गर्भवती महिलेच्या उपचारासाठी मनसेची ५० हजारांची मदत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वसंत व्हॅली रुग्णालयात शुक्रवारी ८ ऑक्टोबर रोजी एका गर्भवती महिलेसह पल्स रेट तसेच शरीरातील शुगर अतिरिक्त वाढ झाल्याने फिजिशियन डॉक्टर नसल्याचे कारण देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देऊन दारातच ताटकळत ठेवले होते. याबाबत मनसेचे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांनी तत्परता दाखवत या महिलेला एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून तिचा जीव वाचवला होता. तसेच या महिलेला उपचारासाठी ५० हजार रुपयांची मदत देखील केली आहे.

 वसंत व्हॅली येथे पालिकेने प्रसूतिगृह नव्याने सुरू केले असून बैल बाजार येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ईरफाना शेख या महिलेला प्रसूती करिता ८ ऑक्टोबर तारीख दिली होती. आपली आई व भावा यासोबत सकाळी ८ च्या दरम्यान प्रसुती साठी ऍडमिट होण्यासाठी हि महिला आली होती. प्रचंड वेदना सुरू असताना ईरफानाला डॉक्टरांनी उपचारार्थ दाखल करून न घेता विविध कारणे देऊन अन्य रुग्णालयात दाखल करावे असे नातेवाइकांनी सांगितले. ४ तास ती गरोदर महिलेला बाहेर बसून होती.

याबाबत कल्याण शहर मनसे संघटक रुपेश भोईर यांना या बाबत माहिती समजली असता डॉक्टरांन सोबत चर्चा करून गर्भवती महिलेची शारीरिक अवस्था बघता कल्याणातील खाजगी हॉस्पिटल मध्ये या गर्भवती महिलेला  उपचारार्थ दाखल केले. या रुग्णालयात गर्भवती महिलेची योग्य उपचार होत प्रसूती व्यवस्थित  पार पडली. यात डॉ. अनिता मैथयू,  आणि डॉ. रेनुमा यांच्या विशेष सहकार्यामुळे मातेचा जीव वाचू शकल्याने मनसे तर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.

-कुणाल म्हात्रे

अहमदनगर कल्याण एसटीने कोरोनाचा शिरकाव ?

कल्याण :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कल्याणमध्ये व्यक्त केली जात नसली तरी कल्याणच्या एसटी डेपोत दररोज अहमदनगरहून जवळपास ८० बसेस येतात. या बसमधून कल्याणमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालिकेने विविध अँटिजेंन टेस्ट आणि इतर सेवा पुरवली पाहिजे अन्यथा कोरोना रुग्णाचा आकडा या माध्यमातून वाढू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
         

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने शिरकाव केला आहे. या जिल्ह्यातील ६९ गावे लॉकडाऊन करण्यात आली आहे. या जिल्ह्यातील ४० टक्के कोरोना रुग्ण पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेतात अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच पुण्यात दिली. कल्याण हे देखील वाहतूकीच्या दृष्टीने जंक्शन आहे. कल्याण अहमदनगर या मार्गावर रेल्वे मार्ग नाही. अहमदनगरहून शेतकरी शेतमालाची वाहतूक याच मार्गे करतात. तसेच सामान्य प्रवाशाला खाजगी बस आणि वाहनाने प्रवास परवडत नाही. त्यामुळे हा प्रवासी एसटीला पसंत देतो.

कल्याण अहमदनगर हा एसटीच्या उत्पन्नाचा मार्ग आहे. या मार्गावर ८०  एसटी बसेस चालविल्या जातात. या मार्गे अहमदनगरहून कल्याणमध्ये कोरोनाची तिसरी लाट दाखल होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. वेळीच काळजी घेतली नाही तर हा मार्ग कोरोना मार्ग होऊ शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान अहमदनगर वरून येणाऱ्या प्रवाशांची एसटी महामंडळाने चाचणी करणं बंधनकारक केले पाहिजे. अन्यथा पुन्हा कल्याण डोंबिवली मध्ये कोरोना थैमान घालेल अशी भीती  रुपेश भोईर (मनसे शहर संघटक कल्याण) यांनी निवेदन देऊन वर्तवली आहे या गंभीर मुद्द्या कडे लक्ष देणे महत्वाचे आहे.

-रोशन उबाळे

खड्ड्यांच्या तक्रारीसाठी KDMC ने जारी केला टोल फ्री नंबर

कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर मोठ्या प्रमणात खड्डे झाले असून नागरिकांना आता या खड्ड्यांची तक्रार टोल फ्री क्रमांकावर नोंदविण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी महापलिकेने हि सुविधा सुरु केली आहे.

गेले तीन महिने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबतच्या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून, वृत्तपत्रातून मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. पावसाची उघडीप मिळाल्याबरोबर महानगरपालिकेने यापूर्वीच खड्डे भरण्याचे, रस्ते दुरुस्तीचे कामास प्रारंभ केला आहे. आता महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेसाठी, रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसाठी तक्रार नोंदविण्याकरिता 1800 233 0045 या टोल फ्री क्रमांक ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरी नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डयांबाबतच्या आपल्या तक्रारी कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळी या टोल फ्री क्रमांकावर नोंदवाव्यात असे आवाहन महानगरपालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

खड्डे पडणे आणि खड्डे बुजवणे याकरिता योग्य ठोस उपाययोजना राबवायला हव्यात. तात्पुरत्या स्वरूपाची किंवा काही ठराविक काळा पुरती केलेली मरमपट्टी यातून ही समस्या सुटणार नसून तेच तेच चित्र पुन्हा पुन्हा दिसत आहे. त्यामुळे शहरातील समाजिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते ठोस पावलं उचलणं जास्त महत्वाचे वाटत आहे.

3 वर्षांपूर्वी खड्ड्याची समस्या कायमची सोडवण्यासाठी प्लॅस्टिकयुक्त डांबरी रस्त्याचा यशस्वी प्रयोग गणेशवाडी येथे केला होता , चार खड्ड्यांवर हा प्रयोग केला होता , आजही तेथे खड्डा पडला नाही … पेट प्लास्टिक 160 डिग्री पर्यंत गरम करून त्यात डांबर व खडी एकत्र करून जर खड्ड्यात टाकले व त्यावर रोलर फिरविला तर 10 वर्षे तेथे खड्डा पडत नाही …

सदर कार्यक्रमाला त्यावेळचे तत्कालीन आयुक्त बोडके साहेब / शहर अभियंता / बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते … दुर्दैव पुढे यांनी काहीच केले नाही.

नितीन निकम (मा.नगरसेवक)

त्या टोल फ्रिवर call केला खड्यांची नोंद घेण्याचे आदेश देणात आले आहेत. त्यावर पुढे कोणती कार्यवाही केली जाणार ह्याबद्दल टोल फ्रिवर उपलब्ध असणा-या कर्मचा-यांनी सांगितले. अधिकारी कडोमपा पालिका हद्दीतुमच मुख्यालय किंवा प्रभाग कार्यालयात जातात की प्रावेट जेट घेवुन महापालिकेत उतरतात. नागरिकांनीच खड्डे कुठे आहेत ते सांगायचे का ? मग जो नागरिक खड्डा सांगेल त्याला अधिका-याच्या पगारातुन अर्धा पगार दिला जाईल का? हे नकली काम बंद करा आणि पहिला खड्डे भरुन काढा.

प्रथमेश सावंत (अध्यक्ष, जाणीव सामाजिक संस्था)

जो पर्यंत आधिका-यांचा व लोक प्रतिनीधी यांचा टक्केवारी बद्दलचा फाटलेला खिसा शिवला जात नाही , तो पर्यंत रस्त्यावर १००% खड्डे पडणार.

रवी केदारे (आम आदमी पार्टी)

-संतोष दिवाडकर

६ वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या मोक्कातील आरोपीला कल्याण क्राईम ब्रांचने पकडले जाळ्यात

कल्याण :- शनिवारी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये मोक्का अंतर्गत ६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी सलमान उर्फ जॅकी पपली इराणी उर्फ हुसेन वय-३१ वर्षे रा. इंदिरानगर, आंबिवली हा बर्‍याच दिवसांपासून फरार असल्याने तो मिळून येत नव्हता तसेच त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात मालमत्ता व शारीरिक विरोधाच्या गुन्हे दाखल आहेत.

या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना आरोपीची पोलीस हवालदार कामत यांनी गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती काढून त्याचा शोध घेतला असता तो खडवली परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे या ठिकाणी सापळा रचून मोठ्या शिताफीने या आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून १० हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

       या आरोपीवर महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन अंतर्गत ४, आर.के.मार्ग पो.स्टे. मध्ये ५, तर मानपाडा आणि ताडदेव पोलीस स्टेशन मध्ये प्रत्येकी १ असे एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. ताब्यात घेतलेला आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला आहे. हि कामगिरी व.पो.नि विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पो. हवा/कामत, मंगेश शिर्के, सचिन साळवी, सुरेश निकुळे, राहुल ईशी यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

केडीएमसीच्या घरोघरी जावून लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद

कल्याण : कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वतीने नागरिकांच्या घरोघरी जावून लसीकरण मोहिमेला सुरवात करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रात ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत महापालिका क्षेत्रातील १८ वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांसाठी, प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रामार्फत घरोघरी जावून लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे ज्यांचे लसीकरण झाले नसेल त्यांनी त्याचप्रमाणे दिव्यांग व आजारी व्यक्तींनी देखील महानगरपालिकेच्‍या लसीकरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव अजूनही टळलेला नाही, परदेशात कोविडची तिसरी लाट आली आहे. भारतातही कोविडच्या तिस-या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे, या पार्श्वभूमीवर १८ वर्षावरील सर्व नागरिकांनी कोविशिल्ड/कोव्हॅक्सिन लस घेतली नसल्यास त्यांनी तातडीने जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून लस घ्यावी. तसेच ज्या नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांनी ८४ दिवस पूर्ण झाल्यावर व ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला असेल त्या नागरिकांनी २८ दिवस पूर्ण झाल्यावर तातडीने दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. कोविड-१९ चे लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित आहे व त्या पासून कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही. त्यामुळे कोविड लसीचे २ डोस घेवून आपले आणि कुटूंबियांचे कोविड पासून संरक्षण करावे.

महापालिकेच्या कोविड लसीकरण मोहिमे अंतर्गत आपल्या घराजवळ ठिकठिकाणी लसीकरण सत्र चालविण्यात येत आहे. जेणे करुन प्रत्येक नागरिकाला याचा लाभ घेता येईल. लसीकरण केद्रांची माहिती दररोज फेसबुक, व्हॉटस्ॲप, इन्टाग्राम, व्टिटर तसेच महापालिकेच्या संकेत स्थळावर दररोज सायंकाळी प्रसिध्द केली जाते.

-कुणाल म्हात्रे

वर्ल्डकपच्या भारतीय संघात मुंबई इंडियन्सचे सहा खेळाडू; तर चेन्नई बेंगलोरच्या फक्त एकालाच स्थान

आयपीएल स्पर्धेचा गतविजेता संघ मुंबई इंडियन्स सध्या स्पर्धेतून बाद झाल्याने समाज माध्यमांवर मिम्सचा पाऊस विरोधी संघाच्या चाहत्यांनी सुरू केला आहे. मात्र मुंबई संघाचे फेन्स देखील त्यांच्या या टीकेला तोडीस तोड अशी उत्तरे देताना दिसत आहेत. मुंबईच्या संघाने 1552 बस पकडून घरी जावे असे मुंबईचे विरोधी फेन्स म्हणत आहेत तर आमची अर्धी टीम वर्ल्डकप साठी खेळणार आहे तेव्हा तुमच्याच खेळाडूंना आयपीएल नंतर बॅगा भरायला लावा असे उत्तर मुंबई समर्थक देत आहेत. पण नक्की काय आहे या उत्तरा मागील गमक ? ज्यामुळे चेन्नई आणि बेंगलोरच्या समर्थकांना काहीसा कमीपणा घ्यावा लागतो हे जाणून घेऊयात.

आयपीएल २०२०, आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांतील खेळाच्या परफॉर्मन्सनुसार बीसीसीआयने भारताच्या संघाची टी20 वर्ल्डकप 2021 साठी निवड केली आहे. यात 15 खेळाडूंची नावे आहेत. तसे पाहता आयपीएल संपल्यानंतर सर्व खेळाडू हे आपल्या देशासाठी एका रंगात खेळत असतात. यात कोणत्याही आयपीएल संघाचा कसलाही संबंध नसतो. मात्र सध्या आयपीएल मधून बाद झाल्या नंतर चेन्नई बेंगलोरच्या फेन्सने मुंबईसाठी ‘घरी जा’ असे मिम्स बनवल्याने मुंबईचे समर्थक त्यांना समर्पक उत्तर देताना दिसत आहेत.

आयपीएल संघा नुसार पहायचे झाले तर भारतीय संघात निवड झालेल्या 15 खेळाडूंपैकी 6 खेळाडू हे सध्याच्या मुंबई इंडियन्स संघासाठी खेळलेल्या पैकी आहेत. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, सुर्यकुमार यादव, ईशन किशन, राहुल चहर हे ते सहा खेळाडू. याउलट चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांचा प्रत्येकी एक-एकच खेळाडू वर्ल्डकप साठी निवडण्यात आला आहे. ते म्हणजे रवींद्र जडेजा आणि कर्णधार विराट कोहली. पंजाब किंग्स चे केएल राहुल, मोहम्मद शमी. दिल्ली कॅपिटल्सचा ऋषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल. कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्ती आणि सनरायजर्स हैदराबादचा भुवनेश्वर कुमार अशी आयपीएल नुसार विगतवारी करता येईल. दुर्दैव म्हणजे राजस्थान रॉयल्स ही एकच टीम अशी आहे ज्याचा एकही खेळाडू वर्ल्डकपच्या भारतीय संघात नाही.

15 ऑक्टोबरला आयपीएल संपताच 17 ऑक्टोबर पासून ओमन येथून वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. तर 24 ऑक्टोबर रोजी भारताचा संघ पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला सामना खेळताना दिसणार आहे. या दिवशी संपूर्ण आयपीएल समर्थक भारतीय संघाला समर्थन करताना दिसतील. मात्र तोपर्यंत हा मिम्स वोर असाच सुरू राहणार यात काही शंका नाही.

-संतोष दिवाडकर

क.डों.म.पा. प्रसृती रुग्णालयासमोर महिलेची तासनतास प्रतीक्षा; आरोग्य यंत्रणा कुचकामी ?

कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रसुतीगृह रुग्णालयासमोर एका गरोदर महिलेला तासनतास बसून ठेवल्याचा केविलवाणा प्रकार समोर आला आहे. यंत्रणेचे कारण देत या महिलेस इतर ठिकाणी जाण्याचे सांगितल्याने आरोग्य सुविधांचा वानवा आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे वायले नगर येथे प्रसूतिगृह आहे. या प्रसूती गृहामध्ये दूध नाका परिसरामध्ये राहणारी इरफाना शेख या महिलेला प्रसूतीसाठी आणले असता तिची प्रसूती न करताच तिला रुग्णालयाच्या बाहेरच बसून ठेवण्यात आले होते. तुमचा शुगर वाढलेला आहे आमच्याकडे डॉक्टर नाहीत, आय सी यु नाही असे थातुरमातुर कारण सांगून या गरोदर महिलेला ठाणे मुंबईला जाण्याचा अजब सल्ला रुग्णालयाकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान कोरोना काळात आधीच मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना आता आरोग्य सेवा घेताना कुचंबणा केली जात आहे. त्यामुळे महिला आरोग्य विभागात गंभीर कुचंबणा करणाऱ्या डॉक्टरांवर आणि संबंधितांवर कारवाई होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-रोशन उबाळे

पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोड्यासह बलात्कार; कल्याण लोहमार्ग पोलिसांचा तपास सुरू

कल्याण :- इगतपुरी ते कसारा दरम्यान मेल एक्सप्रेसमध्ये लुट आणि बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. धावत्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये सात ते आठ दरोडेखोरांनी १६ प्रवाशांना लुटण्यासह एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काल (शुक्रवारी) सायंकाळच्या सुमारास इगतपुरी ते कसारा दरम्यान घडली आहे.

कसारा रेल्वे स्थानकावर उतरून आरोपी पसार झाले मात्र याच दरम्यान दोन आरोपीना प्रवाशानी मोठ्या धाडसाने पकडलं. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत दोन जणांना अटक केली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या आठ आरोपीमधील सात जण घोटी परिसरात राहतात तर एक आरोपी मुंबई येथे राहणारा आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास ही सुरक्षित राहिला नसल्याचे या घटनेवरून समोर येते आहे.

शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली असताना आठ जण एक्स्प्रेस मध्ये चढले . एक्स्प्रेस ने इगतपुरी स्टेशन सोडताच या आठ जणांनी धाक दाखवून प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. १६ प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटले ६ जणांचे पैसे रोकड आणि १० जणांचे मोबाईल व इतर वस्तू हिसकावून घेतल्या. दरोडेखोर इथेच थांबले नाही तर त्यांनी एका प्रवाशा सोबत प्रवास करणाऱ्या त्याच्या २० वर्षीय प्रवासी पत्नीची छेड काढत तिच्यावर बलात्कार केला. तब्बल तासभर दरोडेखोरांचा हा थरार सुरू होता.

कसारा रेल्वे स्थानक येताच या दरोडेखोरांनी उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामधील सहा आरोपी निसटले मात्र याच दरम्यान काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कल्याण स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपीना अटक करण्यात आली आहे. प्रकाश पारधी व अर्षद शेख अस या आरोपींच नाव आहे. हे आठ आरोपी एकमेकांचे मित्र असून यामधील सात जण घोटी मध्ये राहतात तर एक जण मुंबई येथे राहण्यास आहे. नशेच्या अमलाखालि त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसाची पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत. विविध पथक कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे.

मध्य रेल्वे डीसीपी मनोज पाटील यांनी घटना घडल्यानंतर आम्ही घटना स्थळ न पाहता कल्याण जीआर मध्ये गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिलेची प्रकृती स्थिर आहे. आठ पैकी सात आरोपी घोटीचे राहणार आहेत. तर एक आरोपी मुंबईचा आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे मनोज पाटील (रेल्वे डीसीपी) यांनी सांगितले आहे. आमचा तपास योग्य दिशेने सुरू असून उर्वरित आरोपींच्या लवकरच मुसक्या आवळण्यात येतील. अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

-रोशन उबाळे

‘या’ निमित्ताने कल्याण पूर्वेत आमदार खासदार दिसले एकत्र

कल्याण : कल्याण पूर्वेत ‘अंतर्राष्ट्रीय अग्रहरि वैश्य’ समाजाच्या वतीने महाराजा ‘श्री अग्रसेन’ यांची ५१४५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि साध्वी सरस्वती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे जवळपास दोन वर्षांनी खासदार शिंदे आणि आमदार गायकवाड हे एकाच मंचावर उपस्थित होते.

       यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाराजा अग्रसेन यांच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख करत सांगितले कि, जे महाराजा अग्रसेन यांनी ५१४५ वर्षे आधी सांगितले होते त्या गोष्टी आज देखील समाजामध्ये लागू होतात. संस्थेचे राष्ट्रीय वरिष्ठ अध्यक्ष योगेश अग्रहरी (के. एस. गुप्ता) यांनी सांगितले कि, आम्ही अग्रहरी समाजाचे लोकं महाराजा श्री अग्रसेन यांचे वंशज असून आज त्यांच्या जयंती समारोहात त्यांच्या आठवणींना उजाळा देत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काय काय करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,  आमदार गणपत गायकवाड यांच्यासह कथा वाचक साध्वी सरस्वती, शिवसेना कल्याण पूर्व संपर्क प्रमुख शरद पाटिल, अंतराष्ट्रीय अग्रहरि समाचाचे मुकेश अग्रहरि, दिनेश अग्रहरि आदींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

खडकपाडा गोदरेज हिल परिसरात युवकाची हत्या; शुल्लक कारणाची बाचाबाची ठरली जीवघेणी

कल्याण :- कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरातील गोदरेज हिल भागात क्षुल्लक कारणाने एका तरुणाची हत्या झाली आहे. तीक्ष्ण हत्याराने भोकसल्याने खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान सदर तरुण मयत झाला. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

खडक पाडा परिसरातील गोदरेज हिल भागात गुरुवारी रात्री १२ ते १ च्या सुमारास दोंघांची रस्त्यात बाचाबाची झाली. शब्दाला शब्द वाढत गेले आणि या बाचाबाचीचे परिवर्तन हाणामारीत झाले. या दरम्यान शेख खान या आरोपीने तीक्ष्ण हत्याराने वार केले. वार जिव्हारी लागल्याने खाजगी रुग्णालयात मुकेश देसाई या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शेख खान या इसमावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. खडकपाडा पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन कसोशीने पुढील तपास सुरू केला आहे.

-रोशन उबाळे