Kalyan Loksabha : मोदींच्या सभेपुर्वी शिवसेनेच्या कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुखाचा मुख्यमंत्र्यांकडे ना-राजीनामा

Kalyan Loksabha : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कल्याण शहरात जाहीर सभा होत आहे. मात्र या सभेपुर्वी शिवसेनेचे कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मोदींच्या सभेवरून मोरे हे नाराज असल्याचे त्यांच्या राजीनाम्यातुन स्पष्ट होत आहे.

शिवसेनेच्या बंडानंतर सुरुवातीला अरविंद मोरे हे ठाकरे गटात होते. यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची कल्याण मुरबाड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली. पदनियुक्तीनंतर ते मिळालेली जबाबदारी पार पाडत होते. मात्र आता मोदींच्या सभेपुर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

जिल्हाप्रमुख या पदाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मान प्राप्त करून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणमधील सभेकरिता आमदार, माजी आमदार तसेच पक्षाचे शहरप्रमुख यांना मंचावर निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र शिवसेनेच्या प्रोटोकॉलनुसार जिल्हाप्रमुखालाही हा मान मिळायला हवा होता. यात माझे नाव जाणीवपूर्वक डावलले असल्याने मी या पदाचा राजीनामा देत असल्याचे अरविंद मोरे यांनी पत्रात म्हटले आहे. नरेंद्र मोदी भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील, कल्याणचे डॉ.श्रीकांत शिंदे व ठाण्याचे नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ ही सभा घेत असून शिवसेनेतील अंतर्गत नाराजी समोर आल्याच्या चर्चा कल्याणच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

Kalyan Loksabha : Shiv Sena’s Kalyan Murbad District Chief Resigns to Chief Minister Ahead of Modi’s Meeting

Kalyan Loksabha : कल्याण पूर्वेत आज शिंदे-दरेकर आमने सामने; एकाच दिवशी प्रचार रॅली

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात सध्या प्रचाराच्या फेऱ्या झडत असून कळवा ते अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात प्रचार रॅली सुरू आहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना उबाठा असा सामना कल्याण लोकसभेत रंगला असून शिवसेनेकडून डॉ.श्रीकांत शिंदे व उबाठा पक्षाकडून वैशाली दरेकर हे उमेदवार लढत देत आहेत. योगायोगाची बाब म्हणजे आज कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी एकाच वेळी हे दोन्ही उमेदवार शक्ती प्रदर्शन करणार आहेत.

शिवसेनेचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांची प्रचार रॅली दुपारी ४ वाजल्या पासून श्री राम टॉकीज येथील पंचमुखी हनुमान मंदिरापासून सुरू होणार आहे. पुढे या रॅलीचा मार्ग अपर्णा डेअरी, खडेगोळवली नाला, रायगड कॉलनी, आंबेडकर चौक ६० फुटी रोड, शिवाजी महाराज चौक, राजाराम चौक, चिंचपाडा रोड, काटेमानिवली चौक, कोळसेवाडी, सिद्धार्थ नगर, तिसगाव रोड, गुंजाई चौक, लोकग्राम, नेतीवली रोड, चक्कीनाका असा असणार आहे.

शिवसेना उबाठा पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची प्रचार रॅली सायंकाळी ५ वाजता साईनगर शिवसेना शाखेपासून सुरू होणार आहे. पुढे या रॅलीचा मार्ग पुणे लिंक रोड, काटेमानिवली, कोळसेवाडी, सिद्धार्थ नगर, तिसगाव रोड, गुंजाई चौक, लोकग्राम, सुमेरू टॉवर पासून पुढे एका विकासकाच्या कार्यालयाजवळ या रॅलीचा सांगता होणार आहे. दोन्ही उमेदवारांच्या प्रचार रॅलीचा मार्ग हा जवळपास एकच असल्याने दोन्ही रॅली या आमने सामने नव्हे तर मागे पुढे असणार आहेत. एक वेळ एक मार्गिका असल्याने समन्वय कसा साधला जातो हे आता पहावे लागणार आहे.

कल्याण पूर्वेचा बराचसा भाग हा अतिशय कोंडीचा असल्याने या भागातील रस्ते देखील अरुंद आहेत. यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना कल्याण पूर्वेतील नागरिकांना सहन करावा लागतो. त्यात आता दोन्ही उमेदवार एकाच दिवशी एकाच वेळी या रस्त्यांवर शक्ती प्रदर्शनासाठी उतरणार असल्याने हे रस्ते देखील कोंडीत सापडणार आहेत. परिणामी परिसरातील नागरिक, तसेच लगीन खरेदीसाठी तसेच इतर खरेदीसाठी बाहेर पडलेल्या खरेदीदारांना मात्र मोठ्या जाचाला सामोरे जावे लागणार आहे हे मात्र नक्की.

-संतोष दिवाडकर 8767948054

Kalyan Loksabha : Shinde-Darekar face off today in Kalyan East

Lagnachya goshti : लग्न पहावे करून; भाग पहिला

Lagnachya goshti : लग्न पहावे करून… यंदा कर्तव्य आहे… जुळल्या रेशीमगाठी… असल्या ओळी आता हमखास वाचायला मिळत आहे. शहरातील गल्लोगल्ली व गावातील वाडीवाडीत लग्न समारंभाचे सूर ऐकायला मिळत आहेत. म्हणून म्हटलं की हीच वेळ योग्य आहे लग्नावर लिहण्याची. बरेच दिवस हे डोक्यात घोंगवणारे विचार लिहायला मोकळीक मिळत नव्हती. म्हटलं आता थोडा वेळ काढुच आणि मग केली ही सुरुवात.

या नव्या लेख मालिकेतून मला आधुनिक लग्न समारंभाविषयी सांगायचे आहे. तसे विषय बरेच आहेत. जसे की लग्नाची ठरवा ठरव, बस्ता, पत्रिका, मानपान, भोजन समारंभ, पाहुण्यांचे रुसवे फुगवे, वरातीचा घाट, पूजा, जागरण गोंधळ आणि पुढचे काही दिवस. यातील प्रत्येक मुद्द्यावर मी निश्चितपणे बोलणार आहे.

दोन वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. त्यामुळे मी स्वतःच्या लग्नात अनुभव घेऊनच पुढे इतरांच्या लग्नातील सावळे गोंधळ सांगणार आहे. सुरुवात करायची झाली तर बघा बघी पासून. मुळात कोणत्याही लग्नाचा हा मुख्य पाया असतो. हा जर नीट नसेल तर त्या दोघांचे संपूर्ण आयुष्य हे तडजोड करण्यातच जातं. ज्यात सुखाचा शोध शोधून शोधून घ्यावा लागतो.

फार पूर्वी प्रेमविवाह म्हणजे गैर मानले जात होते. थोडक्यात पालकांना नाक कापले गेल्याचा आविर्भाव होत असे. आज हाच आविर्भाव अभिमान बनला आहे. आमक्या आमक्याच्या पोराने पोरगी पटकावली. तुमच्या पोराला काय जमत का नाय? किंबहूना आता पालक आपल्या मुलालाच म्हणतात की तुला मुलगी शोधता नाही येत का? की ते आता आम्हीच बघायचं? आता या प्रेमविवाहाच्या गोष्टी झाल्या. ज्या अजूनही काही घरांमध्ये मान्य नाहीत. जग काय म्हणेल? या एका प्रश्नामुळे कित्येक पालक आपल्या मुलांचे सुख हिरावून घेतात. तर काही मुलं घरातून पळून जाणे पसंद करतात.

पालकांना एक गोष्ट सांगायला नक्की आवडेल. देवाधिकानी देखील प्रेम केले आहे. यात गैर काय आहे ? शेवटी काय तर आयुष्याच्या जोडीदाराची निवडच ती. उगाच तुम्ही ठरवून दिलेल्या लग्नाचा मागे लागता आणि मुलांना ज्ञानाच्या गोष्टी सांगता. यामुळे होत असे की, ठरवून केलेलं लग्न हे यशस्वी होत की नाही हे सांगू शकत नाही. काही वेळेस मुलाला मुलीचे वागणे पटत नाही, मुलीला मुलाचा स्वभाव पटत नाही. काही वेळेस शांत स्वभावाच्या मुलाला नखाने ओरबाडून मांजरी सारखी चवताळणारी बायको मिळते. तर कधी गरीब गाई मुलीला दारुडा आणि मारझोड करणारा अन्यायकारी नवरा मिळतो. आणि मग पुढे काही दिवस घरच्यांच्या बैठका, वोर्निंग लेटर, सोडचिठ्ठया, भांडण, खर्चाची मागामाग असे खूप काही कुटाने होतात. पण हे तेव्हाच जेव्हा त्रास सहन करायची तयारी नसते.

आई वडिलांना त्रास नको म्हणून कित्येक लेकीबाळींनी नवऱ्याचा व सासरच्या लोकांचा जाच सहन केला आहे. बापाकडे फुलाप्रमाणे आयुष्य जगलेली मुलगी सासरी आल्यावर अक्षरशः पायपुसन देखील बनली आहे. हे समाजातील भीषण वास्तव्य आहे. परिस्थिती आज ना उद्या बदलेल या एका आशेवर कित्येक संसार अजूनही सुरू आहेत. पण जोपर्यंत पती पत्नी एकमेकांच्या सुखाचा विचार करीत नाहीत तोवर हे संसार कधीच बहरत नाहीत. म्हणून म्हटले की स्थळ शोधन ही लग्नाची पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. ही पसंद चुकली तर आयुष्याचा खेळ झाला. पण शेवटी खेळ तर नियतीचा पण आहे. जसं वालाह्याचा वाल्मिक ऋषी होतो तसंच काही.

म्हणजे सांगायचं हे की काही वेळेस पसंद चुकते सुरुवातीची काही वर्षे जाचात जातात पण कुठून तरी आशेची किरण जागी होतात आणि आयुष्याला कलाटणी मिळते. दुःखाचा संसार सुखाचा होतो जेव्हा वेळ चांगली होते. आणि बहुतेक वेळा ही चांगली वेळ आनण आपल्याही हातात असतं. अशा परिस्थितीत आपलं आयुष्य बरबाद झालं हा विचार सोडून आपलं आयुष्य सुंदर होणार आहे हा विचार करून संसाराचा गाडा पुढे हाकत रहावा. असे करणाऱ्याच्या आयुष्यात नक्कीच सोन्याचे दिवस येतात.

मुला मुलीचे लग्न जमवताना अगोदर त्यांच्या सुखाचा विचार केला जावा. कारण फक्त लग्न लावून देणं ही आपली जबाबदारी नाही. तर आपल्या मुलाबाळाचं सुख कशात आहे हे पाहूण आपली खरी जबाबदारी आहे. असो आता लग्न ठरल्यानंतर बातमी वाऱ्यासारखी नातेवाईकांमध्ये, शेजारीपाजारी, गावभर पसरते. मग चर्चा सुरू होतात. “हीच जमलं बरं का… कुठं दिली तिला?… बरीच लांब दिली… आता तिकडे कामं जमली तर बरी… अजून चांगलं स्थळ बघायला पाहिजे होतं… पोरगी लय शिकली पण पोराचं शिक्षण कमी आहे… पोर सावळी आहे पण नवरा गोरापान भेटला बुवा… सरकारी नोकरी आहे पोराची… तरी पण नीट चौकशी केली पाहिजे यांनी…” या अशा चर्चा ऐकायला मिळतात.

ऍरेंज मॅरेज… म्हणजेच ठरवून लग्न करण्यामागचे एकमेव कारण म्हणजे आमच्या मुला मुलीचे लग्न आमच्याच समाजात किंवा जाती जमातीत करून देण्याचा अट्टहास. मग जातीपुढे आयुष्याची माती का होईना. आम्ही जोखीम उचलायला तयार असतो. जो जातीचा नाही तो या मातीचा नाही अशा फुशारक्या करणारी चार पाच स्वयंघोषित विचारवंत टाळकी पुढे येतात आणि दुसऱ्याच्या आयुष्याचा सौदा करून सुपारी फोडून पान चावून कोपऱ्यात घाण करून निघून जातात. यांच्याबद्दल बोलायची आवश्यकता ही आहे की यांचे मोठेपण मिरवणे हे कुणाच्या तरी आयुष्याशी खेळ असतो. त्यामुळे आजच्या जगात जाती पाती पाहण्यापेक्षा तुम्ही मुलाचे विचार आणि आपल्या मुलीला तो कसा सुखी ठेऊ शकतो हे पाहण्याकडे प्राधान्य द्या. कारण जात जात करून उद्या जेव्हा संकट येईल तेव्हा कोणी पूढे येत नसतं. त्या संकटाला आपल्यालाच सामोरे जायचे असते. मग जी चार लोक तुमच्या गरजेला उपयोगी पडतील का नाही हे माहीत नाही ते काय म्हणतील या विचाराने मुलांच्या आयुष्याशी खेळू नका. जोडीदार निवडताना जात पात विसरा त्या जोडीदाराची गुणवत्ता पहा. सुखाचा संसार होईल अशी खात्री असेल तर द्या हातात हात.

तुमचं लग्न झालं आहे का? ठरलं आहे का? किंवा तुमच्या ऐकण्यात असे काही किस्से असतील तर नक्की कमेन्ट करा. किंवा मला पर्सनल मेसेज करून तुमचं मत नक्की कळवा. जेणेकरून मला हे कळेल की हा लेख कोण कोण वाचत आहे. आणि वाचकांना त्याबद्दल काय वाटते. आता पुढच्या भागात आपण जरा निमंत्रण पत्रिकां बद्दल बोलूयात. तो खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यावर व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. पत्रिका ऑनलाइन की ऑफलाइन द्याव्यात यावर व्यक्त होऊयात. वाट पहा… लवकरच पुढील भाग.

संतोष दिवाडकर (युवा पत्रकार 8767948054)

Lagnachya goshti : Lagna pahave karun; part 1

Arya Global ग्रुप ऑफ स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा

Arya Global : महाराष्ट्र ही स्वप्नांची आणि संधीं प्राप्त करून देणारी भूमी आहे जिथे कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय तुम्हाला स्थान मिळवून देऊ शकते. महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नाही तर संस्कृती, भाषा आणि परंपरा यांचे विभिन्न रूप आहे.

Arya Global ग्रुप ऑफ स्कूल्सने 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. हे ऐक्य, लवचिकता आणि प्रगतीच्या भावनेचे प्रतीक आहे. जे राज्याच्या अनेक दशकांच्या प्रवासाची व्याख्या करते. महाराष्ट्र दिन 2024 हा कामगार दिन किंवा कामगार दिवस म्हणून ओळखला जाणारा दिवस संपूर्णपणे आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलच्या शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना समर्पित करण्यात आला.

आर्य गुरुकुल, अंबरनाथ, नांदिवली आणि सेंट मेरी स्कूल, कल्याण येथे ध्वजारोहण झाले. मुंबईच्या उत्तुंग गगनचुंबी इमारतींपासून ते पश्चिम घाटाच्या निर्मळ भूदृश्यांपर्यंत, महाराष्ट्राने परंपरा, भाषा आणि श्रद्धा यांनी व्यापलेला आहे. हे वाक्य शाळेतील दादांनी आणि माऊशींनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये भाषणे देऊन दिवसाचे महत्त्व सांगितल्यामुळे महाराष्ट्र दिन हा उत्साहाने साजरा झाला. मुख्याध्यापक आर्य गुरुकुल, अंबरनाथ, नीलेश राठोर, मुख्याध्यापक आर्य गुरुकुल नांदिवली, राधामणी अय्यर, मुख्याध्यापिका सेंट मेरी स्कूल दिव्या बोरसे, समन्वयक, शिक्षक व सर्वांच्या उपस्थितीने दिवसाची भव्यता अधिक दृढ झाली.

शिक्षकेतर कर्मचारी, माऊशी आणि दादांच्या आर्यग्लोबल ग्रुपची कामगिरी टाळ्यांच्या कडकडाटात दुमदुमली. चमकणाऱ्या चेहऱ्यांनी कौतुकास्पद नोट्सची देवाणघेवाण केली कारण प्रेक्षकांनी आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर त्यांचे प्रेम आणि आराधना व्यक्त केली. श्रमाचा सन्मान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असले पाहिजे. तो आपल्या स्वभावाचा एक भाग असला पाहिजे. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारंपारिक दीपप्रज्वलनाने उत्सवाची सुरुवात झाली आणि त्यानंतर माऊशी आणि दादांनी सादर केलेल्या मंत्रमुग्ध करणारी सादरीकरणे झाली. त्यानंतर शिक्षकांनी आमच्या सहाय्यक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मुख्याध्यापकांनी आपल्या प्रेरक भाषणात सर्वांचे हार्दिक स्वागत केले. राज्याबद्दल प्रेमाचे प्रतीक सादर केले आणि आपल्या समाजातील प्रत्येक घटक कसा महत्त्वाचा आहे आणि आर्यग्लोबल ही शैक्षणिक संस्था सुरळीतपणे चालविण्यात आपल्या लाडक्या माऊशी आणि दादांची महत्त्वाची भूमिका कशी आहे हे सांगितले.

उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रीय स्तरावर साजरा केल्या जाणाऱ्या दिनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल कलाकारांचे कौतुक करण्यात आले. तो खरोखर एक आनंददायक प्रसंग होता. सर्वत्र आनंदी चेहरे दिसत होते.

Celebrating Maharashtra Day and Labor Day in Arya Global Group of Schools