलेल्या सापील्दी, धामणगाव, खोपिगाव, दसपटी येथील ओवाळी, धनगरवाडी, कडवड गावांना कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणने मदतीचा हात दिला. चार दिवसांच्या व चार तालुक्यातील या संपूर्ण मदतकार्यात कोकण वासीयांनी संपूर्ण कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणचे आभार मानले. कल्याणहुन आलेली ही मदत महाड,पोलादपूर,खेड आणि चिपळूण तालुक्यातील प्रत्यक्ष गरजूंनाच देण्यात आली. त्यामुळे मदत करण्यापेक्षा मदत कोणाला करीत आहोत या बाबीवर प्रतिष्ठाण भर दिल्याने मदत योग्य हातात गेली असल्याचे समाधान यावेळी व्यक्त करण्यात आले.

प्रतिष्ठाणच्या मदतीने भारावले कोकणकर:- संपुर्ण ४ दिवस मदत वाटप करीत असताना आपत्तीग्रस्त नागरिकांनी संस्थेच्या लोकांना तसेच सहभागी झालेल्या आमदारांसमोर आपल्या व्यथा मांडल्या. काही ठिकाणी मोबाईल टॉवरची मागणी असोत किंवा काही ठिकाणी एसटी थांब्याकरीता निवारा मिळण्याची अपेक्षा करण्यात आली. सरकार आमच्याकडून बस थांब्याच्या निवाऱ्याकरिता पैसे मागतात असे म्हणत तुम्ही काहीतरी प्रयत्न करावा अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. ज्याठिकाणी आजपर्यंत कोणीही मदतीसाठी पोहोचलं नव्हतं सरकार देखील इथे आलं नसेल अशा भागात तुम्ही मदत घेऊन आलात. ही आम्हाला मिळालेली पहिली मदत आहे. कारण बाकीचे लोक शहरातच मदत वाटून निघून जातात पण आमच्या दुर्गम भागात कधी कोणी आलं नव्हतं. तुमची ही मदत खरोखरच लाखमोलाची आहे. अशा शब्दांत गावकऱ्यांनी प्रतिष्ठाणचे आभार मानले. शिवाय गावकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा आणि प्रश्न यावर नक्कीच मार्ग काढला जाणार असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष संजय मोरे यांनी गावकऱ्यांना दर्शवला.

मदतकार्यात सहभागी सेवेकरी :- कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या या मदतकार्यात कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड, प्रतिष्ठाणचे संस्थापक/अध्यक्ष संजय बाबुराव मोरे, कार्याध्यक्ष रमाकांत देवळेकर, उपाध्यक्ष सुभाष म्हस्के, सचिव संदीप तांबे, उपखजिनदार अजय पवार, सल्लागार तसेच प्रसिद्धी प्रमुख शरद शिंदे, त्याचप्रमाणे दीपक गायकवाड, जाणीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश सावंत, अनिल राऊत, राहुल कासारे, योगेंद्र यादव, प्रदीप उपाध्याय, सदानंद शिंदे, संतोष परब, संतोष गुरव, रुपेश साळुंखे, मंगेश पवार, मंगेश सकपाळ, गणेश शिंदे, अविनाश शिरकर, मनीष पाटील, सचिन कुरणे, रदणेश महाडिक, अजय महाडिक, इलाखी कोनार, प्रशांत पवार, प्रितेश आचरेकर, साहिल मोरे, संतोष दिवाडकर, तिसाई ग्रुपचे अरुण दिघे, मनोज माळी, संदीप सरवणकर, अमीत धानजी, विशाल जोगदंड, अज्जू गायकवाड, नितीन शिंदे, प्रमोद माने, तुकाराम मापरी, साजीत खान, सूरज भारद्वाज, गौरव सरवणकर, रामदास तळपदे तसेच कल्याण कल्याण पूर्व व्यापारी संघटना आणि इतर सहकाऱ्यांचे प्रत्यक्ष योगदान कोकण दौऱ्यात लाभले. मदत करताना द्यावयाचे सामान व मदत देण्याचे ठिकाण आगोदर निश्चित करण्याचे आवाहन कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण यांच्या कडून इतर संस्थांना करण्यात येत आहे.

-संतोष दिवाडकर

सर्वसामान्य प्रवाशांना लोकल ट्रेनने प्रवास करू द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार – मनसेचा रेल्वेला ईशारा

सर्वसामान्य प्रवाशांना लोकल ट्रेनने प्रवास करू देण्याची मागणी मनसेने केली असून कल्याण मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांनी याबाबत मध्य रेल्वेच्या क्षेत्र अधिकारयांना, कल्याण स्टेशन अधीक्षक, लोहमार्ग पोलीस, रेल सुरक्षा बळ यांना  निवेदन दिले आहे. येत्या २ ते ३ दिवसांत सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करू न दिल्यास मनसेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

कोरोना काळात सावधगिरी म्हणून सरकार तर्फे सर्वात आधी उपनगरीय लोकल गाड्या बंद करण्यात आल्या आणि नंतर अतिआवश्यक सेवे करीता सुरु ही करण्यात आल्या. सरकारी आणि वैद्यकीय कर्मचारीच उपनगरीय गाड्यात प्रवास करू शकतात. आता सर्व काही पूर्व पदावर येत असतानाही, सामान्य प्रवाश्याना उपनगरीय गाड्यात प्रवेश नाही, म्हणजे सरकारी आणि वैद्यकीय कर्मचारीच काम करीत आहेत बाकीच्या लोकांनीं  घरी बसायचा का असा सवाल मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांनी उपस्थित केला आहे.

सामान्य जनता लाचार झाली असून आता पाणी डोक्याच्या वर जात आहे. ज्या लोकांनी एक किंवा दोन्ही लस घेतलेल्या आहेत त्यांना तरी प्रवाशाची मुभा देण्यात यावी. जर येत्या दोन तीन दिवसात सामान्य प्रवाश्याचा विचार नाही केला गेला तर, मनसे तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्व जवाबदारी रेल्वेची असेल असा इशारा भोईर यांनी दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

महानगरपालिकेच्या शाळेतील मुले बनवताहेत उपग्रह; आयुक्तांनी केला विद्यार्थ्यांचा गौरव

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात ही एक मोठी व अभिमानास्पद गोष्ट आहे, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्यांचे गौरव करताना काढले आहे. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन आणि स्पेस झोन इंडिया आयोजित ‘स्पेस रिचर्स पेलोड क्यूब्ज चॅलेंज 2021’ साठी महापालिकेच्या शाळातून 10 विदयार्थ्यांनी उपग्रह बनविण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला. या मुलांना आज प्रशस्तीपत्र देवून गौरवितांना पालिका आयुक्तांनी हे उद्गार काढले.

मुलांनी अभ्यासाबरोबरच क्रिडा क्षेत्रातही नैपुण्य मिळवावे व पुढील आयुष्यात प्रगती करावी, अशा भरभरुन शुभेच्छा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी उपस्थित विदयार्थ्यांना दिल्या. महापालिका शाळातून विदयार्थ्यांना यापुढेही कुठल्याही उपक्रमात सहभाग घ्यावयाचा झाल्यास निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यावेळी दिले.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, रामेश्वरम, तामिळनाडू आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिचर्स पेलोड क्यूब्ज चॅलेंज 2021 साठी सदर फाऊंडेशनचे सचिव मिलींद चौधरी यांनी मार्टिन ग्रुप या संस्थेमार्फत महापालिकेच्या महात्मा फुले प्राथमिक विदयालय,शाळा क्र.68, बारावे, बंदे अली खाँ महापालिका शाळा क्र. 99/12, उर्दू बल्याणी, तिसाई प्राथमिक विदयालय, तिसगाव, मनपा शाळा क्र. 18,  मनपा शाळा क्र. 12, उंबर्डे, प्रबोधनकार ठाकरे मनपा शाळा क्र.19 नेतीवली या शाळातून 10 विदयार्थ्यांना उपग्रह बनविण्याचा मोहिमेत सहभागी करुन घेतले.

डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत विदयार्थ्यांना उपग्रह बनविणेबाबत संस्थेमार्फत ऑनलाईन मार्गदर्शन कण्यात आले होते. आणि दि. 19 जानेवारी, 2021 रोजी जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविदयालय, हडपसर, पुणे यांचेमार्फत उपग्रह बनविण्याची कार्यशाळादेखील आयोजित करण्यात आली होती. दि. 07 फेब्रुवारी 2021 रोजी रामेश्वरम तामिळनाडू येथून 100 उपग्रह हेलियम बलूनद्वारे एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा विश्वविक्रम करण्यात आला.

हे उपग्रह एका केसमध्ये फिट केलेले असून त्यासमवेत पॅराशुट, जीपीएस ट्रकिंग सिस्टिम लाईव्ह कॅमेरा जोडलेला आहे, त्यामुळे प्रत्यक्ष ओझोन, कार्बन डायऑक्साईड, हवेची शुध्दता, हवेतील प्रदुषण, हवेचा दाब आणि माहिती या उपग्रहामार्फत पृथ्वीवरील केंद्राना पाठवता येईल. या पेलोड सोबत काही झाडांच्या बिया सुध्दा पाठविल्या आहेत. यामुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल. अशाप्रकारे शालेय विदयार्थ्यांना उपग्रह बनविण्याचा उपक्रमामध्ये सहभागी करुन घेतल्यामुळे विदयार्थ्यांमध्ये स्पेस संबंधित संशोधनाची आवड निर्माण होवून भविष्यात त्यांना करियर बनवितांना नक्की उपयुक्त ठरेल. या गौरव सोहळयासमयी उपआयुक्त शिक्षण अनंत कदम, प्रशासन अधिकारी जे.जे. तडवी, शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरकटे व संबंधित शाळांतील शिक्षक वर्ग विदयार्थ्यांसमवेत उपस्थित होता.

-संतोष दिवाडकर