विठ्ठलवाडी : गणेशोत्सवा निमित्ताने कोकणात जाण्यासाठी हजारो एसटी बसेस मुंबई तसेच राज्यभरातून मार्गस्थ करण्यात येत आहेत. मात्र त्याचबरोबर राज्यातील इतर ठिकाणी जाणाऱ्या काही एसटी बसेस रुद्ध होत असल्याने त्या भागातील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून एसटी महामंडळावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
विठ्ठलवाडी एसटी आगारातून शेकडो एसटी बसेस कोकणात रवाना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांमार्फत देखील शेकडो एसटी गाड्या मार्गस्थ केल्या गेल्या. मात्र सोमवार दि.१८ सप्टेंबर रोजी सुटणारी विठ्ठलवाडी गोंदवले ही एसटी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर रुद्ध झाल्याची माहिती विठ्ठलवाडी एसटी आगाराकडून प्रवाशांना देण्यात आली. तिकिटासाठी भरलेले पैसे परत मिळतील असे सांगण्यात आले असले तरी फक्त पैसे महत्त्वाचे नसून आमची मोठी गैरसोय झाली असल्याचा संताप प्रवासी व्यक्त करीत आहेत.
गणेशोत्सवा निमित्ताने कोकणात जाण्यासाठी जादा एसटी गाड्या सोडण्यासाठी नियमीत सुटणाऱ्या व रिजर्वेशन असलेल्या बसेस रुद्ध करणे किती योग्य आहे ? असा सवाल प्रवाशांमार्फत विचारला जात आहे. विठ्ठलवाडी एसटी आगारातून अगदी जेमतेमच गाड्या पुणे सातारा मार्गावर धावतात. त्यातच गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी रुद्ध झाल्याने गणेशोत्सव महाराष्ट्राच्या इतर भागात नसतो का ? असा सवाल एसटी महामंडळाकडे उपस्थित केला जात आहे.
विठ्ठलवाडी एसटी आगार व्यवस्थापक यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर एसटी ही सातारा विभागाच्या दहीवडी आगाराची असून त्यांनी ही एसटी रुद्ध केली असल्याचे स्पष्ट केले आहे. तर दहीवडी आगाराशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. रिजर्वेशन असलेली एसटी बस रुद्ध झाल्यानंतर प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करणे ही जबाबदारी एसटी महामंडळाची नाही का? की सर्व सामान्य माणसाला गृहीत धरून मनमौजी कारभार सुरू आहे असा प्रश्न आता प्रवाशी विचारत आहेत.
–संतोष दिवाडकर
ST Corporation’s neglect of other Maharashtra?