Durgadi Fort : भारतीय नौसेना दिन, शिवराय आणि कल्याणचे ऐतिहासिक महत्त्व

भारतीय नौसेना दिन हा दिवस ४ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौसेनेचे जनक म्हणून संबोधले जाते. ( Durgadi Fort ) आजकाल समाज माध्यमांवर याबाबत सर्वाना अवगत झाले आहे. शिवाजी महाराजांनी समुद्री आरमाराची स्थापना केली असल्याने त्यांना नौसेनेचे जनक म्हटले जाते. मात्र त्यांनी हे आरमार कुठे स्थापन केले ? याबद्दलची माहिती सर्वाधिक लोकांपर्यंत आज गेलेलीच नाही.

आरमाराआधीचे कल्याण :- छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्री आरमाराची सुरुवात कल्याण मधून केली. महाराजांच्या जन्मापूर्वी या शहरात परकीय राजवट राज्य करीत होते. पोर्तुगीजांनी पश्चिम किनारपट्टीवर कब्जा केला होता. त्याकाळी कल्याणमध्ये लाकूड आणि वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणावर सुरू होता. कल्याण शेजारील भिवंडी शहरात वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणावर चालत असे. हातमागावर तयार झालेला कपडा जलमार्गाने देखील सर्वत्र पोहोचत असे. याच शहरात शेतीच्या अवजारांची निर्मिती होत असे. यानिमित्ताने व्यापार करण्यासाठी आलेल्या पोर्तुगीजांनी ठाणे खाडी किनारी वखारी बांधल्या. आणि त्याच्या आडोशाला गढी चौक्या देखील उभ्या केल्या.

कल्याण ताब्यात घेऊन किल्ल्याची निर्मिती :- हिंदवी स्वराज्याचा विस्तार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी २४ ऑक्टोबर १६५७ रोजी आदिलशाहीच्या ताब्यात असलेले कल्याण शहर जिंकले आणि स्वराज्यात सामील करून घेतले. खरंतर हा दिवस कल्याण शहर वासीयांसाठी स्वातंत्र्य दिवसच म्हणावा लागेल. कल्याण पाठोपाठ भिवंडी शहर देखील स्वराज्याचा भाग बनले. शिवाजी महाराजांनी कल्याण काबीज केल्यानंतर ठाणे परिसरातील समुद्रातून आत येणारे खाडीमार्ग अभ्यासपूर्ण हेरून घेतले. पोर्तुगीज आणि त्याच बरोबर इंग्रजांचा दूरदृष्टीने विचार करून त्यांनी कल्याणच्या खाडी किनारी दुर्गाडी किल्ला उभारायचे ठरवले. पुढे आबाजी महादेव यांना किल्ला बांधताना अमाप द्रव्ये सापडली. देवीची कृपादृष्टी म्हणून या किल्ल्याला दुर्गाडी असे नाव मिळाले. याच दुर्गाडी किल्ल्यावर आश्रय घेऊन शिवाजी महाराजांनी समुद्री आरमाराची स्थापना केली. अनुभवी आणि कौशल्य असलेल्या तरबेज लोकांकडून त्यांनी जहाजे बांधून घेतली.

जहाजांची निर्मिती :- छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्यावरून समुद्री आरमाराची सुरुवात केली. यासाठी त्यांनी गोदी निर्माण केली. जिथून ही जहाजे बनविण्यात आली. त्यांच्या आरमारात तरांडी, तारवे, शिबाडे, गुराबा, पगारा, तिरकाठी, मचवा, पाल, संगमीऱ्या, फत्तेमाऱ्या अशी निरनिराळी जहाजे, गलबते उभी राहिली. त्यांची जहाजे ठाणे खाडीतून दाभोळ, रत्नागिरी, राजापूर आणि कारवारपर्यंत ये जा करत होती. ही जहाजे अरुंद होती व नाळेचा भाग निमुळता असल्याने पाणी कापून वेगही धरत होती. ही जहाजे शत्रूला चकवा देऊन सहज पुढे निघून जात होती. समुद्री स्वराज्याच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराजांचे आरमार पूर्णपणे सज्ज झाले होते. पुढे याच आरमाराने पोर्तुगीज, इंग्रज, डच, सिद्धी आदींवर जरब बसवली होती.

आरमाराच्या मदतीने कोकण किनाऱ्यावर असलेले किल्ले ताब्यात घेणे आणि ते दुरुस्त करणे, नव्याने काही किल्ले बांधणे असे उपक्रम त्यांनी सुरु केले होते. जस-जशी मराठ्यांची आरमारी ताकद वाढू लागली तसे त्यांचे शत्रू अधिक हालचाली करू लागले.

आरमाराच्या मदतीने समुद्रात साम्राज्य :- १६६० ते १६६४ या काळात सुवर्णदुर्ग , विजयदुर्ग, रत्नदुर्ग, सिंधुदुर्ग असे जलदुर्ग बांधले गेले किंवा त्यांची पुर्नबांधणी केली गेली. कुलाबा आणि खांदेरी हे जलदुर्ग राजांनी १६७८-७९ नंतर बांधले. मराठा आरमार ह्या जलदुर्गांच्या ताकदीवर समुद्रात फिरे. शत्रूस जेरीस आणणे आणि गरज पडल्यास माघार घेत जलदुर्गांच्या आश्रयाला येई. पश्चिम किनारपट्टीच्या सुरक्षेबरोबर राजांनी सागरी व्यापार सुरु केला. त्यासाठी मीठ वाहून नेणारी जहाजे बांधली. मुघलांशी राजकारण करून थेट मस्कतपर्यंत व्यापार सुरु केला. आता आरमार आणि व्यापार एकमेकांच्या जोडीने वाढू लागले. सुरक्षा असेल तर व्यापार वाढतो आणि व्यापारातून झालेल्या फायद्यामधून अधिक प्रबळ आरमार उभे करता येते.

१६६५ पर्यंत संपूर्ण कोकण मराठ्यांच्या ताब्यात आलेले होते. आदिलशहाची सत्ता उखडली गेली होती. मात्र जंजिर्याच्या जोरावर दंडा-राजापुरी सिद्दी धरून होता. मुंबईमध्ये इंग्रज (इस्ट इंडिया कंपनी) अजून स्वतःचे बस्तान बसवत होते आणि गोव्याला पोर्तुगीझ आपली राजधानी राखून होते. शिवाय ठाणे – वसई भाग त्यांच्या ताब्यात होताच.

नवीन जहाजांची निर्मिती :- स्वतःची जशी जमिनीवरची युद्धपद्धती ठरवली होती तशी आता समुद्रावरची युद्धपद्धती ते ठरवत होते. सुरवातीची पद्धत अतिशय सोपी होती. खोल समुद्रात संचार न करता जलदुर्गांच्या संरक्षणाखाली राहून, किनाऱ्या-किनाऱ्याने शत्रूला हुलकावणी देऊ शकतील अश्या बोटी बनवण्याच्या मागे ते लागले होते. तेंव्हा ‘गुराबे’ आणि ‘गलबते’ बनवायची तयारी जोमाने सुरु झाली होती. गुराब हे १५० ते ३०० टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज असते. ह्यावर २-३ डोलकाठ्या असतात. एकावेळी १५०-२०० सैनिक आणि खलाशी ह्यातून प्रवास करू शकत. गलबत हे आकाराने असून लहान असते. ७०-८० टन क्षमता असलेले हे जहाज फारतर १०० सैनिक वाहून नेत असे. मात्र जलद हालचालीच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त असे जहाज होते.

व्यापारासाठी धोरण निश्चित :- जस-जसे आरमार सजू लागले तशी त्याची व्यापारी धोरणे सुद्धा निश्चित केली गेली होती. सागरी व्यापारातून मिळणारे सर्व उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा केले जाई. आरमारात काम करणाऱ्या प्रत्येकाला महिना पगार मिळायचा. कोणालाही सागरी उत्पन्नातून हिस्सा घेण्याची मुभा नव्हती. सर्व सुभ्यांना स्पष्ट ताकीद होती की विविध बंदरामध्ये येणाऱ्या जहाजांना कुठलीही तोशीश लावता कामा नये. त्यांना योग्य ती सुरक्षा देणे हे आरमाराचे काम होते. जर बंदरेच नाही राहिली तर व्यापार कुठून होणार आणि कुठून मिळणार जकात हे साधे तत्व होते. मिळणाऱ्या जकातीवर आणि अधिक व्यापारावर आरमार सजवीत जावे असे राजांचे धोरण होते. फक्त बंदरातच नाही तर दर्यामध्ये देखील उगाच कोणा व्यापारावर उपद्रव करू नये अशी स्पष्ट ताकीद सर्वांना होती. जर चुकून शत्रू पक्षाकडील व्यापाराचे जहाज कुठल्याही बंदरात आले तरी ते लुटू नये, सुभेदारांनी जाऊन त्याची परीक्षा करावी आणि योग्य ते समाधान करावे, त्यांना अधिकाधिक आपल्या कडील जिन्नस विकावे आणि योग्य जकात वसूल करावी असे कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.

शून्यातून राज्याचे एक नये अंग सजू लागले होते. फक्त पायदळ आणि घौडदळ असलेल्या मराठा फौजेकडे आता आरमार सुद्धा तयार झाले होते. त्याच्या जोरावर ते आता शत्रूला आव्हान देण्यास सज्ज झाले होते.

संकलित लेखन :- संतोष दिवाडकर

संदर्भ :-
https://www.maayboli.com/node/31679

https://www.google.com/amp/s/maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/shivramaya-armaram-thane-creek-and-portuguesa/amp_articleshow/64429383.cms

वर्ल्डकपच्या भारतीय संघात मुंबई इंडियन्सचे सहा खेळाडू; तर चेन्नई बेंगलोरच्या फक्त एकालाच स्थान

आयपीएल स्पर्धेचा गतविजेता संघ मुंबई इंडियन्स सध्या स्पर्धेतून बाद झाल्याने समाज माध्यमांवर मिम्सचा पाऊस विरोधी संघाच्या चाहत्यांनी सुरू केला आहे. मात्र मुंबई संघाचे फेन्स देखील त्यांच्या या टीकेला तोडीस तोड अशी उत्तरे देताना दिसत आहेत. मुंबईच्या संघाने 1552 बस पकडून घरी जावे असे मुंबईचे विरोधी फेन्स म्हणत आहेत तर आमची अर्धी टीम वर्ल्डकप साठी खेळणार आहे तेव्हा तुमच्याच खेळाडूंना आयपीएल नंतर बॅगा भरायला लावा असे उत्तर मुंबई समर्थक देत आहेत. पण नक्की काय आहे या उत्तरा मागील गमक ? ज्यामुळे चेन्नई आणि बेंगलोरच्या समर्थकांना काहीसा कमीपणा घ्यावा लागतो हे जाणून घेऊयात.

आयपीएल २०२०, आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांतील खेळाच्या परफॉर्मन्सनुसार बीसीसीआयने भारताच्या संघाची टी20 वर्ल्डकप 2021 साठी निवड केली आहे. यात 15 खेळाडूंची नावे आहेत. तसे पाहता आयपीएल संपल्यानंतर सर्व खेळाडू हे आपल्या देशासाठी एका रंगात खेळत असतात. यात कोणत्याही आयपीएल संघाचा कसलाही संबंध नसतो. मात्र सध्या आयपीएल मधून बाद झाल्या नंतर चेन्नई बेंगलोरच्या फेन्सने मुंबईसाठी ‘घरी जा’ असे मिम्स बनवल्याने मुंबईचे समर्थक त्यांना समर्पक उत्तर देताना दिसत आहेत.

आयपीएल संघा नुसार पहायचे झाले तर भारतीय संघात निवड झालेल्या 15 खेळाडूंपैकी 6 खेळाडू हे सध्याच्या मुंबई इंडियन्स संघासाठी खेळलेल्या पैकी आहेत. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, सुर्यकुमार यादव, ईशन किशन, राहुल चहर हे ते सहा खेळाडू. याउलट चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांचा प्रत्येकी एक-एकच खेळाडू वर्ल्डकप साठी निवडण्यात आला आहे. ते म्हणजे रवींद्र जडेजा आणि कर्णधार विराट कोहली. पंजाब किंग्स चे केएल राहुल, मोहम्मद शमी. दिल्ली कॅपिटल्सचा ऋषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल. कोलकाता नाईट रायडर्सचा वरुण चक्रवर्ती आणि सनरायजर्स हैदराबादचा भुवनेश्वर कुमार अशी आयपीएल नुसार विगतवारी करता येईल. दुर्दैव म्हणजे राजस्थान रॉयल्स ही एकच टीम अशी आहे ज्याचा एकही खेळाडू वर्ल्डकपच्या भारतीय संघात नाही.

15 ऑक्टोबरला आयपीएल संपताच 17 ऑक्टोबर पासून ओमन येथून वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. तर 24 ऑक्टोबर रोजी भारताचा संघ पाकिस्तान विरुद्ध आपला पहिला सामना खेळताना दिसणार आहे. या दिवशी संपूर्ण आयपीएल समर्थक भारतीय संघाला समर्थन करताना दिसतील. मात्र तोपर्यंत हा मिम्स वोर असाच सुरू राहणार यात काही शंका नाही.

-संतोष दिवाडकर

मुंबईचा वडापाव बनला महाराष्ट्राचा फेव्हरेट; Vadapav history

Vadapav history : ‘वडापाव’……… एक अशी चव जी प्रत्येक महाराष्ट्रातील लोकांच्या जिभेवर जणू कोरली गेली आहे. आज २३ ऑगस्ट हा दिवस म्हणजे जागतिक वडापाव दिवस म्हणून ओळखला जातो. मग असे असेल तर आजच्या दिवशी मुद्दाम वडापाव खायलाच हवा. लहानपणापासून जो वडापाव आपण खात आलो तो वडापाव नेमका आणला कसा ? याबाबत अनेक कहाण्या आहेत पण माहीत खुप कमी लोकांना आहेत.

काय असतो वडापाव ? तर एक पावाचा तुकडा मधोमध भेदून त्यात टाकलेला बटाट्याचा बेसनात तळलेला एक गोल गरगरीत गोळा. आता महाराष्ट्रात पावाला डिमांड मिळाला तो वड्यामुळे. बटाट्याच्या भाजीपासून केलेले गोळे बेसनात बुडवून तेलात सोडले की तयार होतो वडा. त्याच वड्याला पावात घातला की झाला वडापाव. आता हे सर्वांना माहिती आहेच. वडापाव दिसायला कसाही असो शेवटी त्याची चव काय आहे ? यावरून त्याचा दर्जा कळतो. वडा पावाला पुढे चटणी आणि मिरचीची जोड आली. आणि चटणी मिरची शिवाय लोकांनी वडापाव खाण्याला नाराजी दर्शविल्याने विक्रेत्यांना देखील खादाड मंडळींच्या जिभेचे चोचले पुरवायला घेतले. एकीकडे जिभेचे लाड आणि दुसरीकडे खिसा जाड. धावपळीच्या युगात घराबाहेर असताना वेळेची आणि पैशांची बचत करून पोट भरण्यासाठी वडपावची जागा कुणीही घेऊ शकत नाही.

Vadapav history :- आम्ही घेतलेल्या शोधात अशी माहिती मिळाली की हा वडापाव मुळात मुंबईत तयार झाला आहे. स्वातंत्र्या नंतरच्या काळात मुंबईत गिरणी कामगारांचे मोठे प्रमाण वाढले होते. याचदरम्यान १९६६ साली दादर रेल्वे स्थानकात अशोक वैद्य यांनी या वडपावला प्रथम विक्रीसाठी आणले. तयार केलेली बटाट्याची भाजी बेसनात घोळून त्यांनी उकळत्या तेलात सोडली आणि वड्याचा जन्म झाला. बटाट्याचा वडा रेल्वे स्थानकात खूप प्रसिद्ध होऊ लागला. पुढे हा वडापाव गरमगरम खाणे जरा कठीणच होते. आणि मग पुढे लगेचच याच वड्याला मिळाली पावाची जोड. आणि वडापाव खऱ्या अर्थाने उदयाला आला. वैद्य यांनी बनवलेला वडापाव पाहून ठिकाणी स्टोल लागू लागले.

वडापाव आणि शिवसेना :- त्याकाळात दाक्षिणात्य लोकांनी मुंबईत आपले पदार्थ विकून जम बसवला होता. पण नव्यानेच सुरू झालेली बाळासाहेबांची शिवसेना हलहळू विस्ताराला लागली होती. आणि एके याच वड्याने बाळासाहेब ठाकरेंच्या जीभेला तृप्त केले. जिभेवर रेंगाळलेली चव त्यांच्या डोक्यात गेली आणि त्यांनी याच वडापावला चालना दिली. मराठी माणसाचा वडापाव मुंबईसह महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्यामागे बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान विसरून चालणार नाही. आणि याच वडापावने पुढे दाक्षिणात्य पदार्थांच मार्केट ठप्प करून मुंबईत स्वतःच आणि परिणामी मराठी अस्मितेच नाव उच्च स्थानी नेलं. पुढे शिवसेनेने शिव वडा नावाने उद्योग सूरू केला. आणि शिवसैनिकांनी वडापावच्या व्यवसायात पाय रोवले.

Diwadkar Vadapav Karjat :- मुंबई पुणे प्रवास करीत असताना कुणी दिवाडकरांचा वडा खाल्ला नाही असे खूप कमी लोकच असतील. आता तुम्ही म्हणाल पहिल्या सारखा राहिला नाही. आता हे ग्राहकांचं म्हणणं आहे त्याच्या जिभेने केलेले परीक्षण. वडापावचा जन्म झाल्या नंतर पुढील काही वर्षानंतर कर्जतमध्ये दिवाडकरांचा वडापाव प्रसिद्ध झाला. त्याकाळी रेल्वे स्थानक म्हणजे विशेष गजबजाट नसायची. एक रेल्वेगाडी गेली की शुकशुकाट. ना कसली अनाऊन्समेंट, ना लोकांच्या बडबडीचा आवाज, ना बाहेरील गाड्यांचे हॉर्न. अतिशय शांत वातावरण कर्जत रेल्वे स्थानकात असायचे. मनुष्य वस्ती देखील फारशी नव्हती. या काळात डेक्कन क्वीन सारखी एक्स्प्रेस या स्थानकात खूपवेळ थांबायची. त्याचे कारण असे की कर्जतच्या पुढे खंडाळा घाट सुरू होत असल्याने इथे एक्स्ट्राचे इंजिन जोडण्याची गरज भासायची. आणि इंजिनच्या जोडजोडीला बराच वेळ निघून जायचा. मुंबईपासून प्रवास करून आलेले पुण्याकडे निघालेले प्रवासी कर्जत पर्यंत येई पर्यंत भुकेले असतात. आणि म्हणूनच इथे वडापावची विक्री अधिक प्रमाणात होते.

कर्जतपासून पुढे राहत असलेले बाबुराव दिवाडकर यांनी या गोष्टीचा फायदा करायचे ठरवले. त्यांनी सुरुवातीला घरून परातभर वडे बनवून आणले आणि रेल्वे येताच विकायला घेतले. मुंबईपासूनचा प्रवास, पुढे घाट मध्ये खाण्यास काही नाही. म्हणून त्यांचे वडे पटापट विकले गेले. हळूहळू त्यांनी वडे वाढवले. पण जितके वाढतील तितके वडे विकले जाऊ लागले. आणि पाहता पाहता दिवाडकर वडापाव ब्रॅन्ड बनला. पुढे हा व्यवसाय बनला आणि आता या वडापावची फ्रँचायजी विकली जाते. त्यामुळे आता या वडापावचं नाव जरी दिवाडकर असलं तरी तो बनवणारा दिवाडकरच असेल हे सांगता येत नाही. पण तेव्हाचा आणि आताचा वडापाव यात जमीन आणि आसमानाचा फरक आहे. आकारा सोबतच चव देखील बदलली असल्याचे ग्राहक सांगतात. एकंदरीतच आता हा वडापाव आवर्जून नव्हे तर भुकेपोटी नाईलाजाने खाल्ला जात असल्याचे खाणारे म्हणतील. असोत खवय्यांना नाराज केल्याचा परिणाम व्यवसायावर होतो हे कळायला वेळ लागत नाही.

वडापाव महाराष्ट्राच्या गावागावांत :- मुंबईतून निघालेला वडापाव हळुहळु बाहेर पडला आणि संपुर्ण महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात जाऊन पोहोचला. आता वडापाव फक्त मुंबईचा राहिलेला नसून तो संपूर्ण महाराष्ट्राचा झालेला आहे. खेडोपाड्यात एसटी स्टॅन्डवर एक रुपयाला स्वादिष्ट वडापाव विकला जाऊ लागला. आज प्रत्येक गाव खेड्यात आणि तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला फेमस वडापाव हॉटेल नक्कीच मिळेल. जसे की महाराष्ट्रातील संगमनेर, नारायणगाव, आळेफाटा इथे एसटी प्रवासी वडापाव वर ताव देतात. कोल्हापुरात पावावर का जुलूम होत आहे माहीत नाही. कारण येथील वड्याची चव इतकी खास नाही आणि शिवाय पावाच्या जागी ब्रेड दिला जातो. त्यामुळे याठिकाणी वडापाव खाण्याचे समाधान मिळत नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.

बदलता वडापाव :- सुरुवातीला वडा…पुढे पावाची जोड… चटणीची चव… आणि ठेचा किंवा मिर्चीचा झणका… इथपर्यंत वडापाव खाण्यात खरी गंमत आहे. पण आता वडापाव मध्ये छेडछाड करून त्यात वैविध्यता आणण्याचा प्रयत्न खूप वेळा केला जातो. प्रत्येक प्रसिद्ध वडापाव विक्रेत्यांची एक वेगळी आणि जबरदस्त अशी चव आहे. कारण चवीनेच प्रसिद्धी दिलेली असते. काही वडापाव विक्रेते हे आपल्या वड्या बरोबर चटणी देताना खूप काळजी घेतात. आणि फक्त चटणीमुळे देखील तिथला वडपाव प्रसिद्ध होतो.

२०१० च्या दशकात मुंबईत काही ठिकाणी वडापावची साईज मोठी केली आणि जम्बो वडापाव म्हणून मार्केट जमवले. तर पुढे पाश्चिमात्य बर्गरचा क्रेज पाहून काहींनी वडापावचा आकार देखील गोल केला आणि गोली वडापाव नावारुपाला आला. २०२० च्या दशकात काही लोकांनी वडपावला चायनीज चटण्यांमध्ये बुडवून विकला. नावीन्य असल्याने प्रसिद्धी देखील मिळाली. काहींनी तर चीज,बटर,व्हाईट सॉस शक्य होईल तितके नवनवीन प्रयोग वडापाव सोबत केले. यामुळे आजच्या तारखेला १२ रुपयांचा साधा वडापाव आणि २५ रुपयांचा हायजेनिक वडापाव असे प्रकार बनले. किती बदल जरी झाले तरी साधा आणि खरा वडपावच आज सर्वाधिक लोकांची पसंद बनलेला आहे. २०३० च दशक सुरू झालेल आहे. त्यामुळे इतक्या वर्षांचा वडापाव आणखी कोणती रूप घेतो हे येणारा काळच सांगेल. तो पर्यंत खात रहा आणि भरवत रहा… मराठमोळा वडापाव.

सदर लेख तुम्हाला कसा वाटला ? हे नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला आणखी कशी माहिती वाचायला आवडेल याबद्दलही आपल्या सूचना कळवा.

-संतोष दिवाडकर

Mumbai’s Vada pav becomes Maharashtra’s favourite; Vadapav history

ऐतिहासिक समाधीस्थळांच्या जीर्णोद्धारासाठी मा.नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्याकडून ५१ हजारांचा कर्तव्य निधी राजे प्रतिष्ठाणकडे सुपूर्द

क.डों.म.पा.चे मा.नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांनी महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई यांच्या ऐतिहासिक समाधीस्थळाच्या जिर्णोद्धारासाठी आपला खारीचा वाटा पुढे केला आहे. यासाठी त्यांनी ५१ हजार रुपयांचा धनादेश ‘राजे प्रतिष्ठाण दुर्गसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य’कडे सुपुर्द केला आहे.

१५ ऑगस्ट देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राजे प्रतिष्ठाणने माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीदरम्यान राजे प्रतिष्ठाणचे प्रदेशाध्यक्ष राहुल महाजन यांनी माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या समोर समाधी स्थळाचा आराखडा ठेवला आणि संपूर्ण कामाची इत्यंभूत माहिती त्यांना दिली. छत्रपती शिवरायांना आपले प्रेरणास्थान माननारे नगरसेवक अभिमन्यु गायकवाड यांनी देखील या जिर्णोद्धाराकरिता स्वतः खारीचा वाटा पुढे केला असून ५१ हजार रुपयांचा कर्तव्य निधी राजे प्रतिष्ठाण कडे सुपूर्द केला आहे. तसेच राजे प्रतिष्ठाणच्या संपूर्ण संस्थेला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्थापन केलेल्या राजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राहुल महाजन हे ऐतिहासिक कल्याण शहरात वास्तव्यास आहेत. त्यांनी प्रतिष्ठाणच्या वतीने दुर्ग संवर्धन तसेच समाधी स्थळांच्या जिर्णोद्धाराचा विडा उचलला आहे. या मोहिमेत आर्थिक पाठबळ असणे देखील तितकेच गरजेचे असून लोकनिधीतून ते निधी जमा करीत आहेत. यासाठी त्यांनी अभिमन्यू गायकवाड तसेच मदत केलेल्या इतरांचेही आभार मानले आहे. याबद्दल MH मराठीने माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड तसेच राजे प्रतिष्ठाण प्रदेशाध्यक्ष राहुल महाजन यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी MH मराठीला आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राजे प्रतिष्ठाणने माझी भेट घेतली. त्यांनी माझ्या समोर महाराणी येसूबाई व महाराणी ताराबाई यांच्या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धाराचा आराखडा ठेवला. अध्यक्ष राहुल महाजन यांनी काही ऐतिहासिक घटना आणि कालांतराने आजची परिस्थिती निदर्शनास आणून दिली. मुळात आपण या महाराष्ट्रात राहतो असं म्हणण्यापेक्षा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीत राहतो. या नात्याने आपले काहीतरी कर्तव्य बनते की आपण अशा उपक्रमासाठी नक्कीच पुढाकार घ्यावा. यासाठी आर्थिक पाठबळ देखील महत्वाचे असते म्हणून मी माझा खारीचा वाटा म्हणून एक कर्तव्य निधी राजे प्रतिष्ठाणकडे दिला आहे. माझी अशी इच्छा आहे की लवकरच हे समाधी स्थळ उभं रहावं आणि यासाठी इतरांनीही आपल्या परीने फुल ना फुलाची पाकळी कर्तव्य निधी म्हणून द्यावी.

अभिमन्यू गायकवाड (मा.नगरसेवक,क.डों.म.पा.)

कल्याणचे भूमिपुत्र मा.नगरसेवक अभिमन्यूशेठ गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली. महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई यांचे ऐतिहासिक समाधीस्थळ कसे असेल याचा आराखडा त्यांना दाखवला. त्यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. व ५१ हजार रुपयांचा एक कर्तव्य निधी स्वराज्य कार्यासाठी अर्पण केला. याबद्दल राजे प्रतिष्ठाण कडून त्यांचे मनापासून धन्यवाद. महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई यांचं स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान होत. त्यांनी शत्रुसमोर आपली चांगलीच जरब बसवली होती. त्यामुळे आता आपलं कर्तव्य म्हणून आम्ही हा समाधी स्थळ जीर्णोद्धाराचा उपक्रम हाती घेतला आहे. सद्या खोदकाम वगैरे झालेले आहे. पावसाळा संपल्या नंतर पुढील कामाला सुरुवात केली जाणार आहे. यासाठी ज्याला जसे जमेल तशी मदत तुम्ही करू शकता. मदत नव्हे तर हे स्वराज्यासाठी आपले कर्तव्य आहे असे आपण म्हणू.

राहुल महाजन (अध्यक्ष, राजे प्रतिष्ठाण दुर्ग संवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य)

संतोष दिवाडकर

‘कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणचा’ कोकणातील आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात; भाग २

कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणने केलेली मदतीची सुरुवात आणि त्यांच्या टीमचा पहिल्या दोन दिवसांचा प्रवास तर आपण जाणून घेतलातच आता पहा पुढे नेमकं काय घडलं ? परंतु ज्यांनी पहिला भाग वाचला नाही त्यांनी पुढील लिंकवर आधी तो वाचावा. https://mhmarathi.in/?p=954

शनिवार दि.३१ जुलै… मदतकार्याचा तिसरा दिवस. खेड तालुक्यातील संजय मोरे यांच्या निवासस्थाना पासून मदतीसाठी संपूर्ण ताफा पुढील ठिकानी रवाना झाला. सुसेरी अलसुरे मोहल्ला, शिव, भोसते येथील पूरग्रस्तांच्या भेटी घेऊन त्यांना अन्नधान्य किट व इतर वस्तुंचे किट देण्यात आले. जगडुबी नदीच्या पुराने या लोकांचे प्रचंड नुकसान झाले होते. काहींची भातशेती वाहून गेली होती. रस्ते उखडले, घरे कोसळली. या सर्व भागात मदत दिल्यानंतर संपूर्ण ताफा खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागात जायला निघाला.

उपाशीपोटी अतिदुर्गम भागाकडे रवाना :- दुपारचे तीन वाजले होते. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांच्या समवेत अतिदुर्गम भागाकडे निघाले आणि प्रवास सुरु झाला. काही लोकांनी सकाळचा नाश्ता केला नव्हता. शिवाय दुपार झाली असल्याने पोटात भुकेचे कावळे ओरडू लागले होते. मदतकार्य करता करता पोटात भुकेने गोळा उठला होता. मात्र आता प्रवास सुरु झाला होता. खेड तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या बिरमिनी गावाकडे हा ताफा निघाला होता. येथीलच मु.पो.वडगाव गावात दरड कोसळून एका दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यावेळी कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण तसेच आमदार गणपत गायकवाड यांनी नातेवाईकांची भेट घेतली. त्याचप्रमाणे मदतीचा हात पुढे केला.

मोबाईल टॉवर साठी करणार आमदार प्रयत्न :- गावखेड्यातील संपूर्ण प्रवासात मोबाईलला कसलेही नेटवर्क आढळले नाही. येथील लोक एका मोठ्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. ही बाब त्यांनी आमदार गणपत गायकवाड यांच्या निदर्शनास आणून दिली. आपण मोबाईल टॉवर लावण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी यावेळी गावकऱ्यांना सांगितले. यानंतर ताफा निघाला आणि येथील एक जागृत देवस्थान देवी इवराई मानाई देवीच्या दर्शनासाठी काहीवेळ थांबला. देवदर्शन करून पुन्हा ताफा खेडकडे जिथे वास्तव्य होते त्या ठिकाणी निघाला. सायंकाळचे सहा वाजत आले होते. शनिवारचा निरंकार उपवास घडल्याने सर्वजन जेवणावर तुटून पडले.

दोन दिवसांच्या मदतकार्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्या समवेत आलेला ताफा पुन्हा कल्याणकडे निघाला. दुसऱ्या दिवशी रविवारचा जनता दरबार आणि इतर नियोजित कार्यक्रम असल्याने ते आपल्या मतदारसंघात परतण्यासाठी सर्वांचा निरोप घेऊन जाणीव संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश सावंत यांच्या समवेत निघाले. यानंतर रात्री थोडेफार जेवण करून सर्वजण झोपी गेले.

दिवस चौथा – चिपळूण :- रविवार दि. १ ऑगस्ट … मदतकार्याचा चौथा दिवस. सकाळी आवरून उर्वरित मालाच्या टेम्पोसह दोन गट करून चिपळूण येथे मदत वाटण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी निघाले. चिपळूण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याची आर्थिक राजधानीच. वाशिष्ठी नदीच्या पुरामुळे येथील पूल देखील वाहून गेला. मात्र डागडुजीनंतर आता वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. परशुराम घाटापासून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. यामुळे काही गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. १९६५ नंतर आलेल्या भयावह पुरामुळे तालुक्यातील बाजारपेठ, जवळपास असणाऱ्या वसाहती साधारण १२ फूट पाण्यात गेल्या होत्या. काही ठिकाणी नदी प्रवाह बदलल्याने पूर परिस्थिती ओढावली असल्याचे तेथील लोक सांगत होते. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणने त्या ठिकाणी जाऊन मदतीचा एक हात पुढे केला.

खेर्डी येथील दत्तवाडी, विकासवाडी, सती, समर्थ नगर, बाजारपेठ मोहल्ला वस्ती, माप, खिंड, वाणी, आळी, कलबसते अश्या ठिकाणी जाऊन जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले गेले. चिपळूण तालुक्यातील दुर्गम भागातील पोसरे गावच्या बौद्ध वाडीवर दरड कोसळून जिवीतहानी झाली होती. याही ठिकाणी अध्यक्ष मोरे यांनी सहकाऱ्यांसमवेत जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्याचबरोबर जवळपास असलेल्या सापील्दी, धामणगाव, खोपिगाव, दसपटी येथील ओवाळी, धनगरवाडी, कडवड गावांना कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणने मदतीचा हात दिला. चार दिवसांच्या व चार तालुक्यातील या संपूर्ण मदतकार्यात कोकण वासीयांनी संपूर्ण कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणचे आभार मानले. कल्याणहुन आलेली ही मदत महाड,पोलादपूर,खेड आणि चिपळूण तालुक्यातील प्रत्यक्ष गरजूंनाच देण्यात आली. त्यामुळे मदत करण्यापेक्षा मदत कोणाला करीत आहोत या बाबीवर प्रतिष्ठाण भर दिल्याने मदत योग्य हातात गेली असल्याचे समाधान यावेळी व्यक्त करण्यात आले.

प्रतिष्ठाणच्या मदतीने भारावले कोकणकर:- संपुर्ण ४ दिवस मदत वाटप करीत असताना आपत्तीग्रस्त नागरिकांनी संस्थेच्या लोकांना तसेच सहभागी झालेल्या आमदारांसमोर आपल्या व्यथा मांडल्या. काही ठिकाणी मोबाईल टॉवरची मागणी असोत किंवा काही ठिकाणी एसटी थांब्याकरीता निवारा मिळण्याची अपेक्षा करण्यात आली. सरकार आमच्याकडून बस थांब्याच्या निवाऱ्याकरिता पैसे मागतात असे म्हणत तुम्ही काहीतरी प्रयत्न करावा अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. ज्याठिकाणी आजपर्यंत कोणीही मदतीसाठी पोहोचलं नव्हतं सरकार देखील इथे आलं नसेल अशा भागात तुम्ही मदत घेऊन आलात. ही आम्हाला मिळालेली पहिली मदत आहे. कारण बाकीचे लोक शहरातच मदत वाटून निघून जातात पण आमच्या दुर्गम भागात कधी कोणी आलं नव्हतं. तुमची ही मदत खरोखरच लाखमोलाची आहे. अशा शब्दांत गावकऱ्यांनी प्रतिष्ठाणचे आभार मानले. शिवाय गावकऱ्यांनी मांडलेल्या व्यथा आणि प्रश्न यावर नक्कीच मार्ग काढला जाणार असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष संजय मोरे यांनी गावकऱ्यांना दर्शवला.

मदतकार्यात सहभागी सेवेकरी :- कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या या मदतकार्यात कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड, प्रतिष्ठाणचे संस्थापक/अध्यक्ष संजय बाबुराव मोरे, कार्याध्यक्ष रमाकांत देवळेकर, उपाध्यक्ष सुभाष म्हस्के, सचिव संदीप तांबे, उपखजिनदार अजय पवार, सल्लागार तसेच प्रसिद्धी प्रमुख शरद शिंदे, त्याचप्रमाणे दीपक गायकवाड, जाणीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश सावंत, अनिल राऊत, राहुल कासारे, योगेंद्र यादव, प्रदीप उपाध्याय, सदानंद शिंदे, संतोष परब, संतोष गुरव, रुपेश साळुंखे, मंगेश पवार, मंगेश सकपाळ, गणेश शिंदे, अविनाश शिरकर, मनीष पाटील, सचिन कुरणे, रदणेश महाडिक, अजय महाडिक, इलाखी कोनार, प्रशांत पवार, प्रितेश आचरेकर, साहिल मोरे, संतोष दिवाडकर, तिसाई ग्रुपचे अरुण दिघे, मनोज माळी, संदीप सरवणकर, अमीत धानजी, विशाल जोगदंड, अज्जू गायकवाड, नितीन शिंदे, प्रमोद माने, तुकाराम मापरी, साजीत खान, सूरज भारद्वाज, गौरव सरवणकर, रामदास तळपदे तसेच कल्याण कल्याण पूर्व व्यापारी संघटना आणि इतर सहकाऱ्यांचे प्रत्यक्ष योगदान कोकण दौऱ्यात लाभले. मदत करताना द्यावयाचे सामान व मदत देण्याचे ठिकाण आगोदर निश्चित करण्याचे आवाहन कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण यांच्या कडून इतर संस्थांना करण्यात येत आहे.

-संतोष दिवाडकर

‘कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण’चा कोकणातील आपत्ती ग्रस्तांना मदतीचा हात; भाग १

‘कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण’ कडून कोकणात आलेल्या पुरातील नुकसानग्रस्त लोकांना मदतीचा हात पुढे करण्यात आला होता. मंडळातील लोकांनी मदत गोळा करून जवळपास ३५ टन जीवनावश्यक साहित्य कोकणातील गरजूंना वाटप केले. साहित्य गोळा करण्यापासून वाटप करून परतण्या पर्यंतचा एक धावता प्रवास सर्वांना माहीत व्हावा या दृष्टीने लिहलेला हा लेख.

कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण’ची स्थापना :- ‘कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण – कल्याण,महाराष्ट्र’ मागील अनेक वर्षांपासून कल्याण शहरात कार्यरत आहेत. स्वतःचे जीवन घडवण्यासाठी कोकणातून शहरात आलेल्या लोकांनी एकत्र येऊन या प्रतिष्ठाणची स्थापना केली. राजकारणाला थोडंस लांब ढकलून गावच्या मातीचा आभास शहरात व्हावा यासाठी कोकणातील मातीशी नाळ असलेल्या कल्याण शहरातील कोकणकरांना समाजसेवक संजय बाबुराव मोरे यांनी एकत्र करून या संस्थेची स्थापना केली. आणि कल्याण मध्ये भव्य दिव्य असा कोकण महोत्सव सुरू झाला. कोकणातील संस्कृतीचे दर्शन कोकणात न जाता कल्याणकरांना घडू लागले. कोकणातील जीवनपद्धती, कोकणातील आहार, एकंदरीत हापूस आंबा सोडला तर सर्वच गोष्टी या महोत्सवात मिळत कारण साधारण जानेवारी महिन्यात हा महोत्सव होत असे जेव्हा हापूस झाडावर बहरायचा कालावधी सुरू असतो.

कोकणात जाण्याचा आखला बेत :- मागील दोन वर्षात कोरोनाने थैमान घातल्याने कोकण महोत्सव होऊ शकला नाही. त्यामुळे कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणचे पदाधिकारी व कार्यकर्ते काही काळासाठी विखुरले गेले होते. २१ व २२ जुलैच्या पावसाने कोकणाला झोडपून काढले. नदी ओढे ओसंडून वाहू लागले. दरडी कोसळल्या, पुरात लोकांची घर बुडाली तर दरडीत कुटुंबच्या कुटुंब मातीत गाडली गेली. कोकणावर आस्मानी संकट कोसळलेले. अशा परिस्थितीत महाराष्ट्र भरातून कोकणात मदतीचा हात पुढे केला गेला. आणि कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाण देखील आपल्या गावाच्या मदतीसाठी सज्ज झाली. फोन फिरले… संस्थेचे सर्व पदाधिकारी गोळा झाले… मीटिंग झाल्या आणि पुढच्या कामाची आखणी कागदावर झाली.

प्रतिष्ठाणच्या सभासदांनी तसेच पदाधिकार्यांनी मदतीसाठी आवाहन केले. शक्य तितकी मदत लोक करू लागले. काहींनी धान्य दिले, काहींनी इतर जीवनावश्यक वस्तू सुपूर्द केल्या. वस्तू जमा झाल्या खरे पण आता त्या नेमक्या कुठे वाटप करायचा याबाबत महत्त्वाचा विचार करण्यात आला. कारण कोकणात महाराष्ट्र भरातून मदत होत होती. आणि जिथे नुकसान झालं नाही अश्या लोकांची देखील घरं सामानांनी भरली होती. वर्षभर बसून खातील इतके समान एका एका घरात साठले होते. बाहेरून आलेला ट्रक शहरातच कुठेतरी जवळपास थांबून येईल त्याला सामान देऊन निघून जात होते. त्यामुळे कोकणात ज्याचे काही नुकसान झाले नाही त्यांचे मोठे फावले होते.

कमिटीचे व्यवस्थापन :- ही बाब कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या निदर्शनास आली होती. म्हणून संस्थेने मदत कुणाला करायची याचा एक सर्वे केला. कोणत्या भागात नुकसान झालंय त्या गावातील लोकांची यादी बनवली गेली व यासाठी प्रत्यक्ष कोकणात संपर्क साधला गेला. दुसरीकडे मदतीचे सामान देखील जमा होत होते. मंडळातील पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी शक्य तितकी मदत केली. जाणीव सामाजिक संस्था, कल्याण पूर्व मधील व्यापारी संघटना अशा अनेक मंडळ व संस्थांनी मदतीचा हातभार लावला. उद्योजकांनी देखील आर्थिक मदत केली. कल्याणच्या आमदारांनी देखील मदत वाटपासाठी आर्थिक मदत संस्थेला दिली. यानंतर पुढील धोरण आखून मदतीचे दिवस आणि ठिकाण तसेच इतर गोष्टींचं व्यवस्थापन करण्यात आले.

प्रवासाची पहिली रात्र :- गुरुवार दि.२९ जुलै रोजी सकाळ पासूनच ट्रक मध्ये सामान भरायला सुरुवात झाली. साधारणपणे ३५ टन च्या आसपास माल असल्याने सर्व ट्रक भरण्यास संध्याकाळ झाली. कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी ट्रकचे पूजन करून सर्व गाड्यांना मार्गस्थ केले. सामानांचे मोठे ट्रक, केटरर्सची पिकअप सह पाच सहा गाड्यांच्या ताफ्यात जवळपास २५-३० लोकांची टीम सायंकाळी कोकणाकडे रवाना झाली. इतक्या लोकांचा ताफा असल्याने अडीअडचणी येणे देखील स्वाभाविक होते. इतक्या लोकांच्या जेवणाची जबाबदारी प्रितेश आचरेकर यांच्या केटरर्स टीम वर सोपवली होती. मात्र नागोठणे जवळच त्यांची पीकअप बंद पडली आणि वेळ व्यवस्थापण साधून त्यांनी तिथेच एका गेरेजच्या वर्कशॉप बाहेर जेवण बनवले. गरमागरम पुलावभात आणि लॉन्च पापड खाऊन तृप्त झालेली माणसं पुन्हा गाडीत बसून कोकणाकडे निघाली. जेवण होई पर्यंत आचरेकर यांची केटरर्सची व्हेन देखील गेरेजमधून रिपयेर होऊन आली होती.

कोकणातील महाड येथील उतेकर यांच्या गावातील बंगल्यावर पहिली रात्र जाणार होती. पण तिथे पोहोचे पर्यन्त पहाटेचे साडे चार वाजले होते. कारण रात्रीची वेळ असल्याने ताफ्यातील गाड्या मागे पुढे राहत होत्या. टेम्पो वाल्यांना आणायला पुन्हा मागे जावे लागत होते. असे करत करत ताफा महाड येथील उतेकर यांच्या बंगल्यावर पोहोचला. लाईट नसल्याने जनरेटर सुरू झाला. आणि पाच वाजता सर्वजण मिळेल त्या जागेत झोपी गेले. जनरेटरच्या आवाजाने झोप घेणे सोपे नव्हते. तरीही काही तासांची झोप घेऊन सकाळी सर्वांनी आवरले. चहा पोह्यांचा नाश्ता झाला. बाहेर पावसाने हजेरी लावली होती.

आमदार गणपत गायकवाड झाले पथकात सामील :- सकाळी उशिराच्या दरम्यान कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड आपल्या काही सहकाऱ्यांसमवेत महाड येथे येत कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणला जॉईन झाले. दरम्यान स्थानिक आमदार भरत गोगावले हे देखील भेटीसाठी आले होते. त्यांच्या भेटीनंतर मदतकार्यासाठी प्रतिष्ठाणची टीम रवाना झाली. महाडमधील खरवळी, ब्राह्मण आळी नवले, भोई, असनपोई, आकले बौद्धवाडी येथील सावित्री व काळ नदीच्या पुराने बधितांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. या सर्व भागात मदत पोहोचल्यानंतर पुन्हा संपूर्ण ताफा उतेकर यांच्या बंगल्यावर परतला. यानंतर जेवण करण्यात आले आणि दुपारच्या दरम्यान एक टीम कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांच्या समवेत तळई दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेली. यावेळी आमदारांनी संस्थे समवेत मातीखाली गेलेल्या गावाला भेट दिली तसेच मृतकांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याचबरोबर बचावलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेत त्यांना मदतीचा हात पुढे केला. यानंतर सायंकाळी संपूर्ण टीम खेड तालुक्याकडे निघाली.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी खेड तालुक्यातील संजय बाबुराव मोरे यांच्या निवासस्थानी संपूर्ण टीम रवाना झाली. आधल्या दिवशी व्यवस्थित झोप न झाल्याने तसेच दिवसभरातील धावपळीत २४ तासांचा शीण इथे घालवण्यात आला. व त्यानंतर रात्री व्यवस्थितपणे झोप झाली. दुसऱ्या दिवशी कशा पद्धतीने मदतवाटप झाले आणि कोणत्या अडचणींचा सामना झाला यासाठी वाचा MH मराठीचा उद्याचा लेख. धन्यवाद !!!

-संतोष दिवाडकर

लॉकडाऊनचं आर्थिक संकट आणि कल्याण पूर्वेत व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या

लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात अडकलेल्या कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरातील एका व्यवसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत जनमत वृत्त संस्थेचे याच भागात वास्तव्यास असणारे पत्रकार आनंद गायकवाड यांनी आपल्या शब्दात एक लेख प्रसिद्ध केला आहे.

पत्रकार आनंद गायकवाड यांचा लेख खालीलप्रमाणे :-

गेली ३० ते ३५ वर्षे अनेक संकटांवर मात करीत आपल्या कुटूंबियांच्या उपजिविकेची समर्थ पणे जबाबदारी पार पाडणाऱ्या कल्पाण पूर्वेतील एका प्रिन्टींग प्रेस व्यवसायीकाने लॉकडाऊन मुळे आर्थिक संकटात सापडल्याने अखेर गळफास लावून आपले जिवन संपवल्याची ह्यदस्पर्शी घटना कल्याण पूर्वेतील तिसगांव नाक्यावर सोमवारच्या रात्री घडली आहे . तिसगांव नाक्यावरील मातोश्री इमारती मध्ये रहाणारे बंडू श्रीराम पांडे असे या व्यवसायीकाचे नांव असून अवघ्या ५६ वर्षे वयाच्या या दुदैवी व्यवसायीकाच्या पश्चात पत्नी आशा ( ५१ ) विवाहीत मुली चेतना ( २८ ) , रोशनी ( २६ ) आणि अविवाहीत मुलगी श्रुतीका असा परिवार आहे.

वर्धा जिल्ह्यातील पुलगांव या आपल्या मुळगावाहून ८० च्या दशकात व्यवसाया निमित्त कल्याण पूर्वैत स्थानिक झाल्या नंतर बंडू पांडे यांचा ओम शांती प्रिन्टर्स या नावाने प्रिटींग प्रेस चा व्यवसाय मोठ्या जोमात चालला होता. गेल्या ६ ते ७ वर्षा नंतर त्यांनी उल्हासनगर कॅम्प नं . ३ मध्ये आपल्या व्यवसायात जम बसविला होता. या दरम्यान त्यांच्या वर अनेक संकटे आली. अशाही परिस्थितीत त्यांनी प्रत्येक संकटावर मात करून आपल्या व्यवसायात भरभराट निर्माण केली होती. परंतु गेली १७ ते १८ महिने कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे प्रिटींग प्रेसचा व्यवसाय पुर्ण पणे ठप्प झाला होता. अशातच उल्हास नगर कॅम्प नं. ३ मधील प्रेस च्या गाळ्याचे भाडेही वाढू लागल्याने त्यांनी गेल्या पंधरा दिवसां पासून प्रिन्टींग प्रेसचे साहित्य विकण्यास सुरुवात केली होती. या सर्व परिस्थितीमुळे नैराश्य आल्याने त्यांनी सोमवारच्या रात्री घरातील एका खोलीत जाऊन पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. या समयी त्यांची पत्नी आणि दोन मुली दुसऱ्या रुम मध्ये होत्या. फाशी घेण्यापूर्वी त्यांनी हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातून जिव जात नसल्याने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी नागरीकांकडून सांगितले जात आहे.

अत्यंत कष्टमय जिवन जगत असतांनाच त्यांनी आपल्या एका मुलीला डॉक्टर केले आहे. त्यांनी काही काळ एका पतसंस्थेत वसुली अधिकारी म्हणूनही पार्ट टाईम नोकरी केली होती. अखेर लॉकडाउने निर्माण केलेल्या आर्थिक संकटामुळे आलेल्या नैराश्येतून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पार्थिवावर विठ्ठलवाडी स्मशान भूमीत मोठ्या शोकाकूल वातावरणात त्यांच्या मुलींनी मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आला. या समयी समर्थ मित्र मंडळ, तिसाई नागरी सहकारी पतपेढीचे सर्व सदस्य, पदाधिकारी तसेच त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेखणी :- आनंद गायकवाड (पत्रकार)

लॉकडाऊनमुळे अनेक व्यापारी क्षेत्रातील लोक सध्या अडचणीत आणि तणावात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सतत लादल्या जाणाऱ्या निर्बंधांचा परिणाम अनेक व्यावसायिकांवर होताना दिसत आहे. यामुळे हसत्या खेळत्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर सुखाची चिन्हे दिसेनाशी होऊ लागली आहेत. कोरोना महामारीमुळे प्रशासनाची नामुष्की असल्याने लॉकडाउन रुपी संकट आ वासून उभे आहे. परंतु आत्महत्या हा यावर मार्ग नसून एका वादळाप्रमाणे सामना करा हे ही दिवस बदलतील. शेवटी जीवनच महत्त्वाचे आहे. संयम ठेवा आत्महत्या करू नका असे आवाहन आमच्या कडून केले जात आहे.

-संतोष दिवाडकर

फक्त एक चुकीचा निर्णय आणि कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; कल्याण पूर्वेतील दोघांना मलंगगडच्या ओढ्यात जलसमाधी

कल्याण पूर्व आमराई येथील राहणाऱ्या दोन तरुणांचा मलंगगड भागातील ओढ्याच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली होती. २४ तासानंतर दोन्ही तरुणांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात NDRF च्या जवानांना यश आले आहे. या घटनेनंतर दोन्ही कुटुंब आणि आमराई परिसरात शोककळा पसरली आहे. तर झाल्या घटनेनंतर मलंगगड विभागात देखील हळहळ व्यक्त केली जातेय. इशांत मोहोडकर आणि विनायक परब अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघेही १८-१९ च्या वयोगटातील होते.

अशी घडली दुर्दैवी घटना :- संपूर्ण जिल्ह्यात गेली चार पाच दिवस मुसळधार पाऊस सुरू होता. अनेक ठिकाणी पाणी साठले होते. नद्या,ओढे,नाले दुथडी भरून वाहत होते. पुलांवरून पाणी वाहत होते. निसर्गप्रलय सुरू असताना शहरी भागात राहणाऱ्या तीन तरुणांचा मलंगगड भागात वर्षा पर्यटनाला जाण्याचा मोह झाला. त्यांनी इतर मित्रांनाही संपर्क केला असेलच मात्र बाहेरील पावसाचा रुद्रावतार पाहता काहींना पर्यटनाला जाणे जमले नसेल. त्यामुळे इन मिन तिघेच मलंगगड भागात जाण्यास निघाले. दुपारी पावसाचा आस्वाद घेत तिघेही मलंगगड भागात आले. या भागातील चिंचवली भागात ते थांबले होते. आणि तितक्यात दोघांना पाण्यात उतरण्याचा मोह झाला. असं म्हणतात की आग आणि पाणी यांच्या नादाला कधीही लागू नये. प्रचंड पावसाने धो धो पाणी वाहत असतानाही ते दोघे पाण्यात उतरले. पावसा पाण्याचा त्या दोघांनाही अंदाज नव्हता. आणि प्रवाहा बरोबर ते दोघेही वाहून गेले. किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या त्यांच्या तिसऱ्या मित्राच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच्या डोळ्या देखत त्याचे दोन्ही मित्र निघून गेले होते. तेच शेवटचे क्षण आणि तीच शेवटची भेट. पोहता येत नसल्याने मी पाण्यात उतरलो नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

घटना घडल्यानंतर स्थानिकांना खबर देण्यात आली. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. त्याअगोदर स्थानिकांनी देखील दोघे कुठे दिसतात का हे पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र नजरेला पाण्याशिवाय काही पडत नव्हते. पोलिसांनी घाबरलेल्या तिसऱ्या तरुणास पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेले. पाण्याचा प्रवाह इतका भयावह होता की त्यात शोधकार्य करणे अवघडच.

२४ तासांनी मृतदेहांचा शोध :- स्थानिक रहिवासी पाण्यात उतरून शोध घेत होते मात्र काही तपास लागत नव्हता. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी NDRF च्या जवानांची शोधमोहीम सुरू झाली. दुपारच्या सुमारास इशांत मोहोडकरचा मृतदेह शोधण्यास जवानांना यश आले. घटनास्थळी हिललाईन पोलीस, स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायतीची लोक, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मा. नगरसेवक महेश गायकवाड, पत्रकार असे अनेक लोक जमले होते. दुसऱ्या तरुणाच्या मृतदेहाचा शोध अनेक तासानंतरही लागत नव्हता. यानंतर स्कुबा डायव्हर्सला पाचारण करण्यात आले. पाण्याच्या तळाशी जाऊन शोधमोहीम पुन्हा सुरू झाली. आणि तासाभरातच दुसरा मृतदेह पाण्या बाहेर आला. विनायक परबचा हा मृतदेह होता. आणि यानंतर जवानांच सकाळपासून सुरू असलेला शोधकार्य सायंकाळी थांबलं.

कसे होते हे दोघे तरुण ? :- इशांत मोहाडीकर हा १९ वर्षांचा होता. तर विनायक परबचा १८ वा वाढदिवस अवघ्या १२-१३ दिवसांवर आला होता. मात्र त्या अगोदरच काळाने घाला घातला. दोघां बद्दल सांगायचं झालं तर दोघेही लहानापासूनचे एकाच चाळीत राहणारे बालमित्र. ‘ओम धर्मवीर’ या चाळीत दोघेही एकमेकांशी खेळत वाढले होते. दोघेही सामान्य घरातील होते आणि शिवाय घरच्यांना एकुलते एक असे वंशाचे दिवे होते अशी माहिती प्राप्त झाली आहे. दोघांच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नाही. इशांतचे वडील वायरमन म्हणून कुटुंबाची उपजीविका करतात तर विनायकचे कुटुंबीय हातगाडी लावून छोटासा व्यवसाय करतात. ते पूर्वी राहत असलेली चाळ डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी गेल्याने मोहाडीकर कुटुंबीय प्रतापगड चाळीत तर परब कुटुंबीय विशाल नगरीत राहत असल्याची माहिती आहे. परब हे पूर्वापार पासूनचे शिवसैनिक आहेत.

आई वडिलांनी आता काय करावं ? :- आज हे दोघेही मित्र जगाचा निरोप घेऊन निघून गेलेत. मात्र त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. जन्मदाती आई आणि संगोपन करणाऱ्या पित्याने आपल्या पोटच्या लेकराला गमावले आहे. ज्याच्यासाठी जगायचं तोच निघून गेल्याने जीवनाचा आधार हरपला असल्याचे दुःख त्यांना आता झाले आहे. प्रत्येक आई वडिलांच्या आपल्या मुलांवर जीव असतो. त्याचबरोबर काही स्वप्न, इच्छा, आकांशा या देखील असतात. मात्र नियतीने सर्वावरच पाणी फेरल आहे.

तमाम तरुणांना हात जोडून नम्र विनंती :- आणि विनायक सारख्या तरुणांना आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही तारुण्यात ज्या चुका करता जे निर्णय घेता त्या आधी स्वतःच्या जीवाची नाही पण घरच्यांची तरी पर्वा करावी. अश्या ठिकाणी फिरायला जाणे, नको ते साहस करणे जीवावर बेतणारे आहे. तारुण्य हे मजा करायचं वय आहे असे समजून जगा पण त्याचबरोबर आपण काय करतोय ? त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचाही विचार करा. घरातील तरुण मुलं घराबाहेर पडतात आणि अश्या घटना घडतात की त्या माता पित्यांना पुढील आयुष्यात फक्त अंधार शिल्लक राहतो. तरुणांनो आपल्या आई वडिलांचा विचार करा असे साहस करणे टाळा. मजहजा एका विशिष्ट पद्धतीने स्वतःची व इतरांची काळजी घेऊन करा. आज इशांत आणि विनायकच्या कुटुंबियांच्या मनाची जी अवस्था आहे ती पाहून तरी सावध व्हा. अन्यथा क्षणभराची मजा आयुष्याला सजा बनू शकते हे वेगळं सांगायला नको. हुल्लडबाजी बंद करून आई वडिलांसाठी जगा असं विनंतीवजा आवाहन तमाम तरुणांना हात जोडून करीत आहे. तुम्हाला यावर काय वाटतं ? कमेंट मध्ये अभिप्राय कळवा.

-संतोष दिवाडकर

मावळ : वाघेश्वर शिवमंदिर परिसरातील धरणात बुडून युवकाचा मृत्यू

मावळ तालुक्यातील वाघेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर प्रसिद्धीच्या झोतात आल्या नंतर येथे पर्यटकांची सध्या मोठी रीघ लागली आहे. मात्र त्याचबरोबर या मंदिरात भेट देण्यासाठी आलेल्या एका युवकाचा परिसरातील धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वाघेश्वर येथे एक प्राचीन शिवमंदिर आहे. स्थानिक तरुणांनी समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल केल्याने आता बाहेरील लोक देखील मंदिराला भेट देण्यासाठी गर्दी करीत आहेत. यासंबंधीत लेख MH मराठीने मागील महिन्यात प्रसिद्ध केला होता. शनिवार,रविवार आणि सोमवार हे तीन दिवस या मंदिरात प्रचंड गर्दी होत असते. मुळातच हे मंदिर पवना धरण क्षेत्रात असल्याने वर्षातून निम्मा काळ हे मंदिर पाण्याखाली असते. आणि जवळच असलेल्या पवना धरणाच्या जलाशयात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहे.

रविवारी पुण्यातील खडकी येथील राहणारा शुभम दुधाळ हा २१ वर्षीय तरुण आपल्या सहा मित्रांसोबत या मंदिराला भेट देण्यासाठी आला होता. मंदिर पाहून त्याने दर्शन केले आणि या मित्रांनी आपल्या मोबाईलमध्ये काही फोटो देखील घेतले. मात्र मंदिरा जवळ असलेल्या पवना धरणाच्या विहंगम दृश्याने त्यांना मोहित केले. आणि येथूनच पाण्यात पोहण्याची इच्छा झाली. दुपारच्या सुमारास शुभम पाण्यात उतरला. मंदिरा जवळील धरण क्षेत्रात ओढ्यातून वाहून आलेला गाळ अधिक प्रमाणात असतो हे स्थानिकांना माहीत आहे. शिवाय येथील पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम पाण्यात बुडाला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंदिरा समोरून वाहणाऱ्या ओढ्याच्या पलीकडल्या बाजूस साधारणपणे एक किमी पासून दूरवर असलेल्या भागात ही घटना घडली असल्याची माहिती स्थानिक व्यापाऱ्याकडून देण्यात आली.

तरुण पाण्यात बुडाल्याची माहिती समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे पोलिसांना पाचारण करण्यात आले. स्थानिक तरुणांनी बोटीच्या सहाय्याने पाण्यात उतरून शोध घेत मृतदेह शोधून काढला. घटनेचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत. दर्शनासाठी आलेल्या एखाद्या युवकाचा बुडून मृत्यू होण्याची ही पहिली घटना आहे. मात्र असे असले तरी भविष्यात आणखी घटना घडतील याची शक्यता नाकारता येत नाही.

पर्यटनाला गेल्या नंतर निष्काळजीपणामुळे जीव गेल्याच्या अनेक घटना अनेक ठिकाणी घडत असतात. मग पाण्यात बुडुन मृत्यू असो की पाय घसरून खोल दरीत झालेला अपघात. या घटना वारंवार घडत असतात तरीही पर्यटक जीव धोक्यात घालणे काही कमी करीत नाहीत. वाघेश्वर शीव मंदिराला भेट दिल्यानंतर पवनेचा जलाशय जवळपासच असल्याने पाण्यात उतरण्याचा मोह जीवावर बेतू नये यासाठी पुढील वर्षी (मंदिर पाण्यातून बाहेर पडल्यानंतर) स्थानिकांच्या मदतीने ठोस उपाययोजना राबवणे प्रशासनाला जास्त गरजेचे असणार आहे हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

-संतोष दिवाडकर

नवी मुंबई विमानतळाला असेल शिवरायांचं नाव ; राज ठाकरेंनी मांडली भूमिका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अतिशय जबाबदारीने बोलणारे नेते म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. जितके आक्रमक आणि परखड ते आहेत तितकेच संयमी आणि अभ्यासु त्यांचे विचार आहेत असे मनसैनिक आवर्जून सांगत असतात. नवी मुंबई विमानतळाला नाव कुणाचे द्यायचे ? असा प्रश्न उभा असताना राज ठाकरेंनी मात्र तिसऱ्याच नावाचा गौप्यस्फोट केल्याने आता नामकरणाला नवीनच वळण प्राप्त झाले आहे.

नवी मुंबईला स्व.बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात येईल यावर शिवसेना पक्ष ठाम आहे. शिवसेना सत्तेत असल्याने राज्यसरकार देखील याच नावाचा विचार करतेय यात काही शंका नाही. याउलट भूमिपुत्रांनी देखील दि.बा.पाटील यांच्या नावासाठी मुंबई आणि उपनगरात आंदोलन सुरू केली आहेत. मनसेचे एकमेव आमदार हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. यातून मनसेचा पाठींबा असेल असे सर्वांना वाटले होते.

भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी दि.बा.पाटील नामकरणाला पाठिंबा द्यावा याबाबत राज ठाकरेंशी चर्चा केली. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी प्रत्यक्ष पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

“नवी मुंबई येथे होणारे विमानतळ हे सध्याच्या मुंबईतील विमानतळाचाच भाग आहे. फक्त हे विमानतळ उभं राहिल्या नंतर या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ केले जाईल आणि जुन्या विमानतळाला डॉमेस्टिक विमानतळ म्हणून ठेवले जाईल. त्यामुळे दोन्ही विमानतळ ही एकच असल्याने नाव देखील तेच राहील. बाळासाहेब किंवा पाटील अश्या कोणत्याही व्यक्तीमत्वाला विरोध नाही मात्र जे आहे तेच नाव केंद्राकडून ठेवले जाईल. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. या महाराष्ट्रात जेव्हा तुम्ही कुठूनही आल्यावर पाय ठेवता तेव्हा सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या भूमीत तुम्ही पाय ठेवता. त्यामुळे रस्त्यावरील संघर्ष नक्कीच थांबेल. आमदार राजू पाटील आणि प्रशांत ठाकूर यांना मी हा मुद्दा नीट समजावून सांगितला आहे. जर शिवरायांचं नाव विमानतळाला देत असतील तर मग हा विषय इथेच संपला असे ते यावर म्हणाले आहेत.”

– राज ठाकरे (मनसे अध्यक्ष)

वास्तवात विमानतळ बनण्यापूर्वीच त्या विमानतळाला काय नाव असेल यावरून जो संघर्ष सुरू झाला होता त्या संघर्षाला राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर वेगळंच वळण लाभलं आहे. शिवसेना विरुद्ध भूमिपुत्र दोन्ही वेगवेगळ्या नावासाठी आग्रही असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवरायांचे नाव सुचवले आहे.

राज ठाकरे हे एखादी भूमिका मांडत असताना वास्तविक भूमिका मांडतात. त्यांनी जर ठरवले असते तर ते दि.बा.पाटील यांच्या नावाला पाठिंबा देऊन आगरी कोळी समाजाला आपल्याकडे सहज खेचू शकले असते. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देखील जवळच आली आहे. पण राज ठाकरे मतांचे राजकारण कधीच करत नाही. असे काही मनसैनिक समाज माध्यमातून सांगत आहेत.

-संतोष दिवाडकर