लसीकरणाच्या बाबतीत कल्याण पूर्वेशी दुजाभाव ? पालिका प्रशासनावर सामाजिक संघटनांचा रोष

कल्याण पुर्वेचा भाग हा महापालिका क्षेत्रातील इतर भागांच्या तुलनेत विकासापासून वंचित राहिला आहे अशी एक नेहमीची ओरड आहे. कल्याण पूर्वेला स्वतंत्र आमदार आहे. दोन महापौरही याच भागात होऊन गेले. कोटींच्या महागड्या गाड्या घेणारे तसेच अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिक कल्याण पूर्वेत राहतात. मात्र कोरोना काळात या कल्याण पूर्वेत लसीकरण केंद्रे जर पहायला गेलात तर कधी चार तर कधी कधी एकच केंद्र दिलं जातं. इतर परिसराच्या मानाने लोकसंख्या ही ४ लाखांच्या वर आहे त्यामुळे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी विरोधात सामाजिक संघटना रोष व्यक्त करताना दिसत आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. एकूण २४ केंद्र तर काही वेळेस १९ उभारली जातात. मात्र त्यात कल्याण पूर्वेला झुकते माप देऊन जेमतेम तीन ते चार केंद्रे दिली जातात. काही दिवशी तर १९ पैकी एकच लसीकरण केंद्र कल्याण पूर्वेत दिले जाते. त्यामुळे विकासाच्या बाता मारणारे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी आणि बाकीचे राजकीय पक्ष आहे कुठे असा संतप्त सवाल सामाजिक संघटना उपस्थित करत आहेत.

१९ केंद्रावर लसीकरण होत असताना

कल्याण पूर्व – १
कल्याण पश्चिम – ६
डोंबिवली मधे – ११
टिटवाळा – १

अशी केंद्र कधी कधी पालिका प्रशासन देते. आणि त्यामुळे कल्याण पूर्वेतील नागरिकांना कल्याण पश्चिम किंवा डोंबिवली मध्ये जावे लागत आहे. त्यात लसीच्या दुसऱ्या मात्रेसाठी पूर्वेकर मोबाईल लसीकरणाची वाट पाहूनही थकले आहेत.

लसीकरण सुरू झाल्यापासून असेच सुरू आहे. हे कल्याण पूर्वेला भिक दिल्या प्रमाणे लसीकरण केंद्र देत असतात हा अन्याय आहे. कल्याण पूर्वेचे लोक अतिशय शांत सुस्वभावी आहेत. आपल्या पक्षाला, माणसाला मतदान करणारे आहेत. याचा गैर फायदा प्रशासन घेत आहे की काय ? डोंबिवली चे विशेष कौतुक कारण ते मात्र बरोबर मिळवतात सर्व काही.

उदय रसाळ (माजी नगरसेवक)

दरम्यान आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी पाटील यांना याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केले असता कल्याण पूर्व साठी फिरते लसीकरण केंद्रे उभारण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कल्याण डोंबिवली परिसरात केंद्रे उभारण्याचे काम उपायुक्त पल्लवी भागवत यांच्या कडे आहेत असे स्पष्ट केले. भागवत यांना संपर्क केला असता त्यांना फोनचा स्वीकारच करता आला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

-रोशन उबाळे

मुंबईचा वडापाव बनला महाराष्ट्राचा फेव्हरेट; Vadapav history

Vadapav history : ‘वडापाव’……… एक अशी चव जी प्रत्येक महाराष्ट्रातील लोकांच्या जिभेवर जणू कोरली गेली आहे. आज २३ ऑगस्ट हा दिवस म्हणजे जागतिक वडापाव दिवस म्हणून ओळखला जातो. मग असे असेल तर आजच्या दिवशी मुद्दाम वडापाव खायलाच हवा. लहानपणापासून जो वडापाव आपण खात आलो तो वडापाव नेमका आणला कसा ? याबाबत अनेक कहाण्या आहेत पण माहीत खुप कमी लोकांना आहेत.

काय असतो वडापाव ? तर एक पावाचा तुकडा मधोमध भेदून त्यात टाकलेला बटाट्याचा बेसनात तळलेला एक गोल गरगरीत गोळा. आता महाराष्ट्रात पावाला डिमांड मिळाला तो वड्यामुळे. बटाट्याच्या भाजीपासून केलेले गोळे बेसनात बुडवून तेलात सोडले की तयार होतो वडा. त्याच वड्याला पावात घातला की झाला वडापाव. आता हे सर्वांना माहिती आहेच. वडापाव दिसायला कसाही असो शेवटी त्याची चव काय आहे ? यावरून त्याचा दर्जा कळतो. वडा पावाला पुढे चटणी आणि मिरचीची जोड आली. आणि चटणी मिरची शिवाय लोकांनी वडापाव खाण्याला नाराजी दर्शविल्याने विक्रेत्यांना देखील खादाड मंडळींच्या जिभेचे चोचले पुरवायला घेतले. एकीकडे जिभेचे लाड आणि दुसरीकडे खिसा जाड. धावपळीच्या युगात घराबाहेर असताना वेळेची आणि पैशांची बचत करून पोट भरण्यासाठी वडपावची जागा कुणीही घेऊ शकत नाही.

Vadapav history :- आम्ही घेतलेल्या शोधात अशी माहिती मिळाली की हा वडापाव मुळात मुंबईत तयार झाला आहे. स्वातंत्र्या नंतरच्या काळात मुंबईत गिरणी कामगारांचे मोठे प्रमाण वाढले होते. याचदरम्यान १९६६ साली दादर रेल्वे स्थानकात अशोक वैद्य यांनी या वडपावला प्रथम विक्रीसाठी आणले. तयार केलेली बटाट्याची भाजी बेसनात घोळून त्यांनी उकळत्या तेलात सोडली आणि वड्याचा जन्म झाला. बटाट्याचा वडा रेल्वे स्थानकात खूप प्रसिद्ध होऊ लागला. पुढे हा वडापाव गरमगरम खाणे जरा कठीणच होते. आणि मग पुढे लगेचच याच वड्याला मिळाली पावाची जोड. आणि वडापाव खऱ्या अर्थाने उदयाला आला. वैद्य यांनी बनवलेला वडापाव पाहून ठिकाणी स्टोल लागू लागले.

वडापाव आणि शिवसेना :- त्याकाळात दाक्षिणात्य लोकांनी मुंबईत आपले पदार्थ विकून जम बसवला होता. पण नव्यानेच सुरू झालेली बाळासाहेबांची शिवसेना हलहळू विस्ताराला लागली होती. आणि एके याच वड्याने बाळासाहेब ठाकरेंच्या जीभेला तृप्त केले. जिभेवर रेंगाळलेली चव त्यांच्या डोक्यात गेली आणि त्यांनी याच वडापावला चालना दिली. मराठी माणसाचा वडापाव मुंबईसह महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्यामागे बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान विसरून चालणार नाही. आणि याच वडापावने पुढे दाक्षिणात्य पदार्थांच मार्केट ठप्प करून मुंबईत स्वतःच आणि परिणामी मराठी अस्मितेच नाव उच्च स्थानी नेलं. पुढे शिवसेनेने शिव वडा नावाने उद्योग सूरू केला. आणि शिवसैनिकांनी वडापावच्या व्यवसायात पाय रोवले.

Diwadkar Vadapav Karjat :- मुंबई पुणे प्रवास करीत असताना कुणी दिवाडकरांचा वडा खाल्ला नाही असे खूप कमी लोकच असतील. आता तुम्ही म्हणाल पहिल्या सारखा राहिला नाही. आता हे ग्राहकांचं म्हणणं आहे त्याच्या जिभेने केलेले परीक्षण. वडापावचा जन्म झाल्या नंतर पुढील काही वर्षानंतर कर्जतमध्ये दिवाडकरांचा वडापाव प्रसिद्ध झाला. त्याकाळी रेल्वे स्थानक म्हणजे विशेष गजबजाट नसायची. एक रेल्वेगाडी गेली की शुकशुकाट. ना कसली अनाऊन्समेंट, ना लोकांच्या बडबडीचा आवाज, ना बाहेरील गाड्यांचे हॉर्न. अतिशय शांत वातावरण कर्जत रेल्वे स्थानकात असायचे. मनुष्य वस्ती देखील फारशी नव्हती. या काळात डेक्कन क्वीन सारखी एक्स्प्रेस या स्थानकात खूपवेळ थांबायची. त्याचे कारण असे की कर्जतच्या पुढे खंडाळा घाट सुरू होत असल्याने इथे एक्स्ट्राचे इंजिन जोडण्याची गरज भासायची. आणि इंजिनच्या जोडजोडीला बराच वेळ निघून जायचा. मुंबईपासून प्रवास करून आलेले पुण्याकडे निघालेले प्रवासी कर्जत पर्यंत येई पर्यंत भुकेले असतात. आणि म्हणूनच इथे वडापावची विक्री अधिक प्रमाणात होते.

कर्जतपासून पुढे राहत असलेले बाबुराव दिवाडकर यांनी या गोष्टीचा फायदा करायचे ठरवले. त्यांनी सुरुवातीला घरून परातभर वडे बनवून आणले आणि रेल्वे येताच विकायला घेतले. मुंबईपासूनचा प्रवास, पुढे घाट मध्ये खाण्यास काही नाही. म्हणून त्यांचे वडे पटापट विकले गेले. हळूहळू त्यांनी वडे वाढवले. पण जितके वाढतील तितके वडे विकले जाऊ लागले. आणि पाहता पाहता दिवाडकर वडापाव ब्रॅन्ड बनला. पुढे हा व्यवसाय बनला आणि आता या वडापावची फ्रँचायजी विकली जाते. त्यामुळे आता या वडापावचं नाव जरी दिवाडकर असलं तरी तो बनवणारा दिवाडकरच असेल हे सांगता येत नाही. पण तेव्हाचा आणि आताचा वडापाव यात जमीन आणि आसमानाचा फरक आहे. आकारा सोबतच चव देखील बदलली असल्याचे ग्राहक सांगतात. एकंदरीतच आता हा वडापाव आवर्जून नव्हे तर भुकेपोटी नाईलाजाने खाल्ला जात असल्याचे खाणारे म्हणतील. असोत खवय्यांना नाराज केल्याचा परिणाम व्यवसायावर होतो हे कळायला वेळ लागत नाही.

वडापाव महाराष्ट्राच्या गावागावांत :- मुंबईतून निघालेला वडापाव हळुहळु बाहेर पडला आणि संपुर्ण महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात जाऊन पोहोचला. आता वडापाव फक्त मुंबईचा राहिलेला नसून तो संपूर्ण महाराष्ट्राचा झालेला आहे. खेडोपाड्यात एसटी स्टॅन्डवर एक रुपयाला स्वादिष्ट वडापाव विकला जाऊ लागला. आज प्रत्येक गाव खेड्यात आणि तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला फेमस वडापाव हॉटेल नक्कीच मिळेल. जसे की महाराष्ट्रातील संगमनेर, नारायणगाव, आळेफाटा इथे एसटी प्रवासी वडापाव वर ताव देतात. कोल्हापुरात पावावर का जुलूम होत आहे माहीत नाही. कारण येथील वड्याची चव इतकी खास नाही आणि शिवाय पावाच्या जागी ब्रेड दिला जातो. त्यामुळे याठिकाणी वडापाव खाण्याचे समाधान मिळत नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

बदलता वडापाव :- सुरुवातीला वडा…पुढे पावाची जोड… चटणीची चव… आणि ठेचा किंवा मिर्चीचा झणका… इथपर्यंत वडापाव खाण्यात खरी गंमत आहे. पण आता वडापाव मध्ये छेडछाड करून त्यात वैविध्यता आणण्याचा प्रयत्न खूप वेळा केला जातो. प्रत्येक प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यांची एक वेगळी आणि जबरदस्त अशी चव आहे. कारण चवीनेच प्रसिद्धी दिलेली असते. काही वडापाव विक्रेते हे आपल्या वड्या बरोबर चटणी देताना खूप काळजी घेतात. आणि फक्त चटणीमुळे देखील तिथला वडपाव प्रसिद्ध होतो.

२०१० च्या दशकात मुंबईत काही ठिकाणी वडापावची साईज मोठी केली आणि जम्बो वडापाव म्हणून मार्केट जमवले. तर पुढे पाश्चिमात्य बर्गरचा क्रेज पाहून काहींनी वडापावचा आकार देखील गोल केला आणि गोली वडापाव नावारुपाला आला. २०२० च्या दशकात काही लोकांनी वडपावला चायनीज चटण्यांमध्ये बुडवून विकला. नावीन्य असल्याने प्रसिद्धी देखील मिळाली. काहींनी तर चीज,बटर,व्हाईट सॉस शक्य होईल तितके नवनवीन प्रयोग वडापाव सोबत केले. यामुळे आजच्या तारखेला १२ रुपयांचा साधा वडापाव आणि २५ रुपयांचा हायजेनिक वडापाव असे प्रकार बनले. किती बदल जरी झाले तरी साधा आणि खरा वडपावच आज सर्वाधिक लोकांची पसंद बनलेला आहे. २०३० च दशक सुरू झालेल आहे. त्यामुळे इतक्या वर्षांचा वडापाव आणखी कोणती रूप घेतो हे येणारा काळच सांगेल. तो पर्यंत खात रहा आणि भरवत रहा… मराठमोळा वडापाव.

सदर लेख तुम्हाला कसा वाटला ? हे नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला आणखी कशी माहिती वाचायला आवडेल याबद्दलही आपल्या सूचना कळवा.

-संतोष दिवाडकर

Mumbai’s Vada pav becomes Maharashtra’s favourite; Vadapav history

कल्याण पुर्वेत रक्षाबंधना निमित्त धर्मवीर आनंद दिघे उद्यानात वृक्षारोपण; “रक्षा वृक्षांची” दिला संदेश

आरक्षित भुखंडावर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आरक्षित भुखंडाच्या सीमेवर झाडे लावून  भुखंड सुरक्षित ठेवण्याबाबत निर्देश दिले असल्याने आरक्षित भुखंडावर झाडे लावण्यात येत आहेत. कल्याण पुर्वीतील “ड” प्रभाग क्षेत्रातील आमराई विजय नगर परिसरातील धर्मवीर आनंद दिघे उद्यान या आरक्षित भुखंडावर विदर्भ युवक मंडळ यांच्या आयोजना नुसार रक्षा बंधन व नारळीपोर्णिमेचे औचीत्त साधुन विभागीय उप आयुक्त अनंत कदम यांच्याहस्ते वृक्षरोपण करण्यात आले. याप्रसंगी “ड” प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल, स्थानिक नगरसेविका माधुरी काळे, माजी नगरसेवक प्रशांत काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कल्याण पूर्व मध्ये रक्षाबंधन दिवशी वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षांची रक्षा करणे हे आजच्या निसर्गाच्या नियमांची गरज भासली आहे. वृक्षतोडीमुळे अनेक ठिकाणी निसर्गाचा नियम पायमल्ली झाल्यामुळे जीवित हानी पासून सृष्टीची हानी देखील सुरू आहे, माणसाने आपल्या सोयीनुसार अनेक बांधकामं, रस्ते तयार केलेत  आणि भरमसाठ वृक्षतोड झाली. ऑक्सिजनची कमतरता शहरांमध्ये भासत आहे. याकरिता सृष्टी रक्षा हेच “रक्षाबंधन व्हावं” या उद्देशाने कल्याण पूर्व मध्ये माधुरी प्रशांत काळे यांनी  सामाजिक संस्थेसोबत वृक्षारोपण घेवून मोलाचे कार्य केले आहे.

या भव्य वृक्षारोपण कार्यक्रमात प्रभागातील नागरिकांनी नगरसेविका माधुरी काळे यांनी स्वेच्छेने  वृक्षारोपणासाठी झाडे ,फुलझाडे देण्याच्या मागणीस चांगला प्रतिसाद दिला. नागरिकांनी दिलेली ही झाडे त्यांच्या नावाने लावण्यात येणार आहेत. यावेळी ड प्रभाग अधीक्षक संजय कुमावत, विदर्भ युवक मंडळाचे संस्थापक पी. डी. चौधरी, अध्यक्ष उत्तम पाटील, सचिव सुरेश ढगे, विश्वस्थ विजय गैगावली, सुरेखा कपले, कासार, सिद्धिविनायक सामाजिक संस्थेच्या संचालिका सुरेखा गौरे, आशा चौधरी, विजय नगर हौसिंग फेडरेशनचे सचिव प्रदीप तांबे, खजिनदार, वासुदेव कदम, संचालक कानसे, संभाजी माने, नरेश कासार, किरण गौरे, विनय ठोकळे आदींसह नागरिक उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी दिवा जंक्शनहून विशेष रेल्वे गाड्या सोडा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी दिवा जंक्शन वरून विशेष रेल्वे गाड्या सोडाव्यात अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे यांच्याकडे केली असून त्याबाबतचे पत्र सुद्धा दिले आहे.

याबाबत मनसे आमदार यांनी सांगितले की कोकणातील बहुतांश रहिवासी नोकरी व्यवसायानिमित्त दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर अगदी कसारा-खोपोली राहतात. दरवर्षी सहकुटुंब गणेशोत्सवानिमित्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील आपआपल्या मुळ गावी जाऊन पारंपारीक पद्धतीने सण साजरा करतात. गेल्या दिड वर्षापासून कोविडचे संकट सुरु आहे. त्यामुळे पहिला लॉकडाऊन सुरु लागल्यापासून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना वरदान ठरणारी दिवा-सावंतवाडी पॅसेंजर व दिव्याला थांबा असणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर या गाड्या बंद करण्यात आलेल्या असून अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. आता गणेशोत्सवानिमित्त रेल्वेकडून काही विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. परंतु त्यामध्ये दिवा जंक्शनमधून एकही गाडी सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकणकर संभ्रमात पडले आहेत.

कोविडची तिसरी लाट गृहीत धरुन शासनाकडून रेल्वे प्रवासालाही अटी घालण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये दोन डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. सद्यस्थिती पाहता बहुतांश जणांना दोन डोस नाहीच पण एकही डोस अजून पर्यंत मिळालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये दिवा ते अगदी खोपोली, कसारा पर्यत राहणाऱ्या कोकणकरांना गावी जाण्यासाठी ठाणे, दादर, सीएसएमटी किंवा पश्चिम रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवास करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आधीच कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांचे हाल होणार आहेत.

त्यामुळे कोकणात जाण्यासाठी जवळपास रेल्वे सेवा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तरी रेल्वेने याची तातडीने दखल घेऊन कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी सोयीचे ठरणाऱ्या दिवा जंक्शनवरुन दिवा-सावंतवाडी व दादर-रत्नागिरी पॅसेंजरसह जास्तीत जास्त गणेशोत्सव स्पेशल ट्रेन सोडून प्रवाशांची सोय करावी अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

ऑनलाईन इकोफ्रेंडली गणेशा मेकिंग वर्कशॉप; ११९४ विद्यार्थ्यांनी साकारला आपला बाप्पा

ऑनलाईन इकोफ्रेंडली गणेशा मेकिंग वर्कशॉपमध्ये ११९४ विद्यार्थ्यांनी आपला बाप्पा साकारत पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याचा मूलमंत्र दिला आहे. आविष्कार एज्युकेअर फाउंडेशन, एनजीओ गेल्या दहा वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी इकोफ्रेंडली गणेशा मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करत आले आहे. प्रेत्येक वर्षी असंख्य विदयार्थी या वर्कशॉपच्या माध्यमातून प्रत्यक्षरीत्या आपल्या कलेला नवीन आयाम देत असतात. नावीन्य पूर्ण कौशल्य आत्मसात करत असतात.

        यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात वर्कशॉप घेणे शक्य नसल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने जागतिक इकोफ्रेंडली गणेशा मेकिंग वर्कशॉप आविष्कारच्या माध्यमातून घेण्यात आला. यातून ११९४ विद्यार्थ्यांनी आपल्या घरी बसून इकोफ्रेंडली गणेशा (आपला बाप्पा) बनवण्याचा आनंद घेतला.  कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात सकारत्मक ऊर्जा आणि कार्य, नाविन्यपूर्ण कला शिकण्याची ही सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना आविष्काने दिली.  यातूनच आपण सर्व एकत्र येऊन पर्यावरण संवर्धन करू शकणार आहोत. पर्यावरण संवर्धनाच्या आमच्या प्रयत्नांना जन्सामण्यांमधून खूप उत्तम प्रतिसाद, साथ मिळत आहे.  सर्व सहभागी विद्यार्थ्यांना  सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

या तीन दिवसीय वर्कशॉप मध्ये पहिल्या दिवशी मनीष व्यापारी या गणेशमूर्ती कलाकार तसेच कलाशिक्षक यांनी हाताने गणपती बाप्पा कसा बनवायचा हे शिकवले. दुसऱ्या दिवशी गणेश गव्हाणकर यांच्या गणेशमूर्ती वर्कशॉमध्ये शाडूच्या मातीपासून साच्याच्या माध्यमातून गणपती कसा बनवायचा त्याचे फिनिशिग, अलंकार, सजावट कशी करायची हे शिकविण्यात आले. तर तिसऱ्या दिवशी आपण बनवलेल्या बाप्पाचे रंगकाम, सजावट, डोळ्याची आखणी व घरच्या घरी इकोफ्रेंडली पद्धतीने बाप्पाचे विसर्जन कसे करावे हे सांगण्यात आले. यासाठी गणेशमूर्ती कलाकार गणेश गव्हाणकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

       शाडूची भिजवलेली माती किंवा लाल भिजवलेली माती, चमचा, पेन रिफिल व इतर, बाप्पासाठी पाठ, सुती कापड, प्लॅट ब्रश, पाण्यासाठी वाटी किंवा मग अशा साहित्याचा उपयोग करण्यात आला.  या वर्कशॉमध्ये धुळे, जळगाव, मलकापूर, पुणे, कोल्हापूर, नागपूर, आनंदवन, सांगली, सातारा, औरंगाबाद, वाशी, पनवेल, मुंबई अश्या विभागातून अवघ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी साहबाग नोंदवला.

       या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी तहसीलदार रतीलाल चव्हाण, उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, आविष्कार फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन जाधव, खजिनदार गिरीश मंजुळे, दलजीत बोन्स, स्पूर्ती फाऊंडेशनचे बजरंग तांगडकर, प्रणय काटे, अदिती कदम, हे उपस्थित होते. आविष्कार चे संस्थापक सचिव विनोद शेलकर यांनी सूत्रसंचालन केले. रोहित माळी आणि तन्मय चव्हाण यांनी हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मोलाची कामगिरी केली.

-कुणाल म्हात्रे

गावातच ११ वी १२ वीचे वर्ग सुरु करण्याची कल्याण तालुक्यातील फळेगाव ग्रामस्थांची मागणी

कल्याण तालुक्यातील फळेगाव, नडगाव, दानबाव, रुंदे, उशीद, हाल, मढ, आंबीवली या गावांतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी गोवेली किंवा कल्याण मधील कॉलेज असे दूर अंतरावर जावे लागते. त्यामुळे येथे जाण्यासाठी  लागणारा वेळ, मुलां-मुलींची सुरक्षितता, पालक वर्गाला बसणारा आर्थिक फटका या सर्व बाबींचा विचार करून नुकतच फळेगाव येथे ११वी आणि १२ वीचे आर्ट्स, कॉमर्स व सायन्सचे वर्ग सरू करण्याबाबत छत्रपती विद्यालय यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी गावातील सरपंच, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना वह्या देखील वाटप करण्यात आल्या. भविष्यात फळेगाव येथे ११ वी, १२ वी चे वर्ग लवकरात लवकर सुरु व्हावेत अशी भावना अनेक पालकानी व्यक्त केली आहे.

-कुणाल म्हात्रे