KDMC Election 2026 : महायुतीतील इनकमिंगचा फुगा फुटलाच; इच्छूकांनी ठाकरे ब्रँडकडे वळवला मोर्चा

KDMC Election 2026 : महायुतीत महिन्याभरापासून सुरू असलेल्या इंकमिंगगचा फुगा फुटणार अशी शक्यता ‘एम एच मराठी’ने काही दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. ही बाब खरी ठरली असून आता महायुतीचे उमेदवार जवळपास निश्चित झालेले असून ठाकरेंच्या पक्षांतून लढण्यासाठी आता इच्छूकांची घालमेल सुरू आहे. तर दुसरीकडे तिसरा पर्याय म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श.प. व इतर लहान सहान पक्षांचा विचारही केला जात आहे.

मागील महिन्याभरापासूनच उमेदवारी मिळवून निवडणूक जिंकण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांतून शिवसेना भाजप मध्ये प्रचंड इच्छूकांची गर्दी झाली. पॅनलचे गणित जुळवण्यासाठी दोन्ही पक्षांतही आपसात खेचखेची झाली. यामध्ये प्रामुख्याने माजी नगरसेवक ओढण्याचे काम दोन्ही पक्षातून केले गेले. मात्र यातील काही माजी नगरसेवकांना पक्षात घेऊनही उमेदवारी देता न आल्याने पक्ष प्रवेश करून पायावर धोंडा पाडून घेतल्याचा अविर्भाव निर्माण होऊ लागला आहे. याउलट शिवसेना उबाठा व मनसेने शांत राहून संयमाने पाऊल टाकल्याचे दिसून आले आहे.

पक्ष सोडून गेलेले आता पुन्हा उमेदवारीसाठी मनसेत येण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र आम्ही आमची दारं त्यांच्यासाठी कायमची बंद केली असल्याचे मनसे नेते राजू पाटील म्हणाले. याउलट दुसरीकडे अनेक वर्षांनी मनसेत वापसी करणाऱ्या काही माजी नगरसेवकांचे मात्र जोरदार स्वागत झाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस असून निवडणुकीच्या रिंगणात कोण दिसणार? हे समजण्यासाठी अवघे काही तास वाट पहावी लागणार आहे. अर्ज छाननी व माघारी अर्ज गेल्यानंतर ३ जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी निवडणूक चिन्हांसह प्रसिद्ध केली जाणार आहे.

KDMC Election 2026 : The bubble of incoming in the Mahayuti has burst
Thackrey in KDMC : कल्याण डोंबिवलीत ‘ठाकरे’ ब्रँड ठरू शकतो पॉवरफुल

Thackrey in KDMC : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष भरती प्रक्रियेत मग्न आहेत. काँग्रेससह दोन्ही ठाकरेंचे माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी गळाला लावण्याचे काम दोन्ही पक्षांकडून सुरू असल्याने शहरात दोनच पक्षांची चलती असल्याचे दिसून येत आहे. परंतु राजकारणात आजमितीला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्याअनुषंगाने आतापर्यंत शांत असलेल्या ठाकरेंचे पक्ष आता ‘वेट अँड वोच’च्या भूमिकेतून बाहेर पडले आहेत. मनसे शिवसेना उबाठा नेमकी काय रणनिती करीत आहे याचा अंदाजही ते इतर पक्षांना लागून देत नसून बुधवारी त्यांनी युतीची घोषणा केली आहे.

इनकमिंगचा फुगा फुटणार? : मागील काही दिवसांत मनसेचे माजी नगरसेवक शिवसेनेसह भाजपात गेलेले आहेत. शिवसेना उबाठाचेही माजी आमदार व आमदारकी लढवलेले काही मोठे चेहरे पक्षाला सोडून गेले आहेत. मात्र ज्या पक्षात इच्छूकांचे प्रचंड ट्रॅफिक जमले आहे, त्याच पक्षात आधीपासून असणाऱ्या पदाधिकार्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे एकाला धरताना, दुसरे निसटून जाण्याची भीती आता दोन्ही पक्षांना लागून आहे. तर हेच निसटलेले नाराज निष्ठावंत ठाकरेंच्या ताफ्यात आता सामावू शकतात.

आतापर्यंत ओढाओढी करून शिवसेना भाजपने शक्तिप्रदर्शन करून आपणच वजनात आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र इनकमिंग इतकी झाली की महायुतीच्या घोषणे नंतर नाराज मंडळी आउटगोइंगही सुरू करू शकतात. याच गोष्टीचा फायदा घेऊन आतापर्यंत शांत असलेले ठाकरेंचं वादळ कधी घोंगावून चित्र पालटवेल हे सांगू शकत नाही. आतापर्यंत या महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता असली तरीही शिवसेनेच्या विभाजनानंतर आता भाजप मोठा भाऊ बनून महापौर पदाचा दावा करीत आहे. अंबरनाथ, बदलापुरात तसे साध्यही केले आहे.

आतापर्यंत पक्षीय बलाबल : २०१५ च्या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीत १२२ जागांपैकी ९४ जागा या शिवसेना भाजपने जिंकल्या होत्या. त्यातील सर्वाधिक ५२ नगरसेवक शिवसेनेचे होते. तर मनसेचेही दहा नगरसेवक विरोधी बाकावर बसले होते. आता शिवसेनेच्या विभाजनासह मनसेच्या काही माजी नगरसेवकांनीही पक्षांतर केल्याने ठाकरेंना नवे चेहरे द्यावे लागणार आहेत. याच नव्या चेहऱ्यात मनसेचे २०१० साली निवडणूक लढवलेले काही माजी नगरसेवक पुन्हा मनसेतून निवडणूक लढवणार आहेत.

ठाकरेंचं वादळ घोंघावणार ? : राजकीय पटलावर ठाकरे बंधू मागील काही दिवस शांत होते. मात्र ही शांतता वादळापूर्वीची शांतता असल्याचे ठाकरेंचे कार्यकर्ते म्हणत आहेत. दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने काय फरक पडू शकतो? यापेक्षा त्यांनी कोणती व्यूहरचना केली आहे? आणि कल्याण डोंबिवलीत नेमकी काय चाल चालणार? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी ६२ ही मॅजिक फिगर असून ठाकरे बंधूना मॅजिक फिगर गाठण्यासाठी सर्वप्रथम महायुतीलाच ६० च्या आत थोपवण्याचे आवाहन असणार आहे.

Thackrey in KDMC : ‘Thackrey’ brand can be powerful in Kalyan Dombivali

जनतेचे नाव पुढे करीत राजकारण्यांचे पक्षप्रवेश; पॅनलच्या जमवाजमवीसाठी पक्षनिष्ठा खुंटीला

कल्याण : महानगरपालिका निवडणुकीला अवघा चार आठवड्यांचा अवधी राहिला असून त्यापूर्वी पक्षप्रवेश सोहळे शहरात पार पडत आहेत. पॅनलमध्ये निवडून येण्यासाठी जो तो आपला विचार करीत असून इच्छूकांसह माजी नगरसेवकांनी शिवसेना भाजप मध्ये प्रवेश घेण्याची धडपड सुरू ठेवली आहे. मात्र हे पक्षप्रवेश करताना, “आम्ही जनतेच्या हितासाठी, प्रभागाच्या विकासासाठी प्रवेश करतोय” असा केविलवाणा निर्वाळा करीत स्वतःचे राजकीय स्वार्थ साधले जात असल्याचे उघडपणे दिसून येत आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत यंदा पॅनल पद्धत असल्याने सरसकट चार उमेदवारांना एकत्र लढत द्यावी लागणार आहे. त्यात महायुती, महाविकास आघाडी, मनसेसह अन्य घटकपक्ष आपले नशीब अजमावणार आहे. मात्र या पद्धतीत लहान पक्ष व अपक्ष लढणाऱ्यांना निवडणूक लढवणे अवघड होणार आहे. याच बाबीचा फायदा मोठ्या पक्षांना होणार आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा, मनसे, काँग्रेस पक्षांतील माजी नगरसेवक आपापल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना घेऊन जनतेच्या विकासाचे नाव पुढे करीत स्वतःचे राजकीय भवितव्य अबाधित ठेवण्यासाठी दलबदलू राजकारण करण्यास कोणताही कमीपणा ठेवत नाहीत. अशा परिस्थितीत सुगीचे दिवस असणाऱ्या पक्षांसोबत जाऊन पुन्हा नगरसेवक बनायचे हा एकमेव उद्देश साध्य करण्यासाठी पक्षनिष्ठा खुंटीला टांगून पक्ष बदलले जात आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपात झालेली प्रचंड ट्रॅफिक पाहता निवडणूक महायुतीत लढावी की स्वतंत्र लढावी असाही मोठा प्रश्न शिवसेना भाजपला पडलेला आहे. दोन्ही पक्षांत प्रचंड गर्दी झाल्याने उमेदवारी दिल्यानंतर पुन्हा नाराजीनाट्ये रंगणार आहेत. त्यामुळे ऐनवेळेस स्वतंत्र लढण्याची नामुष्की ओढवू शकते. याउलट दोन्ही ठाकरे एकवटले असून दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना महायुतीपुढे टिकायचे असेल तर ठाकरेंचे एकत्र लढणेच शहाणपणाचे ठरेल असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

✍️ संतोष दिवाडकर 8767948054

Kalyan East : अवेळी आलेल्या पावसाने चाळ परिसरांची उडाली दाणादाण

Kalyan East : वेळेपूर्वीच आलेल्या पावसाने राज्यभरात अनेक ठिकाणी हाहाकार माजवला आहे. पावसाळ्यापूर्वी शहरा शहरात नालेसफाईची कामे मार्गी लावावी लागतात जी साधारपणे मे महिन्यात केली जातात. मात्र पावसाने अवेळी हजेरी लावल्याने सफाई कर्मचाऱ्यांची देखील चांगलीच दाणादाण उडाली आहे. तर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने मोठ मोठ्या नाल्यातील सफाईला ब्रेक लावण्यात आला आहे. मात्र लहान सहान गटारातील गाळ उपसण्याचे काम महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमार्फत अनेक ठिकाणी सुरू आहे.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, चिकणीपाडा, जिम्मी बाग, विठ्ठलवाडी हा सखल भाग बहुतांश चाळ परिसराचा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यास पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरते. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसा दरम्यान ‘४-जे’ प्रभाग क्षेत्रातील मंगल राघो नगर भागात नालेसफाईचे काम सुरू होते. मात्र पाऊस आल्याने सफाई कामगारांनी काम थांबवून आडोसा घेतला. अर्धवट नालेसफाई असल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने काही चाळींमध्ये पाणी तुंबून नागरिकांच्या उंबरठ्या पर्यंत पाणी पोहोचले होते. आणखीन काही वेळ पावसाने ब्रेक लावला नसता तर असंख्य नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता होती.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या असल्या तरी पाऊसच वेळेपूर्वी आल्याने प्रशासनाची देखील गोची झाली आहे. अपुऱ्या नालेसफाईमुळे अनेक ठिकणी पाणी साठत असल्याने करदाते नागरिक संपूर्ण रोष महापालिका प्रशासनावर व्यक्त करीत आहेत. येत्या काही दिवसांत पाऊस पूर्णपणे थांबणार असल्याचा ईशारा हवामान खात्याने दिला असून याच काळात महापालिकेला संपूर्ण नालेसफाई करण्यास मुभा मिळणार आहे.

Kalyan East : Unseasonal rains have washed away the rice fields.

Water Cut Kalyan : कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद

Water Cut Kalyan : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार मंगळवार दि. २७ मे २०२५ रोजी कल्याण डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अगोदरच अतिरिक्त पाणीसाठा करून पाणी जपून वापरावे असे आवाहनही महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे मंगळवारी २२ के.व्ही. एन.आर.सी.-२ फीडरवर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत देखभाल दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. या सबस्टेशनहुन महापालिकेच्या १५० द.ल.लि. नेतीवली व १०० द.ल.लि. मोहिली जलशुद्धीकरण केंद्रास विद्युत पुरवठा केला जातो. मात्र मंगळवारी हा वीजपुरवठा बंद असणार असल्याने परिणामी जलशुद्धीकरण केंद्रही बंद राहणार आहे. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिक उपकरणांची दुरुस्ती करणे देखील आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

विद्युत व यांत्रिक उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीकरिता महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ८ तासांकरिता बंद असणार आहे. यादरम्यान कल्याण ग्रामीण विभाग, मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम भागाला पाणीपुरवठा बंद राहील अशी माहिती महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

Water supply to Kalyan Dombivali to be cut off on Tuesday

Thakurli bridge : ठाकुर्ली उड्डाणपूलाच्या उर्वरित कामाचा मार्ग मोकळा

Thakurli bridge : डोंबिवलीचे आमदार व भाजप प्रदेश कार्यध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महानगर पालिका प्रशासनास डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या स.वा. जोशी शाळेसमोरील उड्डाणपुलाच्या म्हासोबा चौकापर्यंतच्या विस्ताराचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पुलामुळे बाधित ६० रहिवाशांना पर्यायी घरांची वाटप पत्रे (अलॉटमेंट लेटर) वितरित करण्याचा कार्यक्रम कल्याण डोंबिवली महानगर प्रशासनाने आज दुपारी तीन वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित केलेला आहे.

सदर पुलामुळे विस्थापीत होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे सदर उड्डाणपुलाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता काम वेगाने पूढे जाईल असे चव्हाण म्हणाले.

Clear the way for remaining work of Thakurli bridge

Kalyan East भागात हायटेक सेमी इंग्लिश स्कुल उभारण्याची मागणी

Kalyan East : दिवसेंदिवस मराठी शाळेतील मुलांची घटती पटसंख्या, शाळेसाठी असलेल्या राखीव भूखंडावर झालेली अतिक्रमणे, शाळांची झालेली दुरावस्था तसेच कल्याण डोंबिवली शहरातील सर्व महापालिकेच्या शाळा या सेमिइंग्लिश करणे बाबत माजी नगरसेवक नितीन निकम यांनी नुकतीच कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांची भेट घेतली.

Kalyan East भागात मोठ्या प्रमाणावर गरीब व मध्यमवर्गीय नागरिक राहत असून इंग्रजी शाळेत आकारण्यात येणारी भरमसाठ फी व डोनेशन आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना परवडणारे नाही. कल्याण पूर्वेत नेतीवली येथे महापालिकेच्या मालकीची केवळ एकमेव सेमीइंग्लिश शाळा आहे. मात्र ती शहराच्या एका वेगळ्या टोकाला असल्याने कल्याण पूर्वेच्या मध्यभागी असलेल्या काटेमानिवली शाळा व जाईबाई शाळा येथे तातडीने सेमीइंग्लिश स्कुल सुरू करावे अशी मागणी निकम यांनी केली आहे.

अलीकडल्या काळात काटेमानिवली येथील शाळेची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. शाळेसाठी असलेल्या राखीव भूखंडावर झालेली अतिक्रमणे हटवून तेथे नव्याने सुसज्ज ईमारत बांधून कल्याण पूर्वेतील मुलांसाठी सर्व सोयीसुविधा असलेली हायटेक सेमी इंग्लिश स्कुल सुरू करण्यात यावे अशी मागणी देखील नितीन निकम यांनी आयुक्तांना केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक कैलास शिंदे देखील उपस्थित होते.

Demand for establishment of Hi-Tech Semi English School in Kalyan East area

Kalyan East : गणेशवाडीतील गीता हरिकीसनदास रुग्णालयात लहान मुलांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याची होतेय मागणी

Kalyan East : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी गणेशवाडी येथे महानगरपालिकेचे गीता हरीकिसनदास हे रुग्णालय आहे. या रुग्णालयात सध्या ओ.पी.डी. आणि कोळसेवाडी नागरी सुविधा केंद्र सुरू आहे. याजागी लहान मुलांचे सुसज्ज रुग्णालय सुरू केले जावे अशी मागणी माजी नगरसेवक नितीन निकम यांनी महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रभाग क्रमांक ९२, गणेशवाडी येथील शक्तीधाम संकुलातील भूखंड हा सांस्कृतिक भवनाकरिता आरक्षित आहे. मात्र या भूखंडावर महात्मा फुले योजने अंतर्गत व इतर शासकीय योजने अंतर्गत सर्व आजारांवर ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातील असे सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू असून आरक्षण बदलण्यासाठी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. सदर भूखंडावर असलेल्या इमारतीत रुग्णालयाचे काम करण्यात आलेले आहे. मात्र आरक्षण बदल होईपर्यंत याठिकाणी महिलांसाठी प्रसृतिगृह तसेच गीता हरिकीसनदास रुग्णालयात सध्या सुरू असलेल्या सोयीसुविधा याठिकाणी हलविण्यात याव्यात याबाबत माजी नगरसेवक नितीन निकम यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

शक्तीधाम येथील इमारतीत १५ ऑगस्ट पर्यंत तातडीने प्रसृतिगृह उभारून गीता हरिकीसनदास रुग्णालय लहान मुलांसाठी सुसज्ज करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी महापालिका आयुक्तांनी दिले असल्याचे नितीन निकम यांनी म्हटले आहे. यावेळी शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड देखील उपस्थित होते.

Demand for setting up a well-equipped children’s hospital at Geetha Harikisandas Hospital in Ganeshwadi

Kalyan News : KDMC ‘ड’ प्रभाग क्षेत्र परिसर अजूनही नशेखोरांचा अड्डा? सामाजिक कार्यकर्त्यांनी तिघांना केलं पोलिसांच्या हवाली

Kalyan News : मंदिरातील निर्भया कांड प्रकरणाच्या निषेधार्थ कल्याण पूर्वेत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पूर्वेतील सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र येथे ही सभा पार पडली. या सभेला विधान परिषदेचे माजी आमदार आप्पा शिंदे, माजी नगरसेवक महेश गायकवाड, हर्षवर्धन पालांडे, उदय रसाळ, शरद पाटील, राधिका गुप्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मंदिराचे पावित्र्य पायदळी तुडवून सामूहिक बलात्कार आणि हत्या करणाऱ्या अटकेत असलेल्या आरोपी मिश्रा पांडे, आणि शर्मा यांना फाशी व्हावी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. तसेच विभागा विभागात WCR (वुमन कॉमन रूम) पालिकेच्या/शासनाच्या माध्यमातून उभे करण्यात यावेत. ज्यात स्वच्छ, सुशोभीत व टीव्ही असलेला हॉल, वाचनालय, महिला समुपदेशक, चेंजिंग रूम, टॉयलेट, महिला पोलीस कर्मचारी अशी व्यवस्था महिलांसाठी करावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ही बैठक संपल्यानंतर मात्र त्यांना याच परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला. काही तरुण डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानकेंद्र जवळ असलेल्या शौचालयाच्या ठिकाणी नशा पाणी करत होते. शौचालय चालक ही त्यांना मिळाला असल्याचे सांगण्यात येते. हा सर्व प्रकार निदर्शनास आल्यानंतर उपस्थित्यांनी हल्ला बोल करीत त्या शौचालयाच्या ठिकाणी नशा पाणी करता यावं म्हणून केलेले शेड, काढून टाकण्यात आले. यानंतर पोलीस घटनास्थळी आले. तिथे चिलीम आणि नशेचे पदार्थ असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. तात्काळ तरुणांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी अवैध धंद्यांवर बुलडोझर चालविण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले. मात्र याच महापालिकेच्या नाकाखाली बसून नशापाणी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा समोर आला असून ‘ड’ प्रभाग क्षेत्र अजूनही नशेखोरांपासून मुक्त झाला नसल्याचे समोर आले आहे.

कल्याण पूर्वेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन, जिथे जिथे अवैध धंदे, नशा पाणी केंद्र चालतात त्यावर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी, निवेदन करून बैठकीत मांडावी यासाठी माझाही पुढाकार असेल.

आप्पा शिंदे (माजी विधानपरिषद सदस्य)

________________________________

“‘ड’ प्रभाग क्षेत्र परिसरात एक शौचालय आहे. या शौचालयाच्या आवारात बसून एक इसम लोकांकडून गैरप्रकारे पैसे गोळा करतो. आणि तिथेच छप्पर बांधून तो नशेखोरांना जागा तयार करून देतो. या ठिकाणी चरस गांजाचे सेवन केले जाते. ही गंभीर बाब असून सदर इसमालाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.” -हर्षवर्धन पालांडे (माजी नगरसेवक)

_____________________________________

“‘ड’ प्रभाग क्षेत्राच्या परिसरात गांजा, चरस अशा अमली पदार्थ सेवन केले जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस स्थानकात करण्यात येतात मात्र त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. काही तरुणांना आम्ही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्यांनी बनवलेले छप्पर देखील तोडले आहे. महिलांनी असाच आवाज उचलल्यास अशा गोष्टी बंद होतील असे मला वाटते.” –उदय रसाळ (माजी नगरसेवक)

____________________________________

“‘ड’ प्रभाग क्षेत्रात लोक संध्याकाळी फेरफटका मारायला येतात. याठिकाणी सुंदर असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र उभारले आहे. आणि अशा पवित्र वास्तूच्या परिसरातील आवारात अशा गोष्टी करणे ही शर्मेची बाब आहे. यागोष्टी कुठे ना कुठे थांबविण्याची आपल्याला गरज आहे.”शाहीन मुल्ला (समाजसेविका)

Kalyan News : KDMC ‘D’ ward area is still a haven for addicts

KDMC आरोग्य विभागा विरोधात समाजसेवकांनी मांडला ठिय्या

KDMC : कल्याण डोंबिवली महपालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार सद्या मोठ्या चर्चेतील विषय बनला आहे. पालिका प्रशासनाची आरोग्य व्यवस्था अकार्यक्षम असल्याचा आरोप आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. मात्र पालिका प्रशासन या सर्व आरोपांचे खंडण वेळोवेळी करीत असून आमची आरोग्य सेवा सुरळीत असल्याचे परिपत्रक काढून सांगत आहे. कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या गीता हरिकिसनदास रुग्णालयात जाणीव सामजिक संस्थेचे पदाधिकारी समाजसेवक प्रथमेश सावंत यांच्या पुढाकाराने ठिय्या मांडून बसले असून काही वेळापूर्वी महापालिका वैधकिय अधिकारी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी उस्थित राहिले होते.

महानगरालिकेचा आरोग्य विभाग शहरातील नागरिकांना पुरेशा सोयी सुविधा देण्यास असमर्थ ठरत असल्याचे आरोप राजकीय पक्षांमार्फत देखील करण्यात आले असून मनसेने ट्रॉफी देऊन आंदोलन केले होते. या अगोदर एका महिलेची पालिका रुग्णालयाच्या दालनात प्रसृती झाल्याने महानगरपालिका प्रशसनावर टीकेची झोड उठली होती.

शासकीय रुग्णालयात रुग्णांना लागणारे औषध गोळ्यांचा अपुरा पुरवठा, उपलब्ध नसलेले इंजेक्शन, अपुरे मनुष्बळ, उपचारासाठी कळवा येथे पाठविणे अशा अनेक कारणांमुळे कल्याण डोंबिवली महापालिका आरोग्य विभागावर सवाल उपस्थित केले जात असून त्यांचे खाजगी रुग्णालयाशी हितसंबंध आहेत असेही आरोप सामान्य नागरिक करू लागले आहेत. कल्याण पूर्वेतील गीता हरिकिसनदास रुग्णालयाच्या कारभारा विरोधात समाजसेवक प्रथमेश सावंत यांनी ठिय्या मांडला असून जोपर्यंत समाधानकारक उत्तर दिली जात नाही तोवर इथून हटणार नाही असे सावंत यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे.

आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी देखील अधिकाऱ्यांना सवाल उपस्थित केले. जनतेकडून आरोग्य सेवेचा कर घेता मग परिपूर्ण सेवा का देत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

-संतोष दिवाडकर

Social workers organized against KDMC health department