Eknath Shinde : नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी वालधुनी नदी विकासाच्या खेळखंडोब्यास न्याय देण्याची मागणी  

कल्याण : वालधुनी नदी विकासाचा प्रस्ताव हा गेली कित्तेक वर्षे शासन दरबारी अक्षरशः धूळ खात पडलेला आहे. जागृत नागरिकांनी हा मुद्दा मंत्रालय, जिल्हाधिकारी आणि खालील नगरपालिका आणि महानगरपालिकांमधे गेली अनेक वर्षे लावून धरला आहे. तरी वालधुनी नदीच्या ताकास अद्यापि तूर लागलेला नाही. त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी ( Eknath Shinde ) वालधुनी नदी विकासाच्या खेळखंडोब्यास न्याय देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.  

२००५ च्या प्रलयंकारी महापुरा नंतर मुंबईतील मिठी आणि ठाणे जिल्ह्यातील मलंग गडाच्या पायथ्याशी उगम पाऊन, पुढे अंबरनाथ नगरपालिका, उल्हासनगर आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातून वाहणारी वालधुनी नदी चर्चेत आली. कारण या नद्यांमुळे या शहरांत महापुरात मोठी जिवित आणि वित्तहानी झाली होती. तत्कालिन सरकारने त्या नंतर लगेच, दोन्ही नद्यांचा विकास करण्याचा प्रस्ताव पारित केला होता. 

यातील मिठी नदी विकासाचे काम एमएमआरडीएकडे सोपवून काही वर्षात पूर्ण करण्यात आले. त्या नंतरच्या काळात मिठी नदीच्या पुरामुळे उद्भवणारी मुंबईतील समस्या सुटली. मात्रं वालधुनी नदी विकासाचे काम जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत स्थानिक प्रशासनाच्या माथी मारण्यात आले. वेग वेगळ्या शहरातील स्थानिक प्रशासनातील समन्वयाच्या व निधीच्या अभावामुळे वालधुनी नदी विकासाचा मुद्दा कळीचा झाला आहे.

येथिल नागरिक मात्रं, पूर आणि प्रदूषणाच्या जीवघेण्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कर्मभूमी मधिल जटिल समस्यांचे मार्ग सुकर करावेत अशी मागणी विनोद शिरवाडकर यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

Newly elected Chief Minister Eknath shinde demands justice for Valdhuni river development

Farmer Day व Doctors Day चे औचित्य साधत आंबिवली जैवविविधता उदयान येथे वृक्षारोपण

Farmer Day : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत आंबिवली येथील वन जमिनीवर सुमारे ४० एकर जागेवर वनराई साकारली असून जैवविविधता उदयान उभारले आहे. या उदयानात एकाच ठिकाणी फुलपाखरु उदयान, बॅट पार्क, बी पार्क, नक्षत्र उदयान, मेडीसिनल प्लांट पार्क अनोखे आहेत.

आज कृषी दिन व डॉक्टर्स डे औचित्य साधून या ठिकाणी महानगरपालिकेने महापालिका क्षेत्रातील डॉक्टरांच्या विविध संघटना तसेच क्रेडाई-एमसीएचआय आणि कल्याण डोंबिवली युनिट यांचा दौरा व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

जैवविविधता पार्कमध्ये आज महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन कार्यक्रम साजरा केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, आयएमए चे डॉ. प्रशांत पाटील, विविध संघटनांचे प्रतिनिधी, एमसीएचआयचे प्रतिनिधी, वृक्ष अधिकारी तथा महापालिका सचिव संजय जाधव, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील व महापालिका शाळांचे विदयार्थी, आय नेचर फाऊंडेशनचे प्रतिनिधी तसेच अनेक वृक्ष प्रेमी उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

Plantation at Ambivali Biodiversity Park on the occasion of Farmer Day and Doctors Day

Shivsena : खासदार श्रीकांत शिंदेच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड

Shivsena : कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेत बंड पुकारलेल्या आमदारांच्या विरोधात महाराष्ट्रभरातून शिवसैनिक आता आक्रमक होताना दिसत आहे. याबाबत आता राज्यभरातून निदर्शने होताना दिसत आहेत.

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २१ जून पासून एकनाथ शिंदे यांनी ३५ हुन अधिक आमदारांसह शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारला आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले असून बंड पुकारणारे सर्व आमदार राज्याबाहेर गुवाहाटी येथे थांबले आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला सारून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असलेली युती मान्य नसल्याचे या बंडातून सांगितले जात आहे. मात्र यावरून शिवसैनिक आता महाराष्ट्र भरात आक्रमक होताना दिसत आहेत.

ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याचा एक समज आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचे उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालय शनिवारी फोडण्यात आल्या नंतर पोलिसांनी आता अधिक गंभीर भूमिका घेतली असून राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये म्हणून ठाणे ग्रामीण भागात ३० जून पर्यंत तर मुंबईत १० जुलै पर्यंत जमावबंदी देखील लागू करण्यात आली आहे.

-संतोष दिवाडकर

Shivsena: MP Shrikant Shinde’s office vandalized by shivsainik

अनधिकृत फलक लावणाऱ्यांना KDMC चं अभय? RTI मधून आली ‘ही’ माहिती समोर

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या KDMC हद्दीत अनधिकृत फलक लागलेले नेहमीच दिसत असतात. प्रामुख्याने त्यात राजकीय नेत्यांच्या शुभेच्छांचे तर जाहिराती म्हणून लावलेले फलक असतात. अश्या लावलेल्या फलकांची कोणतीही परवानगी ही महानगरपालिकेकडून घेतली जात नाही. त्यामुळे अश्या अनधिकृत फलकांमुळे शहराचे सौंदर्य धोक्यात येतं आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने मागील वर्षी शहरात लागणाऱ्या अनधिकृत फलकांवर थेट गुन्हे नोंद करून फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश काढलेले असतांनाही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आजवर एकही अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर गुन्हा नोंद करून फौजदारी कार्यवाही केली नाही अशी धक्कादायक बाब माहिती अधिकार कार्यकर्ता भूषण पवार यांनी केलेल्या अर्जातून उघड झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत फलकांवर गुन्हे नोंद करावे असे आदेश दिले होते. तरीही शहराच्या हद्दीत अनधिकृत फलकांचा सुळसुळाट असतांना देखील आजवर महानगरपालिकेने एक ही गुन्हा नोंद न करून अनधिकृत फलकांना महानगरपालिकेचे अभय आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते भूषण पवार यांनी महानगरपालिकेकडे ११ एप्रिल रोजी महानगरपालिका हद्दीत आजवर अनधिकृत फलकांवर किती गुन्हे नोंद केले म्हणून माहिती मागविली होती. ३० दिवसांत संबंधित अर्जाचे उत्तर अपेक्षित असतांना देखील महानगरपालिकेने १० प्रभागा ऐवजी ५ प्रभागांची माहिती उपलब्ध करून इतर ५ प्रभागांची माहिती दिली नाही. याउलट महानगरपालिकेने अर्जदार भूषण पवार यांनाच महानगरपालिकेच्या दहा प्रभागात चौकशी करावी आणि माहिती घ्यावी अशी अजब उत्तरं देऊन स्वजबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.

संबंधित अर्जा बद्दल माहिती अर्धवट दिली असल्याने महानगरपालिकेकडे प्रथम अपील करून उर्वरित माहिती घेणार आहोत. त्याच सोबत गरज पडल्यास संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार ही राज्य माहिती अधिकार आयुक्त यांच्याकडे करणार असल्याचे भूषण पवार यांनी सांगितले आहे.

-कुणाल म्हात्रे

KDMC ‘s protection against unauthorized billboards? information came from RTI

Titwala येथील शाळेचा RTE विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यास नकार? पालकांचा शिक्षण मंडळ कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा

Titwala : शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. सरकारने राबवलेल्या आरटीई शिक्षण योजने अंतर्गत मुलांना शिक्षण आणि शैक्षणिक साहित्य शाळेने देणे बंधनकारक असतांना टिटवाळ्यातील रवींद्र विद्यालयाने मात्र आरटीई विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यास नकार दिला असून शाळेकडून पालकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे बुधवार पर्यंत शाळेने मुलांना शालेय साहित्य न दिल्यास शिक्षण मंडळ कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आता पालकांनी दिला आहे.

सरकारने राबवलेल्या आरटीई शिक्षण योजने अंतर्गत टिटवाळा येथील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी रवींद्र विद्यालय या शाळेत प्रवेश मिळवला आहे. तेव्हा पासून शाळेने कधीही शैक्षणिक साहित्य वाटप केलेले नाही. मात्र हया वर्षी सर्व पालक शाळेच्या मुख्याध्यापकांना शैक्षणिक साहित्य वाटप कधी करणार हे विचारायला २८ एप्रिल रोजी गेले असता मुख्याध्यापकांनी असभ्यतेची भाषा वापरून पालकांवर दबाव टाकला. तसेच तुमची ऐपत नव्हती आपल्या मुलांना शिकवण्याची तर या शाळेत मुलांना का टाकले? तसेच तुमच्या मुलांना शिकवायचे आहे की नाही हे आमच्या हातात आहे. म्हणून यापुढे तुम्ही पालकांनी एकत्र एऊन अशी तक्रार करायची नाही. तुम्हाला शैक्षणिक साहित्य शाळेतूनच विकत घ्यावे लागेल. असे म्हणून आम्हाला शाळे बाहेर काढून दिले असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

याबाबत सर्व पालकांनी टिटवाळा पोलिस स्टेशन येथे शाळेविरोधात तक्रार केली. त्या नंतर २ मे रोजी सर्व पालकांनी केडीएमसीच्या शिक्षण विभाग कार्यालयात शाळेची लेखी तक्रार केली. यानंतर शाळेला १४ मे रोजी आरटीईचे एक लेखी पत्रक दिले गेले. आरटीईच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य व गणवेश ४८ तासांच्या आत मोफत पुरविण्यात यावे असा उल्लेख त्यात करण्यात आलेला आहे. परंतु शाळेने शिक्षण विभागाचा आदेश न मानता शाळा आपल्या मनमर्जि प्रमाणे वागत असल्याचा आविर्भाव पालक व्यक्त करीत आहेत.

त्यामुळे बुधवारपर्यंत आरटीई अंतर्गत पालकांना पाल्यासाठीचे मूलभूत अधिकार अंतर्गत येणारे शैक्षणिक साहित्य मिळाले नाही तर गुरुवारी शिक्षण विभाग कार्यालयात सर्व पालकांसोबत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा या पालकांनी दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

RTE of Titwala school refuses to provide educational materials to students? A warning of sit-in agitation at the parents’ education board office

Shahad News : ‘आधी प्रश्न सोडवा मग मते मागायला या’ – स्थानिक नगरसेवकाला मनसेची बॅनर लावून कानपिचकी

Shahad News : कल्याण पश्चिमेतील  शहाड परिसरातील आंबिका नाला हा अरुंद आहे. तसेच या भागात नाल्यावर बेकायदा बांधकामे झाली असल्याची ओरड आहे. ९ जून रोजी पहिल्या पावसाचा फटका शहाड परिसराला बसला. या प्रश्नावर मनसेच्या पदाधिकार्याने एक बॅनर आंबिकानगर येथे लावला आहे. त्यावर आधी प्रश्न सोडवा. मग मते मागायला या असे लिहिले आहे. स्थानिक नगरसेवकाला कानपिचक्या देत  हा बॅनर लक्षवेधी ठरत आहे.

मनसेचे पदाधिकारी पंकजराजे पाचपिंडे यांनी हा बॅनर लावला आहे.९ जून रोजी नाल्याचे पाणी तुंबले व ते रस्त्यावर कसे साचले? त्यात वाहने कशा प्रकारे अडकली? याचे फोटोही बॅनरवर लावले आहेत. तासाभराच्या पावसाने ही  अशी स्थिती उद्धवते. आधी प्रश्न सोडवा। मगच मते मागायला या. प्रश्न सोडविला नाही तर मते मिळणार नाहीत असा इशारा राजकीय पक्षांसह लोकप्रतिनिधींना दिला आहे. त्यामुळे या फलका मुळे  परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

-रोशन उबाळे

Shahad News: ‘First solve the problem, then come to ask for votes’ – MNS banner to local corporator

कल्याणमधील आनंदवाडी पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यासाठी होतेय मागणी

कल्याण : कल्याण पूर्व कोळसेवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत, Kalyan police आनंदवाडी डबल टॉवर जवळ असलेली पोलीस चौकी अनेक दिवसांपासून बंद आहे. या बंद पोलीस चौकीमुळे परिसरातील लोकांमधे असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. येथून ये जा करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी विशेषतः महिला वर्ग ज्यांना याच परिसरातून रात्री ये जा करावी लागते त्यांना या बंद पोलीस चौकीमुळे असुरक्षितता वाटत असून ही बंद असलेली पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

कल्याण विकासिनी संस्थेचे अध्यक्ष ऍड. उदय रसाळ यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना पत्र लिहित या विषयाकडे लक्ष वेधले आहे. बंद असलेली पोलीस चौकी पुन्हा नव्याने सुरू करून नागरिकांना सुरक्षिततेचा आधार द्यावा अशी मागणी आता केली जात आहे.

कल्याण शहरातील अनेक भागात पोलीस चौक्या उभारण्यात आलेल्या आहेत. यातील काही चौक्या या आजतागायत सुरू आहेत तर काही चौक्या या बंद अवस्थेत उभ्या आहेत. यातीलच आनंदवाडी या भागातील चौकी देखील बंद असून ती पुन्हा सुरू होण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

-कुणाल म्हात्रे

Demand for reopening of Anandwadi police station in Kalyan

KDMC Election : स्वबळावर लढण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मानस; – जगन्नाथ शिंदे

कल्याण :- राष्ट्रवादी कॉंगेसच्या वर्धापन दिनानिमित्त ८ ते १६ जून दरम्यान वर्धापन दिन सप्ताह विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जात असून या दरम्यान विरोधी पक्षाकडून ओबीसी आरक्षणाबाबत पसरवल्या जाणार्या चुकीच्या माहितीचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत बोलताना आप्पा शिंदे यांनी अप्रत्यक्ष स्वबळाचा नारा दिला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्राचे ओबीसी आरक्षण नाकारले गेले असून मध्यप्रदेशला मात्र ओबीसी आरक्षण मंजूर करण्यात आले आहे. महाराष्ट्रला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. पुढे याबाबत बोलताना शिंदे यांनी पक्षपातळीवर महाविकास आघाडी होईल असे संकेत आहेत. मात्र स्थानिक  महानगर पातळीवर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते इच्छुक असतात अशावेळी आघाडी झाल्यास कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता असल्यानेच पालिका निवडणुका KDMC Election स्वबळावर लढण्याची तयारी करण्यात आली आहे. निवडणुका जवळ आल्यानंतरच आघाडीबाबत योग्य तो  निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटलेला नसताना महापालिका निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षण वगळून होत असल्या तरी येत्या केडीएमसी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तिकीट वाटप २७ टक्के ओबीसी आरक्षण गृहीत धरूनच केले जाणार असल्याचे माजी आमदार व कल्याण डोंबवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.

-रोशन उबाळे

कल्याण पूर्व ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या आवारात साकारणार बाबासाहेबांचे स्मारक; स्मारक समितीने पेढे वाटून मानले खासदारांचे आभार

कल्याण : अनेक वर्षांपासून काही कारणास्तव प्रलंबित असलेल्या कल्याण पूर्व ‘ड’ प्रभाग क्षेत्र आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग आता मोकळा होऊ लागला आहे. क.डों.म.पा.ने या स्मारकासाठी ८ कोटी ७४ लाखांची निविदा मंजूर केली आहे. यामुळे स्मारक समितीने आज खासदार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांना पेढे देऊन त्यांचे आभार मानले आहेत.

कल्याण पूर्वेतील ‘ड’ प्रभाग क्षेत्र आवारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच पुण्यतिथी साजरी केली जाते. मात्र या ठिकाणी पुतळा नसल्याने बाहेरून पुतळा आणताना विशेष कसरत करावी लागते. या भागात बाबासाहेबांचे स्मारक व्हावे याकरिता अनेक प्रयत्न सुरू होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे स्मरकास विलंब होत होता. मात्र आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने याकरिता ८ कोटी ७४ लाखांची निविदा मंजूर केली आहे. यानुसार १० महिन्यांत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तसेच ज्ञानकेंद्र उभे राहणार आहे.

आज विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती कल्याण पूर्वने मा.नगरसेवक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या वतीने त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना पेढे देऊन आनंद साजरा करीत आभार मानले. यावेळी संस्थापक अण्णासाहेब रोकडे, अध्यक्ष देवचंद अंबादे, कार्याध्यक्ष महेश गायकवाड, सचिव सुमेध हुमणे, कोषाध्यक्ष भारत सोनवणे, सह कोषाध्यक्ष शेखर केदारे, समाजसेवक सुभोध भारत, समता फेरी अध्यक्ष केतन रोकडे, मा.अध्यक्ष विवेक जगताप, मा.अध्यक्ष भारती जाधव, मा. सचिव पराग मेंढे, मनीष बनकर, तुषार जाधव, विलास गायकवाड, दादासाहेब महाले, शिल्पा अंबादे, पल्लवी जाधव आणि इतर पदाधिकारी व आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.

-संतोष दिवाडकर

Web Title : The Ambedkar Memorial Committee distributed sweets and thanked MP Shrikant Shinde

Raju Patil : शिवसेनेने स्वतःच्या सोईनुसार प्रभाग रचना करून घेतल्याचा मनसे आमदाराचा आरोप

कल्याण :- मागील काही महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना आणि नकाशे मनपाने आज जाहीर केले आहेत. मात्र या प्रभाग रचनेवर राजकीय नेत्यांसह काही सर्वसामान्य नागरिकांनी आपला आक्षेप नोंदवला आहे.

कल्याण डोंबिवली मनपा प्रारूप प्रभाग रचनेवर कल्याण डोंबिवली मधील काही नागरिकांनी नकाशे प्रभाग रचना पाहून सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी प्रभाग रचना केल्या असल्याचा आरोप केला आहे. मनसे आमदार राजू पाटील ( Raju Patil ) यांनी या प्रभाग रचनेवर जोरदार आक्षेप घेतला असून शिवसेनेने फायदा होईल अशीच रचना करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. “जिसकी लाठी उसकी भैस” या पंक्ती प्रमाणे शिवसेना सत्तेचा फायदा घेत आहे आणि आपल्या सोइ नुसार प्रभाग पाडले जात असल्याचा घणाघाती आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

कोरोनामुळे KDMC निवडणूक बरीच लांबणीवर पडल्याने महानगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे. मात्र महानगरपालिकेने प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर निवडणुकेचा बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेने आरोप केल्यानंतर आता नव्या प्रभाग रचनेवर हरकती नोंदवल्या जातात की नाही हे देखील पहावे लागणार आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणूकीत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. मात्र आता युतीतून वेगळे झाल्यानंतर भाजपची काय भूमिका असेल हे देखील पहावे लागणार आहे.

-रोशन उबाळे

Raju Patil: MNS MLA alleges that Shiv Sena has formed wards according to its own convenience