Kalyan Dombivli Double Decker Metro Pattern; ​खाली रस्ता, मध्ये उड्डाणपूल आणि वर मेट्रो

​Kalyan Metro : कल्याण-डोंबिवली शहरांतील वाहतूक कोंडीची समस्या कायमची सोडवण्यासाठी एमएमआरडीएने आता कंबर कसली आहे. शहरातील सर्व नियोजित मेट्रो मार्गिका आता ‘डबल डेकर’ पद्धतीने उभारल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वात खालच्या स्तरावर रस्ता, मधल्या स्तरावर फ्लायओव्हर आणि सर्वात वरच्या स्तरावर मेट्रो धावणार आहे. या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे कल्याण-डोंबिवलीच्या वाहतूक व्यवस्थेला नवा आयाम प्राप्त होणार आहे.

मुंबईत पार पडलेल्या एमएमआरडीएच्या महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून, लवकरच याचा अंतिम आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकल्पामध्ये कल्याण आणि आसपासच्या परिसरातील प्रमुख मेट्रो आणि रस्ते मार्गांचा समावेश आहे.

मेट्रो १२ (कल्याण-तळोजा), मेट्रो १४ (कांजूरमार्ग-बदलापूर), मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) आणि मेट्रो ५-अ (कल्याण-उल्हासनगर-चिखलोली). शिळफाटा-रांजणोली उन्नत मार्ग आणि वालधुनी ते नेवाळी उन्नत मार्ग. आदींचा यात समावेश आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो मार्गिकांचे आणखी उप-टप्प्यांत विस्तारीकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. यात ​मेट्रो ५-ब चिखलोली ते बदलापूर, ​मेट्रो ५-क दुर्गाडी ते टिटवाळा, ​मेट्रो १२-ब शिळफाटा ते कळवा-मुंब्रा मार्गे ठाणे आदींचा समावेश आहे.

​अंबरनाथ-उल्हासनगरला मोठा दिलासा :

मेट्रो ५-अ ही मार्गिका दुर्गाडी नाक्यावरून कल्याण शहरामार्गे उल्हासनगरच्या कल्याण-बदलापूर रस्त्याने थेट चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत जाणार आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर आणि ग्रामीण भागातील रहिवाशांना मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे गाठणे अत्यंत सुलभ आणि जलद होणार आहे.

​कल्याण-डोंबिवलीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा एमएमआरडीए मुख्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या ‘डबल डेकर’ पॅटर्नमुळे जागेची बचत होईलच, पण एकाच वेळी रस्ते आणि मेट्रो वाहतूक सक्षम झाल्यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे.

Kalyan Dombivli Double Decker Metro Pattern

शिंगणवाडीचा ‘चंद्रा’; कल्याणमध्ये तेजोमय

बीड जिल्ह्यातील शिंगणवाडी गाव. चहुबाजूंनी डोंगरदऱ्यांनी वेढलेलं हे छोटंसे खेडं. ५ मार्च १९८७ ची ती पहाट होती. मच्छिंद्र सोनावळे यांच्या घरात एका बालकाचा जन्म झाला, ज्याचे नाव ठेवले गेले—चंद्रसेन. पण कोणाला ठाऊक होतं की, हा ‘चंद्रा’ एक दिवस हजारो लोकांच्या आयुष्यातला अंधार दूर करणारा ‘तेजोमय प्रकाश’ ठरेल?

२००५ सालचे ते दिवस. रखरखतं ऊन आणि समोर पसरलेली उसाची शेतं. तरुण चंद्रसेनच्या हातात कोयता होता आणि डोक्याला फडका बांधलेला.
“चंद्रा, हात आवर लवकर! गाडी भरायची आहे,” थकून गेलेल्या मच्छिंद्र सोनावळे यांनी आपल्या मुलाला साद घातली.
चंद्रसेनने कपाळावरचा घाम पुसला आणि म्हणाला, “बाबा, आयुष्यभर आपण हेच करणार का? रक्ताचं पाणी करूनही पदरात फक्त ऊसतोडणीच राहणार का?”
वडील सुस्कारा सोडून म्हणाले, “आपलं नशीब हेच आहे रे बाळा.”
पण चंद्रसेनचे डोळे शिंगणवाडीच्या डोंगरांपलीकडे काहीतरी शोधत होते. त्याने मनोमन ठरवलं होतं, नशिबाला साकडं घालण्यापेक्षा कष्टाने नशीब बदलायचं.

२००७ मध्ये त्याने आपल्या आई-वडिलांच्या पाया पडून मुंबईच्या दिशेने पाऊल टाकले. खिशात काही रुपये आणि डोळ्यात अफाट जिद्द घेऊन तो कल्याण नगरीत उतरला. कल्याणमधील सुरुवातीचे दिवस अतिशय कठीण होते. कधी बिगारी काम, कधी भिंतींना रंग देणारा पेंटर, तर कधी टेम्पो ड्रायव्हर.

एकदा एका चहाच्या टपरीवर चंद्रसेनचा मित्र त्याला म्हणाला, “अरे चंद्रा, एवढं कष्ट करून काय मिळणार? गावाकडे जाऊन शेतीच केलेली बरी.”
चंद्रसेन हसून म्हणाला, “मित्रा, ज्या हातांनी ऊस तोडलाय ना, ते हात आता स्वतःचं नशीब लिहायला शिकलेत. थांब जरा, अजून तर ही सुरुवात आहे!”हळूहळू मेहनतीच्या जोरावर चंद्रसेनने ट्रॅव्हल्स व्यवसायात जम बसवला. पण त्याचं मन फक्त स्वतःच्या प्रगतीत रमत नव्हतं. २०१५ मध्ये चंद्रसेनने ‘श्री शिवसाई प्रतिष्ठान’ची स्थापना केली. एके दिवशी एका महिलेने त्यांना अडवले आणि विचारले, “भाऊ, आम्हा बायकांसाठी काही काम मिळेल का? घर खर्च भागवणे कठीण झालंय.”
चंद्रसेनने त्याच क्षणी ठरवलं. त्यांनी २० महिला बचत गट सुरू केले.
“ताई, आता तुम्ही फक्त चूल आणि मूल यात अडकून राहू नका. लघुउद्योग सुरू करा, मी तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे,” हा त्यांचा शब्द शेकडो महिलांना उद्योजिका बनवून गेला. २०२० मध्ये जेव्हा जग थांबलं होतं, तेव्हा त्याने ‘आर. पी. सिक्युरिटी सर्व्हिसेस’च्या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगार दिला. तो आता फक्त ‘चंद्रा’ उरला नव्हता, तो अनेकांचा आधारवड झाला होता.

पण खऱ्या सेवेची ओढ त्यांना आरोग्य क्षेत्रात खेचून नेत होती. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी रुग्णसेवेचे व्रत घेतले. गुरुवर्य मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी स्वीकारली. आज कल्याण पूर्वेतील नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यालयात मोठी गर्दी असते. तिथे चंद्रसेन सोनावळे लोकांच्या फाईल्स तपासताना दिसतात.
एका वृद्ध आजोबांनी विचारले, “साहेब, माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचंय, पण पैसे नाहीत. काय करू?”
चंद्रसेननी प्रेमाने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, “बाबा, पैशाची काळजी तुम्ही करू नका. ही फाईल माझ्याकडे द्या. मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होईल तुमची. मुख्यमंत्री सहायता निधी आहे ना आपल्याकडे!”
अशाच प्रकारे त्यांनी ४०० पेक्षा जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि २५० हून अधिक अँजिओग्राफी/अँजिओप्लास्टी मोफत करून दिल्या. दररोज ८० ते ९० रुग्ण गायकवाड यांच्या मार्फत त्यांच्याकडे आशेने येतात आणि समाधानाने परत जातात.

आज चंद्रसेन सोनावळे यांच्याकडे स्वतःची कार आहे, घर आहे, मानसन्मान आहे. पण आजही जेव्हा ते आपल्या गावी शिंगणवाडीला जातात, तेव्हा त्यांचे पाय जमिनीवरच असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आरोग्यदूत मंगेश चिवटे,जनसेवक महेश दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे कार्य अविरत सुरू आहे.
त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळ वृत्तपत्राचे पत्रकार संतोष दिवाडकर यांनी त्यांना विचारले, “चंद्रसेनजी, आता तुमचं पुढचं ध्येय काय?”
चंद्रसेन नम्रपणे म्हणाले, “येणाऱ्या काळात एकच संकल्प आहे—कोणाचेही आयुष्य केवळ उपचारांविना थांबू नये. जोपर्यंत प्रत्येक गरजूला मदत मिळत नाही, तोपर्यंत हा चंद्रसेन विश्रांती घेणार नाही.”
एका ऊसतोड मजुराचा मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणा बनला आहे. शिंगणवाडीचा हा ‘चंद्रा’ खरोखरच तेजोमय झाला आहे!

  • लेखन : संतोष दिवाडकर 8767948054

‘Chandra’ of Shinganwadi