कल्याण परिमंडळात लाखो ग्राहकांनी थकवली करोडो रूपयांची बिलं; महावितरणावर गुडघे टेकवण्याची वेळ

महावितरणच्या कल्याण परिमंडलात लघुदाब वर्गवारीतील (कृषी वगळून) तब्बल ८ लाख ७९ ग्राहकांकडे वीजबिलाची ३९१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. परिणामी महावितरणला कठीण आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. परिमंडलातील ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे व अखंडित वीजसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कल्याण परिमंडलाचे नवनियुक्त मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.

धनंजय औंढेकर हे नुकतेच कल्याण परिमंडलाच्या मुख्य अभियंतापदी रुजू झाले आहेत. यापूर्वी ते मुख्य कार्यालयातील देयके व वसुली विभागात मुख्य अभियंता पदावर कार्यरत होते. कल्याण परिमंडलातील विजेची हानी कमी करून महसूल वाढीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी परिमंडलातील अधिकारी, कर्मचारी, संघटना प्रतिनिधी, मीटर रिडींग, वीजबिल वाटप व पायाभूत सुविधा उभारणाऱ्या एजन्सीज समवेत संवाद साधून आगामी कामांबाबत भूमिका मांडली. कल्याण, डोंबिवलीचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत १ लाख ६७ हजार ३२३ ग्राहकांकडे ३८ कोटी ८२ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे.

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर, मुरबाड व ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण समाविष्ट असलेल्या कल्याण मंडल कार्यालय दोनमधील २ लाख ४७ हजार ९९ ग्राहकांकडे १८३ कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. वसई, विरार, वाडा, नालासोपारा, आचोळे भागाचा समावेश असलेल्या वसई मंडलात ३ लाख २६ हजार १३२ ग्राहकांकडे लाख १०३ कोटी ८२ लाख रुपयांची तर पालघर, डहाणू, बोईसर, जव्हार, मोखाडा, तलासरी, विक्रमगड, सफाळे भाग समाविष्ट असलेल्या पालघर मंडलात १ लाख ३८ हजार ६९५ ग्राहकांकडे ६५ कोटी ३३ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. 

यात ग्रामपंचायतींच्या १ हजार ७१३ पथदीप जोडण्यांचे १२७ कोटी ७ लाख आणि पाणीपुरवठा योजनांच्या ९९० जोडण्यांचे २ कोटी ८६ लाख रुपयांच्या वीजबिल थकबाकीचा समावेश आहे. पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचे वीजबिल पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून प्राधान्याने भरावेत व याची जबाबदारी संबंधित सरपंच व ग्रामसेवकांवर असल्याचे परिपत्रक शासनाने जारी केलेले आहे. त्यानुसार वीजबिलाचा भरणा न झाल्यास पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असून होणाऱ्या गैरसोयीस संबंधित ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहणार आहे. 

महावितरणची सध्याची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसूल करण्याचे निर्देश मुख्य अभियंता औंढेकर यांनी दिले आहेत. त्यासाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, थकबाकीपोटी तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची तपासणी व अशा ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर आढळल्यास वीज कायदा २००३ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याच्या सक्त सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनीही थकबाकी व पुनर्रजोडणी शुल्क भरून विजेचा रीतसर वापर करावा आणि कारवाई टाळावी, असे आवाहन त्यांनी ग्राहकांना केले आहे.

-कुणाल म्हात्रे

‘ते’ दोघं ठरले भाजपासाठी सुपरहिरो; शिवसेना नेत्यांना प्रतिकार करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांचा जंगी सत्कार

भाजपा कार्यलयावर हल्ला करणाऱ्या शिवसेना नेत्यांना प्रतिकार करणाऱ्या प्रताप टूमकर आणि वैभव सावंत या भाजप पदाधिकाऱ्यांचा भाजपतर्फे जिल्हा कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, आमदार गणपत गायकवाड, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, नंदू परब, कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा चौधरी, नाना सूर्यवंशी आदींसह इतर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधा तील शिवसेनेच्या आंदोलनाचे पडसाद कल्याणात देखील उमटले. शिवसेनेचे महानगरप्रमुख विजय साळवी व शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यानी काल कल्याण पश्चिमेकडील भाजपच्या कल्याण शहर कार्यालयाला लक्ष करत दगडफेक करत कार्यालयाच्या काचा फोडल्या. यावेळी भाजपचे हे दोन पदाधिकारी त्याठिकाणी कार्यलयाच्या संरक्षणासाठी उपस्थित होते. व्हायरल व्हिडीओमध्ये त्या ठिकाणी आणखी दोन जण देखील दिसत होती. मात्र आक्रमक शिवसेनेच्या नेत्यांनी खिडकीवर दगड मारताच त्या दोघांनी काढता पाय घेतला. निघून जाणारे दोघे जण कोण होते ? याबाबत ठोस माहिती नाही. मात्र इतर दोन जन शिव्या आणि धक्काबुक्की झेलत त्याठिकाणी दिसत होते.

याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेत्यांना प्रतिकार करणाऱ्या भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष प्रताप टूमकर व वैभव सावंत या दोन्ही कार्यकर्त्यांचा भाजप जिल्हा कार्यलयात भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार गायकवाड यांनी हा सत्कार नसून सन्मान असल्याची प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देशाचा स्वातंत्र्य दिवस कितवा हे माहीत नसणं खूप मोठं दुर्दैव आहे. अतिशय खेदजनक बाब आहे आणि त्यावर फक्त प्रतिप्रश्न विचारला म्हणून केंद्रीय मंत्र्याला सूडबुद्धीने अटक करणं हे कोणत्या लोकशाहीमध्ये धरून आहे. या घटनेवरून पूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरणे, तोडफोड करणे, मारहाण करणे या गोष्टीचा जाहीरपणे निषेध करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष शशीकांत कांबळे यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांचा कायापालट करण्याच्या तयारीत महापालिका; एका कंपनीशी झाला सामंजस्य करार

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून महापालिका परिसरातील रस्त्यांचा आता कायापालट होणार असून महापालिका क्षेत्रातील 22 रस्त्यांमधील रस्ता दुभाजक व 7 वाहतुक बेटे यांचे सुशोभिकरण आणि निगा, देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने क्रेडाय एमसीएचआय, कल्याण यांच्या बरोबर नुकताच एक सामंजस्य करार केला आहे.

महापालिकेच्या विकास आराखडयातील वाहतूक बेटे, रस्ता दुभाजक इ. चे सुशोभिकरण, निगा, देखभाल करण्यासाठी 5 वर्षाच्या कालावधीसाठी महापालिकेने हा करार केला आहे. यानुसार रस्ता दुभाजक, चौक यामध्ये हिरवळ, झाडे लावणे व त्यांची दैनंदिन निगा, देखभाल करणे त्याचप्रमाणे प्रत्येक रस्ता दुभाजकाला व गार्ड स्टोनला वर्षातून एकदा रंगरंगोटी करणे व वर्षातून दोन वेळा पाण्याने धुणे व किरकोळ दुरुस्ती सुद्धा करण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची राहणार आहे. त्याबदल्यात वाहतूक बेटे व रस्ता दुभाजकाच्या विदयुत खांबावर जाहिराती चे हक्क विकासकांना विना शुल्क स्वरुपात देण्यात आले आहे. व तसेच सामाजिक संदेश व महापालिकेने दिलेले संदेश लावणे संबंधित विकासकास बंधनकारक राहील.

   महापालिका क्षेत्रातील पुना लिंक रोड( सुचक नाका) ते विठ्ठलवाडी , चक्की नाका ते मलंग रोड, चेतना नाका ते साकेत कॉलेज, नेतीवली नाका ते चक्की नाका, मूरबाड डायव्हर्शन रोड( दुर्गाडी ते प्रेम ऑटो), गांधारी रोड ( लाल चौकी ते गांधारी पुल), संतोषी माता रोड ( सहजानंद चौक ते इंदिरा नगर), बेतुरकरपाडा ते खडकपाडा, बारावे रोड (खडकपाडा ते गोदरेज हिल), बिर्ला कॉलेज ते चिकणघर, निक्की नगर ते माधव संकल्प, निक्की नगर मधील भोईर चौक, विशाल भोईर चौक ते उंबर्डे रोड, एमएसआरडीए 45 मिटर ते साई सत्यम होम्स, कोलीवली रोड, विश्वनाथ भोईर बंगलो- 18 मिटर ते कडोमपा पाण्याची टाकी,काली मश्जिद ते चिकणघर, प्रेम ऑटो ते शहाड पूल, शहाड – मोहने रोड, वैष्णवी देवी मंदिर ते टिटवाळा स्टेशन, टिटवाळा स्टेशन ते गणेश मंदिर,रेल्वे समांतर (90 फुट रोड), ठाकुर्ली, सावित्रीबाई फुले नाटयगृह रोड, घारडा चौक ते मंजूनाथ शाळा या 22 रस्त्यांमधील रस्ता दुभाजकांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे चक्की नाका सर्कल कल्याण (पूर्व), म्हात्रे नाका सर्कल साकेत कॉलेज रोड  कल्याण (पूर्व),  कोळीवली रोड 18 मी. व 15 मी. जंक्शन रस्ता येथील सर्कल, सेंट लॉरेन्स शाळेजवळ आधारवाडी कल्याण (प) येथील सर्कल, कोलीवली सर्कल, प्रांत ऑफिस वायले नगर चौक, टिटवाळा मंदिर सर्कल अशी 7 वाहतूकबेटे/सर्कल यांचे सुशोभीकरण करण्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मान्यता दिली आहे. यानंतर याबाबतचा करारनामा नुकताच महापालिकेच्या वतीने शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली आणि क्रेडाय एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी केला असून यावेळी महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव, क्रेडाय एमसीएचआयचे सेक्रेटरी विकास जैन, खजिनदार साकेत तिवारी हे उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

भाजप कार्यालय वाचवण्यासाठी उभं राहिलेल्या आणि कार्यालय फोडणाऱ्या दोन्ही कार्यकर्त्यांचा पक्षाने केला गौरव

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचे कल्याण मध्ये चांगलेच पडसाद उमटले आहेत. शिवसेनेने भाजपा कार्यालय फोडल्यानंतर कल्याण मधील राजकारण चांगलेच तापले आहे. एकीकडे भाजपा कार्यलय फोडणारया शिवसैनिक अमोल गायकवाड याचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. तर दुसरीकडे भाजपा कार्यकर्ता प्रताप टूमकर यांचा देखील भाजपा पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला आहे.

आज दुपारच्या वेळी शिवसैनिक कल्याण मधीलच भाजप कार्यालय फोडण्यासाठी आले होते. मात्र या ठिकाणी भाजपचा एक कार्यकर्ता त्यांना विरोध करीत होता. जेव्हा शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयावर हल्ला केला तेव्हा मारहाण होऊन देखील प्रताप टूमकर यांनी तेथून न हलता ते तिथेच उभे राहिले. याबद्दल त्यांचा भाजपाच्या वतीने शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

एकीकडे ही सर्व झटापट होत असताना शिवसैनिक अमोल गायकवाड याने स्वतःची पर्वा न करता आपल्या हाताच्या बुक्कीनेच भाजपा कार्यालयाची काच फोडली. या धाडसी कृत्याबद्दल अमोल गायकवाड याचा देखील महानगरप्रमुख विजय साळवी आणि उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांनी गौरव केला.

-कुणाल म्हात्रे

‘यापूढे शिवसेनेला जशास तसे उत्तर देणार’; कार्यालयावरील हल्ल्यानंतर भाजप शहर अध्यक्षांचा ईशारा

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात कल्याणात शिवसेनेकडून भाजपच्या शहर कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्याविरोधात संतप्त झालेल्या कल्याण शहर भाजपकडून शिवसेनेला यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा भाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी  दिला आहे. तसेच या हल्ल्याप्रकरणी शिवसेना महानगरप्रमुख विजय साळवी यांच्या अटकेच्या मागणीसाठी भाजपने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या मांडला होता.

केंद्रीय मंत्री नारायण नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे आज संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. तर कल्याणात मात्र शिवसेनेकडून निषेध करण्यासह भाजपच्या शहर कार्यालयावर हल्ला करत तोडफोड करण्यात आली. भाजप कार्यालयावर दगडफेक करण्यासह त्याला विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यालाही यावेळी मारहाण झाली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या कल्याण शहर भाजप पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या विजय साळवी यांच्या अटकेची मागणी केली.

 त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला. याठिकाणी रस्त्यावरच ठिय्या मांडत झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच शिवसेनेचे महानगरप्रमुख विजय साळवी यांना पोलिसांनी अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिला. शिवसेनेमध्ये खरोखर हिंमत होती तर आम्हाला सांगून त्यांनी हा हल्ला करायला पाहीजे होता. यापूढे शिवसेनेला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही यावेळी शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिला.

-कुणाल म्हात्रे

कल्याणमध्ये नारायण राणें विरोधात पेटून उठली शिवसेना; तीव्र आंदोलनात पुतळा, चपला आणि कोंबड्या

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्या मध्ये मागील काही दिवसांपासून शाब्दिक चकमकी सुरू होत्या. मात्र आता हा वाद विकोपाला गेला असून टीकेची पातळी देखील खालावताना दिसतेय. राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रभर तीव्र आंदोलने केली जात आहेत. कल्याण मध्येही विविध ठिकाणी शिवसैनिकांनी तीव्र आंदोलने करीत राणेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

एकेकाळचे शिवसेनेचे मुख्यमंत्री नारायण राणे ते भाजपाचे केंद्रीय मंत्री असा राजकीय प्रवास केलेले नारायण राणे हे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडे जन आशीर्वाद यात्रेवर असल्यापासून राणे आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू होत्या. शेवटी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल शिवसैनिकांनी राज्यभर आंदोलने केली आहेत. कल्याण मध्ये शिवसेनेचे मोठे वर्चस्व असल्याने या शहरात देखील या आंदोलनाचे तीव्र असे पडसाद उमटले आहेत. शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून ही आंदोलने करण्यात आली.

कल्याण मध्ये शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. ज्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या एका कार्यालयाचे नुकसान केल्याचे समोर आले. डोंबिवलीत देखील शिवसेनेकडून राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमार आंदोलन केले. तर दुसरीकडे शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पूर्वेत शिवसेना शाखेसमोर राणें विरोधात घोषणाबाजी करीत रोष व्यक्त करण्यात आला. तर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेरही शिवसैनिक एकवटले होते. यावेळी नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा झोड देण्यात आला. तसेच या आंदोलनात कोंबड्या दाखवून निषेध करण्यात आला.

एकीकडे इंधनाचे दर आणि महागाई प्रचंड वाढली आहे आणि हे जन आशीर्वाद यात्रा काढत आहेत. या जन आशीर्वाद यात्रा नसून जन शाप यात्रा आहेत. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांनी कल्याण मध्ये येऊन यात्रा काढून दाखवाव्यात असे खुले आव्हान महेश गायकवाड यांनी राणे यांच्यावरील रोष व्यक्त करताना दिले आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप राणेंच्या पाठीशी असल्याचे सांगितले. मात्र नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याला भाजपचे समर्थन नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर भाजप कार्यालयाची नुकसान करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

नारायण राणें विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी पोलीस रवाना झाले. याचदरम्यान राणे यांनी अटकपूर्व जामीन देखील केला होता. मात्र न्यायालयाने राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्या नंतर पोलिसांनी आता नारायण राणेंना अटक केली आहे.

-संतोष दिवाडकर

किकबॉक्सिंग स्पर्धेत टिटवाळयातील खेळाडूंची यशस्वी किक

ठाणे जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशन आणि फ्रॅपर फोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मंदिर हॉल, मुलुंड येथे शनिवारी प्रथमच अल्टिमेट मुंबई विभाग स्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत टिटवाळ्यातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करत यश मिळविले आहे.

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे गेल्या एक ते दीड वर्षापासून क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळांच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक खेळाडू खेळाच्या सरावापासून व स्पर्धे पासून वंचित होते. परंतु तब्बल १८ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधी नंतर पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यात शासनाने नेमून सर्व नियमांचे पालन करून विभाग स्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विभागातील सुमारे २०० पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेसाठी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

 टिटवाळा येथील विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन येथे मुख्य प्रशिक्षक विनायक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणारे गौरी तिटमे, मृण्मयी भोजणे, यश राठोड आणि भुषण जाधव हे ४ खेळाडू देखील या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. या स्पर्धेत अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत या खेळाडूंना अनुक्रमे गौरी तीटमे – सुवर्ण पदक, मृण्मयी भोजने – रौप्य पदक, भुषण जाधव – रौप्य पदक, यश राठोड – सहभाग असे १ सुवर्ण, २ रौप्य पदके प्राप्त झाले. या स्पर्धेत राष्ट्रीय किक बॉक्सिंग खेळाडू व क्रीडा प्रशिक्षक हरीष वायदंडे आणि गणेश गायकवाड यांनी पंच म्हणून कार्य केले.

          ऑलिंपिक खेळाच्या पार्श्व भूमीवर अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त युवक व युवतींनी सहभागी होऊन नक्कीच पुढील ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना सहभागी होण्यासाठी क्रीडा प्रशिक्षक प्रयत्न करत आहेत. या स्पर्धेचे आयोजक व ठाणे जिल्हा किकबॉक्सिंग असोसिशनचे अध्यक्ष मोहन सिंग आणि सचिव संजय कटोडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

-कुणाल म्हात्रे

शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे नावाच्या तुलसीदासाचे हात टिटवाळ्यात दाखल

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतेच वयाच्या शतकोत्तर वर्षात पदार्पण केलंय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं पासुन समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झालायं. या बाबासाहेब पुरंदरे नावाच्या तुलसीदासाच्या हाताचे ठसे टिटवाळा येथील संस्कृती संग्रहालयात संग्रहीत करण्यात आले असून ते सगळ्यांनाच पहायला मिळणार आहेत. 

गेली ७ दशकं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवाजी महाराजांच्या चरित्राचा बाबासाहेब पुरंदरे कधी शिवचरीत्राच्या माध्यमातुन तर कधी जाणता राजा महानाट्यातुन, कधी व्याख्यानातुन तर कधी शिवकल्याण राजाच्या  माध्यमातुन जागर करताहेत. शुक्रवारी संस्कृती संग्रहालय, टिटवाळासाठी याच शिवशाहिरांच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहेत. पुण्याला बाबासाहेबांच्या निवासस्थानी मुर्तीकार प्रशांत गोडांबे, संस्कृती संग्रहालयाचे संचालक अविनाश हरड, संकल्पक युवासेना पदाधिकारी ॲड. जयेश वाणी व संग्रहालयाच्या कायदेशिर सल्लागार दिव्या ठाकुर यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या हाताचे ठसे आणि त्यावर त्यांची स्वाक्षरी घेण्यात आली.

श्रीमहागणपतीच्या टिटवाळा या पावन नगरीत संस्कृती संग्रहालय आकाराला येत आहे. याच संग्रहालयात महारष्ट्राच्या समाजकारणात, कलाक्षेत्रात, क्रिडाक्षेत्रात, धार्मिकक्षेत्रात व राजकारणात महाराष्ट्राला योगदान देणाऱ्या दिग्गज व्यक्तिंच्या हातांचे ठसे पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणा म्हणुन संवर्धित करण्याचे काम सुरु आहे. जगातील या एकमेव अशा प्रकारच्या संग्रहालयात आता बाबासाहेबांचे प्रेरणादाई हात सगळ्यांनाच पहायला मिळतील.

-कुणाल म्हात्रे

लसीकरणाच्या बाबतीत कल्याण पूर्वेशी दुजाभाव ? पालिका प्रशासनावर सामाजिक संघटनांचा रोष

कल्याण पुर्वेचा भाग हा महापालिका क्षेत्रातील इतर भागांच्या तुलनेत विकासापासून वंचित राहिला आहे अशी एक नेहमीची ओरड आहे. कल्याण पूर्वेला स्वतंत्र आमदार आहे. दोन महापौरही याच भागात होऊन गेले. कोटींच्या महागड्या गाड्या घेणारे तसेच अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिक कल्याण पूर्वेत राहतात. मात्र कोरोना काळात या कल्याण पूर्वेत लसीकरण केंद्रे जर पहायला गेलात तर कधी चार तर कधी कधी एकच केंद्र दिलं जातं. इतर परिसराच्या मानाने लोकसंख्या ही ४ लाखांच्या वर आहे त्यामुळे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी विरोधात सामाजिक संघटना रोष व्यक्त करताना दिसत आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. एकूण २४ केंद्र तर काही वेळेस १९ उभारली जातात. मात्र त्यात कल्याण पूर्वेला झुकते माप देऊन जेमतेम तीन ते चार केंद्रे दिली जातात. काही दिवशी तर १९ पैकी एकच लसीकरण केंद्र कल्याण पूर्वेत दिले जाते. त्यामुळे विकासाच्या बाता मारणारे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी आणि बाकीचे राजकीय पक्ष आहे कुठे असा संतप्त सवाल सामाजिक संघटना उपस्थित करत आहेत.

१९ केंद्रावर लसीकरण होत असताना

कल्याण पूर्व – १
कल्याण पश्चिम – ६
डोंबिवली मधे – ११
टिटवाळा – १

अशी केंद्र कधी कधी पालिका प्रशासन देते. आणि त्यामुळे कल्याण पूर्वेतील नागरिकांना कल्याण पश्चिम किंवा डोंबिवली मध्ये जावे लागत आहे. त्यात लसीच्या दुसऱ्या मात्रेसाठी पूर्वेकर मोबाईल लसीकरणाची वाट पाहूनही थकले आहेत.

लसीकरण सुरू झाल्यापासून असेच सुरू आहे. हे कल्याण पूर्वेला भिक दिल्या प्रमाणे लसीकरण केंद्र देत असतात हा अन्याय आहे. कल्याण पूर्वेचे लोक अतिशय शांत सुस्वभावी आहेत. आपल्या पक्षाला, माणसाला मतदान करणारे आहेत. याचा गैर फायदा प्रशासन घेत आहे की काय ? डोंबिवली चे विशेष कौतुक कारण ते मात्र बरोबर मिळवतात सर्व काही.

उदय रसाळ (माजी नगरसेवक)

दरम्यान आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी पाटील यांना याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केले असता कल्याण पूर्व साठी फिरते लसीकरण केंद्रे उभारण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कल्याण डोंबिवली परिसरात केंद्रे उभारण्याचे काम उपायुक्त पल्लवी भागवत यांच्या कडे आहेत असे स्पष्ट केले. भागवत यांना संपर्क केला असता त्यांना फोनचा स्वीकारच करता आला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

-रोशन उबाळे

मुंबईचा वडापाव बनला महाराष्ट्राचा फेव्हरेट; Vadapav history

Vadapav history : ‘वडापाव’……… एक अशी चव जी प्रत्येक महाराष्ट्रातील लोकांच्या जिभेवर जणू कोरली गेली आहे. आज २३ ऑगस्ट हा दिवस म्हणजे जागतिक वडापाव दिवस म्हणून ओळखला जातो. मग असे असेल तर आजच्या दिवशी मुद्दाम वडापाव खायलाच हवा. लहानपणापासून जो वडापाव आपण खात आलो तो वडापाव नेमका आणला कसा ? याबाबत अनेक कहाण्या आहेत पण माहीत खुप कमी लोकांना आहेत.

काय असतो वडापाव ? तर एक पावाचा तुकडा मधोमध भेदून त्यात टाकलेला बटाट्याचा बेसनात तळलेला एक गोल गरगरीत गोळा. आता महाराष्ट्रात पावाला डिमांड मिळाला तो वड्यामुळे. बटाट्याच्या भाजीपासून केलेले गोळे बेसनात बुडवून तेलात सोडले की तयार होतो वडा. त्याच वड्याला पावात घातला की झाला वडापाव. आता हे सर्वांना माहिती आहेच. वडापाव दिसायला कसाही असो शेवटी त्याची चव काय आहे ? यावरून त्याचा दर्जा कळतो. वडा पावाला पुढे चटणी आणि मिरचीची जोड आली. आणि चटणी मिरची शिवाय लोकांनी वडापाव खाण्याला नाराजी दर्शविल्याने विक्रेत्यांना देखील खादाड मंडळींच्या जिभेचे चोचले पुरवायला घेतले. एकीकडे जिभेचे लाड आणि दुसरीकडे खिसा जाड. धावपळीच्या युगात घराबाहेर असताना वेळेची आणि पैशांची बचत करून पोट भरण्यासाठी वडपावची जागा कुणीही घेऊ शकत नाही.

Vadapav history :- आम्ही घेतलेल्या शोधात अशी माहिती मिळाली की हा वडापाव मुळात मुंबईत तयार झाला आहे. स्वातंत्र्या नंतरच्या काळात मुंबईत गिरणी कामगारांचे मोठे प्रमाण वाढले होते. याचदरम्यान १९६६ साली दादर रेल्वे स्थानकात अशोक वैद्य यांनी या वडपावला प्रथम विक्रीसाठी आणले. तयार केलेली बटाट्याची भाजी बेसनात घोळून त्यांनी उकळत्या तेलात सोडली आणि वड्याचा जन्म झाला. बटाट्याचा वडा रेल्वे स्थानकात खूप प्रसिद्ध होऊ लागला. पुढे हा वडापाव गरमगरम खाणे जरा कठीणच होते. आणि मग पुढे लगेचच याच वड्याला मिळाली पावाची जोड. आणि वडापाव खऱ्या अर्थाने उदयाला आला. वैद्य यांनी बनवलेला वडापाव पाहून ठिकाणी स्टोल लागू लागले.

वडापाव आणि शिवसेना :- त्याकाळात दाक्षिणात्य लोकांनी मुंबईत आपले पदार्थ विकून जम बसवला होता. पण नव्यानेच सुरू झालेली बाळासाहेबांची शिवसेना हलहळू विस्ताराला लागली होती. आणि एके याच वड्याने बाळासाहेब ठाकरेंच्या जीभेला तृप्त केले. जिभेवर रेंगाळलेली चव त्यांच्या डोक्यात गेली आणि त्यांनी याच वडापावला चालना दिली. मराठी माणसाचा वडापाव मुंबईसह महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्यामागे बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान विसरून चालणार नाही. आणि याच वडापावने पुढे दाक्षिणात्य पदार्थांच मार्केट ठप्प करून मुंबईत स्वतःच आणि परिणामी मराठी अस्मितेच नाव उच्च स्थानी नेलं. पुढे शिवसेनेने शिव वडा नावाने उद्योग सूरू केला. आणि शिवसैनिकांनी वडापावच्या व्यवसायात पाय रोवले.

Diwadkar Vadapav Karjat :- मुंबई पुणे प्रवास करीत असताना कुणी दिवाडकरांचा वडा खाल्ला नाही असे खूप कमी लोकच असतील. आता तुम्ही म्हणाल पहिल्या सारखा राहिला नाही. आता हे ग्राहकांचं म्हणणं आहे त्याच्या जिभेने केलेले परीक्षण. वडापावचा जन्म झाल्या नंतर पुढील काही वर्षानंतर कर्जतमध्ये दिवाडकरांचा वडापाव प्रसिद्ध झाला. त्याकाळी रेल्वे स्थानक म्हणजे विशेष गजबजाट नसायची. एक रेल्वेगाडी गेली की शुकशुकाट. ना कसली अनाऊन्समेंट, ना लोकांच्या बडबडीचा आवाज, ना बाहेरील गाड्यांचे हॉर्न. अतिशय शांत वातावरण कर्जत रेल्वे स्थानकात असायचे. मनुष्य वस्ती देखील फारशी नव्हती. या काळात डेक्कन क्वीन सारखी एक्स्प्रेस या स्थानकात खूपवेळ थांबायची. त्याचे कारण असे की कर्जतच्या पुढे खंडाळा घाट सुरू होत असल्याने इथे एक्स्ट्राचे इंजिन जोडण्याची गरज भासायची. आणि इंजिनच्या जोडजोडीला बराच वेळ निघून जायचा. मुंबईपासून प्रवास करून आलेले पुण्याकडे निघालेले प्रवासी कर्जत पर्यंत येई पर्यंत भुकेले असतात. आणि म्हणूनच इथे वडापावची विक्री अधिक प्रमाणात होते.

कर्जतपासून पुढे राहत असलेले बाबुराव दिवाडकर यांनी या गोष्टीचा फायदा करायचे ठरवले. त्यांनी सुरुवातीला घरून परातभर वडे बनवून आणले आणि रेल्वे येताच विकायला घेतले. मुंबईपासूनचा प्रवास, पुढे घाट मध्ये खाण्यास काही नाही. म्हणून त्यांचे वडे पटापट विकले गेले. हळूहळू त्यांनी वडे वाढवले. पण जितके वाढतील तितके वडे विकले जाऊ लागले. आणि पाहता पाहता दिवाडकर वडापाव ब्रॅन्ड बनला. पुढे हा व्यवसाय बनला आणि आता या वडापावची फ्रँचायजी विकली जाते. त्यामुळे आता या वडापावचं नाव जरी दिवाडकर असलं तरी तो बनवणारा दिवाडकरच असेल हे सांगता येत नाही. पण तेव्हाचा आणि आताचा वडापाव यात जमीन आणि आसमानाचा फरक आहे. आकारा सोबतच चव देखील बदलली असल्याचे ग्राहक सांगतात. एकंदरीतच आता हा वडापाव आवर्जून नव्हे तर भुकेपोटी नाईलाजाने खाल्ला जात असल्याचे खाणारे म्हणतील. असोत खवय्यांना नाराज केल्याचा परिणाम व्यवसायावर होतो हे कळायला वेळ लागत नाही.

वडापाव महाराष्ट्राच्या गावागावांत :- मुंबईतून निघालेला वडापाव हळुहळु बाहेर पडला आणि संपुर्ण महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात जाऊन पोहोचला. आता वडापाव फक्त मुंबईचा राहिलेला नसून तो संपूर्ण महाराष्ट्राचा झालेला आहे. खेडोपाड्यात एसटी स्टॅन्डवर एक रुपयाला स्वादिष्ट वडापाव विकला जाऊ लागला. आज प्रत्येक गाव खेड्यात आणि तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला फेमस वडापाव हॉटेल नक्कीच मिळेल. जसे की महाराष्ट्रातील संगमनेर, नारायणगाव, आळेफाटा इथे एसटी प्रवासी वडापाव वर ताव देतात. कोल्हापुरात पावावर का जुलूम होत आहे माहीत नाही. कारण येथील वड्याची चव इतकी खास नाही आणि शिवाय पावाच्या जागी ब्रेड दिला जातो. त्यामुळे याठिकाणी वडापाव खाण्याचे समाधान मिळत नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

बदलता वडापाव :- सुरुवातीला वडा…पुढे पावाची जोड… चटणीची चव… आणि ठेचा किंवा मिर्चीचा झणका… इथपर्यंत वडापाव खाण्यात खरी गंमत आहे. पण आता वडापाव मध्ये छेडछाड करून त्यात वैविध्यता आणण्याचा प्रयत्न खूप वेळा केला जातो. प्रत्येक प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यांची एक वेगळी आणि जबरदस्त अशी चव आहे. कारण चवीनेच प्रसिद्धी दिलेली असते. काही वडापाव विक्रेते हे आपल्या वड्या बरोबर चटणी देताना खूप काळजी घेतात. आणि फक्त चटणीमुळे देखील तिथला वडपाव प्रसिद्ध होतो.

२०१० च्या दशकात मुंबईत काही ठिकाणी वडापावची साईज मोठी केली आणि जम्बो वडापाव म्हणून मार्केट जमवले. तर पुढे पाश्चिमात्य बर्गरचा क्रेज पाहून काहींनी वडापावचा आकार देखील गोल केला आणि गोली वडापाव नावारुपाला आला. २०२० च्या दशकात काही लोकांनी वडपावला चायनीज चटण्यांमध्ये बुडवून विकला. नावीन्य असल्याने प्रसिद्धी देखील मिळाली. काहींनी तर चीज,बटर,व्हाईट सॉस शक्य होईल तितके नवनवीन प्रयोग वडापाव सोबत केले. यामुळे आजच्या तारखेला १२ रुपयांचा साधा वडापाव आणि २५ रुपयांचा हायजेनिक वडापाव असे प्रकार बनले. किती बदल जरी झाले तरी साधा आणि खरा वडपावच आज सर्वाधिक लोकांची पसंद बनलेला आहे. २०३० च दशक सुरू झालेल आहे. त्यामुळे इतक्या वर्षांचा वडापाव आणखी कोणती रूप घेतो हे येणारा काळच सांगेल. तो पर्यंत खात रहा आणि भरवत रहा… मराठमोळा वडापाव.

सदर लेख तुम्हाला कसा वाटला ? हे नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला आणखी कशी माहिती वाचायला आवडेल याबद्दलही आपल्या सूचना कळवा.

-संतोष दिवाडकर

Mumbai’s Vada pav becomes Maharashtra’s favourite; Vadapav history