Dombivli News : स्वामीनारायण मंदिर संस्थेच्या स्वच्छता अभियानाला उदंड प्रतिसाद

Dombivli News : महात्मा गांधी जयंतीनिमित्त डोंबिवली पूर्वेला स्वामी नारायण मंदिर संस्थेच्या माध्यमातून बुधवारी स्वच्छता अभियानाचे अयोजन केले होते. राजाजी पथ येथील स्वामी नारायण मंदिर ते पुढील चौकापर्यंत या उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये संस्थेचे स्वामी हरिचरण दास महाराज, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती.

दोघांनीही स्वच्छता अभियानाला स्वतः येऊन सुरुवात केल्याने मंदिराचे शेकडो भक्त रस्त्यावर उतरले आणि त्यांनी परिसरातील जोड रस्त्यांची स्वच्छता केली. दरवर्षी असा उपक्रम होत असून सामाजिक बांधीलकी आणि स्वच्छतेचे महत्व समाजाला पटवून देण्यासाठी अशा उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे हरिचरण दास म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता विषयाला प्राधान्य देऊन तिन्ही टर्म मध्ये ते स्वतः या विषयी विविध उपक्रम आयोजित करून स्वतः त्यात सहभागी होतात. आधी केले आणि मग सांगितले ही उक्ती पंतप्रधान मोदींची असून ती अनुकरणीय आहे असे मला वाटत असल्याचे मत यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. स्वच्छता ही एका दिवसाची असून उपयोग नाही. तर त्यात सातत्य असायला हवे. त्यातून परिसर स्वच्छता, पर्यावरण व्यवस्थित राखले जावे असेही चव्हाण म्हणाले. मंत्री चव्हाण हे आताच नव्हे तर गेली अनेक वर्षे या उपक्रमात येऊन झाडू हातात घेतात. त्यामुळे त्यांचे सहकारीही पुढे सरसावून मदत करतात. या गोष्टीचा आनंद असल्याचे स्वामी नारायण भक्तांनी सांगितले.

Dombivli News : Huge response to Swaminarayan Mandir Sanstha’s cleanliness drive

डोंबिवलीत कॉलेज विद्यार्थ्यांना गांजा सप्लाय करणाऱ्या तिघांना अटक; अतिदुर्गम भागातून आणल्या जात होत्या गोण्या

डोंबिवली (Dombivli Crime) : शहरातील मानपाडा पोलिसांच्या हद्दीत असलेल्या शिवम हॉटेल जवळील मैदानात अमली पदार्थ विकण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. यानंतर तात्काळ मानपाडा पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे यांनी पोलिसांसह सापळा रचून आनंद शंकर देवकर या 32 वर्षीय इसमाला 20 किलो 300 ग्राम गांजाच्या दोन गोण्यासह एनडीपीएस एक्ट अंतर्गत अटक करून पुढील तपास सुरू केला.

पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या गांजाच्या गोणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर या आदिवासी अति दुर्गम भागातून आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मानपाडा पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे यांचे पथक थेट शिरपूर येथील अतिदुर्गम भागात पोहोचले आणि त्यांनी रेमन डुल्या पावरा, संदीप छोटू पावरा या दोघांना अटक करून डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात आणले. हा गांजा डोंबिवलीतील कॉलेज परिसरामध्ये विद्यार्थ्यांसाठी दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघड केला आहे. अशा प्रकारचे कोणतेही गांजा विकणारी टोळी आढळल्यास ठाणे नियंत्रण कक्ष किंवा कल्याण नियंत्रण कक्ष येथे संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कॉलेजात शिकणारी तरुण पिढी गांजाच्या आहारी गेल्याने गांजाची मोठी मागणी शहरी भागात वाढली आहे. यामुळे अतिदुर्गम भागात गांजाची लागवड करून तो माल शहरी भागात आणला जातो. शहरी भागात विविध ठिकाणी गांजा विक्रीचे छुपे अड्डे बनवून त्याची विक्री केली जाते. अशा प्रकारची विक्री कोठे होते याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-संतोष दिवाडकर

Three arrested for supplying cannabis to college students in Dombivali