ज्येष्ठ नागरिक कट्टा भागात शेड उभारण्यासाठी मनसेचं क.डों.म.पा. ला निवेदन

कल्याण : कल्याण पूर्व ‘ड’ प्रभाग क्षेत्र येथे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्यात आलेला आहे. मात्र सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून ज्येष्ठांना येथे बसण्यासाठी प्रचंड गैरसोय होताना दिसत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर या भागात त्यांच्या बसण्याच्या जागेवर शेड उभरावेत या मागणीसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने नुकतेच मनपा प्रशासनाला निवेदन दिले आहे.

शेड बांधल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची ऊन आणि पाऊस या दोन्ही काळात होणाऱ्या गैरसोयीपासून सुटका होणार आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे मनसेचे कल्याण लोकसभा क्षेत्राचे जिल्हा सचिव संदीप नावगे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली व त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. यावर कार्यवाही करून लवकरच शेड उभारणी करून देऊ असे यावेळी उपस्थित शिष्टमंडळाला आश्वासित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

संतोष दिवाडकर

Baipan Bhari Deva review ; बाईपण भारी देवा चित्रपट का गाजतोय ?

Baipan Bhari Deva review : बाईपण भारी देवा चित्रपट का गाजतोय ? हा अनेकांना पडलेला एक प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अनेकांचे पाय सध्या सिनेमागृहाकडे वळत आहेत. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी फक्त स्त्रिया गर्दी करीत असून जेमतेम १०% पुरुषच सिनेमागृहात हजेरी लावत आहेत ते ही आपल्या बायकोच्या इच्छेखातर.

केदार शिंदे दिग्दर्शीत हा चित्रपट रितेश देशमुखच्या वेड चित्रपटा नंतर महाराष्ट्रभरात गाजला असून या चित्रपटाने बॉलिवूडची मात्र महाराष्ट्रात चांगलीच वाजली आहे. पाच करोड खर्च करून बनवलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ३२ करोडचा पल्ला पार केला आहे. इतकेच कायतर कधी नव्हे ते सिनेमागृहात फक्त मराठी चित्रपटासाठी स्क्रीन लागत असून बॉलिवूड करिता पुरेश्या स्क्रीन मिळणे आणि चित्रपट चालणे अतिशय अवघड बनल्याचे भासू लागले आहे.

कल्याण मेट्रो मॉल मधील आयनॉक्स सिनेमा मध्ये या रविवारी हिंदी चित्रपटाला जेमतेम स्क्रीन मिळाल्या असून ‘बाई पण भारी देवा’ या मराठी चित्रपटाला तब्बल १६ स्क्रीन दिल्या असून ही अभिमानाची बाब आहे. याबद्दल प्रेक्षकांनाही तितकेच धन्यवाद द्यायला हवे.

चित्रपटाला फक्त महिलांची उपस्थितीच का ?

चित्रपटाच्या नावाप्रमाणेच हा चित्रपट महिलांचाच आहे अशी या चित्रपटाची ओळख पडली आहे. मुळात चित्रपटाचे कथानकच महिलांच्या जीवनातील रोजच्या संघर्षावर आधारित आहे. त्यामुळे चित्रपट पहायला येणारी प्रत्येक महिला स्वतःला कुठे ना कुठे त्या चित्रपटात पाहत आहे. असे असल्याने हा चित्रपट गाजत असून त्याची चर्चा महिलांमध्ये सुरू असते. म्हणून महिला एकत्रितपणे येऊन ग्रुप बनवून चित्रपट पाहत आहेत. काही महिलांच्या ग्रुपने तर संपूर्ण स्क्रीनच बुक केले आहे.

महिला आपल्या जीवनात कोणत्या खडतर वाटचालीतुन जात असतात? त्या कसा संघर्ष करीत असतात? त्यांची सुख त्यांची दुःख हे खर तर पुरुषांनाही समजणे तितकेच गरजेचे आहे. म्हणून हा चित्रपट केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांनी देखील पाहणे तितकेच गरजेचे आहे. हा चित्रपट सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत एक संघर्ष दाखवतो. ज्यात हसण्यासाठी कॉमेडी देखील समाविष्ट आहे. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात जाणारी स्त्री आणि सिनेमागृहातून बाहेर पडणारी स्त्री ही काहीशी वेगळी असते. सिनेमा पाहिल्या नंतर महिलांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास येत असल्याचे पाहायला मिळत असून ही सकारात्मक बाब महिलांच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी फायद्याची ठरू शकते.

संतोष दिवाडकर

Baipan Bhari Deva review ; Why is the movie Baipan Bhari Deva popular?

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक ‘या’ महिन्यांत होण्याची शक्यता

महानगरपालिका निवडणूक : महाराष्ट्रातील लांबणीवर पडलेल्या महानगरपालिका निवडणुक केव्हा होणार असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. राज्यातील चार महानगरपालिका वगळता सर्व महानगरपालिकांचा कार्यकाळ संपून त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र आता राज्यातील सत्ता संघर्षानंतर हालचालींना वेग आला असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून असे संकेत देण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आल्याने सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूकांचा धुरळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित काढण्यात येत असल्याचा देखील उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे अडीच वर्षे लांबलेल्या निवडणुका आता लवकरच पार पडण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे संकेत दिले होते.

मागील वर्षी २०२२ पर्यंत २७ पैकी २३ महानगरपालिकांचा कार्यकाळ पूर्ण झाला. तर त्याअगोदरच २०२० साली कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि आणखीन तीन मनपाचा कार्यकाळ संपला होता. राज्यातील राजकारणात मागील पाच वर्षांत प्रचंड उलथापालथ झाल्याने आता महानगरपालिका निवडणूकीत कोणता पक्ष याचा फायदा घेईल हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेना भाजपाची युती तुटणे, पुढे महाविकास आघाडी तयार होणे, पुन्हा शिवसेना व राष्ट्रवादीचे विभाजन होऊन भाजप सोबत सत्तेत जाणे या सर्व गोष्टींचे पडसाद महापालिका निवडणुकीत उमटणार आहेत.

संतोष दिवाडकर

Municipal elections in Maharashtra are likely to be held in these months

महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली भेळ; दिव्यात तरुण शिरले मनसेच्या ताफ्यात

दिवा : महाराष्ट्रातील राजकारणात मागील पाच वर्षांपासून अनेक राजकीय भूकंप होत असल्याचे जनतेने पाहिले आहे. मात्र या सतत होणाऱ्या राजकीय बदलांना आता जनता कंटाळली आहे की काय असे चित्र पहायला मिळू लागले आहे. हेच कारण पुढे करीत दिव्यात आज असंख्य तरुणांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत मनसे मध्ये प्रवेश केला आहे. येत्या काळात हेच चित्र महाराष्ट्रभर सुरू राहील असे यावेळी मनसेच्या पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले.

शंभरहुन अधिक आमदार असलेल्या भाजप पक्षाने सुरुवातीलाच अजित पवारांना सोबत घेऊन पहाटेचा शपथविधी आटोपला होता. मात्र यानंतर पुन्हा राजकीय भूकंप होऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने अडीच वर्षे महाविकास आघाडीत सरकार चालवले. मात्र यानंतर एकनाथ शिंदेंनी केलेला मोठा बंड पाहता हे सरकार कोसळले आणि शिंदे भाजप सरकार सत्तेत आले. वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन भाग होऊन अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रातील जनता मात्र चांगलीच संभ्रमात पडली आहे.

राज ठाकरेंचा मनसे पक्ष हा कोणत्याही युती आघाड्यांमध्ये नसून वेळोवेळी राज ठाकरे चालू स्तिथीवर भाष्य देखील करीत आहेत. मनसे हा सत्ता संघर्षापासून अलिप्त असलेला पक्ष असल्याने जनमानसात आमची एक वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे सांगत कार्यकर्ते समाज माध्यमांवर व्यक्त होऊ लागले आहेत. त्याचबरोबर मनसे आणि राज ठाकरे हाच एकमेव उरलेला पर्याय असल्याचा पोस्ट समाज माध्यमांवर पहायला मिळत आहेत. याच विचारांतून मनसेत इनकमिंग सुरू असल्याचा दावा आता मनसे पदाधिकारी करू लागले आहेत.

संतोष दिवाडकर

In the presence of Raju Patil, the youth entered the MNS party