Thackrey in KDMC : कल्याण डोंबिवलीत ‘ठाकरे’ ब्रँड ठरू शकतो पॉवरफुल
Thackrey in KDMC : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष भरती प्रक्रियेत मग्न आहेत. काँग्रेससह दोन्ही ठाकरेंचे माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी गळाला लावण्याचे काम दोन्ही पक्षांकडून सुरू असल्याने शहरात दोनच पक्षांची चलती असल्याचे दिसून येत आहे. परंतु राजकारणात आजमितीला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्याअनुषंगाने आतापर्यंत शांत असलेल्या ठाकरेंचे पक्ष आता ‘वेट अँड वोच’च्या भूमिकेतून बाहेर पडले आहेत. मनसे शिवसेना उबाठा नेमकी काय रणनिती करीत आहे याचा अंदाजही ते इतर पक्षांना लागून देत नसून बुधवारी त्यांनी युतीची घोषणा केली आहे.
इनकमिंगचा फुगा फुटणार? : मागील काही दिवसांत मनसेचे माजी नगरसेवक शिवसेनेसह भाजपात गेलेले आहेत. शिवसेना उबाठाचेही माजी आमदार व आमदारकी लढवलेले काही मोठे चेहरे पक्षाला सोडून गेले आहेत. मात्र ज्या पक्षात इच्छूकांचे प्रचंड ट्रॅफिक जमले आहे, त्याच पक्षात आधीपासून असणाऱ्या पदाधिकार्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे एकाला धरताना, दुसरे निसटून जाण्याची भीती आता दोन्ही पक्षांना लागून आहे. तर हेच निसटलेले नाराज निष्ठावंत ठाकरेंच्या ताफ्यात आता सामावू शकतात.
आतापर्यंत ओढाओढी करून शिवसेना भाजपने शक्तिप्रदर्शन करून आपणच वजनात आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र इनकमिंग इतकी झाली की महायुतीच्या घोषणे नंतर नाराज मंडळी आउटगोइंगही सुरू करू शकतात. याच गोष्टीचा फायदा घेऊन आतापर्यंत शांत असलेले ठाकरेंचं वादळ कधी घोंगावून चित्र पालटवेल हे सांगू शकत नाही. आतापर्यंत या महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता असली तरीही शिवसेनेच्या विभाजनानंतर आता भाजप मोठा भाऊ बनून महापौर पदाचा दावा करीत आहे. अंबरनाथ, बदलापुरात तसे साध्यही केले आहे.
आतापर्यंत पक्षीय बलाबल : २०१५ च्या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीत १२२ जागांपैकी ९४ जागा या शिवसेना भाजपने जिंकल्या होत्या. त्यातील सर्वाधिक ५२ नगरसेवक शिवसेनेचे होते. तर मनसेचेही दहा नगरसेवक विरोधी बाकावर बसले होते. आता शिवसेनेच्या विभाजनासह मनसेच्या काही माजी नगरसेवकांनीही पक्षांतर केल्याने ठाकरेंना नवे चेहरे द्यावे लागणार आहेत. याच नव्या चेहऱ्यात मनसेचे २०१० साली निवडणूक लढवलेले काही माजी नगरसेवक पुन्हा मनसेतून निवडणूक लढवणार आहेत.
ठाकरेंचं वादळ घोंघावणार ? : राजकीय पटलावर ठाकरे बंधू मागील काही दिवस शांत होते. मात्र ही शांतता वादळापूर्वीची शांतता असल्याचे ठाकरेंचे कार्यकर्ते म्हणत आहेत. दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने काय फरक पडू शकतो? यापेक्षा त्यांनी कोणती व्यूहरचना केली आहे? आणि कल्याण डोंबिवलीत नेमकी काय चाल चालणार? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी ६२ ही मॅजिक फिगर असून ठाकरे बंधूना मॅजिक फिगर गाठण्यासाठी सर्वप्रथम महायुतीलाच ६० च्या आत थोपवण्याचे आवाहन असणार आहे.
Thackrey in KDMC : ‘Thackrey’ brand can be powerful in Kalyan Dombivali

