पुनर्वसनाच्या मुद्द्यासाठी महिलांचा मुंडन करण्याचा KDMC ला इशारा

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा रिंगरूट प्रकल्पात ८४५ नागरिक बेघर होत असल्याने मनपा विरोधात मागील दहा दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. बाधित नागरिकांचे हे उपोषण सुरू असून दहा दिवसांपासून मनपा अधिकाऱ्यांनी या उपोषण कर्त्यांकडे ढुंकूनही पाहिले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे उपोषण कर्त्यांनी मनपाचा निषेध करत मुंडन केले आहे. तेराव्या दिवसा पर्यंत मनपा प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर महिला देखील कल्याण डोंबिवली मनपा कार्यालयासमोर मुंडन करणार असल्याचा इशारा जालिंदर बर्वे आणि आंदोलन कर्त्या महिलांनी दिला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील टिटवाळा ते दुर्गाडी या रिंगरुंटमध्ये बाधीत होणाऱ्या ८४५ रहिवाशांचे पुर्नवसन करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विस्थापित कुटूंबियांनी मंत्रालयात भेट घेऊन त्याचे पुनर्वसन करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व पुनवर्सन समितीचे अध्यक्ष सपना देवनपल्ली कोळी यांना दिले आहेत. पुनर्वसनाच्या मागणीसाठी महानगरपालिकेला अनेक पत्र व्यवहार करुन देखिल महापालिका आयुक्त व संबंधीत अधिकारी पुर्नवसन करण्यासाठी कोणतीही हालचाल करत नसल्याने प्रशासनाकडे अनेक वर्षापासून रहिवाशी संस्थेच्या माध्यमातून मोर्चे, अंदोलन, पत्र व्यवहार केला आहे.

पुनर्वसनाच्या मागणीसाठी पब्लिकन पक्ष व अटाळी आंबिवली सामाजिक संस्थेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष जालिंदर बर्वे, सचिव संदीप घाडगे व महिला पदाधिकारी व राहिवाश्यानी सोमवार पासून पालिकेच्या या प्रभाग क्षेत्र वडवली कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. टिटवाळा – अटाळी -आंबिवली या विभागातील रिंगरुटमध्ये बाधीत होणाऱ्या ८४५ कुटूंबियांचे पुर्नवसन बी.एस.युपी या योजनेतुन करण्यात यावे. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने १९९६चे पुर्नवसन पात्र धोरणात बदल करुन ते २०१६ पर्यंत करण्यात यावे. जो पर्यंत पुर्नवसन होत नाही तो पर्यंत तोडक कारवाई करु नये. रिंगरुट मध्ये बाधीत होणाऱ्या कुटुंबियांच्या पुर्नवसनाच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही, तो पर्यंत रिंगरुट चे काम बंद करण्यात यावे आदी प्रमुख मागण्या उपोषणकर्त्यांनी यावेळी केल्या असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरु राहणार असल्याचे उपोषणकर्त्या सर्व रहिवाशांनी सांगितले आहे.

-रोशन उबाळे

कल्याणमध्ये ३२ नागरिकांचे गहाळ फोन पोलिसांनी दिले शोधून

कल्याण : कल्याण मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागाच्या वतीने महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत हरविलेल्या ३२ मोबाईलचा शोध घेवुन नागरिकांचे गहाळ झालेले ४ लाख ५० हजार किमतींचे मोबाईल परत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  

सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग, कल्याण यांच्या अंतर्गत असलेली महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत कल्याण डोबिवली तसेच कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी बाहेर जिल्हयातुन येणाऱ्या लोकांचे सन २०१९, २०२०, २०२१ या कालावधीत वेगेवगळया कंपनीचे मोबाईल गहाळ झाल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून संबधीत पोलीस ठाण्यात प्रॉपटी मिसिंग अन्वये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

या हरविलेल्या मोबाईलचा तात्रींक माहितीच्या आधारे शोध घेणे बाबत अपर पोलीस आयुक्त दत्ता कराळे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिलेल्या योग्य त्या सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या अधिन असलेल्या वाहन व मोबाईल चोरी विरोधी पथकाचे सपोनि एच.जी ओऊळकर, पोहवा पवार, पोना गायकवाड, वाघ, वळवी, पोशि चव्हाण यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेवुन अंदाजे एकुण ४ लाख ५० हजार  किंमतीच्या ३२ हरविलेल्या मोबाईलचा शोध घेवुन हे मोबाईल तक्रारदारांना परत केले आहेत.

दरम्यान आपले गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले असून पोलिसांच्या प्रती असलेला विश्वास आणखी दृढ झाला असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. (Kalyan Crime)

-कुणाल म्हात्रे

उल्हासनगरमध्ये धावत्या टँकर मधून एसिड उडून चार जण भाजले

Ulhasnagar : सल्फयुरिक एसिडने भरलेल्या टँकर चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे एसिड बाहेर पडून चार जणांच्या अंगावर उडाले. यामध्ये भरत वसीटा आणि दिलीप पुरस्वानी हे दोघे गंभीर स्वरूपात भाजले गेले. याबाबत पोलिसांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगरच्या श्री राम चौक परिसरात ही घटना घडली असून विठ्ठलवाडी पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे. ऍसिडने भरलेला टँकर रहदारीच्या परिसरातून घेऊन जाणे तसेच टँकरचे झाकण अश्या पद्धतीने लिकेज होणे ही निष्काळजीपणाची बाब आहे. यामुळे दोन जणांना गंभीर स्वरूपाची इजा झाली आहे. यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस कठोर कारवाई करतात.

रस्त्यावरून पायी चालत असताना किंवा दुचाकी चालवत असताना अश्या प्रकारच्या अवजड वाहना पासून शक्यतो सुरक्षित अंतर ठेवणे आपल्याच हिताचे असणार आहे. या अगोदरही रस्ते अपघातात अनेक दुचाकीस्वाराचा अवजड वाहनांशी अपघात होऊन त्यांना स्वतःचा जीव देखील गमवावा लागला आहे. उल्हासनर येथील या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ माजली आहे.

-संतोष दिवाडकर

In Ulhasnagar, four persons were burnt when acid flew from a speeding tanker

डोंबिवलीत फक्त दागिन्यांसाठी महिलेची हत्या

Dombivli :- डोंबिवली शहरातील टिळकनगर भागात विजया बाविस्कर (Vijaya Baviskar) या ५८ वर्षीय महिलेच्या हत्येने (Murder) सोमवारी एकच खळबळ माजली होती. यानंतर पोलिसांनी तपास करीत एका महिलेला ताब्यात घेतले असून दागिन्यांसाठी हत्या झाली असल्याचे उघड झाले आहे. मात्र असे असले तरी नेमके हेच कारण आहे की संपत्तीच्या वादातून कट कारस्थान रचले गेले आहे अश्या उलट सुलट चर्चांना देखील उधाण आले आहे.

डोंबिवलीत पोळी भाजी केंद्र चालवणाऱ्या सीमा खोपडे (Seema khopde) या महिलेने दागिन्यांसाठी विजया बाविस्कर या महिलेची हत्या केल्याचे समोर येत आहे. या महिलेने देखील या हत्येची कबुली दिली असून पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेत पूढील तपास सुरू केला आहे. नातेवाईकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार महिलेचा ३० वर्षांपूर्वी घटस्पोट झाला असून ही महिला सदर भागात मागील तीन वर्षांपासून वास्तव्यास आहे.

विजया बाविस्कर यांची हत्या दागिन्यांच्या हव्यासापोटी झाली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. मात्र असे असले तरी या महिलेच्या हत्येमागे नक्की हेच कारण आहे की संपत्तीची लालसा आहे ? असाही संशय टाळता येणार नाही. जर या हत्येच्या मागे संपत्तीचे कारण असेल तर सदर हत्येत आणखीन कोणाचा सहभाग आहे का ? ही देखील एक तपासाची बाब बनू शकते.

-संतोष दिवाडकर

Woman killed in Dombivli just for jewelery