Titwala येथील शाळेचा RTE विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यास नकार? पालकांचा शिक्षण मंडळ कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा

Titwala : शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. सरकारने राबवलेल्या आरटीई शिक्षण योजने अंतर्गत मुलांना शिक्षण आणि शैक्षणिक साहित्य शाळेने देणे बंधनकारक असतांना टिटवाळ्यातील रवींद्र विद्यालयाने मात्र आरटीई विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यास नकार दिला असून शाळेकडून पालकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे बुधवार पर्यंत शाळेने मुलांना शालेय साहित्य न दिल्यास शिक्षण मंडळ कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आता पालकांनी दिला आहे.

सरकारने राबवलेल्या आरटीई शिक्षण योजने अंतर्गत टिटवाळा येथील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी रवींद्र विद्यालय या शाळेत प्रवेश मिळवला आहे. तेव्हा पासून शाळेने कधीही शैक्षणिक साहित्य वाटप केलेले नाही. मात्र हया वर्षी सर्व पालक शाळेच्या मुख्याध्यापकांना शैक्षणिक साहित्य वाटप कधी करणार हे विचारायला २८ एप्रिल रोजी गेले असता मुख्याध्यापकांनी असभ्यतेची भाषा वापरून पालकांवर दबाव टाकला. तसेच तुमची ऐपत नव्हती आपल्या मुलांना शिकवण्याची तर या शाळेत मुलांना का टाकले? तसेच तुमच्या मुलांना शिकवायचे आहे की नाही हे आमच्या हातात आहे. म्हणून यापुढे तुम्ही पालकांनी एकत्र एऊन अशी तक्रार करायची नाही. तुम्हाला शैक्षणिक साहित्य शाळेतूनच विकत घ्यावे लागेल. असे म्हणून आम्हाला शाळे बाहेर काढून दिले असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

याबाबत सर्व पालकांनी टिटवाळा पोलिस स्टेशन येथे शाळेविरोधात तक्रार केली. त्या नंतर २ मे रोजी सर्व पालकांनी केडीएमसीच्या शिक्षण विभाग कार्यालयात शाळेची लेखी तक्रार केली. यानंतर शाळेला १४ मे रोजी आरटीईचे एक लेखी पत्रक दिले गेले. आरटीईच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य व गणवेश ४८ तासांच्या आत मोफत पुरविण्यात यावे असा उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे. परंतु शाळेने शिक्षण विभागाचा आदेश न मानता शाळा आपल्या मनमर्जि प्रमाणे वागत असल्याचा आविर्भाव पालक व्यक्त करीत आहेत.

त्यामुळे बुधवारपर्यंत आरटीई अंतर्गत पालकांना पाल्यासाठीचे मूलभूत अधिकार अंतर्गत येणारे शैक्षणिक साहित्य मिळाले नाही तर गुरुवारी शिक्षण विभाग कार्यालयात सर्व पालकांसोबत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या पालकांनी दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

RTE of Titwala school refuses to provide educational materials to students? A warning of sit-in agitation at the parents’ education board office

Shahad News : ‘आधी प्रश्न सोडवा मग मते मागायला या’ – स्थानिक नगरसेवकाला मनसेची बॅनर लावून कानपिचकी

Shahad News : कल्याण पश्चिमेतील  शहाड परिसरातील आंबिका नाला हा अरुंद आहे. तसेच या भागात नाल्यावर बेकायदा बांधकामे झाली असल्याची ओरड आहे. ९ जून रोजी पहिल्या पावसाचा फटका शहाड परिसराला बसला. या प्रश्नावर मनसेच्या पदाधिकार्याने एक बॅनर आंबिकानगर येथे लावला आहे. त्यावर आधी प्रश्न सोडवा. मग मते मागायला या असे लिहिले आहे. स्थानिक नगरसेवकाला कानपिचक्या देत  हा बॅनर लक्षवेधी ठरत आहे.

मनसेचे पदाधिकारी पंकजराजे पाचपिंडे यांनी हा बॅनर लावला आहे.९ जून रोजी नाल्याचे पाणी तुंबले व ते रस्त्यावर कसे साचले? त्यात वाहने कशा प्रकारे अडकली? याचे फोटोही बॅनरवर लावले आहेत. तासाभराच्या पावसाने ही  अशी स्थिती उद्धवते. आधी प्रश्न सोडवा। मगच मते मागायला या. प्रश्न सोडविला नाही तर मते मिळणार नाहीत असा इशारा राजकीय पक्षांसह लोकप्रतिनिधींना दिला आहे. त्यामुळे या फलका मुळे  परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

-रोशन उबाळे

Shahad News: ‘First solve the problem, then come to ask for votes’ – MNS banner to local corporator

Dombivli Murder : रेल्वे मैदानावर  इसमाची हत्या; दांडक्याने प्रहार केल्याचे निष्पन्न

Dombivli Murder : शहराच्या पश्चिमतील बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदानात एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अद्याप पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली नसून त्या दिशेन तपास सुरु आहे. मृतदेहाच्या डोक्यावर जोरदार प्रहार केल्याच्या खुणा दिसत असल्याने त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. डोंबिवली विष्णूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

डोंबिवली पश्चिमेला बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदानात एका इसमाचा मृतदेह पडल्याची माहिती विष्णूनगर पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन सदर जागेवर इसमाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. साधारणतः ४५ ते ५० वयोगटातील या इसमाच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केल्याचे त्याचा जागीच मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेहाची ओळख पटली नसली तरी पोलीस मृतदेहाची माहिती काढण्यासाठी चौकशी सूरु केली आहे.

बावनचाळ परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन इसमाला मारले असावे. परंतु त्याची हत्या करण्यामागे काय उद्देश असावा? कोणी हत्या केली असावी? याचा तपास विष्णूनगर पोलीस करत आहे. दरम्यान बावनचाळीत रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवणे आवश्यक झाले आहे.

-रोशन उबाळे

Dombivli Murder: Murder of a man at a railway ground; Conclusion of being hit with a stick

कल्याणमधील आनंदवाडी पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यासाठी होतेय मागणी

कल्याण : कल्याण पूर्व कोळसेवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत, Kalyan police आनंदवाडी डबल टॉवर जवळ असलेली पोलीस चौकी अनेक दिवसांपासून बंद आहे. या बंद पोलीस चौकीमुळे परिसरातील लोकांमधे असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. येथून ये जा करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी विशेषतः महिला वर्ग ज्यांना याच परिसरातून रात्री ये जा करावी लागते त्यांना या बंद पोलीस चौकीमुळे असुरक्षितता वाटत असून ही बंद असलेली पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

कल्याण विकासिनी संस्थेचे अध्यक्ष ऍड. उदय रसाळ यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना पत्र लिहित या विषयाकडे लक्ष वेधले आहे. बंद असलेली पोलीस चौकी पुन्हा नव्याने सुरू करून नागरिकांना सुरक्षिततेचा आधार द्यावा अशी मागणी आता केली जात आहे.

कल्याण शहरातील अनेक भागात पोलीस चौक्या उभारण्यात आलेल्या आहेत. यातील काही चौक्या या आजतागायत सुरू आहेत तर काही चौक्या या बंद अवस्थेत उभ्या आहेत. यातीलच आनंदवाडी या भागातील चौकी देखील बंद असून ती पुन्हा सुरू होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

-कुणाल म्हात्रे

Demand for reopening of Anandwadi police station in Kalyan

KDMC Election : स्वबळावर लढण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मानस; – जगन्नाथ शिंदे

कल्याण :- राष्ट्रवादी कॉंगेसच्या वर्धापन दिनानिमित्त ८ ते १६ जून दरम्यान वर्धापन दिन सप्ताह विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जात असून या दरम्यान विरोधी पक्षाकडून ओबीसी आरक्षणाबाबत पसरवल्या जाणार्या चुकीच्या माहितीचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत बोलताना आप्पा शिंदे यांनी अप्रत्यक्ष स्वबळाचा नारा दिला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्राचे ओबीसी आरक्षण नाकारले गेले असून मध्यप्रदेशला मात्र ओबीसी आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. महाराष्ट्रला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. पुढे याबाबत बोलताना शिंदे यांनी पक्षपातळीवर महाविकास आघाडी होईल असे संकेत आहेत. मात्र स्थानिक  महानगर पातळीवर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते इच्छुक असतात अशावेळी आघाडी झाल्यास कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता असल्यानेच पालिका निवडणुका KDMC Election स्वबळावर लढण्याची तयारी करण्यात आली आहे. निवडणुका जवळ आल्यानंतरच आघाडीबाबत योग्य तो  निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटलेला नसताना महापालिका निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षण वगळून होत असल्या तरी येत्या केडीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तिकीट वाटप २७ टक्के ओबीसी आरक्षण गृहीत धरूनच केले जाणार असल्याचे माजी आमदार व कल्याण डोंबवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.

-रोशन उबाळे

कल्याण पूर्व ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या आवारात साकारणार बाबासाहेबांचे स्मारक; स्मारक समितीने पेढे वाटून मानले खासदारांचे आभार

कल्याण : अनेक वर्षांपासून काही कारणास्तव प्रलंबित असलेल्या कल्याण पूर्व ‘ड’ प्रभाग क्षेत्र आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग आता मोकळा होऊ लागला आहे. क.डों.म.पा.ने या स्मारकासाठी ८ कोटी ७४ लाखांची निविदा मंजूर केली आहे. यामुळे स्मारक समितीने आज खासदार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांना पेढे देऊन त्यांचे आभार मानले आहेत.

कल्याण पूर्वेतील ‘ड’ प्रभाग क्षेत्र आवारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच पुण्यतिथी साजरी केली जाते. मात्र या ठिकाणी पुतळा नसल्याने बाहेरून पुतळा आणताना विशेष कसरत करावी लागते. या भागात बाबासाहेबांचे स्मारक व्हावे याकरिता अनेक प्रयत्न सुरू होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे स्मरकास विलंब होत होता. मात्र आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने याकरिता ८ कोटी ७४ लाखांची निविदा मंजूर केली आहे. यानुसार १० महिन्यांत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तसेच ज्ञानकेंद्र उभे राहणार आहे.

आज विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती कल्याण पूर्वने मा.नगरसेवक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या वतीने त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना पेढे देऊन आनंद साजरा करीत आभार मानले. यावेळी संस्थापक अण्णासाहेब रोकडे, अध्यक्ष देवचंद अंबादे, कार्याध्यक्ष महेश गायकवाड, सचिव सुमेध हुमणे, कोषाध्यक्ष भारत सोनवणे, सह कोषाध्यक्ष शेखर केदारे, समाजसेवक सुभोध भारत, समता फेरी अध्यक्ष केतन रोकडे, मा.अध्यक्ष विवेक जगताप, मा.अध्यक्ष भारती जाधव, मा. सचिव पराग मेंढे, मनीष बनकर, तुषार जाधव, विलास गायकवाड, दादासाहेब महाले, शिल्पा अंबादे, पल्लवी जाधव आणि इतर पदाधिकारी व आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.

-संतोष दिवाडकर

Web Title : The Ambedkar Memorial Committee distributed sweets and thanked MP Shrikant Shinde

वसार गावात प्रवेशद्वाराचे लोकार्पण

कल्याण : श्री नानासाहेब धर्माधिकारी ( Nana saheb Dharmadhikari ) आई गांवदेवी प्रसन्न प्रवेशद्वाराचे लोकार्पण आज होळीच्या निमित्ताने वसार गावात करण्यात आले. स्व.तुळशीराम गायकर यांच्या स्मरणार्थ रमेश गजानन फुलोरे यांच्या सौजन्याने व सुभाष गायकर तसेच सागर फुलोरे यांच्या प्रयत्नाने व स्वखर्चाने करण्यात आले आहे.

प्रत्येक गावात अथवा शहरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला कमानीतून जावे लागते. यातून आपण कोठे प्रवेश करीत आहोत हे सर्वांना समजते. या दृष्टीने वसार गावात आता नवे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून यावर विचार केला जात होता. मात्र उद्योजक सुभाष गायकर, सागर फुलोरे, रमेश फुलोरे आणि सहकाऱ्यांनी मिळून या प्रवेशद्वाराच्या निर्मितीला सुरुवात केली. होळीच्या शुभमहूर्तावर सकाळी फीत कापून या प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले.

आयोजित लोकार्पण सोहळ्याला अनेक मान्यवर तसेच प्रमुख अतिथी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र भुषण विश्वनाथ महाराज वारींगे उपस्थित होते. त्याचबरोबर शंकर महाराज म्हात्रे, अभिमन्यू चिकणकर, अशोक म्हात्रे, गणेश कोळेकर, दिलीप फुलोरे, नरेश वायले आदी मान्यवरांसह ग्रामस्थ देखील उपस्थित होते. याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार देखील मानण्यात आले.

उद्योग क्षेत्रात किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना आपण समाजासाठी देखील काहीतरी देणं लागतो हा विचार प्रत्येकाने करायला हवा. आणि याच विचारातून आम्ही हे प्रवेशद्वार उभे करण्यासाठी पुढे सरसावलो असे उद्योजक सुभाष गायकर यांनी एम एच मराठीशी बोलताना सांगितले. यापुढेही लोकोपयोगी कार्य व समाजसेवा अविरतपणे सुरू ठेवणार असल्याचे गायकर म्हणाले.

-संतोष दिवाडकर

Web Title : Dedication of entrance to Vasar village

पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची Kalyan Mahotsav ला भेट

Kalyan Mahotsav : कल्याण पूर्वेतील तिसगाव गांवदेवी मंदिर प्रांगणात सुरू असलेल्या कल्याण महोत्सवाची सांगता काल झाली. अंतिम दिनी पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी कल्याण महोत्सवाला भेट दिली. यावेळी आयोजकांनी कोरोना काळात फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी तसेच स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.

अध्यक्ष दिलीप दाखिनकर आणि आधारस्तंभ महेश गायकवाड यांच्या आयोजनातून १२ मार्च पासून कल्याण महोत्सवाला सुरुवात करण्यात आली होती. पाचही दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या हस्ते महिला पोलिसांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे विठ्ठलवाडी स्मशानभूमीच्या कर्मचाऱ्यांना देखील सन्मानित करण्यात आले. यावेळी रुग्णवाहिकेवर कार्यरत असणारे ‘देवा’ यांचे आयोजक महेश गायकवाड यांनी देखील कौतुक केले.

संपूर्ण पाचही दिवस कल्याण महोत्सवात हजारोंच्या संख्येने लोकांनी भेट दिली. एम्युजमेंट पार्क, खाण्या पिण्याचे स्टोल, कपडे व इतर वस्तूंचे स्टोल या महोत्सवात लोकांच्या चांगलेच पसंतीस उतरले. या सर्वांबरोबर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी देखील प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. मागील दोन वर्षे कोरोनामुळे अश्या पध्दतीचे महोत्सव होत नव्हते. त्यामुळेच आम्ही लोकांना आनंद वाटण्याच्या उद्देशाने कल्याण महोत्सव आयोजित केला असल्याचे अध्यक्ष दिलीप दाखिनकर व महेश गायकवाड यांनी सांगितले.

-संतोष दिवाडकर

Web Title : Deputy Commissioner of Police Sachin Gunjal visits Kalyan Mahotsav

कल्याण शहरात जल्लोषात सुरू झाला ‘कल्याण महोत्सव’

Kalyan Mahotsav : मातोश्री गुंजाई फाउंडेशन आणि आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विध्यमाने तिसगाव येथील गांवदेवी मंदिराच्या प्रांगणात काल पासून कल्याण महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. महोत्सवाची सुरुवात ढोल ताशांच्या गजरात करण्यात आली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली उपस्थिती दर्शविली.

ऐतिहासिक कल्याण शहराची संस्कृती जपणारा महोत्सव म्हणून कल्याण महोत्सव साजरा केला जात असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. १२ मार्च ते १६ मार्च पर्यंत कल्याण पूर्व तिसगाव गांवदेवी मंदिर मैदानात हा महोत्सव सुरू असणार आहे. लकी ड्रॉ मार्फत दररोज महिला व युवतींसाठी साड्या तसेच ड्रेसपीस बक्षीस स्वरूपात देण्यात येत आहे. महोत्सवात भजन, कीर्तन, पोवाडे, मंगळागौरी, होम मिनिस्टर, ऑर्केस्ट्रा तसेच कुस्तीचे सामने असे विविध सांस्कृतिक उपक्रम पहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर खवय्यांसाठी खाणपानाचे स्टोल व इतर वस्तूंचे स्टोल देखील आहेत. लहान मुलांसाठी तसेच मोठ्यांसाठी एम्युजमेंट पार्क देखील बनवण्यात आला आहे. तसेच या महोत्सवात दररोज सेलिब्रिटिंच्या भेटी देखील होणार आहेत.

कल्याण महोत्सवाची प्रमुख कार्यकारिणी : दिलीप दाखिनकर (अध्यक्ष), महेश गायकवाड (आधारस्तंभ), संजय गुजर (कार्याध्यक्ष), प्रशांत बोटे (उपाध्यक्ष), प्रतीक महिले (सल्लागार), अस्मिता माने (सचिव), निलेश सावंत (सहसचिव), संदीप भालेकर (सहसचिव), अजित चौघुले (खजिनदार), वैशाली ठाकूर (सहखजिनदार), सुगंधा चव्हाण (सहखजिनदार), रवींद्र उतेकर (प्रसिद्धी प्रमुख).

-संतोष दिवाडकर

Web Title : Kalyan Mahotsav starts in Kalyan city

कल्याण पूर्वेत सहा हजार रोपांच्या माध्यमातून साकारणार शिवरायांची प्रतिमा

Kalyan Shiv Jayanti : कल्याण पूर्वेतील गेल्या ३६ वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक शिवजयंती महोत्सव मंडळ कल्याण पूर्व यांच्या विद्यमाने १९ फेब्रुवारी या शिवजयंती दिनी वृक्ष रोपांच्या माध्यमातून भव्य अशी शिवप्रतीमा निर्माण करण्यात येणार असून शिव जयंती नंतर हीच वृक्षांची रोपे विविध संस्था संघटनांना वृक्षारोपणासाठी देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव मंडळाच्या वतीने देण्यात आली.

गेल्या वर्षा प्रमाणे या वर्षीही भव्य स्वरूपात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंध कायम असल्याने कोरोना संदर्भातील सर्व अटी शर्तींना अधिन राहून १९ फेब्रुवारी रोजी शिव जयंती उत्सव तिसगांवातील तिसाई मंदीराच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या उत्सवा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  चेहर्‍याची विविध प्रकारच्या सहा हजार वृक्ष रोपांच्या माध्यमातून प्रतीकृती निर्माण करण्यात येणार असल्याची माहीती मंडळाचे अध्यक्ष रुपेश गायकवाड, सचिव राजु अंकूश तसेच विश्वस्त नरेंद्र सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुमारे पंधराशे चौरस फुटामध्ये साकारण्यात येणाऱ्या शिवप्रतीमेत वापरली जाणारी वृक्षांची रोपे सामाजिक, सांस्कृतीक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था संघटनांना देण्यात येणार असुन ज्या संस्था संघटना या रोपांचे पुढच्या वर्षा अखेर चांगल्या प्रकारे जतन आणि संवर्धन करतील अशा संस्था संघटनांचा पुढील वर्षीच्या जयंती उत्सवात विशेष असा सन्मान करण्यात येणार असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले असून मंडळाच्या या उपक्रमातील साकारण्यात येणाऱ्या शिव प्रतीमेचे दर्शन घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

Web Title : The image of Shivaji maharaj will be created through 6,000 saplings in Kalyan East