माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

प्र.क्र.९० चिकणीपाडा येथे माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा प्रभागातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. तसेच शिबिराचे आयोजन केल्या बद्दल आयोजकांचे आभार मानले.

शिवसेनेच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड या गेली पाच वर्षे प्रभाग क्रमांक ९० चिकणीपाडाच्या नगरसेविका म्हणून काम करीत होत्या. संगीता गायकवाड यांनी प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले होते. आरोग्यम धनसंपदा फाउंडेशन, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल – रिसर्च सेंटर, तेरणा डेंटल कॉलेज व ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

आयोजित शिबिराचा लाभ प्रभागातील असंख्य नागरिकांनी घेतला. या शिबिरात मोफत डोळे तपासणी, दातांची तपासणी, विविध आजारांची तपासणी केली गेली. या नंतर हृदय,अन्ननलिका,एपेंडीक्स,कॅन्सर,यकृत,मणके,किडनी,मुतखडा,गर्भाशय,हाडांचे फ्रॅक्चर अशा विविध शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. प्रभागातील गरीब नागरिकांसाठी हे शिबीर लाभदायक ठरले असल्याचे नागरिक सांगतात. तसेच गरजू व गरजू लोकांसाठी असे शिबिर आयोजित करायलाच हवे असे मत प्रभागाच्या तत्कालीन नगरसेविका संगीता गायकवाड यांनी व्यक्त केले.

संगीता गायकवाड यांनी आयोजित केलेल्या शिबिरात शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पूर्व विधानसभा सहसंपर्क प्रमुख शरद पाटील, माजी नगरसेवक निलेश शिंदे, परिवहन सभापती मनोज चौधरी, शिवसेना शिवसेना उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, महिला शहर संघटक पुष्पा ठाकरे, युवासेना शहर अधिकारी संजय मोरे, सागर घायवट, वैशाली पेटकर, सचिन राणे, सुरेश काळे, विवेक बर्वे, निंबाळकर, सूरज विर, संतोष दिघे, छबुताई रणसिंगे आदी महिला आघाडी तसेच शिवसेना युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रेल्वे कामगारांनी लावलेल्या नायलॉन सदृश रश्शीमुळे दोघांचा गळा चिरून मृत्यू – कल्याण रेल्वे स्थानक हद्दीतील घटना

कल्याण रेल्वे स्थानक हद्दीत गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी एक गंभीर दुर्घटना घडली. फलाट क्रमांक ७ नजीक काम सुरू असल्याने कर्मचाऱ्यांनी प्रवेश निषिद्ध करण्यासाठी नायलॉन रश्शी लावली. मात्र ही रश्शी न दिसल्याने दोघांचा गळा चिरून मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे.

काम सुरू असताना ‘काम सुरू आहे’ फलकासह बेरिकेट लावणे गरजेचे होते मात्र असे न करता नायलॉन सदृश रश्शी लावली. ही रश्शी डोळ्यांना न दिसल्याने दोन तरुणांचा गळा चिरून दुर्दैवी मृत्यू झाला. योगेश सांगळे व मुकेश राय अशी दोन्ही मृत युवकांची नावे आहेत. या घटनेत रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो.

आज शनिवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कल्याण डोंबिवली शहर युवक कार्याध्यक्ष भारत सोनवणे यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे. मृत्युमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना मोबदला मिळणे व रस्त्यावर रश्शी बांधणाऱ्याना निलंबित करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्थानक प्रबंधक, एरिया मॅनेजर, आरपीएक इंचार्ज, वरीष्ठ पोलीस निरीक्षक जीआरपी यांना ही निवेदने देण्यात आलेली आहेत. शिवाय न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देखील रिपाईच्या वतीने देण्यात आलेला आहे. यावेळी मोठ्या संख्येने रिपाईचे युवक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मृतांना न्याय मिळावा याकरिता समाजसेवक सुमेध हुमने व शेखर केदारे देखील उपस्थित होते.

“… तर मग कल्याणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरणार” – जगन्नाथ शिंदे

उल्हासनदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी ‘मी कल्याणकर’ ही सामाजिक संस्था गेल्या तीन दिवसांपासून धरणे आंदोलन करण्यासाठी नदीपात्रात बसलेली आहे. क.डों.म.पा.चे माजी नगरसेवक नितीन निकम आणि त्यांच्या समवेत काही समाजसेवक देखील या आंदोलनासाठी बसलेले आहेत.

नितीन निकम हे गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने उल्हासनदी प्रश्नावर आंदोलने करीत आहेत. उल्हासनदी पत्रातील परिस्थिती पुन्हा एकदा दयनीय झाली आहे. नागरिकांच्या हिताचा प्रश्न असल्याने त्यांना राजकीय पक्ष व संघटनांचा पाठिंबा दरवेळेस मिळतो. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः निकम यांच्या आंदोलनाला मागील वेळेस भेट दिली होती.

उल्हास नदी प्रश्नावर सुरू असलेल्या धरणे आंदोलना संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी स्वतः आंदोलनकर्त्यांची आंदोलन स्थळी जाऊन भेट घेतली आणि समस्या जाणून घेतली. आंदोलनाचा गंभीर विषय अद्यापही प्रशासन मनावर घेत नसल्याचे दिसून येत आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी ते सबंधित यंत्रणांच्या भेटीगाठी घेणार आहेत. जर प्रशासनाने हा तिढा सोडवला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा जगन्नाथ शिंदे यांनी दिला आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात निवडणूक जवळ आलेली असताना शिवसेना,भाजपा,मनसे आदी पक्षांनी याच महिन्यात विविध विषयावर आंदोलने पुकारली होती. आणि याच आंदोलनातुन राजकीय पक्षांनी आपले शक्तिप्रदर्शन केले. आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील उल्हास नदी प्रश्नावर आंदोलन करण्याचा तयारीत आहे. त्यामुळे उल्हास नदी प्रश्न प्रशासनाने सोडवला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काही दिवसांत रस्त्यावर उतरताना दिसू शकेल. आणि असा इशाराही जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी आता दिला आहे.

कल्याणमध्ये आंदोलनातून मनसेने दाखवली ताकद

क.डों.म.पा.ची निवडणूक महिन्याभरावर आलेली असताना शहरात राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. राजकीय पक्ष आपआपला जोर दाखवू लागले आहेत. मनसेने देखील डोंबिवलीत दोन झटके झेलल्यानंतर कल्याणमध्ये आंदोलनाच्या मार्फत शक्तीप्रदर्शन केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण-डोंबिवली शहराच्या वतीने आज पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आणि वाढीव वीजबिल विरोधात महामोर्चा आयोजित केला होता. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यलयाला भेट दिली. डोंबिवली शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज घरत तसेच कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई, मनसेचे काही नगरसेवक, माजी आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात एकवटले होते.

शहरात होणार्या आगामी महापालिका निवडणुकांसाठी पक्ष तयार असल्याचा इशारा मनसेने विरोधकांना दिलाय का ? असाही सवाल या आंदोलनातील शक्तीप्रदर्शनातून व्यक्त केला जातोय.

कल्याण – डोंबिवलीचे उत्तर आठ दिवसांत देणार – अविनाश जाधव ,मनसे जिल्हाध्यक्ष

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक अवघ्या महिन्या भरावर येऊन ठेपलेली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ सुरू झालेली आहे. यातच मनसेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या डोंबिवलीतुन दोन महत्त्वाचे मोहरे पक्षातून गेल्याने पक्षाने आता अधिक जोर लावला असल्याचे दिसते.

काही दिवसांपूर्वी डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम आणि क.डों.म.पा.चे विरोधी पक्ष नेतेपद भूषविलेले मंदार हळबे या दोघांनीही मनसेला जय महाराष्ट्र करीत शिवसेना आणि भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर मनोज घरत यांना तत्काळ डोंबिवली शहर अध्यक्ष बनविण्यात आले. आणि ‘व्हायचं ते होणारच’ अशा शब्दांत मनसे आमदार राजू पाटील यांनी विरोधकांना चेतावणी दिली.

बुधवारी कृष्णकुंज येथे शेकडो सेना-भाजप कार्यकर्त्यांनी तसेच ५०० उत्तर भारतीयांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचे योगदान होते. हा पक्षप्रवेश म्हणजे डोंबिवलीचे उत्तर होते का ? असा सवाल त्यांना उपस्थित माध्यमांनी केला होता.
“कल्याण डोंबिवलीचे उत्तर कल्याण डोंबिवलीतच देणार. आठ दहा दिवस थांबा राजू पाटील मोठा पक्ष प्रवेश घडवून आणणार आहेत.” असे त्यांनी माध्यमांना सांगितले.

आठ दिवसांत मनसे कल्याण डोंबिवलीत कोणाला पक्षात आणणार याकडे संपूर्ण मनसैनिक आणि इतर राजकीय पक्ष आताच लक्ष ठेवून आहेत. मनसे बेरजेची गणित जुळवण्याची तयारी करीत असताना इतर पक्षांना वजबाकीचा सामना करावा लागू नये म्हणजे नवलच.

वाह ! कंपनीचा कामगारच निघाला चोर. – बदलापूर पोलिसांचा पाच तासात शोध

बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात ४ फेब्रुवारी रोजी मुद्देमाल चोरीला गेली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. गुन्हा घडल्यानंतर पाच तासांच्या आतच पोलिसांना गुन्ह्याची उकल करण्यात यश आले आहे. यात आरोपी कंपनीतलाच कामगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका कुरियर कंपनीत अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला होता. कंपनीत शिरून अज्ञात चोरट्यांनी २,४५,७०५ रुपये असलेली लोखंडी तिजोरी लंपास केली. शिवाय चोरीचा सुगावा न लागावा यासाठी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज जिथे सेव्ह होते ती २००० रुपये किंमतीची डिव्हीआर मशीन देखील काढून नेली. चोरी झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज नसल्याने पोलिसांनी अथक मेहनत घेतली आणि चोरांच्या येण्या जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर गुप्त माहीतगारा कडून पोलिसांनी माहिती मिळवली आणि काही तासांतच पाच आरोपींचा शोध लावला. त्यातील दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आणि त्यांच्या कडून तिजोरी हस्तगत करण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कंपनीतील ३५ कामगारांची चौकशी केली. यातील एका कामगारावर पोलिसांना संशय बळावला. अधिक सखोल तपास केला असता या चोरीशी त्याचा सबंध असल्याचे उघड झाले. तो याच कुरियर कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करीत होता. कंपनीतील सर्व माहिती त्याला असल्याने त्याने बाहेरील साथीदारांना सोबत घेऊन कट रचला आणि चोरी केली. परंतु हि चोरी आता उघड झाल्याने त्याला आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

गुन्ह्यातील आरोपींवर बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात भा.दं. वि. कलम ३८०,४५४ व ४५७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज ठाकरेंमुळे महापालिकेत कॅबिन मिळाली आणि आता पक्ष सोडला. – नव्या शहराध्यक्षाची घणाघाती टीका.

डोंबिवलीत मनसेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात भाषण करताना मनसेच्या नव्या डोंबिवली शहराध्यक्षांनी मनसे सोडलेल्यां वर घणाघाती टीका केली.

मागील आठवड्यात डोंबिवली मध्ये मनसेला दोन मोठे धक्के बसल्याचे पहायला मिळाले. एक म्हणजे शहराध्यक्ष पद सोडून राजेश कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर मनसेचे विरोधी पक्ष नेतेपद भूषविलेले मंदार हळबे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर डोंबिवलीच्या शहराध्यक्षपदी मनोज घरत यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली.

डोंबिवलीत पार पडलेल्या महाराष्ट्र सैनिक मेळाव्यात बोलताना मनोज घरत यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर नाव न घेता सडकून टिका केली. जे गेले त्यांनी स्वतःचा इमान विकला आहे. त्यांनी स्वतःला विकलंय असे त्यांनी आरोप केले. तर राज साहेबांमुळे ज्यांना इतके वर्ष महापालिकेत केबिन मिळाली ते देखील स्वार्थीपणे सोडून गेलेत. आपण इमान विकायचा नाही असा घणाघाती आरोप त्यांनी मनसे सोडून गेलेल्यांवर केला आहे. डोंबिवलीत आयोजित पक्षाच्या मेळाव्यातून ते बोलत होते. मनोज घरत यांची नियुक्ती झाल्या नंतर मनसेने कल्याण डोंबिवलीत पक्ष बांधणी करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येते.

सत्ताधाऱ्यांना आंदोलन करायची गरज काय ? – मनसे नेत्या शालिनी ठाकरे

डोंबिवली ग्रामीण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. याच समारंभाला मनसे नेत्या तसेच सरचिटणीस शालिनी ठाकरे उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य अशा दोन्ही सरकारला जाब विचारला.

महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शालिनी ठाकरे आल्या होत्या. मात्र पत्रकारांनी राज्यातील राजकीय पक्षांच्या आंदोलना बाबत विचारले असता शालिनी ठाकरे यांनी दोन्ही पक्षाना सवाल केले आहेत.

शुक्रवारी भाजपाने वाढीव वीजबिल कमी करण्यासाठीच्या मुद्द्यावर राज्यातील सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन केले. तर शिवसेनेने देखील वाढीव इंधनदर आणि गॅस दरवाढीच्या मुद्द्यावर केंद्रातील भाजप सरकार विरोधात आंदोलन केले. हे दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. तरीही आंदोलन करीत आहेत. यांना आंदोलन करायची काय आवश्यकता आहे ? हे प्रश्न सोडवायचे सोडून एकमेकांवर लादत आहेत. असा आरोप व सवाल मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केल्या. डोंबिवलीतील आयोजित मनसेच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

पवना लेक कॅम्पिंग – अमावस्येच्या काळोखातील एक चित्तथरारक प्रसंग ; भाग सहा

टीप :- ज्यांनी या आधीचे भाग वाचले नसतील त्यांनी नक्की वाचा अन्यथा कथा आपणास समजणार नाही.पूर्वसूत्र :- मागील भागात आपण पहिले कि ज्या मुलाला भूत समजून करिश्मा गौरव जंगलात पळतात तो भूत नसून शिकारी असतो. त्यांना शोधायला निघालेल्या माझ्या टीम सोबत तोही सामील होतो. करिश्मा गौरवचा सामना अजगराशी होतो. त्याच अजगराचा सामना लेखकाशी होतो. जंगलात गेलेल्या मुलाच्या शोधात कॅम्पिंग जवळ सर्व बैचेन होतात. जीवन,गणेश आणि काही लोक देखील शोधकार्यात पडतात. इतक्यात कोल्ह्यांचा एक टोळक लेखक आणि त्याच्या समवेत असणार्या लोकांच्या अंगावर येते. आता पुढे वाचा कथेचा शेवटचा टप्पा…..

त्या बारक्या पोरा माग आमची पळापळ सुरू झाली. आणि समोरून पाच सहा कोल्हे आमच्या दिशेने यायला लागले. बहुतेक आता आपलं खरं नाही असा विचार करून आम्ही सर्वे एकमेकांजवळ बिलगलो. एका कोल्ह्याने लांबूनच आमच्यावर झडप घातली. पुन्हा एकदा माझ्या कानाजवळून सपकन काही तरी गेल्याचा आवाज झाला. आणि मी पाहिले तर तो कोल्हा जमिनीवर तरफडू लागला होता. नंतर मला समजले की त्या बरक्याचा बाण पुन्हा एकदा माझ्या जवळून गेला. कारण तो आवाज दुसऱ्यांदा कानावर पडला होता. त्याच्या बाणाने थेट कोल्ह्याच्या तोंडाचा वेध घेतला होता. त्यानंतर तो मुलगा आमच्या पुढ्यात गुडघ्यावर बसला. त्याने पाठीमागे हात नेत एक बाण काढला आणि विजेच्या वेगाने समोर सोडला. एका मागोमाग एक त्याने आणखी दोन कोल्ही उतानी केली. ते पाहून बाकीची पळून गेली. आमच्या समोर तीन कोल्हे मरून पडले होते.”बारक्या तू नसता ना आज आमचं सगळ्यांच कामच झालं असत” अशोक त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला.”आज तुमच्या मुळ शिकार झाली. नायतर मी कोटम्याव रातभर बसून एक ससा नेला असता तेवढा.” तो ही खुश झाला. त्याने ते मेलेले कोल्हे एका ठिकाणी ठेवले. आणि आम्ही पुन्हा वनव्याकडे पळ काढला.

“एक मिनिटं सगळ्यांनी वरून व्हा” सखाराम आबाने पोरांना अचानकपणे थांबवले.”काय झालं आबा ?” गणेशने खांद्यावरची बंदूक काढली.”आर माझ्या कडचा बेटरीचा फोकस लय डेंजर. हे बघ काय” त्याने टॉर्च मारली.”आग बाबो… कसल मोठं जनवार आहे ते… हे तर माणूस गिटिन एखादा” एक मुलगा म्हणाला.”केमेरा पण नाही नाहीतर या अजगराचा फोटो व्हिडीओ घेतले असते. फोन पण नाही आणला शीट” जीवन तळमळ करू लागला.”पाव्हन माझा फोन देऊ का ?” गणेशच्या मित्राने विचारले.”अरे पण त्याच्या जवळ कोण जायचं. केमेरा असता तर झूम केलं असत.” जीवन म्हणाला.”चला वरून व्हा पोराव. लवकर बघू तिकड जाऊन” असे म्हणत पुन्हा पळापळ सुरू झाली.

करिश्मा आणि गौरव धावत धावत एका ठिकाणी आले. तिथे वणव्याची फिकीर नव्हती. पण उजेडावर त्यांना सर्व काही दिसत होते. आणि आम्हालाही ते दोघे दिसत होते.”आर दादा ते दोघ सापडले र” बारक्या पळता पळता थांबला.”कुठंय?” घामाने भिजलेले आम्ही धापा टाकत एक सुरात म्हणालो.”ते बघा तिकडं लांब पायथराला शिखराच्या” असे म्हणतात आम्ही वर पाहिले.वर जाणे आता शक्य नव्हते. वर आता एक उंच शिखर दिसत होते. आता वरती जायचं म्हणजे थेट शिखराच्याही वरती असे तो बारक्या म्हणत होता. “गौरव….” अंकुशने आवाज दिला. “दादा वणव्याचा आवाज हाय र… तिथं आवाज पोहोचायचा नाही.” बारक्या असे म्हणाला आणि त्या दिशेने निघाला. आम्ही त्याच्या मागे निघालो.

“देवा खंडोबा रक्षण कर र पोरांचं” खंडू बुवा सारखे भंडारा फुकत होते. “अहो शिंदे मला वाटतंय वणवा लागलाय रानात. दिसतंय का तुम्हाला?” असे म्हणत संदीप सर केम्पिंग पासूनच पाहू लागले. दूरचे पाहण्यासाठी शिंदे सरांनी चष्मा काढला आणि शर्टाला पुसू लागले. तोच पाठीमागून धक्का लागला आणि हातातला चष्मा सटकून तो खाली पडला. तसा त्याच्या काचा फुटल्या. “अहो मॅडम काय हो” शिंदे सर म्हणाले.”अहो अप्पा मी नाही मी इथे आहे” मोरे मॅडम म्हणाल्या.”मग मला धक्का कुणी दिला?” असे म्हणत शिंदे सर मागे वळले.हातात बाटली घेऊन ड्रायव्हर सम्राट डुलत डुलत पाहत होता. “ही ही ही सॉरी हा सर जी. गलती से मेरा पैर फिसला और धक्का लगा” ड्रायव्हर हसत बोलू लागला.शिंदे सरांनी त्याच्या हातातली बाटली खेचली आणि लांब धरणाकडे फेकून दिली.”हराम** तू काय ठरवलंय का मला त्रास द्यायचं” शिंदे सर वैतागले.”आरे बाबा तू जा इथून तुला हात जोडतो मी सम्राट जी” संदीप सरांनी त्याला पुन्हा तिथून जायला सांगितले. शिंदे सरांनी चष्म्याची फ्रेम उचलून खिशात ठेवली.

आता आम्ही देखील गौरव करिश्मा जवळ पोहोचलो होतो. “ए करिश्मा ताई…. ते बघ ते… संतोष,विशाल, संदेश… सगळे आलेत आपल्याला शोधत” गौरवने आम्हाला पाहिले.करिष्माने मान वळवली आणि आम्हाला पाहून ती रडायला लागली. तिला आम्हाला पाहून अश्रू अनावर झाले. दोघेही उठले आणि हळूहळू आमच्या दिशेने यायला लागले आणि आम्ही त्यांच्या. दमलो असल्याने अगदी हळुवारपणे आम्ही चालत होतो. वणव्याचा प्रकाशात सर्व काही दिसत होते. “ए बारक्या इथे हाड हाड का पडलेत रे बघावं तिथं” ऋषीने विचारले.”ओ या भागात कुणी येत नाही किंवा आलं नाही कधी. मी स्वतः पहिल्यांदा येतोय” तो बोलला.”बापरे आपण मग चांगलीच एडव्हेंचर केलंय आज” अंकुश म्हणाला.”आ…. आर दादा… शssss आवाज करू नका…” त्याने आम्हाला थांबवले आणि तो कावरा बावरा होऊन आजूबाजूला पाहू लागला. “ए बाबा काय झालं भुताडकी आहे का इथं?” मी विचारले.”आर दादा आपण शिखरा पाशी आलोय. आणि इथं हडक पण आहेत.” तो मागे पाहून म्हणाला.”म्हणजे?” विशालने विचारले.”म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे” असे म्हणत ऋषी हसायला लागला आणि खिशातील पुडी काढली.”बरोबर बोलला र दादा” बारक्याने ऋषीला सांगितले.”ए काय बरोबरे ? तुला काय म्हणायचंय ते सांग नक्की?” विशालने विचारले.”म्हणजे दादा इथं वाघ आहे” बारक्या दबक्या आवाजात म्हणाला.वाघ म्हणताच आम्हाला परत घाम फुटला. सर्वांना धड धड व्हायला लागली. आम्ही इकडे तिकडे नजर फिरवू लागलो.”म्हणजे आता नसेल ना तो?” विचारता विचारता ऋषीच्या हातातली पुडी निसटून खाली पडली. “आता हाड दिसतायत ना इथं. मग वाघ पण इथंच आहे” बारक्या म्हणाला.आम्ही पुरते घाबरलो. संदेशने दोघांना पटापट येण्याचा इशारा केला. “असू द्या घाबरू नका. आख जंगल हिंडलो. काय झालं का ? बारक्या सोबत आहे ना?” अशोकने धीर दिला.

गौरव आणि करिश्मा आमच्या दिशेने येत होते. आणि वाटेतच त्यांच्या डाव्या बाजूला एक भलेमोठे भगदाड होते. “अय्या हे काय ?” करिष्माने गौरवला ते भगदाड दाखवत विचारले.”काय माहिती ? भुयार बियार असेल” गौरव म्हणाला. “इथे खजिना असेल का रे?” करिश्माने हसतच विचारले.”हो का…. त्या लोकांना बघून लय जोर आला वाटत तुला?” गौरव म्हणला.ते पुढे निघणार तितक्यात आतून आवाज आला.”कसला आवाज हा ?” करिष्माने विचारले.”हा आवाज पहिल्यांदा ऐकलाय. पण हा आवाज ऐकल्या सारखे वाटते. पिक्चर मध्ये” गौरव म्हणाला.”गौऱ्या…. हे भुयार नाही…. ही गुहा आहे..” करिश्मा शांतपणे म्हणाली.”आणि तो आवाज नाही ती डरकाळी होती” गौरव देखील शांतपणेच म्हणाला.दोघेही जोरात ओरडले आणि आमच्या दिशेने पळू लागले.

“आरं ए गणेश खाली आरडाओरडा झाला का र ?” सखाराम आबाने कानोसा घेतला.”आबा आबा पोर दिसतायत पलिकडे” जीवन ओरडला.तसे वरच्या म्हणजेच गुहेच्या बाजूने ते सर्व धावत येऊ लागले. एक मोठी डरकाळी फोडत एक भलामोठा वाघ गुहेतून उडी घेऊन बाहेर आला. बापरे मी टीव्ही आणि राणीच्या बागेत पाहिला त्यानंतर आता पाहिला. एक पट्टेदार वाघ. अतिशय धिप्पाड. लांब लांब मिश्या , भलेमोठे तोंड. आणि तितकाच मोठा त्याचा जबडा व त्यातून दिसणारे सूळया सारखे त्याचे दात. पाहताक्षणी एखादा चक्कर यावा असा तो वाघ. तुम्ही या ठिकाणी मोगली चित्रपटातला शेरखान आठवलात तरी चालेल.

गौरव आणि करिश्मा पुढे पळत होते. त्या वाघाने एकवार नजर टाकली. पंजाने जमिनीवर पाय विखुरले आणि त्यांच्या पाठीमागे तो लागला. पळता पळता करिष्माचा पाय अडखळला आणि ती पडली. गौरव तिला उचलत होता. तोच वाघ त्यांच्या अगदी जवळ येऊन थांबला. दोघेही त्या वाघाकडे पाहत होते. त्यांच्यात जेमतेम दहा बारा पावलांचे अंतर उरले होते. वाघाने त्यांच्या कडे पाहत गदागदा मान हलवली आणि आकाशात पाहत डरकाळी फोडली. त्या आवाजाने सारे जंगल दुमदुमले.”ओह माय गोड” अंकुश उद्गारला.इतक्यात बारक्या गुडघ्यावर बसला. तसा आमच्या जीवात जीव आला.”कम ऑन बारक्या” कपाळावरून घाम टिपत संदेश म्हणाला.बारक्याने धनुष्य हातात धरला. आणि एक हात मागे नेत बाण चाचपडला.”बारक्या बाहुबली ची स्टाईल बंद कर आणि सोड बाण” अशोक बोलला.”आर दादा चार बाण होते… संपले” बारक्या पुन्हा उठला.”आरे तीन कोल्हे मारले… चौथा बाण काय केला ?” विशालने विचारले.”अहो दादा पहिलाच बाण तुमच्या बाजूने नाय का गेला?” त्याने माझ्या कडे पाहिले. आता म्हटलं काही खरं नाही. आता काय करावं सुचेना.

वाघाने चार पावले मागे घेतली.”चालला वाटत?” अंकुश हळूच म्हणाला. तितक्यात मला अक्षय कुमारचा डायलॉग आठवला.’शेर जब चार कदम पिछे जाता हे तो वो झपटने के लिये’ असं आठवलं आणि म्हटलं आता संपलं. तितक्यात वाघाने एक उंच झडप घेतली. त्या दोघांनी डोळे मिटले. आम्ही देखील माना वळवल्या. तोच एक जोरात बार झाला. आणि धाडकन वाघ कोसळला. आम्ही माना वर करून पाहिले. समोर पाहतो तर काय ? वाघाच्या मागे काही अंतरावर गणेश उभा आणि त्याच्या खांद्यावर बंदूक. नेम धरून तो तसाच उभा होता. वेळेवर येऊन त्याने आम्हाला वाचवले होते. करिश्मा गौरव दोघेही उठून उभे राहिले.

“आरे तुम्ही काय पागल आहेत का रे ? इथे कशाला आलात ?” जीवन वैतागून म्हणाला.”ओ जीवन शेठ इथं काय बोलू नका. खाली जाऊन बोलू. नक्की काय झालं ते तिथे गेल्यावरच समजेल.” विशालने जीवनला शांत केले. “ठेंक्स गणेश बरे झाले तू इथे आलास वेळेवर. नाहीतर आता आमचं काही खरं नव्हतं.” मी त्याचे आभार मानले.तो मात्र सैरभैर झाला होता.”संतोष चला इथून” त्याने सर्वांना चलायला सांगितले. “तू असा का पाहतोयस ?” मी विचारले.”अरे गोळी लागली पण वाघ कुठे गेला ?” गणेश असं म्हणताच सर्वांची पुन्हा एकदा घाबरकुंडी उडाली. फार काही न बोलता आम्ही तिथून पावलं उचलीत घाईने निघालो. “काय नाय गोळी लागल्यावर पळाला असेल” ऋषी घुटकी गिळत म्हणाला.पुन्हा एकदा माझ्या डोक्यात फिल्मी डायलॉग आला. ‘जखमी शेर और खतरनाक होता हे’ आम्ही सर्व काळजीपूर्वक चालत होतो.

अचानकच वरच्या बाजूने वेगाने वाघाने हल्ला केला आणि त्याने थेट गणेशवर झडप घातली. काही कळायच्या आतच गणेश खाली कोसळला आणि घरंगळत खाली गेला. त्याच्या खांद्यावरची बंदूक देखील निसटून एका बाजूला पडली. त्याच्या डोक्याला थोडा मार लागला व रक्त यायला लागले. वाघाच्या देखील पाठीला गोळी लागल्याने तो ही रक्तबंबाळ झालेला. दोघेही एकमेकांसमोर उभे होते. वाघ एक एक पाऊल त्याच्या दिशेने जात होता. तो एक एक पाऊल मागे टाकत होता. वरतून आम्ही सर्वे पाहत होतो. “आर यार दादाने आमचा जीव वाचवून स्वतःचा जीव धोक्यात घातला.” करिश्मा रडकुंडीला येत म्हणाली.गौरवने तिचे उद्गार ऐकले आणि त्यानेही खाली उडी घेतली. “गौऱ्या…. ” करिश्मा जोरात ओरडली.गणेशच्या हातातून निसटलेली बंदूक गौरवने उचलली. “ए पोरा बंदूक आन लवकर वर एकच बार आहे त्यात. डबल बारीची आहे ती. घालतो वाघावर. आन इथे” सखाराम आबाने हाक दिली. वरती आम्ही खाली वाघ आणि गणेश आणि मध्यभागी बंदूक घेऊन गौरव उभा असे चित्र होते. सगळं काही वनव्याच्या उजेडावरच सुरू होत आणि दिसत होत.

सखाराम आबा पर्यन्त बंदूक आणून देई पर्यन्त गणेशच्या नरडीचा घोट वाघ घेणार होता. म्हणून गौरवने बंदूक स्वताच्या खांद्यावर ठेवली. “ओ तेरी… हा काय करतोय ?” अंकुश आश्चर्य व्यक्त करीत एक पूल पुढे आला.”याला बंदूक चालवता येते ? हा वाघ मारेल का?” गणेशच्या एका मित्राने आम्हाला विचारले.”याने कधी ऑफिसमध्ये मुंगळा नाही मारला हा वाघ कधी मारणार ?” संदेश हळूच बोलला.”याने दिवाळीत पण बंदूक नाही चालवली” मी असं म्हणताच सखाराम आबा चक्कर येऊन खाली पडले. गणेशची पावलं थांबली. एका झाडाला येऊन गणेश थांबला. आता त्याला मागे जाता येईना. म्हणून त्याने गुडघ्यावर बसून घेतले आणि स्वतःला त्याच्या स्वाधीन केले. आता आमची दुसरी नजर गौरव वर खिळली. वाघ अगदी गणेशच्या जवळ गेला. गौरवच्या नेम धरणार पण थरकाप उडाल्याने त्याच्या खांद्यावरून बंदूक निसटली आणि खाली पडली. “अरे यार….” जीवनने डोक्याला हात लावला.

“सखाराम आबा खाली जा उठा” चक्कर येऊन पडलेल्या आबाला पोर उठवू लागली. गौरवने पुन्हा बंदूक उचलली. वाघाने गणेशच्या अगदी जवळ आला. त्याने गणेशचा वास घेतला. आणि जिभेने त्याच्या डोक्यावरचे रक्त चाटले. आणि तसाच तो मागे फिरला. पण आठ दहा पावले मागे वळताच गणेशने डोळे उघडले. मागे आलेला वाघ पुन्हा त्याच्या दिशेने धावला. एक उंच झेप त्याने घेतली. आणि डरकाळी फोडत गणेशच्या अंगावर झेपावू लागला. गणेशने डोळे पुन्हा मिटले आणि हात वर केले. इकडे मी जोरात ओरडलो.”गौरव किल….”किल शब्द ऐकताच गौरवने बंदुकीचा चाप ओढला. गोळी बंदुकीच्या नळीतून बाहेर पडली. काही कळण्याच्या आतच गोळी वाघाच्या डोक्यात शिरली. गोळी लागताच वाघ खाली कोसळला. आणि गतप्राण झाला.

“येह…. फट्टासा हेडशोट” असे म्हणत गौरव जोरात ओरडला. आम्ही सगळे काहीवेळ पाहतच राहिलो. गणेश देखील एक वेळ वाघाकडे, एकवेळ गौरवकडे आणि आमच्याकडे पाहू लागला. आम्ही सर्वांनी धपाधप खाली उड्या घेतल्या. गणेशच्या मित्रांनी गौरवला उचलून घेतले आणि नाचायला लागले. मी त्याच्या डोक्यावर जोरजोरात कुरवाळून शाबासकी दिली. आम्ही क्रिकेट मॅच सारखं सेलिब्रेशन करू लागलो. सखाराम आबा शुद्धीवर आले आणि त्यांना काय झाले कळेनाच. ते पुन्हा बेशुद्ध झाले. “आरे तू होळीला बंदूक वापरीत नाय. आन तुला कस जमलं हे ?” जीवन हसतच गौरवला विचारू लागला. “हा रे कसं काय ? ते पण डायरेक्ट डोक्यात हेडशोट ?” अंकुशने ही विचारले.

“भाई पबजी…. ” गौरव उद्गारला.”पबजी ??” विशालने विचारले.”पब्जीचा अनुभव कामी आला. संतोष किल म्हणाला आणि पब्जी समजून मी नेम धरला. किल….” गौरव म्हणाला.आम्ही सगळे हसायला लागलो. त्यानंतर आम्ही सर्वे उठलो आणि केम्पिंग कडे निघालो. रात्रभर काय झालं हे सगळं आम्ही केम्पिंग कडे येऊन कथन करीत होतो. आमची चित्तथरारक गोष्ट ऐकून सगळे भारावून गेले होते. जो तो आपला आपला किस्सा सांगत होता. की त्यांनी काय काय पाहिलं. जो ससा पाहून गौरव करिश्मा रानात गेले तो बारक्याच्या फासात अडकला होता. आणि बारक्याला घाबरूनच पुढे जे घडले ते घडले. बारक्याने गौरव आणि करिश्माला तो ससा दिला. आणि रान डुक्कर घेऊन तो त्याच्या घरी गेला. सकाळ होत आली. आम्हाला रात्रभर झोप नसल्याने आम्ही दमलो होतो. पण आता झोपलो तर केम्पिंग ची मजा येणार नव्हती. तरी गणेश म्हणाला तीन चार तास झोपा आपण करूच मजा. आणि आम्हाला रूम मध्ये बिछाना घालून दिला.

शिंदे सर टॉयलेट कडे गेले. पण पाहता तर आमचा ड्रायव्हर त्या संडासात पिऊन आडवा झालेला.”आरे बाबा तू काय माझी पाठ धरलीस ? चल उठ हो बाहेर” शिंदे सर जोरजोरात आरडाओरडा करू लागले. पुन्हा संदीप सर हसत हसत तिथे गेले आणि त्यांनी ड्रायव्हरला तिथून बाहेर नेले. दुसऱ्या दिवशी आम्ही केम्पिंग मध्ये खूप धमाल केली. पण खरं सांगतो खरं एडव्हेंचर ना रात्रीच आजमावल होत. अगदी जीवावर बेतणार एडव्हेंचर. जे आमच्या या आठवणीत कायम बसणार होत.धन्यवाद !

टीप :- वरील कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा कसलाही संबंध नाही. कथेतील काही पात्र ही लेखकाच्या परिचयाची असून इतर पात्रे तयार करण्यात आली आहेत. मनोरंजनाच्या दृष्टीने लिहलेली ही कथा काल्पनिक असल्याने कोणत्याही वन्य प्राण्यांची हिंसा होणे देखील काल्पनिकच आहे. वन्य प्राण्यांची हत्या करणे कायद्याने गुन्हा असून आम्ही त्याचे समर्थन करीत नाही. याउलट प्राणी मित्र म्हणून आम्ही निसर्गाचे ऋणी आहोत. त्याचबरोबर २०२० ची हि शेवटची कथामालिका देखील इथेच संपत आहे. भेटूयात नव्या वर्षात नव्या उमेदीत आणि काही नव्या कथा व संकल्पनासह. तो पर्यंत धन्यवाद !!!!

पवना लेक कॅम्पिंग – अमावस्येच्या काळोखातील एक चित्तथरारक प्रसंग ; भाग पाच

टीप :- ज्यांनी सुरुवातीचे चार भाग वाचले नसतील त्यांनी नक्की वाचा अन्यथा कथा आपणास समजणार नाही.पूर्वसूत्र :- मागील भागात आपण पहिले कि करिश्मा आणि गौरव एका सश्याच्या पाठीमागे जाऊन जंगलात हरवतात. तिथे त्यांना एक दहा वर्षाचा लहान मुलगा दिसतो. ज्याला घाबरून ते जंगलात आणखी आत शिरतात. शेकोटी जवळ बसलेले त्यांच्या शोधात निघतात. कॅम्पिंग जवळ सर्वजण गायब झाल्याने सिनियर मंडळी चिंताग्रस्त होतात. आता पुढे….

सर्वांच्या मोबाईलचे टॉर्च सुरू होते. सगळ्यांना घेऊन मी वाट काढीत जंगलातून वरच्या बाजूला निघत होतो. आणि सपकन काहीतरी माझ्या कानाच्या बाजूने गेल्याचे जाणवले. “ए कोणे ? काये?” मी ओरडलो.तसे सगळे काय झालं म्हणून पाहू लागले.तितक्यात आम्हाला समोरून कोणी तरी येत असल्याचे जाणवले. अचानक समोर प्रकाश पेटला. तो प्रकाश एखाद्या जुन्या कंदिलाचा असावा. आणि एक दहा वर्षांचा मुलगा आमच्या दिशेने येऊ लागला. लांब सडक केस, कधीही न धुतलेले, उघडा बंब, मळकी चड्डी. तो आमच्या जवळ आला. “कोण रं तुम्ही ?” त्याने विचारले.”तू कोण आहेस ?” मी विचारले.”थोडक्यात वाचला रं दादा तू. आता माझा बाण लागला असता तुम्हाला. मला वाटलं जनावर आलं म्हणून मी सोडला बाण” तो त्यांच्या कातकरी ट्यून मध्ये म्हणाला.त्यावरून मी ओळखले हा एखादया कातकऱ्याचा मुलगा आहे आणि तो शिकारीला आला आहे. “शिकारीला आलाय का ?” मी विचारले.”शिकारीला आलोय पण काय भेटना आज. फासात तेव्हढा एक ससा गुतलाय. पण मोठं जनावर काय मिळत नाय आज” असे तो म्हणाला.”ए बारक्या इथे कुणी आलं होतं का रे ? म्हणजे एखादा माणूस आणि पोरगा पोरगी ?” अशोकने विचारले.”माणूस नाय ओ माहिती. पण पोरगा पोरगी आलथ इथं” तो म्हणाला”कुठं गेले ते?” संदेशने पटकन विचारले.”अहो इथं माझा फास होता म्हणून काय अडकल बघाय आलो तर मला एक पोरगा नी पोरगी दिसले” तो म्हणाला.”मग कुठे गेले ते ?” ऋषीने विचारले.”मी त्यांच्या जवळ जात होतो तर मला घाबरून इकड वरल्या बाजूला पळाले दोघे” तो म्हणाला.”अरे बारक्या तू दिसतोस असा भुता सारखा. तू आवाज देऊन थांबवायचं ना” विशाल म्हणाला.”आवाज ? आवाज दिला तर जनावर पळून जाईल की” तो म्हणू लागला.”एक काम कर आम्हाला दाखव ते कुठे गेले” स्वप्नील म्हणाला.”अहो हे इथून वर निघा या जाळकांडातुन वाकून पुढं निघा” त्याने बोट दाखवले.”तू चल ना बारक्या आम्हाला नाही ना माहिती” अशोक म्हणाला.”मी कशाला ? इथं जनावर येत. पाण्याचा कोटमा आहे इथं. इथंच असतो मी” तो काही येईना. “अरे चल ना बाळा. आम्हाला काही माहीत नाही रे. तुला पैसे देतो.” प्रसादने खिशातून दहाच्या नोटा काढल्या.”बर चला. माझा कंदील घ्या इकडे.” तो म्हणाला.ऋषीने त्याचा कंदील धरला तसे आम्ही त्याचा मागोमाग जंगलात वरच्या बाजूला निघालो.

“हे मोठं इपरित झालं म्हणायचं” खंडू बुवा म्हणाले.”तुमच्या मालकाला बोलवून घ्या” संदीप सर म्हणाले.”अहो तो मालक गावात राहतो. आणि गाव इथून काय जवळ नाय. एक काम करा तुम्ही तुमची गाडी काढा. आपण मालकाला आणू” खंडू बुवा म्हणाले.तसा जीवन गाडीकडे बघून आला.”अहो सर तो ड्रायव्हर गाडीत नाहीये. त्याला पण नेला वाटत अशोकने” जीवन म्हणाला.”कशाला आणला असला माणूस. ” शिंदे सर वैतागले.”आयला हि काय फालतूगिरीये ? ओ शिंदे सर बघुयात का आपण जाऊन ?” संदीप सर म्हणाले.”नाय नाय तसं करू नका. तुम्हाला माहिती नाय. आणि पोरं पण जाणकार नाय. ती १००% चुकणार आत. कारण जाणकार जरी गेला तरी तो आत गेल्याव सैरभैर होतो. वाट घवत नाय. थांबा आपण सखाराम आबा ला आणू त्याच घर हितून जवळे. ते पक्क हुशारे. रानातलं सगळं माहितीये त्याला.” असे म्हणत खंडू बुवा आत गेले आणि भंडारा घेऊन बाहेर आले. त्यांनी सर्वांच्या माथी भंडारा फासला. “देवा खंडोबा रक्षण कर र बाळ गोपाळाच” असे म्हणत थोडासा भंडारा जंगलाच्या दिशेने फुकुन दिला.

“गौरव मला वाटत आपण इथे दगडाच्या पाठी जरा सेफ आहोत.” असे करिश्मा म्हणते ना म्हणते तेच तिच्या हाताला कसलासा स्पर्श झाला. तिने हात मागे घेतला. “गौरव ? काय झालं?” तिने विचारले.”काही नाही ताई. मलाही वाटत आपण इथे सेफ आहोत. एक काम करू का ? मी ना इथे आग लावतो म्हणजे प्राणी येणार नाहीत” गौरव म्हणाला.दगडाला बिलगलेल्या करिश्माच्या मानेला पुन्हा स्पर्श झाला.”गौरव तू काय करतोयस ?” तिने थोडे रागात विचारले.”अग मी मघाशी बार्बेक्यू पेटवले ना तर माचीस खिशात राहील होत. थांब मी इथे गवत पेटवतो. म्हणजे इशारा मिळेल जो आपल्याला शोधेल त्याला.” उभे राहत गौरव म्हणाला.”गौरव तू तिकडे आहेस ? मग इथे माझ्या बाजूला कोण आहे?” असे म्हणत करिश्मा धावपळ करीत उठली. आणि त्याच्या सोबत उभी राहिली.”काय झालं दीदी आता?” गौरव म्हणाला.”अरे मला वाटलं की तुझा हात मला लागतोय पण तू तर इथे आहेस. तिथे अंधारात कोण आहे बघ बर. ते मघासच पोरग तर नसेल ?” करिश्मा म्हणाली.”अरे पण इथे मला तू दिसत नाहीस. आपण कुठे बसलो तेही दिसत नाहीये.” गौरव म्हणाला.”अरे हे काय इथे समोरच दोन पावलांवर बसलेलो आपण. तू ते माचीस पेटव आणि त्याच्या उजेडावर बघ” करिश्मा म्हणाली.”हा हा थांब” असे म्हणत गौरव ने माचीस पेटवले. आणि जवळ नेले. काहीतरी दिसले आणि तितक्यात माचीस विझले.”गौरव काय आहे तिथे?” करिश्मा घाबरून म्हणाली.”थांब यार काय नीट दिसले नाही.” गौरव म्हणाला.त्याने दुसरी काडी पेटवली. तसा उजेड पसरला. आणि त्या उजेडात त्यांनी जे पाहिले ते पाहून त्यांच्या पाया खालची जमीनच सरकली. दोघेही थरथर कपू लागले. ते दोघे बसलेल्या ठिकाणी एक भले मोठे अजगर बिळातून बाहेर येऊन बसले होते. एनाकोंडा पिक्चर मध्ये असावं अगदी त्यापेक्षा थोडं लहान. पुढ्यात असलेलं अक्राळ विक्राळ अजगर पाहून करिश्माला चक्कर येऊ लागली. दोघे पुन्हा एकदा धावायला लागले. गौरव अंधारातून वाट काढू लागला.

इकडे आम्ही आम्ही चालत चालत एका ठिकाणी आलो. बारक्या क्षणभर थांबला.”आर दादा…. इकड आण जरा कंदील. इथं रान डुक्कर हाय. कुणी मारलं असेल याला ? अर्ध खाल्लं आहे र. बिबट्याने खाल्लं असणार” असे म्हणत तो ते डुक्कर गोणीत भरू लागला.”काय बिबट्या ? पण तुझा केम्पिंगवाला मित्र तर म्हणाला इथं बिबट्या नसतो” संदेशने मला विचारले.”आरं दादा… रानात आलाय तुम्ही. इथे असणारच ना.” तो मुलगा म्हणाला.”ए बारक्या ते जाऊदे आता. ते दोघे कुठे आहेत ते बघू.” अशोक म्हणाला.” थांबा जरा मी गोणी झाडावर ठेवून येतो. मंग घरी जाताना नेता येईल.” तो सरसर झाडावर गेला आणि गोणी ठेवून आला. आणि आम्ही पुढे जायला निघालो.थोडं पुढे आल्यावर आम्हाला मोबाईलचा टॉर्च दिसला.”विशाल अरे मोबाईलचा टॉर्च दिसतोय.” ऋषी म्हणाला. आम्ही त्या उजेडाचा दिशेने निघालो.

इकडे शिंदे सर, जीवन आणि खंडू बुवा सखाराम आबा च्या घरी आले. सखाराम आबाने त्यांच्या नातवाला गाडीवर गणेशला बोलवायला पाठवले. मदतीला चार माणसं मागितली. आणि ते सर्वे वेताळबुवा च्या झाडा जवळ जमले.

“गौरव माझं ऐक. मला त्या एनकोंडा जवळ सोड. मला नाही जमणार आता पळायला. एकदाच काय ते होऊन जाऊ दे ना” करिश्मा रडायला लागली.गौरव देखील घाबरला होता.”ताई एक मिनिटं मी काही तरी करतो.” असे म्हणत त्याने माचीसची काडी ओढली आणि गवतात टाकली. एकच भडका उडाला. सरसर गवताने पेट घेतला. हवेमुळे आग पांगु लागली.

“अरे हा तर गौरवचा फोन आहे” अंकुशने खाली पडलेला फोन उचलला.”आता कुठे गेले असतील ?” अंकुश पुन्हा म्हणाला.”दादा मला वाटत शिकार झाली तव्हा ते इथच होते. म्हणजे ते इथून पळाले असतील. आणि घाबरून फोन पडला असेल.” तो बारक्या सांगू लागला.”तुला काय वाटत कुठे जातील तिथे चल” विशाल म्हणाला.”या माग माग” असे म्हणत आम्ही त्याच्या मागे निघालो.

खंडू आबा, मोरे मेम आणि श्वेता केम्पिंगच्या ठिकाणी काळजी करीत बसले होते.”बाई असं कशाला करायचं यांनी. नसतो आलं ते परवडले असते” मोरे मॅडम म्हणाल्या.”ओ बाबा सापडतील ना ते” श्वेताने विचारले.”हो… मालक आले वाटत बघा. तिकड फटफटीचा आवाज आला. आता घवतील पोर” खंडू बुवा म्हणाले.”काय झालं सर संतोष पण गेलाय का आत रानात ?” बाईकवरून उतरून झाडाखाली थांबलेल्या सरांना गणेशने विचारले.”हो ना… काय मूर्खपणा करताय काय माहीत. एकतर कुणाला काही माहिती नाही.” संदीप सर म्हणाले.पाठीमागून चार पाच टू व्हीलर आल्या. गणेश आठ-दहा पोर मदतीला घेऊन आला.”सर तुम्ही केम्पिंग पाशी थांबा. आम्ही बघतो.” असे म्हणत गणेश, सखाराम आबा आणि त्याचे काही मित्र रानात शिरले. “थांबा मी पण येतो जोडीला” असे म्हणत जीवन देखील त्यांच्या सोबत निघाला.

गौरवने लावलेली आग आता पूर्ण वाढली होती. आगीच्या भीतीने आसपासचे हिंसक प्राणी दूर पळाले होते. पण आता त्याच आगीत ते दोघेही अडकले होते. आगीच्या उजेडाने ते दूरपर्यंत पाहू शकत होते. आणि उजेडात वाट शोधण्याचा प्रयत्न करीत होते.

“आर ह्या काय ? आग लागली का काय ?” संदेशने आगीचा लोट पहिला.”आग लागली नाय र लावली आसल.” बारक्या वेगाने चालू लागला.”कुणी लावली?” अंकुशने विचारले.”तुमच्या मित्रांनी लावली असल. अशी लागत नाही आग. आणि दुसरं कोण येत नाय र इथं. तेच असतील” असे म्हणत आम्ही त्याच्या मागे चालत सुटलो.

जीवन, गणेश आणि त्याचे मित्र पाठीमागून वेगाने डोंगर चढत होते. काट्या कुट्यातून ते वाट काढीत होते.”आबा कुढ गेली असतील पोर ?” गणेशने विचारले.”आर हित जाळी मोडली आहे. वरच्या भागातच असतील. सायरीच्या रानात” असे म्हणत ते ही वाट काढू लागले. गणेशच्या खांद्यावर चापाची बंदूक लोड केलेली होती. अचानक होणाऱ्या कुठल्याही हल्ल्या पासून बचाव करण्यासाठी.

गौरव आणि करिश्मा आगीच्या विळख्यातुन स्वतःची सुटका करतात. दोघेही धुराने काळे झालेले असतात. परंतु ते जीव वाचवून पळत असतात. कारण वणवाही त्यांच्या पाठीमागे वेगाने येत असतो. जर हालचाल केली नाहीतर वणवा त्यांना गाठू शकत होता. नाविलाजाने त्यांनी आणखीन वरच्या बाजूला प्रवास सुरु केला. पाठीमागून येणाऱ्या वनव्याच्या उजेडावर ते पुढचे आणि पाया खालचे सर्व काही पाहू शकत होते.आम्ही देखील आता वनव्याच्या दिशेने पळत होतो. आणि तितक्यात माझा पाय अडखळला आणि मी तोंडावर आपटलो. पण तोंड वाचवण्यासाठी हात मध्ये आणला म्हणून माझ्या हाताला खरचटले. इतक्यात माझ्या पायाला कायतरी पटकन लपेटल्या सारखे झाले. हातातून निसलेला मोबाईल मी उचलला आणि पाहिले तर एका अक्राळ विक्राळ अजगराने माझ्या पायाला विळखा मारला होता.मी बोंबाबोंब सुरू केली. तसे ते पळणारे सर्व थांबले आणि मागे फिरले. अशोक माझ्या जवळ आला आणि तितकाच दूर गेला.भला मोठा अजगर पाहून कुणाचीच पाचावर धार राहिली नव्हती. त्या बारक्या मुलाने पटकन झडप दिली आणि अजगराचे मुंडके धरले.”आर बघू नका साप व्हडा. मी तोंड धरलय.” तो पोरगा ओरडू लागला.सगळे घाबरत होते. तरीही स्वप्नील, संदेश, अंकुश आणि ऋषीने जोर लावला. प्रसाद, अशोक आणि विशालची हिंमत होईना. पण बराच वेळ सुरू असलेली झटापट पाहुन त्या दोघानीही जोर लावला. काही वेळातच अजगर थकला आणि शांत झाला. तसा विळखा सैल झाला आणि मी माझा पाय खेचला.आवळला गेल्याने पायाला मुंग्या आल्या होत्या. “थांबा सोडू नका… मी सांगतो तव्हर.” त्याने सांगितले.तो एका बाजूला आला आणि त्याने एक इशारा केला तसे सर्वांनी अजगराला सोडले. अजगर देखील हळुवारपणे खालच्या बाजूला निघून गेला. मी देखील कसाबसा उभा राहिलो. आणि पुन्हा शोधमोहीम सुरू केली.

“त्या आईच्या गावात ? गण्या ए आरे हिकडं बघ रक्तये कुणाचं तरी?” त्याच्या मित्राने रक्त दाखवले.जीवन आणि गणेश सर्वच धावू लागले.”आर थांबा भ्येता कायला ? जनावरच दिसतंय. शिकार फिकार झाली आताच” सखाराम आबा म्हणाले.”आग बाबो… कसला र वणवा लागलाय. सायरीच्या रानाला?” एकाने वनव्याकडे लक्ष वळवले.”म्हणजे हे सर्व तिकडे आहेत” गणेश जीवन कडे पाहत म्हणाला.”तुम्हाला कस माहिती गणेशजी” जीवन ने विचारले.”जीवन जी हा वणवा अचानक लागू शकत नाही कुनी लावल्या शिवाय. हे सर्व तिकडेच आसपास असणार चला” गणेश म्हणाला आणि सर्व तिकडे चालू लागले.”त्याआयला पोर हिकडं काय रान पेटवून द्यायला आलीत का काय ?” सखाराम आबा देखील पळता पळता बोलू लागले.

त्या बारक्या पोरा माग आमची पळापळ सुरू झाली. आणि समोरून पाच सहा कोल्हे आमच्या दिशेने यायला लागले. बहुतेक आता आपलं खरं नाही असा विचार करून आम्ही सर्वे एकमेकांजवळ बिलगलो. आणि तितक्यात पापणी मिटायच्या आतच एका कोल्ह्याने लांबूनच आमच्यावर झडप घातली.

क्रमशः