कॅन्सरमुक्त कल्याणच्या संकल्पनेसाठी २ ऑगस्टला Kalyan Monsoon Run 2026

Kalyan Monsoon Run 2026 : कॅन्सरविषयी जनजागृती, वेळेत निदान आणि गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत या उद्देशाने ICTC फाउंडेशन आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका KDMC यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कल्याण मॉन्सून रन २०२६’ या भव्य मॅरेथॉनचे आयोजन २ ऑगस्ट २०२६ रोजी रिंग रोड, कल्याण पश्चिम येथे करण्यात आले आहे. ३ किमी, ५ किमी आणि १० किमी अशा तीन अंतरांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत सर्व वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ICTC फाउंडेशन Indian Cancer Treatment Centre ही सामाजिक उपक्रम राबविणारी संस्था असून, मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कॅन्सर केमो-डेकेअर साखळींपैकी एक आहे. ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. अमित घाणेकर आणि टाटा मेमोरियल, एम्स दिल्ली तसेच GCRI येथील अनुभवी कॅन्सरतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यरत आहे. रुग्णांना त्यांच्या शहरातच जागतिक दर्जाचे, परवडणारे आणि वेळेत कॅन्सर उपचार उपलब्ध करून देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.

‘कॅन्सरमुक्त कल्याण’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून कॅन्सर प्रतिबंध, लवकर निदान आणि वेळेवर उपचार याविषयी जनजागृती केली जाणार आहे. आज कॅन्सरचे उपचार अधिक प्रगत झाले असले तरी अनेक रुग्ण जागरूकतेअभावी उशिरा उपचारासाठी पोहोचतात. त्यामुळे वेळेवर उपचार पूर्ण होणे हेच उत्तम परिणामांचे गमक असल्याचा संदेश या मॅरेथॉनच्या माध्यमातून दिला जाणार आहे.

या मॅरेथॉनमधून जमा होणारा निधी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणारा प्रत्येक धावपटू स्वतःच्या आरोग्यासाठी धावणारच नाही, तर एका गरजू कॅन्सर रुग्णाला उपचाराची आशाही देणार आहे.

स्पर्धेत नोंदणी करणाऱ्या प्रत्येक सहभागीला फिनिशर मेडल, सहभाग प्रमाणपत्र, अधिकृत टी-शर्ट, गुडी बॅग, अल्पोपहार व रिफ्रेशमेंट्स, तसेच विविध मनोरंजक उपक्रमांचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय ५ किमी आणि १० किमी स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ७०२१७९५६०८ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा https://ictconco.org अथवा www.indiarunning.com वर ऑनलाइन नोंदणी करावी. आयोजकांनी नागरिकांना आपल्या मित्र-परिवारासह सहभागी होऊन ‘कॅन्सरमुक्त कल्याण’ या जनआंदोलनाचा भाग बनण्याचे आवाहन केले आहे.

Kalyan Monsoon Run 2026

कल्याण पूर्व भागात मनसे आणि मनविसेतर्फे भव्य वह्यावाटप; शेकडो विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

कल्याण : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पूर्व परिसरात एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत परिसरातील असंख्य गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या मदतीमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. या पहिल्या टप्प्यातच शेकडो विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले असून, आगामी काळात पुढील टप्पे राबवले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसे आणि मनविसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये प्रामुख्याने मनसे विधानसभा अध्यक्ष निर्मल निगडे, मनविसे कल्याण शहर अध्यक्ष अंकुश राजपूत, उपशहर अध्यक्ष स्वप्निल पंडित आणि शाखा अध्यक्ष विजय जाधव यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते.

या प्रसंगी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “मनसे अध्यक्ष माननीय राज ठाकरे यांच्या शैक्षणिक भूमिकेला अनुसरून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. कल्याण पूर्व भागातील एकही गरजू विद्यार्थी वह्या किंवा शैक्षणिक साहित्याअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आज केवळ पहिला टप्पा पूर्ण झाला असून, पुढील टप्प्यात आणखी विद्यार्थ्यांना मदत पोहोचवली जाईल.”​ या उपक्रमाबद्दल कल्याण पूर्व भागातील नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांनी मनसे व मनविसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानले आहेत.

Grand notebook distribution by MNS and MNVS in the Kalyan East area.