आजोबांच्या तरुणपणातला फोटो लागला हाती

आरसा हा आपला वर्तमान दाखवतो. पण आपला भूतकाळ जिवंत ठेवतो तो म्हणजे कॅमेरा. तो आता तर ज्याच्या त्याच्या हातातल्या मोबाईल फोनमध्ये आलेला आहे. पण पूर्वीच्या काळी कॅमेरा देखील फार दुर्मिळ असे. आज माझ्या वडिलांनी मला एक जुना फोटो दाखवला. जुन्या काळात जशी तैलचित्रे असायची तसा तो फोटो होता. कुणाचा फोटो होता हे अगोदर समजलेच नाही. अंदाजे 25 ते 30 वर्षांच्या तरुणाचा तो एक रुबाबदार फोटो पाहत असतानाच वडील म्हणाले की हा तुझा आजोबांचा फोटो आहे.

फोटो पाहून विश्वासच बसेना. कारण मी माझ्या आजोबांना लहानपणी पाहिले होते. 2000 साली ते देवाघरी गेले जेव्हा माझे वय 6 वर्षे होते. त्यानंतर एका फोटोमध्येच मी त्यांना पाहत होतो. जो त्यांचा अंदाजे 60 ते 65 वयाचा फोटो असेल. यावरून कल्पनाच करू शकणार नाही की ही फोटोतली तरुण व्यक्ती माझे आजोबा असतील. आखीव रेखीव भुवया आणि भेदक अशी त्यांची नजर होती. कायम वजनात राहायचं आणि रुबाबात जगायचं ही त्यांची स्वभावशैलीच होती. गावखेड्यात आता 21 व्या शतकात बदल होऊ लागले आहेत. त्यापूर्वी शहरी भाग म्हणजे जणू परराज्यात जाण्यासारखे होते. दिवसभराचा अपूर्ण प्रवास आणि कुठेतरी मुक्काम असे काही त्याकाळी (50 वर्षांपूर्वी) असायचे.

ऐन तारुण्यात आजोबांनी गावी राहून फोटो कसा काढला? असा प्रश्न माझ्या मनात आला. फोटो मध्ये सूट घातलेला व्यक्ती गावाला कसा असू शकतो हाही प्रश्न आला? त्यानंतर वडिलांकडून समजले की माझे आजोबा हे तरुणपणातच मुंबईत आले होते. साधारणपणे तो काळ असावा अंदाजे 1960 ते 1965 च्या दरम्यानचा. मुंबईत आल्यानंतर त्यांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची देखील संधी मिळाली होती. परंतु शहरापेक्षा गाव बरा असे त्यांना वाटले असावे किंवा कौटुंबिक जबाबदारी, अशा कोणत्यातरी कारणाने त्यांनी मुंबईतील वास्तव्य सोडून पुन्हा ते गावात आले. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात असलेल्या एका छोट्याशा खेडयात त्यांना राहणे जास्त सुकर वाटले. पुढे त्यांनी कायमस्वरूपी शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. दोन मुलं आणि तीन मुली असा त्यांचा प्रपंच होता. पत्नी पार्वताबाई यांच्या सोबत त्यांचा शिस्तीचा पण सुखाचा संसार झाला. पाठीवर एक भाऊ आणि दोन बहिणी तुकाराम, अंजुबाई आणि पप्पूबाई.

पप्पूबाई ही त्यांची बहीण कडक स्वभावाची होती. पुढे त्यांचाही विवाह झाला. मुळशी तालुक्यातील मौजे उरावडे गावात कांजणे घराण्यात त्यांना देण्यात आले. तर अंजुबाई यांनाही मुळशी तालुक्यातील मौजे आंबवणे गावात भावेकरांची सून म्हणून पाठविले. पुढे लहान भावाचा विवाह झाला. आणि धोंडिबा बाबांनी घराची वाटणी करून आपल्या संसाराचा गाडा हाकायला सुरुवात केली. त्यांची पाच अपत्ये असून माझे वडील नारायणराव हे थोरले सुपुत्र. यानंतर राजेंद्रराव, नंदाबाई, मंदाबाई, कुंदाबाई ही माझ्या वडिलांनी भावंडे.

मुंबईत वास्तव्यास असताना त्यांनी एका फोटो स्टुडिओमध्ये जाऊन स्वतःचा एक फोटो काढला होता. तो फोटो खरंतर ब्लॅक अँड व्हाईट होता. पण गावी येताना ते हा फोटो घेऊन आले होते. त्याकाळी स्वतःचा फोटो असणे ही खूप मोठी गोष्ट होती. गावात आल्यानंतर संपूर्ण गावाला त्यांनी तो फोटो दाखवला. फोटो पाहण्यासाठी गावकरी म्हणजेच त्यांचे सवंगडी घरीही येत होते. अनेक वर्षे होत गेली. धोंडीबारावांचं वय वाढू लागले. मुले मोठी होत गेली. थोरला मुलगा म्हणजे माझे वडील नारायणराव अंदाजे 12-13 वर्षांचे असतानाच त्यांना दमदाटी करन त्यांचे भाचे सुरेशराव भावेकर यांच्यासोबत मुंबईला नोकरीस पाठवून दिले. तो काळ होता 1962 चा. (वडिलांचा प्रवास नंतर लिहून प्रकाशित केला जाईल).

माझे वडील मुंबईत नोकरीस आल्यानंतर ते अजूनही मुंबईतच आहेत. गावाशी नाळ जोडली असल्याने बालपण गावी गेले असल्याने ते अधूनमधून गावी जातातच. तेव्हाही गावी गेले असताना आजोबांच्या जुन्या सामानात त्यांना आजोबांचा हा फोटो सापडला. त्यांनी तो फोटो मुंबईत आणून बदललेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये रंग भरले. आणि फ्रेम करून गावाला पाठवून दिली. पण फ्रेम फुटल्यानंतर फोटो व्यवस्थितपणे ठेऊन देण्यात आला. आता पुन्हा तो फोटो त्यांना मिळाला आणि त्यांनी तो मला दाखवला. म्हणून हा फोटो आणि फोटोमागची जेवढी समजली तितकी कहाणी सर्वांना समजावी यासाठी हा माझा बऱ्याच दिवसनांतर आलेला स्पेशल लेख.

धन्यवाद !!!

  • संतोष नारायण दिवाडकर (पत्रकार 8767948054)

सूचना : ज्यांनी कुणी हा लेख वाचला असेल ते जर मला ओळखत नसतील तर त्यांनी कृपया मला व्हॉट्सअप वर आपल्याला काय वाटलं ते कळवावे. आणि आणखीन काही जुन्या गोष्टी शेअर कराव्यात. अगदी निःसंकोचपणे बिनधास्तपणे सांगा.

About Author