Rickshaw strike : रिक्षा चालकांचा चक्का जाम आंदोलनाचा ईशारा

Rickshaw strike : रिक्षा प्रवासात एकावेळी तीन हुन अधिक प्रवासी प्रवास करीत असल्यास सदर रिक्षाचालकावर दंडात्मक कारवाई करण्याचा बडगा कल्याण डोंबिवलीत वाहतूक पोलिसांनी सुरू केला आहे. यामुळे संतापलेल्या रिक्षाचालकांनी आता संपूर्ण शहरात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे. सोमवारी या संदर्भात चक्कीनाका येथील वाहतूक उपशाखेत निवेदन देण्यात आले आहे.

ओव्हर सीट बसविल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून दहा हजार रुपयांचा दंड रिक्षा चालकांना ठोठावण्यात आला असून ही कारवाई अन्यायकारक आहे. एखादा प्रवासी स्वतःहून बसत असेल तर त्याच्यावर का कारवाई करीत नाहीत? आम्हालाही कुटुंब आहे. त्यांचे उदरनिर्वाह सर्व काही आम्हा रिक्षाचालकांवर अवलंबून आहे. सध्या इतक्या रिक्षा वाढल्या आहेत की आम्हाला व्यवसाय करणे कठीण होऊन बसले आहे. त्यात आम्ही इतका भरमसाट दंड कसा भरणार? असे अनेक सवाल रिक्षा चालकांकडून करण्यात आले. दरम्यान ही कारवाई थांबली नाही तर अर्धे ठाणे चक्का जाम करू असा इशारा रिक्षा चालकांकडून देण्यात आला.

Rickshaw drivers warn of massive strike

Waldhuni Bridge ला हाईट बॅरियर; अवजड वाहनांना नो एन्ट्री

Waldhuni Bridge : पश्चिमेतुन पूर्वेला तसेच उल्हासनगरला जाण्या येण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग आहेत. त्यातीलच एक असलेल्या वालधुनी पुलावर आता अवजड वाहनांना प्रवेश नसणार आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूस वाहतूक विभागाच्या समन्वयातून हाईट बॅरियर बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे उंच अवजड वाहने या बॅरियर मधून जाऊ शकणार नाहीत. मालाची वाहतूक करणाऱ्यांची मात्र आता बऱ्यापैकी गैरसोय होणार आहे.

कल्याण शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उदभवत आहे. पश्चिमेतुन पूर्वेला तसेच उल्हासनगरला जाण्या येण्यासाठी दिवसभरात शेकडो वाहने वालधुनी पुलावरून वाहतूक करतात. त्यामुळे पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. यापूर्वीच विठ्ठलवाडी एसटी आगाराला आपली वाहने पत्रिपुलावरून नेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार एसटीची वाहतूकही या पुलावरून बंद करण्यात आली होती.

आता अवजड वाहनांचाही प्रवेश बंद केल्याने या कोंडीतून सुटका होते का हे पहावे लागणार आहे. अवजड वाहनांसाठी हा मार्ग बंद केल्याने उल्हासनगर व कल्याण पूर्वेत जाण्या येण्यासाठी शहाड अथवा पत्रिपुलाचा आधार घ्यावा लागणार आहे.

Height barrier on Waldhuni Bridge; no entry for heavy vehicles

Ganesh Vidya Mandir शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचं मस्तीत स्वागत

Ganesh Vidya Mandir : जून महिन्याच्या या आठवड्यापासून शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत समारंभ शाळेकडून करण्यात आला. कल्याण पूर्वेतील गणेश विद्या मंदिर शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांचेही काहिसे असेच मजेदार स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटून, कागदी टोप्या घालीत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून शाळेच्या शिक्षकांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

एकेकाळी शाळेचा पहिला दिवस म्हणजे नुसतीच रडगाणी. परंतु आता बदलत्या काळानुसार पहिला दिवस म्हणजे फक्त नाचगाणी अशीच नवी प्रथा प्रचलित झाली आहे. गणेश विद्या मंदिर शाळेच्या शिक्षकांनी आपल्या पहिलीच्या विद्यार्थ्यांचा पहिला दिवस चांगलाच मजेदार आणि अविस्मरणीय बनवला. लहान मुलांना आवडणारी गाणी लावून शिक्षकही विद्यार्थ्यांसोबत थिरकू लागले. शाळेत संपूर्ण दिवसभर या विद्यार्थ्यांचा नुसता कल्ला सुरू होता. आपल्या आवडीच्या गाण्यावर चिमुकल्यांनी चांगलाच ताल धरला होता. नवा गणवेश, नवे दप्तर, नवी पुस्तकं, नव्या वह्या, नवे शिक्षक आणि नवे मित्र. एकंदरीतच सारे काही नवे नवे.

शाळेतील मुख्यद्यापीका ललिता मोरे यावेळी म्हणाल्या की, “पूर्वी असे काही नव्हते. शाळेच्या पहिल्या दिवशी छडी चालवायची नाही एवढेच आम्हाला माहीत असायचे. पण आता शाळेचा पहिला दिवस म्हणजे एक सोहळ्या सारखा साजरा करण्याची पद्धत बनली आहे. खरेतर ही छान गोष्ट आहे, कारण हा दिवस पुढची दहा वर्षे म्हणजेच दहावीच्या निरोप समारंभा पर्यंत ही मुले लक्षात ठेवतील”.

Ganesh Vidya Mandir School welcomes first standard students with fun

“किती भ्रष्टाचार करायचा काय लिमिट? कमी पडले असेल तर घ्या” – मनसेच्या राजू पाटलांनी खिशातून काढल्या नोटा

डोंबिवली : कल्याण शीळ मार्गावरील पलावा येथील अर्धवट पुलाच्या कामाविरोधात व सत्ताधारी पक्षाने दिलेल्या उदघाटनाच्या आश्वासनाविरुद्ध शिवसेना उबाठा व मनसेने पलावा पुलाच्या कामाची पाहणी करीत निषेध नोंदवला. शिवसेना उबाठा पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे व मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एकत्र येत मागील आठ वर्षांपासून अर्धवट असलेल्या पुलाच्या कामाविरोधात सत्ताधार्यांवर जोरदार ताशेरे ओढले.

अर्धवट पुलामुळे परिसरात दररोज प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून, त्यामुळे सामान्य नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या ट्राफिक कोंडीमुळे काही वेळेस शाळा प्रशासनाला देखील सुट्टी देण्याची वेळ आली आहे. या पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे तासांतास नागरिकांना या वाहतूक कोंडीत अटकून राहावे लागते. नागरिकांना सत्ताधारी पक्षाकडून या पुलाच्या उद्घाटनाबाबत यापूर्वी अनेक वेळा खोट्या तारखा सांगून नागरिकांची फसवणूक करण्यात आली. 31 मे रोजी पूल सुरू होईल, असे दिलेले आश्वासन देखील अपूर्ण राहिले. ही गंभीर फसवणूक लक्षात घेता, नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन हाती घेण्यात आले असल्याचे यावेळी दीपेश म्हात्रे म्हणाले.

या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील, तसेच मनसेचे डोंबिवली व कल्याण ग्रामीण येथील पदाधिकाऱ्यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि नेत्यांनी एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दात टीका केली. “किती पैसा खायचा? किती भ्रष्टाचार करायचा? याला काही लिमिट आहे. म्हणून मी नोटा दाखवल्या. त्यांना कमी पडत असतील तर घ्या” अशी खरमारीत टीका राजू पाटील यांनी सत्ताधार्यांवर केली.

MNS, Shiv Sena ubt unite against incomplete work of Palava bridge

Kalyan East : अवेळी आलेल्या पावसाने चाळ परिसरांची उडाली दाणादाण

Kalyan East : वेळेपूर्वीच आलेल्या पावसाने राज्यभरात अनेक ठिकाणी हाहाकार माजवला आहे. पावसाळ्यापूर्वी शहरा शहरात नालेसफाईची कामे मार्गी लावावी लागतात जी साधारपणे मे महिन्यात केली जातात. मात्र पावसाने अवेळी हजेरी लावल्याने सफाई कर्मचाऱ्यांची देखील चांगलीच दाणादाण उडाली आहे. तर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने मोठ मोठ्या नाल्यातील सफाईला ब्रेक लावण्यात आला आहे. मात्र लहान सहान गटारातील गाळ उपसण्याचे काम महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत अनेक ठिकाणी सुरू आहे.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, चिकणीपाडा, जिम्मी बाग, विठ्ठलवाडी हा सखल भाग बहुतांश चाळ परिसराचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यास पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरते. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसा दरम्यान ‘४-जे’ प्रभाग क्षेत्रातील मंगल राघो नगर भागात नालेसफाईचे काम सुरू होते. मात्र पाऊस आल्याने सफाई कामगारांनी काम थांबवून आडोसा घेतला. अर्धवट नालेसफाई असल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने काही चाळींमध्ये पाणी तुंबून नागरिकांच्या उंबरठ्या पर्यंत पाणी पोहोचले होते. आणखीन काही वेळ पावसाने ब्रेक लावला नसता तर असंख्य नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता होती.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या असल्या तरी पाऊसच वेळेपूर्वी आल्याने प्रशासनाची देखील गोची झाली आहे. अपुऱ्या नालेसफाईमुळे अनेक ठिकणी पाणी साठत असल्याने करदाते नागरिक संपूर्ण रोष महापालिका प्रशासनावर व्यक्त करीत आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस पूर्णपणे थांबणार असल्याचा ईशारा हवामान खात्याने दिला असून याच काळात महापालिकेला संपूर्ण नालेसफाई करण्यास मुभा मिळणार आहे.

Kalyan East : Unseasonal rains have washed away the rice fields.

Water Cut Kalyan : कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद

Water Cut Kalyan : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. २७ मे २०२५ रोजी कल्याण डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अगोदरच अतिरिक्त पाणीसाठा करून पाणी जपून वापरावे असे आवाहनही महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे मंगळवारी २२ के.व्ही. एन.आर.सी.-२ फीडरवर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत देखभाल दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. या सबस्टेशनहुन महापालिकेच्या १५० द.ल.लि. नेतीवली व १०० द.ल.लि. मोहिली जलशुद्धीकरण केंद्रास विद्युत पुरवठा केला जातो. मात्र मंगळवारी हा वीजपुरवठा बंद असणार असल्याने परिणामी जलशुद्धीकरण केंद्रही बंद राहणार आहे. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिक उपकरणांची दुरुस्ती करणे देखील आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

विद्युत व यांत्रिक उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीकरिता महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ८ तासांकरिता बंद असणार आहे. यादरम्यान कल्याण ग्रामीण विभाग, मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम भागाला पाणीपुरवठा बंद राहील अशी माहिती महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

Water supply to Kalyan Dombivali to be cut off on Tuesday

“गोली मार दुगा” हिंदी भाषेतून धमकीचा फोन; पोलिसांत गुन्हा दाखल

कल्याण : अंबरनाथ पोलीस स्थानक गोळीबार प्रकरणाला वर्ष पूर्ण झाले असले तरी त्याचे पडसाद मात्र अजूनही कल्याण शहरात उमटतच आहेत. सहा गोळ्या लागून बचावलेले महेश गायकवाड यांचे कार्यालय प्रमुख असलेले निलेश रसाळ यांना आता फोनद्वारे धमकी आली आहे. सारखे सारखे कोर्टात जातोस, तुला गोळ्या घालून मारीन अशी धमकी सदर इसमाने दिली आहे. मात्र ही धमकी देणारा व्यक्ती हा हिंदीतुन बोलत असून तो नेमका महाराष्ट्रातील आहे की परराज्यातून फोन करून अशी धमकी देत आहे ही बाब देखील तपासली जाणार आहे.

मनसेच्यागुढीपाडवा मेळाव्यानंतर अनेक वर्षे महाराष्ट्रात राहून मराठी न येणाऱ्या इतर भाषिकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. मराठी बोलता येत नसेल तर काही खैर नाही असे चित्र आता मनसेने उभे केले आहे. त्यातच कल्याण मधील निलेश रसाळ या मराठी युवकास आलेला धमकीचा फोन हा एका अमराठी भाषिकाने केल्याने आपल्याच घरात मराठी माणसाच्या गळ्यावर नख लावले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

निलेश रसाळ हे महेश गायकवाड यांचे कार्यलयीन कामकाज पाहतात. त्यामुळे अनोळखी इसमाने त्यांना कोर्टात सारखा दिसू नको नाहीतर गोळ्या घालीन अशी उघड धमकी दिली आहे. पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून अज्ञात इसमाचा शोध घेतला जात आहे. परंतु सदर इसम हा अमराठी असून येथील स्थानिक मराठी भाषिकालाच जीवे मारण्याची धमकी देत आहे ही बाब गंभीर असल्याचे बोलले जाते. आता ही बाब मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कानावर गेल्यानंतर त्याचे काय पडसाद उमटतील हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संपूर्ण संभाषण ऐका पुढील लिंकवर

https://www.facebook.com/share/v/164WouekZ1

Hindi speaker threatens to kill local man

Kalyan East मध्ये शिंदेंच्या Shivsena पक्षात अंतर्गत धुसफूस; सर्व पद घेतली काढून

Shivsena Kalyan East : एकनाथ शिंदे यांच्या कल्याण पूर्वेतील शिवसेनेत फार आधीपासूनच अंतर्गत धुसफूस असल्याचे समोर येत आहे. शिवसेनेच्या विभाजनानंतर एकनाथ शिंदें सोबत असलेल्या पदाधिकारी वर्गातही गटतट बनल्याने पक्षासाठी हे नुकसानकारक बनले आहे. कोळसेवाडी पोलीस स्थानकात शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या राढ्यानंतर आता शिंदेंच्या सेनेने शेवटी कल्याण पूर्वेतील महत्त्वाच्या फळीची कार्यकारिणी बदलून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी गुरुवारी एक परिपत्रक जारी केले असून त्यांनी कल्याण पूर्वेतील पुरुष व महिला उप शहरप्रमुख पर्यंतची सर्व पदे स्थगित करीत असल्याचे म्हटले आहे. तर आजवर केलेल्या कामाचा आढावा घेऊन नव्याने मुलाखती घेऊन पुन्हा नव्याने पद नियुक्ती केली जाईल असेही त्यांनी या परीपत्रकात म्हटले आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

मागील महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना हा कल्याण पूर्वेतील मोठा पक्ष ठरला होता. पुढे शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने तरीही आपलं पारडं जड ठेवलं. अगोदरच पक्षात गटातटाचे राजकारण असताना त्यातच विधानसभा निवडणुकीत शहर प्रमुखाने बंड पुकारल्याने पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. यानंतर आता पुन्हा एक अंतर्गत वाद बाहेर पडल्यानंतर कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगेंनी मोठा निर्णय घेत पदांची नवनियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण पूर्वेतील अंतर्गत डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता खासदारांना विशेष लक्ष द्यावे लागतेय का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. परिस्थिती न बदलल्यास याचा फटका पक्षाला आणि लाभ मात्र इतरांना मिळू शकतो.

Internal dispute within Shinde’s Shivsena party in Kalyan East

Dombivali Ro Ro Boat ने होणार मुंबईचा प्रवास सोपा

Dombivali Ro Ro Boat : रेल्वेची जीवघेणी गर्दी आणि रस्त्यावरील वेळघेणी वाहतूक कोंडी यामुळं डोंबिवलीकर त्रस्त झाला आहे. त्यामुळे आता लवकरच डोंबिवलीकरांना मुंबईचा प्रवास जलमार्गाने करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. डोंबिवली मोठागाव जलवाहतूक प्रकल्पाच्या कामाला अधिकृतपणे सुरुवात झाली असून रो-रो बोटसाठी जेट्टीच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले आहे.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून सुमारे १००० कोटी रुपयांचा डी.पी.आर. तयार करण्यात आला असून प्राथमिक स्वरूपात ८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यातील डोंबिवली मोठागाव जेट्टीसाठी २२ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर डोंबिवलीहून मुंबई, नवी मुंबई, वसई आणि विरार या ठिकाणी नागरिकांना त्यांच्या वाहनांसह जलमार्गाने रो-रो बोटीने प्रवास करता येणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधन खर्च वाचणार आहे. शिवाय वाहनांमुळे होणारे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात कमी होईल. वाहतुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प क्रांतिकारी ठरणारा असून सागरी परिवहन क्षेत्रालाही मोठी चालना मिळू शकते.

डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, वसई आणि विरार यांना जलमार्गाने जोडणारा हा ऐतिहासिक प्रकल्प नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला सुलभ, वेगवान आणि पर्यावरणस्नेही सिद्ध करू शकतो. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास ही मार्गिका कल्याण शहराला देखील जोडली जाऊ शकते. एका रो रो बोटमध्ये शेकडो प्रवासी आपल्या वाहनांसह प्रवास करू शकतात. सध्या ही सेवा मुंबई ते भाईंदर येथे सुरू असून चारचाकी वाहन धारकांना २४० रुपये तर दुचाकी धारकांना ६० रुपये तिकीट आकारले जात आहे. या प्रवासातून पैसे, वेळ, इंधनाची बचत होत असून वाहतूक कोंडी व प्रदूषणमुक्त प्रवास डोंबिवलीकरांना करता येणार आहे. सागरी मार्गाने सुरू होणारी ही परिवहन सेवा येत्या काळात क्रांती घडवून आणू शकते.

Travel to Mumbai will be easier with Dombivali Ro Ro Boat

कल्याण डोंबिवलीत झोपडपट्टी पुनर्वसन योजना; रवींद्र चव्हाण यांची प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा

डोंबिवली : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हद्दीत कल्याण, डोंबिवली विभागातील खासगी आणि सरकारी जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी. प्रत्येक लाभार्थी घटकाला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना माजी मंत्री तसेच डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या मुंंबईतील अधिकाऱ्यांना दिले.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात किती अंमलबजावणी झाली? आणि करायची असेल तर ती कशा पध्दतीने करता येईल? लाभार्थींना या योजनेचा अधिकाधिक लाभ कसा मिळेल? तसेच कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी, या दृष्टीने भाजप प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. यावेळी प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी अश्विनी जोशी, तहसीलदार विजय वाकोडे, साहाय्यक अधिकारी हर्षद घोटेकर उपस्थित होते.

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रात कल्याण डोंबिवली पालिकेसह, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था भागात ही योजना तातडीने राबविण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे तेथे या योजनेचा विनाविलंब शुभारंभ करावा. या योजनेतून खरा लाभार्थी अजिबात वंचित राहता कामा नये. प्राधिकरणाच्या अन्य क्षेत्रातही खासगी, शासकीय जमिनींवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना अधिक प्रभावीपणे, गतिमानतेने राबविता येईल यासाठी प्राधिकरणाने वेगाने हालचाली सुरू कराव्यात. या योजनेच्या अंमलबजावणीत काही अडथळे येत असतील तर त्याचे शासन पातळीवर निराकरण करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन आमदार रवींद्र चव्हाण यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही ही योजना कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगितले.

Slum rehabilitation scheme in Kalyan Dombivali; Ravindra Chavan discusses with authority officials