पुनर्वसनाच्या मुद्द्यासाठी महिलांचा मुंडन करण्याचा KDMC ला इशारा

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा रिंगरूट प्रकल्पात ८४५ नागरिक बेघर होत असल्याने मनपा विरोधात मागील दहा दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. बाधित नागरिकांचे हे उपोषण सुरू असून दहा दिवसांपासून मनपा अधिकाऱ्यांनी या उपोषण कर्त्यांकडे ढुंकूनही पाहिले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे उपोषण कर्त्यांनी मनपाचा निषेध करत मुंडन केले आहे. तेराव्या दिवसा पर्यंत मनपा प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर महिला देखील कल्याण डोंबिवली मनपा कार्यालयासमोर मुंडन करणार असल्याचा इशारा जालिंदर बर्वे आणि आंदोलन कर्त्या महिलांनी दिला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील टिटवाळा ते दुर्गाडी या रिंगरुंटमध्ये बाधीत होणाऱ्या ८४५ रहिवाशांचे पुर्नवसन करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विस्थापित कुटूंबियांनी मंत्रालयात भेट घेऊन त्याचे पुनर्वसन करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व पुनवर्सन समितीचे अध्यक्ष सपना देवनपल्ली कोळी यांना दिले आहेत. पुनर्वसनाच्या मागणीसाठी महानगरपालिकेला अनेक पत्र व्यवहार करुन देखिल महापालिका आयुक्त व संबंधीत अधिकारी पुर्नवसन करण्यासाठी कोणतीही हालचाल करत नसल्याने प्रशासनाकडे अनेक वर्षापासून रहिवाशी संस्थेच्या माध्यमातून मोर्चे, अंदोलन, पत्र व्यवहार केला आहे.

पुनर्वसनाच्या मागणीसाठी पब्लिकन पक्ष व अटाळी आंबिवली सामाजिक संस्थेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष जालिंदर बर्वे, सचिव संदीप घाडगे व महिला पदाधिकारी व राहिवाश्यानी सोमवार पासून पालिकेच्या या प्रभाग क्षेत्र वडवली कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. टिटवाळा – अटाळी -आंबिवली या विभागातील रिंगरुटमध्ये बाधीत होणाऱ्या ८४५ कुटूंबियांचे पुर्नवसन बी.एस.युपी या योजनेतुन करण्यात यावे. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने १९९६चे पुर्नवसन पात्र धोरणात बदल करुन ते २०१६ पर्यंत करण्यात यावे. जो पर्यंत पुर्नवसन होत नाही तो पर्यंत तोडक कारवाई करु नये. रिंगरुट मध्ये बाधीत होणाऱ्या कुटुंबियांच्या पुर्नवसनाच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही, तो पर्यंत रिंगरुट चे काम बंद करण्यात यावे आदी प्रमुख मागण्या उपोषणकर्त्यांनी यावेळी केल्या असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरु राहणार असल्याचे उपोषणकर्त्या सर्व रहिवाशांनी सांगितले आहे.

-रोशन उबाळे

कल्याणमध्ये ३२ नागरिकांचे गहाळ फोन पोलिसांनी दिले शोधून

कल्याण : कल्याण मध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभागाच्या वतीने महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत हरविलेल्या ३२ मोबाईलचा शोध घेवुन नागरिकांचे गहाळ झालेले ४ लाख ५० हजार किमतींचे मोबाईल परत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.  

सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग, कल्याण यांच्या अंतर्गत असलेली महात्मा फुले चौक, बाजारपेठ, खडकपाडा व कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत कल्याण डोबिवली तसेच कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी बाहेर जिल्हयातुन येणाऱ्या लोकांचे सन २०१९, २०२०, २०२१ या कालावधीत वेगेवगळया कंपनीचे मोबाईल गहाळ झाल्याने त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून संबधीत पोलीस ठाण्यात प्रॉपटी मिसिंग अन्वये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

या हरविलेल्या मोबाईलचा तात्रींक माहितीच्या आधारे शोध घेणे बाबत अपर पोलीस आयुक्त दत्ता कराळे, पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिलेल्या योग्य त्या सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या अधिन असलेल्या वाहन व मोबाईल चोरी विरोधी पथकाचे सपोनि एच.जी ओऊळकर, पोहवा पवार, पोना गायकवाड, वाघ, वळवी, पोशि चव्हाण यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेवुन अंदाजे एकुण ४ लाख ५० हजार  किंमतीच्या ३२ हरविलेल्या मोबाईलचा शोध घेवुन हे मोबाईल तक्रारदारांना परत केले आहेत.

दरम्यान आपले गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले असून पोलिसांच्या प्रती असलेला विश्वास आणखी दृढ झाला असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. (Kalyan Crime)

-कुणाल म्हात्रे

उल्हासनगरमध्ये धावत्या टँकर मधून एसिड उडून चार जण भाजले

Ulhasnagar : सल्फयुरिक एसिडने भरलेल्या टँकर चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे एसिड बाहेर पडून चार जणांच्या अंगावर उडाले. यामध्ये भरत वसीटा आणि दिलीप पुरस्वानी हे दोघे गंभीर स्वरूपात भाजले गेले. याबाबत पोलिसांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगरच्या श्री राम चौक परिसरात ही घटना घडली असून विठ्ठलवाडी पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे. ऍसिडने भरलेला टँकर रहदारीच्या परिसरातून घेऊन जाणे तसेच टँकरचे झाकण अश्या पद्धतीने लिकेज होणे ही निष्काळजीपणाची बाब आहे. यामुळे दोन जणांना गंभीर स्वरूपाची इजा झाली आहे. यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस कठोर कारवाई करतात.

रस्त्यावरून पायी चालत असताना किंवा दुचाकी चालवत असताना अश्या प्रकारच्या अवजड वाहना पासून शक्यतो सुरक्षित अंतर ठेवणे आपल्याच हिताचे असणार आहे. या अगोदरही रस्ते अपघातात अनेक दुचाकीस्वाराचा अवजड वाहनांशी अपघात होऊन त्यांना स्वतःचा जीव देखील गमवावा लागला आहे. उल्हासनर येथील या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ माजली आहे.

-संतोष दिवाडकर

In Ulhasnagar, four persons were burnt when acid flew from a speeding tanker

डोंबिवलीत फक्त दागिन्यांसाठी महिलेची हत्या

Dombivli :- डोंबिवली शहरातील टिळकनगर भागात विजया बाविस्कर (Vijaya Baviskar) या ५८ वर्षीय महिलेच्या हत्येने (Murder) सोमवारी एकच खळबळ माजली होती. यानंतर पोलिसांनी तपास करीत एका महिलेला ताब्यात घेतले असून दागिन्यांसाठी हत्या झाली असल्याचे उघड झाले आहे. मात्र असे असले तरी नेमके हेच कारण आहे की संपत्तीच्या वादातून कट कारस्थान रचले गेले आहे अश्या उलट सुलट चर्चांना देखील उधाण आले आहे.

डोंबिवलीत पोळी भाजी केंद्र चालवणाऱ्या सीमा खोपडे (Seema khopde) या महिलेने दागिन्यांसाठी विजया बाविस्कर या महिलेची हत्या केल्याचे समोर येत आहे. या महिलेने देखील या हत्येची कबुली दिली असून पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेत पूढील तपास सुरू केला आहे. नातेवाईकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार महिलेचा ३० वर्षांपूर्वी घटस्पोट झाला असून ही महिला सदर भागात मागील तीन वर्षांपासून वास्तव्यास आहे.

विजया बाविस्कर यांची हत्या दागिन्यांच्या हव्यासापोटी झाली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. मात्र असे असले तरी या महिलेच्या हत्येमागे नक्की हेच कारण आहे की संपत्तीची लालसा आहे ? असाही संशय टाळता येणार नाही. जर या हत्येच्या मागे संपत्तीचे कारण असेल तर सदर हत्येत आणखीन कोणाचा सहभाग आहे का ? ही देखील एक तपासाची बाब बनू शकते.

-संतोष दिवाडकर

Woman killed in Dombivli just for jewelery

डोंबिवलीत घरात एकट्या राहणाऱ्या महिलेचा खूण

डोंबिवली : महिलेच्या खूनाने डोंबिवली हादरली आहे. घरात एकट्या राहणाऱ्या महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना सांस्कृतिक राजधानी असलेल्या डोंबिवली टिळक नगर येथे घडली आहे. या हत्येमागे कोण आहे ? हा शोध आता सुरू होत आहे. (Dombivli crime)

प्राथमिक माहितीनुसार डोंबिवली पूर्व टिळक नगर चौकातील ‘आनंद शीला’ या सोयसायतीत राहणाऱ्या महिलेचा प्राथमिक गळा दाबून खून झाल्याची खळबजनक घटना घडली आहे. ५८ वर्षीय घटस्फोटीत विजया बावीस्कर या घरात एकट्या राहत होत्या. अज्ञात इसमाने आधीच्या रात्री घरात घुसून या महिलेचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

सकाळच्या वेळेस घरकाम करणारी महिला कामासाठी घरात आली असता झालेला सर्व प्रकार तिच्या डोळ्यासमोर दिसला. त्यानंतर तिने तात्काळ शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर ही माहिती टिळक नगर पोलीस ठाण्याला मिळाली. आता या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. विजया बाविस्कर यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार साधारण तीस वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता. मागील तीन वर्षांपासून ते या इमारतीत राहत होत्या.

-संतोष दिवाडकर

Murder of a woman living alone in a house in Dombivali

खोणी तळोजा महामार्गावर अपघात; ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वार ठार

मलंगगड : कल्याण शहराजवळ असलेल्या मलंगगड भागात आज सकाळी मालवाहतूक करणारा ट्रक आणि दुचाकीस्वाराचा अपघात झाला. या अपघातात ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सध्या ट्रकचालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

खोणी तळोजा (Khoni Taloja) महामार्ग हा प्रचंड रहदारीचा मार्ग मानला जातो. या मार्गावर सततच्या होणाऱ्या अपघातामुळे या मार्गाला मृत्यूचा सापळा म्हटले जात आहे. आज सकाळी ११:३० च्या दरम्यान झालेल्या अपघातात जवळच्याच पाली गावातील रवी ठाकरे नामक इसमाला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवुन दिला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून ट्रक आणि क्लिनरला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार याच ठिकाणी मागील महिन्यात ट्रक आणि एर्टीगा गाडीत भीषण अपघात झाला होता. यात देखील दोघा तिघांना प्राणाला मुकावे लागले होते. हा महामार्ग आणखी किती जणांचा जीव घेणार हे काही सांगता येत नाही. मात्र प्रशासनाने सतत होणाऱ्या अपघातांचे कारण जाणून घेऊन तांत्रिक बाबींचा अभ्यास करणे काळाची गरज बनली आहे. वेळीच यावर तोडगा न निघाल्यास मृत्यूची मालिका अशीच सुरू राहू शकते.

-संदेश दाभने

Accident on Khoni Taloja Highway; The truck crushed down and killed the biker

भयानक थंडीत उघड्यावर झोपणाऱ्या बेघरांना ब्लॅंकेट वाटप

कल्याण : भर थंडीत उघड्यावर झोपणाऱ्या गोरगरीब बेघरांना नागरी हक्क संघर्ष समितीने मकरसक्रांत आणि नामांतर दिवसाचे औचित्य साधून ब्लॅंकेटचे वाटप केले आहे. त्याचबरोबर गोरगरिबांना वस्तू दान करण्याचे आव्हान ही करण्यात आले आहे. दोन वर्ष करोनाचा कहर त्यात गरिबांचा कामधंदा गेला. खाण्याचे हाल, उघड्यावर दुकानाच्या आसऱ्याला झोपायचे, त्यात महा भयंकर थंडी. अशा परिस्थितीत काही लोक जगतात. त्यांचे जगणे रात्री अपरात्री फिरल्यावर समजते.

बैल बाजार स्मशान भूमि समोर स्मार्ट स्टोर जवळ एक तीस वर्षाचा व्यक्ती प्ल्यास्टिकच्या गोणीत स्वतःला टाकून थंडीत कुडकुडत झोपला होता. सर्व शरीर त्याने त्या गोणीत गुंडाळून घेतलेले होते. त्याला उठवले असता त्याने त्याची करुण कहाणी सांगितली. “साहेब काम धंदा नाही पोटाला अन्न नाही विदर्भातील थंडी पेक्षा ही त्या मानाने थंडी कमी. करोना मुळे कोणी काम देत नाही. मृत्यू पण येत नाही”. बोलतांना त्याच्या डोळ्यात पाणी होतेच मात्र ब्लॅंकेट मिळाल्याचे समाधानही.

अशीच एक प्लास्टिक पालव टाकलेली पाच दहा घर फोर्टीज हॉस्पिटलच्या मागे कल्याणच्या मध्यवर्ती पॉश वस्तीत अशी घर आहेत हेच आश्चर्य आहे. कल्याणच्या लोकांना, नेते आणि कार्यकर्ते म्हणवणाऱ्या लोकांना माणुसकी असेल तर त्यांनी जरा तिकडे फिरून यावे. पावसाळ्यात हे लोक कसे राहत असतील? असा विचार आला तर अंगावर शहारे आले. लाईट नाही, पाणी नाही. साप, विंचू, घुशी यांची भीती नाही. तरी लोक चिमुरडे घेऊन येथे राहतात. त्यांच्या कडे ढुंकूनही कोणी पहात नाही. अश्या बेवारस वस्तीत जाऊन सामाजिक भान ठेवून शनिवारी रात्री ब्लॅंकेट वाटन्यात आले.

अशीच एक स्वाभिमानी वयोवृद्ध आजी कृषी बाजार समितीच्या गेट वर सापडली. अंगावर फक्त साडी, विना स्वेटर केळ्याची पान आणि काही भाजी रात्री थंडीत विकायला बसली होती. आजी कुठून आली? विचारले असता ती म्हणाली जळगाव वरून. आता रात्र भर थंडीत राहणार काय? तर म्हणाली पोटा पुढे थंडी काय आहे पोरांनो? कुठून उर्मी येते यांना जगण्याची हे एक कोडे आहे. या घरात बसण्याच्या वयात ही म्हातारी एव्हड्या लांबून थंडीत केळीची पाने विकायला आली.
सलाम त्या आजीच्या स्वाभिमानाला.

लोक जेथे आसरा मिळेल तेथे झोपली होती. दुकानाच्या थंड गार लादीवर, अंगावर असेल तो पातळ कपडा, अंगाखाली काही नाही व त्यात डास. काही लोकांच्या म्हणन्यानुसार ते नशेडी म्हणून घोषित केले जातात. पण काही लोक नशा न करता ही झोपलेले होते. आणि ही त्यांची हौस नसून त्यांची मजबूरी होती. ज्याकडे येथील व्यवस्था आणि समाजाने दुर्लक्ष केले आहे.

१४ जानेवारीच्या रात्री ब्लॅंकेट वाटण्याच्या अनुभवाने एक रात्र वैऱ्याची, निसर्गाच्या थंडीच्या प्रकोपाची अनुभवायला मिळाली. रात्रीच भयानक वास्तव आणि स्मार्ट सिटी बनायला निघालेल्या शहराच काय होणार? लोक स्मार्ट केंव्हा होणार? माणसात माणुसकी केंव्हा येणार? असे अनेक प्रश्न घेऊन सकाळी पाच वाजता चार भिंतीच्या सुरक्षित ब्लॉकच्या घरात ब्लँकेट घेऊन झोपलो. स्वतःला,सुशिक्षित समजणाऱ्या समाजाला येथील भांडवलदारांना, राजकारणी नेत्यांना, लोकशाही म्हणून तीचा खून पाडणाऱ्या सत्ताधारी व्यवस्थेला शिव्या देत.

नागरी हक्क संघर्ष समिती तर्फे हे वाटप करण्यात आहे. माणुसकी मनात जिवंत असणाऱ्या लोकांच्या मदतीने रात्री जागून सामाजिक भूक भागवणारे कार्यकर्ते हजर होते. बाबा रामटेके, हेमंत कांबळे, अभिजित पंडित, राजू रणदिवे, अक्षय गायकवाड, प्रवेश सिंग, रमेश बर्वे, ऍड.सुनील चतुर्वेदी, कलाकार फोटोग्राफर मनोज घुसळे.

दरम्यान ब्ल्याॅंकेट वाटप कार्यक्रम पुढे दहा दिवस चालू राहणार आहे. ज्यांना नवीन ब्लॅंकेट/चादर देणे असतील त्यांनी स्टार ऑप्टिकल ताल बार समोर, मुरबाड रोड कल्याण पश्चिम येथे द्यावे. मदत करण्यासाठी पत्रकार बाबा रामटेके यांच्या ८०९७५४०५०६ नंबरवर संपर्क साधण्याचे संघटनेने आव्हान केले आहे.

-रोशन उबाळे

कल्याण डोंबिवलीत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाया सुरूच

कल्याण : महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच दिलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या प्रभागातील पथके पोलिसांच्या मदतीने महापालिका परिसरात दररोज विना मास्क फिरणा-या लोकांवर कारवाई करत असूनही अजून काही नागरिक रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मास्क न घालत फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

१० जानेवारी ते १४ जानेवारी या पाच दिवसात सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणा-या ७७९ व्यक्तींकडून महानगरपालिका कर्मचारी पथकाने पोलिसांच्या मदतीने ३ लाख ८९ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. तरी गर्दीच्या ठिकाणी, अथवा बाजारात, किराणा दुकान, मॉल या ठिकाणी जातांना नागरिकांनी मास्क परिधान करावा तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. तसेच कोविड अनुरुप वर्तनाचा अवलंब करावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

“क.डों.म.पा.च्या जम्बो कोविड सेंटर मध्ये भ्रष्टाचार” – राष्ट्र कल्याण पार्टीचा आरोप

कल्याण : वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णांवर उपचार करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने डोंबिवलीच्या एमआयडीसी भागात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. मात्र या कोविड सेंटर मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचिव राहुल काटकर यांनी केला असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

 डॉबिवली औद्योगिक क्षेत्र फेज – १ मधील इंडस्ट्रियल युनिट मेकानो इंडीया प्रा. लि. या कंपनीतील इमारत क्र. २ मध्ये डेडिकेटेड कोविद हॉस्पिटल तयार करण्यात येत आहे. हे हॉस्पिटल तयार करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे हॉस्पिटल तयार करण्याचे काम मे. एम अंक इंजिनियर्स या कंपनीला दिलेले आहे. याठिकाणी सार पत्रकाप्रमाणे कोणतेही काम करण्यात आलेले नाही. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्र कल्याण पार्टीने केला आहे.

याठिकाणी प्लायवुड ज्या कंपनीचे व जेवढ्या जाडीचे लावण्यास सांगितले होते ते लावण्यात आलेले नाही. तसेच जे लावण्यात आलेले आहेत ते देखील निकृष्ट बर्जाचे भंगार मधील घेऊन लावण्यात आलेले आहे. सनमाईका देखील सुमार दर्जाच्या लावण्यात आल्या असून त्यामध्ये देखील बरेचसे सनमाईका तुटलेले वापरण्यात आले आहे. अल्युमिनियम व स्टील अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आलेले आहे. बाथरूम मध्ये लावण्यात आलेले सर्व साहित्य निकृष्ट व दुष्यम दर्जाचे आहेत. लोकल कंपनीचा कलर वापरण्यात आला आहे, तसेच तो देखील योग्य प्रकारे लावण्यात आलेला नाही. तात्पुरते स्वरूपात सर्व बाजूने लावण्यात आलेले पत्रे भंगार मधून घेऊन लावण्यात आलेले आहेत.

निविदा प्रमाणे कंपनी ने दुसऱ्या कोणालाही काम देऊ नये असे असताना कंपनी ने थर्ड पार्टीला काम दिले आहे. मे. एम डॅक इंजिनियर्स या कंपनीचे मालक दिलीप महादेव गावडे यांचा मृत्यू झालेला आहे. तसेच कंपनीचे मालक यांच्या बनावट सही करून महानगरपालिकेची दिशाभूल व फसवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व कामांची तृतीय पक्षातर्फे तपासणी करण्यात यावी, जेणेकरून कामाची गुणवत्ता आपल्या निदर्शनास येईल. निविदा देण्यात आलेल्या कंपनीचे एकही बिल देण्यात येऊ नये तसेच आतापर्यंत देण्यात आलेल्या बिलाची रक्कम देखील कंपनी कडून वसूल करण्यात यावी आणि या कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे, तसेच ज्यांनी महानगरपालिकेची दिशाभूल व फसवणूक करून भ्रष्टाचार केला आहे त्यांच्याविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा व कर्त्यव्यात कसूर करून कंत्राटदार यांना पाठीशी घालणाऱ्या जबाबदार अधिकारयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी राष्ट्र कल्याण पार्टीने केली आहे.

-कुणाल म्हात्रे

संक्रातीच्या सणाला कल्याण डोंबिवलीत हजारो कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण :- नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच वेगाने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त झाले होते. मात्र संक्रांतीच्या दिवसाला समाधानकारक अशी बातमी समोर आली आहे. कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात आज तब्बल १२१६ रुग्णांना डिस्चार्ज म्हणजेच बरे झाले असल्याची नोंद करण्यात आलेली आहे. यामुळे या वाढत्या आकड्यांमधून काहीसे दिलासादायक वृत्त संक्राती निमित्त कल्याण डोंबिवलीकरांना मिळाले आहे.

मागील काही दिवसांपासून क.डों.म.पा. क्षेत्रात दररोज हजारो नवे कोरोना रुग्ण नोंदवले जात आहेत. जवळपास १० हजारांहून अधिकचे रुग्ण या १४ दिवसांत नोंदवले गेले आहेत. मात्र आज नव्या रुग्णापेक्षा बरे झालेले रुग्ण अधिक प्रमाणात नोंदवले गेले आहेत. या आकडेवारी मध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंदही करण्यात आलेली आहे. आजच्या आकडेवारी नुसार क.डों.म.पा. क्षेत्रात एकूण ११ हजार ३५७ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. बदलत्या वातावरणामुळे सध्या प्रकृतीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत.

-संतोष दिवाडकर