Dwarli ते नेवाळी नाका पर्यंत घरफोड्या वाढल्या; रात्रीच्या पोलीस गस्तीची मनसेची मागणी

Dwarli : श्री मलंगगड रोडवरील द्वारली ते नेवाळी नाका परिसरात अलीकडल्या काळात चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याचबरोबर या भागात गर्दुल्ल्यांचा वावर वाढला असून महिलांची छेडछाड होत असल्याची माहिती मनसेचे शाखाध्यक्ष युवराज कांबळे यांनी हिल लाईन पोलिसांना निवेदनाद्वारे दिली असून रात्रीच्या वेळी पोलीस गस्त सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कल्याण पूर्व भागात असलेला द्वारली ते नेवाळी नाका पर्यंतचा भाग हा शहरी वर्दळीपासून बाहेर असलेला भाग आहे. त्यामुळे येथील लोकवस्ती ही अलीकडे हळूहळू वाढू लागली आहे. त्याचबरोबर परिसरात घरफोड्या, दुकानफोडी वाढल्याने परिसरातील नागरिक व व्यापारी वर्ग भयभीत झाला असल्याचे मनसे पदाधिकारी सांगत आहेत.

गर्दुल्ल्यांचा वावरामुळे या भागात महिला सुरक्षित नसून छेडछाडीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या भागात रात्रीच्या वेळी गस्त घालावी अशी मागणी निवेदनात केली असून, हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांना भेटून प्र.क्र.११९ चे शाखाध्यक्ष युवराज कांबळे यांनी निवेदन दिले आहे.

Burglary increased from Dwarli to Newali Naka; MNS’s demand for night police patrolling

डोंबिवली ते मुंबई थेट KDMT बससेवा सुरू करण्याची मागणी

KDMT : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन बसेस सध्या नवी मुंबई मार्गावर यशस्वी व प्रवाशांना सोयीस्कर अशी धाव घेताना दिसत आहे. त्याचप्रमाणे आता डोंबिवली मोठागाव येथून नव्याने बांधण्यात आलेल्या मोठागाव-मानकोली पुलावरून मुंबईकडे बस सेवा सुरू करण्यासाठी युवासेनेचे दीपेश म्हात्रे यांनी महापालिका आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. ही मागणी मान्य झाल्यास डोंबिवलीकरांना मोठा दिलासा मिळेल असे मत म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत लवकरच शंभरहून अधिक नवीन बस दाखल होणार आहेत. या बसमुळे डोंबिवली ते घोडबंदर रोड, डोंबिवली ते ठाणे, डोंबिवली ते मुलुंड चेक नाका आणि डोंबिवली ते घाटकोपर मेट्रो स्टेशन या मार्गांवर बस वाहतूक सुरू झाल्यास, रेल्वे प्रवासाला उत्तम पर्याय मिळेल. ही सेवा सुरू झाल्यास डोंबिवलीकरांना प्रवासाचा मोठा दिलासा मिळणार असून रेल्वेवरचा भार काहीसा कमी होईल असे दीपेश म्हात्रे यांनी पत्रात म्हटले आहे.

कल्याण डोंबिवली शहरांत स्मार्ट सिटी अंतर्गत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. शहरांवर येणाऱ्या लोंढ्यामुळे लोकसंख्या दुप्पटीने वाढू लागली आहे. त्यामुळे येथील वाहतुकीचा देखील बोजवारा उडाला आहे. ज्याचा ताण रेल्वे वाहतुकीवर अधिक होतो. त्या दृष्टीने कल्याण डोंबिवलीतुन मानकोली पुलावरून मुंबई बससेवा सुरू केली तर नक्कीच सोयीस्कर बाब ठरू शकते असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

Dipesh Mhatre’s demand to start direct KDMT bus service from Dombivli to Mumbai

डोंबिवली शहर होणार ग्रीन एनर्जी सिटी; मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून मोफत सोलार पॉवर युनिट बसविण्यास सुरुवात

रवींद्र चव्हाण : डोंबिवलीतील हाऊसिंग सोसायट्यांमधील सार्वजनिक वापराच्या विजेचे येणारे भरघोस बिल व या बिलात सातत्याने होणारी वाढ, या दरवाढीचा सोसायटी मेंटेनन्सच्या दरावर होणारा प्रतिकूल परिणाम या समास्यांमधून आता डोंबिवलीकरांची सुटका होणार आहे. शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मोफत सोलार पॉवर युनिट बसवण्याची योजना बऱ्याच वर्षांपासून रवींद्र चव्हाण यांच्या मनात घोळत होती. विशेष म्हणजे या योजनेत सोलार पॉवर युनिटच्या फिटिंग आणि देखभालीसह संपूर्ण प्रक्रिया मोफत पार पडणार आहे. यामुळे सोसायट्यांना सोलार पॉवर युनिट बसवणे आणि त्याची देखभाल करणे यासाठी सोसायटीचे फंड्स वापरावे लागणार नाहीत.

सदर योजनेसाठी सोलार पॉवर कंपन्या, सोसायट्या आणि महावितरण कंपनी यांना एकाच व्यासपीठावर आणत काही दिवसांपूर्वी या प्रक्रियेतील माईलस्टोन गाठला आहे. यावेळी ५४ सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी लेटर ऑफ इंटेंट साईन केले. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या स्नेहा रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये सोलार पॉवर युनिट बसविण्याच्या कामाचा शुभारंभ सोहळा आज संपन्न झाला.

या योजनेमुळे सोलार पॉवरच्या माध्यमातून हाऊसिंग सोसायटीला स्वतःची वीजनिर्मिती करता येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वापराच्या कनेक्शनसाठी पुढील २५ वर्षे स्थिर वीजदर शक्य होणार आहे. परिणामी तब्बल ५० ते ६०% रक्कमेची बचत होईल. यामुळे डोंबिवलीकरांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या या ग्रीन एनर्जी सिटी संकल्पनेचे स्वागत केले आहे.

आमदार Ganpat Gaikwad यांचे द्वितीय पुत्र Son राजकारणात? राजकीय वर्तुळात चर्चा

Ganpat Gaikwad Son : अंबरनाथ पोलीस स्थानक गोळीबार प्रकरणी कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड हे सध्या तळोजा कारागृहात आहेत. तर त्यांचे ज्येष्ठ पुत्र वैभव गायकवाड हे या घटनेनंतर अज्ञातवासात आहेत. त्यांच्या पश्चात गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या सक्रियपणे राजकारणात उतरल्या असून मागील काही काळापासून ते संपूर्ण मतदारसंघात वावरताना दिसत आहेत. त्यातच आता आमदार गणपत गायकवाड यांचे द्वितीय चिरंजीव प्रणव गायकवाड हे देखील नुकतेच एका विकासकामाच्या लोकार्पण प्रसंगी प्रथमच उपस्थित असल्याचे दिसल्यानंतर ते देखील राजकीय क्षेत्रात उतरले आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

गणपत गायकवाड तरुण वयात असल्यापासूनच सामाजिक कार्यातून पुढे आले होते. त्यानंतर सलग दोन वेळा अपक्ष आमदार झाल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षातून तिसऱ्यांदा विजयी निवडणूक लढवली होती. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र वैभव गायकवाड यांनी देखील मागील वर्षी राजकारणात अधिकृतरित्या एन्ट्री केली होती. या संपूर्ण वर्षभरात त्यांच्या अनुपस्थितीत सुलभा गायकवाड यांनी मतदारसंघाची मदार आपल्या खांद्यावर घेऊन कामकाज सुरू ठेवले. त्यानंतर आता त्यांचे कनिष्ठ चिरंजीव प्रणव गायकवाड हे देखील एका राजकीय समारंभात दिसून आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. शुक्रवारी आमदार निधीतून मंजूर करण्यात आलेल्या एका विकासकामाच्या लोकार्पण प्रसंगी ते उपस्थित राहिले होते. त्यांच्याच हस्ते प्रभाग क्रमांक ११८ परिसरात विद्युत एल.ई.डी. पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आले असून उपस्थितांनी याबाबत त्यांचे स्वागत केले.

प्रणव गायकवाड हे राजकीय गराळ्यापासून नेहमीच स्वतःला दूर ठेवत आले आहेत. साधी राहणी आणि सर्वसामान्य जीवनपद्धती अशी त्यांची ओळख असून याआधी ते धार्मिक,कौटुंबिक कार्य सोडता कधीही राजकीय अथवा सामाजिक प्रकाश झोतात आलेले नाहीत. मात्र आयोजित लोकार्पण सोहळ्याला काही कारणाने सुलभा गायकवाड यांना उपस्थित राहता न आल्याने प्रणव गायकवाड हे स्वतः उपस्थित राहिले असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रणव गायकवाड हे अद्याप राजकारणात आलेले नसून त्यांनी फक्त सामाजिक कार्य म्हणून सदर कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली असल्याचे सांगण्यात येत आहे.

MLA Ganpat Gaikwad second son in politics?

KDMC News : मनसे शाखेसमोरील शेडवर कारवाई करणाऱ्या सहाय्यक आयुक्तांची बदली

KDMC News : कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथील मनसे शाखेबाहेर असलेल्या पत्र्यांच्या शेडवर काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने तोडक कारवाई केली होती. 4 जे प्रभागाच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार ही कारवाई केली होती. त्यांच्या या कारवाई नंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी बॅनर लावून तक्रारदारांचा निषेध व्यक्त केला होता. मात्र कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची आता काही दिवसांपूर्वी बदली झाल्याचे समोर आले आहे. परंतु ही बदली कारवाईमुळे झाली नसून महापालिकेच्या कार्यप्रणालीनुसार करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांच्या निर्देशानंतरही अनेक ठिकाणी असंख्य अनधिकृत ढाबे राजरोसपणे सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई न करता मनसे शाखेसमोरील पत्र्याचे शेड तोडणे महापालिकेला जास्त महत्त्वाचे वाटते का? असा सवाल मनसे पदाधिकार्यांनी उपस्थित केला होता. तसेच सत्ताधारी पक्षातील काही राजकीय मंडळींनी आकसापोटी महापालिकेकडे तक्रार केली असल्याचे सांगत मनसेने शाखेसमोरील रस्त्यालगत एक भलेमोठे होर्डिंग्ज लावले होते. ज्यात ‘कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही’ असा राज ठाकरेंच्या विधानाचा मजकूर लिहलेला होता. तक्रादारांच्या डोळ्यावरची सत्तेची झापड उतरविण्यासाठी आम्ही बॅनर लावला असल्याचे यावेळी सांगण्यात आले होते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड यांनी 4 जे प्रभाग क्षेत्राच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त सविता हिले यांची 5 ड प्रभाग क्षेत्रात बदली केली आहे. तर 4 जे प्रभाग क्षेत्राच्या सहाय्यक आयुक्त पदी सचिन तामखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदली प्रक्रियेत 5 ड प्रभाग क्षेत्राचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांच्यावर सामान्य प्रशासन सहाय्यक आयुक्त पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. मनसे शेडबाहेरील पत्र्यांच्या शेडवर केलेली कारवाई ही प्राप्त तक्रारीनुसार करण्यात आली होती. झालेल्या बदल्या या प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी करण्यात आल्या असल्याचे बदली आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.

KDMC News : Transfer of Assistant Commissioner who took action on shed in front of MNS branch

मालवणमधील शिवरायांच्या मूर्ती दुर्घटने प्रकरणी कल्याणचे मूर्तिकार जयदीप आपटे यांच्यावर गुन्हा दाखल

जयदीप आपटे : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून विरोधकांनी देखील सरकारला धारेवर धरले आहे. या घटनेनंतर कल्याण येथील या मूर्तीचे निर्माते जयदीप आपटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. याप्रसंगी त्यांच्या समवेत केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण देखील उपस्थित होते. हा पुतळा भारतीय नौदलाने उभरला असून तो बनविण्याची जबाबदारी जयदीप आपटे यांच्याकडे देण्यात आली होती.

जयदीप आपटे हा कल्याणमधील अंदाजे २५ वर्षीय तरुण असून त्याने राजकोट किल्ल्यावर २८ फूट उंच ब्राँझचा पुतळा तयार केला होता. या पुतळ्याच्या बांधकामाला सुमारे 3 वर्षे लागली, जयदीपने एका मुलाखतीत सांगितले की, पुतळ्याचे निर्माण जून 2023 मध्ये सुरू झाले आणि डिसेंबर 2023 पर्यंत म्हणजे केवळ सात महिन्यांत पूर्ण झाले होते. पोलिसांनी आता जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट केले नसून केवळ पुतळ्यासाठी बांधलेल्या व्यासपीठाची रचना केली होती, असे सांगत चेतन पाटील यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

समाज माध्यमांवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जयदीप आपटे यांनी जे जे स्कुल ऑफ आर्ट्स व एल एस रहेजा आर्ट्स स्कुलमध्ये शिक्षण घेतले आहे. जयदीप आपटे हे खरेतर एक उत्तम मूर्तिकार असून त्यांनी अनेक मुर्त्या घडविल्या आहेत. त्यांनी बनवलेल्या मुर्त्या ह्या जिवंत असल्याचा भास होतो. यामुळेच त्यांना हे काम दिले असावे असा कयास बांधला जात आहे. मात्र एक भव्य दिव्य मूर्तीची उभारणी करण्यात ते अयशस्वी ठरले असून त्यांच्यावर टिकांचा वर्षाव होत असून ते कायद्याच्या कचाट्यातही सापडले आहेत. या घटनेनंतर जयदीप यांच्या आजवरच्या कामावर पाणी फेरलं गेलंय. मात्र संपुर्ण विश्वास नसेल तर इतके मोठं काम स्वीकारायला नको होते असेही काही जाणकार म्हणत आहेत.

A case has been registered against the sculptor of Kalyan in the case of Shivaraya idol accident in Malvan

जयदीप आपटे यांनी बनविलेल्या काही मुर्त्या :-

Kalyan MNS : मनसे शाखेसमोरील शेडवर कारवाई; पदाधिकाऱ्यांनी बॅनर लावून व्यक्त केला संताप

Kalyan MNS : कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा येथील मनसे शाखेबाहेर असलेल्या पत्र्यांच्या शेडवर काही दिवसांपूर्वी महापाकिलेने तोडक कारवाई केली होती. या कारवाई विरोधात मनसे पदाधिकाऱ्यांनी शाखेच्या समोरच एक बॅनर लावला असून ही कारवाई आकसापोटी केली असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही असे राज ठाकरेंनी केलेले एक विधान त्यांनी या बॅनरवर लिहून ईशारा दिला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे सदर पत्र्याचे शेड अनधिकृत असून ते तोडण्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार महापालिका कारवाई करीत असल्याची माहिती 4 जे प्रभाग क्षेत्राच्या सहाय्याक आयुक्त सविता हिले यांनी दिली आहे. मात्र दुसरीकडे पालिका आयुक्तांच्या निर्देशानंतरही अनेक ठिकाणी असंख्य अनधिकृत ढाबे बिनदिक्कतपणे सुरू आहेत. या ढाब्यांवर बेकायदा दारूच्या पार्ट्या सुरू आहेत. काही ढाबे विना परवाना ग्राहकांना मद्यविक्रीही करीत आहेत. असले काळे धंदे सुरू असताना प्रशासनाला मनसे शाखे समोरील शेड तोडणे महत्त्वाचे वाटते का असा सवाल मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शेड संदर्भात तक्रार केली असून सत्तेचा वापर करून अशा तक्रारी खोडसाळपणाने करून आमचे समाजकार्य बघवले जात नाही असेही मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याच खोडसाळ तक्रारदारांना आम्ही एकाच ओळीत उत्तर दिले असून हा बॅनर त्यांच्या डोळ्यावरची सत्तेची मस्ती असलेली झापड काढण्यासाठी लावला असल्याचे सांगण्यात आले. आम्ही सर्व गोष्टींचा हिशोब ठेवतो आणि वेळेवर तो चुकताही करतो असेही यावेळी मनसे पदाधिकारी म्हणाले.

Kalyan MNS : Action on shed in front of MNS branch

Dombivli Dahihandi : यंदा दीपेश म्हात्रे रिक्षाचालकांना देणार दहीहंडी फोडण्याचा मान

Dombivli Dahihandi : दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने ‘स्वराज्य दहीकाला उत्सव’ या वर्षी तिसऱ्यांदा सम्राट चौक, डोंबिवली पश्चिम येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीचा दहीहंडी फोडण्याचा मान रिक्षा चालकांना देण्यात येणार आहे. डोंबिवली शहरातील नागरिकांची सेवा, कोरोना काळातील उल्लेखनीय कार्य तसेच अनेकदा अॅम्बुलन्स पोहोचण्यापूर्वीच नागरिकांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचे काम रिक्षा चालक करतात. या अद्वितीय कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ त्यांना या वर्षीचा दहीहंडी फोडण्याचा मान देण्यात येत असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

दहीहंडी महोत्सवाच्या संध्याकाळी ‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोड यांचा लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहे. तसेच प्रसिद्ध युट्युबर विनायक माळी देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या वर्षीच्या दहीहंडी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एक लाख रुपये असून ते सर्वांसाठी खुले असणार आहे. द्वितीय पारितोषिक देखील एक लाख रुपये असून ते मात्र डोंबिवलीतील मंडळांसाठीच आरक्षित असेल. 26 ऑगस्टच्या रात्री 11 वाजता कृष्ण जन्मोत्सव पारंपरिक भजनांच्या माध्यमातून आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. तरी, या उत्सवात सहभागी होऊन दहीहंडीचा आनंद सर्व नागरिकांनी घ्यावा, असे दीपेश म्हात्रे फाउंडेशनकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

सण उत्सवात विविध पक्ष रस्त्यावर कमानी उभ्या करतात, मोठमोठे होर्डिंग्ज आणि बॅनर लावतात. सध्या रस्त्यांची सर्वत्र दुरावस्था झाल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे कमानी उभारून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नका असा संदेश दीपेश म्हात्रे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे.

Dombivli Dahihandi : This year Dipesh Mhatre will give the honor of breaking Dahihandi to the rickshaw drivers

Vitthalwadi ST Depot : प्रवाशांना सुरक्षित सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष बॅज देऊन स्वातंत्र्य दिन साजरा

Vitthalwadi ST Depot : महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या विठ्ठलवाडी एसटी आगारात भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आगारात नव्याने नियुक्त झालेल्या आगार व्यवस्थापक गीता कोंडार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आगारातील पाच वर्षे सुरक्षित सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मान बॅज देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

कल्याण रेल्वे स्थानकात स्मार्ट सिटी अंतर्गत काम सुरू असल्याने कल्याणचा एसटी डेपो तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी एसटी आगारात हलविण्यात आला आहे. त्यामुळे सकाळपासूनच विठ्ठलवाडी एसटी आगारातून असंख्य वाहने ये जा करतात तसेच प्रवासी संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे विठ्ठलवाडी एसटी आगाराचे देखील व्यवस्थापन वाढले असून आता व्यवस्थापक पदी गीता कोंडार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याच हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. त्यांच्या समवेत सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक महेश भोये, वाहतूक निरीक्षक राजाराम जाधव व असंख्य एसटी कर्मचारी उपस्थित होते.

एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास असे म्हटले जाते. मात्र हाच प्रवास सुखाचा करण्यासाठी चालक व वाचकांचे सर्वात मोठे योगदान असते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विठ्ठलवाडी एसटी आगारातील पंकज भावसार व चालक नितीन चौधरी यांनी एसटी महामंडळात पाच वर्षे सुरक्षित सेवा दिल्याबद्दल त्यांचा विशेष बॅज देऊन सन्मान करण्यात आला. एसटी महामंडळात नोकरीला लागल्या पासून आम्ही आमची नोकरी इमानी इतभरे करीत आलो आहोत. एसटी ही प्रवाशांच्या सेवेसाठी आहे याची पूर्ण जाण असल्याने आम्ही सर्व कर्मचारी प्राण ओतून काम करीत असतो अशा भावना यावेळी विठ्ठलवाडी एसटी आगाराचे कर्मचारी योगेंद्र कदम यांनी व्यक्त केल्या.

Vitthalwadi ST Depot : Celebrating Independence Day by awarding special badges to employees who provide safe services to passengers

Kalyan Student Suicide : पात्रता नसलेले शिक्षक असलेल्या खाजगी शाळा संस्थांवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

Kalyan East : कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात एका शाळकरी विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या नावे सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. ही बाब लक्षात घेता माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्राथमिक प्रशिक्षित मान्यता प्राप्त पात्रता नसलेले शिक्षक घेऊन खाजगी शाळेच्या माध्यमातून भरमसाठ फी घेऊन व्यापार करणाऱ्या संस्थामुळे विद्यार्थी व पालकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा संस्थांवर कारवाई करावी असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

प्रशिक्षित पात्रता म्हणजे डी.एड, बी.एड पदवीधारक. या व्यतिरिक्त इतर कुणालाही विद्यार्थ्यांना शिकवण्याची पात्रता नसते. या प्रशिक्षणात बाल मानसशास्त्र हा महत्त्वाचा विषय असतो. परंतु खाजगी शाळांमध्ये अधिक नफा मिळवण्यासाठी भरमसाठ फी घेऊन पात्रता नसलेले शिक्षक म्हणून कमी पगारावर रुजू केले जातात. अशा शिक्षकांना बाल मानसशास्त्र माहीत नसल्याने विद्यार्थ्यांशी कसे वागावे हे या शिक्षकांना ठाऊक नसते. त्यामुळे समाजात अघटित प्रकार समोर येतात असे उदय रसाळ यांनी पत्राद्वारे म्हटले आहे.

कल्याण डोंबिवलीत अशा अनेक शाळा आहेत ज्यात अशाच प्रकारची शिक्षक भरती आहे. एखादा विद्यार्थी शिक्षकांच्या भीतीने किंवा शिक्षकाच्या कार्य पद्धतीने सरळ आत्महत्या करतो हे प्रचंड भयानक आहे. जे मुलं आत्महत्या करत नाहीत त्या मुलांचा बौद्धिक विकास अशा शिक्षकांमुळे खुंटतो किंवा मुलं पुढील शिक्षणात मागे पडतात. काल दि १२ ऑगस्ट २४ रोजी, कल्याण पूर्व येथील एका शाळेतील बारा वर्षाच्या मुलाने असेच शिक्षकांच्या त्रासामुळे जीव दिला. असे अप्रशिक्षित शिक्षक ज्या ज्या शाळेमध्ये भरणा केले आहेत अशा संस्थांची त्वरित चौकशी करून कारवाई करावी. आणि अशा संस्था तसेच शाळांबाबत प्रशिक्षित शिक्षक भरती बाबत कठोर नियमावली करण्यात यावी. जी सर्व प्रकारच्या शाळांना लागू व्हावी अशी मागणी मा. मुख्य मंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे.

– उदय रसाळ (माजी नगरसेवक)

Kalyan Student Suicide : Letter to Chief Minister to take action against private school institutions with unqualified teachers