कल्याणमध्ये मुलाने केला बापाचा खूण; आईवरही केला प्राणघातक हल्ला

कल्याण :- शहरातील चिकनघर परिसरात हत्ये प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. मुलानेच वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघड झाला आहे. या हल्ल्यात मध्ये येणाऱ्या आईवरही प्राणघातक हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी जखमी मुलगा लोकेश आणि जखमी आई या दोघांवर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी लोकेशच्या विरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न या आरोपाखाली गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात राहणाऱ्या प्रमोद बनोरिया यांचा २७ वर्षीय मुलगा लोकेश हा विद्यार्थीदशेत आहे. या पिता पुत्रांमध्ये सतत वाद होत होते. शनिवारी रात्री देखील दोघांमध्ये वाद झाले होते. हा वाद इतका विकोपाला गेला की लोकेशने वडील प्रमोद यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करत वडिलांची हत्या केली. याच दरम्यान प्रमोद यांना वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या प्रमोद यांची पत्नी व लोकेश ची आई कुसुम वर देखील लोकेशने ८ते १० वार करून तिला देखील जखमी केले. यानंतर कट रचून स्वतःच्या बचावासाठी त्याने स्वतःच्या पोटावर वार करून घेतले. यानंतर रात्रभर त्याने जखमी आईसह वडिलांचा मृतदेह घरातच ठेवला. संपूर्ण घरात रक्ताचा सडा पडला होता.

पहाटे च्या सुमारास सुरक्षा रक्षकाला फोन करून रुग्णवाहिका बोलवण्यास सांगितले. मात्र रात्री उशिरा त्यांच्या घरातून भांडणाचे आवाज येत असल्याने सुरक्षा रक्षकाचा काहीतरी अनुचित घडले असल्याचा संशय बळावला. त्याने सोसायटीच्या सदस्यांना याबाबत माहिती दिली. सोसायटी मधील लोकांनी घरात येऊन पाहिले असता त्यांना घरात सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याचे दिसले. आणि त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पुढे पोलीस आल्यानंतर मात्र लोकेश याने वडिलांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला करत आईला जखमी करत स्वतः आत्महत्या केल्याचा कांगावा केला. तसेच आईने आपल्या विरोधात पोलिसांना माहिती दिल्यास तिला मारण्याची धमकी दिली होती. मात्र पोलिसांनी लोकेशवर संशय व्यक्त करीत तपास सुरू केला.

डॉक्टर आणि पोलिसांनी लोकेशच्या आईला विश्वासात घेत विचारणा केल्यानंतर तिने मुलाच्या कृत्याचा पाढा वाचला. यानंतर दोघांवरही मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी मुलगा लोकेश विरोधात गुन्हा दाखल करत पूढील तपास सुरू केला आहे. या हत्या मागे नक्की कोणते कारण आहे की इतक्या टोकाचे पाऊल उचलून जन्मदात्या बापाला आयुष्यातुन संपवले ही बाब मात्र अद्यापही गुलदस्त्याबाहेर येऊ शकलेली नाही. मात्र लोकेशच्या चौकशी नंतर हत्येमागचे नेमके कारण पोलिसांच्या हाती लागणार आहे.

-रोशन उबाळे

‘शरद पवार’ – एक पॉजिटिव्ह एनर्जी

शरद पवार…. लहानपणा पासून हे नाव चांगलंच परिचयाचं आहे. अगदी राजकारण कळत नव्हतं तेव्हा पासून. आता पत्रकार असल्याने पवार साहेबांची भाषण पाहण्यात येत होती. भाषण पाहण्यात असल्याने आणि मिमिक्रीची आवड असल्याने या माणसाचा आवाज मला काढता येऊ लागला. आज राष्ट्रवादी पक्षातील कोणीही जेव्हा माझा तो आवाज ऐकतो जाम खुश होतो. आजही त्यांचे जितके चाहते असतील तितके विरोधक देखील नक्की असतील. पण प्रत्येक वेळी माणसाला राजकारणाच्या चष्म्यातून तोलण किती योग्य आहे ?

ज्यांना मी मानतो, ज्यांचे व्यक्तिमत्त्व मला भावते त्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या काही भाषणात पवार साहेबां बद्दल काही न ऐकलेल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. अदृश्य हात, तेल लावलेला पहिलवान अश्या नानाविध उपमा देऊन जे प्रसंग वर्णन त्यांनी केलं त्याबद्दल खरंच विचार करायला भाग पाडलं.

आता तर पवार साहेबांचं खूप वय झालं आहे. या वयात राजकारणातुन संन्यास घेऊन काही वर्षे विश्रांती घ्यायला हवी असे काहींना वाटते. पण मला वाटत नाही ही व्यक्ती असा विचार कधी करत असेल का? आजच्या तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा यांच्यात आजही आहे. चाहते म्हणतात आमच्या साहेबांनी पावसात भिजून भाषण केले. विरोधक म्हणतात राजकीय स्टंट होता, केवळ मत मिळवण्यासाठी केलेला. काहीही असो… या वयात कसलीही तमा न बाळगता स्वतःला झोकून देणं म्हणजे एक मोठी ऊर्जा आहे आणि हे सत्य मान्य करावेच लागेल.

राजकारणाचा चष्मा जरा बाजूला करा आणि आता फक्त एक व्यक्ती म्हणून पहा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली त्या काळी म्हणजेच साधारण २० वर्षांपूर्वीही शरद पवार हे ज्येष्ठ व्यक्तीमत्वच होत. 1999 साली त्यांनी पक्ष उभा केला. त्यावेळी त्यांचं वय 60 च्या घरात होत. या वयात रिटायर्ड होऊन पुढील आयुष्य आरामात घालवायच असा एक समज असतो. मात्र त्याच वयात यांनी पक्षाची स्थापना केली.

२१ व्या शतकाच्या सुरुवातीचे पहिले दशक म्हणजे सोशल मीडियाचा लवलेश देखील नाही. सोशल मीडिया दूरची गोष्ट त्याकाळी साधा मीडिया देखील नव्हता. मोजके टीव्ही चॅनल्स आणि मोजकेच काय ते वर्तमानपत्र. ना कसलं इंटरनेट ना कसला मोबाईल फोन. या अश्या काळात स्वतः महाराष्ट्रभर फिरून त्यांनी पक्षाची पाळमूळ रुजवली. दिवसभरात छोट्या छोट्या गांवखेड्यात जाऊन सभा घेतल्या. सभेतून लोकांशी जवळीक निर्माण केली. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचं घड्याळ लोकांच्या पक्क डोक्यात बसल. विशेषतः पुणे,सातारा या सर्व भागात जाऊन त्यांनी संघटन वाढवले. हळूहळू त्यांची कीर्ती वाढत गेली आणि आज ते सर्वानाच ज्ञात आहेत.

एखाद्याच्या नावाने बोट मोडन किंवा एखाद्या बद्दल वाईट बोलणं सोपं आहे. पण त्या व्यक्तीची कारकीर्द, त्याने घेतलेली अपार मेहनत देखील कधीतरी पाहिली पाहिजे. राजकारणात भले तुम्हाला ते आवडत नसतील. पण त्यांच्या कडे जी ऊर्जा या वयात आहे. ती खरंच अजब आहे. मनातून ध्येय, जिद्द आणि चिकाटी असेल तर यश तुमच्या जवळच असेल हे त्यांच्याकडून शिकता येईल. परिस्थिती काय आहे ? यापेक्षा ती कशी बदलायची हे ज्याला कळलं तो अर्धा खेळ तिथेच जिंकला.

अलिकडल्या काळात त्यांच्या तोंडाला सूज आल्याचे पत्रकार परिषदेत पाहिले. मनात विचार आला की व्यवस्थित बोलत येत नसतानाही ही व्यक्ती पत्रकार परिषद घेत आहे. खरंच अजबच.. पण नंतर एक लेख वाचल्या नंतर समजले की शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. तुम्ही त्यांचे समर्थक असाल, विरोधक असाल किंवा कुणीही असाल…. पण त्यांच्या या अदृश्य शक्तीला किंवा सकारात्मक उर्जेला नाकारू शकत नाही. हीच ऊर्जा राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीसाठी अजस्त्र आधारवडाची छाया बनलेली आहे.

संतोष दिवाडकर (युवा पत्रकार)
कल्याण 8767948054

बॉक्सिंग स्पर्धेत कल्याणच्या खेळाडुंची चमकदार कामगिरी

कल्याण : मुंबई आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा ही आशिया खंडातील सर्वात जुनी व मानाची समजली जाणारी स्पर्धा आहे.  मुंबई विभागातील सर्व बॉक्सर्स आपण सुद्धा या स्पर्धेत चॅम्पियन बनावे अशी स्वप्ने पाहत असतात. गत वर्षी ही स्पर्धा कोरोना प्रादुर्भावाने घेण्यात आली नव्हती व या वर्षी निवड चाचणी स्वरूपात ही स्पर्धा घेण्यात आली. मुंबई येथील ठाकूर  कॉलेज येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कल्याण येथील बिर्ला कॉलेजच्या यश पाटील आणि शुभम सिंग या दोन बॉक्सर्सनी फायनल सामना जिंकून मुंबईच्या संघात आपले स्थान निश्चित केले.

यश पाटील याने 63.5 या वजनी गटात तर शुभम सिंग याने 63.5 ते 67 या वाजनी गटात हे यश मिळवले. यश पाटील ला फायनल मध्ये प्रकाश  कॉलेजच्या सोहन कांचन यांचे कडवे आव्हान होते पण त्याने चोख प्रत्युत्तर देत  सामना एकहाती जिंकला. तर शुभम सिंग याला सुद्धा ठाकूर कॉलेजच्या अभिषेक यादव याचे आव्हान होते  पण शुभम च्या डिफेन्सीव्ह खेळापुढे त्याला गुण मिळवणे कठीण झाले व शुभम याने अचूक प्रहाराने गुण मिळवत सामना आपल्या बाजूने फिरवला.

अखिल भरतीय आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा या 24 डिसेंबर पासून लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब येथे सुरू होणार आहे. दोघे बॉक्सर्स कल्याण येथील बॉक्स2 फिट बॉक्सिंग अकॅडमी येथे प्रशिक्षक विकास गायकवाड यांच्या कडे प्रशिक्षण घेत आहेत .दोन्ही बॉक्सर्स अतिशय उत्तम रीतीने सराव करत असून नक्कीच अखिल भारतीय आंतर विद्यापीठीय स्पर्धेत पदक प्राप्त करतील अशी खात्री प्रशिक्षक विकास गायकवाड यांना आहे.

-कुणाल म्हात्रे

पेट्रोल भरताना असं काढतात येड्यात; या ट्रिक बद्दल माहिती करून घ्या

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे वाहनचालक अगोदरच चिंतेत आहेतच पण पंपावरील पेट्रोल माफियांचं काय ? पंपावर होणारा गफला ही सर्वात मोठी डोकेदुखी असून यावर तोडगा कसा काढावा हाच एक प्रश्न आहे. आणि आजवर अनेक ठिकाणी अश्या घटना उघडही झाल्या आहेत.

भेसळयुक्त पेट्रोल :- पेट्रोल पंपावर अनेक वेळा भेसळयुक्त पेट्रोल विकले जाते. अशा प्रकारच्या घोटाळ्यात पेट्रोल पंप चालक प्रामुख्याने समाविष्ट असतो. पेट्रोल मध्ये भेसळ करून त्याचे प्रमाण वाढवले जाते. ज्याप्रमाणे दुधात पाणी टाकले जाते अगदी तशीच ही प्रक्रिया असून पाण्याऐवजी वेगळा पदार्थ वापरला जातो.

कमी पेट्रोल :- इंटरनेटवर शोध घेतल्यावर आणखीन एक घोटाळा असा समोर येईल की पंपावर पेट्रोल सोबत तुम्हाला हवेचे पैसे देखील मोजावे लागतील. याचा अर्थ असा की निर्धारित पेट्रोल भरायला सांगितले असता आपल्या गाडीच्या टाकीत त्या पेक्षा कमी पेट्रोल पडते. मुळात पेट्रोल पडतंय की नाही हे पाहण्यासाठी पाईप पारदर्शक असावा अशी मागणी ग्राहक करीत आहेत.

ओव्हर स्मार्ट ग्राहकांना हेरणे :- पंपावर पेट्रोल भरणारा कामगार हा बहुतेक वेळा गफला करण्याचा प्रयत्न करतो. अति घाईत असणारी किंवा स्वतःला ओव्हर स्मार्ट, स्टॅण्डर्ड समजणारी माणसं त्यांचे मुख्य शिकार असतात. कारण हीच माणसं पेट्रोल भरताना आपण खूप मोठे आहोत आणि आपल्याला मीटर पाहण्यात वेळ नाही असे दाखवतात. खिडकीतुन नोट देऊन ही लोक पेट्रोल भरून घेतात. आणिक अशा वेळी माफिया कामगार मीटर रिसेट न करताच पुढे पेट्रोल भरतो आणि सुशिक्षित माणसांना चुना लावतो.

मिटरची शाळा :- सध्या पेट्रोल पंपावर काम करणारे काही माफिया या ट्रिकचा वापर करीत आहेत. आणि या ट्रिक बद्दल तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. ज्यावेळी तुम्ही पेट्रोल भरण्यासाठी येता तेव्हा तुम्ही त्याला खिशातून पैसे काढता काढता पेट्रोल भरायला सांगता. समजा तुम्ही त्याला “४०० रुपयांचं टाक” असे म्हणालात तर तो कमी ऐकल्या सारखे १०० चे पेट्रोल टाकून स्टॉप करतो. त्यावर तुम्ही पुन्हा सांगितलत की तो हसून एखादा न ऐकले असल्याचा डायलॉग मारतो. या नंतर तो तुमच्याशी शाळा करू लागतो. ती अशी की, “मी १०० चे टाकले म्हणजे आता किती टाकायचं ?” असा प्रश्न तो तुम्हाला करतो. त्यावर तुम्ही साधे भोळेपणाने ३०० म्हणता. याचदरम्यान त्यांचा एक माणूस तुम्हाला पैशांच्या देवाणघेवाण किंवा अन्य कारणा वरून तुमचं लक्ष त्याच्याकडे वेधतो. आणि याच संधीचा फायदा उचलून पेट्रोल भरणारा मीटर शून्यावरून रिसेट न करता तो १०० पासूनच सुरू करून ३०० वर थांबतो. आणि आपल्याला वाटत की १००+३०० म्हणजे ४०० चं पेट्रोल भरलं गेलं आहे. पण मुळात ३०० चं पेट्रोल टाकून त्याने आपल्या खिशातून १०० रुपयांची चोरी केलेली असते. आणि ती आपल्या लक्षातही येत नाही.

एक लक्षात घ्या दिवसभरात शेकडो गाड्यांमध्ये पेट्रोल टाकले जाते. परंतु ही ट्रीक ते माणूस पाहूनच करतात. समजा या लोकांनी दिवसभरात १०० लोकांवर जरी ही ट्रिक वापरली तरी ३० लोक तरी सहज फसतील. आणि दररोज या ट्रिकचा वापर करून महिन्याला पगारा पेक्षा दुप्पट रक्कम हे यातूनच कमावतात.

पेट्रोल भरनारे सारेच कर्मचारी हे बेईमानी करीत नाही. काही कामगार इमानदार देखील आहेत. मात्र याच इमानदारांच्या गर्दीत काही बेईमान, लुटारू आणि माफिया तुमच्या समोर येणार नाहीत हे कशावरून ? तेव्हा पेट्रोल भरताना सतर्क रहा. आपली फसगत होणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्या. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास पंप चालका कडे त्वरित तक्रार करा. पेट्रोल पंपाच्या कारभारावर संशय असल्यास पोलिसात कळवा. संबंधित माहिती इतरांनाही पाठवा. तुम्हाला असा अनुभव आला असल्यास कृपया खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवावा.

संतोष दिवाडकर (युवा पत्रकार)
8767948054

एका युट्युबरला आलेला असाच एक अनुभव
ऐतिहासिक कल्याण नगरीत शिवप्रताप दिन साजरा; कालीचरण महाराजांची विशेष उपस्थिती

कल्याण :- ऐतिहासिक कल्याण नगरीत श्री शिवप्रताप फाउंडेशन तर्फे भव्यदिव्य शिवप्रताप दिन तिथीनुसार साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या दिवशी अफझल खानाचा वध केला होता. या समरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

कल्याण पूर्वेतील साकेत कॉलेज जवळ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मयुरेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली असंख्य मान्यवर व शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. कार्यक्रमातील पोवाड्यांच्या गजराने संपूर्ण ऐतिहासिक नगरी दुमदुमली होती. महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचवणारे शिवशाहीर देवानंद माळी यांच्यासह त्यांचे सहकारी देखील उपस्थित होते ज्यांनी पोवाडा सादर केला.

नरवीर शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद (किल्ले पन्हाळा), सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज युवराज जेधे व प्रमुख उपस्थिती म्हणून श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे मठाधिपती मोडक महाराज, वीर जिवाजी महाले पुरस्कृत शंकरजी गायकर, कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड, पश्चिमेतील माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

श्री शिवप्रताप फाउंडेशन आयोजित शिवप्रताप दिन सोहळ्यात विशेष आकर्षण म्हणून कालीपुत्र कालीचरण महाराज उपस्थित राहिले होते. समस्त कल्याण करांच्या वतीने त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दरम्यान कालीचरण महाराजांनी या विशेष दिनाचे औचित्य साधत तमाम शिवप्रेमींना आपल्या भाष्या द्वारे संबोधित केले. यानंतर कालीचरण महाराजांनी प्रेरित शिवभक्तांना शुभाशीर्वाद तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कल्याण पूर्वेतील समाजसेवक संजय बाबुराव मोरे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील कालीचरण महाराजांच्या हस्ते करण्यात आले.

-संतोष दिवाडकर

कल्याण डोंबिवलीत सापडलेला ओमीक्रोन रुग्ण झाला बरा; केडीएमसी आयुक्तांनी दिली माहिती

कल्याण :- कल्याण डोंबिवली महापालिका मध्ये ओमीक्रोनचा रुग्ण सापडला होता. मात्र त्या रुग्णाची आर.टी.पी.सी.आर. टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्याला विलगिकरण कक्षेत ७ दिवसांसाठी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पहिल्या ओमीक्रोन रुग्णाला डिस्चार्ज दिला असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांनी दिली आहे.

डोंबिवली मध्ये दक्षिण आफ्रिकाच्या कॅपटाऊनहुन आलेला रुग्ण नवीन व्हेरियांट ओमिक्रोन संक्रमित झाला होता. त्यामुळे कल्याण डोंबिवली मध्ये चिंताजनक आणि भीतीचे वातावरण पसरले होते. त्याचबरोबर पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागावरही ताण आला होता. मात्र आरोग्य विभागाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णाला चांगल्या प्रकारे उपचार केल्याने रुग्णाची आर.टी.पी.सी.आर. टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

या रुग्णाला ७ दिवस घरी विलगिकरण कक्षेत राहण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेच्या कोरोना सेंटर मधून त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांनी पत्रकारांना दिली आहे. त्यामुळे आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

-रोशन उबाळे

परदेशातून आलेल्या १०९ लोकांचा पालिका घेतेय शोध; पालिकेला माहिती देण्याचे आयुक्तांकडून आवाहन

कल्याण :- कोरोनाचा नवा व्हेरीयंट ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी यंत्रणेने खबरदारी आणि उपाययोजनांसाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. परदेशातून गेल्या काही दिवसांत कल्याण डोंबिवलीत २९५ नागरिक आले असून त्यापैकी  १०९ जणांचा शोध घेतला जात आहे. या प्रवाश्यानी पालिका प्रशासनाला आपली माहिती देण्याचे आवाहन क.डों.म.पा. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

परदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्या २९५ नागरिकांपैकी ८८ जणांची कोवीड चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३४ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून उर्वरित ४८ जणांचे रिपोर्ट आद्यप येणे बाकी आहेत. यातील ३४ लोकं ही केडीएमसी बाहेरचे रहिवासी असून उर्वरित१०९ जणांशी संपर्क साधण्यासाठी केडीएमसी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र अनेकांचे फोन बंद येत आहेत तर अनेकांच्या घराला कुलूप असल्याने संपर्कात अडथळा येत असल्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

परदेशातून कल्याण डोंबिवलीमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. ऍट रिस्क (कमी धोक्याचे देश) आणि हाय रिस्क (अति धोक्याचे देश) देशातून येणाऱ्या व्यक्तींना ७ दिवसाचे होम कॉरंटाईन बंधनकारक आहे. या ७ दिवसांत नियंत्रण ठेवण्यासाठी कॉल सेंटरमधून फोनद्वारे संपर्क साधण्यासह केडीएमसीचे मेडिकल ऑफिसरही त्याठिकाणी सरप्राईज व्हिजिट करणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी म्हणाले. तसेच ८  व्या दिवशी त्यांची कोवीड टेस्ट होणार असून त्यात निगेटिव्ह आले तर पुन्हा ७ दिवसांचे होम कॉरंटाईन आणि पॉझिटिव्ह आल्यास केडीएमसीच्या संस्थात्मक कॉरंटाईन केले जाईल.

ज्या सोसायटीमध्ये अशा व्यक्ती राहत असतील त्या नियमानुसार होम कॉरंटाईन करतात की नाही याची खबरदारी सोसायटीने घेण्याचे निर्देश देत उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाईचा इशाराही डॉ. सूर्यवंशी यांनी दिला आहे. नागरिकांनी ही आपल्या आरोग्य बरोबर इतरांचे प्रकृती आणि आरोग्य सुदृढता कशी राहिल याकडे सामाजिक बांधिलकी तुन पाहिले पाहिजे.

मास्क न घालणाऱ्यांविरोधात उद्यापासून पुन्हा कडक कारवाई केली जाणार. गेल्या काही दिवसांपासून मास्क न घालता वावरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. अशा व्यक्तींविरोधात उद्यापासून पोलीस आणि महापालिकेची संयुक्त कारवाई पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. याशिवाय लग्न समारंभ , मोठे कार्यक्रमांमध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होतेय की नाही यावरही करडी नजर असेल असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

दरम्यान लस न घेतलेल्यानी लगेचच कोवीड लस घेण्याचे आवाहन केले गेले. कोरोनाला अटकाव घालण्यात कोवीड लस ही महत्वाचा घटक असून ज्या लोकांनी अद्याप लस घेतलेली नसेल त्यांनी तातडीने लस घेण्याचे आवाहनही केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी केले. तर कल्याण डोंबिवलीमध्ये आता पर्यंत ७२ टक्के नागरिकांचा पहिला आणि ५२  टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला झाला असल्याची माहिती आयुक्तां कडून देण्यात आली आहे.

-रोशन उबाळे

कल्याण पुर्वेतील भाजपच्या रोजगार मेळाव्यातुन शेकडोंच्या हाताला काम; विविध औद्योगिक कंपन्यांचा सहभाग

कल्याण :- पूर्वेतील भारतीय जनता पार्टी व श्री शिवप्रतिष्ठाण युवा हिंदुस्थान यांच्या संयुक्त विध्यमाने भव्य अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात जवळपास दिड हजार लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. यातील मुलाखतीद्वारे शेकडो लोकांच्या हाताला नवे काम लागले आहे. या उपक्रमासाठी कल्याण पूर्व भाजप अध्यक्ष संजय बा. मोरे यांनी विशेष पुढाकार घेतला होता.

कोरोनाच्या दोन लाटांमुळे अनेक लोकांच्या हातचे काम सुटले. बेरोजगारी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नवतरुण तसेच गरजूंच्या हाताला पुन्हा काम लागावे यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देता यावा यासाठी हा मेळावा आयोजित करीत असल्याचे कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले. बँकिंग, कॉल सेंटर, सेक्युरिटी, बॅक ऑफिस, शैक्षणिक, वैदयकीय, रिअल इस्टेट, मॅकेनिक अशा विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या मेळाव्यात उपलब्ध होत्या. असंख्य नव तरुण व तरुणी यांनी फॉर्म भरून मुलाखती दिल्या. विविध क्षेत्रातील संस्थांना या मेळाव्यामार्फत आपल्यासाठी उपयुक्त असे एम्प्लॉय या मेळाव्यात मिळाले. शेकडो लोकांना लागलीच कॉल लेटर देण्यात आले.

कल्याण पुर्वेत आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या मेळाव्यात रोजगारासाठी हजारोंच्या संख्येने तरुण उपस्थित होते. या समवेत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठाण युवा हिंदुस्थानचे पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड हे देखील उपस्थित होते.

“आजच्या तरुणाईच्या हातात ताकद आहे, बुद्धी आहे. परंतु रोजगार नसल्याने अनेक प्रश्न उद्भवतात. याकरिता रोजगार मेळावा आयोजित करून केलेला हा एक छोटासा प्रयत्न. कोरोनामुळे निर्माण झालेली बेरोजगारी व अन्य बाबी पाहता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन भाजपा कल्याण पूर्व मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व त्यांना त्याचा लाभही झाला. भाजपा सदैव युवकांसोबत आहे अशी ग्वाही देतो.”

संजय मोरे (अध्यक्ष, भाजपा कल्याण पूर्व)

-संतोष दिवाडकर

महाराष्ट्रात ओमीक्रोनने उघडलं खात; डोंबिवलीत आढळला पहिला रुग्ण

डोंबिवली :- कल्याण डोंबिवलीकरांसाठी चिंताजनक अशी माहिती समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला तरुण आता ओमीक्रोन पोजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रातील हा पहिला ओमीक्रोन संक्रमित रुग्ण असून राज्यात ओमीक्रोनचा आता शिरकाव झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२४ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून हा ३३ वर्षीय युवक दुबई-दिल्ली मार्गे मुंबई विमानतळावर उतरला होता. तिथुन टेक्सीने तो डोंबिवलीत आला. मात्र तो आला तेव्हाच त्याला हलका ताप होता. पुढे टेस्ट दरम्यान त्याचा रिपोर्ट कोरोना पोजिटिव्ह आला होता. मात्र त्याचे सेंपल्स मुंबईत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला ज्यात तो ओमीक्रोन संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णावर आता पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना जवळपास आटोक्यात आलेला आहे. असे असताना आता ओमीक्रोनने शिरकाव केल्याने महानगरपालिका प्रशासनाची तारांबळ उडालेली आहे. महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यावर काय उपाययोजना करणार हे आता लवकरच स्पष्ट होईल. सध्या तरी घाबरून न जाता मास्कचा वापर, हात व तोंड स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे हे सर्व नियम पाळण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेला व्यापारी वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिक मात्र या नव्या प्रकरणामुळे अधिक हवालदिल झाले आहेत.

ओमीक्रोन हा कोरोनाचा नवीन व्हेरीयंट आहे. भारतात आतापर्यंत चार रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकातुन ओमीक्रोनने भारतात आपले खाते उघडले. पहिले दोन रुग्ण या राज्यात आढळले. त्यानंतर तिसरा रुग्ण गुजरात मध्ये आढळला. आणि आता महाराष्ट्रात डोंबिवलीत चौथा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

-संतोष दिवाडकर

Durgadi Fort : भारतीय नौसेना दिन, शिवराय आणि कल्याणचे ऐतिहासिक महत्त्व

भारतीय नौसेना दिन हा दिवस ४ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौसेनेचे जनक म्हणून संबोधले जाते. ( Durgadi Fort ) आजकाल समाज माध्यमांवर याबाबत सर्वाना अवगत झाले आहे. शिवाजी महाराजांनी समुद्री आरमाराची स्थापना केली असल्याने त्यांना नौसेनेचे जनक म्हटले जाते. मात्र त्यांनी हे आरमार कुठे स्थापन केले ? याबद्दलची माहिती सर्वाधिक लोकांपर्यंत आज गेलेलीच नाही.

आरमाराआधीचे कल्याण :- छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्री आरमाराची सुरुवात कल्याण मधून केली. महाराजांच्या जन्मापूर्वी या शहरात परकीय राजवट राज्य करीत होते. पोर्तुगीजांनी पश्चिम किनारपट्टीवर कब्जा केला होता. त्याकाळी कल्याणमध्ये लाकूड आणि वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू होता. कल्याण शेजारील भिवंडी शहरात वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणावर चालत असे. हातमागावर तयार झालेला कपडा जलमार्गाने देखील सर्वत्र पोहोचत असे. याच शहरात शेतीच्या अवजारांची निर्मिती होत असे. यानिमित्ताने व्यापार करण्यासाठी आलेल्या पोर्तुगीजांनी ठाणे खाडी किनारी वखारी बांधल्या. आणि त्याच्या आडोशाला गढी चौक्या देखील उभ्या केल्या.

कल्याण ताब्यात घेऊन किल्ल्याची निर्मिती :- हिंदवी स्वराज्याचा विस्तार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी २४ ऑक्टोबर १६५७ रोजी आदिलशाहीच्या ताब्यात असलेले कल्याण शहर जिंकले आणि स्वराज्यात सामील करून घेतले. खरंतर हा दिवस कल्याण शहर वासीयांसाठी स्वातंत्र्य दिवसच म्हणावा लागेल. कल्याण पाठोपाठ भिवंडी शहर देखील स्वराज्याचा भाग बनले. शिवाजी महाराजांनी कल्याण काबीज केल्यानंतर ठाणे परिसरातील समुद्रातून आत येणारे खाडीमार्ग अभ्यासपूर्ण हेरून घेतले. पोर्तुगीज आणि त्याच बरोबर इंग्रजांचा दूरदृष्टीने विचार करून त्यांनी कल्याणच्या खाडी किनारी दुर्गाडी किल्ला उभारायचे ठरवले. पुढे आबाजी महादेव यांना किल्ला बांधताना अमाप द्रव्ये सापडली. देवीची कृपादृष्टी म्हणून या किल्ल्याला दुर्गाडी असे नाव मिळाले. याच दुर्गाडी किल्ल्यावर आश्रय घेऊन शिवाजी महाराजांनी समुद्री आरमाराची स्थापना केली. अनुभवी आणि कौशल्य असलेल्या तरबेज लोकांकडून त्यांनी जहाजे बांधून घेतली.

जहाजांची निर्मिती :- छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्यावरून समुद्री आरमाराची सुरुवात केली. यासाठी त्यांनी गोदी निर्माण केली. जिथून ही जहाजे बनविण्यात आली. त्यांच्या आरमारात तरांडी, तारवे, शिबाडे, गुराबा, पगारा, तिरकाठी, मचवा, पाल, संगमीऱ्या, फत्तेमाऱ्या अशी निरनिराळी जहाजे, गलबते उभी राहिली. त्यांची जहाजे ठाणे खाडीतून दाभोळ, रत्नागिरी, राजापूर आणि कारवारपर्यंत ये जा करत होती. ही जहाजे अरुंद होती व नाळेचा भाग निमुळता असल्याने पाणी कापून वेगही धरत होती. ही जहाजे शत्रूला चकवा देऊन सहज पुढे निघून जात होती. समुद्री स्वराज्याच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराजांचे आरमार पूर्णपणे सज्ज झाले होते. पुढे याच आरमाराने पोर्तुगीज, इंग्रज, डच, सिद्धी आदींवर जरब बसवली होती.

आरमाराच्या मदतीने कोकण किनाऱ्यावर असलेले किल्ले ताब्यात घेणे आणि ते दुरुस्त करणे, नव्याने काही किल्ले बांधणे असे उपक्रम त्यांनी सुरु केले होते. जस-जशी मराठ्यांची आरमारी ताकद वाढू लागली तसे त्यांचे शत्रू अधिक हालचाली करू लागले.

आरमाराच्या मदतीने समुद्रात साम्राज्य :- १६६० ते १६६४ या काळात सुवर्णदुर्ग , विजयदुर्ग, रत्नदुर्ग, सिंधुदुर्ग असे जलदुर्ग बांधले गेले किंवा त्यांची पुर्नबांधणी केली गेली. कुलाबा आणि खांदेरी हे जलदुर्ग राजांनी १६७८-७९ नंतर बांधले. मराठा आरमार ह्या जलदुर्गांच्या ताकदीवर समुद्रात फिरे. शत्रूस जेरीस आणणे आणि गरज पडल्यास माघार घेत जलदुर्गांच्या आश्रयाला येई. पश्चिम किनारपट्टीच्या सुरक्षेबरोबर राजांनी सागरी व्यापार सुरु केला. त्यासाठी मीठ वाहून नेणारी जहाजे बांधली. मुघलांशी राजकारण करून थेट मस्कतपर्यंत व्यापार सुरु केला. आता आरमार आणि व्यापार एकमेकांच्या जोडीने वाढू लागले. सुरक्षा असेल तर व्यापार वाढतो आणि व्यापारातून झालेल्या फायद्यामधून अधिक प्रबळ आरमार उभे करता येते.

१६६५ पर्यंत संपूर्ण कोकण मराठ्यांच्या ताब्यात आलेले होते. आदिलशहाची सत्ता उखडली गेली होती. मात्र जंजिर्याच्या जोरावर दंडा-राजापुरी सिद्दी धरून होता. मुंबईमध्ये इंग्रज (इस्ट इंडिया कंपनी) अजून स्वतःचे बस्तान बसवत होते आणि गोव्याला पोर्तुगीझ आपली राजधानी राखून होते. शिवाय ठाणे – वसई भाग त्यांच्या ताब्यात होताच.

नवीन जहाजांची निर्मिती :- स्वतःची जशी जमिनीवरची युद्धपद्धती ठरवली होती तशी आता समुद्रावरची युद्धपद्धती ते ठरवत होते. सुरवातीची पद्धत अतिशय सोपी होती. खोल समुद्रात संचार न करता जलदुर्गांच्या संरक्षणाखाली राहून, किनाऱ्या-किनाऱ्याने शत्रूला हुलकावणी देऊ शकतील अश्या बोटी बनवण्याच्या मागे ते लागले होते. तेंव्हा ‘गुराबे’ आणि ‘गलबते’ बनवायची तयारी जोमाने सुरु झाली होती. गुराब हे १५० ते ३०० टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज असते. ह्यावर २-३ डोलकाठ्या असतात. एकावेळी १५०-२०० सैनिक आणि खलाशी ह्यातून प्रवास करू शकत. गलबत हे आकाराने असून लहान असते. ७०-८० टन क्षमता असलेले हे जहाज फारतर १०० सैनिक वाहून नेत असे. मात्र जलद हालचालीच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त असे जहाज होते.

व्यापारासाठी धोरण निश्चित :- जस-जसे आरमार सजू लागले तशी त्याची व्यापारी धोरणे सुद्धा निश्चित केली गेली होती. सागरी व्यापारातून मिळणारे सर्व उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा केले जाई. आरमारात काम करणाऱ्या प्रत्येकाला महिना पगार मिळायचा. कोणालाही सागरी उत्पन्नातून हिस्सा घेण्याची मुभा नव्हती. सर्व सुभ्यांना स्पष्ट ताकीद होती की विविध बंदरामध्ये येणाऱ्या जहाजांना कुठलीही तोशीश लावता कामा नये. त्यांना योग्य ती सुरक्षा देणे हे आरमाराचे काम होते. जर बंदरेच नाही राहिली तर व्यापार कुठून होणार आणि कुठून मिळणार जकात हे साधे तत्व होते. मिळणाऱ्या जकातीवर आणि अधिक व्यापारावर आरमार सजवीत जावे असे राजांचे धोरण होते. फक्त बंदरातच नाही तर दर्यामध्ये देखील उगाच कोणा व्यापारावर उपद्रव करू नये अशी स्पष्ट ताकीद सर्वांना होती. जर चुकून शत्रू पक्षाकडील व्यापाराचे जहाज कुठल्याही बंदरात आले तरी ते लुटू नये, सुभेदारांनी जाऊन त्याची परीक्षा करावी आणि योग्य ते समाधान करावे, त्यांना अधिकाधिक आपल्या कडील जिन्नस विकावे आणि योग्य जकात वसूल करावी असे कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.

शून्यातून राज्याचे एक नये अंग सजू लागले होते. फक्त पायदळ आणि घौडदळ असलेल्या मराठा फौजेकडे आता आरमार सुद्धा तयार झाले होते. त्याच्या जोरावर ते आता शत्रूला आव्हान देण्यास सज्ज झाले होते.

संकलित लेखन :- संतोष दिवाडकर

संदर्भ :-
https://www.maayboli.com/node/31679

https://www.google.com/amp/s/maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/shivramaya-armaram-thane-creek-and-portuguesa/amp_articleshow/64429383.cms