‘आजी’ एक वटवृक्ष अर्थात आधारवडाची सावली

आई …. दोनच शब्दात साऱ्या ब्रम्हांडाची ताकद सामावली आहे. देवाधिकातही आईला प्रथम स्थान आहे. जिच्यामुळे पाहिले हे सुंदर जग ती आई म्हणजे आपल्यासाठी पहिली देवी. आणि बाप हा देव. फक्त एका दिवसा पुरता गोड गोड बोलणे नव्हे तर आयुष्यभर तिच्या उपकाराची जाण ठेवणं म्हणजे जन्माचे सार्थक.

आजच्या या मातृ दिना निमित्त एक गोष्ट मी तुमच्याशी शेअर करतोय. जी नुकत्याच तीन महिन्यांपूर्वी घडली होती. ते सर्व प्रसंग आज मला सर्वांना सांगायचे आहेत ज्यांना ते माहीत नाहीत. ही गोष्ट माझ्या आईच्या आईची म्हणजेच माझ्या आजीची आहे.

आजी आणि आजोबांचे तरुण पणातील छायाचित्र

दिवाडकरांची लेक गोसाव्याची सून झाली आणि पोमगावच्या मारुती गोसावी यांच्याशी तिचा ७० च्या दशकात विवाह झाला. पहिली मुलगी म्हणजे माझी आई, त्या नंतर माझे मामा आणि मग माझ्या तीन मावश्या. अश्या चार बहिणी आणि एक भाऊ असे पाच मुलांचे संगोपन मोठ्या हलाखीत झाले. इतकेच नाहीतर विठ्ठल आणि लक्ष्मण गोसावी हे लहान दिर देखील पाठच्या भावा प्रमाणे होते. सासू आणि सासर्याचे हित पाहून तिने संसार नेटाचा केला.

आजीची सासू बबा बाई आणि माझी लहान मावशी

आजकाल सर्व सुखसोया आहेत. पण २० व्या शतकात खेडेगावात काय होत हो ? साधा रस्ता देखील शहराला जोडला नव्हता. जे काय दळणवळण असायचे ते धरणातून व्हायचे. मुळशी धरणातील लाँचेने गावखेडी जोडली गेली होती. पैसा तर बघण्यातच नसायचा. अश्या हलाखीच्या परिस्थितीत तिने सर्व मुलांना मोठे केले. आणि पुढे ज्याची त्याची लग्न होऊन संसार सुरू झाले.

आजी आजोबा सोबत आजोबांचे लहान भाऊ व भाऊजय

साधारणपणे २१ व्या शतकात परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. कुटुंब वाढली होती. सुखसोयी गावात पोहोचल्या होत्या. जुन्या लोकांना जुने दिवस आठवत होते. पण नव्या पिढीला मोबाईलच्या नेटवर्क पुढे जुन्या दिवसातील त्रास कळणारा नव्हता. माझ्या आजीने लहानपणा पासून लेक, लेकी, नातवंड असं सर्वांना जीव लावला. त्यामुळे तिची माया कुणी विसरणार नाही. आता मी त्या प्रसंगावर येतो जो मला सांगायचा आहे.

फेब्रुवारी महिन्यात माझ्या बहिणीचे लग्न होते. नातीचे लग्न म्हणून माझी आजी शिळीमला आमच्या गावी आली होती. तसं सुरुवातीला तिला सर्दी होती. पण जस जसे लग्नाचे काही दिवस जवळ आले तिच्या सर्दीचे रूपांतर कफ मध्ये झाले. तिच्या छातीत हळूहळू कफ वाढू लागला होता. लग्नाच्या दोन दिवस आधी तिला आम्ही जवणला असलेल्या डॉक्टर कडे नेले होते. त्या डॉक्टरने वाफ दिली आजी औषध गोळ्या देऊन नॉर्मल असल्याचे सांगितले. यानंतर आजीला दोन दिवस काहीसे बरे वाटत होते.

लगीन घर असल्याने जो तो आपल्या घाईत आणि तंद्रीत होता. कार्यक्रम, विशेष रसम, बांगड्या, मेहंदी, सामानाची आवरा आवर, अक्षता, मंडप, लायटिंग, साऊंड, गाणी, उटणे, असे सर्व रसम असल्याने फारसे लक्ष आजीकडे जात नव्हते. मुळात ही वेळ अशी असते की कोणता पाहुणा कुठे असतो हे देखील कुणाला माहीत नसते. आणि इतक्या गडबडीत मात्र आजीचा दम वाढू लागला. तसे दिसताना ती नॉर्मल वाटत होती. कारण जेवतेय, बसतेय असं सर्व दिसत होतं.

लग्नाच्या दिवशी आजी लग्नालाही आली. लग्न पाहीले आणि रात्री घरी आलो. आणि त्या रात्री तिला खूप जास्त त्रास झाला. त्या रात्री ती शिंदू मावशीच्या घरी झोपली होती. रात्रभर तिला श्वास घेता येत नव्हता. मात्र कोणालाही कल्पना नव्हती की त्रास बळावला आहे. सकाळी तिने अंघोळ केली. थोडावेळ बसली आणि ती खाटेवर जाऊन झोपली. तिला प्रचंड दम लागला होता. कोणीतरी मला दवाखान्यात न्यावं असं तिला वाटत होतं. पण तिला जास्त बोलता येत नव्हते. मी, विकास, गणेश उशिरा उठलो होतो. आम्ही नाश्ता केला, पीक आप गाडी घेऊन मंडप वाल्याचे सामान पोहोचवले. दुपारचे जेवणही केले.

दुपारी कुंदा काकूने आजीची तब्येत पाहिली तेव्हा तिला जास्त त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर तिला पुन्हा एकदा डॉक्टर कडे न्यावे लागेल असे वाटले. विकासने पिक अप काढली आणि आजीला पवना नगरला नेले. सोबत काकू आणि गणेश होता.

पवना नगरला डॉक्टरानी तपासल्यानंतर छातीत खूप कफ झाला असून न्यूमोनिया झाला असल्याचे सांगितले. शिवाय एडमीट करून ऑक्सिजन लावावे लागेल असे सांगितले. यानंतर तिला घेऊन गेलेल्यांना तिची तब्येत खालावली असल्याचे समजून आले. यानंतर घरी फोन आला. घरी फोन आल्यानंतर वातावरण देखील बदलले. मी पटकन फोन करून माझ्या मित्राची गाडी बोलवली. पप्पा, रंगनाथ काका, आणि सुरेखा असे तिघे जण त्या गाडीतून कामशेतला निघाले.

कामशेत मधील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात आजीवर उपचार सुरू झाले. आता घरात माझी आई, सुरेखा मावशी दोघेही चिंता करीत होते. बाळू मामा आणि बापू दोघेही बाईक घेऊन पोमगावला डॉक्युमेंट आणायला गेले होते. लोणावळ्याहुन उमेश मामा, रमेश मामा देखील कामशेतला आले होते.

घरी फक्त मी, आई, मावशी, राणी आणि अण्णा एवढेच होतो. त्यात अण्णा खूप जास्त पिले असल्याने त्यांनाही आम्हाला सांभाळावे लागत होते. गावात पाणी नसल्याने लग्नासाठी मागवलेला निम्मा टँकर खाली करून घरात रिकामे झालेले पाण्याचे ड्रम भरायचे होते. अंधार पडायच्या आत आम्ही सर्व पाणी भरले.

रात्री आठ वाजता मामा आणि बापू आले. यावेळी उमेश मामा चा बाळू मामा शी फोनवरून बोलणे झाले. तब्येत जास्त असल्याचे बाळू मामला समजले आणि मामा एकटेच वरहंड्यात बसून राहिले. खात्री साठी मी पप्पांना फोन केला. तर त्यांनी तब्येत ठीक आहे रिपोर्ट आले की आम्ही निघू असे सांगितले. मग गणेश सोबत बोललो. आणि मग उमेश मामाला विचारले. तोवर मामा आणि मावशी आई घरी नुसते अधून मधून रडत होते. खूप भावुक आणि नाजूक असं वातावरण होत. त्यात हे सर्व बीपीचे पेशंट असल्याने मला विशेष काळजी घ्यावी लागत होती. कारण मामा म्हणाले की तिचं काही खरं नाही. आणि तिथून मग तिघेही रडायला लागले.

उमेश मामा ला फोन लावल्या नंतर परिस्थिती समजली. आणि मी फोन स्पीकरला टाकला. तेव्हा आजी ठीक असल्याचे समजले आणि तिघेही शांत झाले. रात्री दहा वाजता हॉस्पिटलमध्ये गेलेली सर्व माणसे घरी आली. आम्ही सर्वांनी जेवण केले. आजीने आम्हाला माझ्या बहिणीच्या जागरण गोंधळाला जायला सांगितले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व तिकडे होतो.

तिसऱ्या दिवशी आम्ही सर्व आजीला पाहायला कामशेतला आलो होतो. हॉस्पिटलमध्ये मी आणि बापू आजीला भेटायला गेलो आणि ती पाहून रडायला लागली. तिला नीट बोलताही येत नव्हते. मी फक्त काळजी घे असं बोललो आणि तिथून निघून आलो. कारण डॉक्टर फार वेळ थांबू देत नाहीत. मात्र हॉस्पिटलमधून निघताना माझी आई, मावशी, मी आम्ही पुन्हा तिला भेटलो. कोणास ठाऊक ही भेट शेवटची ठरावी. कारण तिची किडनी निकामी होत असल्याचे डॉक्टर सांगत होते. कफ पूर्ण छातीत पसरला होता. मात्र आता काहीसा कमी झाल्याचे जाणवत होते.

आजीची सून माया मामी तिची विशेष काळजी घेत होती. मात्र हॉस्पिटलचे बिल जवळपास लाखभर रुपयांवर आले होते. हे हॉस्पिटल परवडणारे नसल्याने इथून दुसरीकडे शिफ्ट करण्याचे प्लॅनिंग सुरू होते. धोका मोठा होता. मात्र पाण्या सारखा पैसा हॉस्पिटल ओरबाडत होते.

चौथ्या दिवशी मी माझ्या बायकोला घेऊन सासरी आलो. कारण तिची तपासणी होती. त्याच दिवशी आजीला दुपार नंतर पुण्यातील सिम्बॉयसिस या मोठ्या मात्र नामांकित हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले. हॉस्पिटल बदलल्यानंतर तिच्या तब्येतीत आणखीन बिघाड झाल्याचे समजले. ती रात्र गेल्यानंतर तिच्या जगण्याची शक्यता धूसर झाली. आम्ही देखील दुसऱ्याच दिवशी बायकोचे चेकअप करून घ्यायचे ठरवले.

पाचव्या दिवशी सकाळीच आम्ही हडपसर कडे निघालो. उमेश मामा सोबत बोलणेही झाले. डॉक्टरानी जगण्याची शक्यता नसल्याचे सांगितले असून आता आजीला गावी नेण्याचे विचार असल्याचे सांगितले. गावी नेणार म्हणजे खेळ संपलेला आहे असाच थोडक्यात त्याचा अर्थ होता. बायकोचे चेकअप झाल्यानंतर आम्ही धनकवडी येथे नातेवाईकांकडे गौरी ताई कृष्णा कुरावले यांच्या घरी मुक्काम केला.

याच रात्री शिळीम मध्ये मोठा हाहाकार माजला होता. सर्व काही संपलं असे समजून माझी आई, काकू, मावशी सर्वजण रडायला लागले. दुसऱ्या दिवशी गाडी करून पोमगावला जायचे असे त्यांचे ठरले. आणि कसेबसे झोपले. रात्रभर कुणाच्या डोळ्याला डोळा नव्हता.

सातव्या दिवसाची सकाळ उजडताच सर्वांनी आवराआवर सुरू केली. आणि तितक्यात एक फोन कॉल पप्पांचा झाला.

“हा बोल उमेश. निघाले का तुम्ही तिकडून ?” पप्पांनी हलक्या आवाजात विचारले.

तोवर घरात आई आणि काकू कोमेजल्या चेहऱ्याने आवराआवर करीत होते. आणि इकडे घराबाहेर फोन सुरू होता.

“दाजी… अहो तुम्ही काय गडबड करू नका निघायची. आईची तब्येत आता वैशि बरिये.” उमेश मामा म्हणाले.

असे ऐकताच पप्पांना आश्चर्याचा धक्का बसला.

“डॉक्टर आलथे आता तपासायला ते म्हणाले पेशंटच्या तब्येतीत सुधारणा जाणवतेय. तुम्ही काही घाई करू नका अजून राहुद्यात इकडे” असे मामांनी सांगितले.

“अच्छा अच्छा वा… देवाला काळजी बाकी. बरं झालं. आता अक्का आणि आम्ही सगळे निघणार होतो थोड्या वेळानी नवनाथची गाडी करून” पप्पा म्हणाले.

हा फोन कॉल संपताच पप्पा ही बातमी सांगायला आतमध्ये आले.

“उमेशचा फोन होता. तो म्हणाला तुम्ही काय तिकडं येऊ नका. मामी आहेत ठीक” पप्पांनी आई आणि काकुला सांगितले.

हे ऐकताच त्यांना कानावर विश्वास बसेना झाला. कोमेजलेले चेहरे पुन्हा एकदा खुलले. आणि सर्वांनी देवाचे आभार मानले. सकाळी ९ वाजता मी देखील असाच कॉल उमेश मामाला केला. त्यांनी देखील मला असेच सांगितले. मलाही छान वाटले. हा एक दैवी चमत्कार होता असे आम्हाला सर्वांना आजही वाटते. मग पोमगावला न जाता आम्ही सरळ पुन्हा राजगुरूनगरला आलो.

दुसऱ्या म्हणजेच आठव्या दिवशी आजीची तब्येत आणखी सुधारली आणि तिला आयसीयू मधून जनरल वॉर्डात शिफ्ट केले. याचा अर्थ हा की धोका आता टळलेला होता. मी, बायको आणि माझे सासू, सासरे, मेव्हणा आम्ही तिला पहायला हॉस्पिटलमध्ये आलो. तिला भेटलो, बोललो, एकदम छान वाटलं. आणि दुसऱ्या दिवशीच आम्ही कल्याणला आलो.

पुढे काही दिवस आजी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत राहिली. सर्वांनी तिची खूप काळजी घेतली. सासू सुनेचे भांडण म्हणजे काही नवीन नाही. मात्र तरीही सून म्हणून माझ्या मामीने तिचे कर्तव्य बजावले. मामी दिवस रात्र तिच्या सोबत हॉस्पिटलमध्ये होती व अजूनही सेवा करीत आहे. अनेकांनी खूप धावपळ आणि मेहनत घेतली. आणि शेवटी काही दिवसानंतर आजीला डिस्चार्ज देण्यात आला.

आजी घरी तर आली पण आता नवा प्रश्न निर्माण झाला होता. ते म्हणजे तिला संडास येत नसल्याने तिचे पोट फुगत होते. शिवाय उलटी होत असल्याने पोटात अन्नही जात नव्हते. थोडाफार फळांचा रस, काहीतरी खाणे आणि पाणी यावरच ती जगत होती. तेव्हाही सर्व जण तिला बघून जात होते. आता काही दिवसांपूर्वी राणीने व्हिडिओ कॉल केला होता. ज्यात जवळपास तीन महिन्यांनंतर आजी आपल्या मूळ रुपात नऊ वारी साडीत आम्हाला दिसली होती. पूर्वी प्रमाणेच ती चालत आणि बसत होती. शिवाय जेवणही हळूहळू सुरू केले होते. म्हणजेच थोडक्यात आता ती पहिल्या सारखी होत आहे. देव करो आणि ती आधी सारखीच धड धाकट होवो.

स्वर्ग रिटर्न आहेस तू… असे अनेक जन तिला म्हणतात. कारण सर्व संपलेले असतानाही ती त्यातूनही सावरून बाहेर आली. तिची जगण्याची प्रचंड इच्छा, तिच्यासाठी प्रार्थना करणारे असंख्य हात, आजारपणातही देवाचा धावा करणारे तिचे मन, जागेवर पडूनही दुसऱ्यांच्या काळजीने खालीवर होणारा तिचा जीव. खरंच देवाच्याही मनात काहीतरी आलं असावं म्हणून देवाने तिला पुनर्जन्म दिला असावा असं आम्हाला वाटत. सारं काही संपलेलं असताना सारं काही सुरू राहतं यामागे कोणती मोठी दैवी शक्ती आहे ? हे आपल्या सारख्या सामान्य माणसाला कळणारे नाही.

आजच्या मातृ दिनाच्या निमित्ताने आज हा ताजा असलेला प्रसंग तुम्हाला मी आज सांगितला. कारण ती आईच असते जिच्या मायेच्या पंखात आम्ही विसावलेलो असतो. एकच सांगेल की जमत असेल तर शक्य तितकी काळजी घ्या, आणि जमत नसेल तर त्रास होणार नाही असे वागू नका. कारण स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी…

संतोष दिवाडकर

गावखेड्यांचा कायापालट; अर्थात हरवत चाललेलं गावपन, भाग दुसरा

आजपासून दोन दशकांपूर्वी म्हणजे २० वर्षांपूर्वीचं माझं गाव आणि आताचं माझं गाव. यात खूप मोठा फरक पडला आहे. म्हणूनच काही जुन्या आठवणींवर उजाळा टाकण्यासाठी त्याचबरोबर आजच्या पिढीला जरा पाठीमागचा आरसा दाखवण्यासाठी म्हणून मी ही नवीन लेख मालिका सुरू केली आहे. तसे फारसे अवघड शब्द न वापरता सोप्या शब्दात परंतु वाचकाला त्या काळात घेऊन जाणे हेच प्रथम उद्दिष्ट. मुळात वाचकाला त्या काळात नेण्या आधी लेखकाला त्या काळात जावे लागते. मागील लेखाला मिळालेला प्रतिसाद पाहता पुढील भाग आणखीन सुंदर बनतील असा आशावाद मला नक्की आहे. परंतु ज्यांनी मागील पहिला भाग वाचला नसेल त्यांनी लिंकवर क्लिक करून आधी तो वाचावा. लिंक https://mhmarathi.in/shilim-village-the-lost-of-rurality/

पूर्वी जी गावाकडची ओढ असायची ती आता कमी होऊ लागली आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे गावाचे हरवत चाललेलं गावपन. गाव आणि शहर यातील फरक हा तोच व्यक्ती सांगू शकतो ज्याने शहरी आणि ग्रामीण जीवनपद्धती लहान पणापासून जगलेली आहे. गावातील पिढीला आपला गाव बदलला आहे एवढेच फक्त जाणवू शकते. या कथा मालिकेतून आपला गाव आणि शहर या दोघांमध्ये काय फरक होता याचेही दर्शन घडणार आहे. तर आता मागील भागापासून पुढे जाऊयात.

शहरातून गावाला पोहोचल्यानंतर अंगणात पोहोचे पर्यंत जवळपास दुपारचे दोन वाजलेले असे. डोक्यावर रनरनत ऊन जरी असलं. तरी फारसे उकडत नसे. शिवाय कोणत्याही दिशेने येणारा सोसाट्याचा वारा हवा घालण्याचे काम करीत होता. वाऱ्यामुळे झाडांची पाने खळखळून आवाज करीत होते. जसे की स्वागताला टाळ्या. उंच उंच फांद्या वाऱ्यावर डोलत होत्या. आणि मध्येच काही चाफ्याची फुल पुष्पवृष्टी करीत होती.

काल्पनिक प्रतिमा

अंगणाच्या पुढे एका बाजूला भला मोठा खड्डा. त्याला म्हणतात उकिरडा. उकिरड्यात काय ? तर घरातील केर कचरा, जेवणातील खरकटे आणि जनावरांचे शेण. सहज सांगायचं तर डंपिंग ग्राउंड. परंतु कसलाही दुर्गंध न सोडणारं.

आणि त्याच्याच जवळपास एका मांडवा खाली उभी असलेली पाखर्या पपट्याची बैल जोडी. दावणीला बांधून असलेली ही काळी कुट्ट बैल आलेल्या पाव्हण्यांकडे बघत राही. आकर्षण असे की त्यांच्या वेसणीला धरून मी त्यांना गोंजारत असे. तसा पाखऱ्या माझा लाडका बैल. कारण तो शांत आणि समजदार होता. आणि पपट्या जवळ गेला तरी फुसकरायचा. लहानपणी चुकून मी माझा हात दावणी समोरील आडव्या खांबावर ठेवला तर त्याने माझं बोटावर शिंग आदळलं होतं. म्हणून पपट्याचा राग यायचा. पण एक सांगू का तो जो गंध यायचा ना बैलांचा आणि शेणाचा त्याच्या पुढे आजचे रूम फ्रेशनरही फिक्केच. एक वेगळाच गंध होता तो. त्यात कुठेतरी आपलेपणा होता.

पाखऱ्या पपट्या

गावात तेव्हा सगळ्यात जास्त चिवचिवाट कोंबड्या आणि त्यांची पिल्ले करायची. ज्याच्या त्याच्या घरात १०-१५ कोंबड्या असायचा. दिवसा मोकळ्या सोडल्या जात असल्याने अंगणात किंवा उकिरड्यात पायाने माती हुसकून दाणे टिपायचा. कधी कधी बैलाच्या समोर टाकलेल्या पेंढ्यातही उस्तरायला जात होत्या. प्रत्येक कोंबडीच्या मागे तिची आठ नऊ पिल्ले. आणि त्या पिल्लां मागे धावणारा मी. कोंबड्या असो किंवा अजून कुठला प्राणी. मला लहानपणापासून त्यांच्या सोबत खेळायचा नाद बनला आहे.

बराच वेळ अंगणातच थांबल्याने घरातून आजी बाहेर यायची.
“बये आला बाई माझा बच्चा, ये बाळा उन्हात नको खेळू घरात ये. जेवून घे ये” अशी आजीची हाक.
शेणाने सारवलेले मातीचे अंगण आणि डोक्यावर गवताच्या झावळीचा मांडव खूप छान सावली देत होता. लाकडाच्या मेढ्या (खांब) जमिनीत रोवून त्यावर मेसकाट (बांबू) बांधून त्याच्यावर पत्र्यां ऐवजी गवताच्या झावळी पसरल्या जायचा. हे मांडव पावसाळा संपला की बनवले जायचे. आणि तीच खरी थंडगार सावली.

काल्पनिक

घरात जाण्यापूर्वी पहिली पायरी म्हणजे एक भला मोठा दगड. हीच घराची पहिली पायरी. त्या चौकोनी दगडावर पाय देऊन लाकडी दाराचा उंबरा ओलांडून घरात प्रवेश व्हायचा. शेणाच्या सारवलेल्या जमिनीवर ना गरमी जाणवत होती ना गारवा. कपडे घाण होतील असे कधी मनातही यायचे नाही. प्लॅस्टिक खुर्ची वगैरे असले काही नव्हते त्या काळी. लाकडी फळ्यांची बनवलेली एक खाट आमच्या घरात होती. गावातील सुताराकडून तासून तासून ती आजोबांनी बनवुन घेतली होती. आणि त्याच आजोबांचा फोटो एका खांडा खाली तिरका लटकत होता. आता खांड म्हणजे काय ? तर ज्याला आज आपण पिलर म्हणतो. दगड माती पासून उभ्या असलेल्या आमच्या घराला लाकडी फळ्यांचा माळा होता. आणि घराला संपूर्ण कौल. या काळात सिमेंटचे पत्रे वगैरे असे खेडोपाडी पोहोचलेच नव्हते.

एका उंचवट्यावर असलेलं आमचं उंच घर. आणि ते ही तितकेच प्रशस्त होते. घरात बैलांचा गोठा, त्यासमोर एक पडघी. पडघी म्हणजे अशी जागा जिथे काही पेंढा, लाकूड फाटा असे काही सामान ठेवतात. आणि त्यानंतर आमची ओटी. आजच्या भाषेत आपण हॉल म्हणतो. तसे पाहता ओट्या सारख्या वाटणाऱ्या भागाला ही ओटी म्हणतात. परंतु आमची ओटी अथवा हॉल हा प्रशस्त होता. आणि मधोमध एका रांगेत सर्व खांब. ज्यावर सुतारांनी त्यांच्या केलेचे उत्तम प्रदर्शन करून नक्षीकाम केलेले होते. या खांबांना ऑइल पेंट मारून अथवा इतर कोणते रंग मारून सजवले जात असे.

काल्पनिक

पुढे उजव्या हाताला एक खोली होती. ज्याला आम्ही आतलं घर म्हणायचो. आजच्या भाषेत त्याला म्हणतील बेड रूम. त्या आतल्या खोलीच्या भिंतींना लागून धान्याचे डबे रचून ठेवले जाई. तसेच एका कोपर्याला जमिनीवर देवघर असे. आणि ओटीच्या डाव्या बाजूला स्वयंपाक घर.

स्वयंपाक घराला लागूनच पुढे मोरी असे. आज सहजपणे बाथरूम बोलतो आपण. तेव्हा मोरीच म्हटले जाई. आताही म्हणतात म्हणा गावाला काही लोक. ती मोरी पण पूर्ण नाही. तर अर्धीच बांधलेली असे. एका कोपऱ्यात अर्धी भिंत बांधली आणि तिला हॉल काढून पाणी बाहेर जायला आउटलेट दिलं की झालं काम. घरातील महिला पुरुष उठण्या पूर्वी आंघोळी आटपत. आणि तिथेच पुढे स्वयंपाकाला बसत. मुळात बसून अंघोळ करीत असल्याने मोरीच्या भिंती अर्ध्या होत्या. आणि त्या अर्ध्या भिंतीवर हंडे कळशी एकावर एक रचून ठेवले जाई. म्हणजे मोरीच्या अर्ध्या भिंतीवर पाणीसाठा केला जायचा. आता असे चित्र दिसणे दुर्लभ.

काल्पनिक

मोरीच्या जवळ लागूनच दुहेरी चूल होती. तशा चुली आताही आहेतच. पण अजून किती काळ असतील सांगू शकत नाही. दुहेरी चूल म्हणजे सर्वसामान्य. एक तोंड आणि दोन बाजू. एका बाजूला कालवण कढत (शिजत) असेल तर एका बाजूला तव्यावर भाकरी भाजल्या जाई. ही भाकर थोडी कच्ची ठेवून तिला चुलीच्या तोंडावर शेकवले जाते. आणि याच चुलीच्या शेजारी कोवळाभर (हातात मावतील एवढी) फाटी (चुलीला जाळायची लाकडं) रचलेली असायची. एखादं फाट जळून संपलं की लगेच दुसरं लावायचं. ही फाटी क्रॉस जाळली जातात. जेणेकरून दोन्ही बाजूला आग पसरेल असं. याच चुलीच्या वरच्या बाजूला लागून असलेल्या भिंती धुराने काळ्या पडलेल्या असायचा.

काल्पनिक

स्वयंपाक घरातील भिंती शेणामातीने रंगवल्या जायचा. याच भिंतीवर बत्त्या लटकवलेल्या असायचा. आता बत्त्या म्हणजे काय ? तर औषधाच्या किंवा दारूच्या बारक्या बाटलीत रॉकेल ओतून त्याच्या झाकणाला हॉल पाडून त्यातून चिंधीची वात करून सोडली जाई. जसं की आपण देवाला दिवा लावतो तसे. पण त्या बत्त्या असायचा रॉकेलच्या. त्या काळात गावागावांत रात्रीच्या वेळी तासनतास लाईट जायची. त्यावेळी या बत्त्या घरोघरी पेटवून ओटीवर ठेवल्या जायचा.

स्वयंपाक घराला दार असायचे. ते म्हणजे घराचे मागचे दार. माझ्या आजोबांनी इथेही एक अंगण बनवले होते. आणि याच ठिकानी तुळस उभारली होती. तर उंच उंच डोलणारी निलगिरीची भलीमोठी झाडं काही अंतरांवर उभी होती.

घरातील एका कोपऱ्यात अण्णांनी म्हणजे माझ्या चूलत्यांनी एक लाकडी शोकेस टाइप कपाट बनवले होते. ज्यावर ब्लॅक एन्ड व्हाइट टीव्ही ठेवला होता. त्याकाळी गावात टीव्ही हा प्रकार कुणा कडेही नसे. रेडिओ जरी असला तरी खूप मोठे आपरुक मानले जाई. घराच्या प्रत्येक भिंतीला चौकोनी अथवा त्रिकोणी देवळ्या होत्या. देवळी म्हणजे काही वस्तू ठेवता येईल अशी जागा. एखाद्या देवळी मध्ये देव पुजलेले असायचे तर एखाद्या देवळीत काचेचा कंदील. तर कुणाचं पाटी पुस्तक.

काल्पनिक

एवढं मोठं घर आणि घरात एकही पंखा त्याकाळी नव्हता. उलट उन्हाळा असला तरी अंगावर घेऊन झोपायला लागते. जे आता कमी होऊ लागले आहे. आता काही लोक आम्हाला टेबल फेन शिवाय झोप येत नाही असे सांगतात. त्याकाळी शहरात असलेली पांढरी शुभ्र ट्युबलाईट अजूनही गावखेड्यात पोहोचली नव्हती. पिवळ्या रंगाचा ब्लब हाच सर्व काही होता. आणि त्याची बटनही एकदम निराळीच होती.

जेवताना सगळी मंडळी सगळं जेवण घेऊन एकत्र बसत. प्रत्येकाच्या ताटात पाहिजे तसं जेवण वाढलं जाई. आता जेवण काय ? तर आमचा गावात भाजीपाला नसायचा. रानात भाज्या असायचा त्या पण पावसाळ्यात. मग उन्हाळ्याच काय जेवण ? उन्हाळ्यात डाळ, मसूर, वाल, काळा घेवडा, काळा वाटाणा अशी वाळवलेली कडधान्याची आमटी असे. भाकरीला पण तीच आणि भाताला पण तीच. पण तोंडी लावायला प्रत्येकाच्या भाकरीच्या टोपलीत एक भला मोठा मिरचीचा गोळा असायचा. लाल मिरच्या पाट्यावर ठेचून, त्यात लसूण, मीठ असं काही टाकून तयार केलेली चटणी. घरात काही भाजी नसेल तर हीच चटणी भाकरीवर घ्यायची आणि लावून लावून खायची. किंवा आणखीन एक म्हणजे तीळकुटाची चटणी. जी आजही गावाला खायला मिळते त्याला आपण भुगी म्हणतो. तेव्हा आम्हाला भूक लागली तर आमची आजी त्या भुगीमध्ये तेल टाकून आम्हाला चपाती बरोबर खायला देई. तेलामुळे ओलावा मिळे आणि तिखटपणा कमी होई. तसं शहरात भूक लागली तर आम्ही जॅम चपाती खायचो. पण गावाला गेलो की मिळेल ते गोड लागायचं. जेवणात फारसे मसाले मिष्टान्न नव्हतं. पण प्रत्येक पदार्थाला आणि कालवणाला एक वेगळीच चव असायची. ती चव पिजा बर्गर समोर पण फेलच.

आता ही सर्व झाली घराची रचना आणि एकंदर राहणीमान. यातील किती गोष्टी तुम्हाला आठवल्या ? तुमचं घर तुम्हाला कस दिसलं ? वीस वर्षांपूर्वी मागचा प्रवास करून तुम्हाला कसं वाटलं ? आणि शहरी भागातील ज्यांनी हा अनुभव घेतला नाही. त्यांना हे चित्र कसं वाटलं ? हे सर्व मला पर्सनली सांगायला विसरू नका. तुम्हाला वाचताना काय अनुभव येतोय हे मला कळण जास्त गरजेचं आहे. भले तुम्ही माझ्यासाठी ओळखीचे असोत किंवा अनोळखी. पण तुमच्या शब्दात मला तुमचा अभिप्राय कळवा. काही लोकांना सांगायचं तर असतं पण लिहायचा कंटाळा करतात पण तुम्ही मला भावना कळल्या नाहीत तर तुम्ही लेख वाचत आहात हे मला अजिबात समजणार नाही. २००३ पासून सुरू झालेल्या या मागच्या प्रवासात कोण कोण सामील आहे हे मलाही बघायला आवडेल. पुढील भागात करूयात नवी सैर एका वेगळ्या प्रसंगासह. तूर्तास धन्यवाद !!!

-संतोष दिवाडकर ( 8767948054 )
या माझ्या व्हॉट्सऍप वर आपल्या कमेंट पोहोचवा.

शिंदेवाडी होळीमाळ येथील जुना फोटो. बैलगाडी पुढे नामदेव शिंदे. बैलगाडीत बसलेले पांढऱ्या वेशात नारायण दिवाडकर, खंडू शिंदे आणि तेव्हाची तरुण पिढी.

या लेखाबद्दल वाचकांनी व्यक्त केलेल्या निवडक भावना

“लहान होता तेव्हा गावाकडं खुप मजा मस्ती केली. आणि मोबाईल नव्हता त्यामुळे पूर्ण वेळ खेळण्यात जायचा. आता सगळे एकत्र बसले तरी प्रत्येकाच्या हातात फोन असतो.”

– दिपाली शिंदे

“वा खुपच छान लिहिलं आहेस तू लहानपणी चा संपूर्ण प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला आम्ही पण शिळिंम ला मामाच्या गावाला जाण्यासाठी खुप आतुर असायचो खूपच छान होते ते लहानपणी चे दिवस आणि गाव आणि गावाकडची प्रेमळ स्वभावाची माणसं गावाला जाऊन आल्या सारखं च वाटलं मला”

– कादंबरी गोसावी

“ज्यांनी हे जगले त्यांच्या चेहऱ्यावर शेवट पर्यंत एक छान स्मितहास्य नक्किच राहत असनार. शिळीम गावच्या आठवनीत. व्यावं पुन्हा लहान आणि जगावं ते बालपण परत. काळाची पावलं मागं नेता आली असती तर किती बरं झालं असतं ना.”

– उज्वला पवार

“खरंच मला त्या काळात गेल्यासारखं वाटलं. क्षणभर सगळं काही ठळकपणे आठवलं. लग्ना नंतरचे आठवत नाही. पण बालपण आठवलं. मस्त लेख आहे.”

– भावना दिवाडकर

“२ रुपयांना जाळीत झाकून ठेवलेला वडा पाव. खरंच बालपण किती छान होत. त्या काळी खिशात २ रुपये जरी असले तरी खूप वाटायचे आणि आता. काय सुख होत त्या बालपणात. आता गूगल पे ने पूर्ण अकाउंट कितीही पैश्यानी भरुदे पण त्या बालपणासारखे सुख नाही कुठेच.

– ओमकार चासकर

“छान वाटलं. जुन्या आठवणी खरच ताज्या झाल्या. क्षणभर अस वाटलं अजून मी तिथेच आहे का. वाचता वाजता रुळून गेली.

– पुजा कदम

“खूप छान लिहलय. आता मोबाईल मुळे गावाचे गावपण हरवल आहे. गावा सारखी मज्जा शहरात नाही घेता येत.”

– अश्विनी इंगळे

“मस्तच! मस्त रमलो जुन्या आठवणीत. पण आज गावाचं गावपण हरवत चाललं आहे. गावांचाही विद्रुप शहरीकरण होत चाललंय. आणि खेदाची बाब म्हणजे आपण यालाच विकास समजतोय. गावाशी जुळलेली नाळ आणि भावना नष्ट होत चालल्या आहेत. आठ वाजताच निद्रिस्त होणारे गाव मध्यरात्री पर्यंत पण मोबाइलच्या स्क्रीनमुळे काजव्याप्रमाणे चमकत आहे. सगळं काही आपल्या हातातून सुटत चाललंय, हि खूप मोठी धोक्याची घंटा आहे.”

– गोपाळ दंडगवळे

“दादा तुमचा लेख वाचला. सत्य परिस्थितीचें वर्णन केले आहे. तुम्ही खरच मावळच काय अशी अनेक पुण्या नजिक गाव आहेत जी आता गाव म्हणून ओळखणे कठीण होत आहे .सतत चालणारे काँक्रिटीकरण, झाडं मुळासकट उखडून टाकली जात आहे खेडी लोप पावत आहेत. मी मूळची कोकणातली पण महाड पोलादपूर जिथे माझ गाव होत तिथे फक्त आता शहरी सांगाडा दिसत आहे. गाव कुठे तरी हरवला आहे. खूपच वाईट वाटत आहे. येणाऱ्या पिढीला गाव काय असतं कधी कळेल का??? हे विचार करूनच खंत वाटत आहे.”

– रोहिणी जाधव
Shilim Village : गावखेड्यांचा कायापालट; अर्थात हरवलेलं गावपन

Shilim Village भारत देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागला आणि देशातील गावखेडी वेगानं विकसित होऊ लागली. शहर आडवी उभी पसरली तर गावांनी हळूहळू शहरात रूपांतर व्हायला सुरुवात केली. पण यात एक गोष्ट मात्र हरवत चालली आहे. ते म्हणजे गावाचं गावपन. भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना गाव म्हणजे काय असतं ? हे देखील कळणे कठीणच. जसं पूर्वी शहरात असे म्हटले जाई की ज्याला गाव आहे तो खरंच भाग्यवान. पण भविष्यात गाव उरतील का ? असा संभ्रम तयार झाला आहे.

गावाचे आधुनिकीकरण होत गेले की त्या गावाला शहर म्हटले जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एखाद्या शहराच्या अथवा परिसराच्या नावात गाव शब्द असणे. उदा. तळेगाव, गोरेगाव, तिसगाव. आता यांच्या नावातच गाव आहे. याचे मूळ कारण म्हणजे कधी एके काळी हे खरोखरच एक गाव होते. मात्र बदलत्या काळानुसार आज यांना शहर म्हणून बघितले जाते. जसे की तळेगाव शहर, गोरेगाव शहर. बदलाचे हे एक उत्तम उदाहरण आहे पण हा बदल पाहणारी पिढी म्हणजे आपल्या आजी आजोबांची. आता जो बदल मी पाहतोय त्या बद्दल मला सांगावेसे वाटेल. इथून पुढे मी बालपणापासूनच्या काही आठवणी आणि बदलांना उजाळा देणार आहे.

जन्मा पासून कल्याण मध्ये राहत असलो तरी माझे मूळ गाव म्हणजे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिळीम हे गाव. लहानपणा पासून गावा बद्दल एक वेगळंच आकर्षण असे. शहरी गजबजलेल्या भागातून शांत निसर्गाच्या सानिध्यात जाणे हे म्हणजे स्वर्ग सुखापेक्षा मोठे नाही. त्यामुळे गणपती आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट आम्ही पाहत असे.

उन्हाळ्याचा दाह आणि शाळेची वार्षिक परीक्षा संपायची वेळ आली की चाहूल लागायची गावाची. शेवटचा पेपर लिहता लिहता गावाला जाण्याबाबत अगोदरच आतुरता लागलेली असायची. कारण बऱ्याच महिन्यानंतर आता गावाची मजा येणार होती. हा काळ असेल साधारणपणे २००३ चा.

ज्या दिवशी गावाला जायचे असते त्याच्या काही दिवसांपूर्वी मी तर नुसते दिवसच मोजत असे. मग गावाला काय काय न्यायचे ? काय काय करायचे ? कुणाला काय काय सांगायचे ? हे सर्व आगोदर ठरलेले असे. मुळात मोबाईल नावाचा प्रकार नसल्याने तिकडे काय काय चालू आहे ? याची कल्पना नसल्याने बरेच काही नवीन ऐकावयास मिळणार हेही माहीत असायचे. त्यामुळे गप्पा मारण्यासाठी पुरेसे विषय जवळ असायचे.

गावाला जाण्याच्या दिवशी सकाळी भल्या पहाटे आपोआपच जाग येई. अंघोळ आवरून तयारी करून घराला कुलूप लावून आम्ही निघे. पप्पा जवळ भल्या मोठ्या बेगी असत. आईकडे एखादी कमी वजनाची बेग आणि आम्ही दोघे बहीण भाऊ मोकळे. रिक्षातून एसटी स्टॅन्ड आणि त्यानंतर एसटी मध्ये चढून आरक्षण केलेल्या सीटवर जाऊन खिडकीत बसणे. एसटी मधली विंडो सीट आम्ही बहीण भाऊ एक एक स्थानकानंतर बदलत असे. आमचा हा क्रम कामशेत येई पर्यंत चालत असे.

कामशेतला आल्या नंतर जुन्या एसटी स्टॅंडवर बराच वेळ बसावे लागे. खूप सारे गावकरी तिथे एसटीची वाट बघत असे. “१२ ची एसटी कव्हा यायची ?” अशा चर्चा तिथे सुरू असत. धोतर, कोपरी अथवा पांढरा शर्ट किंवा सदरा आणि डोक्यावर टोपी घातलेली मंडळी तिथे जास्त असत. आणि मग एसटी आली की चढायची घाई. मग पुन्हा विंडो सीट. आणि मग काही वेळाने सुरू होई माझ्या गावाला पोहोचवणार्या एसटी मधील प्रवास.

कामशेत च्या मुख्य चौकातून एसटी रस्ता पार करून शिळीमच्या मार्गावर लागे. आता या चौकात काही वर्षांपूर्वी फ्लाय ओव्हर बनला आहे. जो त्या काळी नव्हता. त्याकाळी वाहतूक फारशी नसल्याने एसटी आरामशीर रस्ता पार करीत होती. आता इथून पुढे जो रस्ता असे तो एकदम लहान एकेरी आणि पूर्णपणे मोकळा. एसटी व्यतिरिक्त या मार्गावर दुसरे कोणतेही खाजगी वाहन नजरेस पडत नव्हते. क्वचित एखादी जीप गाडी, टेम्पो असे खाजगी वाहन नजरेस पडत असे. आणि राहिला विषय दुचाकीचा तर या काळात बोटावर मोजण्या इतक्याच दुचाक्या या भागात होत्या. त्यामुळे रस्त्यावर लालपरी सोडली तरी सगळा रस्ता सामसूम. आजूबाजूला दिसणारे डोंगर, पिवळी सुकलेली गवत, गावची मोकळी हवा, पवना धरणाचं विहंगम दृश्य हे सर्व नजरेस पडे.

कामशेत नंतर आमची एसटी पवनानगरला येऊन थांबायची. त्या काळी पवनानगर वगैरे असे काही नाव कोणी उच्चारत नसे. ‘कॉलनी आली’ बस एवढंच. आताही कॉलनीच म्हणतात पण तेव्हा फक्त तेवढंच होत. कॉलनीला आल्यानंतर काहीशी दुकान नजरेला पडत. एखाद दोन हॉटेल, काही भाज्यांची दुकानं, आणि काही लोकांची गर्दी इथे नजरेस पडे. यानंतर मात्र पुढील कोणत्याही गावात गजबजाट दिसणार नाही. पुढे जवण गावात फक्त एकच दुकान. एसटी येताच झाडाच्या सावलीत पारावर बसलेली माणसं एसटीत चढून बसत. आणि मग हळूहळू गाव जवळ येई. गावाजवळ एसटी आली की मग रस्त्यावर देवळा शेजारी एसटी उभी राही. एसटीतुन उतरलो की घरातील कोणी तरी घ्यायला येई.

एसटी मधून उतरल्यावर सर्व शुकशुकाट असे. जेमतेम एखाद दोन माणस नजरेस पडत. रस्त्याच्या कडेला लागूनच भैरवनाथाचे मंदिर. एका कडेला मारुती रायाचे मंदिर आणि रस्त्याला फक्त फणसाच्या झाडाची सावली. गावात एक मारवाडीचे दुकान, एक बबन बुवाची टपरी आणि दुसरी भाऊची टपरी. आणि टपरी समोर एक छोटंसं दुकान. बस एवढंच काय ते होत.

आम्ही मंदिरात जाऊन नारळ फोडून हार वगैरे घालून दर्शन घेत. आणि मग जे कोणी घ्यायला येईल त्यांना पप्पा भाऊच्या टपरीतून काहीतरी गोळ्या घेऊन देत. तसं भाऊ आणि पप्पा चांगले गप्पा करायचे. पण ते भाऊ आता कोण होते ? मला काय आठवत नाही. त्यांच्या दुकानात पार्लेच बिस्कीट, पेपरमिंट, हत्ती चिमण्यांच्या गोळ्या, भिंगरीच्या गोळ्या, पिठासारख्या दिसणाऱ्या रंगबेरंगी गोळ्या, ऑरेंज लेमनगोळ्या, सुपारी, बडीशोप असं काही काही मिळत होत. आणि २ रुपयांना जाळीत झाकून ठेवलेला वडापाव. जो त्या काळी महाग वाटत होता. आठण्याच्या आठ गोळ्यांनी खिसा भरून गेला की आम्ही घराकडे निघायचो.

आता त्या काळात शॉर्ट कट म्हणजे भैरीच्या देवळा कडून चिंचेच्या झाडा पासून दोन चार शेत ओलांडून ओसाड पडलेला ओढा ओलांडून एका पांधीतुन वाट काढत आमच्या वाडीत जावे लागायचे. पायी खुपाटा उडवत, एखाद्या करवंदाच्या जाळीच करवंद तोडून हा पायी प्रवास सुखावणारा होता. इथून पुढे आलो की आता सध्या पोल्ट्री लागते. मात्र त्या काळात तिथे असं काही नव्हतं. गावात शिरताना पहिले घर लागायचे ते म्हणजे राऊत यांचं आणि पुढे मारणे. या व्यतिरिक्त तिथे घरं नव्हती. आणि मग पुढे डावीकडे खंडू तात्या शिंदेंच. संपूर्ण गाव शांत वाटत होता. शेमडी बोळातून दोन्ही बाजूला झाडी होती. आणि त्या कमानीतून कृष्णाच्या देवळा पर्यंत चालण्यास वेगळाच फील मिळत होता. मग घरी जाण्या अगोदर कृष्णाच्या देवळात हार घालून पाया पडायचो. त्यावेळी मंदिर आणि पुढील परिसर एकदम रिकामा होता. ना कुठला शेड ना कुठले गेट. मंदिरा समोर फक्त झाडी आणि एका कडेला भेंडीचे झाड बसायला सावली देत होते.

देवाच्या पाया पडून झालं की घराकडे जायला निघत. तेव्हा तिथे कोपरी घालून खंडू शिंदे म्हणजेच गुरुजी सपत्नीक दिसे. मग विचारपूस होत असे. आणखी पुढे आलो की खडकाळ भाग लागत असे. जिथे खडक आणि त्याला गोल गोल असे चार पाच खड्डे. तिथे इंदू आजी असायचा. “आलं दात पडक कोल्ह” असे म्हणत ते मला चिडवायचा. आणि मग त्यांचा नातू विक्रम जो सतत त्यांच्या सोबत असायचा तो ही हसायचा.
“मला आता दात आलेत” असे म्हणून मी उत्तर पण द्यायचो. पण दरवेळी हा ठरलेला प्रश्न आणि उत्तर.

यानंतर मग एका छोट्याशा उंचवट्यावर आमचे मोठे घर वसलेले होते. आता पुढे काय होत असे ? नक्की वाचा पुढच्या भागात.

टीप :- जर संपूर्ण लेख तुम्ही वाचला असेल तर तुम्हालाही तुमच्या भावना आणि आठवणी सांगायची इच्छा नक्की झाली असेल. तुम्हाला वाचून काय वाटलं ? हे मला नक्की सांगा. तुम्ही मला ओळखत असू अथवा नसू. पण मला तुमचे म्हणणे ऐकायला नक्की आवडेल आणि मलाही कळेल की कोणी कोणी वाचले आहे. व्हॉट्सऍप मसेज किंवा कॉल जमेल त्यावर आपले म्हणणे मांडा.

  • संतोष दिवाडकर
    (युवा पत्रकार 8767948054 )

Shilim Village the lost of rurality

श्री कृष्ण मंदिर, शिंदेवाडीचा साधारणपणे ९० च्या दशकातील एक छायाचित्र. हस्तांदोलन राजू दिवाडकर, ताशा वादक नामदेव शिंदे, उजव्या बाजूला खंडू शिंदे आणि इतर काही ग्रामस्थ
खऱ्या दानाचा आनंद काय असतो ? – An experience at the base of Aai Ekvira

खरं तर न राहवून काही तरी सांगावंसं वाटलं आणि बरेच दिवस काही लिहल नव्हतं म्हणून मुद्दामच हे लिहतोय. आज माझ्या ऑफिसमधील स्टाफ सोबत मी एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. खूप गर्दी असल्याने आम्ही फक्त मुख दर्शनच केले. ज्यावेळी दर्शन करीत होतो त्यावेळी सर्व जण हाताला येतील तितके पैसे दहा, वीस, पन्नास , शंभर आईच्या चरणी वाहत होते. (Experience aai ekvira)

आता खरं सांगतो मी देवाच्या चरणी कधीही एकही रुपया दान न करणारा व्यक्ती असल्याने मी याही वेळी असे काही केले नाही. पण आशीर्वाद घेताना जे मागितले त्यावरून फक्त आईला इतकेच बोललो की मी काही पैसे वाहणार नाही आणि तुला त्याची गरज पण नाहीये. तू फक्त आशीर्वाद दे आणि माझ्याकडून गरजूंची मदत करून घे. हे मी मनातल्या मनातच बोललो. मुखदर्शन केले माथा टेकला आणि तिथून निघालो. थोडे फार फोटो सेशन झाले आणि आम्ही सर्व खाली उतरायला सुरुवात केली.

यादरम्यान आमच्यातील तिघे जण पुढे निघून गेले. मी आणि माझा सहकारी मित्र विशाल आम्ही मागून चालत होतो. या दरम्यान पायर्यांवर अनेक जन भेटले. त्यात काही महिला परडी हातात घेऊन दक्षिणा घेत होत्या, काही जण देवाच्या नावाने भिक्षा मागत होते. पण या ठिकाणी मी कधीच दान करीत नसल्याने हात जोडून पूढे निघालो.

जिथून पायऱ्या सुरू होतात त्या ठिकाणी आल्या नंतर एका बाजूला बसलेल्या वयस्कर आदिवासी महिलेने आवाज दिला, दिसायला अशक्त वाटत होती. अंगावर ठाकरी पेहराव म्हणजे ब्लाउज आणि कंबरे खाली साडी असे काहीतरी.

“दादा… आर खायला दे र कायतरी… दे दे चिक्की तरी दे…” तिचे आवाज ऐकून मी थांबलो आणि पटकन पिशवी उचकटून तिला एक चिक्कीचे पाकीट काढून दिले.

“पाणी हाय का रं? खूप वेळ तहानली हाय… दे र दादा पाणी…” तिने पाण्याची मागणी केली.

आमच्याकडे पाणी नव्हते. थोडे पाठीमागेच एक हॉटेल होते. तिथून एक पाण्याची बाटली घेतली आणि त्या महिले पर्यंत आलो. त्यांना म्हटलं…

“हे घ्या पाणी…”
हातात पाण्याची बाटली घेत तिने माझा हात ओढला आणि डोक्याला लावला. त्या आजी बाईने थेट माझ्या पायाला हात लावून पाया पडू लागली. न राहवून मी मागे सरकलो. आणि वाकून तिने पायाला हात लावल्या बद्दल तिच्या पाया पडलो. तिच्या डोळ्यात अश्रू पाहून मला जाणीव झाली की ही महिला पाण्यासाठी कासावीस झाली होती.

“नको नको राहुद्या… पाया नका पडू” त्या महिलेला मी थांबवले.

का कुणास ठाऊक मी तिथून निघालो तरी जोरजोरात जिवाच्या आकांताने ती ओरडत होती…

” बाळा… लय मोठा होशील र तू… देव तुझं भलं करील… तू लय मोठा होशील…” संपूर्ण पायऱ्या संपे पर्यंत ती बाई हेच सांगत होती. का कुणास ठाऊक मी मागेही वळून पाहिले नाही. एकदा हात जोडून निघालो तर पुन्हा मागेही पाहिले नाही. माझा मित्र विशालनेही माझ्या या कृत्या बद्दल मला शाबासकी दिली.

सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की खरं दान हे दानपेटीत नाही तर प्रत्यक्ष गरजू व्यक्तीला मदत करणे आहे. एकविरा मातेला फक्त म्हणालो की मी दान म्हणून इथे पैसे देणार नाही. माझ्या कडून एखाद्याची मदत करवून घे. आणि देवी मातेने हे पुण्यकर्म शेवटी जाता जाता तिच्याच दारात करवूनही घेतलं. ही माझी परीक्षा होती का आणखी काही माहीत नाही. पण हा अनुभव आणि हा प्रसंग लक्षात राहणारा ठरला आहे.

एकविरा माते की जय !!!

-संतोष दिवाडकर

An experience at the base of Aai Ekvira

Foxconn Vedanta Semiconductor Project म्हणजे नेमकं काय ?

Foxconn Vedanta : महाराष्ट्रात होणारा सेमीकंडक्टर प्रकल्प आता गुजरातला नेण्यात येत असल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार होती. मावळ तालुक्यातील तळेगाव येथे होणारा हा १ लाख ५८ हजार कोटींचा भला मोठा प्रकल्प आता गुजरातला होणार असल्याचे जाहीर होताच शिंदे भाजप सरकारवर प्रश्नचिन्ह उमटवले जात आहेत.

फॉक्सकॉन ही तैवान देशातील एक इलेक्ट्रॉनिक कंपनी आहे तर वेदांता ही भारतीय कंपनी. या दोन्ही समूहांनी मिळून भारतात प्रथमच सेमीकंडक्टर प्लांट उभारायचे ठरवले आहे. सेमीकंडक्टर ही एक मायक्रोचिप आहे जी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये वापरली जाते. ज्याकरिता भारताला आजवर चीन वर अवलंबून रहावे लागत होते. ही बाब भारतासाठी गौरवास्पद असून यानंतर लॅपटॉप, टेबलेट, स्मार्टफोन अशा काही उपकरणांच्या किंमती भारतीय बाजारात कमी होण्याची देखील शक्यता आहे.

गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यात हजार एकर जागेवर हा प्रकल्प येत्या दोन वर्षांत उभा राहणार असून त्यानंतर चिप निर्मितीला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती वेदांताचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी गुजरात सरकारशी करारबद्ध होत असताना दिली. यासाठी ६०-४० अशी दोन्ही कंपन्यांची या प्रकल्पात भागेदारी असणार आहे.

भारताचा हा एक मोठा प्रकल्प असून तो महाराष्ट्राच्या मावळ तालुक्यातील तळेगाव येथील एमआयडीसी क्षेत्रात होण्याची तयारी सुरू होती असं महाविकास आघाडी कडून सांगितले जात आहे. मात्र असे असताना हा प्रकल्प गुजरातला कसा काय जातो ? असे सवाल राजकीय वर्तुळात सुरू आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी देखील शिंदे भाजप सरकारवर टिका केली आहे. तर प्रकल्पातून महाराष्ट्रात रोजगार निर्मिती होणार होती. हा प्रकल्प गुजरातला कसा काय नेला याची चौकशी केली जावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील केली आहे.

आम्ही त्यांना अकराशे एकर जमीन दिली होती मात्र मागील दोन वर्षे आधीच्या सरकार कडून त्यांना योग्य रिस्पॉन्स मिळत नसेल असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबाबदार धरले आहे. तर हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

-संतोष दिवाडकर

What exactly is the Foxconn-Vedanta Semiconductor Project? in marathi

मावशीच्या कोंबडीची निराळी गोष्ट

कोंबडीची गोष्ट

काही गोष्टी खूप खास असतात. पण या खास गोष्टी जेव्हा कोणी सांगत नाही तोवर सर्वांना कळत नाही. सध्या मी गावी असल्याने खूप निवांत आहे. करमण्या सारखे काही नसल्याने व नवीन लग्न झाल्याने कुठेही लांब जाण्याची मुभा नसल्याने घरा जवळच मन रमवत असतो. याचं दरम्यान मावशीच्या कोंबडीची गोष्ट आज सांगावी वाटते.

जो फोटो तुम्ही पाहिला असेल त्या कोंबडीचे वय आता ७-८ वर्षे आहे. माझ्या आठवणी प्रमाणे मी कॉलेजच्या अंतिम वर्षाला असल्या पासून या कोंबडीला पाहतोय. शिवाय दरवर्षी येणारे पाव्हणे पण कोंबडी पाहुन आवर्जून पाहत राहतात. एकंदरीत गावात किंवा पंचक्रोशीत सर्वाधिक जगलेली कोंबडी म्हणजे हिच असावी. मुळात कोंबडी ही अंड्यासाठी, कापून खाण्यासाठी किंवा एकतर विकून व्यवसाय करण्यासाठी पाळली जाते. पोल्ट्रीच्या कोंबड्या तर सहा महिन्यांच्या आतच लोकांच्या पोटात जातात. गावठी कोंबड्या जास्तीत जास्त २-४ वर्षे जगवतात आणी नंतर त्यांचा बाजार करून टाकतात. पण हिला ७-८ वर्षे का जगवली ? त्यामागे काय कारण आहे ? हेच तुम्हाला सांगायचे आहे.

आजपासून ६-७ वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या घराजवळील एका कुत्र्याने मावशीच्या कोंबडीवर हल्ला केला. त्या कुत्र्याने कोंबडीची मान धरली. जिथे अन्न साठवले जाते ते अन्नाचे जठर (गचुरा) त्या कुत्र्याने बाहेर काढला होता. खाजा खिज ऐकून घरातील सर्व जन बाहेर आले. त्यांनी कुत्र्याला लांब पिटाळले त्यानंतर त्यांनी कोंबडीला उचलून धरले. पण तिचे अन्नाचे जठर तसेच खाली लोंबत होते. माझ्या दोन्ही मावश्या कुंदा काकू आणी शिंदू मावशी यांनी लगेच हळद आणी मिठाचे मिश्रण केले. लोंबत असलेला गचुरा तसाच परत आत कोंबला आणी त्याच्यावर हळद मिठाचा लेप लावला. संपूर्ण जखम फडक्याने बांधून टाकली आणी कोंबडीला खुराड्यात बसवले.

जीवावर बेतणारा हल्ला होऊनही कोंबडी जिवंत होती याचे विशेष वाटत होते. पण जगली तरी ती किती दिवस जगतेय ? हे कोणी सांगू शकत नव्हत. कारण सुरुवातीला तीने जे काही खाल्लं किंवा पाणी पिलं की ते सरळ बाहेर पडत होत. त्यामुळे तिच्या जगण्याची शक्यता नव्हतीच. पण कदाचित तिला अगोदरच दीर्घायुष्य होत की काय काय माहित ती काही दिवसात बरी झाली. तिला बांधलेले फडके काढून टाकले. जखम देखील भरत आलेली होती. त्यानंतर तिला पुन्हा एकदा मोकळ्या अंगणात सोडून दिले. रोजच्या सारखे दिवसभर चरून फिरुन ती संध्याकाळी घरी परतु लागली. आता या गोष्टीला खूप काळ लोटला. त्यावर अनेक पावसाळे, जत्रा, शे दोनशे रविवार आणी गिर्हाईक येऊन गेले. पण मावशीने अजून तिला सांभाळून ठेवले.

कुत्र्याच्या हल्ल्या पासून जीव बचावलेल्या कोंबडीने अनेक वर्षे अंडी तसेच नवीन नवीन कोंबड्या जन्माला घातल्या. ज्यातून मावशीला चार पैसेहि मिळत राहिले. 3 वर्षे झाली का घरात कोंबडी ठेवत नाहीत. पाव्हणा आला की तिचा बेत केला जातो. पण या कोंबडी सोबत असं काही करायची इच्छाच कोणाची झाली नाही. तिच्यामागून कितीतरी कोंबड्या आल्या आणी गेल्या. पण ही कोंबडी अजूनही घरात कायम आहे. आता या कोंबडीचे बऱ्यापैकी वय झाले आहे. तश्या कोंबड्या १०-१५ वर्षे जगू शकतात असे वाचण्यात आले होते. त्यामुळे कोंबडीचा जन्म घेऊनही इतक्या वर्षाचे आयुष्य लाभले म्हणजे नशीबचं म्हणावं लागेल.

ही छोटीशी पण न ऐकलेली गोष्ट कशी वाटली ते रिप्लाय मध्ये नक्की सांगा. तुम्ही वाचून रिप्लाय दिला तरच मला समजेल की कोणी कोणी वाचली आहे. आणी कधी आलात गावच्या घरी तर कोंबडी नक्की बघून जा. धन्यवाद !!!

लेखन – संतोष दिवाडकर

रविवारचा वापर असाही ! दुर्ग संवर्धकांनी दिली भिवगडावरील पाण्याच्या टाकीला नवसंजीवनी

राजेप्रतिष्ठान दुर्गसंवर्धन विभाग कर्जत आणि अखंड भिवगड संवर्धन समिती गौरकामथ यांच्या संयुक्त सहभागाने किल्ले भिवगडावरील अनेक वर्षांपासून गाळाखाली लोप पावत चाललेल्या पाण्याच्या टाकीला पुनर्जीवित करण्यात आले आहे. किल्ल्यावरील पाण्याच्या टाकीत वर्षानुवर्षे साचलेला गाळ बाहेर काढणे हे जिकरीचे काम होते. मात्र दुर्ग संवर्धकांनी हे काम पार पाडले.

मागील वर्षातील सप्टेंबर महिन्यापासून टाकीत साचलेला गाळ उपसण्याची मोहीम साधारण ३ महिन्यांपूर्वी सुरू केली होती. या कालावधीत १२ रविवार मोहिमा घेऊन हे काम आता पूर्ण झाले आहे. ह्या मोहिमेला महाराष्ट्रभरात दुर्गसंवर्धन करत असणाऱ्या विविध संघटनांनी एकत्र येऊन हे कार्य पूर्ण करून समाजाला एक नवीन आदर्श घालून दिला आहे. सर्व संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील गडकोट येणाऱ्या पिढीला बघता येईल ह्यासाठी प्रयत्न करत असल्याचा भावना व्यक्त केल्या. याच मोहिमेत शिवशाहीर गणेश तानाजी ताम्हाणे (रायगड जिल्हा अध्यक्ष,
महाराष्ट्र शाहीर परिषद) यांनी संपूर्ण भिवगड आपल्या शाहिरीने दुमदुमून सोडला. यामुळे काम करताना शिवभक्तांमध्ये अधिक ऊर्जा निर्माण झाली होती.

भिवगड मोहिमेसाठी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे, कर्जत, मुरबाड, खालापूर, नवीमुंबई, पुणे अशा विविध भागातुन दुर्गसंवर्धक आले होते. किल्ले भिवगड पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान (अंबरनाथ), शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, दुर्गजागर प्रतिष्ठान (रायगड/ठाणे), सज्जनगड संवर्धन समिती (सातारा), शिवकार्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आदींनी पुढाकार घेतला होता. तसेच भिवगडावरील आणखीन तीन टाक्यांच्या संवर्धनाच काम बाकी असून संपूर्ण काम होई पर्यंत प्रत्येक रविवारी ही मोहीम सुरू राहणार असल्याचे राजे प्रतिष्ठाण दुर्ग संवर्धन विभाग महाराष्ट्र अध्यक्ष राहुल महाजन यांनी एम एच मराठीशी बोलताना सांगितले.

-संतोष दिवाडकर

Water tank on Bhivgada fort cleaned by fort keepers

Video – मोहिमेत गायलेली शाहिरी
भयानक थंडीत उघड्यावर झोपणाऱ्या बेघरांना ब्लॅंकेट वाटप

कल्याण : भर थंडीत उघड्यावर झोपणाऱ्या गोरगरीब बेघरांना नागरी हक्क संघर्ष समितीने मकरसक्रांत आणि नामांतर दिवसाचे औचित्य साधून ब्लॅंकेटचे वाटप केले आहे. त्याचबरोबर गोरगरिबांना वस्तू दान करण्याचे आव्हान ही करण्यात आले आहे. दोन वर्ष करोनाचा कहर त्यात गरिबांचा कामधंदा गेला. खाण्याचे हाल, उघड्यावर दुकानाच्या आसऱ्याला झोपायचे, त्यात महा भयंकर थंडी. अशा परिस्थितीत काही लोक जगतात. त्यांचे जगणे रात्री अपरात्री फिरल्यावर समजते.

बैल बाजार स्मशान भूमि समोर स्मार्ट स्टोर जवळ एक तीस वर्षाचा व्यक्ती प्ल्यास्टिकच्या गोणीत स्वतःला टाकून थंडीत कुडकुडत झोपला होता. सर्व शरीर त्याने त्या गोणीत गुंडाळून घेतलेले होते. त्याला उठवले असता त्याने त्याची करुण कहाणी सांगितली. “साहेब काम धंदा नाही पोटाला अन्न नाही विदर्भातील थंडी पेक्षा ही त्या मानाने थंडी कमी. करोना मुळे कोणी काम देत नाही. मृत्यू पण येत नाही”. बोलतांना त्याच्या डोळ्यात पाणी होतेच मात्र ब्लॅंकेट मिळाल्याचे समाधानही.

अशीच एक प्लास्टिक पालव टाकलेली पाच दहा घर फोर्टीज हॉस्पिटलच्या मागे कल्याणच्या मध्यवर्ती पॉश वस्तीत अशी घर आहेत हेच आश्चर्य आहे. कल्याणच्या लोकांना, नेते आणि कार्यकर्ते म्हणवणाऱ्या लोकांना माणुसकी असेल तर त्यांनी जरा तिकडे फिरून यावे. पावसाळ्यात हे लोक कसे राहत असतील? असा विचार आला तर अंगावर शहारे आले. लाईट नाही, पाणी नाही. साप, विंचू, घुशी यांची भीती नाही. तरी लोक चिमुरडे घेऊन येथे राहतात. त्यांच्या कडे ढुंकूनही कोणी पहात नाही. अश्या बेवारस वस्तीत जाऊन सामाजिक भान ठेवून शनिवारी रात्री ब्लॅंकेट वाटन्यात आले.

अशीच एक स्वाभिमानी वयोवृद्ध आजी कृषी बाजार समितीच्या गेट वर सापडली. अंगावर फक्त साडी, विना स्वेटर केळ्याची पान आणि काही भाजी रात्री थंडीत विकायला बसली होती. आजी कुठून आली? विचारले असता ती म्हणाली जळगाव वरून. आता रात्र भर थंडीत राहणार काय? तर म्हणाली पोटा पुढे थंडी काय आहे पोरांनो? कुठून उर्मी येते यांना जगण्याची हे एक कोडे आहे. या घरात बसण्याच्या वयात ही म्हातारी एव्हड्या लांबून थंडीत केळीची पाने विकायला आली.
सलाम त्या आजीच्या स्वाभिमानाला.

लोक जेथे आसरा मिळेल तेथे झोपली होती. दुकानाच्या थंड गार लादीवर, अंगावर असेल तो पातळ कपडा, अंगाखाली काही नाही व त्यात डास. काही लोकांच्या म्हणन्यानुसार ते नशेडी म्हणून घोषित केले जातात. पण काही लोक नशा न करता ही झोपलेले होते. आणि ही त्यांची हौस नसून त्यांची मजबूरी होती. ज्याकडे येथील व्यवस्था आणि समाजाने दुर्लक्ष केले आहे.

१४ जानेवारीच्या रात्री ब्लॅंकेट वाटण्याच्या अनुभवाने एक रात्र वैऱ्याची, निसर्गाच्या थंडीच्या प्रकोपाची अनुभवायला मिळाली. रात्रीच भयानक वास्तव आणि स्मार्ट सिटी बनायला निघालेल्या शहराच काय होणार? लोक स्मार्ट केंव्हा होणार? माणसात माणुसकी केंव्हा येणार? असे अनेक प्रश्न घेऊन सकाळी पाच वाजता चार भिंतीच्या सुरक्षित ब्लॉकच्या घरात ब्लँकेट घेऊन झोपलो. स्वतःला,सुशिक्षित समजणाऱ्या समाजाला येथील भांडवलदारांना, राजकारणी नेत्यांना, लोकशाही म्हणून तीचा खून पाडणाऱ्या सत्ताधारी व्यवस्थेला शिव्या देत.

नागरी हक्क संघर्ष समिती तर्फे हे वाटप करण्यात आहे. माणुसकी मनात जिवंत असणाऱ्या लोकांच्या मदतीने रात्री जागून सामाजिक भूक भागवणारे कार्यकर्ते हजर होते. बाबा रामटेके, हेमंत कांबळे, अभिजित पंडित, राजू रणदिवे, अक्षय गायकवाड, प्रवेश सिंग, रमेश बर्वे, ऍड.सुनील चतुर्वेदी, कलाकार फोटोग्राफर मनोज घुसळे.

दरम्यान ब्ल्याॅंकेट वाटप कार्यक्रम पुढे दहा दिवस चालू राहणार आहे. ज्यांना नवीन ब्लॅंकेट/चादर देणे असतील त्यांनी स्टार ऑप्टिकल ताल बार समोर, मुरबाड रोड कल्याण पश्चिम येथे द्यावे. मदत करण्यासाठी पत्रकार बाबा रामटेके यांच्या ८०९७५४०५०६ नंबरवर संपर्क साधण्याचे संघटनेने आव्हान केले आहे.

-रोशन उबाळे

‘शरद पवार’ – एक पॉजिटिव्ह एनर्जी

शरद पवार…. लहानपणा पासून हे नाव चांगलंच परिचयाचं आहे. अगदी राजकारण कळत नव्हतं तेव्हा पासून. आता पत्रकार असल्याने पवार साहेबांची भाषण पाहण्यात येत होती. भाषण पाहण्यात असल्याने आणि मिमिक्रीची आवड असल्याने या माणसाचा आवाज मला काढता येऊ लागला. आज राष्ट्रवादी पक्षातील कोणीही जेव्हा माझा तो आवाज ऐकतो जाम खुश होतो. आजही त्यांचे जितके चाहते असतील तितके विरोधक देखील नक्की असतील. पण प्रत्येक वेळी माणसाला राजकारणाच्या चष्म्यातून तोलण किती योग्य आहे ?

ज्यांना मी मानतो, ज्यांचे व्यक्तिमत्त्व मला भावते त्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या काही भाषणात पवार साहेबां बद्दल काही न ऐकलेल्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. अदृश्य हात, तेल लावलेला पहिलवान अश्या नानाविध उपमा देऊन जे प्रसंग वर्णन त्यांनी केलं त्याबद्दल खरंच विचार करायला भाग पाडलं.

आता तर पवार साहेबांचं खूप वय झालं आहे. या वयात राजकारणातुन संन्यास घेऊन काही वर्षे विश्रांती घ्यायला हवी असे काहींना वाटते. पण मला वाटत नाही ही व्यक्ती असा विचार कधी करत असेल का? आजच्या तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा यांच्यात आजही आहे. चाहते म्हणतात आमच्या साहेबांनी पावसात भिजून भाषण केले. विरोधक म्हणतात राजकीय स्टंट होता, केवळ मत मिळवण्यासाठी केलेला. काहीही असो… या वयात कसलीही तमा न बाळगता स्वतःला झोकून देणं म्हणजे एक मोठी ऊर्जा आहे आणि हे सत्य मान्य करावेच लागेल.

राजकारणाचा चष्मा जरा बाजूला करा आणि आता फक्त एक व्यक्ती म्हणून पहा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली त्या काळी म्हणजेच साधारण २० वर्षांपूर्वीही शरद पवार हे ज्येष्ठ व्यक्तीमत्वच होत. 1999 साली त्यांनी पक्ष उभा केला. त्यावेळी त्यांचं वय 60 च्या घरात होत. या वयात रिटायर्ड होऊन पुढील आयुष्य आरामात घालवायच असा एक समज असतो. मात्र त्याच वयात यांनी पक्षाची स्थापना केली.

२१ व्या शतकाच्या सुरुवातीचे पहिले दशक म्हणजे सोशल मीडियाचा लवलेश देखील नाही. सोशल मीडिया दूरची गोष्ट त्याकाळी साधा मीडिया देखील नव्हता. मोजके टीव्ही चॅनल्स आणि मोजकेच काय ते वर्तमानपत्र. ना कसलं इंटरनेट ना कसला मोबाईल फोन. या अश्या काळात स्वतः महाराष्ट्रभर फिरून त्यांनी पक्षाची पाळमूळ रुजवली. दिवसभरात छोट्या छोट्या गांवखेड्यात जाऊन सभा घेतल्या. सभेतून लोकांशी जवळीक निर्माण केली. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचं घड्याळ लोकांच्या पक्क डोक्यात बसल. विशेषतः पुणे,सातारा या सर्व भागात जाऊन त्यांनी संघटन वाढवले. हळूहळू त्यांची कीर्ती वाढत गेली आणि आज ते सर्वानाच ज्ञात आहेत.

एखाद्याच्या नावाने बोट मोडन किंवा एखाद्या बद्दल वाईट बोलणं सोपं आहे. पण त्या व्यक्तीची कारकीर्द, त्याने घेतलेली अपार मेहनत देखील कधीतरी पाहिली पाहिजे. राजकारणात भले तुम्हाला ते आवडत नसतील. पण त्यांच्या कडे जी ऊर्जा या वयात आहे. ती खरंच अजब आहे. मनातून ध्येय, जिद्द आणि चिकाटी असेल तर यश तुमच्या जवळच असेल हे त्यांच्याकडून शिकता येईल. परिस्थिती काय आहे ? यापेक्षा ती कशी बदलायची हे ज्याला कळलं तो अर्धा खेळ तिथेच जिंकला.

अलिकडल्या काळात त्यांच्या तोंडाला सूज आल्याचे पत्रकार परिषदेत पाहिले. मनात विचार आला की व्यवस्थित बोलत येत नसतानाही ही व्यक्ती पत्रकार परिषद घेत आहे. खरंच अजबच.. पण नंतर एक लेख वाचल्या नंतर समजले की शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. तुम्ही त्यांचे समर्थक असाल, विरोधक असाल किंवा कुणीही असाल…. पण त्यांच्या या अदृश्य शक्तीला किंवा सकारात्मक उर्जेला नाकारू शकत नाही. हीच ऊर्जा राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीसाठी अजस्त्र आधारवडाची छाया बनलेली आहे.

संतोष दिवाडकर (युवा पत्रकार)
कल्याण 8767948054

पेट्रोल भरताना असं काढतात येड्यात; या ट्रिक बद्दल माहिती करून घ्या

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे वाहनचालक अगोदरच चिंतेत आहेतच पण पंपावरील पेट्रोल माफियांचं काय ? पंपावर होणारा गफला ही सर्वात मोठी डोकेदुखी असून यावर तोडगा कसा काढावा हाच एक प्रश्न आहे. आणि आजवर अनेक ठिकाणी अश्या घटना उघडही झाल्या आहेत.

भेसळयुक्त पेट्रोल :- पेट्रोल पंपावर अनेक वेळा भेसळयुक्त पेट्रोल विकले जाते. अशा प्रकारच्या घोटाळ्यात पेट्रोल पंप चालक प्रामुख्याने समाविष्ट असतो. पेट्रोल मध्ये भेसळ करून त्याचे प्रमाण वाढवले जाते. ज्याप्रमाणे दुधात पाणी टाकले जाते अगदी तशीच ही प्रक्रिया असून पाण्याऐवजी वेगळा पदार्थ वापरला जातो.

कमी पेट्रोल :- इंटरनेटवर शोध घेतल्यावर आणखीन एक घोटाळा असा समोर येईल की पंपावर पेट्रोल सोबत तुम्हाला हवेचे पैसे देखील मोजावे लागतील. याचा अर्थ असा की निर्धारित पेट्रोल भरायला सांगितले असता आपल्या गाडीच्या टाकीत त्या पेक्षा कमी पेट्रोल पडते. मुळात पेट्रोल पडतंय की नाही हे पाहण्यासाठी पाईप पारदर्शक असावा अशी मागणी ग्राहक करीत आहेत.

ओव्हर स्मार्ट ग्राहकांना हेरणे :- पंपावर पेट्रोल भरणारा कामगार हा बहुतेक वेळा गफला करण्याचा प्रयत्न करतो. अति घाईत असणारी किंवा स्वतःला ओव्हर स्मार्ट, स्टॅण्डर्ड समजणारी माणसं त्यांचे मुख्य शिकार असतात. कारण हीच माणसं पेट्रोल भरताना आपण खूप मोठे आहोत आणि आपल्याला मीटर पाहण्यात वेळ नाही असे दाखवतात. खिडकीतुन नोट देऊन ही लोक पेट्रोल भरून घेतात. आणिक अशा वेळी माफिया कामगार मीटर रिसेट न करताच पुढे पेट्रोल भरतो आणि सुशिक्षित माणसांना चुना लावतो.

मिटरची शाळा :- सध्या पेट्रोल पंपावर काम करणारे काही माफिया या ट्रिकचा वापर करीत आहेत. आणि या ट्रिक बद्दल तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. ज्यावेळी तुम्ही पेट्रोल भरण्यासाठी येता तेव्हा तुम्ही त्याला खिशातून पैसे काढता काढता पेट्रोल भरायला सांगता. समजा तुम्ही त्याला “४०० रुपयांचं टाक” असे म्हणालात तर तो कमी ऐकल्या सारखे १०० चे पेट्रोल टाकून स्टॉप करतो. त्यावर तुम्ही पुन्हा सांगितलत की तो हसून एखादा न ऐकले असल्याचा डायलॉग मारतो. या नंतर तो तुमच्याशी शाळा करू लागतो. ती अशी की, “मी १०० चे टाकले म्हणजे आता किती टाकायचं ?” असा प्रश्न तो तुम्हाला करतो. त्यावर तुम्ही साधे भोळेपणाने ३०० म्हणता. याचदरम्यान त्यांचा एक माणूस तुम्हाला पैशांच्या देवाणघेवाण किंवा अन्य कारणा वरून तुमचं लक्ष त्याच्याकडे वेधतो. आणि याच संधीचा फायदा उचलून पेट्रोल भरणारा मीटर शून्यावरून रिसेट न करता तो १०० पासूनच सुरू करून ३०० वर थांबतो. आणि आपल्याला वाटत की १००+३०० म्हणजे ४०० चं पेट्रोल भरलं गेलं आहे. पण मुळात ३०० चं पेट्रोल टाकून त्याने आपल्या खिशातून १०० रुपयांची चोरी केलेली असते. आणि ती आपल्या लक्षातही येत नाही.

एक लक्षात घ्या दिवसभरात शेकडो गाड्यांमध्ये पेट्रोल टाकले जाते. परंतु ही ट्रीक ते माणूस पाहूनच करतात. समजा या लोकांनी दिवसभरात १०० लोकांवर जरी ही ट्रिक वापरली तरी ३० लोक तरी सहज फसतील. आणि दररोज या ट्रिकचा वापर करून महिन्याला पगारा पेक्षा दुप्पट रक्कम हे यातूनच कमावतात.

पेट्रोल भरनारे सारेच कर्मचारी हे बेईमानी करीत नाही. काही कामगार इमानदार देखील आहेत. मात्र याच इमानदारांच्या गर्दीत काही बेईमान, लुटारू आणि माफिया तुमच्या समोर येणार नाहीत हे कशावरून ? तेव्हा पेट्रोल भरताना सतर्क रहा. आपली फसगत होणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्या. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास पंप चालका कडे त्वरित तक्रार करा. पेट्रोल पंपाच्या कारभारावर संशय असल्यास पोलिसात कळवा. संबंधित माहिती इतरांनाही पाठवा. तुम्हाला असा अनुभव आला असल्यास कृपया खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवावा.

संतोष दिवाडकर (युवा पत्रकार)
8767948054

एका युट्युबरला आलेला असाच एक अनुभव