Dombivli Building Collapse : आयरे गावात कोसळली इमारत; मलब्यात अडकले दोन रहिवाशी

Dombivli Building Collapse : आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी ५:४० दरम्यान डोंबिवली पूर्वेतील आयरे गावातील आदिनाथ बिल्डिंगचा (G+3) काही भाग कोसळला असल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. घटनास्थळी क.डों.म.पा. अग्निशमन दलाचे जवान, फायर इंजिन, आपत्ती व्यवस्थापन टीम, TDRF दाखल असून सदर ठिकाणी मलबा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सदर इमारतीतील नागरिकांना या अगोदर इमारत खाली करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाली असल्याची माहिती नसून प्रशासन घटनास्थळी कामकाज करीत असून महापालिका आयुक्तांनी देखील प्रत्यक्ष भेट दिली होती. मात्र या इमारतीच्या मलब्यात दोन रहिवासी अडकले असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

इमारत खचत असताना रहिवासी आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाले. मात्र याच इमारतीत राहत असलेले ७० वर्षीय वृद्ध आणि एक ४५ वर्षीय महिला आजारी असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. आणि काही वेळातच पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारत कोसळली. या दोन्ही रहिवाशांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

संतोष दिवाडकर

Dombivli Building Collapse : Building collapsed in Ayre village

शिंदे गटा समोर भाजपचे काही चालत नाही; त्यांनी महापौर बसवण्याची स्वप्न पाहू नये; Raju Patil यांचा टोला आणि त्याला भाजप आमदारांचे समर्थन

Raju Patil : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप आपला महापौर बसवण्याची तयारी करीत आहे याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. कल्याण डोंबिवलीत शिंदे गटा समोर भाजपचे काही चालत नसून त्यांनी महापौर बनवायच्या वलग्ना करूच नये अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली आहे. तर यावर कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी ही बाब बरोबर असल्याचे मान्य केले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे राज्यातील राजकारण आणि सर्व राजकीय समीकरणे पूर्णपणे फिरली आहेत. आता नेमके मतदार कोणाच्या बाजूने आपला कौल देतात हे निवडणूकीच्या निकाला नंतरच स्पष्ट होणार आहे. राज्यात जरी शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती असली तरी कल्याण डोंबिवलीत मात्र या दोन्ही बाजूंमध्ये तू तू मे मे अशीच परिस्थिती पहायला मिळते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत जिंकून आपल्या पक्षाचा महापौर व्हावा अशी प्रत्येक पक्षाची इच्छा आहे. मात्र शहरात भाजपा, शिवसेना, उबाठा गट आणि मनसे या चार पक्षांमध्ये जबरदस्त चढाओढ पहायला मिळणार आहे. या महानगरपालिकेवर आतापर्यंत शिवसेनेशिवाय इतर कोणत्याही पक्षाचा महापौर बसला नसून आता भाजप देखील शिंदे गटा समोर चालत नसून त्यांनी महापौर पदाची वलग्ना करू नये असा सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजपला देत त्यांना डिवचले आहे.

राजू पाटील यांच्या या वक्तव्यावर कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून त्यांनी ही बाब खरी असल्याचे म्हटले आहे. राजू पाटील यांच्या मताशी मी सहमत असून शिंदे पिता पुत्रांकडून राज्यात भाजपचे खच्चीकरण करण्याचं काम सुरू असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.

संतोष दिवाडकर

Raju Patil & Ganpat Gaikwad criticized Shinde

Kalyan Ganeshotsav : कल्याण डोंबिवली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना KDMC कडून दिलासा

Kalyan Ganeshotsav : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत महापालिका प्रशासन आणि गणेश मंडळांच्या नियोजना संदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी अनेक विषयांवर चर्चा केली तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना त्यांनी यावेळी मोठा दिलासा दिला आहे.

क.डों.म.पा. आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी गणेश मंडळांना मंडप आणि त्याजवळील असलेल्या कमानीचे शुल्क माफ करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर अग्निशमन विभागाचे असणारे शुल्क हे हजार रुपयांवरून निम्मे करण्यात आले आहे. त्यामुळे गणेश मंडळांना महापालिकेच्या या शुल्कातून मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे सर्व परवानग्या मिळवण्यासाठी सोयीस्कर अशी एक खिडकी योजना प्रभाग क्षेत्र कार्यालयात राबविण्यात येणार आहे.

सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने खड्डे पडलेले रस्ते गणेशोत्सवापूर्वी दुरुस्त करून डांबरीकरण केले जाणार असल्याची माहिती देखील आयुक्तांनी माध्यमांना दिली आहे. त्याचबरोबर घरघुती गणपतींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाल्यानंतर मूर्तींची होणारी विटंबना थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही यावेळी आयुक्तांकडून माध्यमांना सांगण्यात आले.

संतोष दिवाडकर

Kalyan Ganeshotsav : Relief from KDMC to Kalyan Dombivli Public Ganeshotsav Mandals

Navbharat Saksharta Abhiyan : कल्याण डोंबिवलीत निरक्षरांचे झाले सर्वेक्षण; शिक्षकांची झाली पुरती दमछाक

Navbharat Saksharta Abhiyan : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण विभागाचे उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या अधिपत्याखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये “नवभारत साक्षरता अभियान उपक्रम २०२२ -२७ अंतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे काम दि. १७.०८.२०१३ ते ३१.०८.२०२३ या कालावधीत करण्यात आले. महापालिका क्षेत्रातील ४४६ शाळांतील २३०६ शिक्षकांमार्फत सर्व वार्डातील सर्व कुटूंबाचे सर्वेक्षण यातून करण्यात आले.

शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणाद्वारे निरक्षरांचे नाव, लिंग, संवर्गनिहाय माहिती संकलीत करण्यात आली. सर्व प्रभागातील लोकांचे सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करून त्यांना ऑनलाईन व ऑफलाईन पदधतीने साक्षर करणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण दि. १७.०८. २०२३ ते ३१.०८.२०२३ या कालावधीत शिक्षक सर्वेक्षक, म्हणून आपल्या कुटुबांचे सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करणार आहेत.

या कालावधित वय वर्ष १५ ते ३५ आणि ३५ वर्षाच्या पुढील सर्व स्त्री आणि पुरूष दिव्यांग आणि पारलिंगी यांचे सर्वेक्षण करून विगतवारी करून निरक्षर संख्या निश्चित करावयाची आहे. तसेच शाळाबाहय मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल केले जाणार आहे. या सर्वेक्षण उपक्रम अंतर्गत जिल्हास्तर, तालुकास्तर, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सिआरसी प्रमुख यांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र शाळाबाहय व निरक्षर मुक्त करण्यासाठी प्रशासन अधिकारी रंजना राव यांनी सहकार्य करणेकामी महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना आवाहन केले होते. मात्र हे सर्वेक्षण करण्याचे काम शाळेतील शिक्षकांना देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शिकवण्या बरोबरच घरोघरी फिरून शिक्षकांची चांगलीच दमछाक झाल्याचं दिसून आले. त्याचबरोबर सर्वेक्षणापूर्वी नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देतानाच शिक्षकांच्या नाकी नऊ आले होते.

संतोष दिवाडकर

Navbharat Saksharta Abhiyan : A survey of illiterates was conducted in Kalyan Dombivli

Kalyan Murder : कल्याण पूर्वेत आणखी एक हत्या; टोळक्याच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Kalyan Murder : कल्याण पूर्व भागातील वाढती गुन्हेगारी शहरवासीयांसाठी चिंतेची बाब बनली असताना आता आणखीन एका हत्येची बातमी समोर येत आहे. खडेगोळवली येथे वास्तव्यास असलेल्या एका मुलाची हत्या झाली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सदर मुलाला काही जणांच्या टोळक्याने अमानुष मारहाण केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

समीर लोखंडे असं मृत मुलाचे नाव असून तो काल सायंकाळी कैलाशनगर परिसरात गेला होता. तेथे जुन्या वादातून एका टोळक्याने त्याला घेराव घालून अमानुषपणे मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांना पाहताच टोळक्याने तेथून पोबारा केला. त्या टोळक्यातील एका आरोपीला पोलिसांनी पकडले तसेच जखमी समीरला उपचारार्थ रुग्णालयात हलवले. मात्र आज पहाटेच्या दरम्यान समीरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली. सध्या काही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मुकेश आणि नीरज दास अशी त्यापैकी दोघांची नावे आहेत.

कल्याण पूर्व भागात सध्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढत असून शहरवासीयांसाठी ही चिंतेची बाब बनली आहे. तिसगावातील अल्पवयीन मुलीचे हत्या प्रकरण ताजे असताना आणखी एका मुलाच्या हत्येने आता पूर्व भागात खळबळ माजली आहे. स्थानिक आमदार तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख यांनी नुकतेच आणखी एक पोलीस स्थानक तसेच पोलीस कुमक वाढवण्याची मागणी केली आहे. कल्याण पूर्वेतील लोकसंख्या, क्षेत्रफळ, फोफावलेली गुन्हेगारी आणि एकट्या कोळसेवाडी पोलीस स्थानकावरील ताण लक्षात घेता आता गृहखात्याने गांभीर्याने विचार करून आणखी एक पोलीस स्थानक निर्माण करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे.

शहरातील तरुणाईला गांचाचा नाद ?

अलिकडल्या काळातील तरुणाई ही गांजाच्या अधीन गेली असून शहरात ठिकठिकाणी गल्ली बोळात घोळका करून गांजा सेवन केले जाते. खडेगोळवली भागातील असंख्य अल्पवयीन मुलं या नशेच्या आहारी गेली असल्याचे स्थानिकांमार्फत सांगण्यात येत आहे. या अगोदर मानापाडा पोलिसांनी अनेकदा गांजा पकडला होता. मात्र तरी देखील शहरात तरुणांना गांजा कुठून मिळतो? गांजा विक्रेते कोण आहेत? हा गांजा कुठून सप्लाय होतो? याचा शोध घेऊन तरुणाईला वाचवणे ही देखील येणाऱ्या काळाची गरज बनली आहे.

संतोष दिवाडकर

Kalyan Murder : A minor boy died in a gang attack in Kalyan East

आयडीएट प्रोटो प्रकार श्रेणीतील सर्वोत्कृष्ट प्रदर्शन Arya Gurukul अंबरनाथने पटकावले

Arya Gurukul : अंबरनाथ Arya Gurukul स्कूल आयोजित मंथन फेस्टिवल सफल झाला. दोन दिवसीय लेख, क्राफ्ट आणि सायन्स प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक मॉडेल बनवून आपली प्रतिभा दाखवली. एग्जीबिशनमध्ये सर्वोत्तम प्रकल्प तयार करणारे विद्यार्थ्‍यांना स्‍कूल मॅनमेंट तर्फे बक्षीस देऊन सन्मानित केले गेले.

कार्यक्रमात कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, रेल्वे मंत्रालयाचे अधिकारी अजित दुबे, डॉ. सुजीत नायर, अजुकेशन टुडे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.नीलम मलिक आणि सचिव भरत मलिक यांनी विद्यार्थी ट्रॉफीकर उत्साही मनोबल वाढवला. एजुकेशन टुडे फाउंडेशन द्वारा संचालित अंबरनाथ आर्य गुरुकुल स्कूल मध्ये 12 आणि 13 ऑगस्ट ला मंथन फेस्टिवल संपन्न झाला. चार स्कूल्स ने यात भाग घेतला होता.

प्रदर्शन थीम या वर्षी होणारी जी-२० शिखर परिषदेवर आधारित होती. प्रदर्शनातील विद्यार्थ्यांनी मॉडेल च्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. यात रोलिंग ट्रॉफी कल्याण पूर्वच्या सेंट मेरिज हाई स्कूल आणि लिटल आर्यन्स ने जिंकली तर प्रोटो प्रकार श्रेणीमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन आर्य गुरुकुल स्कूल अंबरनाथ ने पटकावला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मंथन फेस्टिवल पाहिल्यानंतर भरत मलिक आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. पवार यांनी सांगितले की मी कार्यक्रमाचा पाहुणा नसून आर्य गुरुकुल परिवाराचा एक सदस्य म्हणून येथे आलो आहे . पवार यांनी पुढे बोलताना सांगितले की प्रत्येक पालकाला आपलं मुल यांनी आर्य गुरुकुल मध्ये शिक्षा घ्यावी असं वाटत आहे.

या मंथन फेस्टिवल कार्यक्रमात अमरनाथ आर्य गुरुकुल चे प्रिंसिपल नीलेश राठौड़, गीता नायर, आर्य गुरुकुल कल्याणच्या प्रिंसिपल राधामनी अय्यर, सेंट मेरिज स्कूल कल्याणच्या प्रिंसिपल दिव्या बोरसे सहित तमाम टीचर्सचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

संतोष दिवाडकर

Arya Gurukul Ambernath won the Best Exhibit in the IDET Prototype category

Watch Exhibition Video
क.डों.म.पा. क्षेत्रातील पदपथांवर सर्रास अतिक्रमणे; पत्रकार धमकी प्रकरणी तहसीलदारां मार्फत राष्ट्रपतींना निवेदन

कल्याण : शहराच्या पूर्व भागातील पूना लिंक रोडवर असलेल्या पदपथावर एका बांधकाम विकासकाने आपले काही सामान मांडून ठेवले होते. याबाबत पत्रकार आनंद गायकवाड यांनी वृत्त प्रकाशित केले होते. यामुळे सदर विकासकांनी त्यांना धमकी दिली असल्याची तक्रार आनंद गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात दिली. यानंतर पत्रकार सुरक्षा कायदा २०१९ अंतर्गत कोळसेवाडी पोलिसांनी संबंधित विकासकांवर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास थेट सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे हे स्वतः करीत आहेत.

विकासकाने फुटपाथवर बांधकामाचे सामान ठेवल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर महानगरपालिकेने विकासकाला दंड ठोठावला होता. मात्र दंडात्मक कारवाई नंतरही पदपथ मोकळा न झाल्याने पत्रकार आनंद गायकवाड यांनी पुन्हा चित्रीकरण केले. याचदरम्यान विकासकांकडून धमकी दिली गेली असल्याचे आनंद गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष दिल्या नंतर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

देशभरात पत्रकारांवर होणारे हल्ले पाहता या घटनांना आळा घालण्यासाठी पत्रकार संघटना पुढे येत असतात. आता या प्रकरणी देखील पत्रकार संघटनेने कल्याण तहसीलदार यांच्या मार्फत थेट राष्ट्रपती व राज्यपाल यांना निवेदन दिले आहे. महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष दिले असते तर हा गुन्हा दाखल झाला नसता अशा भावना पत्रकार आनंद गायकवाड यांनी व्यक्त केल्या.

शहरातील पदपथांवर व्यापाऱ्यांचा ताबा?

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पादचाऱ्यांना चालण्यासाठी असलेले पदपथ हे जवळपास गायब झाले असल्याचे चित्र आहे. पूना लिंक रोड सारख्या मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर असलेल्या पदपथावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्याचे चित्र संपूर्ण शहरभरात दिसत आहे. मग हे पदपथ नक्की नागरिकांना चालण्यासाठी आहेत? दिखाव्यासाठी आहेत? की व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी दिलेत? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

पदपथावर अतिक्रमण केल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावर उतरून चालावे लागते. यामुळे वाहतूक कोंडी तसेच अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या अगोदर असे अपघात झालेही आहेत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन पदपथावर होणारी अतिक्रमणे रोखणार का? की फक्त दंडात्मक कारवाई करून पुढे परिस्थिती जैसे थे असणार? असा केविलवाणा सवाल आता स्मार्ट सिटीतील नागरिकांना पडला आहे.

संतोष दिवाडकर

Statement to Kalyan Tehsildar of Journalist Association

तहसीलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतिक्रिया

Kalyan Crime News : संतापजनक ! अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाने पोलिसांसमोरच दाखवला माध्यमांना माज

Kalyan Crime News : कल्याण पूर्वेत बुधवारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्नात कोळसेवाडी पोलिसांनी एका नराधमाला अटक करून पोलीस ठाण्यात आणले होते. याचवेळी उपस्थित माध्यम प्रतिनिधींनी या प्रसंगाचे चित्रीकरण सुरू केले. मात्र संतापजनक बाब म्हणजे अटक केलेल्या आरोपीने चक्क पोलीसांच्या समोरच माध्यमांच्या केमेऱ्याकडे दोन बोटे दाखवून विक्टरी म्हणजेच विजयाची खून केली. हा प्रकार अतिशय धक्कादायक असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शिकवणी वरून आपल्या घरी जात असताना विशाल गवळी नामक इसमाने तिचा पाठलाग करून तिला भर रस्त्यात अडवले. यानंतर तिला रस्त्याकडेला नेले व तिचे तोंड दाबून तिला खाली पाडले. भयभीत झालेल्या मुलीने त्याचा प्रतिकार केला आणि ती निसटून घरी आली. यानंतर तिच्या घरच्यांनी थेट कोळसेवाडी पोलीस स्थानकात धाव घेतली. पोलिसांनी तासाभरातच नराधम आरोपी विशाल गवळी याच्या मुसक्या आवळून त्याला पोलीस स्थानकात हजर केले.

अटकेत असलेल्या आरोपीचे चित्रीकरण करणाऱ्या प्रतिनिधींना या नराधमाने चक्क पोलिसांच्या समोरच दोन बोट दाखवून संतापजनक कृत्य केले. त्याने असे कृत्य करताच पोलिसांनी त्याचा हात झटकरला. यामुळे याला कायद्याचा धाक आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला. केलेल्या दुष्कृत्याचा जराही पश्चाताप या नराधमाला झाला नसून आता तो पोलिसांच्या तावडीत आहे.

आरोपी विशाल गवळीवर या अगोदरही बलात्कार तसेच इतर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती असून त्याच्यावर तडीपारची कारवाई देखील करण्यात आली होती. आता त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती असून त्याला पोलीसी खाक्या दाखवावा असे लोकांमार्फत बोलले जात आहे.

संतोष दिवाडकर

Kalyan Crime News : Attempt to rape a minor girl in Kalyan East

ज्येष्ठ नागरिक कट्टा भागात शेड उभारण्यासाठी मनसेचं क.डों.म.पा. ला निवेदन

कल्याण : कल्याण पूर्व ‘ड’ प्रभाग क्षेत्र येथे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्यात आलेला आहे. मात्र सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून ज्येष्ठांना येथे बसण्यासाठी प्रचंड गैरसोय होताना दिसत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर या भागात त्यांच्या बसण्याच्या जागेवर शेड उभरावेत या मागणीसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने नुकतेच मनपा प्रशासनाला निवेदन दिले आहे.

शेड बांधल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची ऊन आणि पाऊस या दोन्ही काळात होणाऱ्या गैरसोयीपासून सुटका होणार आहे. महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे मनसेचे कल्याण लोकसभा क्षेत्राचे जिल्हा सचिव संदीप नावगे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली व त्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. यावर कार्यवाही करून लवकरच शेड उभारणी करून देऊ असे यावेळी उपस्थित शिष्टमंडळाला आश्वासित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

संतोष दिवाडकर

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक ‘या’ महिन्यांत होण्याची शक्यता

महानगरपालिका निवडणूक : महाराष्ट्रातील लांबणीवर पडलेल्या महानगरपालिका निवडणुक केव्हा होणार असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. राज्यातील चार महानगरपालिका वगळता सर्व महानगरपालिकांचा कार्यकाळ संपून त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र आता राज्यातील सत्ता संघर्षानंतर हालचालींना वेग आला असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून असे संकेत देण्यात आले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आल्याने सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूकांचा धुरळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित काढण्यात येत असल्याचा देखील उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे अडीच वर्षे लांबलेल्या निवडणुका आता लवकरच पार पडण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे संकेत दिले होते.

मागील वर्षी २०२२ पर्यंत २७ पैकी २३ महानगरपालिकांचा कार्यकाळ पूर्ण झाला. तर त्याअगोदरच २०२० साली कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि आणखीन तीन मनपाचा कार्यकाळ संपला होता. राज्यातील राजकारणात मागील पाच वर्षांत प्रचंड उलथापालथ झाल्याने आता महानगरपालिका निवडणूकीत कोणता पक्ष याचा फायदा घेईल हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेना भाजपाची युती तुटणे, पुढे महाविकास आघाडी तयार होणे, पुन्हा शिवसेना व राष्ट्रवादीचे विभाजन होऊन भाजप सोबत सत्तेत जाणे या सर्व गोष्टींचे पडसाद महापालिका निवडणुकीत उमटणार आहेत.

संतोष दिवाडकर

Municipal elections in Maharashtra are likely to be held in these months