Kalyan to pandharpur bus msrtc : आषाढी पंढरपूर वारीसाठी

Kalyan to pandharpur bus msrtc : कल्याण व आसपासच्या शहरी व ग्रामीण भागातील भाविकांसाठी एसटी महामंडळाने विशेष नियोजन केले आहे. त्यानुसार यंदा कल्याण व विठ्ठलवाडी एसटी आगारातुन आजपासून (दि.४) जवळपास १६ एसटी बसेस मार्गस्थ होणार आहेत. याचा लाभ कल्याण, डोंबिवली, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा येथील भाविकांना मिळणार आहे.

आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून हरी नामाचा जप करीत हजारो वारकरी भाविक भक्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. रविवारी दि.६ जुलै रोजी पंढरपूरात होणाऱ्या सोहळ्यासाठी भक्तगण रेल्वे, एसटी, खाजगी गाड्या अशा मिळेल त्या वाहनाने दाखल होतात. या भाविक भक्तांची विशेष सोय म्हणून एसटी महामंडळ दरवर्षी राज्यातील कानाकोपऱ्यातून एसटी बसेसचे नियोजन करीत असते.

दोन्ही एसटी आगारांचे चार दिवसांचे नियोजन ठरलेले असून ठाणे विभागातून मिळालेल्या सूचनांनुसार त्याचे पालन केले जाणार आहे. कल्याण आगारातून ११ तर विठ्ठलवाडी एसटी आगारातुन एकूण ५ गाड्या मार्गस्थ होणार आहेत. मार्गस्थ होत असलेल्या या बसेसमध्ये नियमित, जादा व ग्रुप बुकिंग अशा प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या आणखीन ४ बसेस भिवंडी येथून तर कल्याण आगाराच्या ६ बसेस शहापूर येथून पंढरपूर वारी करणार आहेत. ठरलेल्या निर्धारित वेळेनुसार सर्व गाड्या मार्गस्थ होत असून ग्रुप बुकिंग असलेल्या बसेस मात्र प्रवाशांनी मागणी केलेल्या वेळेत सोडण्यात येतील. कल्याण आगाराच्या एसटी गाड्या तारकपूर मार्गे जाणार असून विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या गाड्या चांदणी चौक मार्गे जाणार आहेत.

कल्याण एसटी आगाराचे नियोजन

स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू असल्याने कल्याण एसटी आगार तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी एसटी आगारात स्थलांतरीत केला असला तरी कल्याणच्या जुन्या आगारा मागील बास्केटबॉल कोर्ट परिसरात तात्पुरते बस स्थानक उभारण्यात आले आहे.

शुक्रवार – एकूण गाड्या – २
नियमित – १
निर्धारित वेळ – स.७ वा.

शनिवार- एकूण गाड्या – ७
नियमित – २
निर्धारित वेळ – स.६, स.७ व इतर ठराविक वेळात

रविवार- एकूण गाड्या – २
नियमित – १
निर्धारित वेळ – स.७ वा.

विठ्ठलवाडी एसटी आगाराचे नियोजन

दि.४ – एकूण गाड्या – २
नियमित १
निर्धारित वेळ – स.७ वा.

दि.५ – एकूण गाड्या – २
नियमित १
निर्धारित वेळ – स.७ वा.

दि.६ – एकूण गाड्या – १
नियमित १
निर्धारित वेळ – स.७ वा.

असा असणार परतीचा प्रवास

मागील तीन ते चार दिवसांत भाविकांना घेऊन पंढरपूरात गेलेल्या सर्व एसटी गाड्या आषाढी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि.७) पुन्हा कल्याणच्या दिशेने परतणार आहेत. पंढरपूरच्या चंद्रभागा स्थानकातून या सर्व गाड्या तेथील ठरलेल्या वेळेनुसार सुटतील. याकरिता कल्याण एसटी आगाराच्या ६ गाड्या आरक्षित झाल्या असून आणखीन ७ गाड्या प्रवाशांच्या गर्दीनुसार म्हणजेच प्रवासी घेऊन शक्य तशा वेळेत आगारात परतणार असल्याची माहिती कल्याण आगार व्यवस्थापक महेश भोये यांनी दिली आहे. तर विठ्ठलवाडी एसटी आगाराच्या ५ गाड्यांचे परतीचे आरक्षण झाले असल्याची माहिती विठ्ठलवाडी आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी दिली आहे.

विठ्ठलवाडी एसटी आगारातुन बारमाही पंढरपूर वारी

आषाढी एकादशी निमित्ताने जादा गाड्या सोडण्यात येत असल्या तरी विठ्ठलवाडी एसटी आगारातून दररोज पंढरपूर साठी एक एसटी नियमित रवाना होते. स.७ वाजता ही एसटी विठ्ठलवाडी येथून मार्गस्थ होत कल्याण, डोंबिवली स्थानकातून प्रवासी घेत चांदणी चौक मार्गे पुढे जात दुपारी ४ ते ५ दरम्यान पंढरपूर गाठते. तर हीच गाडी पुन्हा विठ्ठलवाडीसाठी पहाटे ५ वाजता परतीचा प्रवास सुरु करत दुपारी २ ते ३ दरम्यान परतते. विठ्ठलवाडी येथून सकाळी ८ वाजता सुटणाऱ्या कलेढोण एसटीनेही फलटण पर्यंत प्रवास करीत पुढे वाहन बदलून पंढरपूरला पोहोचता येते.

Kalyan to pandharpur bus msrtc : Kalyan, Vitthalwadi ST depot ready for Ashadhi Pandharpur Wari

MSRTC Bus Booking वर आता मिळणार १५% सूट

MSRTC Bus Booking : एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या १५० कि.मी. पेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुर्ण तिकीट धारी प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. सवलतधारक प्रवाशांसाठी ही सवलत नसणार असून ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात १ जुलैपासून करण्यात आली आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

१ जुनला एस टी च्या ७७ व्या वर्धापन दिनी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटामध्ये १५ टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी १ जुलैपासून लागू करण्यात आली आहे.

येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात १५ टक्के सवलत१ जुलैपासून लागू होत आहे. तथापि जादा बसेससाठी ही सवलत लागू असणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो.

कुठे कराल आरक्षण?

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित इ-शिवनेरी बसमधील प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, npublic.msrtcors.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा MSRTC Bus Reservation या मोबाईल अॅपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना १५% सवलत प्राप्त करता येऊ शकते.

Now you will get 15% discount on MSRTC Bus Booking

Rickshaw strike : रिक्षा चालकांचा चक्का जाम आंदोलनाचा ईशारा

Rickshaw strike : रिक्षा प्रवासात एकावेळी तीन हुन अधिक प्रवासी प्रवास करीत असल्यास सदर रिक्षाचालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा बडगा कल्याण डोंबिवलीत वाहतूक पोलिसांनी सुरू केला आहे. यामुळे संतापलेल्या रिक्षाचालकांनी आता संपूर्ण शहरात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे. सोमवारी या संदर्भात चक्कीनाका येथील वाहतूक उपशाखेत निवेदन देण्यात आले आहे.

ओव्हर सीट बसविल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून दहा हजार रुपयांचा दंड रिक्षा चालकांना ठोठावण्यात आला असून ही कारवाई अन्यायकारक आहे. एखादा प्रवासी स्वतःहून बसत असेल तर त्याच्यावर का कारवाई करीत नाहीत? आम्हालाही कुटुंब आहे. त्यांचे उदरनिर्वाह सर्व काही आम्हा रिक्षाचालकांवर अवलंबून आहे. सध्या इतक्या रिक्षा वाढल्या आहेत की आम्हाला व्यवसाय करणे कठीण होऊन बसले आहे. त्यात आम्ही इतका भरमसाट दंड कसा भरणार? असे अनेक सवाल रिक्षा चालकांकडून करण्यात आले. दरम्यान ही कारवाई थांबली नाही तर अर्धे ठाणे चक्का जाम करू असा इशारा रिक्षा चालकांकडून देण्यात आला.

Rickshaw drivers warn of massive strike

Waldhuni Bridge ला हाईट बॅरियर; अवजड वाहनांना नो एन्ट्री

Waldhuni Bridge : पश्चिमेतुन पूर्वेला तसेच उल्हासनगरला जाण्या येण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग आहेत. त्यातीलच एक असलेल्या वालधुनी पुलावर आता अवजड वाहनांना प्रवेश नसणार आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूस वाहतूक विभागाच्या समन्वयातून हाईट बॅरियर बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे उंच अवजड वाहने या बॅरियर मधून जाऊ शकणार नाहीत. मालाची वाहतूक करणाऱ्यांची मात्र आता बऱ्यापैकी गैरसोय होणार आहे.

कल्याण शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उदभवत आहे. पश्चिमेतुन पूर्वेला तसेच उल्हासनगरला जाण्या येण्यासाठी दिवसभरात शेकडो वाहने वालधुनी पुलावरून वाहतूक करतात. त्यामुळे पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. यापूर्वीच विठ्ठलवाडी एसटी आगाराला आपली वाहने पत्रिपुलावरून नेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार एसटीची वाहतूकही या पुलावरून बंद करण्यात आली होती.

आता अवजड वाहनांचाही प्रवेश बंद केल्याने या कोंडीतून सुटका होते का हे पहावे लागणार आहे. अवजड वाहनांसाठी हा मार्ग बंद केल्याने उल्हासनगर व कल्याण पूर्वेत जाण्या येण्यासाठी शहाड अथवा पत्रिपुलाचा आधार घ्यावा लागणार आहे.

Height barrier on Waldhuni Bridge; no entry for heavy vehicles

हिंदी शिकवायची नाही! मनसेचं शाळांना पत्र

कल्याण : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता पहिली पासूनच शाळेतील विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेचा पर्याय दिला असून मनसेने या निर्णया विरोधात आवाज उठवला आहे. या संदर्भात शाळांनी विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकवू नये या आशयाचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सर्व शाळांना देण्याच्या सूचना मनसे पदाधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार शनिवारी मनसेने कल्याण पूर्वेत एक एक शाळा पिंजून काढीत शाळेतील मुख्यध्यापकांना राज ठाकरेंचे पत्र दिले आहे.

इयत्ता पहिली पासूनच शाळेत तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवली जावी अशी सक्ती शिक्षण मंडळाकडून करण्यात आली होती. मात्र या निर्णयाला विरोध होत असल्यामुळे ही सक्ती हटवून शाळेने आपल्या मर्जीनुसार हिंदी शिकवावी असे सांगण्यात आले. त्यानंतर शाळा प्रशासनाने आपल्या शाळेत हिंदी शिकवू नये याकरिता मनसेने सर्व शाळांमध्ये जाऊन राज ठाकरेंचे पत्र देण्याचा धडाका लावला आहे. कल्याण पूर्वेतील मराठी, इंग्रजी अशा सर्वच माध्यमातील शाळांना मनसे कार्यकर्त्यांनी भेट देत निवेदन दिले आहे.

या अगोदर इ.पाचवी पासून अभ्यासक्रमात हिंदी आणली जात होती. आता पहिली पासूनच विद्यार्थ्यांना जर तीन तीन भाषा लादल्या तर त्या लहान मुलांसाठी जाचक ठरेल असेही यावेळी मनसे पदाधिकारी म्हणाले. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नसून उत्तरेकडील भाषा आहे त्यामुळे ती महाराष्ट्रात लादू नये. राज्यभाषा म्हणून मराठी आणि आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजी या दोन भाषाच ठीक आहेत. परंतु उत्तरेकडील लोकांना इकडे येऊन महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठीच इथे आतापासून हिंदी माथी मारली जातेय. त्यामुळे आपण आपल्या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत हिंदी शिकवू नये, मनसे तुमच्या सोबत असेल असे राज ठाकरेंनी पत्रात नमूद केले आहे.

Hindi should not be taught! MNS’s letter to schools

Ganesh Vidya Mandir शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचं मस्तीत स्वागत

Ganesh Vidya Mandir : जून महिन्याच्या या आठवड्यापासून शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत समारंभ शाळेकडून करण्यात आला. कल्याण पूर्वेतील गणेश विद्या मंदिर शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांचेही काहिसे असेच मजेदार स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटून, कागदी टोप्या घालीत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून शाळेच्या शिक्षकांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

एकेकाळी शाळेचा पहिला दिवस म्हणजे नुसतीच रडगाणी. परंतु आता बदलत्या काळानुसार पहिला दिवस म्हणजे फक्त नाचगाणी अशीच नवी प्रथा प्रचलित झाली आहे. गणेश विद्या मंदिर शाळेच्या शिक्षकांनी आपल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस चांगलाच मजेदार आणि अविस्मरणीय बनवला. लहान मुलांना आवडणारी गाणी लावून शिक्षकही विद्यार्थ्यांसोबत थिरकू लागले. शाळेत संपूर्ण दिवसभर या विद्यार्थ्यांचा नुसता कल्ला सुरू होता. आपल्या आवडीच्या गाण्यावर चिमुकल्यांनी चांगलाच ताल धरला होता. नवा गणवेश, नवे दप्तर, नवी पुस्तकं, नव्या वह्या, नवे शिक्षक आणि नवे मित्र. एकंदरीतच सारे काही नवे नवे.

शाळेतील मुख्यद्यापीका ललिता मोरे यावेळी म्हणाल्या की, “पूर्वी असे काही नव्हते. शाळेच्या पहिल्या दिवशी छडी चालवायची नाही एवढेच आम्हाला माहीत असायचे. पण आता शाळेचा पहिला दिवस म्हणजे एक सोहळ्या सारखा साजरा करण्याची पद्धत बनली आहे. खरेतर ही छान गोष्ट आहे, कारण हा दिवस पुढची दहा वर्षे म्हणजेच दहावीच्या निरोप समारंभा पर्यंत ही मुले लक्षात ठेवतील”.

Ganesh Vidya Mandir School welcomes first standard students with fun

एसटीला खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांची जोड?

एसटी पर्यटन : राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात यासाठी खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी सोबत संयुक्तपणे सहली आयोजित करव्यात असे आवाहन परिवहन मंत्र्यांकडून करण्यात आले आहे. सर्वसामान्य प्रवाशांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता यावा या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या योजनेत राज्यातील सर्व टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. एसटी महामंडळ मुख्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यादरम्यान महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सर्व खाते प्रमुख यांच्या सह खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्यातील गोर-गरीब जनतेला धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या माध्यमातून कमी गर्दीच्या दिवसात सहलीचे आयोजन करावे. विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी एसटीला प्रवासी भारमान कमी असते. त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. अशावेळी धार्मिक पर्यटन स्थळी सहली आयोजित केल्यास त्यातून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढेल, तसेच सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरात पर्यटनाचा आनंद लुटता येईल.

खाजगी टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कमी गर्दीच्या दिवशी पर्यटकांच्या मागणीनुसार पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, ज्योतिर्लिंग, त्र्यंबकेश्वर-नाशिक दर्शन, अष्टविनायक दर्शन, अशा धार्मिक सहलींचे आयोजन करावे. तथापि, या उपक्रमाची सुरुवात येत्या श्रावण महिन्यापासून करावी अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.

Private tours and travel companies join ST

“किती भ्रष्टाचार करायचा काय लिमिट? कमी पडले असेल तर घ्या” – मनसेच्या राजू पाटलांनी खिशातून काढल्या नोटा

डोंबिवली : कल्याण शीळ मार्गावरील पलावा येथील अर्धवट पुलाच्या कामाविरोधात व सत्ताधारी पक्षाने दिलेल्या उदघाटनाच्या आश्वासनाविरुद्ध शिवसेना उबाठा व मनसेने पलावा पुलाच्या कामाची पाहणी करीत निषेध नोंदवला. शिवसेना उबाठा पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे व मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकत्र येत मागील आठ वर्षांपासून अर्धवट असलेल्या पुलाच्या कामाविरोधात सत्ताधार्यांवर जोरदार ताशेरे ओढले.

अर्धवट पुलामुळे परिसरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून, त्यामुळे सामान्य नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या ट्राफिक कोंडीमुळे काही वेळेस शाळा प्रशासनाला देखील सुट्टी देण्याची वेळ आली आहे. या पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे तासांतास नागरिकांना या वाहतूक कोंडीत अटकून राहावे लागते. नागरिकांना सत्ताधारी पक्षाकडून या पुलाच्या उद्घाटनाबाबत यापूर्वी अनेक वेळा खोट्या तारखा सांगून नागरिकांची फसवणूक करण्यात आली. 31 मे रोजी पूल सुरू होईल, असे दिलेले आश्वासन देखील अपूर्ण राहिले. ही गंभीर फसवणूक लक्षात घेता, नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले असल्याचे यावेळी दीपेश म्हात्रे म्हणाले.

या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील, तसेच मनसेचे डोंबिवली व कल्याण ग्रामीण येथील पदाधिकाऱ्यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि नेत्यांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दात टीका केली. “किती पैसा खायचा? किती भ्रष्टाचार करायचा? याला काही लिमिट आहे. म्हणून मी नोटा दाखवल्या. त्यांना कमी पडत असतील तर घ्या” अशी खरमारीत टीका राजू पाटील यांनी सत्ताधार्यांवर केली.

MNS, Shiv Sena ubt unite against incomplete work of Palava bridge

Kalyan East : अवेळी आलेल्या पावसाने चाळ परिसरांची उडाली दाणादाण

Kalyan East : वेळेपूर्वीच आलेल्या पावसाने राज्यभरात अनेक ठिकाणी हाहाकार माजवला आहे. पावसाळ्यापूर्वी शहरा शहरात नालेसफाईची कामे मार्गी लावावी लागतात जी साधारपणे मे महिन्यात केली जातात. मात्र पावसाने अवेळी हजेरी लावल्याने सफाई कर्मचाऱ्यांची देखील चांगलीच दाणादाण उडाली आहे. तर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने मोठ मोठ्या नाल्यातील सफाईला ब्रेक लावण्यात आला आहे. मात्र लहान सहान गटारातील गाळ उपसण्याचे काम महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत अनेक ठिकाणी सुरू आहे.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, चिकणीपाडा, जिम्मी बाग, विठ्ठलवाडी हा सखल भाग बहुतांश चाळ परिसराचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यास पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरते. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसा दरम्यान ‘४-जे’ प्रभाग क्षेत्रातील मंगल राघो नगर भागात नालेसफाईचे काम सुरू होते. मात्र पाऊस आल्याने सफाई कामगारांनी काम थांबवून आडोसा घेतला. अर्धवट नालेसफाई असल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने काही चाळींमध्ये पाणी तुंबून नागरिकांच्या उंबरठ्या पर्यंत पाणी पोहोचले होते. आणखीन काही वेळ पावसाने ब्रेक लावला नसता तर असंख्य नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता होती.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या असल्या तरी पाऊसच वेळेपूर्वी आल्याने प्रशासनाची देखील गोची झाली आहे. अपुऱ्या नालेसफाईमुळे अनेक ठिकणी पाणी साठत असल्याने करदाते नागरिक संपूर्ण रोष महापालिका प्रशासनावर व्यक्त करीत आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस पूर्णपणे थांबणार असल्याचा ईशारा हवामान खात्याने दिला असून याच काळात महापालिकेला संपूर्ण नालेसफाई करण्यास मुभा मिळणार आहे.

Kalyan East : Unseasonal rains have washed away the rice fields.

Water Cut Kalyan : कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद

Water Cut Kalyan : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. २७ मे २०२५ रोजी कल्याण डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अगोदरच अतिरिक्त पाणीसाठा करून पाणी जपून वापरावे असे आवाहनही महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे मंगळवारी २२ के.व्ही. एन.आर.सी.-२ फीडरवर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत देखभाल दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. या सबस्टेशनहुन महापालिकेच्या १५० द.ल.लि. नेतीवली व १०० द.ल.लि. मोहिली जलशुद्धीकरण केंद्रास विद्युत पुरवठा केला जातो. मात्र मंगळवारी हा वीजपुरवठा बंद असणार असल्याने परिणामी जलशुद्धीकरण केंद्रही बंद राहणार आहे. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिक उपकरणांची दुरुस्ती करणे देखील आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

विद्युत व यांत्रिक उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीकरिता महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ८ तासांकरिता बंद असणार आहे. यादरम्यान कल्याण ग्रामीण विभाग, मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम भागाला पाणीपुरवठा बंद राहील अशी माहिती महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

Water supply to Kalyan Dombivali to be cut off on Tuesday