कल्याणच्या गौरी पाडा तलावात मृत कासवांचा खच; मृत कासवांवर अग्नीसंस्कार

कल्याण : दोन दिवसांपूर्वी कल्याण (Kalyan) पश्चिमेतील गौरी पाडा (Gouri Pada) तलावात मृत झालेल्या कासवांवर (Turtle) वन विभागाने नियमाप्रमाणे अग्निसंस्कार केले आहेत. तर १३ कासवांना वाचविण्यात वॉर रेस्क्यू टीमला (War Rescue Team) यश आले आहे.

कल्याण पश्चिम येथील गौरीपाडा तलाव हा मस्त्य व्यवसाय आणि गौरी गणपती विसर्जनासाठी प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणात येथे मासे पकडुन विक्री केली जाते. या तलावात दोन दिवसांपासून खूप दुर्गंधी पसरली होती आणि स्थानिक नागरिकांचे आरोग्य ही धोक्यात आले होते. मा.नगरसेवक दया गायकवाड यांनी वॉर संस्थेच्या हेल्पलाईन वर संपर्क केला असता त्यांची टीम घटनास्थळी गेली. त्यानंतर त्यांना मन विचलित करणारे दृश्य दिसले. त्याठिकाणी दोन-चार नव्हे तर ५० ते ६० मृत कासवांचा खच पडला होता. तर अनेक कासव शेवटचा श्वास घेत होते.

भारतीय मृदूपाठीचे कासव हे संकटग्रस्त उभयचर जीवांपैकी एक आहे. डासांनी पाण्यात सोडलेली अंडी, किडे व मृत मासे त्यांचे प्रमुख अन्न आहे. पाणी शुद्ध आणि स्वच्छ करणारे जीव हे एक प्रकारे मानवी जीवाला फायदेशीर आहे. घटनास्थळी वनविभागाकडून पंचनामा होत असताना काही कासव किनाऱ्यावर तडफडत असल्याचे आढळून आले. त्यात ९ भारतीय मृदू पाठीचे कासव आणि ४ रेड इयर्ड स्लाइडर जातीचे कासव असे एकूण १३ कासवांना वॉर टिम ने तत्काळ सुखरूप बाहेर काढले आहे. तर ५३ कासवांवर वनविभागाने नियमाप्रमाणे अग्निसंस्कार केले आहेत.

मृत कासवां पैकी काही कासव शवविच्छेदना करिता वनविभागाने पाठवले आहेत. लवकरच त्याचा अहवाल प्राप्त होईल. कासवांचा मृत्यू कशामुळे झाला? तलावात कोणी औषध टाकले आहे का? पाण्यात रासायनिक सांडपाणी सोडले गेले आहे का? तलावात मासे देखील असून मग त्यांचा मृत्यू कसा झाला नाही? असे एकना अनेक प्रश्न पडले आहेत. त्यामुळे कासवांचा मृत्यू मानवनिर्मित असेल तर दोषींवर लवकरच कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वॉर संस्थेच्या सुहास पवार यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

Many turtles die in Gauri Pada lake of Kalyan

आजपासून शाळा सुरू! विद्यार्थ्यांनी सजवल्या शाळेच्या भिंती

कल्याण : पुन्हा एकदा शाळा भरल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक या सगळ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. त्या निमित्ताने कल्याण येथील श्री गजानन विद्यालय शाळेच्या आवाराबाहेरील भिंतींवर विविध समाज प्रबोधन पर चित्र काढण्यात आली आहेत. मुलगी वाचवा मुलगी शिकवा, लेक माझी भारताची शान, स्वच्छता अभियान आदी विषयांबाबत चित्रांद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. या कामासाठी केडीएमसी शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी विजय सरकटे, रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांची मदत झाली असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन भालेराव यांनी दिली.

शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी केडीएमसीच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश आले असून शहर सौंदर्यीकरणासाठी यापुढील पाऊल म्हणून शहरातील शाळांच्या भितींवर पर्यावरण पूरक संदेश देणारी चित्र काढण्यात येत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन‍ आणि शिक्षण विभागातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती.

 या बैठकीत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने शालेय स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन विद्यार्थी, शिक्षक- पालकांच्या सहभागातून साजरी करणे, सर्व प्राथमिक- माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये दर्शनी भागातील भिंतीवर, शालेय परिसरातील सार्वजनिक भितींवर सार्वजनिक तसेच पर्यावरण पूरक संदेश देणारे चित्रण करण्याचा ठराव मंजूर झाला. कलाकृती बनवण्यासाठी लागणारे रंग, ब्रश आणि इतर सामग्री प्रत्येक शाळेला महापालिकेमार्फत देण्यात येत आहे.

-कुणाल म्हात्रे

Schools in Maharashtra resume from today

“नाना पटोले डोक्यावर पडलेले नेते” – भाजप शहर जिल्हाध्यक्ष

डोंबिवली : कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना अक्कल नसून, ते डोक्यावर पडलेले राजकारणी नेते आहेत. तसेच नाना पटोले सडलेल्या मेंदूचे राजकारणी आहेत. असे खळबळजनक वक्तव्य कल्याण डोंबिवली भाजपा जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे (Shashikant Kamble) यांनी केल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसापूर्वीच तथाकथीत गावगुंड मोदीच्या नावे केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वादाची ठिणगी पडली होती. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद राज्यभरात  उमटताना दिसत असून भाजपा अधिक आक्रमक झाली आहे. असे असताना रविवारी देखील नाना पटोले यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्याने भाजपाचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली रेल्वे स्थानकासमोरील  स्वर्गीय इंदिरा गांधी चौकात नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन करून भाजप कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

-कुणाल म्हात्रे

BJP protests against Nana Patole in Dombivali

स्व.बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त मा.नगरसेवक महेश गायकवाड यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना वह्या वाटप

कल्याण : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कल्याण पुर्वतील प्र.क्र.९८ विजयनगर शिवसेनेच्या मा. नगरसेविका शीतल मंढारी यांच्या जनसंपर्क कार्यालयात मा.नगरसेवक महेश गायकवाड यांच्या सौजन्यातुन गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या आहेत.

२३ जानेवारी म्हणजेच स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. बाळासाहेबांच्या ९६ व्या जयंतीच्या निमित्ताने विजय नगर येथील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या होत्या. यावेळी मा. नगरसेवक महेश गायकवाड, शीतल मंढारी यांच्यासह, उपविभागप्रमुख शंकर पाटील, सुमेध हुमणे, गंभाजी लाड, संजय पिंगळे, शाखाप्रमुख राजेश पेडणेकर, प्रशांत बोटे, उपशाखाप्रमुख उत्तम घाडीगांवकर, कृष्णकांत मोरे, महेश नाईक, शाखा संघटक मीना मुठे,ज्येष्ठ नागरिक वामन कांबळे, कोठावदे सर, तसेच पक्षातील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणाने संबोधित केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या गेल्या. बाळासाहेबांच्या जयंती निमित्ताने भगवा सप्ताहच सुरू असतो. अनेक ठिकाणी विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. असे शीतल मंढारी यांनी सांगितले. तर उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व तसेच आई वडिलांशी कसे वागावे याबाबत मार्गदर्शन महेश गायकवाड यांनी केले.

“बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणीनुसार, नेहमी गोरगरीब जनतेच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी नेहमी अग्रेसर रहा हा शिवसैनिकांना दिलेल्या आदेशानुसार आज त्यांच्या जयंती निमित्त कल्याण पूर्व विजयनगर-आमराई विभागातील गरीब-गरजू विद्यार्थ्यांना मा. नगरसेवक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. नगरसेविका शितलताई मंढारी यांच्या उपस्थितीत विभागातील जवळपास ३०० विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.”

-सुमेध हुमणे (शिवसेना उपविभाग प्रमुख)

-संतोष दिवाडकर