Kalyan मध्ये Dengue मुळे एकाचा मृत्यू

Dengue in kalyan: शहरात मागील काही दिवसांपासून डेंगूने डोके वर काढले असून कल्याण पूर्वेत एका तरुणाचा डेंगूमुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. विलास म्हात्रे Vilas Mhatre (३१) असे या मृत तरुणाचे नाव असून त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. दरम्यान गुरुवारी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. डेंगूच्या वाढत्या फैलावा संदर्भात मनसेने दोन दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्तांची भेट घेतली होती. आता तरुणाच्या मृत्यूनंतर मनसेने अधिक संताप व्यक्त केला आहे.

डेंग्यू, मलेरियाच्या संसर्गामुळे नागरिकांचे आरोग्य सध्या धोक्यात आले असल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेचे ड्रेनेज बाबतीत व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी साठत आहे. यामुळे काही ठिकाणी पाण्याची डबकी तयार होतात. अशाच साठलेल्या पाण्यातून डेंगूच्या डासांचा प्रादुर्भाव अधिक होतो. त्यामुळे महापालिकेने काटेकोरपणे नालेसफाई करायला हवी अशी मागणीही मनसेने केली होती. या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत धूर व कीटकनाशक फवारणी करायला हवी, तसेच घरोघरी डेंग्यू प्रतिबंधक जनजागृती मोहीम राबवावी अशा संदर्भाचे निवेदन मनसेने महापालिका आयुक्तांना नुकतेच दिले आहे.

नागरिकांनी घ्यावी ही काळजी

डेंग्यूचे डास हे साचलेल्या पाण्यातूनच उत्पन्न होतात. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा. पाण्याने भरलेल्या कुंड्या, टायर मध्ये साठलेले पाणी, झाडा झुडपांजवळ साठलेले डबके अशा ठिकाणी डेंगूचे डास मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होतात. त्यामुळे नागरिकांनी अशा पध्दतीने पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. घरात डासांचा शिरकाव टाळण्यासाठी संध्याकाळी खिडक्या, दारे शक्यतो लावून घ्याव्यात. डासांपासून बचाव करणाऱ्या संसाधनांचा वापर करावा. डासांचे अधिक प्रमाण असल्यास मच्छरदाणीचा वापर अवश्य करावा.

डेंगूची लक्षणे काय आहेत ?

अचानक ताप येणे, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी आणि सांधेदुखी, थकवा, काहींना मळमळ आणि उलट्या, काहींच्या त्वचेवर पुरळ येणे अशी लक्षणे सुरुवातीला आढळून येतात. सौम्य डेंग्यूमध्ये, ताप ६-७ दिवसांनी कमी होतो. गंभीर प्रकरणांमध्ये पुनर्प्राप्तीस २-३ आठवडे लागू शकतात.

“पावसाळ्यात डेंग्यूची लक्षणे ओळखणे महत्वाचे आहे. लक्षणे दिसल्यास सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळ वाया घालवू नये. त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. रक्त व सर्व तपासण्या करून घ्याव्यात. डेंग्यूची लागण झाल्यावर योग्य उपचार आणि विश्रांती घेणे आवश्यक आहे.”

डॉ.प्रमोद बैरागी-वैष्णव, वरिष्ठ चिकित्सक

“डेंगूमुळे मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी झालो होतो. नुकतेच आम्ही महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. मात्र यांच्याकडे डेंगूच्या रुग्णांचा आकडाही नाही. रुग्णालयांची दयनीय अवस्था आहे. अशी परिस्थिती असेल तर मनसे मोठे जन आंदोलन करणार.

– प्रकाश भोईर, माजी आमदार मनसे

“नागरिकांनी विशेषतः पावसाळ्यात आठवड्यातुन एकदा ड्राय डे करायला हवा. या दिवशी साठवलेले पाणी संपूर्णपणे रिकामे करून नव्याने पाणीसाठा करायला हवा. २५ मे पासून आमचा सर्वे सुरू असून दीड लाख घरांचा सर्वे झालेला आहे. यातील ३०० हुन अधिक कंटेनर मध्ये आम्हाला डासांच्या अळ्या आढळून आल्या. ही फक्त महापालिकेची जबाबदारी नसून नागरिकांनीही सहकार्य करायला हवे.”

 – हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त क.डों.म.पा.

One dies due to dengue in Kalyan

Kalyan Election : उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी ठाकरे फडणवीस उद्या कल्याणमध्ये

Kalyan Election : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्षांनी आपले काही उमेदवार घोषित केले आहेत. निवडणूक आयोगाने २२ ते २९ ऑक्टोबर पर्यंतचा कालावधी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिला आहे. उद्या दि.२४ ऑक्टोबर रोजी कल्याण पूर्व महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड व कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील हे आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

कल्याण पूर्व मतदारसंघात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या अनुपस्थितीत महायुतीत रस्सीखेच सुरू असताना भाजप वरिष्ठांनी आपली जागा कायम ठेवत उमेदवारी गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली. आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती माध्यमांना दिली. याकरिता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असलयाचे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थिती दर्शविण्याची शक्यता यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

मनसेने देखील विद्यमान आमदार राजू पाटील यांनाच पुन्हा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे. दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरेंच्या हस्ते राजू पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाचा भव्य उदघाटन सोहळा पार पडला. त्याचवेळी राजू पाटलांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी स्वतः येत असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती. त्यामुळे उद्याच्या दिवशी कल्याण शहरात दोन दिग्गज नेत्यांची हजेरी लागणार असल्याने दोन्ही राजकीय पक्षांत उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे.

Kalyan Election : Thackeray Fadnavis in Kalyan tomorrow to fill the applications of candidates

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांना मिळणार गती ; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुलभूत सोयीसुविधांचा विकास या लेखाशीर्षअंतर्गत (२२१७-०९१३) सुमारे १५.५५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. सदर कामांची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध होणार असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.

खासदार शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मुलभूत सुविधांसाठी पाठपुरावा करत विविध विकासकामे मंजूर करून घेतली. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्ते आणि पाणीसारख्या पायाभूत सुविधा पुरवण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. परंतु, कोरोना सारख्या महामारीच्या संकटात महापालिकेची आर्थिक परिस्थिती बघता प्रभागातील कामे करण्याकरिता लोकप्रतिनिधी यांचा नगरसेवक निधीचा अभाव पडत असल्यामुळे या शहरांमधील महत्त्वाच्या रस्त्यांची कामे नगरविकास विभागाच्या माध्यमातून व्हावीत, यासाठी खासदार डॉ. शिंदे सातत्याने पाठपुरावा करत होते.

खा. डॉ. शिंदे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून कल्याण डोंबिवलीसाठी १५.५५ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी मिळाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेची आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे महापालिका क्षेत्रातील विकासकामे थांबू नये यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी शासन दरबारी रु. १५.६५ कोटीचीमागणी केली होती. क.डों. महापालिका क्षेत्रातील नागरिकांना या निधीतून मुलभूत सुविधा मिळण्यास मदत होईल.

येणाऱ्या काळातही विविध योजनाअंतर्गत महापालिका क्षेत्रासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून आणण्यात येईल, त्यासाठी शासनाकडे अनेक प्रस्ताव सादर केले असून त्यासाठी सुद्धा लवकरच निधी मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती खा.डॉ. शिंदे यांनी दिली. त्यामुळे मंजुरी मिळालेल्या विकासकामांची निविदा प्रक्रिया सुरु केली असून प्रत्यक्ष कामास लवकरच सुरुवात करून ती कामे पूर्णत्वास येतील असा विश्वास हि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणचा आणखी एक महत्त्वाचा पुल होणार लोकांसाठी खुला ; ३१ मे ला मुख्यमंत्री करणार ऑनलाइन लोकार्पण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक पुलांचे काम सुरू होते. पत्रिपुलानंतर काही पुल सुरू झाले त्यातीलच एक महत्त्वाचा असलेला नवा दुर्गाडी पुल हा ३१ मे पासून लोकांच्या सेवेत येणार आहे. या पुलाची एक मार्गिका खुली केली जाणार आहे.

नवा दुर्गाडी पुल हा ठाणे मुंबईला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पुल आहे. कल्याणसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तसेच आंबिवली व टिटवाळा भागातील नागरिकांना मुंबईला जाण्याचा हा उपयुक्त मार्ग मानला जातो. या पुलाचे काम सुरू झाल्यापासून विविध तांत्रिक,नैसर्गिक व बेजबाबदारी सारख्या कारणांमुळे काम रखडत होते. त्यानंतर एमएमआरडीए प्रशासनाने नव्या कंत्राटदारा मार्फत पुलाच्या कामाला गती दिली.

सोमवार दि.३१ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण केले जाणार आहे. या पुलावरील एक मार्गिका जूनच्या सुरुवातीलाच खुली होणार आहे. या मार्गिकेमुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी सुटू शकतो. कल्याण शहरात सुरू असलेल्या विविध पुलांच्या कामामुळे हे शहर वाहतुकीच्या विळख्यात होते. त्यातच पत्रिपुलानंतर हा पूल सुरू झाल्यास वाहतुकीचा ताण काहीसा कमी होणार आहे.

भीमजयंती निमित्त समाजसेवकाने बेघरांना वाटले अन्नधान्य आणि भाजीपाला

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सुमेध हुमणे यांनी चिंचपाडा गावाजवळील शंभर फुटी रोड लगत झोपड्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना अन्नधान्य आणि भाजीपाल्याचे वाटप केले. या वेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार घालून डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले त्याचप्रमाणे बुद्ध वंदना करण्यात आली.

गेली २५ वर्षे झोपड्यांमध्ये राहणारे याच देशातील नागरिक, दीनदुबळे, आजही घरा पासून ते पिण्याच्या पाण्या पर्यंत आजही वंचित आहेत. हातावरचे पोट असणाऱ्या मेहनती कष्टकरी जनतेला, कोरोना मुळे झालेल्या लॉक डाऊनचा खूप मोठा फटका बसला आहे. तरी या दीनदुबळ्या जनतेचे बाबासाहेबांवरील प्रेम अजूनही कमी झालेलं नाही. केंद्र सरकारच्या अनेक योजना राबवल्या गेल्या तरी या भारत देशात रस्त्यालगत आपला अशियाना तयार करून राहणाऱ्या अनेक जणांच्या डोक्यावर आजही हक्काचं छप्पर नाही. रस्त्यालगत राहून आपली उपजीविका सांभाळणाऱ्या या भारत देशातील नागरिकांना २०२४ पर्यंत डोक्यावर छप्पर मिळेल असे केंद्रशासनाने सांगितलं असलं तरी आज दिसणारी ही अवस्था फारच बिकट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीनदुबळे, पीडितांसाठी आपलं आयुष्य वेचलं. मात्र अजूनही या देशातील अनेक दीनदुबळे निराधार आहेत असं दिसून येतंय. रस्ता रुंदीकरणामध्ये यांच्या झोपड्या नेस्तनाबूत झाल्यानंतर, येथील नागरिकांचा मानवी हक्क अजूनही त्यांना मिळालेला नाही असे दिसतेय. म्हणून त्यांनी आपल्या व्यथा या दिवशी प्रसार माध्यमांसमोर मांडल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एक स्तुत्य उपक्रम कल्याण पूर्वेतील शिवसेना उपविभाग प्रमुख सुमेध हुमने यांनी राबवला होता. नगरसेवक महेश गायकवाड, नगरसेविका शीतल मंढारी, आर पी आय चे युवक जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनवणे, या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झोपड्यात राहणाऱ्या नागरिकांना अन्नदान, भाजीपाल्याचे वाटप करून, दीनदुबळ्यांना आधार देण्यात आला. या देशात अजूनही अनेक नागरिक आपल्या मानवी हक्कापासून वंचित असून त्यांना त्यांचे हक्क कधी मिळतील ? या प्रतीक्षेत ते असताना या नागरिकांची व्यथा आपण नक्कीच शासन, प्रशासना समोर पत्राद्वारे मांडू असं नगरसेवक महेश गायकवाड यांनी यावेळी सांगितले.