कल्याण : ९७ वर्षांच्या पंजोबांनी कोरोनाला मारला पंजा ; बरे होऊन सुखरूप घरी

कल्याण शहरातील ९७ वर्षीय पंजोबानी कोरोना सोबत पंजा लढवून कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून ठणठणीत बरे होवून त्यांना काल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच नकारात्मक परिस्थिती असताना कल्याण शहरातील ९७ वर्षांच्या पंजोबांनी मात्र कोरोना वर यशस्वी मात करत एक सकारात्मक संदेश दिला आहे. रामचंद्र नारायण साळुंखे असे या या पंजोबांचे नाव असून आपल्याला कोरोनाशी न घाबरता त्याच्याशी लढून त्याला हरवायच आहे असा संदेश त्यांनी दिला आहे.

गेल्या महिन्याभरापासून कल्याण-डोंबिवलीत कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. दररोज वाढणारे रेकॉर्डब्रेक रुग्ण आणि फुल होणारे बेड तसेच ऑक्सिजन व इंजेक्शनचा तुटवडा पाहता परिस्थिती गंभीर असल्याचे दिसत आहे. परंतु नकारात्मक परिस्थितही कल्याण मधील ९७ वर्षीय रामचंद्र नारायण साळुंखे या पंजोबानी कोरोनाला थेट धोबीपछाड दिला आहे. त्यांच्यावर कल्याण पश्चिम लाल चौकी येथील महानगरपालिकेच्या आर्टगॅलरी कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर योग्य उपचार केले आणि त्यांनी देखील त्या उपचाराला खंबीरपणे साथ देत कोरोना वर मात केली आणि आज ते आपल्या घरी सुखरूप परतले आहेत.

भीमजयंती निमित्त समाजसेवकाने बेघरांना वाटले अन्नधान्य आणि भाजीपाला

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सुमेध हुमणे यांनी चिंचपाडा गावाजवळील शंभर फुटी रोड लगत झोपड्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे वाटप केले. या वेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार घालून डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले त्याचप्रमाणे बुद्ध वंदना करण्यात आली.

गेली २५ वर्षे झोपड्यांमध्ये राहणारे याच देशातील नागरिक, दीनदुबळे, आजही घरा पासून ते पिण्याच्या पाण्या पर्यंत आजही वंचित आहेत. हातावरचे पोट असणाऱ्या मेहनती कष्टकरी जनतेला, कोरोना मुळे झालेल्या लॉक डाऊनचा खूप मोठा फटका बसला आहे. तरी या दीनदुबळ्या जनतेचे बाबासाहेबांवरील प्रेम अजूनही कमी झालेलं नाही. केंद्र सरकारच्या अनेक योजना राबवल्या गेल्या तरी या भारत देशात रस्त्यालगत आपला अशियाना तयार करून राहणाऱ्या अनेक जणांच्या डोक्यावर आजही हक्काचं छप्पर नाही. रस्त्यालगत राहून आपली उपजीविका सांभाळणाऱ्या या भारत देशातील नागरिकांना २०२४ पर्यंत डोक्यावर छप्पर मिळेल असे केंद्रशासनाने सांगितलं असलं तरी आज दिसणारी ही अवस्था फारच बिकट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीनदुबळे, पीडितांसाठी आपलं आयुष्य वेचलं. मात्र अजूनही या देशातील अनेक दीनदुबळे निराधार आहेत असं दिसून येतंय. रस्ता रुंदीकरणामध्ये यांच्या झोपड्या नेस्तनाबूत झाल्यानंतर, येथील नागरिकांचा मानवी हक्क अजूनही त्यांना मिळालेला नाही असे दिसतेय. म्हणून त्यांनी आपल्या व्यथा या दिवशी प्रसार माध्यमांसमोर मांडल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एक स्तुत्य उपक्रम कल्याण पूर्वेतील शिवसेना उपविभाग प्रमुख सुमेध हुमने यांनी राबवला होता. नगरसेवक महेश गायकवाड, नगरसेविका शीतल मंढारी, आर पी आय चे युवक जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनवणे, या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झोपड्यात राहणाऱ्या नागरिकांना अन्नदान, भाजीपाल्याचे वाटप करून, दीनदुबळ्यांना आधार देण्यात आला. या देशात अजूनही अनेक नागरिक आपल्या मानवी हक्कापासून वंचित असून त्यांना त्यांचे हक्क कधी मिळतील ? या प्रतीक्षेत ते असताना या नागरिकांची व्यथा आपण नक्कीच शासन, प्रशासना समोर पत्राद्वारे मांडू असं नगरसेवक महेश गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

कल्याण डोंबिवलीतील ‘ही’ आहेत ६१ कोवीड हॉस्पिटल्स ; महापालिकेने प्रसिद्ध केली यादी

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोरोनाचा हाहाकार माजला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने दिवसाला २००० हजरांपर्यंत रुग्ण नोंदवले जात आहेत. अश्या परिस्थितीत कोणत्या रुग्णालयात जावं असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडून असतो. महानगरपालिका प्रशासनाने महानगरपालिका क्षेत्रातील ६१ कोविड हॉस्पिटल्स तसेच उपचार केंद्रांची यादी प्रसिद्ध केली आहे.

क.डों.म.पा. ने प्रसिद्ध केलेल्या यादीत ६१ कोविड उपचार केंद्रांची नावे आणि ठिकाणे समाविष्ट आहेत. या यादीत हॉस्पिटलचे नाव,पत्ता,संपर्क क्रमांक,रुग्णालय प्रमुखाचा संपर्क,खाटाची संख्या, तसेच ICU व व्हेंटिलेटरची माहिती देण्यात आलेली आहे. या यादीत एकूण ५ जम्बो कोविड हॉस्पिटल्स तर ५६ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे.

६१ कोविड हॉस्पिटल्सची यादी खालीलप्रमाणे :-

क.डों.म.पा. क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजर सुरू असल्याचे देखील निष्पन्न होऊ लागले आहे. महानगरपालिका क्षेत्रात आज (दि.१३ एप्रिल २१ रोजी) दिवसभरात एकूण ११८८ नवे कोरोना रुग्ण नोंदवले गेले आहेत. तर आज १२४९ रुग्णांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. याचबरोबर ४ जणांना कोरोनाने जीव गमवावा लागला आहे. यानंतर आता महापालिका क्षेत्रात एकूण १६३८८ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात जवळपास लाखभर लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आकडे सांगत आहेत.

कल्याण-डोंबिवलीत रेमडेसिवीरचा काळाबाजार ? आमदार गणपत गायकवाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनावर परिणामकारक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर शहरात तुटवडा जाणवत आहे. यामुळेच हे औषध मूळ किंमती पेक्षा तीन चार पटींने अधिक किंमतीत काळ्या बाजारात विकले जात आहे. असे पत्र कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी रेमडेसिवीरच्या तुटवड्या बाबतची धक्कादायक बाब समोर आली होती. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतल्यानंतर रातोरात औषधांचा पुरवठा करण्यात आला. मात्र सध्या कल्याण डोंबिवली व उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात काही माफिया हे इंजेक्शन मूळ किमती पेक्षा तीन चार पटीने विकून त्याचा काळाबाजार करीत आहेत. आपल्या माणसांचा जीव वाचवण्यासाठी लोक किंमत मोजायला तयार होतात व औषध विकत घेतात. अश्या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

कोरोना काळात उधोगधंदे ठप्प झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात पिचलेल्यानी काय करावं ? असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शिवाय रेमडेसिवीर सहज उपलब्ध होत नसल्याने त्यासाठी नातेवाईकांना लांब लांबचे अंतर भर उन्हात कापावे लागत आहे. तरी रेमडेसिवीरचा पुरेसा साठा मेडिकल मध्ये उपलब्ध करून द्यावा व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार गायकवाड यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशातच कोरोना बाधित रुग्णांसाठी परिणामकारक असलेल्या रेमडेसिवीर या औषधाचा ठाणे जिल्ह्यात विशेषतः कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असुन या औषधाचा मुबलकसाठा उपलब्ध करून देण्याबाबत तसेच या औषधाचा काळाबाजार करून मुळ किमती पेक्षा तीन ते चार पट वाढीव दराने विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याबाबतची मागणी मुख्यमंत्री मा. ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.ना.श्री.राजेशजी टोपे साहेब, मा.श्री.राजेशजी नार्वेकर साहेब जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे केली.

गणपत गायकवाड (आमदार,कल्याण पूर्व)
KDMC चा दंडात्मक कारवाईवरच भर ; उपाययोजना कागदावर – मनसे आमदार राजू पाटील

मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी क.डों.म.पा. प्रशासनाच्या कामकाजावर असंतोष व्यक्त केला आहे. पालिका प्रशासन फक्त दंडात्मक कारवायाच करण्यावर भर देत असून कोरोनासाठी करावयाचा उपाययोजना फक्त कागदावरच आहेत असे म्हणत राजू पाटील यांनी क.डों.म.पा. ची तुलना नवी मुंबई महानगरपालिकेशी केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रा अंतर्गत आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी काही निर्बंध लादले आहेत. शिवाय राज्य सरकारने देखील कठोर निर्बंध लादले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका प्रशासन दंडात्मक कारवाया करीत आहेत. पोलीस स्थानकात गुन्हे दाखल होत आहेत. परंतु याच बरोबर पालिका प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनावर जास्तीत भर द्यावा असे राजू पाटील म्हणत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका कशा पद्धतीने काम करते हे त्यांनी त्यांच्या फेसबुकद्वारे सांगितले आहे.

“कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई या दोन्ही महापालिकांमध्ये प्रशासक म्हणून आयुक्तच सर्वेसर्वा आहेत. हाताशी असलेली यंत्रणा कमी अधिक असू शकते परंतु कामाची पद्धत पण महत्वाची आहे. नवीमुंबईत आरोग्यसेवक भरती करून लसीकरण केंद्र वाढवून कोरोनाशी लढा द्यायचा चाललेला प्रयत्न दिसत आहे. सोबतच पोलिस प्रशासनाला बरोबर घेऊन लोकांच्या हालचाली मर्यादीत करण्यावर तिकडे भर दिला जात आहे. तर आमच्या केडिएमसीत फक्त दंडात्मक कारवाईवर भर दिलेला दिसत आहे. बाकीच्या उपाययोजना फक्त कागदावरच दिसत आहेत. आधीच आरोग्यसेवेचा बोजवारा उडालेला असताना आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी असे करण्यात काय अर्थ आहे ? केडिएमसी प्रशासनाने जास्तीत जास्त लसीकरणावर भर द्यावा, उगीचच ‘टार्गेट’ दिल्याप्रमाणे व्यापारी व दुकानदारांना त्रास देऊ नये. पालिकेला हेच ‘टार्गेट’ मध्ये अडकलेले मनुष्यबळ इतर ठिकाणी लसीकरण केंद्र व दवाखान्यात वापरता येतील. लोकांनी पण घालून दिलेले बंधन पाळलेच पाहिजेत व ते आता गंभीरपणे पाळताना पण दिसत आहेत. मग अश्यावेळी आठवड्यातून २/३ दिवस दुकाने उघडण्यास परवानगी द्यायला काय हरकत आहे ? त्यानंतरही नियम तोडले गेले तर कडक कारवाई जरूर करावी. परंतु प्रशासनाने प्राधान्याने जास्तीत जास्त लक्ष व वेळ आरोग्यसेवा व लसीकरणावर द्यावा. आता या कोरोनाचा प्रसार लॅाकडाऊन नाही तर लसीकरणानेच कमी करता येईल.”

राजू पाटील (आमदार,कल्याण ग्रामीण)
नियम मोडल्याने KDMC प्रशासनाने केली छोटी-मोठी दुकाने सील

क.डों.म.पा. क्षेत्रात कोरोना निर्बंध नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अनेक छोटी मोठी दुकाने रोज सील केली जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही अत्यावश्यक सेवेतील बाबी वगळून इतर सर्व आस्थापना ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निर्गमित केले आहेत. सदर आदेशाच्या अनुषंगाने प्रभागक्षेत्र अधिकारी यांनी आपापल्या प्रभागात परिस्थितीची पाहणी केली.

‘ब’ प्रभागात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ६ दुकाने सील करण्यात आली. ‘क’ प्रभागात २ मॅरेज लॉन्स ३० एप्रिल पर्यंत सील करण्यात आले आहेत. ‘फ’ प्रभागात मानपाडा रोडवरील इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचे व टेलर अशी २ दुकाने तसेच ९० फुटी रोडवरील ३ दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली. ‘ग’ प्रभागात सत्यम सोशल क्लब व आणखी २ दुकाने सील करण्यात आली. त्याचप्रमाणे ‘ई’ प्रभागक्षेत्रात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी ई प्रभागातील डी-मार्ट तसेच २ वाईन शॉप सील करण्याची धडक कारवाई केली.

कोरोना साथीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका यंत्रणा अथक काम करीत असताना या कामात महापालिकेच्या नागरिकांनी देखील कोरोना नियमावलीचे पालन करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. मात्र नियम मोडल्यास कारवाई अटळ आहे. मागील काही दिवसांपूर्वी शेकडोंच्या संख्येने लग्नसोहळा पार पडलेला मॅरेज लॉन्स तसेच संयोजक व आयोजकांवरही पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उल्हासनदीत सोडली दोन विभिन्न प्रजातीची २० हजार माशांची पिल्ले

उल्हासनदी जतन व संवर्धनासाठी नदीमध्ये ग्रास कार्प व सिल्वर कार्प जातीच्या २०,००० माशांची पिल्ले आज सोडण्यात आली आहेत. सध्या या नदीत ठिकठिकाणी जलपर्णी वनस्पती इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली आहे कि त्यामुळे येथील मासेमारी करणारे ते सर्व साधारण स्थानिक पासून ते पालकमंत्र्यापर्यंत सर्वच सामाजिक घटक चिंतीत आले आहेत.

ग्रास कार्प व सिल्वर कार्प या दोन जातीचे मत्स्यबीज एकूण २०,००० नग कलकत्त्याहून विमानाने मुंबई पर्यंत आणण्यात आले. आज पहाटे रायते ब्रीज येथे या सर्व माशांची पिल्ले पोहोचली. या अभियानात लहानग्या पासुन मोठ्या पर्यंत, विविध समाजसेवी संस्थानी सहभाग दर्शविला.

कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे, कल्याण तालुका तहसीलदार दिपक आकडे, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक नितिन निकम, उल्हास नदी बचाव कृती समिती चे अश्विन भोईर, रविंद्र लिंगायत, विवेक गंभीरराव व वालधुनी बिरादरी चे शशिकांत दायमा, उल्हास नदी च्या दोन्ही बाजूच्या ग्रामपंचायत सदस्य. म्हारळ, वरप, कांबाचे बरेच नवनिर्वाचित सदस्य, द वॉटर फाउंडेशन चे पंकज गुरव व कुमार रेड्डीयार, तसेच अश्वमेध प्रतिष्ठान चे अविनाश हरड, तुषार पवार, दत्ता बोंबे आदि पर्यावरणप्रेमी, ऊमाई पुत्र या अभियानात सामील झाले होते.

उल्हास नदीचे वाढते प्रदूषण व त्यावरील उपाययोजना यावर कृषिरत्न  चंद्रशेखर भडसावळे, सगुणा बाग नेरळ यांनी प्रमुख मार्गदर्शन केले तसेच प्रशासकीय पातळीवर उल्हास नदी बचावासाठी शक्य अश्या सर्व उपाययोजना व मदत केली जाइल अशी ग्वाही कल्याण तालुका तहसीलदार दिपक आकडे यांनी दिली. 

मासे म्हटले की, फक्त खाण्यासाठी उपयोगात येत नसून ते पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी ही उपयोगी असतात असे नमूद करतांना मासे नदीत सोडत लहानग्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला. आज सोडण्यात आलेल्या दोन्ही प्रजातींचे मासे हे पर्यावरणच नव्हे तर स्थानिकांचा रोजगार देखील बनणार आहे. तसेच या माश्यांची उत्पत्ती वाढल्याने हे मासे आसपासच्या गावातील लोकांच्या आहारात देखील सामावले जाऊ शकतात. या दोन्ही प्रजातींचे मासे हे एका वर्षाने एक किलो वजनाचे होऊ शकतात. तर हाच मासा जास्त जगला तर ४ किलो पर्यंत देखील भरू शकतो असा दावा केला गेला आहे. त्यामुळे या माशांची उत्पत्ती वाढली तर पुढच्या वर्षी मोठं मोठे मासे या नदीतून मिळतील हे नक्की.

कल्याण डोंबिवलीत विनामास्क फिरणाऱ्यांना पोलीस टाकणार हॉस्पिटलमध्ये ; पोलिसांनी महापालिकेला सांगितला आपला निर्णय

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे आकडे भलतेच वाढताना दिसत आहेत. मात्र असे असतानाही लोकांचा यावर विश्वास नसल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. मात्र पालिका प्रशासन याबाबतीत कठोर निर्णय घेताना दिसत आहे. आता पालिके बरोबर पोलीस प्रशासनाने देखील आपली भूमिका पालिका आयुक्तांकडे मांडली आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात आजपासून सरकारच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी होणार आहे. या साठी पालिका मुख्यालयात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, दोन्ही सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच महापालिका अधिकारी यांची बैठक पार पडली. निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी काय केले पाहिजे यावर बराच वेळ चर्चा झाली. कोरोनाचे प्रादूर्भाव रोखण्यासाठी जे काही करायचे ते सरकार करणार आहे. महापालिका आयुक्तांनी सांगितले की, निर्बधाच्या अंमलबजावणीसाटी प्रशासन सज्ज आहे. मंगल कार्यालय आणि भाजी मंडईवर विशेष नजर ठेवली जाईल. नियमांचे उल्लंघन केल्यास तर मंगल कार्यालये ३० एप्रिलर्पयत सिल करण्यात येतील.

विनामास्क फिरणाऱ्यांची होऊ शकते रुग्णालयात रवानगी :-

महापालिका अधिका:यांसोबत पोलिस सुद्धा निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी सज्ज झाले आहेत. विना मास्क फिरणा:या नागरीकांवर केवळ दंडात्मक कारवाई करणार नाही तर त्यांना पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची प्रथम अँटीजेन टेस्ट केली जाईल. यामध्ये व्यक्ती पॉझीटीव्ह आझळल्यास त्याची रवानगी थेट रुग्णालयात केली जाईल असा निर्णय कल्याण पोलिसांनी घेतला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे.

आईच्या स्मृतिदिनी मा.नगरसेवक महेश गायकवाड यांनी गरजू महिलांना दिला साडी चोळीचा मान.

कैलासवासी गुंजाई दशरथ गायकवाड यांच्या २१ व्या स्मृति दिनानिमित्त घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणार्‍या महिलांसाठी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यातर्फे साडी-चोळी व धान्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कल्याण पूर्व मधील प्र.क्र.८८ संतोष नगरचे शिवसेना मा. नगरसेवक महेश गायकवाड ३ एप्रिल रोजीचा आपल्या मातोश्रीचा पुण्यतिथी दिन हा स्मृतिदिन म्हणून साजरा करतात.
आयोजित कार्यक्रमात मातोश्री गुंजाई यांना उपस्थितांकडून आदरांजली वाहण्यात आली. दीनदुबळ्यांसाठी मदतीचा हात पुढे करणारे म्हणून नगरसेवक महेश गायकवाड ओळखले जात आहेत. आजच्या दिवशी आपल्या मातोश्रीची आठवण म्हणून, अतिशय हलाखीचे जीवन जगत असलेल्या तर कचरा जमा करून, घरकाम करून कुटुंब उदर निर्वाह करणाऱ्या महिलांसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे करून मान्यवरांच्या हस्ते साडीचोळी आणि धान्य वाटप केले.

कोविड महामारीच्या काळात अनेक घरकाम करणाऱ्या महिलांना,बेरोजगार कुटुंबांना,मदत करण्याचा प्रयत्न शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड सातत्याने करत होते. कोविड महामारीच्या काळात सर्वप्रथम कल्याण पूर्वेत मातोश्री गुंजाई फाउंडेशन तर्फे अन्नदान तसेच धान्य वाटप कार्यक्रम राबावून गोरगरिबांना दिलासा दिला होता. मातोश्री गुंजाई फाउंडेशन तर्फे मातोश्री गुंजाई दशरथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ विविध लोकपयोगी कार्यक्रम ते राबवत असतात. कोणतीही महिला व तिचे कुटुंब उपासमारीचे बळी पडू नये म्हणून आपल्या कार्यालयाचे दार सदैव उघडे आहे असे मातोश्रींच्या एकविसाव्या स्मृतिदिनी त्यांनी सांगितले.

मातोश्री गुंजाई दशरथ गायकवाड स्मृतिदिन कार्यक्रमाला नगरसेवक महेश गायकवाड, नगरसेवक राजाराम ऊर्फ आप्पा पावशे, आडवली माजी सरपंच राहुल पाटील,
मधुर म्हात्रे युवासेना अंबरनाथ, शंकर पाटील उपविभाग प्रमुख,महिला विभाग प्रमुख वंदना तांबे, महिला उपविभागप्रमुख सुजाता शिंदे, कलाकार बजरंग बादशाह, गायिका चंद्रकला दासरी,शाखा प्रमुख प्रशांत बोटे, शाखाप्रमुख प्रतिक महिले,संतोष नवगिरे, समाजसेविका वैशाली ठाकूर ,सुजाता पवार, योगेश चव्हाण, सुरेश रसाळ, कार्यालय प्रमुख निलेश रसाळ तसेच शिवसैनिक व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

मा. नगरसेवक महेश गायकवाड यांनी या स्मृतिदिनी आई बद्दल भाष्य केले असता उपस्थित महिलांना देखील गहिवरून आले होते. पहा व्हिडीओ.

मनसे आंदोलकांवर गुन्हे दाखल मग उदघाटन करणाऱ्या गर्दीवर गुन्हे का नाहीत ? पोलिसांनी पक्षपात करू नये. – आमदार राजू पाटील

एप्रिल फुल म्हणजे १ एप्रिल रोजी मनसे कार्यकर्त्यांनी डोंबिवली येथे ‘एप्रिल फुल डब्बा गुल’ आंदोलन केले होते. या आंदोलनातुन पुलाच्या संथगतीने होत असलेल्या कामावर निशाणा साधला होता. मात्र कोरोना निर्बंधांचे उल्लंघन झाल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वडवली पुलाच्या उदघाटनावेळी गर्दी झाली होती तर मग त्यांच्यावर गुन्हे का नाहीत ? पोलिसांनी पक्षपातीपणा करू नये असे ट्वीट मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात सध्या अनेक पुलांची कामं झालेली आहेत व काही सुरू देखील आहेत. ही काम अत्यंत संथ गतीने होत असल्याचे म्हणत मनसेने १ एप्रिल ला केक कापून आंदोलन केले होते. ‘एप्रिल फुल डब्बा गुल कधी होणार कोपर पूल?’ अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या होत्या. मात्र महापालिकेने आखलेल्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचे म्हणत त्यांच्यावर आता गुन्हे दाखल केले गेले आहेत.

मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनसेला गृहीत धरू नये. प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनू नये. तसेच पोलिसांबद्दल आम्हाला आदर आहे आणि पोलिसांनी पक्षपातीपणा करू नये असे ट्विट राजू पाटील यांनी केले आहे. आयुक्त व डीसीपी यांच्या उपस्थितीत वडवली पुलाचे उदघाटन झाले यावेळी झालेली गर्दी तसेच कोपर पुलाच्या गर्डर लॉंचिंगला गर्दी करणाऱ्यांवर गुन्हे कधी दाखल करणार ? असा सवाल त्यांनी केला आहे.