खड्ड्यांच्या तक्रारीसाठी KDMC ने जारी केला टोल फ्री नंबर

कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर मोठ्या प्रमणात खड्डे झाले असून नागरिकांना आता या खड्ड्यांची तक्रार टोल फ्री क्रमांकावर नोंदविण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी महापलिकेने हि सुविधा सुरु केली आहे.

गेले तीन महिने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबतच्या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून, वृत्तपत्रातून मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. पावसाची उघडीप मिळाल्याबरोबर महानगरपालिकेने यापूर्वीच खड्डे भरण्याचे, रस्ते दुरुस्तीचे कामास प्रारंभ केला आहे. आता महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेसाठी, रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसाठी तक्रार नोंदविण्याकरिता 1800 233 0045 या टोल फ्री क्रमांक ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरी नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डयांबाबतच्या आपल्या तक्रारी कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळी या टोल फ्री क्रमांकावर नोंदवाव्यात असे आवाहन महानगरपालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

खड्डे पडणे आणि खड्डे बुजवणे याकरिता योग्य ठोस उपाययोजना राबवायला हव्यात. तात्पुरत्या स्वरूपाची किंवा काही ठराविक काळा पुरती केलेली मरमपट्टी यातून ही समस्या सुटणार नसून तेच तेच चित्र पुन्हा पुन्हा दिसत आहे. त्यामुळे शहरातील समाजिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते ठोस पावलं उचलणं जास्त महत्वाचे वाटत आहे.

3 वर्षांपूर्वी खड्ड्याची समस्या कायमची सोडवण्यासाठी प्लॅस्टिकयुक्त डांबरी रस्त्याचा यशस्वी प्रयोग गणेशवाडी येथे केला होता , चार खड्ड्यांवर हा प्रयोग केला होता , आजही तेथे खड्डा पडला नाही … पेट प्लास्टिक 160 डिग्री पर्यंत गरम करून त्यात डांबर व खडी एकत्र करून जर खड्ड्यात टाकले व त्यावर रोलर फिरविला तर 10 वर्षे तेथे खड्डा पडत नाही …

सदर कार्यक्रमाला त्यावेळचे तत्कालीन आयुक्त बोडके साहेब / शहर अभियंता / बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते … दुर्दैव पुढे यांनी काहीच केले नाही.

नितीन निकम (मा.नगरसेवक)

त्या टोल फ्रिवर call केला खड्यांची नोंद घेण्याचे आदेश देणात आले आहेत. त्यावर पुढे कोणती कार्यवाही केली जाणार ह्याबद्दल टोल फ्रिवर उपलब्ध असणा-या कर्मचा-यांनी सांगितले. अधिकारी कडोमपा पालिका हद्दीतुमच मुख्यालय किंवा प्रभाग कार्यालयात जातात की प्रावेट जेट घेवुन महापालिकेत उतरतात. नागरिकांनीच खड्डे कुठे आहेत ते सांगायचे का ? मग जो नागरिक खड्डा सांगेल त्याला अधिका-याच्या पगारातुन अर्धा पगार दिला जाईल का? हे नकली काम बंद करा आणि पहिला खड्डे भरुन काढा.

प्रथमेश सावंत (अध्यक्ष, जाणीव सामाजिक संस्था)

जो पर्यंत आधिका-यांचा व लोक प्रतिनीधी यांचा टक्केवारी बद्दलचा फाटलेला खिसा शिवला जात नाही , तो पर्यंत रस्त्यावर १००% खड्डे पडणार.

रवी केदारे (आम आदमी पार्टी)

-संतोष दिवाडकर

६ वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या मोक्कातील आरोपीला कल्याण क्राईम ब्रांचने पकडले जाळ्यात

कल्याण :- शनिवारी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये मोक्का अंतर्गत ६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी सलमान उर्फ जॅकी पपली इराणी उर्फ हुसेन वय-३१ वर्षे रा. इंदिरानगर, आंबिवली हा बर्‍याच दिवसांपासून फरार असल्याने तो मिळून येत नव्हता तसेच त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात मालमत्ता व शारीरिक विरोधाच्या गुन्हे दाखल आहेत.

या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना आरोपीची पोलीस हवालदार कामत यांनी गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती काढून त्याचा शोध घेतला असता तो खडवली परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे या ठिकाणी सापळा रचून मोठ्या शिताफीने या आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून १० हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

       या आरोपीवर महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन अंतर्गत ४, आर.के.मार्ग पो.स्टे. मध्ये ५, तर मानपाडा आणि ताडदेव पोलीस स्टेशन मध्ये प्रत्येकी १ असे एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. ताब्यात घेतलेला आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला आहे. हि कामगिरी व.पो.नि विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पो. हवा/कामत, मंगेश शिर्के, सचिन साळवी, सुरेश निकुळे, राहुल ईशी यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

केडीएमसीच्या घरोघरी जावून लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद

कल्याण : कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वतीने नागरिकांच्या घरोघरी जावून लसीकरण मोहिमेला सुरवात करण्यात आली आहे.

महापालिका क्षेत्रात ८ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत महापालिका क्षेत्रातील १८ वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांसाठी, प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रामार्फत घरोघरी जावून लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे ज्यांचे लसीकरण झाले नसेल त्यांनी त्याचप्रमाणे दिव्यांग व आजारी व्यक्तींनी देखील महानगरपालिकेच्‍या लसीकरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव अजूनही टळलेला नाही, परदेशात कोविडची तिसरी लाट आली आहे. भारतातही कोविडच्या तिस-या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे, या पार्श्वभूमीवर १८ वर्षावरील सर्व नागरिकांनी कोविशिल्ड/कोव्हॅक्सिन लस घेतली नसल्यास त्यांनी तातडीने जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून लस घ्यावी. तसेच ज्या नागरिकांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांनी ८४ दिवस पूर्ण झाल्यावर व ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला असेल त्या नागरिकांनी २८ दिवस पूर्ण झाल्यावर तातडीने दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. कोविड-१९ चे लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित आहे व त्या पासून कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही. त्यामुळे कोविड लसीचे २ डोस घेवून आपले आणि कुटूंबियांचे कोविड पासून संरक्षण करावे.

महापालिकेच्या कोविड लसीकरण मोहिमे अंतर्गत आपल्या घराजवळ ठिकठिकाणी लसीकरण सत्र चालविण्यात येत आहे. जेणे करुन प्रत्येक नागरिकाला याचा लाभ घेता येईल. लसीकरण केद्रांची माहिती दररोज फेसबुक, व्हॉटस्ॲप, इन्टाग्राम, व्टिटर तसेच महापालिकेच्या संकेत स्थळावर दररोज सायंकाळी प्रसिध्द केली जाते.

-कुणाल म्हात्रे

वर्ल्डकपच्या भारतीय संघात मुंबई इंडियन्सचे सहा खेळाडू; तर चेन्नई बेंगलोरच्या फक्त एकालाच स्थान

आयपीएल स्पर्धेचा गतविजेता संघ मुंबई इंडियन्स सध्या स्पर्धेतून बाद झाल्याने समाज माध्यमांवर मिम्सचा पाऊस विरोधी संघाच्या चाहत्यांनी सुरू केला आहे. मात्र मुंबई संघाचे फेन्स देखील त्यांच्या या टीकेला तोडीस तोड अशी उत्तरे देताना दिसत आहेत. मुंबईच्या संघाने 1552 बस पकडून घरी जावे असे मुंबईचे विरोधी फेन्स म्हणत आहेत तर आमची अर्धी टीम वर्ल्डकप साठी खेळणार आहे तेव्हा तुमच्याच खेळाडूंना आयपीएल नंतर बॅगा भरायला लावा असे उत्तर मुंबई समर्थक देत आहेत. पण नक्की काय आहे या उत्तरा मागील गमक ? ज्यामुळे चेन्नई आणि बेंगलोरच्या समर्थकांना काहीसा कमीपणा घ्यावा लागतो हे जाणून घेऊयात.

आयपीएल २०२०, आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांतील खेळाच्या परफॉर्मन्सनुसार बीसीसीआयने भारताच्या संघाची टी20 वर्ल्डकप 2021 साठी निवड केली आहे. यात 15 खेळाडूंची नावे आहेत. तसे पाहता आयपीएल संपल्यानंतर सर्व खेळाडू हे आपल्या देशासाठी एका रंगात खेळत असतात. यात कोणत्याही आयपीएल संघाचा कसलाही संबंध नसतो. मात्र सध्या आयपीएल मधून बाद झाल्या नंतर चेन्नई बेंगलोरच्या फेन्सने मुंबईसाठी ‘घरी जा’ असे मिम्स बनवल्याने मुंबईचे समर्थक त्यांना समर्पक उत्तर देताना दिसत आहेत.

आयपीएल संघा नुसार पहायचे झाले तर भारतीय संघात निवड झालेल्या 15 खेळाडूंपैकी 6 खेळाडू हे सध्याच्या मुंबई इंडियन्स संघासाठी खेळलेल्या पैकी आहेत. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, सुर्यकुमार यादव, ईशन किशन, राहुल चहर हे ते सहा खेळाडू. याउलट चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांचा प्रत्येकी एक-एकच खेळाडू वर्ल्डकप साठी निवडण्यात आला आहे. ते म्हणजे रवींद्र जडेजा आणि कर्णधार विराट कोहली. पंजाब किंग्स चे केएल राहुल, मोहम्मद शमी. दिल्ली कॅपिटल्सचा ऋषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल. कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्ती आणि सनरायजर्स हैदराबादचा भुवनेश्वर कुमार अशी आयपीएल नुसार विगतवारी करता येईल. दुर्दैव म्हणजे राजस्थान रॉयल्स ही एकच टीम अशी आहे ज्याचा एकही खेळाडू वर्ल्डकपच्या भारतीय संघात नाही.

15 ऑक्टोबरला आयपीएल संपताच 17 ऑक्टोबर पासून ओमन येथून वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. तर 24 ऑक्टोबर रोजी भारताचा संघ पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला सामना खेळताना दिसणार आहे. या दिवशी संपूर्ण आयपीएल समर्थक भारतीय संघाला समर्थन करताना दिसतील. मात्र तोपर्यंत हा मिम्स वोर असाच सुरू राहणार यात काही शंका नाही.

-संतोष दिवाडकर

क.डों.म.पा. प्रसृती रुग्णालयासमोर महिलेची तासनतास प्रतीक्षा; आरोग्य यंत्रणा कुचकामी ?

कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रसुतीगृह रुग्णालयासमोर एका गरोदर महिलेला तासनतास बसून ठेवल्याचा केविलवाणा प्रकार समोर आला आहे. यंत्रणेचे कारण देत या महिलेस इतर ठिकाणी जाण्याचे सांगितल्याने आरोग्य सुविधांचा वानवा आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे वायले नगर येथे प्रसूतिगृह आहे. या प्रसूती गृहामध्ये दूध नाका परिसरामध्ये राहणारी इरफाना शेख या महिलेला प्रसूतीसाठी आणले असता तिची प्रसूती न करताच तिला रुग्णालयाच्या बाहेरच बसून ठेवण्यात आले होते. तुमचा शुगर वाढलेला आहे आमच्याकडे डॉक्टर नाहीत, आय सी यु नाही असे थातुरमातुर कारण सांगून या गरोदर महिलेला ठाणे मुंबईला जाण्याचा अजब सल्ला रुग्णालयाकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान कोरोना काळात आधीच मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना आता आरोग्य सेवा घेताना कुचंबणा केली जात आहे. त्यामुळे महिला आरोग्य विभागात गंभीर कुचंबणा करणाऱ्या डॉक्टरांवर आणि संबंधितांवर कारवाई होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-रोशन उबाळे

पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोड्यासह बलात्कार; कल्याण लोहमार्ग पोलिसांचा तपास सुरू

कल्याण :- इगतपुरी ते कसारा दरम्यान मेल एक्सप्रेसमध्ये लुट आणि बलात्काराच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. धावत्या पुष्पक एक्सप्रेस मध्ये सात ते आठ दरोडेखोरांनी १६ प्रवाशांना लुटण्यासह एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना काल (शुक्रवारी) सायंकाळच्या सुमारास इगतपुरी ते कसारा दरम्यान घडली आहे.

कसारा रेल्वे स्थानकावर उतरून आरोपी पसार झाले मात्र याच दरम्यान दोन आरोपीना प्रवाशानी मोठ्या धाडसाने पकडलं. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत दोन जणांना अटक केली असून उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या आठ आरोपीमधील सात जण घोटी परिसरात राहतात तर एक आरोपी मुंबई येथे राहणारा आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास ही सुरक्षित राहिला नसल्याचे या घटनेवरून समोर येते आहे.

शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेने निघाली असताना आठ जण एक्स्प्रेस मध्ये चढले . एक्स्प्रेस ने इगतपुरी स्टेशन सोडताच या आठ जणांनी धाक दाखवून प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. १६ प्रवाशांना या दरोडेखोरांनी लुटले ६ जणांचे पैसे रोकड आणि १० जणांचे मोबाईल व इतर वस्तू हिसकावून घेतल्या. दरोडेखोर इथेच थांबले नाही तर त्यांनी एका प्रवाशा सोबत प्रवास करणाऱ्या त्याच्या २० वर्षीय प्रवासी पत्नीची छेड काढत तिच्यावर बलात्कार केला. तब्बल तासभर दरोडेखोरांचा हा थरार सुरू होता.

कसारा रेल्वे स्थानक येताच या दरोडेखोरांनी उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामधील सहा आरोपी निसटले मात्र याच दरम्यान काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कल्याण स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपीना अटक करण्यात आली आहे. प्रकाश पारधी व अर्षद शेख अस या आरोपींच नाव आहे. हे आठ आरोपी एकमेकांचे मित्र असून यामधील सात जण घोटी मध्ये राहतात तर एक जण मुंबई येथे राहण्यास आहे. नशेच्या अमलाखालि त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसाची पथके फरार आरोपींचा शोध घेत आहेत. विविध पथक कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे.

मध्य रेल्वे डीसीपी मनोज पाटील यांनी घटना घडल्यानंतर आम्ही घटना स्थळ न पाहता कल्याण जीआर मध्ये गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिलेची प्रकृती स्थिर आहे. आठ पैकी सात आरोपी घोटीचे राहणार आहेत. तर एक आरोपी मुंबईचा आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे मनोज पाटील (रेल्वे डीसीपी) यांनी सांगितले आहे. आमचा तपास योग्य दिशेने सुरू असून उर्वरित आरोपींच्या लवकरच मुसक्या आवळण्यात येतील. अशी माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

-रोशन उबाळे

‘या’ निमित्ताने कल्याण पूर्वेत आमदार खासदार दिसले एकत्र

कल्याण : कल्याण पूर्वेत ‘अंतर्राष्ट्रीय अग्रहरि वैश्य’ समाजाच्या वतीने महाराजा ‘श्री अग्रसेन’ यांची ५१४५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि साध्वी सरस्वती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष म्हणजे जवळपास दोन वर्षांनी खासदार शिंदे आणि आमदार गायकवाड हे एकाच मंचावर उपस्थित होते.

       यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाराजा अग्रसेन यांच्याशी संबंधित महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख करत सांगितले कि, जे महाराजा अग्रसेन यांनी ५१४५ वर्षे आधी सांगितले होते त्या गोष्टी आज देखील समाजामध्ये लागू होतात. संस्थेचे राष्ट्रीय वरिष्ठ अध्यक्ष योगेश अग्रहरी (के. एस. गुप्ता) यांनी सांगितले कि, आम्ही अग्रहरी समाजाचे लोकं महाराजा श्री अग्रसेन यांचे वंशज असून आज त्यांच्या जयंती समारोहात त्यांच्या आठवणींना उजाळा देत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काय काय करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,  आमदार गणपत गायकवाड यांच्यासह कथा वाचक साध्वी सरस्वती, शिवसेना कल्याण पूर्व संपर्क प्रमुख शरद पाटिल, अंतराष्ट्रीय अग्रहरि समाचाचे मुकेश अग्रहरि, दिनेश अग्रहरि आदींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

खडकपाडा गोदरेज हिल परिसरात युवकाची हत्या; शुल्लक कारणाची बाचाबाची ठरली जीवघेणी

कल्याण :- कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरातील गोदरेज हिल भागात क्षुल्लक कारणाने एका तरुणाची हत्या झाली आहे. तीक्ष्ण हत्याराने भोकसल्याने खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान सदर तरुण मयत झाला. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

खडक पाडा परिसरातील गोदरेज हिल भागात गुरुवारी रात्री १२ ते १ च्या सुमारास दोंघांची रस्त्यात बाचाबाची झाली. शब्दाला शब्द वाढत गेले आणि या बाचाबाचीचे परिवर्तन हाणामारीत झाले. या दरम्यान शेख खान या आरोपीने तीक्ष्ण हत्याराने वार केले. वार जिव्हारी लागल्याने खाजगी रुग्णालयात मुकेश देसाई या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शेख खान या इसमावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. खडकपाडा पोलिसांनी घटनेची माहिती घेऊन कसोशीने पुढील तपास सुरू केला आहे.

-रोशन उबाळे

ठाकुर्लीतील खंबाळपाड्यात एकाची हत्या तर दुसरा गंभीर जखमी

ठाकुर्ली :- खंबाळपाडा ९० फुटी रस्त्यावर रात्री १ च्या सुमारास रिक्षा अडवून लुटण्याचा बहाण्याने तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. यात एका इसमाचा मृत्यू झाला असून डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही हत्या कशी घडली याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू झाला आहे.

खंबाळपाडा मधील ९० फुटी रस्त्यावर काल मध्यरात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञातांनी रिक्षामधून खाली उतरवून दोन प्रवाशांना बेदम मारहाण केली. लुटीच्या इराद्याने मारहाण केली असल्याचं बबलू चव्हाण या जखमी इसमाने पोलिसांना सांगितले आहे. याचं घटनेत बेचलप्रसाद चव्हाण यांचा गळा कापून त्यांना रेल्वे ट्रॅक वर फेकले. तर जखमी बबलू चव्हाण यांनी झाडीमध्ये लपून स्वतःचा जीव वाचवला अशी माहिती त्याने दिली आहे. या हल्ल्यात तो ही गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान लुटीच्या इराद्याने एकाची हत्या झाल्याच्या माहितीने परिसरात खळबळ माजली आहे .

पंचनामा आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे डोंबिवली रेल्वे पोलीस व टिळक नगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यात आणखी कोणत्या बाजू असू शकतात का ? याचा कसोशीने शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

-रोशन उबाळे

सामाजिक क्षेत्रातील हसरा चेहरा निखळला; अरुण दिघेंच्या निधनानं कल्याण पूर्वेवर शोककळा

कल्याण :– कल्याण पूर्वेतील सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे सरचिटणीस अरुण दिघे यांचे आज हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले आहे. त्यांच्या अचानकपणे जाण्याने त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण कल्याण पूर्वेतील सामाजिक तसेच राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अरुण दिघे हे कारने आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्यांना प्रवासा दरम्यानच हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता. यानंतर त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलं. मात्र इस्पितळात त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक तसेच राजकिय क्षेत्रातील नेत्यांनी,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इस्पितळाकडे धाव घेतली. त्यांच्या निधनाच्या बातमी नंतर कल्याण पूर्वेत शोककळा पसरली आहे.

अरुण दिघे हे पूर्वापार सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. याचबरोबर ते राजकीय पक्षाचे देखील पदाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत होते. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी असंख्य गरजूंना मदत केली आहे. यासाठी अनेकदा त्यांनी पक्ष बाजूला ठेवून समाजकार्य केल्याचे देखील बोलले जाते. काही मंडळ,संस्था यांच्याशी देखील ते संलग्न होते. तर क्रीडा क्षेत्रासाठी देखील त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान लाभले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ते भारतीय जनता पार्टी असा एक त्यांचा राजकिय प्रवास. मात्र असे असतानाही पक्ष बाजूला ठेवून त्यांनी हितसंबंध जोपासले होते. कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड आणि माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. सर्वांना एकत्रित बांधून सलोख्याचे संबंध त्यांनी निर्माण केले होते. म्हणूनच इतर राजकीय पक्षांत देखील त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पक्षाची कोणतीही आंदोलने, मेळावे, कार्यक्रम यात ते हिरहिरीने पुढाकार घेत. याचबरोबर सार्वजनिक जयंती, उत्सव, शिबिरे आणि विविध उपक्रमात त्यांचा पुढाकार असे.

समर्थक आणि विरोधक या दोघांनाही हसऱ्या चेहऱ्याने उत्तर देण्याची त्यांची एक कला होती ज्यातून त्यांनी असंख्य मनांवर अधिराज्य केले होते. मात्र कल्याण पूर्वेचा हाच उमदा आणि हसरा चेहरा निखळल्याने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे असे त्यांचे निकटवर्तीय आता म्हणू लागले आहेत. अश्या या व्यक्तीमत्वास ‘एम एच मराठी’ कडून ‘भावपूर्ण श्रद्धांजली’.

-संतोष दिवाडकर