Kalyan मध्ये Dengue मुळे एकाचा मृत्यू

Dengue in kalyan: शहरात मागील काही दिवसांपासून डेंगूने डोके वर काढले असून कल्याण पूर्वेत एका तरुणाचा डेंगूमुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. विलास म्हात्रे Vilas Mhatre (३१) असे या मृत तरुणाचे नाव असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. दरम्यान गुरुवारी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. डेंगूच्या वाढत्या फैलावा संदर्भात मनसेने दोन दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्तांची भेट घेतली होती. आता तरुणाच्या मृत्यूनंतर मनसेने अधिक संताप व्यक्त केला आहे.

डेंग्यू, मलेरियाच्या संसर्गामुळे नागरिकांचे आरोग्य सध्या धोक्यात आले असल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेचे ड्रेनेज बाबतीत व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी साठत आहे. यामुळे काही ठिकाणी पाण्याची डबकी तयार होतात. अशाच साठलेल्या पाण्यातून डेंगूच्या डासांचा प्रादुर्भाव अधिक होतो. त्यामुळे महापालिकेने काटेकोरपणे नालेसफाई करायला हवी अशी मागणीही मनसेने केली होती. या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत धूर व कीटकनाशक फवारणी करायला हवी, तसेच घरोघरी डेंग्यू प्रतिबंधक जनजागृती मोहीम राबवावी अशा संदर्भाचे निवेदन मनसेने महापालिका आयुक्तांना नुकतेच दिले आहे.

नागरिकांनी घ्यावी ही काळजी

डेंग्यूचे डास हे साचलेल्या पाण्यातूनच उत्पन्न होतात. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा. पाण्याने भरलेल्या कुंड्या, टायर मध्ये साठलेले पाणी, झाडा झुडपांजवळ साठलेले डबके अशा ठिकाणी डेंगूचे डास मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होतात. त्यामुळे नागरिकांनी अशा पध्दतीने पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. घरात डासांचा शिरकाव टाळण्यासाठी संध्याकाळी खिडक्या, दारे शक्यतो लावून घ्याव्यात. डासांपासून बचाव करणाऱ्या संसाधनांचा वापर करावा. डासांचे अधिक प्रमाण असल्यास मच्छरदाणीचा वापर अवश्य करावा.

डेंगूची लक्षणे काय आहेत ?

अचानक ताप येणे, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी आणि सांधेदुखी, थकवा, काहींना मळमळ आणि उलट्या, काहींच्या त्वचेवर पुरळ येणे अशी लक्षणे सुरुवातीला आढळून येतात. सौम्य डेंग्यूमध्ये, ताप ६-७ दिवसांनी कमी होतो. गंभीर प्रकरणांमध्ये पुनर्प्राप्तीस २-३ आठवडे लागू शकतात.

“पावसाळ्यात डेंग्यूची लक्षणे ओळखणे महत्वाचे आहे. लक्षणे दिसल्यास सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळ वाया घालवू नये. त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. रक्त व सर्व तपासण्या करून घ्याव्यात. डेंग्यूची लागण झाल्यावर योग्य उपचार आणि विश्रांती घेणे आवश्यक आहे.”

डॉ.प्रमोद बैरागी-वैष्णव, वरिष्ठ चिकित्सक

“डेंगूमुळे मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी झालो होतो. नुकतेच आम्ही महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. मात्र यांच्याकडे डेंगूच्या रुग्णांचा आकडाही नाही. रुग्णालयांची दयनीय अवस्था आहे. अशी परिस्थिती असेल तर मनसे मोठे जन आंदोलन करणार.

– प्रकाश भोईर, माजी आमदार मनसे

“नागरिकांनी विशेषतः पावसाळ्यात आठवड्यातुन एकदा ड्राय डे करायला हवा. या दिवशी साठवलेले पाणी संपूर्णपणे रिकामे करून नव्याने पाणीसाठा करायला हवा. २५ मे पासून आमचा सर्वे सुरू असून दीड लाख घरांचा सर्वे झालेला आहे. यातील ३०० हुन अधिक कंटेनर मध्ये आम्हाला डासांच्या अळ्या आढळून आल्या. ही फक्त महापालिकेची जबाबदारी नसून नागरिकांनीही सहकार्य करायला हवे.”

 – हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त क.डों.म.पा.

One dies due to dengue in Kalyan

Kalyan to pandharpur bus msrtc : आषाढी पंढरपूर वारीसाठी

Kalyan to pandharpur bus msrtc : कल्याण व आसपासच्या शहरी व ग्रामीण भागातील भाविकांसाठी एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. त्यानुसार यंदा कल्याण व विठ्ठलवाडी एसटी आगारातुन आजपासून (दि.४) जवळपास १६ एसटी बसेस मार्गस्थ होणार आहेत. याचा लाभ कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा येथील भाविकांना मिळणार आहे.

आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून हरी नामाचा जप करीत हजारो वारकरी भाविक भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. रविवारी दि.६ जुलै रोजी पंढरपूरात होणाऱ्या सोहळ्यासाठी भक्तगण रेल्वे, एसटी, खाजगी गाड्या अशा मिळेल त्या वाहनाने दाखल होतात. या भाविक भक्तांची विशेष सोय म्हणून एसटी महामंडळ दरवर्षी राज्यातील कानाकोपऱ्यातून एसटी बसेसचे नियोजन करीत असते.

दोन्ही एसटी आगारांचे चार दिवसांचे नियोजन ठरलेले असून ठाणे विभागातून मिळालेल्या सूचनांनुसार त्याचे पालन केले जाणार आहे. कल्याण आगारातून ११ तर विठ्ठलवाडी एसटी आगारातुन एकूण ५ गाड्या मार्गस्थ होणार आहेत. मार्गस्थ होत असलेल्या या बसेसमध्ये नियमित, जादा व ग्रुप बुकिंग अशा प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या आणखीन ४ बसेस भिवंडी येथून तर कल्याण आगाराच्या ६ बसेस शहापूर येथून पंढरपूर वारी करणार आहेत. ठरलेल्या निर्धारित वेळेनुसार सर्व गाड्या मार्गस्थ होत असून ग्रुप बुकिंग असलेल्या बसेस मात्र प्रवाशांनी मागणी केलेल्या वेळेत सोडण्यात येतील. कल्याण आगाराच्या एसटी गाड्या तारकपूर मार्गे जाणार असून विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या गाड्या चांदणी चौक मार्गे जाणार आहेत.

कल्याण एसटी आगाराचे नियोजन

स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू असल्याने कल्याण एसटी आगार तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी एसटी आगारात स्थलांतरीत केला असला तरी कल्याणच्या जुन्या आगारा मागील बास्केटबॉल कोर्ट परिसरात तात्पुरते बस स्थानक उभारण्यात आले आहे.

शुक्रवार – एकूण गाड्या – २
नियमित – १
निर्धारित वेळ – स.७ वा.

शनिवार- एकूण गाड्या – ७
नियमित – २
निर्धारित वेळ – स.६, स.७ व इतर ठराविक वेळात

रविवार- एकूण गाड्या – २
नियमित – १
निर्धारित वेळ – स.७ वा.

विठ्ठलवाडी एसटी आगाराचे नियोजन

दि.४ – एकूण गाड्या – २
नियमित १
निर्धारित वेळ – स.७ वा.

दि.५ – एकूण गाड्या – २
नियमित १
निर्धारित वेळ – स.७ वा.

दि.६ – एकूण गाड्या – १
नियमित १
निर्धारित वेळ – स.७ वा.

असा असणार परतीचा प्रवास

मागील तीन ते चार दिवसांत भाविकांना घेऊन पंढरपूरात गेलेल्या सर्व एसटी गाड्या आषाढी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.७) पुन्हा कल्याणच्या दिशेने परतणार आहेत. पंढरपूरच्या चंद्रभागा स्थानकातून या सर्व गाड्या तेथील ठरलेल्या वेळेनुसार सुटतील. याकरिता कल्याण एसटी आगाराच्या ६ गाड्या आरक्षित झाल्या असून आणखीन ७ गाड्या प्रवाशांच्या गर्दीनुसार म्हणजेच प्रवासी घेऊन शक्य तशा वेळेत आगारात परतणार असल्याची माहिती कल्याण आगार व्यवस्थापक महेश भोये यांनी दिली आहे. तर विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या ५ गाड्यांचे परतीचे आरक्षण झाले असल्याची माहिती विठ्ठलवाडी आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी दिली आहे.

विठ्ठलवाडी एसटी आगारातुन बारमाही पंढरपूर वारी

आषाढी एकादशी निमित्ताने जादा गाड्या सोडण्यात येत असल्या तरी विठ्ठलवाडी एसटी आगारातून दररोज पंढरपूर साठी एक एसटी नियमित रवाना होते. स.७ वाजता ही एसटी विठ्ठलवाडी येथून मार्गस्थ होत कल्याण, डोंबिवली स्थानकातून प्रवासी घेत चांदणी चौक मार्गे पुढे जात दुपारी ४ ते ५ दरम्यान पंढरपूर गाठते. तर हीच गाडी पुन्हा विठ्ठलवाडीसाठी पहाटे ५ वाजता परतीचा प्रवास सुरु करत दुपारी २ ते ३ दरम्यान परतते. विठ्ठलवाडी येथून सकाळी ८ वाजता सुटणाऱ्या कलेढोण एसटीनेही फलटण पर्यंत प्रवास करीत पुढे वाहन बदलून पंढरपूरला पोहोचता येते.

Kalyan to pandharpur bus msrtc : Kalyan, Vitthalwadi ST depot ready for Ashadhi Pandharpur Wari

MSRTC Bus Booking वर आता मिळणार १५% सूट

MSRTC Bus Booking : एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या १५० कि.मी. पेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुर्ण तिकीट धारी प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. सवलतधारक प्रवाशांसाठी ही सवलत नसणार असून ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात १ जुलैपासून करण्यात आली आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

१ जुनला एस टी च्या ७७ व्या वर्धापन दिनी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटामध्ये १५ टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी १ जुलैपासून लागू करण्यात आली आहे.

येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात १५ टक्के सवलत१ जुलैपासून लागू होत आहे. तथापि जादा बसेससाठी ही सवलत लागू असणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो.

कुठे कराल आरक्षण?

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित इ-शिवनेरी बसमधील प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, npublic.msrtcors.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा MSRTC Bus Reservation या मोबाईल अॅपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना १५% सवलत प्राप्त करता येऊ शकते.

Now you will get 15% discount on MSRTC Bus Booking