‘कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणचा’ कोकणातील आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात; भाग २

कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणने केलेली मदतीची सुरुवात आणि त्यांच्या टीमचा पहिल्या दोन दिवसांचा प्रवास तर आपण जाणून घेतलातच आता पहा पुढे नेमकं काय घडलं ? परंतु ज्यांनी पहिला भाग वाचला नाही त्यांनी पुढील लिंकवर आधी तो वाचावा. https://mhmarathi.in/?p=954

शनिवार दि.३१ जुलै… मदतकार्याचा तिसरा दिवस. खेड तालुक्यातील संजय मोरे यांच्या निवासस्थाना पासून मदतीसाठी संपूर्ण ताफा पुढील ठिकानी रवाना झाला. सुसेरी अलसुरे मोहल्ला, शिव, भोसते येथील पूरग्रस्तांच्या भेटी घेऊन त्यांना अन्नधान्य किट व इतर वस्तुंचे किट देण्यात आले. जगडुबी नदीच्या पुराने या लोकांचे प्रचंड नुकसान झाले होते. काहींची भातशेती वाहून गेली होती. रस्ते उखडले, घरे कोसळली. या सर्व भागात मदत दिल्यानंतर संपूर्ण ताफा खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागात जायला निघाला.

उपाशीपोटी अतिदुर्गम भागाकडे रवाना :- दुपारचे तीन वाजले होते. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांच्या समवेत अतिदुर्गम भागाकडे निघाले आणि प्रवास सुरु झाला. काही लोकांनी सकाळचा नाश्ता केला नव्हता. शिवाय दुपार झाली असल्याने पोटात भुकेचे कावळे ओरडू लागले होते. मदतकार्य करता करता पोटात भुकेने गोळा उठला होता. मात्र आता प्रवास सुरु झाला होता. खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या बिरमिनी गावाकडे हा ताफा निघाला होता. येथीलच मु.पो.वडगाव गावात दरड कोसळून एका दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यावेळी कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण तसेच आमदार गणपत गायकवाड यांनी नातेवाईकांची भेट घेतली. त्याचप्रमाणे मदतीचा हात पुढे केला.

मोबाईल टॉवर साठी करणार आमदार प्रयत्न :- गावखेड्यातील संपूर्ण प्रवासात मोबाईलला कसलेही नेटवर्क आढळले नाही. येथील लोक एका मोठ्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. ही बाब त्यांनी आमदार गणपत गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली. आपण मोबाईल टॉवर लावण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी यावेळी गावकऱ्यांना सांगितले. यानंतर ताफा निघाला आणि येथील एक जागृत देवस्थान देवी इवराई मानाई देवीच्या दर्शनासाठी काहीवेळ थांबला. देवदर्शन करून पुन्हा ताफा खेडकडे जिथे वास्तव्य होते त्या ठिकाणी निघाला. सायंकाळचे सहा वाजत आले होते. शनिवारचा निरंकार उपवास घडल्याने सर्वजन जेवणावर तुटून पडले.

दोन दिवसांच्या मदतकार्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्या समवेत आलेला ताफा पुन्हा कल्याणकडे निघाला. दुसऱ्या दिवशी रविवारचा जनता दरबार आणि इतर नियोजित कार्यक्रम असल्याने ते आपल्या मतदारसंघात परतण्यासाठी सर्वांचा निरोप घेऊन जाणीव संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश सावंत यांच्या समवेत निघाले. यानंतर रात्री थोडेफार जेवण करून सर्वजण झोपी गेले.

दिवस चौथा – चिपळूण :- रविवार दि. १ ऑगस्ट … मदतकार्याचा चौथा दिवस. सकाळी आवरून उर्वरित मालाच्या टेम्पोसह दोन गट करून चिपळूण येथे मदत वाटण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी निघाले. चिपळूण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याची आर्थिक राजधानीच. वाशिष्ठी नदीच्या पुरामुळे येथील पूल देखील वाहून गेला. मात्र डागडुजीनंतर आता वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. परशुराम घाटापासून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. यामुळे काही गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. १९६५ नंतर आलेल्या भयावह पुरामुळे तालुक्यातील बाजारपेठ, जवळपास असणाऱ्या वसाहती साधारण १२ फूट पाण्यात गेल्या होत्या. काही ठिकाणी नदी प्रवाह बदलल्याने पूर परिस्थिती ओढावली असल्याचे तेथील लोक सांगत होते. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणने त्या ठिकाणी जाऊन मदतीचा एक हात पुढे केला.

खेर्डी येथील दत्तवाडी, विकासवाडी, सती, समर्थ नगर, बाजारपेठ मोहल्ला वस्ती, माप, खिंड, वाणी, आळी, कलबसते अश्या ठिकाणी जाऊन जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले गेले. चिपळूण तालुक्यातील दुर्गम भागातील पोसरे गावच्या बौद्ध वाडीवर दरड कोसळून जिवीतहानी झाली होती. याही ठिकाणी अध्यक्ष मोरे यांनी सहकाऱ्यांसमवेत जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याचबरोबर जवळपास असलेल्या सापील्दी, धामणगाव, खोपिगाव, दसपटी येथील ओवाळी, धनगरवाडी, कडवड गावांना कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणने मदतीचा हात दिला. चार दिवसांच्या व चार तालुक्यातील या संपूर्ण मदतकार्यात कोकण वासीयांनी संपूर्ण कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणचे आभार मानले. कल्याणहुन आलेली ही मदत महाड,पोलादपूर,खेड आणि चिपळूण तालुक्यातील प्रत्यक्ष गरजूंनाच देण्यात आली. त्यामुळे मदत करण्यापेक्षा मदत कोणाला करीत आहोत या बाबीवर प्रतिष्ठाण भर दिल्याने मदत योग्य हातात गेली असल्याचे समाधान यावेळी व्यक्त करण्यात आले.

प्रतिष्ठाणच्या मदतीने भारावले कोकणकर:- संपुर्ण ४ दिवस मदत वाटप करीत असताना आपत्तीग्रस्त नागरिकांनी संस्थेच्या लोकांना तसेच सहभागी झालेल्या आमदारांसमोर आपल्या व्यथा मांडल्या. काही ठिकाणी मोबाईल टॉवरची मागणी असोत किंवा काही ठिकाणी एसटी थांब्याकरीता निवारा मिळण्याची अपेक्षा करण्यात आली. सरकार आमच्याकडून बस थांब्याच्या निवाऱ्याकरिता पैसे मागतात असे म्हणत तुम्ही काहीतरी प्रयत्न करावा अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. ज्याठिकाणी आजपर्यंत कोणीही मदतीसाठी पोहोचलं नव्हतं सरकार देखील इथे आलं नसेल अशा भागात तुम्ही मदत घेऊन आलात. ही आम्हाला मिळालेली पहिली मदत आहे. कारण बाकीचे लोक शहरातच मदत वाटून निघून जातात पण आमच्या दुर्गम भागात कधी कोणी आलं नव्हतं. तुमची ही मदत खरोखरच लाखमोलाची आहे. अशा शब्दांत गावकऱ्यांनी प्रतिष्ठाणचे आभार मानले. शिवाय गावकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा आणि प्रश्न यावर नक्कीच मार्ग काढला जाणार असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष संजय मोरे यांनी गावकऱ्यांना दर्शवला.

मदतकार्यात सहभागी सेवेकरी :- कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या या मदतकार्यात कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड, प्रतिष्ठाणचे संस्थापक/अध्यक्ष संजय बाबुराव मोरे, कार्याध्यक्ष रमाकांत देवळेकर, उपाध्यक्ष सुभाष म्हस्के, सचिव संदीप तांबे, उपखजिनदार अजय पवार, सल्लागार तसेच प्रसिद्धी प्रमुख शरद शिंदे, त्याचप्रमाणे दीपक गायकवाड, जाणीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश सावंत, अनिल राऊत, राहुल कासारे, योगेंद्र यादव, प्रदीप उपाध्याय, सदानंद शिंदे, संतोष परब, संतोष गुरव, रुपेश साळुंखे, मंगेश पवार, मंगेश सकपाळ, गणेश शिंदे, अविनाश शिरकर, मनीष पाटील, सचिन कुरणे, रदणेश महाडिक, अजय महाडिक, इलाखी कोनार, प्रशांत पवार, प्रितेश आचरेकर, साहिल मोरे, संतोष दिवाडकर, तिसाई ग्रुपचे अरुण दिघे, मनोज माळी, संदीप सरवणकर, अमीत धानजी, विशाल जोगदंड, अज्जू गायकवाड, नितीन शिंदे, प्रमोद माने, तुकाराम मापरी, साजीत खान, सूरज भारद्वाज, गौरव सरवणकर, रामदास तळपदे तसेच कल्याण कल्याण पूर्व व्यापारी संघटना आणि इतर सहकाऱ्यांचे प्रत्यक्ष योगदान कोकण दौऱ्यात लाभले. मदत करताना द्यावयाचे सामान व मदत देण्याचे ठिकाण आगोदर निश्चित करण्याचे आवाहन कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण यांच्या कडून इतर संस्थांना करण्यात येत आहे.

-संतोष दिवाडकर

सर्वसामान्य प्रवाशांना लोकल ट्रेनने प्रवास करू द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार – मनसेचा रेल्वेला ईशारा

सर्वसामान्य प्रवाशांना लोकल ट्रेनने प्रवास करू देण्याची मागणी मनसेने केली असून कल्याण मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांनी याबाबत मध्य रेल्वेच्या क्षेत्र अधिकारयांना, कल्याण स्टेशन अधीक्षक, लोहमार्ग पोलीस, रेल सुरक्षा बळ यांना  निवेदन दिले आहे. येत्या २ ते ३ दिवसांत सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करू न दिल्यास मनसेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

कोरोना काळात सावधगिरी म्हणून सरकार तर्फे सर्वात आधी उपनगरीय लोकल गाड्या बंद करण्यात आल्या आणि नंतर अतिआवश्यक सेवे करीता सुरु ही करण्यात आल्या. सरकारी आणि वैद्यकीय कर्मचारीच उपनगरीय गाड्यात प्रवास करू शकतात. आता सर्व काही पूर्व पदावर येत असतानाही, सामान्य प्रवाश्याना उपनगरीय गाड्यात प्रवेश नाही, म्हणजे सरकारी आणि वैद्यकीय कर्मचारीच काम करीत आहेत बाकीच्या लोकांनीं  घरी बसायचा का असा सवाल मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांनी उपस्थित केला आहे.

सामान्य जनता लाचार झाली असून आता पाणी डोक्याच्या वर जात आहे. ज्या लोकांनी एक किंवा दोन्ही लस घेतलेल्या आहेत त्यांना तरी प्रवाशाची मुभा देण्यात यावी. जर येत्या दोन तीन दिवसात सामान्य प्रवाश्याचा विचार नाही केला गेला तर, मनसे तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्व जवाबदारी रेल्वेची असेल असा इशारा भोईर यांनी दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

महानगरपालिकेच्या शाळेतील मुले बनवताहेत उपग्रह; आयुक्तांनी केला विद्यार्थ्यांचा गौरव

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेतील मुले उपग्रह बनवितात ही एक मोठी व अभिमानास्पद गोष्ट आहे, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्यांचे गौरव करताना काढले आहे. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन आणि स्पेस झोन इंडिया आयोजित ‘स्पेस रिचर्स पेलोड क्यूब्ज चॅलेंज 2021’ साठी महापालिकेच्या शाळातून 10 विदयार्थ्यांनी उपग्रह बनविण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला. या मुलांना आज प्रशस्तीपत्र देवून गौरवितांना पालिका आयुक्तांनी हे उद्गार काढले.

मुलांनी अभ्यासाबरोबरच क्रिडा क्षेत्रातही नैपुण्य मिळवावे व पुढील आयुष्यात प्रगती करावी, अशा भरभरुन शुभेच्छा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी उपस्थित विदयार्थ्यांना दिल्या. महापालिका शाळातून विदयार्थ्यांना यापुढेही कुठल्याही उपक्रमात सहभाग घ्यावयाचा झाल्यास निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यावेळी दिले.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, रामेश्वरम, तामिळनाडू आणि स्पेस झोन इंडिया आयोजित स्पेस रिचर्स पेलोड क्यूब्ज चॅलेंज 2021 साठी सदर फाऊंडेशनचे सचिव मिलींद चौधरी यांनी मार्टिन ग्रुप या संस्थेमार्फत महापालिकेच्या महात्मा फुले प्राथमिक विदयालय,शाळा क्र.68, बारावे, बंदे अली खाँ महापालिका शाळा क्र. 99/12, उर्दू बल्याणी, तिसाई प्राथमिक विदयालय, तिसगाव, मनपा शाळा क्र. 18,  मनपा शाळा क्र. 12, उंबर्डे, प्रबोधनकार ठाकरे मनपा शाळा क्र.19 नेतीवली या शाळातून 10 विदयार्थ्यांना उपग्रह बनविण्याचा मोहिमेत सहभागी करुन घेतले.

डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत विदयार्थ्यांना उपग्रह बनविणेबाबत संस्थेमार्फत ऑनलाईन मार्गदर्शन कण्यात आले होते. आणि दि. 19 जानेवारी, 2021 रोजी जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविदयालय, हडपसर, पुणे यांचेमार्फत उपग्रह बनविण्याची कार्यशाळादेखील आयोजित करण्यात आली होती. दि. 07 फेब्रुवारी 2021 रोजी रामेश्वरम तामिळनाडू येथून 100 उपग्रह हेलियम बलूनद्वारे एकाच वेळी अवकाशात सोडण्याचा विश्वविक्रम करण्यात आला.

हे उपग्रह एका केसमध्ये फिट केलेले असून त्यासमवेत पॅराशुट, जीपीएस ट्रकिंग सिस्टिम लाईव्ह कॅमेरा जोडलेला आहे, त्यामुळे प्रत्यक्ष ओझोन, कार्बन डायऑक्साईड, हवेची शुध्दता, हवेतील प्रदुषण, हवेचा दाब आणि माहिती या उपग्रहामार्फत पृथ्वीवरील केंद्राना पाठवता येईल. या पेलोड सोबत काही झाडांच्या बिया सुध्दा पाठविल्या आहेत. यामुळे कृषी विभागास अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत मिळेल. अशाप्रकारे शालेय विदयार्थ्यांना उपग्रह बनविण्याचा उपक्रमामध्ये सहभागी करुन घेतल्यामुळे विदयार्थ्यांमध्ये स्पेस संबंधित संशोधनाची आवड निर्माण होवून भविष्यात त्यांना करियर बनवितांना नक्की उपयुक्त ठरेल. या गौरव सोहळयासमयी उपआयुक्त शिक्षण अनंत कदम, प्रशासन अधिकारी जे.जे. तडवी, शिक्षण विस्तार अधिकारी विजय सरकटे व संबंधित शाळांतील शिक्षक वर्ग विदयार्थ्यांसमवेत उपस्थित होता.

-संतोष दिवाडकर

प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षा चालकाला १६ तासांत अटक; KDMC च्या सीसीटीव्हीमुळे लागला शोध

प्रवाशाला लुबाडणाऱ्या रिक्षा चालकाला खडकपाडा पोलिसांनी अवघ्या १६ तासात बेड्या ठोकल्या आहेत. केडीएमसीच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातील सीसीटीव्हीत ही रिक्षा कैद झाली आहे. रिक्षाच्या हूडचा  रंग युनिक असल्याने पोलिसांनी १६ तासाच्या आत प्रवाशाला लुटणाऱ्या रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदारास बेडय़ा ठोकल्या आहेत. अजय कांबळे असे रिक्षा चालकाचं नाव असून रशीद शेख असं त्याच्या साथीदाराचं नाव आहे. हे दोघे कल्याण पूर्व भागातील पत्रिपुल श्रीकृष्ण नगर परिसरात राहणारे आहेत.

आकाश जैयस्वाल याने काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील निक्कीनगर  चौकातून कल्याण स्टेशनला जाण्यासाठी रिक्षा पकडली. या रिक्षात आधीच एक प्रवासी बसला होता. रिक्षा थोडय़ा अंतरावर गेली तेव्हा रिक्षा चालकाने रिक्षा रस्त्याच्या एका बाजूला निजर्न स्थळी घेऊन गेला. आकाश जवळली महागडा मोबाईल आणि रोकड घेऊन रिक्षा चालक आणि सह प्रवासी पसार झाले. मात्र कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लावण्यात आलेल्या सीटीटीव्हीत ही रिक्षा कैद झाली होती. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी पोलिसांनी अवघ्या १६ तासात रिक्षाचालकासह त्याचा साथीदाराला गजाआड केलं असल्याची माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे व.पो.नि. अशोक पवार यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

कल्याण पूर्व नांदीवलीत वाहन पासिंग मध्ये भ्रष्टाचार ? उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे होतेय चौकशीची मागणी

वाहन पासिंग मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची तृतीय पक्षा मार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्र कल्याण पार्टीने केली असून याबाबत पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी यांच्या शिष्टमंडळाने कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांची भेट घेत निवेदन सादर केले आहे. यावेळी महासचिव राहुल काटकर, पवन दुबे, प्रविण के. सी., राज द्विवेदी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण पूर्वेतील नंदिवाली तलाव येथे कल्याण व ठाणे आरटीओ मधील गाड्यांचे पासिंग करण्यात येते. या ठिकाणी  आरटीओ अधिकारी, दलाल व काही स्थानिक मिळून वाहन पासिंग करताना वाहन चालक, मालक यांची लुट व फसवणूक करत आहेत. या ठिकाणी वाहन पासिंग करताना लाखों रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. शनिवार व रविवार या दिवशी काही विशेष दलालांच्या गाड्यांचे पासिंग करण्यात येत आहे. आरटीओ नियमानुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी वाहन पासिंग करण्यात यावे. तसेच प्रत्येक अधिकारी जास्तीत जास्त ४० वाहन पासिंग करु शकतात.

काही दलाल गाडी पासिंग करण्यासाठी ऑनलाइन मध्ये देण्यात आलेल्या तारखेला वाहन पासिंग न करता शनिवार व रविवार या दिवशी वाहन पासिंग करतात. वाहन पासिंग साठी आरटीओ नियमानुसार गाडी मध्ये काही त्रुटी असताना व आवश्यक कागद पत्र नसताना देखील अधिकारी व दलाल आर्थिक संगणमत करुन वाहन पासिंगकरत आहेत. तसेच वाहन पासिंग साठी बुक मध्ये लेखा जोखा देखील करत नाहीत. पासिंग साठी आलेल्या वाहन चालक मालक यांच्या कडुन अनधिकृत पणे पार्किंग साठी १०० रुपये घेतले जात आहेत. पार्किंगची पावती (बनावट पावती) असल्या शिवाय अधिकारी गाडी पासिंग करत नाहीत.

पासिंग साठी आलेल्या वाहन चालक मालक यांच्याकडुन अनधिकृत पणे गाडी सॅनिटायझर करण्यासाठी म्हणून जबरदस्ती १०० रुपये घेतले जात आहेत. सॅनिटायझर केल्याशिवाय अधिकारी गाडी पासिंग करत नाहीत. पासिंगसाठी आलेल्या वाहन चालक मालक यांना गाडीला विशेष व्यक्ती कडुन गाडीला रेडीयम लावण्यासाठी सक्ती अधिकारी यांच्या कडुन करण्यात येत आहे. हे सर्व भ्रष्टाचाराचे प्रकार असून यामुळे  नागरिकांची मोठी लुट होत असल्याचा आरोप राष्ट्र कल्याण पार्टीने केला आहे.

या सर्व मुद्दयांवर ७ दिवसात तृतीय पक्षा मार्फत चौकशी करुन चालु असलेला भ्रष्टाचार त्वरित थांबवून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.अन्यथा राष्ट्र कल्याण पार्टी तर्फे आरटीओ कार्यालयामध्ये तिव्र आंदोलन करण्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर नांदिवली येथील भ्रष्टाचार करणाऱ्या बऱ्याच अधिकारी, दलाल व सामील असलेल्या काही स्थानिकांच्या व्हडीओ ऑडिओ क्लिप्स देखील असल्याचे बोलले जात आहे.

-कुणाल म्हात्रे

‘कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण’चा कोकणातील आपत्ती ग्रस्तांना मदतीचा हात; भाग १

‘कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण’ कडून कोकणात आलेल्या पुरातील नुकसानग्रस्त लोकांना मदतीचा हात पुढे करण्यात आला होता. मंडळातील लोकांनी मदत गोळा करून जवळपास ३५ टन जीवनावश्यक साहित्य कोकणातील गरजूंना वाटप केले. साहित्य गोळा करण्यापासून वाटप करून परतण्या पर्यंतचा एक धावता प्रवास सर्वांना माहीत व्हावा या दृष्टीने लिहलेला हा लेख.

कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण’ची स्थापना :- ‘कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण – कल्याण,महाराष्ट्र’ मागील अनेक वर्षांपासून कल्याण शहरात कार्यरत आहेत. स्वतःचे जीवन घडवण्यासाठी कोकणातून शहरात आलेल्या लोकांनी एकत्र येऊन या प्रतिष्ठाणची स्थापना केली. राजकारणाला थोडंस लांब ढकलून गावच्या मातीचा आभास शहरात व्हावा यासाठी कोकणातील मातीशी नाळ असलेल्या कल्याण शहरातील कोकणकरांना समाजसेवक संजय बाबुराव मोरे यांनी एकत्र करून या संस्थेची स्थापना केली. आणि कल्याण मध्ये भव्य दिव्य असा कोकण महोत्सव सुरू झाला. कोकणातील संस्कृतीचे दर्शन कोकणात न जाता कल्याणकरांना घडू लागले. कोकणातील जीवनपद्धती, कोकणातील आहार, एकंदरीत हापूस आंबा सोडला तर सर्वच गोष्टी या महोत्सवात मिळत कारण साधारण जानेवारी महिन्यात हा महोत्सव होत असे जेव्हा हापूस झाडावर बहरायचा कालावधी सुरू असतो.

कोकणात जाण्याचा आखला बेत :- मागील दोन वर्षात कोरोनाने थैमान घातल्याने कोकण महोत्सव होऊ शकला नाही. त्यामुळे कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणचे पदाधिकारी व कार्यकर्ते काही काळासाठी विखुरले गेले होते. २१ व २२ जुलैच्या पावसाने कोकणाला झोडपून काढले. नदी ओढे ओसंडून वाहू लागले. दरडी कोसळल्या, पुरात लोकांची घर बुडाली तर दरडीत कुटुंबच्या कुटुंब मातीत गाडली गेली. कोकणावर आस्मानी संकट कोसळलेले. अशा परिस्थितीत महाराष्ट्र भरातून कोकणात मदतीचा हात पुढे केला गेला. आणि कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण देखील आपल्या गावाच्या मदतीसाठी सज्ज झाली. फोन फिरले… संस्थेचे सर्व पदाधिकारी गोळा झाले… मीटिंग झाल्या आणि पुढच्या कामाची आखणी कागदावर झाली.

प्रतिष्ठाणच्या सभासदांनी तसेच पदाधिकार्यांनी मदतीसाठी आवाहन केले. शक्य तितकी मदत लोक करू लागले. काहींनी धान्य दिले, काहींनी इतर जीवनावश्यक वस्तू सुपूर्द केल्या. वस्तू जमा झाल्या खरे पण आता त्या नेमक्या कुठे वाटप करायचा याबाबत महत्त्वाचा विचार करण्यात आला. कारण कोकणात महाराष्ट्र भरातून मदत होत होती. आणि जिथे नुकसान झालं नाही अश्या लोकांची देखील घरं सामानांनी भरली होती. वर्षभर बसून खातील इतके समान एका एका घरात साठले होते. बाहेरून आलेला ट्रक शहरातच कुठेतरी जवळपास थांबून येईल त्याला सामान देऊन निघून जात होते. त्यामुळे कोकणात ज्याचे काही नुकसान झाले नाही त्यांचे मोठे फावले होते.

कमिटीचे व्यवस्थापन :- ही बाब कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या निदर्शनास आली होती. म्हणून संस्थेने मदत कुणाला करायची याचा एक सर्वे केला. कोणत्या भागात नुकसान झालंय त्या गावातील लोकांची यादी बनवली गेली व यासाठी प्रत्यक्ष कोकणात संपर्क साधला गेला. दुसरीकडे मदतीचे सामान देखील जमा होत होते. मंडळातील पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी शक्य तितकी मदत केली. जाणीव सामाजिक संस्था, कल्याण पूर्व मधील व्यापारी संघटना अशा अनेक मंडळ व संस्थांनी मदतीचा हातभार लावला. उद्योजकांनी देखील आर्थिक मदत केली. कल्याणच्या आमदारांनी देखील मदत वाटपासाठी आर्थिक मदत संस्थेला दिली. यानंतर पुढील धोरण आखून मदतीचे दिवस आणि ठिकाण तसेच इतर गोष्टींचं व्यवस्थापन करण्यात आले.

प्रवासाची पहिली रात्र :- गुरुवार दि.२९ जुलै रोजी सकाळ पासूनच ट्रक मध्ये सामान भरायला सुरुवात झाली. साधारणपणे ३५ टन च्या आसपास माल असल्याने सर्व ट्रक भरण्यास संध्याकाळ झाली. कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी ट्रकचे पूजन करून सर्व गाड्यांना मार्गस्थ केले. सामानांचे मोठे ट्रक, केटरर्सची पिकअप सह पाच सहा गाड्यांच्या ताफ्यात जवळपास २५-३० लोकांची टीम सायंकाळी कोकणाकडे रवाना झाली. इतक्या लोकांचा ताफा असल्याने अडीअडचणी येणे देखील स्वाभाविक होते. इतक्या लोकांच्या जेवणाची जबाबदारी प्रितेश आचरेकर यांच्या केटरर्स टीम वर सोपवली होती. मात्र नागोठणे जवळच त्यांची पीकअप बंद पडली आणि वेळ व्यवस्थापण साधून त्यांनी तिथेच एका गेरेजच्या वर्कशॉप बाहेर जेवण बनवले. गरमागरम पुलावभात आणि लॉन्च पापड खाऊन तृप्त झालेली माणसं पुन्हा गाडीत बसून कोकणाकडे निघाली. जेवण होई पर्यंत आचरेकर यांची केटरर्सची व्हेन देखील गेरेजमधून रिपयेर होऊन आली होती.

कोकणातील महाड येथील उतेकर यांच्या गावातील बंगल्यावर पहिली रात्र जाणार होती. पण तिथे पोहोचे पर्यन्त पहाटेचे साडे चार वाजले होते. कारण रात्रीची वेळ असल्याने ताफ्यातील गाड्या मागे पुढे राहत होत्या. टेम्पो वाल्यांना आणायला पुन्हा मागे जावे लागत होते. असे करत करत ताफा महाड येथील उतेकर यांच्या बंगल्यावर पोहोचला. लाईट नसल्याने जनरेटर सुरू झाला. आणि पाच वाजता सर्वजण मिळेल त्या जागेत झोपी गेले. जनरेटरच्या आवाजाने झोप घेणे सोपे नव्हते. तरीही काही तासांची झोप घेऊन सकाळी सर्वांनी आवरले. चहा पोह्यांचा नाश्ता झाला. बाहेर पावसाने हजेरी लावली होती.

आमदार गणपत गायकवाड झाले पथकात सामील :- सकाळी उशिराच्या दरम्यान कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड आपल्या काही सहकाऱ्यांसमवेत महाड येथे येत कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणला जॉईन झाले. दरम्यान स्थानिक आमदार भरत गोगावले हे देखील भेटीसाठी आले होते. त्यांच्या भेटीनंतर मदतकार्यासाठी प्रतिष्ठाणची टीम रवाना झाली. महाडमधील खरवळी, ब्राह्मण आळी नवले, भोई, असनपोई, आकले बौद्धवाडी येथील सावित्री व काळ नदीच्या पुराने बधितांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. या सर्व भागात मदत पोहोचल्यानंतर पुन्हा संपूर्ण ताफा उतेकर यांच्या बंगल्यावर परतला. यानंतर जेवण करण्यात आले आणि दुपारच्या दरम्यान एक टीम कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांच्या समवेत तळई दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेली. यावेळी आमदारांनी संस्थे समवेत मातीखाली गेलेल्या गावाला भेट दिली तसेच मृतकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचबरोबर बचावलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेत त्यांना मदतीचा हात पुढे केला. यानंतर सायंकाळी संपूर्ण टीम खेड तालुक्याकडे निघाली.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी खेड तालुक्यातील संजय बाबुराव मोरे यांच्या निवासस्थानी संपूर्ण टीम रवाना झाली. आधल्या दिवशी व्यवस्थित झोप न झाल्याने तसेच दिवसभरातील धावपळीत २४ तासांचा शीण इथे घालवण्यात आला. व त्यानंतर रात्री व्यवस्थितपणे झोप झाली. दुसऱ्या दिवशी कशा पद्धतीने मदतवाटप झाले आणि कोणत्या अडचणींचा सामना झाला यासाठी वाचा MH मराठीचा उद्याचा लेख. धन्यवाद !!!

-संतोष दिवाडकर

बाजारात पिशवी कापून चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या दोन महिलांना केली अटक; टिटवाळा पोलिसांची कामगिरी

टिटवाळा बाजारपेठेत एक महिला खरेदीसाठी गेली असता या महिलेची पिशवी तिच्या नकळत कापून दोन तोळे सोने लंपास करण्यात आले होते. ही बाब लक्षात येताच या महिलेने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार दाखल होताच कसून तपास केला आणि २४ तासांच्या आतच चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक केली.

कल्याण तालुका पोलीस स्टेशन हद्दीत टिटवाळा बाजारपेठेत सोमवारी पार्वतीबाई बोराडे वय ५० वर्षे रा. टिटवाळा या महिला बाजारपेठेत खरेदी करण्याकरिता गेल्या असता त्यांच्या हातातील पिशवी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कापून पिशवीत ठेवलेले ५२ हजार रुपये किमतीचा सुमारे २ तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज लंपास केला. ही बाब महिलेच्या लक्षात आल्यानंतर महिलेच्या फिर्यादीवरून टिटवाळा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.

       या गुन्ह्यातील आरोपींचा कल्याण तालुका पोलिस स्टेशन  पोलिस उप निरीक्षक सुर्वे, पोलिस उप निरीक्षक काजोल यादव, पोलिस कर्मचारी तुषार पाटील, दर्शन सावळे, नितीन विशे, योगेश वाघेरे यांनी शिताफीने शोध घेवून सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या  गुन्ह्यातील दोन महिला आरोपी ज्योती अनिल धोत्रे वय २७  वर्ष राहणार आंबिवली आणि पिंकी मनोज साळुंके वय ३५ वर्ष राहणार आंबिवली यांना २४ तासांच्या आत ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असता आरोपी महिला यांना अटक करून पुढील कार्यवाही करत आहेत.

बाजारात खरेदी करण्यासाठी महिलांची झुंबड उडालेली असते. अशावेळी गर्दीचा फायदा घेऊन हातातली पिशवी धारदार शस्त्राच्या मदतीने नकळतपणे कापून त्यातील किमती माल गायब केला जातो. यात कोणाची पिशवी कापायची यावर अगोदरच पाळत ठेवली जाते. त्याच्या पिशवीत काय असेल ? याचा अंदाज घेतला जातो. आणि त्यानंतर आखो आखो मे इशारा करीत गर्दीमध्ये पिशवी कापून चोरटे रफू चक्कर होऊन जातात. आशा प्रकारणात अनेक महिला पोलिसांत तक्रार देणे टाळत असल्याने अशा चोरट्यांचा चांगलाच जम बसतो. या घटना शहरी भागात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे गर्दीत खरेदी करताना आपल्या किंमती ऐवजाकडे विशेष लक्ष देण्याची आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

-कुणाल म्हात्रे

कोकणातील तळीये भूस्खलन आणि मनसे आमदाराच्या ११ लाखांच्या मदतीने भारावले गावकरी

कोकणातील महाड तालुक्यातील तळीये गावात दोन आठवड्यांपूर्वी डोंगरावरील जमीन सरकून वाहून गेली. या भूस्खलनात जवळपास ८४ लोकांचा मृत्यू झाला. मनसे आमदार राजू पाटील यांनी नुकतीच या ठिकाणी जाऊन भेट दिली तसेच मृतकांच्या कुटुंबियांना ११ लाखांची मदत देखील केली आहे.

मागील दोन आठवड्यापूर्वी मुंबई,पुणे,कोल्हापूर सह कोकणात देखील अतिवृष्टीमुळे हाहाकार पसरला होता. अनेक ठिकणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कोकणात दुर्गम भागात दरडी कोसळल्या तसेच भूस्खलन देखील झाले. यातीलच महाड तालुक्यातील तळीये गावात देखील घडलं. संपूर्ण गावच्या गाव उध्वस्त झाले. कुटुंब मातीखाली गेली. कोसळलेला नुसता डोंगरच नव्हता तर दुःखाचा डोंगर होता. या घटनेनंतर शक्य तितके मृतदेह बाहेर काढण्यात आले. आता अनेक लोक रोज या ठिकाणी येऊन भेटी देत आहेत. सरकार कडून देखील मदत केली जाणार असल्याचे आश्वसित करण्यात आले आहे.

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी कोकण दौऱ्यावर असताना या गावात भेट दिली. त्याचप्रमाणे मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखाचे सांत्वन केले. आणि पक्षाकडून ११ लाख रुपयांचा धनादेश त्यांनी दुखवटा म्हणून मृतकांच्या कुटुंबियांसाठी गावच्या सरपंचांकडे सुपूर्द केला. मनसेच्या आमदाराने केलेल्या इतक्या मोठ्या मदतीने तेथील लोक भारावले. दिलेल्या मदतीने गेलेला माणूस परत येत नसला तरी अश्या वेळी केलेल्या मदती बद्दल तेथील लोकांनी मनसे आमदारांचे आभार मानले. त्यामुळे सरकार कडून मदत येण्या पूर्वीच मनसेच्या आमदाराने केलेली मदत कुटुंबियांना थोडाफार पाठबळ देईल. तसे पाहता कितीही मोठी मदत दिली तरी दुःखाच्या डोंगरापुढे ती मातीच्या एका कना एवढीच आहे हे मात्र खरं.

लोकांचे संसार वाहून गेलेले आज स्वत: डोळ्यांनी पाहीले. ‘घर असावं घरासारखं’ म्हणायला ना तर घर शिल्लक आहे… न घरातली माणसं. नुसतं मृतात्म्यांना श्रध्दांजली वाहून दु:ख भरून येणार नाही, ह्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. पण तरीही एक फुंकर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ११ लाख रूपये दुखवटा म्हणून तळीये गावचे सरपंच ह्यांच्याकडे सुपूर्द केला. कधीही न भरून येणारं अपरिमित नुकसान झालंय ह्या महापूरात. आज मनसेतर्फे केलेली ही मदत शेवटची नसणार एवढीच ग्वाही जाहीर देतो. पूरग्रस्तहो, तुमच्या दु:खात मी सहभागी होतो, आहे आणि कायम राहीन. आज माझ्यासोबत दौऱ्यावर आलेले सगळे मनसे पदाधिकारी आणि मनसैनिक ह्यांचा मला सार्थ अभिमान आहे.

– राजू पाटील (आमदार,मनसे)

-संतोष दिवाडकर

कल्याण पूर्वेतील पूरग्रस्त भागांचे पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची शिवसेनेची मागणी

मागील माही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्व महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून सर्व पूरग्रस्त विभागातील नागरिकांना आर्थिक व सर्वोतोपरी मदत देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत कल्याण पूर्व शिवसेना सहसंपर्क प्रमुखांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

१७ ते २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्व मधील खडेगोळवली, वालधुनी, अशोक नगर, शिवाजी नगर, नेहरू नगर, आनंदवाडी, साई नगर, कैलास नगर या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या चाळी मध्ये पाणी भरले होते. त्यामुळे नागरिकांच्या घरातील बहुतांश सामान अन्न धान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होऊन नागरिकांचे अतोनात नुकसान होऊन नागरिकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत.  या विभागातील राहणारे सर्व नागरिक हे गरीब व मध्यमवर्गीय असून मोल- मजुरी व नोकरी धंदा करणारे असून या कोरोना च्या काळामध्ये अनेक नागरिक बेरोजगार आहेत. त्या मध्ये आलेल्या या नेसर्गिक आपत्ती मुळे त्यांची पूर्ण वाताहत झाली आहे.

या सर्व नागरिकांना कोणताही आधार नसल्यामुळे या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून या पूर ग्रस्तांना सर्वतोपरी मदत करून आधार देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत कल्याण पूर्व शिवसेना सहसंपर्क प्रमुख यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

-कुणाल म्हात्रे

सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास करणाऱ्या सिद्धार्थ गणाईचे कल्याण मध्ये आगमन

सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास “एक झाड माणुसकीचं, एक पाऊल परिवर्तनाचं” ही मोहीम घेऊन निघालेल्या सिद्धार्थ गणाईचे आज कल्याणामध्ये आगमन झाले असून त्याच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कल्याणनजीक असलेल्या बापगावच्या  सरपंचांच्या हस्ते या मोगली सफर चा सत्कार करण्यात आला.

या धाडसी प्रवासच कौतुक करत ह्या तरुण वयात ही जाणीव घेऊन एक पाऊल उचलण खूप मोठी गोष्ट असून सिद्धार्थ ने जे काम हाती घेतले आहे त्या कामाला आमचा पाठींबा असल्याचे सरपंचांनी सांगितले. तसेच याठिकाणी गणाई परिवारातील ज्योती निकाळजे व तमाम सदस्य आणी विद्यार्थी भारती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यादेखील उपस्थित होत्या.

     एक 22 वर्षीय पछाडलेला तरुण त्याच्या स्वप्नांना साकार करत एक सामाजिक जाणिव घेऊन रायगडच्या पायथ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून हिमालयाच्या दिशेने चालत निघाला आहे. निसर्गाची होत चाललेली कत्तल आणि निसर्गाचा कोप ही परिस्थिती मानवी जीवनावर येण्याचं मूळ कारण आपणच आहोत. आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणारे पण आपणच आहोत. यासाठी मी एक हा छोटा प्रयत्न करत आहे. आपण सगळे माझ्या सोबत आहात हीच माझी ताकद आहे. असे सिद्धार्थ गणाई यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे