Titwala येथील शाळेचा RTE विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यास नकार? पालकांचा शिक्षण मंडळ कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा

Titwala : शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. सरकारने राबवलेल्या आरटीई शिक्षण योजने अंतर्गत मुलांना शिक्षण आणि शैक्षणिक साहित्य शाळेने देणे बंधनकारक असतांना टिटवाळ्यातील रवींद्र विद्यालयाने मात्र आरटीई विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यास नकार दिला असून शाळेकडून पालकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे बुधवार पर्यंत शाळेने मुलांना शालेय साहित्य न दिल्यास शिक्षण मंडळ कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आता पालकांनी दिला आहे.

सरकारने राबवलेल्या आरटीई शिक्षण योजने अंतर्गत टिटवाळा येथील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी रवींद्र विद्यालय या शाळेत प्रवेश मिळवला आहे. तेव्हा पासून शाळेने कधीही शैक्षणिक साहित्य वाटप केलेले नाही. मात्र हया वर्षी सर्व पालक शाळेच्या मुख्याध्यापकांना शैक्षणिक साहित्य वाटप कधी करणार हे विचारायला २८ एप्रिल रोजी गेले असता मुख्याध्यापकांनी असभ्यतेची भाषा वापरून पालकांवर दबाव टाकला. तसेच तुमची ऐपत नव्हती आपल्या मुलांना शिकवण्याची तर या शाळेत मुलांना का टाकले? तसेच तुमच्या मुलांना शिकवायचे आहे की नाही हे आमच्या हातात आहे. म्हणून यापुढे तुम्ही पालकांनी एकत्र एऊन अशी तक्रार करायची नाही. तुम्हाला शैक्षणिक साहित्य शाळेतूनच विकत घ्यावे लागेल. असे म्हणून आम्हाला शाळे बाहेर काढून दिले असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

याबाबत सर्व पालकांनी टिटवाळा पोलिस स्टेशन येथे शाळेविरोधात तक्रार केली. त्या नंतर २ मे रोजी सर्व पालकांनी केडीएमसीच्या शिक्षण विभाग कार्यालयात शाळेची लेखी तक्रार केली. यानंतर शाळेला १४ मे रोजी आरटीईचे एक लेखी पत्रक दिले गेले. आरटीईच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य व गणवेश ४८ तासांच्या आत मोफत पुरविण्यात यावे असा उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे. परंतु शाळेने शिक्षण विभागाचा आदेश न मानता शाळा आपल्या मनमर्जि प्रमाणे वागत असल्याचा आविर्भाव पालक व्यक्त करीत आहेत.

त्यामुळे बुधवारपर्यंत आरटीई अंतर्गत पालकांना पाल्यासाठीचे मूलभूत अधिकार अंतर्गत येणारे शैक्षणिक साहित्य मिळाले नाही तर गुरुवारी शिक्षण विभाग कार्यालयात सर्व पालकांसोबत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या पालकांनी दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

RTE of Titwala school refuses to provide educational materials to students? A warning of sit-in agitation at the parents’ education board office

Shahad News : ‘आधी प्रश्न सोडवा मग मते मागायला या’ – स्थानिक नगरसेवकाला मनसेची बॅनर लावून कानपिचकी

Shahad News : कल्याण पश्चिमेतील  शहाड परिसरातील आंबिका नाला हा अरुंद आहे. तसेच या भागात नाल्यावर बेकायदा बांधकामे झाली असल्याची ओरड आहे. ९ जून रोजी पहिल्या पावसाचा फटका शहाड परिसराला बसला. या प्रश्नावर मनसेच्या पदाधिकार्याने एक बॅनर आंबिकानगर येथे लावला आहे. त्यावर आधी प्रश्न सोडवा. मग मते मागायला या असे लिहिले आहे. स्थानिक नगरसेवकाला कानपिचक्या देत  हा बॅनर लक्षवेधी ठरत आहे.

मनसेचे पदाधिकारी पंकजराजे पाचपिंडे यांनी हा बॅनर लावला आहे.९ जून रोजी नाल्याचे पाणी तुंबले व ते रस्त्यावर कसे साचले? त्यात वाहने कशा प्रकारे अडकली? याचे फोटोही बॅनरवर लावले आहेत. तासाभराच्या पावसाने ही  अशी स्थिती उद्धवते. आधी प्रश्न सोडवा। मगच मते मागायला या. प्रश्न सोडविला नाही तर मते मिळणार नाहीत असा इशारा राजकीय पक्षांसह लोकप्रतिनिधींना दिला आहे. त्यामुळे या फलका मुळे  परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

-रोशन उबाळे

Shahad News: ‘First solve the problem, then come to ask for votes’ – MNS banner to local corporator

Dombivli Murder : रेल्वे मैदानावर  इसमाची हत्या; दांडक्याने प्रहार केल्याचे निष्पन्न

Dombivli Murder : शहराच्या पश्चिमतील बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदानात एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अद्याप पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली नसून त्या दिशेन तपास सुरु आहे. मृतदेहाच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याच्या खुणा दिसत असल्याने त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. डोंबिवली विष्णूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

डोंबिवली पश्चिमेला बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदानात एका इसमाचा मृतदेह पडल्याची माहिती विष्णूनगर पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन सदर जागेवर इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. साधारणतः ४५ ते ५० वयोगटातील या इसमाच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केल्याचे त्याचा जागीच मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाची ओळख पटली नसली तरी पोलीस मृतदेहाची माहिती काढण्यासाठी चौकशी सूरु केली आहे.

बावनचाळ परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन इसमाला मारले असावे. परंतु त्याची हत्या करण्यामागे काय उद्देश असावा? कोणी हत्या केली असावी? याचा तपास विष्णूनगर पोलीस करत आहे. दरम्यान बावनचाळीत रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवणे आवश्यक झाले आहे.

-रोशन उबाळे

Dombivli Murder: Murder of a man at a railway ground; Conclusion of being hit with a stick