KDMC New Ward : ‘इतके’ आहेत नवे प्रभाग; तुमचा प्रभाग जाणून घ्या

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिके कडून आज नवी प्रभाग रचना ( KDMC New Ward ) जाहीर करण्यात आली आहे. कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या निवडणुकांमुळे महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र आता प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे लवकरच निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यादृष्टीने आता सर्व पक्षांनी तसेच इच्छुक उमेदवारांनी मतदारांची आकडेमोड करायला सुरुवात केली आहे.

क.डों.म.पा.ने जाहीर केलेल्या यादीनुसार आता १२२ ऐवजी ४४ प्रभाग असणार आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत प्रभागांची संख्या कमी वाटत असली तरी प्रत्येक प्रभागाचा भौगोलिक विस्तार आणि सीमा वाढविण्यात आलेल्या आहेत. लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि भौगोलिक रचनेच्या आधारावर नवे प्रभाग बनविण्यात आले आहेत. एका प्रभागात चार जागांसाठी निवडणुका रंगतील तर काही प्रभागात मात्र तीन जागा असणार आहेत. अश्या एकूण १३३ जागांवर क.डों.म.पा.ची निवडणूक रंगणार आहे.

नव्य प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्याने इच्छुक उमेदवार तसेच राजकीय पक्ष यांना आपल्या योजना आखण्यासाठी वेळ मिळणार आहे. दुसरीकडे OBC आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात सुरू असून राज्यसरकारचे लक्ष त्यावर आहे. मुंबई, पुण्यासह आणखी काही महानगरपालिकेचा कार्यकाळ संपत आला असून तेथेही प्रशासकीय राजवटीची तयारी केली जात आहे. त्यामुळे प्रभाग रचना जरी जाहीर केल्या असल्या तरी प्रत्यक्षात निवडणुका केव्हा होतील हे काही सांगू शकत नाही.

-संतोष दिवाडकर

KDMC New Ward : New ward structure of Kalyan Dombivali Municipal Corporation announced

KDMC च्या पाच माजी आयुक्तांवर गुन्हे दाखल; मनसे आमदार राजू पाटलांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

कल्याण : बांधकाम परवानगीमध्ये अनियमित पद्धतीने व्यवहार केल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाच माजी महापालिका आयुक्तांसह तब्बल १८ जणांविरुद्ध शहर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री फसवणूक आणि अनियमितता तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. यानंतर मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी सत्ताधारी पक्षाला याबाबत सवाल केले आहेत.

क.डों.म.पा. (KDMC) चे माजी आयुक्त गोविंद राठोड, रामनाथ सोनवणे, एसएस भिसे, ई रवींद्रन आणि गोविंद बोडके यांच्यासह चंद्रप्रकाश सिंह, रवि राव, मारुती राठोड ADTP, सुरेंद्र टेंगले, ज्ञानेश्वर आडके, सुखदेव जाधव, रघुवीर शेळके, संजय भोळे, भागवत, सुहास गुप्ते, हरकचंद जैन, अनिल आर. निरगुडे आणि स्वत: विकासक यांच्यासह इतरत्र बदली झालेल्या माजी महापालिका आयुक्तांचा समावेश आहे.

माजी अपक्ष नगरसेवक अरुण पी गीध यांच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कल्याण न्यायालयाच्या निर्देशानुसार कल्याण विभागातील बाजारपेठ पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तक्रारदाराच्या वकिलांनी केलेल्या तक्रारी व युक्तिवादाच्या आधारे दिवाणी न्यायाधीश अ‍ॅड. अक्षय कपाडिया आणि न्याय दंडाधिकारी सोनाली शशिकांत राऊळ यांनी १८ जानेवारी २०२२ रोजी आदेश दिला. नागरी अधिकारी आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगर नियोजकानी आणि इतर कर्मचाऱ्यांनी विकासकाशी संगनमत करून सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच निर्धारित नियमांचे पालन न करून मालमत्तेच्या विकासास परवानगी दिली आहे असे या तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले होते.

एफएसआय देण्याबाबत मालमत्ता विकासकाची अवाजवी बाजू घेण्यात आली आणि त्यानंतर अनेक अनियमित नियमाना पाठीशी घातले आहे. त्यामुळे बांधकाम नियमांचे हे सर्वजण पूर्णपणे उल्लंघन करत होते. तसेच नागरी अधिकारी आणि विकासक यांच्यातील बैठकाही इतिवृत्त म्हणून बनावट होत्या. तक्रारदाराने स्थानिक पोलीस आणि विभागीय आयुक्तांसह वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्यासाठी संपर्क साधला मात्र त्यांनी कोणतीही दखल न घेतल्याने त्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागले. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एसएचओने सांगितले की, कथित आरोपींविरुद्ध आयपीसीच्या कलम ४२०, ४१८, ४१५, ४६०, ४४८, १२० बी, आर डब्ल्यू , ३४ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ९ आणि १३ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. हा संपूर्ण भाग जानेवारी २००४ च्या दरम्यान घडला असून पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे. भूखंडावर २३ मजली स्काय स्क्रॅपर आले आहे आणि विकासकाने गॅरेजचे दुकानात रूपांतर केले आहे.

“माजी आयुक्तांच्या पाठीवर कुणाचा हात ?” – राजू पाटील

जोरदार चर्चेत असलेल्या आणि चव्हाट्यावर आलेल्या या प्रकरणावर मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील आता समाज माध्यमांद्वारे सवाल उपस्थित केला आहे. सत्ताधाऱ्यांनो यावर काय बोलाल ? कोटींचा घाटा त्यात वाघाचा घाटा ? या आयुक्तांमागे कुणाचा हात ? यांचा कोण नाथ असेल ? असे प्रश्न त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे केले आहेत. या पोस्ट नंतर शहरातील पालिका वर्तुळात हा विषय आता आणखीनच चर्चेत आलेला आहे.

-रोशन उबाळे, संतोष दिवाडकर

Charges filed against former KDMC commissioner; MNS MLA Raju Patil’s question to the ruling party

प्रेरणादायक : कचरा वेचून महिलेने विकत घेतली नवी कोरी चारचाकी गाडी

कल्याण :-काम ही सर्वश्रेष्ठ बाब आहे. मग ते कोणतेही असो याची महती सांगणारी प्रेरणा दायक घटना कल्याण (Kalyan News) मधील वाडेघर डम्पिंग ग्राउंड परिसरात घडली आहे. निर्माण होणारा घनकचरा हा फेकून दिला जात असला तरी तो योग्य प्रकारे गोळा केला तर तो धनकचरा ठरू शकतो. हीच किमया कचरावेचक महिला रेखा लाखे यांनी साधली आहे. त्यांनी कचरा वेचण्याच्या कामातून पैसा कमावून कचरा गोळा करण्यासाठी चक्क नवी कोरी बोलेरो पिकअप गाडी घेतली. यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रोत्साहन आणि सहकार्य केल्याने त्यांच्यासह अन्य कचरावेचकांच्या हाताला देखील काम मिळाले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी २५ मे २०२० पासून शहरात शून्य कचरा मोहिम राबविण्यास सुरुवात केली. ती प्रत्यक्षात आण्यासाठी घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी प्रयत्न सुरू केले. महापालिकेने आधारवाडी डम्पिंगवर कचरा टाकणे बंद केले होते. त्यामुळे त्याठिकाणी कचरा वेचणाऱ्या जवळपास ४०० कचरा वेचकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. महापालिकेने त्यापैकी काही कचरा वेचकांना क आणि ब प्रभाग क्षेत्रातील ५० सोसायट्यांमधून सुका कचरा गोळा करण्याची परवानगी दिली. त्यासाठी रेखा यांनी पुढाकार घेतला. गोळा केलेल्या प्रतिटन कचऱ्याच्या बदल्यात एक हजार रुपयांची रॉयल्टी रेखा महापालिकेस देतात.

त्यांनी गोळा केलेल्या कचऱ्यापैकी विक्री योग्य कचऱ्यातून त्यांना उत्पन्न मिळते. उर्वरीत कचरा रिसायकलिंगसाठी जातो. कचऱ्यातून त्यांनी पैसा कमावून चक्क बोलेरो पिकअप गाडी खरेदी केली आहे. सध्या हा प्रयोग दोन प्रभाग क्षेत्रात राबविला जात असला तरी उर्वरीत ठिकाणीही तो राबविण्याचा मानस उपायुक्त कोकरे यांनी व्यक्त केला.

-रोशन उबाळे

In Kalyan, a woman bought a new four-wheeler by selling garbage

रस्त्यावरील बेवारस उभी वाहनं KDMC ने हटवली

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी आणि नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करणे सुलभ व्हावे या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी काही निर्देश घालून दिले होते. यानुसार ‘4-जे’ प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण पूर्व परिसरातील तिसगाव रोड, सुचकनाका, पत्रीपुल, कचोरे या ठिकाणी रस्त्यावर उभी असलेली व दैनंदिन साफसफाईस बाधा ठरणारी बेवारस व मोडकळीस आलेली एकुण १६ बेवारस वाहने जप्त करुन खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा केली आहेत.

आज सकाळी करण्यात आलेली ही कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, आर.टी.ओ. चे अधिकारी यांच्या सहाय्याने व टोइंग मशीन, डंम्‍पर व जेसीबी च्या मदतीने करण्यात आली.

सध्या महानगरपालिका शहरातील स्वच्छता या विषयावर मोठा भर देत असून वास्तवात शहराला बकालपणातुन बाहेर काढीत सौन्दर्यदृष्टी प्रमाणे कामकाज सुरू आहे. वेळोवेळी नागरिकांचा कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या, घनकचरा प्रकल्प, सार्वजनिक ठिकाणी रोषणाई, भिंतीवर रंगकाम अश्या सर्व बाबींवर महापालिका बारकाईने काम करत आहे. मात्र शहराला स्मार्ट करण्यासाठी शहरातील नागरिकांनी आधी स्मार्ट होणं गरजेच आहे.

-कुणाल म्हात्रे

KDMC removed unattended vehicles on the road

आजपासून शाळा सुरू! विद्यार्थ्यांनी सजवल्या शाळेच्या भिंती

कल्याण : पुन्हा एकदा शाळा भरल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक या सगळ्यांमध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. त्या निमित्ताने कल्याण येथील श्री गजानन विद्यालय शाळेच्या आवाराबाहेरील भिंतींवर विविध समाज प्रबोधन पर चित्र काढण्यात आली आहेत. मुलगी वाचवा मुलगी शिकवा, लेक माझी भारताची शान, स्वच्छता अभियान आदी विषयांबाबत चित्रांद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. या कामासाठी केडीएमसी शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी विजय सरकटे, रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांची मदत झाली असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन भालेराव यांनी दिली.

शहरातील कचरा प्रश्न सोडवण्यासाठी केडीएमसीच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात यश आले असून शहर सौंदर्यीकरणासाठी यापुढील पाऊल म्हणून शहरातील शाळांच्या भितींवर पर्यावरण पूरक संदेश देणारी चित्र काढण्यात येत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन‍ आणि शिक्षण विभागातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती.

 या बैठकीत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने शालेय स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन विद्यार्थी, शिक्षक- पालकांच्या सहभागातून साजरी करणे, सर्व प्राथमिक- माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये दर्शनी भागातील भिंतीवर, शालेय परिसरातील सार्वजनिक भितींवर सार्वजनिक तसेच पर्यावरण पूरक संदेश देणारे चित्रण करण्याचा ठराव मंजूर झाला. कलाकृती बनवण्यासाठी लागणारे रंग, ब्रश आणि इतर सामग्री प्रत्येक शाळेला महापालिकेमार्फत देण्यात येत आहे.

-कुणाल म्हात्रे

Schools in Maharashtra resume from today

पुनर्वसनाच्या मुद्द्यासाठी महिलांचा मुंडन करण्याचा KDMC ला इशारा

कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा रिंगरूट प्रकल्पात ८४५ नागरिक बेघर होत असल्याने मनपा विरोधात मागील दहा दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. बाधित नागरिकांचे हे उपोषण सुरू असून दहा दिवसांपासून मनपा अधिकाऱ्यांनी या उपोषण कर्त्यांकडे ढुंकूनही पाहिले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे उपोषण कर्त्यांनी मनपाचा निषेध करत मुंडन केले आहे. तेराव्या दिवसा पर्यंत मनपा प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर महिला देखील कल्याण डोंबिवली मनपा कार्यालयासमोर मुंडन करणार असल्याचा इशारा जालिंदर बर्वे आणि आंदोलन कर्त्या महिलांनी दिला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील टिटवाळा ते दुर्गाडी या रिंगरुंटमध्ये बाधीत होणाऱ्या ८४५ रहिवाशांचे पुर्नवसन करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विस्थापित कुटूंबियांनी मंत्रालयात भेट घेऊन त्याचे पुनर्वसन करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व पुनवर्सन समितीचे अध्यक्ष सपना देवनपल्ली कोळी यांना दिले आहेत. पुनर्वसनाच्या मागणीसाठी महानगरपालिकेला अनेक पत्र व्यवहार करुन देखिल महापालिका आयुक्त व संबंधीत अधिकारी पुर्नवसन करण्यासाठी कोणतीही हालचाल करत नसल्याने प्रशासनाकडे अनेक वर्षापासून रहिवाशी संस्थेच्या माध्यमातून मोर्चे, अंदोलन, पत्र व्यवहार केला आहे.

पुनर्वसनाच्या मागणीसाठी पब्लिकन पक्ष व अटाळी आंबिवली सामाजिक संस्थेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष जालिंदर बर्वे, सचिव संदीप घाडगे व महिला पदाधिकारी व राहिवाश्यानी सोमवार पासून पालिकेच्या या प्रभाग क्षेत्र वडवली कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. टिटवाळा – अटाळी -आंबिवली या विभागातील रिंगरुटमध्ये बाधीत होणाऱ्या ८४५ कुटूंबियांचे पुर्नवसन बी.एस.युपी या योजनेतुन करण्यात यावे. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने १९९६चे पुर्नवसन पात्र धोरणात बदल करुन ते २०१६ पर्यंत करण्यात यावे. जो पर्यंत पुर्नवसन होत नाही तो पर्यंत तोडक कारवाई करु नये. रिंगरुट मध्ये बाधीत होणाऱ्या कुटुंबियांच्या पुर्नवसनाच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही, तो पर्यंत रिंगरुट चे काम बंद करण्यात यावे आदी प्रमुख मागण्या उपोषणकर्त्यांनी यावेळी केल्या असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरु राहणार असल्याचे उपोषणकर्त्या सर्व रहिवाशांनी सांगितले आहे.

-रोशन उबाळे

कल्याण-डोंबिवलीत रेमडेसिवीरचा काळाबाजार ? आमदार गणपत गायकवाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनावर परिणामकारक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर शहरात तुटवडा जाणवत आहे. यामुळेच हे औषध मूळ किंमती पेक्षा तीन चार पटींने अधिक किंमतीत काळ्या बाजारात विकले जात आहे. असे पत्र कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी रेमडेसिवीरच्या तुटवड्या बाबतची धक्कादायक बाब समोर आली होती. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतल्यानंतर रातोरात औषधांचा पुरवठा करण्यात आला. मात्र सध्या कल्याण डोंबिवली व उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात काही माफिया हे इंजेक्शन मूळ किमती पेक्षा तीन चार पटीने विकून त्याचा काळाबाजार करीत आहेत. आपल्या माणसांचा जीव वाचवण्यासाठी लोक किंमत मोजायला तयार होतात व औषध विकत घेतात. अश्या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

कोरोना काळात उधोगधंदे ठप्प झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात पिचलेल्यानी काय करावं ? असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शिवाय रेमडेसिवीर सहज उपलब्ध होत नसल्याने त्यासाठी नातेवाईकांना लांब लांबचे अंतर भर उन्हात कापावे लागत आहे. तरी रेमडेसिवीरचा पुरेसा साठा मेडिकल मध्ये उपलब्ध करून द्यावा व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार गायकवाड यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशातच कोरोना बाधित रुग्णांसाठी परिणामकारक असलेल्या रेमडेसिवीर या औषधाचा ठाणे जिल्ह्यात विशेषतः कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असुन या औषधाचा मुबलकसाठा उपलब्ध करून देण्याबाबत तसेच या औषधाचा काळाबाजार करून मुळ किमती पेक्षा तीन ते चार पट वाढीव दराने विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याबाबतची मागणी मुख्यमंत्री मा. ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.ना.श्री.राजेशजी टोपे साहेब, मा.श्री.राजेशजी नार्वेकर साहेब जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे केली.

गणपत गायकवाड (आमदार,कल्याण पूर्व)
क.डों.म.पा. आयुक्तांचा व्यापाऱ्यांना दिलासा. – निर्बंधांमध्ये केले नवे बदल

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी १० मार्च रोजी निर्बंध लादले होते. मात्र या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत असल्याच्या अनेक तक्रारी त्यांच्या कानावर आल्या. यातून व्यापार्यांना काहीसा दिलासा देण्यासाठी त्यांनी निर्बंधात नवे बदल केले आहेत.

कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाचा दिवसाचा आकडा १०० च्या आत येत असताना अचानकच तो ४०० पर्यंत जायला लागल्याने आयुक्तांनी कडक निर्बंध लादले होते. यानुसार दुकाने सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळात बंद ठेवण्यास संगीतले होते. परंतु यामुळे व्यापारी वर्गात संतापाची आणि चिंतेची लाट उसळली. दुकानभाडे,घरखर्च अशा सर्व चिंता त्यांना लागून होत्या. हि बाब लक्षात घेत आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी १५ एप्रिल रोजी निर्बंधात बदल करून व्यापार्यांना काहीसा दिलासा दिला आहे.

सकाळी १० नंतर व्यापार्यांना दुकान उघडायची वेळ निश्चित करून दिली आहे. पूर्वीची वेळ सकाळी ७ होती. ज्याचा कोणताही फायदा व्यापारी वर्गाला होत नव्हता. नव्या बदलानुसार व्यापारी आता सायंकाळी ८ वाजेपर्यंत आपले दुकान उघडे ठेऊ शकतात. वेळेच्या निर्बंधातून जीवनावश्यक सेवा देणारी दुकाने जसे कि भाजीपाला,फळे,किराणा,दुध आदी वगळण्यात आली आहेत. तर बाकी निर्बंध तसेच कायम ठेवण्यात आलेले आहेत.

क.डों,म.पा. क्षेत्रातील निर्बंध

  • सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत दुकाने चालू (जीवनावश्यक सेवांची दुकाने )
  • खाद्यपदार्थ व खाद्यपेय हातगाड्या तसेच फेरीवाल्यांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत परवानगी.
  • शनिवार-रविवार P1-P2 नुसार दुकाने चालू (पालिका व पोलिसांचे नियोजन).
  • आठवडे बाजार बंद.
  • खाद्यगृह, रेस्टॉरंट आणि बार, ज्यूस व आईस्क्रीम पार्लर, परमिट रूम, पार्सल सेवा सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत ५०% क्षमतेने सुरु.
  • जीवनावश्यक सेवा देणाऱ्या व्यापार्यांनी गर्दी होऊ न देणे, कोरोना पासून बचावाची साधने वापरणे तसेच स्वच्छता राखणे अनिवार्य असेल.
  • रिक्षातून प्रवास करताना फक्त दोनच प्रवासी बसवण्याची मुभा.
  • सामाजिक,राजकीय,धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही.
  • लग्न समारंभ व इतर कार्यक्रम कोरोना नियमांना अनुसरून व्हावेत. याबाबतीत आयोजकांनी प्रभागक्षेत्र कार्यालय व पोलीस स्थानकात प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य. समारंभाचे चित्रीकरण करण करून ते स्वतः जवळ ठेवणे. तसेच पालिका प्रशासन व पोलीस स्टेशनला प्रत उपलब्ध करून देणे आवश्यक राहील.
  • जिम,स्पोर्ट्स क्लब,खेळाची मैदाने,उद्याने,स्विमिंग पूल फक्त वैयक्तिक सरावासाठी खुले.  स्पर्धा आणि इतर कार्यक्रमास परवानगी नाही.

अशा प्रकारचे निर्बंध सध्या महानगरपालिका क्षेत्रात लागू करण्यात आले असून उल्लंघन करणार्यावर कारवाई करण्यात येईल. १५ मार्च रोजी महानगरपालिका क्षेत्रात एकूण २३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात तिघे जन कोरोनाने दगावले आहेत. सध्या महापालिका क्षेत्रात एकूण ३०६८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून कोरोनावर नियंत्रण येई पर्यंत हे निर्बंध सुरु असणार आहेत.

क.डों.म.पा. क्षेत्रातील कोरोना आकडा पुन्हा चार अंकी – कल्याणचे खासदारही कोरोना पोजिटिव्ह

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी जास्त होत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनाही कोरोनाने ग्रासले असल्याचे समोर आले आहे.

वर्षभरापासून कोरोनाने जगभरात थैमान घातलेला आहे. क.डों.म.पा. क्षेत्र देखील या आजाराने फोफावले होते. दररोजचा आकडा हा ५०० पर्यंत देखील गेला होता. मात्र हा आकडा जानेवारी पर्यंत निवळत येत दोन अंकी झाला होता. तर एकूण कोरोना रुग्ण हे तीन अंकी म्हणजे १००० च्या आत आले होते. मात्र आता या महापालिका क्षेत्रात कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. गेल्या काही दिवसांत २०० चा आकडा देखील पार झाला होता. २८ फेब्रुवारी रोजी १७८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. तर महापालिका क्षेत्रात आता सध्याच्या घडीला म्हणजेच फेब्रुवारी अखेरपर्यंत १६४६ एक्टिव्ह कोरोनारूग्ण आहेत. हा चार अंकी आकडा पुन्हा तीन अंकी करण्यासाठी नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेणं जास्त गरजेचं असणार आहे.

कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना देखील मागील दोन-तीन दिवस त्रास जाणवत होता. यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. १ मार्च रोजी त्यांचा रिपोर्ट पोजिटिव्ह आला असून त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. याबाबत त्यांनी अधिक माहिती आपल्या फेसबुकद्वारे दिली आहे. माझी प्रकृती ठीक असून जे माझ्या संपर्कात आले त्यांनी विशेष काळजी घ्यावी तसेच लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करावी असे आवाहन त्यांनी आता केलं आहे.

मास्क कारवाईत पालिका कर्मचार्यांना शिवीगाळ – दोघांवर गुन्हा दाखल

विना मास्क फिरणाऱ्या विरोधातील कारवाईत पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यावरून दोघांना गजाआड करण्यात आलय. पुन्हा वाढणाऱ्या कोरोनावर नागरिक संवेदनशील नाहीत का? असा सवाल यातून उपस्थित होतोय.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्षेत्र ४ जे ची मास्क परिधान न करणाऱ्यांवर आज चक्की नाका येथे कारवाई सुरू होती. या कारवाईत स्कूटी वरून आलेल्या दोन जणांनी मास्क परिधान केला नव्हता. त्यांच्यावर पालिका कर्मचाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र त्यांनी दंड भरण्यास नकार दिला. याउलट या दोघांनी थेट पालिका कर्मचारी राजेंद्र खैरे, राम सावंत, अमीर भालेराव, ज्ञानेश्वर ठाकरे, सुरज गायकवाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

लग्नासाठी चाललेले हे दोघेही आता कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोहचले आहेत. पोलीस प्रशासन आणि पलिका कर्मचारी यांच्याकडून वेळी वेळी समजावून देखील त्यांनी तोंडाला मास्क लावला नाहीच. उलट अरेरावी करत शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवरही सरकारी कामात अडथळा, धमकी देणे, साथीचा रोग अन्वये गुन्हा दाखल झाला असून या दोघांना उद्या कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार आहे.