ज्येष्ठ नागरिक कट्टा भागात शेड उभारण्यासाठी मनसेचं क.डों.म.पा. ला निवेदन

कल्याण : कल्याण पूर्व ‘ड’ प्रभाग क्षेत्र येथे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्यात आलेला आहे. मात्र सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून ज्येष्ठांना येथे बसण्यासाठी प्रचंड गैरसोय होताना दिसत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर या भागात त्यांच्या बसण्याच्या जागेवर शेड उभरावेत या मागणीसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने नुकतेच मनपा प्रशासनाला निवेदन दिले आहे.

शेड बांधल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची ऊन आणि पाऊस या दोन्ही काळात होणाऱ्या गैरसोयीपासून सुटका होणार आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे मनसेचे कल्याण लोकसभा क्षेत्राचे जिल्हा सचिव संदीप नावगे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली व त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. यावर कार्यवाही करून लवकरच शेड उभारणी करून देऊ असे यावेळी उपस्थित शिष्टमंडळाला आश्वासित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

संतोष दिवाडकर

Baipan Bhari Deva review ; बाईपण भारी देवा चित्रपट का गाजतोय ?

Baipan Bhari Deva review : बाईपण भारी देवा चित्रपट का गाजतोय ? हा अनेकांना पडलेला एक प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अनेकांचे पाय सध्या सिनेमागृहाकडे वळत आहेत. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी फक्त स्त्रिया गर्दी करीत असून जेमतेम १०% पुरुषच सिनेमागृहात हजेरी लावत आहेत ते ही आपल्या बायकोच्या इच्छेखातर.

केदार शिंदे दिग्दर्शीत हा चित्रपट रितेश देशमुखच्या वेड चित्रपटा नंतर महाराष्ट्रभरात गाजला असून या चित्रपटाने बॉलिवूडची मात्र महाराष्ट्रात चांगलीच वाजली आहे. पाच करोड खर्च करून बनवलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ३२ करोडचा पल्ला पार केला आहे. इतकेच कायतर कधी नव्हे ते सिनेमागृहात फक्त मराठी चित्रपटासाठी स्क्रीन लागत असून बॉलिवूड करिता पुरेश्या स्क्रीन मिळणे आणि चित्रपट चालणे अतिशय अवघड बनल्याचे भासू लागले आहे.

कल्याण मेट्रो मॉल मधील आयनॉक्स सिनेमा मध्ये या रविवारी हिंदी चित्रपटाला जेमतेम स्क्रीन मिळाल्या असून ‘बाई पण भारी देवा’ या मराठी चित्रपटाला तब्बल १६ स्क्रीन दिल्या असून ही अभिमानाची बाब आहे. याबद्दल प्रेक्षकांनाही तितकेच धन्यवाद द्यायला हवे.

चित्रपटाला फक्त महिलांची उपस्थितीच का ?

चित्रपटाच्या नावाप्रमाणेच हा चित्रपट महिलांचाच आहे अशी या चित्रपटाची ओळख पडली आहे. मुळात चित्रपटाचे कथानकच महिलांच्या जीवनातील रोजच्या संघर्षावर आधारित आहे. त्यामुळे चित्रपट पहायला येणारी प्रत्येक महिला स्वतःला कुठे ना कुठे त्या चित्रपटात पाहत आहे. असे असल्याने हा चित्रपट गाजत असून त्याची चर्चा महिलांमध्ये सुरू असते. म्हणून महिला एकत्रितपणे येऊन ग्रुप बनवून चित्रपट पाहत आहेत. काही महिलांच्या ग्रुपने तर संपूर्ण स्क्रीनच बुक केले आहे.

महिला आपल्या जीवनात कोणत्या खडतर वाटचालीतुन जात असतात? त्या कसा संघर्ष करीत असतात? त्यांची सुख त्यांची दुःख हे खर तर पुरुषांनाही समजणे तितकेच गरजेचे आहे. म्हणून हा चित्रपट केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांनी देखील पाहणे तितकेच गरजेचे आहे. हा चित्रपट सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत एक संघर्ष दाखवतो. ज्यात हसण्यासाठी कॉमेडी देखील समाविष्ट आहे. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात जाणारी स्त्री आणि सिनेमागृहातून बाहेर पडणारी स्त्री ही काहीशी वेगळी असते. सिनेमा पाहिल्या नंतर महिलांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास येत असल्याचे पाहायला मिळत असून ही सकारात्मक बाब महिलांच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी फायद्याची ठरू शकते.

संतोष दिवाडकर

Baipan Bhari Deva review ; Why is the movie Baipan Bhari Deva popular?

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक ‘या’ महिन्यांत होण्याची शक्यता

महानगरपालिका निवडणूक : महाराष्ट्रातील लांबणीवर पडलेल्या महानगरपालिका निवडणुक केव्हा होणार असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. राज्यातील चार महानगरपालिका वगळता सर्व महानगरपालिकांचा कार्यकाळ संपून त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र आता राज्यातील सत्ता संघर्षानंतर हालचालींना वेग आला असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून असे संकेत देण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आल्याने सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूकांचा धुरळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित काढण्यात येत असल्याचा देखील उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे अडीच वर्षे लांबलेल्या निवडणुका आता लवकरच पार पडण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे संकेत दिले होते.

मागील वर्षी २०२२ पर्यंत २७ पैकी २३ महानगरपालिकांचा कार्यकाळ पूर्ण झाला. तर त्याअगोदरच २०२० साली कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि आणखीन तीन मनपाचा कार्यकाळ संपला होता. राज्यातील राजकारणात मागील पाच वर्षांत प्रचंड उलथापालथ झाल्याने आता महानगरपालिका निवडणूकीत कोणता पक्ष याचा फायदा घेईल हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेना भाजपाची युती तुटणे, पुढे महाविकास आघाडी तयार होणे, पुन्हा शिवसेना व राष्ट्रवादीचे विभाजन होऊन भाजप सोबत सत्तेत जाणे या सर्व गोष्टींचे पडसाद महापालिका निवडणुकीत उमटणार आहेत.

संतोष दिवाडकर

Municipal elections in Maharashtra are likely to be held in these months

महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली भेळ; दिव्यात तरुण शिरले मनसेच्या ताफ्यात

दिवा : महाराष्ट्रातील राजकारणात मागील पाच वर्षांपासून अनेक राजकीय भूकंप होत असल्याचे जनतेने पाहिले आहे. मात्र या सतत होणाऱ्या राजकीय बदलांना आता जनता कंटाळली आहे की काय असे चित्र पहायला मिळू लागले आहे. हेच कारण पुढे करीत दिव्यात आज असंख्य तरुणांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत मनसे मध्ये प्रवेश केला आहे. येत्या काळात हेच चित्र महाराष्ट्रभर सुरू राहील असे यावेळी मनसेच्या पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले.

शंभरहुन अधिक आमदार असलेल्या भाजप पक्षाने सुरुवातीलाच अजित पवारांना सोबत घेऊन पहाटेचा शपथविधी आटोपला होता. मात्र यानंतर पुन्हा राजकीय भूकंप होऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने अडीच वर्षे महाविकास आघाडीत सरकार चालवले. मात्र यानंतर एकनाथ शिंदेंनी केलेला मोठा बंड पाहता हे सरकार कोसळले आणि शिंदे भाजप सरकार सत्तेत आले. वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन भाग होऊन अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रातील जनता मात्र चांगलीच संभ्रमात पडली आहे.

राज ठाकरेंचा मनसे पक्ष हा कोणत्याही युती आघाड्यांमध्ये नसून वेळोवेळी राज ठाकरे चालू स्तिथीवर भाष्य देखील करीत आहेत. मनसे हा सत्ता संघर्षापासून अलिप्त असलेला पक्ष असल्याने जनमानसात आमची एक वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे सांगत कार्यकर्ते समाज माध्यमांवर व्यक्त होऊ लागले आहेत. त्याचबरोबर मनसे आणि राज ठाकरे हाच एकमेव उरलेला पर्याय असल्याचा पोस्ट समाज माध्यमांवर पहायला मिळत आहेत. याच विचारांतून मनसेत इनकमिंग सुरू असल्याचा दावा आता मनसे पदाधिकारी करू लागले आहेत.

संतोष दिवाडकर

In the presence of Raju Patil, the youth entered the MNS party

आर्य गुरुकुल शाळेत जागतिक योग दिवस साजरा

कल्याण : एज्युकेशन टुडे फाउंडेशन द्वारा संचालित नांदिवली स्थित आर्या गुरुकुल शाळेत २१ जून २०२३ रोजी योग सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पालक, शिक्षक, योगप्रशिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम बुधवारी सकाळी ठीक ७:४५ ते १०:०० या वेळेत संपन्न झाला. सीबीएससी ने पुरवलेल्या प्रोटोकॉल नुसार प्रात्यक्षिक करून घेण्यात आले. पालकांना व विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याची संधी यात दिली गेली.

आर्या गुरुकुलच्या एक महाराष्ट्र नवनिर्मित व एक एयर एस क्यू एन, एन सी सी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच ऑनलाइन योगाचे आठ दिवसाचे शिबिर घेण्यात आले. व ऑनलाईन पद्धतीने पालकांचे व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन योगासन शिबिर घेण्यात आले.

इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी सुद्धा योगासने केली व योगसनाची कृती फायदे व लाभ सांगितले. तसेच योग या विषयावर आधारित विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग सुद्धा बनवलेले आहेत. शिक्षक व पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन योग दिवस अगदी यशस्वी पद्धतीने साजरा केला गेला.

या प्रसंगी विद्यार्थी पालक व शिक्षकांनी संकल्प केला की मी स्वतः एक स्वास्थ शांतिप्रिय आनंद पूर्ण मनुष्य बनवण्याची संकल्पना करतो. माझ्या प्रत्येक कार्यातून विचारही बाजूंना शांती व स्नेहपूर्ण वातावरण बनवण्याचा व पूर्ण जगाला आपल्या समाविष्ट करण्याचा प्रयत्न करीन. आर्या गुरुकुलचे संस्थापक श्रीयुत भरत मलिक सर म्हटले आमचा विश्वास आहे की योगा हे जीवनासाठी महत्त्वपूर्ण आहे. याद्वारे आपण सर्व भेद व सीमा विसरून पूर्ण जग एकत्र करू शकतो .या कार्यक्रमादरम्यान आर्या गुरुकुलच्या चिन्मय सरगम द्वारा रचित व गायलेले गीतेची ध्वनी चालू होती या कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने झाली.

संतोष दिवाडकर

World Yoga Day celebrated at Arya Gurukul School

आई वडील ‘ती’ आणि ‘तो’

प्रेम करणं म्हणजे गुन्हा आहे असा तुमच्या मनाचा समज असेल तर ही गोष्ट तुमच्यासाठी आहे.

साधारणपणे २० व्या शतकात म्हणजेच आजपासून ५० वर्षांपूर्वी प्रेम करणं म्हणजे घोर पाप असे मानले जायचे. आज पाहायला गेलात तर अतिशय साधारण बाब बनली आहे. पण त्यातही अजूनही प्रेम म्हणजे घोर पाप आहे असं समजले जाण्याची काहींची मानसिकता आहे.

आपल्या मुलीने बाहेर प्रेम प्रकरण न करता आपल्या जातीतील आणि परिचयातील अथवा समाजातील व्यक्तीशीच विवाह करावा असे या पालकांना वाटत असते. त्यामुळे अश्या पाल्यांच्या मुली देखील आपल्या आई वडिलांच्या मान सन्मानासाठी प्रेम करण्यापासून चार हात लांब राहतात आणि घरच्यांच्या संमतीने लग्न करतात. त्यांना असे वाटते की घरच्यांचं नाक न कापता त्यांची मान ताठ रहावी.

खैरेवाडीची ही एक लहान पण मोठी वैचारिक गोष्ट. दोन लहानपणीच्या मैत्रिणी कोमल आणि जुलिशा. एकत्रितपणे शाळा कॉलेज शिकून मोठे झाल्या. मात्र जेव्हा कॉलेजची पायरी चढले त्यावेळी दोघीही प्रेमाच्या विरहात बुडून गेल्या.

कोमलच्या आयुष्यात आदित्य तर जुलिशाच्या आयुष्यात आकाशने घर केले होते. तसे दोघींच्याही घरचे प्रेम विवाहाच्या विरोधात होते. पुढे काही वर्षे अशीच शिक्षणात जात जोती. आणि हळूहळू सर्वांचे शिक्षण पूर्ण होऊन चौघेही चांगले नोकरीला लागले होते.

कोमल आणि जुलीशाच्या घरी लग्नाची बोलणी सुरू होती. कोमलने आदित्य विषयी सर्व काही घरी सांगून दिले होते. अगोदर घरच्यांनी प्रचंड विरोध दाखवला. मात्र या नंतर आदित्य बाबत कोमलच्या घरच्यांनी सर्व माहिती घ्यायला सुरुवात केली. आदित्य एका चांगल्या घरातील, सुसंस्कारि व चांगल्या हुद्द्यावर नोकरी करणारा युवक असल्याने घरच्यांनी या लग्नाला मान्यता दिली आणि कोमल आदित्यच्या प्रेमाचे लग्नात रूपांतर झाले.

कोमलच्या प्रेम विवाहामुळे जुलिशाच्या घरचे नाक मुरडत होते. त्यामुळे जुलिशा आकाश बद्दल घरात बोलण्यास घाबरत होती. ती आकाशला वेगळे होण्यासाठी समजावत होती.

अशाच एका एकांताच्या ठिकाणी दोघे बोलण्यासाठी भेटतात

“जुली तू एक प्रयत्न तर कर यार. आदित्य कोमलने समजावले ना तुला. तू प्रयत्न कर. आपले प्रेम आहे एकमेकांवर” भिजल्या डोळ्यांनी आकाश तिला विनवणी करत होता.

“आकाश… माझ्या घरचे या सर्वाला विरोधात आहेत रे. त्यांना ही सगळी फालतूगिरी वाटते रे. हे शक्यच नाही” जुलिशाही रडून सांगत होती.

“अग पण वाईट काय आहे माझ्यात ? तुझ्या शिवाय कधी कुणाचा विचार तरी केला का मी ? घरच्यांचा आदर करतो, वडील धाऱ्यांचा मान राखतो, चांगला सुशिक्षित आणि नोकरीला पण आहे ? कुठे कमी पडतोय मी ?” आकाश तिचा हात हातात घेऊन विचारत होता.

“नाही तू कमी नाही रे कुठेच. पण प्रेम विवाह ही पद्धतच मुळात माझ्या घरच्यांना नकोय. त्यांची बेइज्जती होईल गावात. माफ कर पण मला माझ्या आई वडिलांचा विचार आहे. आणि मी आधीपासूनच म्हणत आले की लग्ना बाबत मी तुला कोणताही शब्द नाही देऊ शकत” जुलिशा आपल्या पद्धतीने त्याला समजवत होती.

“जुलिशा एक प्रयत्न कर ग. कोमलच्या घरी काय वेगळं होत? बघतेस ना सहा महिने झाले किती छान सुरुये” आकाश तिला जवळ घेऊन बोलू लागला.

“प्लिज आकाश… मी माझ्या घरच्यांना समजवेल एवढी डेरिंग नाय माझ्यात. तू प्लिज समजून घे आणि इथेच थांब” रुमालाने स्वतःचे डोळे पुसत जुलिशा म्हणाली.

“जुलिशा… तू एकदा हिंमत दाखव ग फक्त. नायतर मी भेटतो तुझ्या वडिलांना.” आकाश स्वतः तिच्या जवळ जाऊन बोलला.

“आकाश तू असे काही करणार नाहीस. माझी शपथ आहे तुला” जुलीशाने त्याचा हात डोक्यावर ठेवला.

“जुलिशा… तू हे चुकीचं केलंस. ठीक आहे प्रेमा खातर मी तुझी शपथ मोडणार नाही. पण एक लक्षात ठेव. या जीवनात तू नाही तर कोणी नाही. आजन्म एकटाच राहील” असे म्हणत आकाश तिथून निघणार तोच जुलिशाचा भाऊ जयवंत समोर आला. त्याला पाहताच आकाश घाबरला. मात्र जयवंत जागेवर उभा असल्याने आकाश त्याच्या बाजूने निघून गेला. आकाश निघून जाताच जुलिशा पुरती घाबरली.

“दादा…. ते…. तो… माझा कॉलेजचा मित्र… आम्ही ते बोलायला भेटलो इथे… एक डिस्कशन…” पैलवान असलेल्या धिप्पाड भावा समोर उभा राहून जुलिशाची पाचावर धारण बसत नव्हती. तिला काय बोलावे सुचेना. ती रुमालाने डोळे आणि चेहरा पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागली. जयवंतने तसेच तिच्या हाताला धरून जीपमध्ये बसवले आणि घरा कडची वाट धरली.

गाडी रस्त्यातून पुढे आली आणि गावात घुसण्या ऐवजी त्याने सरळ नेली.

“दादा… आपण कुठे जातोय?” दबक्या आवाजात जुलिशाने प्रश्न केला.

मात्र जयवंत काही बोलला नाही. गाडी आकाशच्या गावाच्या दिशेने निघालेली पाहून जुलिशा घाबरली.

“दादा अरे तू मला सांग ना काय करतोयस ? प्लिज चल घरी दादा” जुलिशा रडू लागली.

जयवंत तिच्याकडे न पाहता काहीही न बोलता शांतपणे जीप चालवत होता. पाहता पाहता आकाशचे गाव आले आणि जीप त्याचे गाव सोडूनही पूढे निघाली. आधी आकाशला मारहाण होईल असे वाटत असताना दादा आता गाडी कुठे घेऊन चाललाय हे तिला कळेना.

काही वेळा नंतर एका गावातील वाडीत जयवंतने गाडी नेली आणि एका घरा समोर उभी केली. जयवंत गाडीतून उतरला तसे जुलिशाही त्याच्या मागे गेली.

“हे कुणाचं घर आहे दादा ? मला इथे का आणलं आहेस ?” जुलिशा विचारू लागली.

जयवंतने तिचा हात धरला आणि तिला घरात नेले. घरातील हॉल मध्ये एक फोटो लावला होता. त्यासमोर दोघेही उभे राहिले.

“दादा काय तरी बोल… कोण आहे ही ? मला का आणलेस इथे” जुलिशा फोटो कडे पाहून गोंधळून बोलली.

“वैष्णवी….” जयवंतच्या तोंडून पहिल्यांदा शब्द फुटले.

“वैष्णवी ??? कोण आहे ही ? मला काय कळेना दादा.” जुलिशाला काही सुचेना.

“माझी पोरगी आहे ती. माझी एकुलती एक लेक” पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीने उत्तर दिले.

तसे जुलिशा मागे वळली. जयवंतची नजर मात्र फोटोवरून हटत नव्हती.

“मी गणपत ढोले पाटील… या गावचा पोलीस पाटील. एके काळचा राजा माणूस. आज पण पैशाने रुबाबाने राजाच आहे. पण पैसा असून हा राजा शेवटी भिकारीच आहे” असे म्हणून ती व्यक्ती ओसरीवर बसली. अंगात जॅकेट, खाली धोतर, डोक्यावर ऐटदार टोपी आणि चष्मा घालून तो व्यक्ती बसला होता.

“जुलिशा तुला काय वाटलं ? आकाश आणि तुझं प्रेम प्रकरण मला माहित नाही ? सगळं माहीत होतं मला. आज मुद्दाम तुमच्यातील बोलणं ऐकायला मी तिथे आलो होतो. पण तुमचं बोलणं ऐकून मला काय करावं कळेना. म्हणून तुला तुझ्या हातून नेमकं काय पाप घडतंय हे दाखवून द्यायला इथे आणलं” जयवंत बोलू लागला.

“दादा सॉरी पण आता मी तुम्ही सांगाल त्याच्याशी लग्न करणार आहे. मी आकाशला लग्नाचं वचन पण दिल नाही. आणि आमच्यात असं काही चुकीचं पण घडलं नाही कधी” जुलिशा बोलू लागली.

“जुलिशा तुला माहिती का हा फोटो कुणाचा आहे ते ?” जयवंतने पुन्हा तिचे लक्ष फोटोकडे वेधले.

“हा… या काकांची मुलगी आहे ना ती ? वारली ना” जुलिशा कुतूहलने बोलली.

“त्यांची मुलगी आहेच पण ही कदाचित तुझी वहिनी असती.” जयवंतच्या डोक्यात पाणी आले.

“काय दादा ??? तुझं हिच्या सोबत ?” जुलिशाला आश्चर्याचा धक्का बसला.

“होय… मघाशी तिथे आकाश बोलत होता… पण मला असं वाटत होतं की हा मीच आहे काय ? जो प्रेम मिळवण्यासाठी स्वतःचा जीव मारतोय. तो बाजूने गेला आणि मी बघतच राहिलो.” जयवंत ओसरीवर चालून बोलू लागला.

” पण दादा मग लग्न का नाही झालं?” जुलिशा विचारू लागली.

“माझ्यामुळे नाही झालं लग्न…” पाठीमागे बसलेल्या गणपत पाटलांनी बसल्या बसल्या खाली मान घालून उत्तर दिलं.

“म्हणजे काय काका ?” जुलिशा त्यांच्याकडे पाहून विचारू लागली.

“गावचा पाटील ना मी ? पाटलाला काळजी त्याच्या फेट्याची. माझा लेकीन मला कधी ही भानगड नाय कळू दिली. पण तुझा भाऊ जयवंतने एकदा स्वतः इथं येऊन माझ्या लेकीचा हात मागितला. गर्वाने माजलेला मी तुझ्या भावाला लाथा बुक्क्यांनी मारून घराबाहेर काढला. आणि त्याच लगीन सराईत लेकीच हात पिवळे करून लांबच्या गावी पाठवली. काय माज होता या पाटलाला. मिश्या ताणून गावात हिंडायचं म्हणजे जणू काय गावचा राजाच. पण एकुलत्या एका माझ्या लेकीच सुख नाय ओळखू शकलो. तिच्या काळजावर घाव करून तिला आमच्याच समाजातल्या एका तालेवार घरात दिली.” असे म्हणून गणपत पाटलांचे डोळे पाणावले.

“मग… पुढे काय झालं काका ?” जुलिशाने खाली बसून गणपत पाटलांच्या खांद्यावर हात ठेवून प्रश्न केला.

“जातीनी माझ्या पोरीची माती केली” असे म्हणत गणपतराव ढसा ढसा रडू लागले.

“काका… शांत व्हा… नक्की काय झालं ताई सोबत…” जुलिशा विचारू लागली.

“गळा दाबून मारून टाकलं तिच्या इज्जतदार नवऱ्याने.” जयवंतने पाठीमागून उत्तर दिले.

“दादा…… पण का ???” हे ऐकून जुलीशाला धक्का बसला.

“त्याला काय विचारते पोरी… या कमनशिबी बापाला विचार…” असे म्हणत ते आपले डोळे हाताने पुसू लागले.

“काका मला प्लिज नीट सांगा. मला काय कळेना. आधीच दादा इथे का घेऊन आला तेच समजेना” जुलिशा गोंधळून गेली.

“तिचा प्रेम विवाहाला विरोध करून जातीत लग्न लावून दिल. पण त्या सैतानानी माझ्या पोरीचं हाल हाल केलं. बापाची इज्जत राखावी म्हणून पोरगी एका शब्दाने बापाला काय बोलली नाही. वर्षभर संसार झाला आणि एका रात्रीत भाडखाऊ पक्का दारू पिऊन माझ्या लेकीला घाणघाण श्या देऊ लागला आई बापावरून. तिला काय ते ऐकवना. ती ओरडली त्याच्यव. त्या सैतानाने त्या दारूच्या नशेत कोयता फिरवला माझ्या बाळाच्या मानगुटीवरून…” गणपतराव ढसा ढसा रडू लागले.

“तळ हाताच्या फोडा सारखी जपली ग तिला. पण तीच सुख नाय ओळखु शकलो ग नाय ओळखू शकलो. असलं प्रेमाच लग्न लावावं तर गावात नाक कापलं जाईल वाटायचं. काय म्हणतील गावातली लोक ? असं वाटायचं. पण आज गणपत पाटील जेवलाय की मरून पडलाय घरात एक भाडखावं डोकवना गावातला माझ्याकडे. आणि यांचा विचार केला मी माझ्या पोरीसाठी” आपले दोन्ही हात फोटोकडे जोडून रडू लागले.

“आबा शांत व्हा… जे झालं ते झालं. आता ते बदलता येणार नाही. पण आपण दुसऱ्यांना पण बदलू शकतो ना.” असे म्हणत जयवंत ने गणपत पाटलांना सावरले.

“दादा तुला आता नेमकं काय म्हणायचं आहे?” जुलिशा त्याच्याकडे पाहत म्हणाली.

“सांगतो तुला… चल घरी..” असे म्हणत जयवंत जुलिशाला घेऊन घराकडे निघतो.

जयवंत जुलिशाच्या प्रेम प्रकरणा बद्दल घरात सर्व काही सांगून टाकतो. हे सर्व सांगितल्या नंतर त्याने त्याच्या प्रेम प्रकरणा बद्दल जे काही घडले ते ही त्याच्या घरात सांगितले. घरच्यांनी या गोष्टीवर खूप विचार केला आणि त्यांनी आकाशची माहितीही काढली. आकाश आपल्या व्यक्तीमत्वात कुठेच कमी पडत नव्हता. शिक्षण, नोकरी, घरदार या सर्वात त्याने स्वतःला घडवले असल्याने त्याला नाकारण्यासाठी प्रेम विवाह हेच एक कारण बनले होते. शेवटी सर्व बाजूने विचार केल्या नंतर कोमल आदित्य पाठोपाठ आकाश आणि जुलिशाचे प्रेम देखील विवाहात रुपांतरीत झाले.

आज शहरातील गाव खेड्यातील कित्येक पालक प्रेम विवाहाला अनेक कारण देऊन नाकारतात. कुणाची जात आडवी येते, कुणाची आर्थिक परिस्थिती तर इतर मतभेद. यामुळे जातीचा नादात कितीतरी मुलींचा आयुष्याची माती झाल्याचे नेहमी दबक्या कानांनी ऐकायाला मिळते. पण याचा अर्थ असा नाही की प्रेम विवाहच काय तो चांगला. बऱ्याचदा इथेही काही गोष्टी बदलतात. काही प्रेमविवाह देखील फसतात. त्यामुळे थेट परवानगी अथवा विरोध न करता काय योग्य आणि अयोग्य याची पारख करा आणि मगच आपल्या मुलीला योग्य घरात द्या. एक गोष्ट लक्षात घ्या. चार लोक काय म्हणतील हा विचार करू नका. ही चार लोक कधीच आपली नसतात. ना सुखात ना दुःखात. त्यामुळे आपल्या पुरता विचार करा, आपल्या लेकरांचा अगोदर विचार करा. लोकांना त्यांचा विचार करू देत. शेवटी चांगले केले तर जळणार आणि वाईट केले तर हसणार. ही चार लोक आहेच तशी.

समाप्त !!!

लेखन :- संतोष दिवाडकर

St. Mary’s High School कल्याणचा एसएससीमध्ये १००% निकाल

St. Mary’s High School :- दहावी बोर्ड परीक्षेत सेंट मेरी हायस्कूल, कल्याणचे विद्यार्थी उत्तुंग यश संपादन करून आले आहेत. एसएससी बोर्ड परीक्षामध्ये 100℅ निकाल मिळविण्याची परंपरा कायम ठेवत, शाळेतील ssc च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळेचा झेंडा फडकवत ठेवला आहे.

या वर्षी १९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ज्यात 24 विद्यार्थ्यांनी 90℅ आणि त्यावरील 107
विद्यार्थ्यांनी 75℅ गुण मिळवले आहेत. यात टॉपर्स आहेत साक्षी तांबे 95.60℅, श्रेया वंजारी.
95% आणि आर्यन साहू 94℅.

सेंट मेरीज हायस्कूलच्या प्राचार्या दिव्या बोरसे यांनी उत्कृष्ट निकालाबद्दल शाळेचे विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, “मला माझ्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांनी सर्वोत्तम प्रयत्न केल्याबद्दल मला खरोखर अभिमान आहे. हे सर्व त्यांचेच आहे परिश्रम आणि समर्पण ज्याचे फळ मिळाले. आर्य ग्लोबलचे चेअरमन भरत मलिक, नीलम मलिक, बिस्कुटे मॅडम यांनी सेंट मेरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

संतोष दिवाडकर

St. Mary’s High School Kalyan 100% Result in SSC

आर्य गुरुकुल, कल्याण शाळेच्या एन.सी.सी.नेवल विंग छात्र सैनिकांचा CATC कॅम्प मध्ये डंका

कल्याण : आर्य गुरुकुल शाळेच्या एन.सी.सी. नेवल विंग छात्रसैनिकांचा वार्षिक प्रशिक्षण शिबीर क्रं ५३८ कॅम्प डी.ए.वि पब्लिक स्कुल, पनवेल येथे दि.२२ मे २०२३ ते ३१ मे २०२३ दरम्यान संपन्न झाला. सदर कॅम्प मध्ये शाळेचे २५ कॅडेट्स सहभागी झाले होते. या शिबिरात मुंबई ठाणे नाशिक येथील विविध नऊ शाळा आणि काही महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.

शिबिरादरम्यान विविध प्रकारच्या उपक्रम आणि स्पर्धेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. विद्यार्थी चित्रकला, रीले टग ऑफ वार, ड्रिल, डॉजबॉल इ. स्पर्धेमध्ये भाग घेऊन शाळेला विजेतेपद मिळवून दिले. आर्य गुरुकुलच्या नेवल छात्र सैनिकांनी ड्रील स्पर्धेत द्वितीय तसेच नवल एन.सी.सी. छात्रा अनुश्री अग्रे हिने उत्कृष्ट छात्रा सैनिक या प्रकारात स्वर्ण पदक मिळविले व सांस्कृतिक कार्यक्रमात वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तर आर्य गुरुकुल शाळेने व्हॉलीबॉल मध्ये द्वितीय पदक व रिले रेस मध्ये द्वितीय पदक मिळविले. तसेच केयुर पवार व नायजेल कुटिल यांना आदर्श सुत्रसंचालक म्हणून सन्मानित केले. या शिबिरात आर्.डि.सी कमानडऱ सीनियर कैडेट कॅप्टन मुन्ना चौधरी यांच्याशी एन.सी.सी. छात्रा सैनिकांना परस्पर संवाद साधता आला.

विद्यालयाच्या प्राचार्या राधामणी अय्यर यांनी शिबिरात सहभागी छात्रसैनिकांचे त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन आणि कौतुक केले. शाळेचे क्रीडा अधिकारी दीपक वर्मा तसेच माजी एअरफोर्स ऑफिसर आणि शाळेचे व्यवस्थापन अधिकारी अनुप नायर यांचे छात्रसैनिकांना शिबिरापुर्वी मार्गदर्शन लाभले होते. त्यांनीही सर्वांचे अभिनंदन केले. तसेच १ महा. नेवल एन.सी.सी.चे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन के.के. कुर्रा तसेच शिबिर प्रशिक्षक पेटी र्ऑफिसर अर्विन्द शाह यांनीही छात्रसैनिकांचे कौतुक केले. शाळेच्या एन.सी.सी.नेवल विंग थर्ड ऑफिसर भारती नरे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले.

संतोष दिवाडकर

Arya Gurukul, Kalyan School NCC Naval Wing Student Soldiers strike at CATC Camp

The Kerala story impact : हिंदू धर्मीय मुलीने मोडले नियोजित लग्न ?

The Kerala story impact : ‘द केरला स्टोरी’ हा लव जिहादवर आधारित असलेला चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाचे पडसाद देखील देशभरात उमटू लागलेले आहेत. तर धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काही राज्यांनी या चित्रपटाला बॅन केले आहे. मात्र या चित्रपटामुळे काही मुलींनी आपले ठरलेले लग्न मोडल्याच्या पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागल्या आहेत.

फेसबुकच्या एका ग्रुपवर आलेल्या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले आहे. हिंदू धर्मीय मुलीने नुकताच ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहून तरुणीने २३ मे रोजी होणारे आंतरधर्मीय नियोजित लग्न रुद्ध केले. असे या पोस्टमध्ये लिहण्यात आले आहे. सोबत या तरुणीचा एका कार्यालयातील पाठमोरा फोटो व एका नोटीशीचा फोटो शेअर केला गेला आहे. या मध्ये तरुणीची माहिती लपवण्यात आली आहे. समाज माध्यमांवरील ही पोस्ट असल्याने तिच्या सत्येतेची पुष्टी आम्ही करीत नाही.

व्हायरल केलेल्या पोस्ट नुसार हा प्रकार गुजरात राज्यातील वडोदरा जिल्ह्यातील आहे. स्पेशल मॅरेज कायद्यानुसार सदर हिंदू तरुणीचे साजिद नावाच्या २७ वर्षाच्या मुस्लिम व्यावसायिक तरुणाशी विवाह होणार होता. मात्र या तरुणीने चित्रपट पाहिल्या नंतर हे लग्नच रुद्ध केल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. बॉक्स ऑफिसवर कमावलेल्या पैशां पेक्षा मुलींचे जीव वाचवणे जास्त महत्त्वाचे असल्याचेही पोस्टमध्ये म्हटले आहे.

संतोष दिवाडकर

The Kerala story impact : Hindu religious girl broke the arranged marriage?

https://www.facebook.com/groups/360609144576990/permalink/1246592649311964/?mibextid=Nif5oz

‘आजी’ एक वटवृक्ष अर्थात आधारवडाची सावली

आई …. दोनच शब्दात साऱ्या ब्रम्हांडाची ताकद सामावली आहे. देवाधिकातही आईला प्रथम स्थान आहे. जिच्यामुळे पाहिले हे सुंदर जग ती आई म्हणजे आपल्यासाठी पहिली देवी. आणि बाप हा देव. फक्त एका दिवसा पुरता गोड गोड बोलणे नव्हे तर आयुष्यभर तिच्या उपकाराची जाण ठेवणं म्हणजे जन्माचे सार्थक.

आजच्या या मातृ दिना निमित्त एक गोष्ट मी तुमच्याशी शेअर करतोय. जी नुकत्याच तीन महिन्यांपूर्वी घडली होती. ते सर्व प्रसंग आज मला सर्वांना सांगायचे आहेत ज्यांना ते माहीत नाहीत. ही गोष्ट माझ्या आईच्या आईची म्हणजेच माझ्या आजीची आहे.

आजी आणि आजोबांचे तरुण पणातील छायाचित्र

दिवाडकरांची लेक गोसाव्याची सून झाली आणि पोमगावच्या मारुती गोसावी यांच्याशी तिचा ७० च्या दशकात विवाह झाला. पहिली मुलगी म्हणजे माझी आई, त्या नंतर माझे मामा आणि मग माझ्या तीन मावश्या. अश्या चार बहिणी आणि एक भाऊ असे पाच मुलांचे संगोपन मोठ्या हलाखीत झाले. इतकेच नाहीतर विठ्ठल आणि लक्ष्मण गोसावी हे लहान दिर देखील पाठच्या भावा प्रमाणे होते. सासू आणि सासर्याचे हित पाहून तिने संसार नेटाचा केला.

आजीची सासू बबा बाई आणि माझी लहान मावशी

आजकाल सर्व सुखसोया आहेत. पण २० व्या शतकात खेडेगावात काय होत हो ? साधा रस्ता देखील शहराला जोडला नव्हता. जे काय दळणवळण असायचे ते धरणातून व्हायचे. मुळशी धरणातील लाँचेने गावखेडी जोडली गेली होती. पैसा तर बघण्यातच नसायचा. अश्या हलाखीच्या परिस्थितीत तिने सर्व मुलांना मोठे केले. आणि पुढे ज्याची त्याची लग्न होऊन संसार सुरू झाले.

आजी आजोबा सोबत आजोबांचे लहान भाऊ व भाऊजय

साधारणपणे २१ व्या शतकात परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. कुटुंब वाढली होती. सुखसोयी गावात पोहोचल्या होत्या. जुन्या लोकांना जुने दिवस आठवत होते. पण नव्या पिढीला मोबाईलच्या नेटवर्क पुढे जुन्या दिवसातील त्रास कळणारा नव्हता. माझ्या आजीने लहानपणा पासून लेक, लेकी, नातवंड असं सर्वांना जीव लावला. त्यामुळे तिची माया कुणी विसरणार नाही. आता मी त्या प्रसंगावर येतो जो मला सांगायचा आहे.

फेब्रुवारी महिन्यात माझ्या बहिणीचे लग्न होते. नातीचे लग्न म्हणून माझी आजी शिळीमला आमच्या गावी आली होती. तसं सुरुवातीला तिला सर्दी होती. पण जस जसे लग्नाचे काही दिवस जवळ आले तिच्या सर्दीचे रूपांतर कफ मध्ये झाले. तिच्या छातीत हळूहळू कफ वाढू लागला होता. लग्नाच्या दोन दिवस आधी तिला आम्ही जवणला असलेल्या डॉक्टर कडे नेले होते. त्या डॉक्टरने वाफ दिली आजी औषध गोळ्या देऊन नॉर्मल असल्याचे सांगितले. यानंतर आजीला दोन दिवस काहीसे बरे वाटत होते.

लगीन घर असल्याने जो तो आपल्या घाईत आणि तंद्रीत होता. कार्यक्रम, विशेष रसम, बांगड्या, मेहंदी, सामानाची आवरा आवर, अक्षता, मंडप, लायटिंग, साऊंड, गाणी, उटणे, असे सर्व रसम असल्याने फारसे लक्ष आजीकडे जात नव्हते. मुळात ही वेळ अशी असते की कोणता पाहुणा कुठे असतो हे देखील कुणाला माहीत नसते. आणि इतक्या गडबडीत मात्र आजीचा दम वाढू लागला. तसे दिसताना ती नॉर्मल वाटत होती. कारण जेवतेय, बसतेय असं सर्व दिसत होतं.

लग्नाच्या दिवशी आजी लग्नालाही आली. लग्न पाहीले आणि रात्री घरी आलो. आणि त्या रात्री तिला खूप जास्त त्रास झाला. त्या रात्री ती शिंदू मावशीच्या घरी झोपली होती. रात्रभर तिला श्वास घेता येत नव्हता. मात्र कोणालाही कल्पना नव्हती की त्रास बळावला आहे. सकाळी तिने अंघोळ केली. थोडावेळ बसली आणि ती खाटेवर जाऊन झोपली. तिला प्रचंड दम लागला होता. कोणीतरी मला दवाखान्यात न्यावं असं तिला वाटत होतं. पण तिला जास्त बोलता येत नव्हते. मी, विकास, गणेश उशिरा उठलो होतो. आम्ही नाश्ता केला, पीक आप गाडी घेऊन मंडप वाल्याचे सामान पोहोचवले. दुपारचे जेवणही केले.

दुपारी कुंदा काकूने आजीची तब्येत पाहिली तेव्हा तिला जास्त त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर तिला पुन्हा एकदा डॉक्टर कडे न्यावे लागेल असे वाटले. विकासने पिक अप काढली आणि आजीला पवना नगरला नेले. सोबत काकू आणि गणेश होता.

पवना नगरला डॉक्टरानी तपासल्यानंतर छातीत खूप कफ झाला असून न्यूमोनिया झाला असल्याचे सांगितले. शिवाय एडमीट करून ऑक्सिजन लावावे लागेल असे सांगितले. यानंतर तिला घेऊन गेलेल्यांना तिची तब्येत खालावली असल्याचे समजून आले. यानंतर घरी फोन आला. घरी फोन आल्यानंतर वातावरण देखील बदलले. मी पटकन फोन करून माझ्या मित्राची गाडी बोलवली. पप्पा, रंगनाथ काका, आणि सुरेखा असे तिघे जण त्या गाडीतून कामशेतला निघाले.

कामशेत मधील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात आजीवर उपचार सुरू झाले. आता घरात माझी आई, सुरेखा मावशी दोघेही चिंता करीत होते. बाळू मामा आणि बापू दोघेही बाईक घेऊन पोमगावला डॉक्युमेंट आणायला गेले होते. लोणावळ्याहुन उमेश मामा, रमेश मामा देखील कामशेतला आले होते.

घरी फक्त मी, आई, मावशी, राणी आणि अण्णा एवढेच होतो. त्यात अण्णा खूप जास्त पिले असल्याने त्यांनाही आम्हाला सांभाळावे लागत होते. गावात पाणी नसल्याने लग्नासाठी मागवलेला निम्मा टँकर खाली करून घरात रिकामे झालेले पाण्याचे ड्रम भरायचे होते. अंधार पडायच्या आत आम्ही सर्व पाणी भरले.

रात्री आठ वाजता मामा आणि बापू आले. यावेळी उमेश मामा चा बाळू मामा शी फोनवरून बोलणे झाले. तब्येत जास्त असल्याचे बाळू मामला समजले आणि मामा एकटेच वरहंड्यात बसून राहिले. खात्री साठी मी पप्पांना फोन केला. तर त्यांनी तब्येत ठीक आहे रिपोर्ट आले की आम्ही निघू असे सांगितले. मग गणेश सोबत बोललो. आणि मग उमेश मामाला विचारले. तोवर मामा आणि मावशी आई घरी नुसते अधून मधून रडत होते. खूप भावुक आणि नाजूक असं वातावरण होत. त्यात हे सर्व बीपीचे पेशंट असल्याने मला विशेष काळजी घ्यावी लागत होती. कारण मामा म्हणाले की तिचं काही खरं नाही. आणि तिथून मग तिघेही रडायला लागले.

उमेश मामा ला फोन लावल्या नंतर परिस्थिती समजली. आणि मी फोन स्पीकरला टाकला. तेव्हा आजी ठीक असल्याचे समजले आणि तिघेही शांत झाले. रात्री दहा वाजता हॉस्पिटलमध्ये गेलेली सर्व माणसे घरी आली. आम्ही सर्वांनी जेवण केले. आजीने आम्हाला माझ्या बहिणीच्या जागरण गोंधळाला जायला सांगितले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व तिकडे होतो.

तिसऱ्या दिवशी आम्ही सर्व आजीला पाहायला कामशेतला आलो होतो. हॉस्पिटलमध्ये मी आणि बापू आजीला भेटायला गेलो आणि ती पाहून रडायला लागली. तिला नीट बोलताही येत नव्हते. मी फक्त काळजी घे असं बोललो आणि तिथून निघून आलो. कारण डॉक्टर फार वेळ थांबू देत नाहीत. मात्र हॉस्पिटलमधून निघताना माझी आई, मावशी, मी आम्ही पुन्हा तिला भेटलो. कोणास ठाऊक ही भेट शेवटची ठरावी. कारण तिची किडनी निकामी होत असल्याचे डॉक्टर सांगत होते. कफ पूर्ण छातीत पसरला होता. मात्र आता काहीसा कमी झाल्याचे जाणवत होते.

आजीची सून माया मामी तिची विशेष काळजी घेत होती. मात्र हॉस्पिटलचे बिल जवळपास लाखभर रुपयांवर आले होते. हे हॉस्पिटल परवडणारे नसल्याने इथून दुसरीकडे शिफ्ट करण्याचे प्लॅनिंग सुरू होते. धोका मोठा होता. मात्र पाण्या सारखा पैसा हॉस्पिटल ओरबाडत होते.

चौथ्या दिवशी मी माझ्या बायकोला घेऊन सासरी आलो. कारण तिची तपासणी होती. त्याच दिवशी आजीला दुपार नंतर पुण्यातील सिम्बॉयसिस या मोठ्या मात्र नामांकित हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले. हॉस्पिटल बदलल्यानंतर तिच्या तब्येतीत आणखीन बिघाड झाल्याचे समजले. ती रात्र गेल्यानंतर तिच्या जगण्याची शक्यता धूसर झाली. आम्ही देखील दुसऱ्याच दिवशी बायकोचे चेकअप करून घ्यायचे ठरवले.

पाचव्या दिवशी सकाळीच आम्ही हडपसर कडे निघालो. उमेश मामा सोबत बोलणेही झाले. डॉक्टरानी जगण्याची शक्यता नसल्याचे सांगितले असून आता आजीला गावी नेण्याचे विचार असल्याचे सांगितले. गावी नेणार म्हणजे खेळ संपलेला आहे असाच थोडक्यात त्याचा अर्थ होता. बायकोचे चेकअप झाल्यानंतर आम्ही धनकवडी येथे नातेवाईकांकडे गौरी ताई कृष्णा कुरावले यांच्या घरी मुक्काम केला.

याच रात्री शिळीम मध्ये मोठा हाहाकार माजला होता. सर्व काही संपलं असे समजून माझी आई, काकू, मावशी सर्वजण रडायला लागले. दुसऱ्या दिवशी गाडी करून पोमगावला जायचे असे त्यांचे ठरले. आणि कसेबसे झोपले. रात्रभर कुणाच्या डोळ्याला डोळा नव्हता.

सातव्या दिवसाची सकाळ उजडताच सर्वांनी आवराआवर सुरू केली. आणि तितक्यात एक फोन कॉल पप्पांचा झाला.

“हा बोल उमेश. निघाले का तुम्ही तिकडून ?” पप्पांनी हलक्या आवाजात विचारले.

तोवर घरात आई आणि काकू कोमेजल्या चेहऱ्याने आवराआवर करीत होते. आणि इकडे घराबाहेर फोन सुरू होता.

“दाजी… अहो तुम्ही काय गडबड करू नका निघायची. आईची तब्येत आता वैशि बरिये.” उमेश मामा म्हणाले.

असे ऐकताच पप्पांना आश्चर्याचा धक्का बसला.

“डॉक्टर आलथे आता तपासायला ते म्हणाले पेशंटच्या तब्येतीत सुधारणा जाणवतेय. तुम्ही काही घाई करू नका अजून राहुद्यात इकडे” असे मामांनी सांगितले.

“अच्छा अच्छा वा… देवाला काळजी बाकी. बरं झालं. आता अक्का आणि आम्ही सगळे निघणार होतो थोड्या वेळानी नवनाथची गाडी करून” पप्पा म्हणाले.

हा फोन कॉल संपताच पप्पा ही बातमी सांगायला आतमध्ये आले.

“उमेशचा फोन होता. तो म्हणाला तुम्ही काय तिकडं येऊ नका. मामी आहेत ठीक” पप्पांनी आई आणि काकुला सांगितले.

हे ऐकताच त्यांना कानावर विश्वास बसेना झाला. कोमेजलेले चेहरे पुन्हा एकदा खुलले. आणि सर्वांनी देवाचे आभार मानले. सकाळी ९ वाजता मी देखील असाच कॉल उमेश मामाला केला. त्यांनी देखील मला असेच सांगितले. मलाही छान वाटले. हा एक दैवी चमत्कार होता असे आम्हाला सर्वांना आजही वाटते. मग पोमगावला न जाता आम्ही सरळ पुन्हा राजगुरूनगरला आलो.

दुसऱ्या म्हणजेच आठव्या दिवशी आजीची तब्येत आणखी सुधारली आणि तिला आयसीयू मधून जनरल वॉर्डात शिफ्ट केले. याचा अर्थ हा की धोका आता टळलेला होता. मी, बायको आणि माझे सासू, सासरे, मेव्हणा आम्ही तिला पहायला हॉस्पिटलमध्ये आलो. तिला भेटलो, बोललो, एकदम छान वाटलं. आणि दुसऱ्या दिवशीच आम्ही कल्याणला आलो.

पुढे काही दिवस आजी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत राहिली. सर्वांनी तिची खूप काळजी घेतली. सासू सुनेचे भांडण म्हणजे काही नवीन नाही. मात्र तरीही सून म्हणून माझ्या मामीने तिचे कर्तव्य बजावले. मामी दिवस रात्र तिच्या सोबत हॉस्पिटलमध्ये होती व अजूनही सेवा करीत आहे. अनेकांनी खूप धावपळ आणि मेहनत घेतली. आणि शेवटी काही दिवसानंतर आजीला डिस्चार्ज देण्यात आला.

आजी घरी तर आली पण आता नवा प्रश्न निर्माण झाला होता. ते म्हणजे तिला संडास येत नसल्याने तिचे पोट फुगत होते. शिवाय उलटी होत असल्याने पोटात अन्नही जात नव्हते. थोडाफार फळांचा रस, काहीतरी खाणे आणि पाणी यावरच ती जगत होती. तेव्हाही सर्व जण तिला बघून जात होते. आता काही दिवसांपूर्वी राणीने व्हिडिओ कॉल केला होता. ज्यात जवळपास तीन महिन्यांनंतर आजी आपल्या मूळ रुपात नऊ वारी साडीत आम्हाला दिसली होती. पूर्वी प्रमाणेच ती चालत आणि बसत होती. शिवाय जेवणही हळूहळू सुरू केले होते. म्हणजेच थोडक्यात आता ती पहिल्या सारखी होत आहे. देव करो आणि ती आधी सारखीच धड धाकट होवो.

स्वर्ग रिटर्न आहेस तू… असे अनेक जन तिला म्हणतात. कारण सर्व संपलेले असतानाही ती त्यातूनही सावरून बाहेर आली. तिची जगण्याची प्रचंड इच्छा, तिच्यासाठी प्रार्थना करणारे असंख्य हात, आजारपणातही देवाचा धावा करणारे तिचे मन, जागेवर पडूनही दुसऱ्यांच्या काळजीने खालीवर होणारा तिचा जीव. खरंच देवाच्याही मनात काहीतरी आलं असावं म्हणून देवाने तिला पुनर्जन्म दिला असावा असं आम्हाला वाटत. सारं काही संपलेलं असताना सारं काही सुरू राहतं यामागे कोणती मोठी दैवी शक्ती आहे ? हे आपल्या सारख्या सामान्य माणसाला कळणारे नाही.

आजच्या मातृ दिनाच्या निमित्ताने आज हा ताजा असलेला प्रसंग तुम्हाला मी आज सांगितला. कारण ती आईच असते जिच्या मायेच्या पंखात आम्ही विसावलेलो असतो. एकच सांगेल की जमत असेल तर शक्य तितकी काळजी घ्या, आणि जमत नसेल तर त्रास होणार नाही असे वागू नका. कारण स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी…

संतोष दिवाडकर