कल्याण पूर्वेच्या गणेश टेकडीचा होणार कायापालट

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग ५ ड कार्यालयाच्या मागे असलेल्या टेकडी वरील गणेश मंदिर तसेच टेकडीच्या सुशोभिकरणाच्या कामाला नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे. नुकतेच या कामाचे भूमिपूजन पूजा पाठ करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले.

गणेश टेकडी कल्याण पूर्व महानगरपालिका ड प्रभागाला लागून आहे. याच टेकडीवर सुमारे दीडशे वर्षांपासून गणपती विराजमान असल्याचे सांगितले जाते. शहरीकरण होण्यापूर्वीच्या कल्याणची साक्ष देणारी नेतीवली प्रमाणेच ही देखील एक टेकडी असल्याचे मानले जाते. मात्र मागील काळात या टेकडीवर अपप्रवृत्तीचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने आजूबाजूचे रहिवासी त्रस्त झाले होते. या टेकडीवर अश्लील चाळे, गर्दुल्ल्यांचे अमली पदार्थांचे सेवन, मद्यसेवन, चोरी, लूटमार, परिसरातील लोकांच्या घरावर दगडी मारणे अशा घटना घडत होत्या.

अलिकडल्या काळात गणेश टेकडी आपले रूप पालटत असून मंदिर परिसराचे देखील सुशोभीकरण होणार आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेकरांसाठी हा परिसर धार्मिक तसेच ज्येष्ठ नागरिक व शहरवासीयांना या उंच ठिकाणी विरंगुळा मिळणार आहे. कधी नव्हे ते टेकडी परिसर सर्वांसाठी सुरक्षित प्रेक्षणीय स्थळ होत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनाही आता मोकळा श्वास घेता येणार आहे.

संतोष दिवाडकर

Ganesh hill of Kalyan East will be transformed

पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने कोसळली सुरक्षा भिंत; लोकांच्या घरात चिखलाचे साम्राज्य

कल्याण : बुधवारी दुपारच्या दरम्यान कल्याणमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी साठण्याच्या तसेच पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत. कल्याण पूर्वेतील हनुमान नगर परिसरात गॅस कंपनीच्या गोडाऊनची सुरक्षा भिंत पावसाच्या प्रचंड प्रवाहाने कोसळून बाजुला असलेल्या रहिवाश्यांच्या घरात पाणी घुसून काही प्रमाणावर वित्त हानी झाली आहे.

सुमारे ३० वर्ष जुनी असलेल्या मनिष गॅस कंपनीच्या गोडाउनच्या सुरक्षा भिंतीला अचानक पणे पडलेल्या प्रचंड अशा पावसाच्या पाण्याचा प्रवाह असह्य झाल्याने हि भिंत कोसळल्याचे सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांच्या घरात पाणी आणि चिखल घुसल्याने घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. अगदी कमी वेळात हा हाहाकार माजल्याने नागरिक देखील गोंधळून गेले होते.

आज सकाळपासून तहसीलदार व तलाठी कार्यलयामार्फत याठिकाणी पंचनामे करण्यात आले असून त्यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार लवकरात लवकर नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्तां कडून केली जात आहे.

संतोष दिवाडकर

The security wall collapsed due to the flow of rain water

कोकणात हजारो एसटी बसेस तर इतर महाराष्ट्राकडे महामंडळाचे दुर्लक्ष? आरक्षित असलेली एसटी बस केली रद्द

विठ्ठलवाडी : गणेशोत्सवा निमित्ताने कोकणात जाण्यासाठी हजारो एसटी बसेस मुंबई तसेच राज्यभरातून मार्गस्थ करण्यात येत आहेत. मात्र त्याचबरोबर राज्यातील इतर ठिकाणी जाणाऱ्या काही एसटी बसेस रुद्ध होत असल्याने त्या भागातील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून एसटी महामंडळावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

विठ्ठलवाडी एसटी आगारातून शेकडो एसटी बसेस कोकणात रवाना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विविध राजकीय पक्षांमार्फत देखील शेकडो एसटी गाड्या मार्गस्थ केल्या गेल्या. मात्र सोमवार दि.१८ सप्टेंबर रोजी सुटणारी विठ्ठलवाडी गोंदवले ही एसटी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर रुद्ध झाल्याची माहिती विठ्ठलवाडी एसटी आगाराकडून प्रवाशांना देण्यात आली. तिकिटासाठी भरलेले पैसे परत मिळतील असे सांगण्यात आले असले तरी फक्त पैसे महत्त्वाचे नसून आमची मोठी गैरसोय झाली असल्याचा संताप प्रवासी व्यक्त करीत आहेत.

गणेशोत्सवा निमित्ताने कोकणात जाण्यासाठी जादा एसटी गाड्या सोडण्यासाठी नियमीत सुटणाऱ्या व रिजर्वेशन असलेल्या बसेस रुद्ध करणे किती योग्य आहे ? असा सवाल प्रवाशांमार्फत विचारला जात आहे. विठ्ठलवाडी एसटी आगारातून अगदी जेमतेमच गाड्या पुणे सातारा मार्गावर धावतात. त्यातच गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी रुद्ध झाल्याने गणेशोत्सव महाराष्ट्राच्या इतर भागात नसतो का ? असा सवाल एसटी महामंडळाकडे उपस्थित केला जात आहे.

विठ्ठलवाडी एसटी आगार व्यवस्थापक यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर एसटी ही सातारा विभागाच्या दहीवडी आगाराची असून त्यांनी ही एसटी रुद्ध केली असल्याचे स्पष्ट केले आहे. तर दहीवडी आगाराशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. रिजर्वेशन असलेली एसटी बस रुद्ध झाल्यानंतर प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करणे ही जबाबदारी एसटी महामंडळाची नाही का? की सर्व सामान्य माणसाला गृहीत धरून मनमौजी कारभार सुरू आहे असा प्रश्न आता प्रवाशी विचारत आहेत.

संतोष दिवाडकर

ST Corporation’s neglect of other Maharashtra?

Dombivli Building Collapse : आयरे गावात कोसळली इमारत; मलब्यात अडकले दोन रहिवाशी

Dombivli Building Collapse : आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी ५:४० दरम्यान डोंबिवली पूर्वेतील आयरे गावातील आदिनाथ बिल्डिंगचा (G+3) काही भाग कोसळला असल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. घटनास्थळी क.डों.म.पा. अग्निशमन दलाचे जवान, फायर इंजिन, आपत्ती व्यवस्थापन टीम, TDRF दाखल असून सदर ठिकाणी मलबा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सदर इमारतीतील नागरिकांना या अगोदर इमारत खाली करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाली असल्याची माहिती नसून प्रशासन घटनास्थळी कामकाज करीत असून महापालिका आयुक्तांनी देखील प्रत्यक्ष भेट दिली होती. मात्र या इमारतीच्या मलब्यात दोन रहिवासी अडकले असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

इमारत खचत असताना रहिवासी आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाले. मात्र याच इमारतीत राहत असलेले ७० वर्षीय वृद्ध आणि एक ४५ वर्षीय महिला आजारी असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. आणि काही वेळातच पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारत कोसळली. या दोन्ही रहिवाशांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

संतोष दिवाडकर

Dombivli Building Collapse : Building collapsed in Ayre village

शिंदे गटा समोर भाजपचे काही चालत नाही; त्यांनी महापौर बसवण्याची स्वप्न पाहू नये; Raju Patil यांचा टोला आणि त्याला भाजप आमदारांचे समर्थन

Raju Patil : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप आपला महापौर बसवण्याची तयारी करीत आहे याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. कल्याण डोंबिवलीत शिंदे गटा समोर भाजपचे काही चालत नसून त्यांनी महापौर बनवायच्या वलग्ना करूच नये अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली आहे. तर यावर कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी ही बाब बरोबर असल्याचे मान्य केले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे राज्यातील राजकारण आणि सर्व राजकीय समीकरणे पूर्णपणे फिरली आहेत. आता नेमके मतदार कोणाच्या बाजूने आपला कौल देतात हे निवडणूकीच्या निकाला नंतरच स्पष्ट होणार आहे. राज्यात जरी शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती असली तरी कल्याण डोंबिवलीत मात्र या दोन्ही बाजूंमध्ये तू तू मे मे अशीच परिस्थिती पहायला मिळते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत जिंकून आपल्या पक्षाचा महापौर व्हावा अशी प्रत्येक पक्षाची इच्छा आहे. मात्र शहरात भाजपा, शिवसेना, उबाठा गट आणि मनसे या चार पक्षांमध्ये जबरदस्त चढाओढ पहायला मिळणार आहे. या महानगरपालिकेवर आतापर्यंत शिवसेनेशिवाय इतर कोणत्याही पक्षाचा महापौर बसला नसून आता भाजप देखील शिंदे गटा समोर चालत नसून त्यांनी महापौर पदाची वलग्ना करू नये असा सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजपला देत त्यांना डिवचले आहे.

राजू पाटील यांच्या या वक्तव्यावर कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून त्यांनी ही बाब खरी असल्याचे म्हटले आहे. राजू पाटील यांच्या मताशी मी सहमत असून शिंदे पिता पुत्रांकडून राज्यात भाजपचे खच्चीकरण करण्याचं काम सुरू असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.

संतोष दिवाडकर

Raju Patil & Ganpat Gaikwad criticized Shinde

बांधकामाला वापरलेले सामान न काढताच गटार केले बंधीस्थ; परिसरात पाणी साचल्याने घाई गडबड बांधकामाचा प्रकार निदर्शनास

विठ्ठलवाडी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्र.क्र. ९६ मध्ये काही दिवसांपूर्वी काॅंक्रीट रस्ता व गटाराचे काम करण्यात आले होते. परंतु गटार बंधिस्त करण्यापूर्वी गटार व्यवस्थित साफ न करता, तसेच खाली लावलेले प्लायवुड सुद्धा काढले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

विठ्ठलवाडी येथील सह्याद्री पार्क ते महालक्ष्मी शाॅपिंग सेंटर येथील नवीन काॅंक्रीट रस्त्यावर अर्धा एक तास मुसळधार पाऊस पडल्यास गुडघ्या पेक्षा अधिक गटाराचे पाणी साचते. यामागे काही तांत्रिक बाबी असून महापालिका व MMRDA ठेकेदार कंपनी कडुन गटारांची साफसफाई आज करण्यात आली होती. याचदरम्यान या परिसरातील रहिवासी तसेच भाजप शहर उपाध्यक्ष संदिप राजाराम जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसह त्याठिकाणी उपस्थित असता ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली. याबाबत समाजसेवक विशाल जाधव यांनी हा प्रकार श्रेयवादाच्या घाईत झाला असल्याची उपरोधक टीका समाज माध्यमांवर केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात विविध प्रभागांत रस्ते काँक्रीटीकरण तसेच बंधीस्थ गटारांची कामे करण्यात आली आहेत. याच कामांचे श्रेय मिळवण्यासाठी राजकीय मंडळींमध्ये चढाओढ लागलेली असते. तर दुसरीकडे मात्र कामात हलगर्जीपणा, निकृष्ठता तसेच दिरंगाई होता सल्याचे प्रकार देखील समोर येत असतात. करदात्या नागरिकांना गृहीत धरून केलेल्या कामाचा पुढे नागरिकांनाच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही स्मार्ट सिटीची स्मार्ट काम आहेत का? असा सवाल नागरीक विचारू लागले असून महापालिका अधिकारी कामाची पाहणी करतात की नाही असाही सवाल उपस्थित केला जातो.

संतोष दिवाडकर

In Vitthalwadi, water accumulates on the road due to sewerage

एज्युकेशन टुडे फाउंडेशन Arya Gurukul आयोजित जन्माष्टमी उत्सव

Arya Gurukul : जन्माष्टमी उत्सवात शाळेतील सर्वच १४३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विविध कार्यक्रम एज्युकेशन टुडे फाउंडेशन तर्फे विविध शाळांमध्ये घेतले जातात. जन्माष्टमी कार्यक्रमा क्षणी मुले खूप आनंदी व उत्साही दिसत होते. लिट्ल आर्यन्सच्या मुलांसाठी तर हा सण म्हणजे एक पर्वणीच होती. शाळेतील सगळे बालगोपाळ प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील मुले व मुली श्रीकृष्ण व राधाचा पोषाख परिधान करून आले होते. आर्य गुरुकुल शाळा नसून एक गोकूळच आहे की काय असा भास होत होता.

लिटिल आर्यन्स परिसरात श्रीकृष्णाच्या जीवनातील अनेक प्रसंगाचे सादरीकरण करण्यात आले. लग्न, बाळकृष्ण, कालियामर्दन, राधा-कृष्ण अशा अनेक प्रसंगाचे हुबेहुब चित्र व सजावट करण्यात आली. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते.

संदिपनी आश्रमातील मुलांनी गीतेच्या श्लोकांचे पठण केले. चिन्मय सरगम समूहाने कृष्ण भजन गायले, मूलींनी मंत्रमुग्ध करणारे नृत्य सादर केले. तसेच शाळेत आयोजित केलेल्या दही हांडीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी भाग घेतला. भगवान श्रीकृष्णांचा आवडता पदार्थ लोणीचा प्रसाद शाळेतील सर्व वालगोपाळांना वाटण्यात आला. शाळेतील बालगोपालन सह हा सण साजरा करताना संपूर्ण वातावरणाने जणू काही आपण मथुरेत आहोत आसा भास होत होता.

संतोष दिवाडकर

Watch Full Video of Arya Gurukul Janmashtami

Janmashtami celebration organized by Education Today Foundation Arya Gurukul

Kalyan Ganeshotsav : कल्याण डोंबिवली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना KDMC कडून दिलासा

Kalyan Ganeshotsav : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत महापालिका प्रशासन आणि गणेश मंडळांच्या नियोजना संदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी अनेक विषयांवर चर्चा केली तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना त्यांनी यावेळी मोठा दिलासा दिला आहे.

क.डों.म.पा. आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी गणेश मंडळांना मंडप आणि त्याजवळील असलेल्या कमानीचे शुल्क माफ करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर अग्निशमन विभागाचे असणारे शुल्क हे हजार रुपयांवरून निम्मे करण्यात आले आहे. त्यामुळे गणेश मंडळांना महापालिकेच्या या शुल्कातून मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे सर्व परवानग्या मिळवण्यासाठी सोयीस्कर अशी एक खिडकी योजना प्रभाग क्षेत्र कार्यालयात राबविण्यात येणार आहे.

सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने खड्डे पडलेले रस्ते गणेशोत्सवापूर्वी दुरुस्त करून डांबरीकरण केले जाणार असल्याची माहिती देखील आयुक्तांनी माध्यमांना दिली आहे. त्याचबरोबर घरघुती गणपतींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाल्यानंतर मूर्तींची होणारी विटंबना थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याचेही यावेळी आयुक्तांकडून माध्यमांना सांगण्यात आले.

संतोष दिवाडकर

Kalyan Ganeshotsav : Relief from KDMC to Kalyan Dombivli Public Ganeshotsav Mandals

एज्युकेशन टुडे फाउंडेशन तर्फे Arya Gurukul School येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याची स्पर्धा संपन्न

Arya Gurukul School : आर्य गुरुकुल विद्यालय नांदिवली शाखा कल्याण पूर्व, एज्युकेशन टुडे फाऊंडेशनचे संस्थापक भरत मलिक यांच्या नेतृत्वाखाली, पर्यावरण सहयोगी, आनंद आणि उत्साहाने गणेश चतुर्थीच्या तयारीला एक नवीन आयाम आणण्यासाठी गणपतीच्या आगमनासह ही बाब लक्षात घेऊन “पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा 2 सप्टेंबर 2023 रोजी आर्यगुरुकुल विद्यालयाच्या भव्य सभागृहात आयोजित करण्यात आली होती.

ज्यामध्ये मुख्याध्यापिका श्रीमती राधामणी अय्यर यांच्या प्रेरणेने शाळांनी पर्यावरणाची शुद्धता आणि सौंदर्य लक्षात घेऊन कच्च्या शाडू मातीपासून गणपती मूर्ती तयार केल्या. ज्यामध्ये पाच शाळांमधील 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी कलाशिक्षक मनीष व्यापारी यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती बनविण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी डेमो सेशन सादर केले.आणि मार्गदर्शन केले.

प्रा.मनीष व्यापारी यांची प्रतिक्रिया

या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून रुपाली शालवाले या पर्यावरणवादी आणि अस्मिता शर्मा होत्या. ज्या 2016 पासून सामाजिक शिक्षणाद्वारे शाश्वत समुदाय उभारणीवर काम करत आहेत. कार्यक्रमाचे परीक्षक विजय पुंडेकर व सुभाष शेगावकर यांनी केले. सर्वांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. या स्पर्धेचा उद्देश लोकांना पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देणे तसेच निस्तेज गणेशमूर्तीं ऐवजी नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यासाठी त्यांना प्रेरणा देणे हा आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना गणेशमूर्ती बनवण्याच्या कलेतील त्यांचे प्रभुत्व दाखवण्याची आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक कल्पना मांडण्याची संधी मिळेल. ही स्पर्धा केवळ रंगीबेरंगी आणि मौजमजेला एक नवी दिशा देणार नाही, तर आपल्या पर्यावरणाच्या रक्षणाचा महत्त्वाचा संदेशही देईल.

पर्यावरणपूरक गरजांशी जोडून उत्तम आणि हरित भविष्य कसे निर्माण करता येईल हा संदेश या स्पर्धेने दिला आहे.स्पर्धेतील सर्व उमेदवारांना सहभाग पत्र देण्यात आले व विजेत्याला प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

संतोष दिवाडकर

Environment friendly Ganesha idol making competition concluded at Arya Gurukul School by Education Today Foundation

Navbharat Saksharta Abhiyan : कल्याण डोंबिवलीत निरक्षरांचे झाले सर्वेक्षण; शिक्षकांची झाली पुरती दमछाक

Navbharat Saksharta Abhiyan : महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण विभागाचे उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या अधिपत्याखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये “नवभारत साक्षरता अभियान उपक्रम २०२२ -२७ अंतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे काम दि. १७.०८.२०१३ ते ३१.०८.२०२३ या कालावधीत करण्यात आले. महापालिका क्षेत्रातील ४४६ शाळांतील २३०६ शिक्षकांमार्फत सर्व वार्डातील सर्व कुटूंबाचे सर्वेक्षण यातून करण्यात आले.

शिक्षकांनी केलेल्या सर्वेक्षणाद्वारे निरक्षरांचे नाव, लिंग, संवर्गनिहाय माहिती संकलीत करण्यात आली. सर्व प्रभागातील लोकांचे सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करून त्यांना ऑनलाईन व ऑफलाईन पदधतीने साक्षर करणे हा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण दि. १७.०८. २०२३ ते ३१.०८.२०२३ या कालावधीत शिक्षक सर्वेक्षक, म्हणून आपल्या कुटुबांचे सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करणार आहेत.

या कालावधित वय वर्ष १५ ते ३५ आणि ३५ वर्षाच्या पुढील सर्व स्त्री आणि पुरूष दिव्यांग आणि पारलिंगी यांचे सर्वेक्षण करून विगतवारी करून निरक्षर संख्या निश्चित करावयाची आहे. तसेच शाळाबाहय मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल केले जाणार आहे. या सर्वेक्षण उपक्रम अंतर्गत जिल्हास्तर, तालुकास्तर, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सिआरसी प्रमुख यांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र शाळाबाहय व निरक्षर मुक्त करण्यासाठी प्रशासन अधिकारी रंजना राव यांनी सहकार्य करणेकामी महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना आवाहन केले होते. मात्र हे सर्वेक्षण करण्याचे काम शाळेतील शिक्षकांना देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना शिकवण्या बरोबरच घरोघरी फिरून शिक्षकांची चांगलीच दमछाक झाल्याचं दिसून आले. त्याचबरोबर सर्वेक्षणापूर्वी नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देतानाच शिक्षकांच्या नाकी नऊ आले होते.

संतोष दिवाडकर

Navbharat Saksharta Abhiyan : A survey of illiterates was conducted in Kalyan Dombivli