आई वडील ‘ती’ आणि ‘तो’

प्रेम करणं म्हणजे गुन्हा आहे असा तुमच्या मनाचा समज असेल तर ही गोष्ट तुमच्यासाठी आहे.

साधारणपणे २० व्या शतकात म्हणजेच आजपासून ५० वर्षांपूर्वी प्रेम करणं म्हणजे घोर पाप असे मानले जायचे. आज पाहायला गेलात तर अतिशय साधारण बाब बनली आहे. पण त्यातही अजूनही प्रेम म्हणजे घोर पाप आहे असं समजले जाण्याची काहींची मानसिकता आहे.

आपल्या मुलीने बाहेर प्रेम प्रकरण न करता आपल्या जातीतील आणि परिचयातील अथवा समाजातील व्यक्तीशीच विवाह करावा असे या पालकांना वाटत असते. त्यामुळे अश्या पाल्यांच्या मुली देखील आपल्या आई वडिलांच्या मान सन्मानासाठी प्रेम करण्यापासून चार हात लांब राहतात आणि घरच्यांच्या संमतीने लग्न करतात. त्यांना असे वाटते की घरच्यांचं नाक न कापता त्यांची मान ताठ रहावी.

खैरेवाडीची ही एक लहान पण मोठी वैचारिक गोष्ट. दोन लहानपणीच्या मैत्रिणी कोमल आणि जुलिशा. एकत्रितपणे शाळा कॉलेज शिकून मोठे झाल्या. मात्र जेव्हा कॉलेजची पायरी चढले त्यावेळी दोघीही प्रेमाच्या विरहात बुडून गेल्या.

कोमलच्या आयुष्यात आदित्य तर जुलिशाच्या आयुष्यात आकाशने घर केले होते. तसे दोघींच्याही घरचे प्रेम विवाहाच्या विरोधात होते. पुढे काही वर्षे अशीच शिक्षणात जात जोती. आणि हळूहळू सर्वांचे शिक्षण पूर्ण होऊन चौघेही चांगले नोकरीला लागले होते.

कोमल आणि जुलीशाच्या घरी लग्नाची बोलणी सुरू होती. कोमलने आदित्य विषयी सर्व काही घरी सांगून दिले होते. अगोदर घरच्यांनी प्रचंड विरोध दाखवला. मात्र या नंतर आदित्य बाबत कोमलच्या घरच्यांनी सर्व माहिती घ्यायला सुरुवात केली. आदित्य एका चांगल्या घरातील, सुसंस्कारि व चांगल्या हुद्द्यावर नोकरी करणारा युवक असल्याने घरच्यांनी या लग्नाला मान्यता दिली आणि कोमल आदित्यच्या प्रेमाचे लग्नात रूपांतर झाले.

कोमलच्या प्रेम विवाहामुळे जुलिशाच्या घरचे नाक मुरडत होते. त्यामुळे जुलिशा आकाश बद्दल घरात बोलण्यास घाबरत होती. ती आकाशला वेगळे होण्यासाठी समजावत होती.

अशाच एका एकांताच्या ठिकाणी दोघे बोलण्यासाठी भेटतात

“जुली तू एक प्रयत्न तर कर यार. आदित्य कोमलने समजावले ना तुला. तू प्रयत्न कर. आपले प्रेम आहे एकमेकांवर” भिजल्या डोळ्यांनी आकाश तिला विनवणी करत होता.

“आकाश… माझ्या घरचे या सर्वाला विरोधात आहेत रे. त्यांना ही सगळी फालतूगिरी वाटते रे. हे शक्यच नाही” जुलिशाही रडून सांगत होती.

“अग पण वाईट काय आहे माझ्यात ? तुझ्या शिवाय कधी कुणाचा विचार तरी केला का मी ? घरच्यांचा आदर करतो, वडील धाऱ्यांचा मान राखतो, चांगला सुशिक्षित आणि नोकरीला पण आहे ? कुठे कमी पडतोय मी ?” आकाश तिचा हात हातात घेऊन विचारत होता.

“नाही तू कमी नाही रे कुठेच. पण प्रेम विवाह ही पद्धतच मुळात माझ्या घरच्यांना नकोय. त्यांची बेइज्जती होईल गावात. माफ कर पण मला माझ्या आई वडिलांचा विचार आहे. आणि मी आधीपासूनच म्हणत आले की लग्ना बाबत मी तुला कोणताही शब्द नाही देऊ शकत” जुलिशा आपल्या पद्धतीने त्याला समजवत होती.

“जुलिशा एक प्रयत्न कर ग. कोमलच्या घरी काय वेगळं होत? बघतेस ना सहा महिने झाले किती छान सुरुये” आकाश तिला जवळ घेऊन बोलू लागला.

“प्लिज आकाश… मी माझ्या घरच्यांना समजवेल एवढी डेरिंग नाय माझ्यात. तू प्लिज समजून घे आणि इथेच थांब” रुमालाने स्वतःचे डोळे पुसत जुलिशा म्हणाली.

“जुलिशा… तू एकदा हिंमत दाखव ग फक्त. नायतर मी भेटतो तुझ्या वडिलांना.” आकाश स्वतः तिच्या जवळ जाऊन बोलला.

“आकाश तू असे काही करणार नाहीस. माझी शपथ आहे तुला” जुलीशाने त्याचा हात डोक्यावर ठेवला.

“जुलिशा… तू हे चुकीचं केलंस. ठीक आहे प्रेमा खातर मी तुझी शपथ मोडणार नाही. पण एक लक्षात ठेव. या जीवनात तू नाही तर कोणी नाही. आजन्म एकटाच राहील” असे म्हणत आकाश तिथून निघणार तोच जुलिशाचा भाऊ जयवंत समोर आला. त्याला पाहताच आकाश घाबरला. मात्र जयवंत जागेवर उभा असल्याने आकाश त्याच्या बाजूने निघून गेला. आकाश निघून जाताच जुलिशा पुरती घाबरली.

“दादा…. ते…. तो… माझा कॉलेजचा मित्र… आम्ही ते बोलायला भेटलो इथे… एक डिस्कशन…” पैलवान असलेल्या धिप्पाड भावा समोर उभा राहून जुलिशाची पाचावर धारण बसत नव्हती. तिला काय बोलावे सुचेना. ती रुमालाने डोळे आणि चेहरा पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागली. जयवंतने तसेच तिच्या हाताला धरून जीपमध्ये बसवले आणि घरा कडची वाट धरली.

गाडी रस्त्यातून पुढे आली आणि गावात घुसण्या ऐवजी त्याने सरळ नेली.

“दादा… आपण कुठे जातोय?” दबक्या आवाजात जुलिशाने प्रश्न केला.

मात्र जयवंत काही बोलला नाही. गाडी आकाशच्या गावाच्या दिशेने निघालेली पाहून जुलिशा घाबरली.

“दादा अरे तू मला सांग ना काय करतोयस ? प्लिज चल घरी दादा” जुलिशा रडू लागली.

जयवंत तिच्याकडे न पाहता काहीही न बोलता शांतपणे जीप चालवत होता. पाहता पाहता आकाशचे गाव आले आणि जीप त्याचे गाव सोडूनही पूढे निघाली. आधी आकाशला मारहाण होईल असे वाटत असताना दादा आता गाडी कुठे घेऊन चाललाय हे तिला कळेना.

काही वेळा नंतर एका गावातील वाडीत जयवंतने गाडी नेली आणि एका घरा समोर उभी केली. जयवंत गाडीतून उतरला तसे जुलिशाही त्याच्या मागे गेली.

“हे कुणाचं घर आहे दादा ? मला इथे का आणलं आहेस ?” जुलिशा विचारू लागली.

जयवंतने तिचा हात धरला आणि तिला घरात नेले. घरातील हॉल मध्ये एक फोटो लावला होता. त्यासमोर दोघेही उभे राहिले.

“दादा काय तरी बोल… कोण आहे ही ? मला का आणलेस इथे” जुलिशा फोटो कडे पाहून गोंधळून बोलली.

“वैष्णवी….” जयवंतच्या तोंडून पहिल्यांदा शब्द फुटले.

“वैष्णवी ??? कोण आहे ही ? मला काय कळेना दादा.” जुलिशाला काही सुचेना.

“माझी पोरगी आहे ती. माझी एकुलती एक लेक” पाठीमागून आलेल्या एका व्यक्तीने उत्तर दिले.

तसे जुलिशा मागे वळली. जयवंतची नजर मात्र फोटोवरून हटत नव्हती.

“मी गणपत ढोले पाटील… या गावचा पोलीस पाटील. एके काळचा राजा माणूस. आज पण पैशाने रुबाबाने राजाच आहे. पण पैसा असून हा राजा शेवटी भिकारीच आहे” असे म्हणून ती व्यक्ती ओसरीवर बसली. अंगात जॅकेट, खाली धोतर, डोक्यावर ऐटदार टोपी आणि चष्मा घालून तो व्यक्ती बसला होता.

“जुलिशा तुला काय वाटलं ? आकाश आणि तुझं प्रेम प्रकरण मला माहित नाही ? सगळं माहीत होतं मला. आज मुद्दाम तुमच्यातील बोलणं ऐकायला मी तिथे आलो होतो. पण तुमचं बोलणं ऐकून मला काय करावं कळेना. म्हणून तुला तुझ्या हातून नेमकं काय पाप घडतंय हे दाखवून द्यायला इथे आणलं” जयवंत बोलू लागला.

“दादा सॉरी पण आता मी तुम्ही सांगाल त्याच्याशी लग्न करणार आहे. मी आकाशला लग्नाचं वचन पण दिल नाही. आणि आमच्यात असं काही चुकीचं पण घडलं नाही कधी” जुलिशा बोलू लागली.

“जुलिशा तुला माहिती का हा फोटो कुणाचा आहे ते ?” जयवंतने पुन्हा तिचे लक्ष फोटोकडे वेधले.

“हा… या काकांची मुलगी आहे ना ती ? वारली ना” जुलिशा कुतूहलने बोलली.

“त्यांची मुलगी आहेच पण ही कदाचित तुझी वहिनी असती.” जयवंतच्या डोक्यात पाणी आले.

“काय दादा ??? तुझं हिच्या सोबत ?” जुलिशाला आश्चर्याचा धक्का बसला.

“होय… मघाशी तिथे आकाश बोलत होता… पण मला असं वाटत होतं की हा मीच आहे काय ? जो प्रेम मिळवण्यासाठी स्वतःचा जीव मारतोय. तो बाजूने गेला आणि मी बघतच राहिलो.” जयवंत ओसरीवर चालून बोलू लागला.

” पण दादा मग लग्न का नाही झालं?” जुलिशा विचारू लागली.

“माझ्यामुळे नाही झालं लग्न…” पाठीमागे बसलेल्या गणपत पाटलांनी बसल्या बसल्या खाली मान घालून उत्तर दिलं.

“म्हणजे काय काका ?” जुलिशा त्यांच्याकडे पाहून विचारू लागली.

“गावचा पाटील ना मी ? पाटलाला काळजी त्याच्या फेट्याची. माझा लेकीन मला कधी ही भानगड नाय कळू दिली. पण तुझा भाऊ जयवंतने एकदा स्वतः इथं येऊन माझ्या लेकीचा हात मागितला. गर्वाने माजलेला मी तुझ्या भावाला लाथा बुक्क्यांनी मारून घराबाहेर काढला. आणि त्याच लगीन सराईत लेकीच हात पिवळे करून लांबच्या गावी पाठवली. काय माज होता या पाटलाला. मिश्या ताणून गावात हिंडायचं म्हणजे जणू काय गावचा राजाच. पण एकुलत्या एका माझ्या लेकीच सुख नाय ओळखू शकलो. तिच्या काळजावर घाव करून तिला आमच्याच समाजातल्या एका तालेवार घरात दिली.” असे म्हणून गणपत पाटलांचे डोळे पाणावले.

“मग… पुढे काय झालं काका ?” जुलिशाने खाली बसून गणपत पाटलांच्या खांद्यावर हात ठेवून प्रश्न केला.

“जातीनी माझ्या पोरीची माती केली” असे म्हणत गणपतराव ढसा ढसा रडू लागले.

“काका… शांत व्हा… नक्की काय झालं ताई सोबत…” जुलिशा विचारू लागली.

“गळा दाबून मारून टाकलं तिच्या इज्जतदार नवऱ्याने.” जयवंतने पाठीमागून उत्तर दिले.

“दादा…… पण का ???” हे ऐकून जुलीशाला धक्का बसला.

“त्याला काय विचारते पोरी… या कमनशिबी बापाला विचार…” असे म्हणत ते आपले डोळे हाताने पुसू लागले.

“काका मला प्लिज नीट सांगा. मला काय कळेना. आधीच दादा इथे का घेऊन आला तेच समजेना” जुलिशा गोंधळून गेली.

“तिचा प्रेम विवाहाला विरोध करून जातीत लग्न लावून दिल. पण त्या सैतानानी माझ्या पोरीचं हाल हाल केलं. बापाची इज्जत राखावी म्हणून पोरगी एका शब्दाने बापाला काय बोलली नाही. वर्षभर संसार झाला आणि एका रात्रीत भाडखाऊ पक्का दारू पिऊन माझ्या लेकीला घाणघाण श्या देऊ लागला आई बापावरून. तिला काय ते ऐकवना. ती ओरडली त्याच्यव. त्या सैतानाने त्या दारूच्या नशेत कोयता फिरवला माझ्या बाळाच्या मानगुटीवरून…” गणपतराव ढसा ढसा रडू लागले.

“तळ हाताच्या फोडा सारखी जपली ग तिला. पण तीच सुख नाय ओळखु शकलो ग नाय ओळखू शकलो. असलं प्रेमाच लग्न लावावं तर गावात नाक कापलं जाईल वाटायचं. काय म्हणतील गावातली लोक ? असं वाटायचं. पण आज गणपत पाटील जेवलाय की मरून पडलाय घरात एक भाडखावं डोकवना गावातला माझ्याकडे. आणि यांचा विचार केला मी माझ्या पोरीसाठी” आपले दोन्ही हात फोटोकडे जोडून रडू लागले.

“आबा शांत व्हा… जे झालं ते झालं. आता ते बदलता येणार नाही. पण आपण दुसऱ्यांना पण बदलू शकतो ना.” असे म्हणत जयवंत ने गणपत पाटलांना सावरले.

“दादा तुला आता नेमकं काय म्हणायचं आहे?” जुलिशा त्याच्याकडे पाहत म्हणाली.

“सांगतो तुला… चल घरी..” असे म्हणत जयवंत जुलिशाला घेऊन घराकडे निघतो.

जयवंत जुलिशाच्या प्रेम प्रकरणा बद्दल घरात सर्व काही सांगून टाकतो. हे सर्व सांगितल्या नंतर त्याने त्याच्या प्रेम प्रकरणा बद्दल जे काही घडले ते ही त्याच्या घरात सांगितले. घरच्यांनी या गोष्टीवर खूप विचार केला आणि त्यांनी आकाशची माहितीही काढली. आकाश आपल्या व्यक्तीमत्वात कुठेच कमी पडत नव्हता. शिक्षण, नोकरी, घरदार या सर्वात त्याने स्वतःला घडवले असल्याने त्याला नाकारण्यासाठी प्रेम विवाह हेच एक कारण बनले होते. शेवटी सर्व बाजूने विचार केल्या नंतर कोमल आदित्य पाठोपाठ आकाश आणि जुलिशाचे प्रेम देखील विवाहात रुपांतरीत झाले.

आज शहरातील गाव खेड्यातील कित्येक पालक प्रेम विवाहाला अनेक कारण देऊन नाकारतात. कुणाची जात आडवी येते, कुणाची आर्थिक परिस्थिती तर इतर मतभेद. यामुळे जातीचा नादात कितीतरी मुलींचा आयुष्याची माती झाल्याचे नेहमी दबक्या कानांनी ऐकायाला मिळते. पण याचा अर्थ असा नाही की प्रेम विवाहच काय तो चांगला. बऱ्याचदा इथेही काही गोष्टी बदलतात. काही प्रेमविवाह देखील फसतात. त्यामुळे थेट परवानगी अथवा विरोध न करता काय योग्य आणि अयोग्य याची पारख करा आणि मगच आपल्या मुलीला योग्य घरात द्या. एक गोष्ट लक्षात घ्या. चार लोक काय म्हणतील हा विचार करू नका. ही चार लोक कधीच आपली नसतात. ना सुखात ना दुःखात. त्यामुळे आपल्या पुरता विचार करा, आपल्या लेकरांचा अगोदर विचार करा. लोकांना त्यांचा विचार करू देत. शेवटी चांगले केले तर जळणार आणि वाईट केले तर हसणार. ही चार लोक आहेच तशी.

समाप्त !!!

लेखन :- संतोष दिवाडकर

‘आजी’ एक वटवृक्ष अर्थात आधारवडाची सावली

आई …. दोनच शब्दात साऱ्या ब्रम्हांडाची ताकद सामावली आहे. देवाधिकातही आईला प्रथम स्थान आहे. जिच्यामुळे पाहिले हे सुंदर जग ती आई म्हणजे आपल्यासाठी पहिली देवी. आणि बाप हा देव. फक्त एका दिवसा पुरता गोड गोड बोलणे नव्हे तर आयुष्यभर तिच्या उपकाराची जाण ठेवणं म्हणजे जन्माचे सार्थक.

आजच्या या मातृ दिना निमित्त एक गोष्ट मी तुमच्याशी शेअर करतोय. जी नुकत्याच तीन महिन्यांपूर्वी घडली होती. ते सर्व प्रसंग आज मला सर्वांना सांगायचे आहेत ज्यांना ते माहीत नाहीत. ही गोष्ट माझ्या आईच्या आईची म्हणजेच माझ्या आजीची आहे.

आजी आणि आजोबांचे तरुण पणातील छायाचित्र

दिवाडकरांची लेक गोसाव्याची सून झाली आणि पोमगावच्या मारुती गोसावी यांच्याशी तिचा ७० च्या दशकात विवाह झाला. पहिली मुलगी म्हणजे माझी आई, त्या नंतर माझे मामा आणि मग माझ्या तीन मावश्या. अश्या चार बहिणी आणि एक भाऊ असे पाच मुलांचे संगोपन मोठ्या हलाखीत झाले. इतकेच नाहीतर विठ्ठल आणि लक्ष्मण गोसावी हे लहान दिर देखील पाठच्या भावा प्रमाणे होते. सासू आणि सासर्याचे हित पाहून तिने संसार नेटाचा केला.

आजीची सासू बबा बाई आणि माझी लहान मावशी

आजकाल सर्व सुखसोया आहेत. पण २० व्या शतकात खेडेगावात काय होत हो ? साधा रस्ता देखील शहराला जोडला नव्हता. जे काय दळणवळण असायचे ते धरणातून व्हायचे. मुळशी धरणातील लाँचेने गावखेडी जोडली गेली होती. पैसा तर बघण्यातच नसायचा. अश्या हलाखीच्या परिस्थितीत तिने सर्व मुलांना मोठे केले. आणि पुढे ज्याची त्याची लग्न होऊन संसार सुरू झाले.

आजी आजोबा सोबत आजोबांचे लहान भाऊ व भाऊजय

साधारणपणे २१ व्या शतकात परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. कुटुंब वाढली होती. सुखसोयी गावात पोहोचल्या होत्या. जुन्या लोकांना जुने दिवस आठवत होते. पण नव्या पिढीला मोबाईलच्या नेटवर्क पुढे जुन्या दिवसातील त्रास कळणारा नव्हता. माझ्या आजीने लहानपणा पासून लेक, लेकी, नातवंड असं सर्वांना जीव लावला. त्यामुळे तिची माया कुणी विसरणार नाही. आता मी त्या प्रसंगावर येतो जो मला सांगायचा आहे.

फेब्रुवारी महिन्यात माझ्या बहिणीचे लग्न होते. नातीचे लग्न म्हणून माझी आजी शिळीमला आमच्या गावी आली होती. तसं सुरुवातीला तिला सर्दी होती. पण जस जसे लग्नाचे काही दिवस जवळ आले तिच्या सर्दीचे रूपांतर कफ मध्ये झाले. तिच्या छातीत हळूहळू कफ वाढू लागला होता. लग्नाच्या दोन दिवस आधी तिला आम्ही जवणला असलेल्या डॉक्टर कडे नेले होते. त्या डॉक्टरने वाफ दिली आजी औषध गोळ्या देऊन नॉर्मल असल्याचे सांगितले. यानंतर आजीला दोन दिवस काहीसे बरे वाटत होते.

लगीन घर असल्याने जो तो आपल्या घाईत आणि तंद्रीत होता. कार्यक्रम, विशेष रसम, बांगड्या, मेहंदी, सामानाची आवरा आवर, अक्षता, मंडप, लायटिंग, साऊंड, गाणी, उटणे, असे सर्व रसम असल्याने फारसे लक्ष आजीकडे जात नव्हते. मुळात ही वेळ अशी असते की कोणता पाहुणा कुठे असतो हे देखील कुणाला माहीत नसते. आणि इतक्या गडबडीत मात्र आजीचा दम वाढू लागला. तसे दिसताना ती नॉर्मल वाटत होती. कारण जेवतेय, बसतेय असं सर्व दिसत होतं.

लग्नाच्या दिवशी आजी लग्नालाही आली. लग्न पाहीले आणि रात्री घरी आलो. आणि त्या रात्री तिला खूप जास्त त्रास झाला. त्या रात्री ती शिंदू मावशीच्या घरी झोपली होती. रात्रभर तिला श्वास घेता येत नव्हता. मात्र कोणालाही कल्पना नव्हती की त्रास बळावला आहे. सकाळी तिने अंघोळ केली. थोडावेळ बसली आणि ती खाटेवर जाऊन झोपली. तिला प्रचंड दम लागला होता. कोणीतरी मला दवाखान्यात न्यावं असं तिला वाटत होतं. पण तिला जास्त बोलता येत नव्हते. मी, विकास, गणेश उशिरा उठलो होतो. आम्ही नाश्ता केला, पीक आप गाडी घेऊन मंडप वाल्याचे सामान पोहोचवले. दुपारचे जेवणही केले.

दुपारी कुंदा काकूने आजीची तब्येत पाहिली तेव्हा तिला जास्त त्रास होत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर तिला पुन्हा एकदा डॉक्टर कडे न्यावे लागेल असे वाटले. विकासने पिक अप काढली आणि आजीला पवना नगरला नेले. सोबत काकू आणि गणेश होता.

पवना नगरला डॉक्टरानी तपासल्यानंतर छातीत खूप कफ झाला असून न्यूमोनिया झाला असल्याचे सांगितले. शिवाय एडमीट करून ऑक्सिजन लावावे लागेल असे सांगितले. यानंतर तिला घेऊन गेलेल्यांना तिची तब्येत खालावली असल्याचे समजून आले. यानंतर घरी फोन आला. घरी फोन आल्यानंतर वातावरण देखील बदलले. मी पटकन फोन करून माझ्या मित्राची गाडी बोलवली. पप्पा, रंगनाथ काका, आणि सुरेखा असे तिघे जण त्या गाडीतून कामशेतला निघाले.

कामशेत मधील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात आजीवर उपचार सुरू झाले. आता घरात माझी आई, सुरेखा मावशी दोघेही चिंता करीत होते. बाळू मामा आणि बापू दोघेही बाईक घेऊन पोमगावला डॉक्युमेंट आणायला गेले होते. लोणावळ्याहुन उमेश मामा, रमेश मामा देखील कामशेतला आले होते.

घरी फक्त मी, आई, मावशी, राणी आणि अण्णा एवढेच होतो. त्यात अण्णा खूप जास्त पिले असल्याने त्यांनाही आम्हाला सांभाळावे लागत होते. गावात पाणी नसल्याने लग्नासाठी मागवलेला निम्मा टँकर खाली करून घरात रिकामे झालेले पाण्याचे ड्रम भरायचे होते. अंधार पडायच्या आत आम्ही सर्व पाणी भरले.

रात्री आठ वाजता मामा आणि बापू आले. यावेळी उमेश मामा चा बाळू मामा शी फोनवरून बोलणे झाले. तब्येत जास्त असल्याचे बाळू मामला समजले आणि मामा एकटेच वरहंड्यात बसून राहिले. खात्री साठी मी पप्पांना फोन केला. तर त्यांनी तब्येत ठीक आहे रिपोर्ट आले की आम्ही निघू असे सांगितले. मग गणेश सोबत बोललो. आणि मग उमेश मामाला विचारले. तोवर मामा आणि मावशी आई घरी नुसते अधून मधून रडत होते. खूप भावुक आणि नाजूक असं वातावरण होत. त्यात हे सर्व बीपीचे पेशंट असल्याने मला विशेष काळजी घ्यावी लागत होती. कारण मामा म्हणाले की तिचं काही खरं नाही. आणि तिथून मग तिघेही रडायला लागले.

उमेश मामा ला फोन लावल्या नंतर परिस्थिती समजली. आणि मी फोन स्पीकरला टाकला. तेव्हा आजी ठीक असल्याचे समजले आणि तिघेही शांत झाले. रात्री दहा वाजता हॉस्पिटलमध्ये गेलेली सर्व माणसे घरी आली. आम्ही सर्वांनी जेवण केले. आजीने आम्हाला माझ्या बहिणीच्या जागरण गोंधळाला जायला सांगितले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व तिकडे होतो.

तिसऱ्या दिवशी आम्ही सर्व आजीला पाहायला कामशेतला आलो होतो. हॉस्पिटलमध्ये मी आणि बापू आजीला भेटायला गेलो आणि ती पाहून रडायला लागली. तिला नीट बोलताही येत नव्हते. मी फक्त काळजी घे असं बोललो आणि तिथून निघून आलो. कारण डॉक्टर फार वेळ थांबू देत नाहीत. मात्र हॉस्पिटलमधून निघताना माझी आई, मावशी, मी आम्ही पुन्हा तिला भेटलो. कोणास ठाऊक ही भेट शेवटची ठरावी. कारण तिची किडनी निकामी होत असल्याचे डॉक्टर सांगत होते. कफ पूर्ण छातीत पसरला होता. मात्र आता काहीसा कमी झाल्याचे जाणवत होते.

आजीची सून माया मामी तिची विशेष काळजी घेत होती. मात्र हॉस्पिटलचे बिल जवळपास लाखभर रुपयांवर आले होते. हे हॉस्पिटल परवडणारे नसल्याने इथून दुसरीकडे शिफ्ट करण्याचे प्लॅनिंग सुरू होते. धोका मोठा होता. मात्र पाण्या सारखा पैसा हॉस्पिटल ओरबाडत होते.

चौथ्या दिवशी मी माझ्या बायकोला घेऊन सासरी आलो. कारण तिची तपासणी होती. त्याच दिवशी आजीला दुपार नंतर पुण्यातील सिम्बॉयसिस या मोठ्या मात्र नामांकित हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले. हॉस्पिटल बदलल्यानंतर तिच्या तब्येतीत आणखीन बिघाड झाल्याचे समजले. ती रात्र गेल्यानंतर तिच्या जगण्याची शक्यता धूसर झाली. आम्ही देखील दुसऱ्याच दिवशी बायकोचे चेकअप करून घ्यायचे ठरवले.

पाचव्या दिवशी सकाळीच आम्ही हडपसर कडे निघालो. उमेश मामा सोबत बोलणेही झाले. डॉक्टरानी जगण्याची शक्यता नसल्याचे सांगितले असून आता आजीला गावी नेण्याचे विचार असल्याचे सांगितले. गावी नेणार म्हणजे खेळ संपलेला आहे असाच थोडक्यात त्याचा अर्थ होता. बायकोचे चेकअप झाल्यानंतर आम्ही धनकवडी येथे नातेवाईकांकडे गौरी ताई कृष्णा कुरावले यांच्या घरी मुक्काम केला.

याच रात्री शिळीम मध्ये मोठा हाहाकार माजला होता. सर्व काही संपलं असे समजून माझी आई, काकू, मावशी सर्वजण रडायला लागले. दुसऱ्या दिवशी गाडी करून पोमगावला जायचे असे त्यांचे ठरले. आणि कसेबसे झोपले. रात्रभर कुणाच्या डोळ्याला डोळा नव्हता.

सातव्या दिवसाची सकाळ उजडताच सर्वांनी आवराआवर सुरू केली. आणि तितक्यात एक फोन कॉल पप्पांचा झाला.

“हा बोल उमेश. निघाले का तुम्ही तिकडून ?” पप्पांनी हलक्या आवाजात विचारले.

तोवर घरात आई आणि काकू कोमेजल्या चेहऱ्याने आवराआवर करीत होते. आणि इकडे घराबाहेर फोन सुरू होता.

“दाजी… अहो तुम्ही काय गडबड करू नका निघायची. आईची तब्येत आता वैशि बरिये.” उमेश मामा म्हणाले.

असे ऐकताच पप्पांना आश्चर्याचा धक्का बसला.

“डॉक्टर आलथे आता तपासायला ते म्हणाले पेशंटच्या तब्येतीत सुधारणा जाणवतेय. तुम्ही काही घाई करू नका अजून राहुद्यात इकडे” असे मामांनी सांगितले.

“अच्छा अच्छा वा… देवाला काळजी बाकी. बरं झालं. आता अक्का आणि आम्ही सगळे निघणार होतो थोड्या वेळानी नवनाथची गाडी करून” पप्पा म्हणाले.

हा फोन कॉल संपताच पप्पा ही बातमी सांगायला आतमध्ये आले.

“उमेशचा फोन होता. तो म्हणाला तुम्ही काय तिकडं येऊ नका. मामी आहेत ठीक” पप्पांनी आई आणि काकुला सांगितले.

हे ऐकताच त्यांना कानावर विश्वास बसेना झाला. कोमेजलेले चेहरे पुन्हा एकदा खुलले. आणि सर्वांनी देवाचे आभार मानले. सकाळी ९ वाजता मी देखील असाच कॉल उमेश मामाला केला. त्यांनी देखील मला असेच सांगितले. मलाही छान वाटले. हा एक दैवी चमत्कार होता असे आम्हाला सर्वांना आजही वाटते. मग पोमगावला न जाता आम्ही सरळ पुन्हा राजगुरूनगरला आलो.

दुसऱ्या म्हणजेच आठव्या दिवशी आजीची तब्येत आणखी सुधारली आणि तिला आयसीयू मधून जनरल वॉर्डात शिफ्ट केले. याचा अर्थ हा की धोका आता टळलेला होता. मी, बायको आणि माझे सासू, सासरे, मेव्हणा आम्ही तिला पहायला हॉस्पिटलमध्ये आलो. तिला भेटलो, बोललो, एकदम छान वाटलं. आणि दुसऱ्या दिवशीच आम्ही कल्याणला आलो.

पुढे काही दिवस आजी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत राहिली. सर्वांनी तिची खूप काळजी घेतली. सासू सुनेचे भांडण म्हणजे काही नवीन नाही. मात्र तरीही सून म्हणून माझ्या मामीने तिचे कर्तव्य बजावले. मामी दिवस रात्र तिच्या सोबत हॉस्पिटलमध्ये होती व अजूनही सेवा करीत आहे. अनेकांनी खूप धावपळ आणि मेहनत घेतली. आणि शेवटी काही दिवसानंतर आजीला डिस्चार्ज देण्यात आला.

आजी घरी तर आली पण आता नवा प्रश्न निर्माण झाला होता. ते म्हणजे तिला संडास येत नसल्याने तिचे पोट फुगत होते. शिवाय उलटी होत असल्याने पोटात अन्नही जात नव्हते. थोडाफार फळांचा रस, काहीतरी खाणे आणि पाणी यावरच ती जगत होती. तेव्हाही सर्व जण तिला बघून जात होते. आता काही दिवसांपूर्वी राणीने व्हिडिओ कॉल केला होता. ज्यात जवळपास तीन महिन्यांनंतर आजी आपल्या मूळ रुपात नऊ वारी साडीत आम्हाला दिसली होती. पूर्वी प्रमाणेच ती चालत आणि बसत होती. शिवाय जेवणही हळूहळू सुरू केले होते. म्हणजेच थोडक्यात आता ती पहिल्या सारखी होत आहे. देव करो आणि ती आधी सारखीच धड धाकट होवो.

स्वर्ग रिटर्न आहेस तू… असे अनेक जन तिला म्हणतात. कारण सर्व संपलेले असतानाही ती त्यातूनही सावरून बाहेर आली. तिची जगण्याची प्रचंड इच्छा, तिच्यासाठी प्रार्थना करणारे असंख्य हात, आजारपणातही देवाचा धावा करणारे तिचे मन, जागेवर पडूनही दुसऱ्यांच्या काळजीने खालीवर होणारा तिचा जीव. खरंच देवाच्याही मनात काहीतरी आलं असावं म्हणून देवाने तिला पुनर्जन्म दिला असावा असं आम्हाला वाटत. सारं काही संपलेलं असताना सारं काही सुरू राहतं यामागे कोणती मोठी दैवी शक्ती आहे ? हे आपल्या सारख्या सामान्य माणसाला कळणारे नाही.

आजच्या मातृ दिनाच्या निमित्ताने आज हा ताजा असलेला प्रसंग तुम्हाला मी आज सांगितला. कारण ती आईच असते जिच्या मायेच्या पंखात आम्ही विसावलेलो असतो. एकच सांगेल की जमत असेल तर शक्य तितकी काळजी घ्या, आणि जमत नसेल तर त्रास होणार नाही असे वागू नका. कारण स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी…

संतोष दिवाडकर

गावखेड्यांचा कायापालट; अर्थात हरवत चाललेलं गावपन, भाग दुसरा

आजपासून दोन दशकांपूर्वी म्हणजे २० वर्षांपूर्वीचं माझं गाव आणि आताचं माझं गाव. यात खूप मोठा फरक पडला आहे. म्हणूनच काही जुन्या आठवणींवर उजाळा टाकण्यासाठी त्याचबरोबर आजच्या पिढीला जरा पाठीमागचा आरसा दाखवण्यासाठी म्हणून मी ही नवीन लेख मालिका सुरू केली आहे. तसे फारसे अवघड शब्द न वापरता सोप्या शब्दात परंतु वाचकाला त्या काळात घेऊन जाणे हेच प्रथम उद्दिष्ट. मुळात वाचकाला त्या काळात नेण्या आधी लेखकाला त्या काळात जावे लागते. मागील लेखाला मिळालेला प्रतिसाद पाहता पुढील भाग आणखीन सुंदर बनतील असा आशावाद मला नक्की आहे. परंतु ज्यांनी मागील पहिला भाग वाचला नसेल त्यांनी लिंकवर क्लिक करून आधी तो वाचावा. लिंक https://mhmarathi.in/shilim-village-the-lost-of-rurality/

पूर्वी जी गावाकडची ओढ असायची ती आता कमी होऊ लागली आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे गावाचे हरवत चाललेलं गावपन. गाव आणि शहर यातील फरक हा तोच व्यक्ती सांगू शकतो ज्याने शहरी आणि ग्रामीण जीवनपद्धती लहान पणापासून जगलेली आहे. गावातील पिढीला आपला गाव बदलला आहे एवढेच फक्त जाणवू शकते. या कथा मालिकेतून आपला गाव आणि शहर या दोघांमध्ये काय फरक होता याचेही दर्शन घडणार आहे. तर आता मागील भागापासून पुढे जाऊयात.

शहरातून गावाला पोहोचल्यानंतर अंगणात पोहोचे पर्यंत जवळपास दुपारचे दोन वाजलेले असे. डोक्यावर रनरनत ऊन जरी असलं. तरी फारसे उकडत नसे. शिवाय कोणत्याही दिशेने येणारा सोसाट्याचा वारा हवा घालण्याचे काम करीत होता. वाऱ्यामुळे झाडांची पाने खळखळून आवाज करीत होते. जसे की स्वागताला टाळ्या. उंच उंच फांद्या वाऱ्यावर डोलत होत्या. आणि मध्येच काही चाफ्याची फुल पुष्पवृष्टी करीत होती.

काल्पनिक प्रतिमा

अंगणाच्या पुढे एका बाजूला भला मोठा खड्डा. त्याला म्हणतात उकिरडा. उकिरड्यात काय ? तर घरातील केर कचरा, जेवणातील खरकटे आणि जनावरांचे शेण. सहज सांगायचं तर डंपिंग ग्राउंड. परंतु कसलाही दुर्गंध न सोडणारं.

आणि त्याच्याच जवळपास एका मांडवा खाली उभी असलेली पाखर्या पपट्याची बैल जोडी. दावणीला बांधून असलेली ही काळी कुट्ट बैल आलेल्या पाव्हण्यांकडे बघत राही. आकर्षण असे की त्यांच्या वेसणीला धरून मी त्यांना गोंजारत असे. तसा पाखऱ्या माझा लाडका बैल. कारण तो शांत आणि समजदार होता. आणि पपट्या जवळ गेला तरी फुसकरायचा. लहानपणी चुकून मी माझा हात दावणी समोरील आडव्या खांबावर ठेवला तर त्याने माझं बोटावर शिंग आदळलं होतं. म्हणून पपट्याचा राग यायचा. पण एक सांगू का तो जो गंध यायचा ना बैलांचा आणि शेणाचा त्याच्या पुढे आजचे रूम फ्रेशनरही फिक्केच. एक वेगळाच गंध होता तो. त्यात कुठेतरी आपलेपणा होता.

पाखऱ्या पपट्या

गावात तेव्हा सगळ्यात जास्त चिवचिवाट कोंबड्या आणि त्यांची पिल्ले करायची. ज्याच्या त्याच्या घरात १०-१५ कोंबड्या असायचा. दिवसा मोकळ्या सोडल्या जात असल्याने अंगणात किंवा उकिरड्यात पायाने माती हुसकून दाणे टिपायचा. कधी कधी बैलाच्या समोर टाकलेल्या पेंढ्यातही उस्तरायला जात होत्या. प्रत्येक कोंबडीच्या मागे तिची आठ नऊ पिल्ले. आणि त्या पिल्लां मागे धावणारा मी. कोंबड्या असो किंवा अजून कुठला प्राणी. मला लहानपणापासून त्यांच्या सोबत खेळायचा नाद बनला आहे.

बराच वेळ अंगणातच थांबल्याने घरातून आजी बाहेर यायची.
“बये आला बाई माझा बच्चा, ये बाळा उन्हात नको खेळू घरात ये. जेवून घे ये” अशी आजीची हाक.
शेणाने सारवलेले मातीचे अंगण आणि डोक्यावर गवताच्या झावळीचा मांडव खूप छान सावली देत होता. लाकडाच्या मेढ्या (खांब) जमिनीत रोवून त्यावर मेसकाट (बांबू) बांधून त्याच्यावर पत्र्यां ऐवजी गवताच्या झावळी पसरल्या जायचा. हे मांडव पावसाळा संपला की बनवले जायचे. आणि तीच खरी थंडगार सावली.

काल्पनिक

घरात जाण्यापूर्वी पहिली पायरी म्हणजे एक भला मोठा दगड. हीच घराची पहिली पायरी. त्या चौकोनी दगडावर पाय देऊन लाकडी दाराचा उंबरा ओलांडून घरात प्रवेश व्हायचा. शेणाच्या सारवलेल्या जमिनीवर ना गरमी जाणवत होती ना गारवा. कपडे घाण होतील असे कधी मनातही यायचे नाही. प्लॅस्टिक खुर्ची वगैरे असले काही नव्हते त्या काळी. लाकडी फळ्यांची बनवलेली एक खाट आमच्या घरात होती. गावातील सुताराकडून तासून तासून ती आजोबांनी बनवुन घेतली होती. आणि त्याच आजोबांचा फोटो एका खांडा खाली तिरका लटकत होता. आता खांड म्हणजे काय ? तर ज्याला आज आपण पिलर म्हणतो. दगड माती पासून उभ्या असलेल्या आमच्या घराला लाकडी फळ्यांचा माळा होता. आणि घराला संपूर्ण कौल. या काळात सिमेंटचे पत्रे वगैरे असे खेडोपाडी पोहोचलेच नव्हते.

एका उंचवट्यावर असलेलं आमचं उंच घर. आणि ते ही तितकेच प्रशस्त होते. घरात बैलांचा गोठा, त्यासमोर एक पडघी. पडघी म्हणजे अशी जागा जिथे काही पेंढा, लाकूड फाटा असे काही सामान ठेवतात. आणि त्यानंतर आमची ओटी. आजच्या भाषेत आपण हॉल म्हणतो. तसे पाहता ओट्या सारख्या वाटणाऱ्या भागाला ही ओटी म्हणतात. परंतु आमची ओटी अथवा हॉल हा प्रशस्त होता. आणि मधोमध एका रांगेत सर्व खांब. ज्यावर सुतारांनी त्यांच्या केलेचे उत्तम प्रदर्शन करून नक्षीकाम केलेले होते. या खांबांना ऑइल पेंट मारून अथवा इतर कोणते रंग मारून सजवले जात असे.

काल्पनिक

पुढे उजव्या हाताला एक खोली होती. ज्याला आम्ही आतलं घर म्हणायचो. आजच्या भाषेत त्याला म्हणतील बेड रूम. त्या आतल्या खोलीच्या भिंतींना लागून धान्याचे डबे रचून ठेवले जाई. तसेच एका कोपर्याला जमिनीवर देवघर असे. आणि ओटीच्या डाव्या बाजूला स्वयंपाक घर.

स्वयंपाक घराला लागूनच पुढे मोरी असे. आज सहजपणे बाथरूम बोलतो आपण. तेव्हा मोरीच म्हटले जाई. आताही म्हणतात म्हणा गावाला काही लोक. ती मोरी पण पूर्ण नाही. तर अर्धीच बांधलेली असे. एका कोपऱ्यात अर्धी भिंत बांधली आणि तिला हॉल काढून पाणी बाहेर जायला आउटलेट दिलं की झालं काम. घरातील महिला पुरुष उठण्या पूर्वी आंघोळी आटपत. आणि तिथेच पुढे स्वयंपाकाला बसत. मुळात बसून अंघोळ करीत असल्याने मोरीच्या भिंती अर्ध्या होत्या. आणि त्या अर्ध्या भिंतीवर हंडे कळशी एकावर एक रचून ठेवले जाई. म्हणजे मोरीच्या अर्ध्या भिंतीवर पाणीसाठा केला जायचा. आता असे चित्र दिसणे दुर्लभ.

काल्पनिक

मोरीच्या जवळ लागूनच दुहेरी चूल होती. तशा चुली आताही आहेतच. पण अजून किती काळ असतील सांगू शकत नाही. दुहेरी चूल म्हणजे सर्वसामान्य. एक तोंड आणि दोन बाजू. एका बाजूला कालवण कढत (शिजत) असेल तर एका बाजूला तव्यावर भाकरी भाजल्या जाई. ही भाकर थोडी कच्ची ठेवून तिला चुलीच्या तोंडावर शेकवले जाते. आणि याच चुलीच्या शेजारी कोवळाभर (हातात मावतील एवढी) फाटी (चुलीला जाळायची लाकडं) रचलेली असायची. एखादं फाट जळून संपलं की लगेच दुसरं लावायचं. ही फाटी क्रॉस जाळली जातात. जेणेकरून दोन्ही बाजूला आग पसरेल असं. याच चुलीच्या वरच्या बाजूला लागून असलेल्या भिंती धुराने काळ्या पडलेल्या असायचा.

काल्पनिक

स्वयंपाक घरातील भिंती शेणामातीने रंगवल्या जायचा. याच भिंतीवर बत्त्या लटकवलेल्या असायचा. आता बत्त्या म्हणजे काय ? तर औषधाच्या किंवा दारूच्या बारक्या बाटलीत रॉकेल ओतून त्याच्या झाकणाला हॉल पाडून त्यातून चिंधीची वात करून सोडली जाई. जसं की आपण देवाला दिवा लावतो तसे. पण त्या बत्त्या असायचा रॉकेलच्या. त्या काळात गावागावांत रात्रीच्या वेळी तासनतास लाईट जायची. त्यावेळी या बत्त्या घरोघरी पेटवून ओटीवर ठेवल्या जायचा.

स्वयंपाक घराला दार असायचे. ते म्हणजे घराचे मागचे दार. माझ्या आजोबांनी इथेही एक अंगण बनवले होते. आणि याच ठिकानी तुळस उभारली होती. तर उंच उंच डोलणारी निलगिरीची भलीमोठी झाडं काही अंतरांवर उभी होती.

घरातील एका कोपऱ्यात अण्णांनी म्हणजे माझ्या चूलत्यांनी एक लाकडी शोकेस टाइप कपाट बनवले होते. ज्यावर ब्लॅक एन्ड व्हाइट टीव्ही ठेवला होता. त्याकाळी गावात टीव्ही हा प्रकार कुणा कडेही नसे. रेडिओ जरी असला तरी खूप मोठे आपरुक मानले जाई. घराच्या प्रत्येक भिंतीला चौकोनी अथवा त्रिकोणी देवळ्या होत्या. देवळी म्हणजे काही वस्तू ठेवता येईल अशी जागा. एखाद्या देवळी मध्ये देव पुजलेले असायचे तर एखाद्या देवळीत काचेचा कंदील. तर कुणाचं पाटी पुस्तक.

काल्पनिक

एवढं मोठं घर आणि घरात एकही पंखा त्याकाळी नव्हता. उलट उन्हाळा असला तरी अंगावर घेऊन झोपायला लागते. जे आता कमी होऊ लागले आहे. आता काही लोक आम्हाला टेबल फेन शिवाय झोप येत नाही असे सांगतात. त्याकाळी शहरात असलेली पांढरी शुभ्र ट्युबलाईट अजूनही गावखेड्यात पोहोचली नव्हती. पिवळ्या रंगाचा ब्लब हाच सर्व काही होता. आणि त्याची बटनही एकदम निराळीच होती.

जेवताना सगळी मंडळी सगळं जेवण घेऊन एकत्र बसत. प्रत्येकाच्या ताटात पाहिजे तसं जेवण वाढलं जाई. आता जेवण काय ? तर आमचा गावात भाजीपाला नसायचा. रानात भाज्या असायचा त्या पण पावसाळ्यात. मग उन्हाळ्याच काय जेवण ? उन्हाळ्यात डाळ, मसूर, वाल, काळा घेवडा, काळा वाटाणा अशी वाळवलेली कडधान्याची आमटी असे. भाकरीला पण तीच आणि भाताला पण तीच. पण तोंडी लावायला प्रत्येकाच्या भाकरीच्या टोपलीत एक भला मोठा मिरचीचा गोळा असायचा. लाल मिरच्या पाट्यावर ठेचून, त्यात लसूण, मीठ असं काही टाकून तयार केलेली चटणी. घरात काही भाजी नसेल तर हीच चटणी भाकरीवर घ्यायची आणि लावून लावून खायची. किंवा आणखीन एक म्हणजे तीळकुटाची चटणी. जी आजही गावाला खायला मिळते त्याला आपण भुगी म्हणतो. तेव्हा आम्हाला भूक लागली तर आमची आजी त्या भुगीमध्ये तेल टाकून आम्हाला चपाती बरोबर खायला देई. तेलामुळे ओलावा मिळे आणि तिखटपणा कमी होई. तसं शहरात भूक लागली तर आम्ही जॅम चपाती खायचो. पण गावाला गेलो की मिळेल ते गोड लागायचं. जेवणात फारसे मसाले मिष्टान्न नव्हतं. पण प्रत्येक पदार्थाला आणि कालवणाला एक वेगळीच चव असायची. ती चव पिजा बर्गर समोर पण फेलच.

आता ही सर्व झाली घराची रचना आणि एकंदर राहणीमान. यातील किती गोष्टी तुम्हाला आठवल्या ? तुमचं घर तुम्हाला कस दिसलं ? वीस वर्षांपूर्वी मागचा प्रवास करून तुम्हाला कसं वाटलं ? आणि शहरी भागातील ज्यांनी हा अनुभव घेतला नाही. त्यांना हे चित्र कसं वाटलं ? हे सर्व मला पर्सनली सांगायला विसरू नका. तुम्हाला वाचताना काय अनुभव येतोय हे मला कळण जास्त गरजेचं आहे. भले तुम्ही माझ्यासाठी ओळखीचे असोत किंवा अनोळखी. पण तुमच्या शब्दात मला तुमचा अभिप्राय कळवा. काही लोकांना सांगायचं तर असतं पण लिहायचा कंटाळा करतात पण तुम्ही मला भावना कळल्या नाहीत तर तुम्ही लेख वाचत आहात हे मला अजिबात समजणार नाही. २००३ पासून सुरू झालेल्या या मागच्या प्रवासात कोण कोण सामील आहे हे मलाही बघायला आवडेल. पुढील भागात करूयात नवी सैर एका वेगळ्या प्रसंगासह. तूर्तास धन्यवाद !!!

-संतोष दिवाडकर ( 8767948054 )
या माझ्या व्हॉट्सऍप वर आपल्या कमेंट पोहोचवा.

शिंदेवाडी होळीमाळ येथील जुना फोटो. बैलगाडी पुढे नामदेव शिंदे. बैलगाडीत बसलेले पांढऱ्या वेशात नारायण दिवाडकर, खंडू शिंदे आणि तेव्हाची तरुण पिढी.

या लेखाबद्दल वाचकांनी व्यक्त केलेल्या निवडक भावना

“लहान होता तेव्हा गावाकडं खुप मजा मस्ती केली. आणि मोबाईल नव्हता त्यामुळे पूर्ण वेळ खेळण्यात जायचा. आता सगळे एकत्र बसले तरी प्रत्येकाच्या हातात फोन असतो.”

– दिपाली शिंदे

“वा खुपच छान लिहिलं आहेस तू लहानपणी चा संपूर्ण प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला आम्ही पण शिळिंम ला मामाच्या गावाला जाण्यासाठी खुप आतुर असायचो खूपच छान होते ते लहानपणी चे दिवस आणि गाव आणि गावाकडची प्रेमळ स्वभावाची माणसं गावाला जाऊन आल्या सारखं च वाटलं मला”

– कादंबरी गोसावी

“ज्यांनी हे जगले त्यांच्या चेहऱ्यावर शेवट पर्यंत एक छान स्मितहास्य नक्किच राहत असनार. शिळीम गावच्या आठवनीत. व्यावं पुन्हा लहान आणि जगावं ते बालपण परत. काळाची पावलं मागं नेता आली असती तर किती बरं झालं असतं ना.”

– उज्वला पवार

“खरंच मला त्या काळात गेल्यासारखं वाटलं. क्षणभर सगळं काही ठळकपणे आठवलं. लग्ना नंतरचे आठवत नाही. पण बालपण आठवलं. मस्त लेख आहे.”

– भावना दिवाडकर

“२ रुपयांना जाळीत झाकून ठेवलेला वडा पाव. खरंच बालपण किती छान होत. त्या काळी खिशात २ रुपये जरी असले तरी खूप वाटायचे आणि आता. काय सुख होत त्या बालपणात. आता गूगल पे ने पूर्ण अकाउंट कितीही पैश्यानी भरुदे पण त्या बालपणासारखे सुख नाही कुठेच.

– ओमकार चासकर

“छान वाटलं. जुन्या आठवणी खरच ताज्या झाल्या. क्षणभर अस वाटलं अजून मी तिथेच आहे का. वाचता वाजता रुळून गेली.

– पुजा कदम

“खूप छान लिहलय. आता मोबाईल मुळे गावाचे गावपण हरवल आहे. गावा सारखी मज्जा शहरात नाही घेता येत.”

– अश्विनी इंगळे

“मस्तच! मस्त रमलो जुन्या आठवणीत. पण आज गावाचं गावपण हरवत चाललं आहे. गावांचाही विद्रुप शहरीकरण होत चाललंय. आणि खेदाची बाब म्हणजे आपण यालाच विकास समजतोय. गावाशी जुळलेली नाळ आणि भावना नष्ट होत चालल्या आहेत. आठ वाजताच निद्रिस्त होणारे गाव मध्यरात्री पर्यंत पण मोबाइलच्या स्क्रीनमुळे काजव्याप्रमाणे चमकत आहे. सगळं काही आपल्या हातातून सुटत चाललंय, हि खूप मोठी धोक्याची घंटा आहे.”

– गोपाळ दंडगवळे

“दादा तुमचा लेख वाचला. सत्य परिस्थितीचें वर्णन केले आहे. तुम्ही खरच मावळच काय अशी अनेक पुण्या नजिक गाव आहेत जी आता गाव म्हणून ओळखणे कठीण होत आहे .सतत चालणारे काँक्रिटीकरण, झाडं मुळासकट उखडून टाकली जात आहे खेडी लोप पावत आहेत. मी मूळची कोकणातली पण महाड पोलादपूर जिथे माझ गाव होत तिथे फक्त आता शहरी सांगाडा दिसत आहे. गाव कुठे तरी हरवला आहे. खूपच वाईट वाटत आहे. येणाऱ्या पिढीला गाव काय असतं कधी कळेल का??? हे विचार करूनच खंत वाटत आहे.”

– रोहिणी जाधव
Shilim Village : गावखेड्यांचा कायापालट; अर्थात हरवलेलं गावपन

Shilim Village भारत देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागला आणि देशातील गावखेडी वेगानं विकसित होऊ लागली. शहर आडवी उभी पसरली तर गावांनी हळूहळू शहरात रूपांतर व्हायला सुरुवात केली. पण यात एक गोष्ट मात्र हरवत चालली आहे. ते म्हणजे गावाचं गावपन. भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना गाव म्हणजे काय असतं ? हे देखील कळणे कठीणच. जसं पूर्वी शहरात असे म्हटले जाई की ज्याला गाव आहे तो खरंच भाग्यवान. पण भविष्यात गाव उरतील का ? असा संभ्रम तयार झाला आहे.

गावाचे आधुनिकीकरण होत गेले की त्या गावाला शहर म्हटले जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे एखाद्या शहराच्या अथवा परिसराच्या नावात गाव शब्द असणे. उदा. तळेगाव, गोरेगाव, तिसगाव. आता यांच्या नावातच गाव आहे. याचे मूळ कारण म्हणजे कधी एके काळी हे खरोखरच एक गाव होते. मात्र बदलत्या काळानुसार आज यांना शहर म्हणून बघितले जाते. जसे की तळेगाव शहर, गोरेगाव शहर. बदलाचे हे एक उत्तम उदाहरण आहे पण हा बदल पाहणारी पिढी म्हणजे आपल्या आजी आजोबांची. आता जो बदल मी पाहतोय त्या बद्दल मला सांगावेसे वाटेल. इथून पुढे मी बालपणापासूनच्या काही आठवणी आणि बदलांना उजाळा देणार आहे.

जन्मा पासून कल्याण मध्ये राहत असलो तरी माझे मूळ गाव म्हणजे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिळीम हे गाव. लहानपणा पासून गावा बद्दल एक वेगळंच आकर्षण असे. शहरी गजबजलेल्या भागातून शांत निसर्गाच्या सानिध्यात जाणे हे म्हणजे स्वर्ग सुखापेक्षा मोठे नाही. त्यामुळे गणपती आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आतुरतेने वाट आम्ही पाहत असे.

उन्हाळ्याचा दाह आणि शाळेची वार्षिक परीक्षा संपायची वेळ आली की चाहूल लागायची गावाची. शेवटचा पेपर लिहता लिहता गावाला जाण्याबाबत अगोदरच आतुरता लागलेली असायची. कारण बऱ्याच महिन्यानंतर आता गावाची मजा येणार होती. हा काळ असेल साधारणपणे २००३ चा.

ज्या दिवशी गावाला जायचे असते त्याच्या काही दिवसांपूर्वी मी तर नुसते दिवसच मोजत असे. मग गावाला काय काय न्यायचे ? काय काय करायचे ? कुणाला काय काय सांगायचे ? हे सर्व आगोदर ठरलेले असे. मुळात मोबाईल नावाचा प्रकार नसल्याने तिकडे काय काय चालू आहे ? याची कल्पना नसल्याने बरेच काही नवीन ऐकावयास मिळणार हेही माहीत असायचे. त्यामुळे गप्पा मारण्यासाठी पुरेसे विषय जवळ असायचे.

गावाला जाण्याच्या दिवशी सकाळी भल्या पहाटे आपोआपच जाग येई. अंघोळ आवरून तयारी करून घराला कुलूप लावून आम्ही निघे. पप्पा जवळ भल्या मोठ्या बेगी असत. आईकडे एखादी कमी वजनाची बेग आणि आम्ही दोघे बहीण भाऊ मोकळे. रिक्षातून एसटी स्टॅन्ड आणि त्यानंतर एसटी मध्ये चढून आरक्षण केलेल्या सीटवर जाऊन खिडकीत बसणे. एसटी मधली विंडो सीट आम्ही बहीण भाऊ एक एक स्थानकानंतर बदलत असे. आमचा हा क्रम कामशेत येई पर्यंत चालत असे.

कामशेतला आल्या नंतर जुन्या एसटी स्टॅंडवर बराच वेळ बसावे लागे. खूप सारे गावकरी तिथे एसटीची वाट बघत असे. “१२ ची एसटी कव्हा यायची ?” अशा चर्चा तिथे सुरू असत. धोतर, कोपरी अथवा पांढरा शर्ट किंवा सदरा आणि डोक्यावर टोपी घातलेली मंडळी तिथे जास्त असत. आणि मग एसटी आली की चढायची घाई. मग पुन्हा विंडो सीट. आणि मग काही वेळाने सुरू होई माझ्या गावाला पोहोचवणार्या एसटी मधील प्रवास.

कामशेत च्या मुख्य चौकातून एसटी रस्ता पार करून शिळीमच्या मार्गावर लागे. आता या चौकात काही वर्षांपूर्वी फ्लाय ओव्हर बनला आहे. जो त्या काळी नव्हता. त्याकाळी वाहतूक फारशी नसल्याने एसटी आरामशीर रस्ता पार करीत होती. आता इथून पुढे जो रस्ता असे तो एकदम लहान एकेरी आणि पूर्णपणे मोकळा. एसटी व्यतिरिक्त या मार्गावर दुसरे कोणतेही खाजगी वाहन नजरेस पडत नव्हते. क्वचित एखादी जीप गाडी, टेम्पो असे खाजगी वाहन नजरेस पडत असे. आणि राहिला विषय दुचाकीचा तर या काळात बोटावर मोजण्या इतक्याच दुचाक्या या भागात होत्या. त्यामुळे रस्त्यावर लालपरी सोडली तरी सगळा रस्ता सामसूम. आजूबाजूला दिसणारे डोंगर, पिवळी सुकलेली गवत, गावची मोकळी हवा, पवना धरणाचं विहंगम दृश्य हे सर्व नजरेस पडे.

कामशेत नंतर आमची एसटी पवनानगरला येऊन थांबायची. त्या काळी पवनानगर वगैरे असे काही नाव कोणी उच्चारत नसे. ‘कॉलनी आली’ बस एवढंच. आताही कॉलनीच म्हणतात पण तेव्हा फक्त तेवढंच होत. कॉलनीला आल्यानंतर काहीशी दुकान नजरेला पडत. एखाद दोन हॉटेल, काही भाज्यांची दुकानं, आणि काही लोकांची गर्दी इथे नजरेस पडे. यानंतर मात्र पुढील कोणत्याही गावात गजबजाट दिसणार नाही. पुढे जवण गावात फक्त एकच दुकान. एसटी येताच झाडाच्या सावलीत पारावर बसलेली माणसं एसटीत चढून बसत. आणि मग हळूहळू गाव जवळ येई. गावाजवळ एसटी आली की मग रस्त्यावर देवळा शेजारी एसटी उभी राही. एसटीतुन उतरलो की घरातील कोणी तरी घ्यायला येई.

एसटी मधून उतरल्यावर सर्व शुकशुकाट असे. जेमतेम एखाद दोन माणस नजरेस पडत. रस्त्याच्या कडेला लागूनच भैरवनाथाचे मंदिर. एका कडेला मारुती रायाचे मंदिर आणि रस्त्याला फक्त फणसाच्या झाडाची सावली. गावात एक मारवाडीचे दुकान, एक बबन बुवाची टपरी आणि दुसरी भाऊची टपरी. आणि टपरी समोर एक छोटंसं दुकान. बस एवढंच काय ते होत.

आम्ही मंदिरात जाऊन नारळ फोडून हार वगैरे घालून दर्शन घेत. आणि मग जे कोणी घ्यायला येईल त्यांना पप्पा भाऊच्या टपरीतून काहीतरी गोळ्या घेऊन देत. तसं भाऊ आणि पप्पा चांगले गप्पा करायचे. पण ते भाऊ आता कोण होते ? मला काय आठवत नाही. त्यांच्या दुकानात पार्लेच बिस्कीट, पेपरमिंट, हत्ती चिमण्यांच्या गोळ्या, भिंगरीच्या गोळ्या, पिठासारख्या दिसणाऱ्या रंगबेरंगी गोळ्या, ऑरेंज लेमनगोळ्या, सुपारी, बडीशोप असं काही काही मिळत होत. आणि २ रुपयांना जाळीत झाकून ठेवलेला वडापाव. जो त्या काळी महाग वाटत होता. आठण्याच्या आठ गोळ्यांनी खिसा भरून गेला की आम्ही घराकडे निघायचो.

आता त्या काळात शॉर्ट कट म्हणजे भैरीच्या देवळा कडून चिंचेच्या झाडा पासून दोन चार शेत ओलांडून ओसाड पडलेला ओढा ओलांडून एका पांधीतुन वाट काढत आमच्या वाडीत जावे लागायचे. पायी खुपाटा उडवत, एखाद्या करवंदाच्या जाळीच करवंद तोडून हा पायी प्रवास सुखावणारा होता. इथून पुढे आलो की आता सध्या पोल्ट्री लागते. मात्र त्या काळात तिथे असं काही नव्हतं. गावात शिरताना पहिले घर लागायचे ते म्हणजे राऊत यांचं आणि पुढे मारणे. या व्यतिरिक्त तिथे घरं नव्हती. आणि मग पुढे डावीकडे खंडू तात्या शिंदेंच. संपूर्ण गाव शांत वाटत होता. शेमडी बोळातून दोन्ही बाजूला झाडी होती. आणि त्या कमानीतून कृष्णाच्या देवळा पर्यंत चालण्यास वेगळाच फील मिळत होता. मग घरी जाण्या अगोदर कृष्णाच्या देवळात हार घालून पाया पडायचो. त्यावेळी मंदिर आणि पुढील परिसर एकदम रिकामा होता. ना कुठला शेड ना कुठले गेट. मंदिरा समोर फक्त झाडी आणि एका कडेला भेंडीचे झाड बसायला सावली देत होते.

देवाच्या पाया पडून झालं की घराकडे जायला निघत. तेव्हा तिथे कोपरी घालून खंडू शिंदे म्हणजेच गुरुजी सपत्नीक दिसे. मग विचारपूस होत असे. आणखी पुढे आलो की खडकाळ भाग लागत असे. जिथे खडक आणि त्याला गोल गोल असे चार पाच खड्डे. तिथे इंदू आजी असायचा. “आलं दात पडक कोल्ह” असे म्हणत ते मला चिडवायचा. आणि मग त्यांचा नातू विक्रम जो सतत त्यांच्या सोबत असायचा तो ही हसायचा.
“मला आता दात आलेत” असे म्हणून मी उत्तर पण द्यायचो. पण दरवेळी हा ठरलेला प्रश्न आणि उत्तर.

यानंतर मग एका छोट्याशा उंचवट्यावर आमचे मोठे घर वसलेले होते. आता पुढे काय होत असे ? नक्की वाचा पुढच्या भागात.

टीप :- जर संपूर्ण लेख तुम्ही वाचला असेल तर तुम्हालाही तुमच्या भावना आणि आठवणी सांगायची इच्छा नक्की झाली असेल. तुम्हाला वाचून काय वाटलं ? हे मला नक्की सांगा. तुम्ही मला ओळखत असू अथवा नसू. पण मला तुमचे म्हणणे ऐकायला नक्की आवडेल आणि मलाही कळेल की कोणी कोणी वाचले आहे. व्हॉट्सऍप मसेज किंवा कॉल जमेल त्यावर आपले म्हणणे मांडा.

  • संतोष दिवाडकर
    (युवा पत्रकार 8767948054 )

Shilim Village the lost of rurality

श्री कृष्ण मंदिर, शिंदेवाडीचा साधारणपणे ९० च्या दशकातील एक छायाचित्र. हस्तांदोलन राजू दिवाडकर, ताशा वादक नामदेव शिंदे, उजव्या बाजूला खंडू शिंदे आणि इतर काही ग्रामस्थ
मावशीच्या कोंबडीची निराळी गोष्ट

कोंबडीची गोष्ट

काही गोष्टी खूप खास असतात. पण या खास गोष्टी जेव्हा कोणी सांगत नाही तोवर सर्वांना कळत नाही. सध्या मी गावी असल्याने खूप निवांत आहे. करमण्या सारखे काही नसल्याने व नवीन लग्न झाल्याने कुठेही लांब जाण्याची मुभा नसल्याने घरा जवळच मन रमवत असतो. याचं दरम्यान मावशीच्या कोंबडीची गोष्ट आज सांगावी वाटते.

जो फोटो तुम्ही पाहिला असेल त्या कोंबडीचे वय आता ७-८ वर्षे आहे. माझ्या आठवणी प्रमाणे मी कॉलेजच्या अंतिम वर्षाला असल्या पासून या कोंबडीला पाहतोय. शिवाय दरवर्षी येणारे पाव्हणे पण कोंबडी पाहुन आवर्जून पाहत राहतात. एकंदरीत गावात किंवा पंचक्रोशीत सर्वाधिक जगलेली कोंबडी म्हणजे हिच असावी. मुळात कोंबडी ही अंड्यासाठी, कापून खाण्यासाठी किंवा एकतर विकून व्यवसाय करण्यासाठी पाळली जाते. पोल्ट्रीच्या कोंबड्या तर सहा महिन्यांच्या आतच लोकांच्या पोटात जातात. गावठी कोंबड्या जास्तीत जास्त २-४ वर्षे जगवतात आणी नंतर त्यांचा बाजार करून टाकतात. पण हिला ७-८ वर्षे का जगवली ? त्यामागे काय कारण आहे ? हेच तुम्हाला सांगायचे आहे.

आजपासून ६-७ वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या घराजवळील एका कुत्र्याने मावशीच्या कोंबडीवर हल्ला केला. त्या कुत्र्याने कोंबडीची मान धरली. जिथे अन्न साठवले जाते ते अन्नाचे जठर (गचुरा) त्या कुत्र्याने बाहेर काढला होता. खाजा खिज ऐकून घरातील सर्व जन बाहेर आले. त्यांनी कुत्र्याला लांब पिटाळले त्यानंतर त्यांनी कोंबडीला उचलून धरले. पण तिचे अन्नाचे जठर तसेच खाली लोंबत होते. माझ्या दोन्ही मावश्या कुंदा काकू आणी शिंदू मावशी यांनी लगेच हळद आणी मिठाचे मिश्रण केले. लोंबत असलेला गचुरा तसाच परत आत कोंबला आणी त्याच्यावर हळद मिठाचा लेप लावला. संपूर्ण जखम फडक्याने बांधून टाकली आणी कोंबडीला खुराड्यात बसवले.

जीवावर बेतणारा हल्ला होऊनही कोंबडी जिवंत होती याचे विशेष वाटत होते. पण जगली तरी ती किती दिवस जगतेय ? हे कोणी सांगू शकत नव्हत. कारण सुरुवातीला तीने जे काही खाल्लं किंवा पाणी पिलं की ते सरळ बाहेर पडत होत. त्यामुळे तिच्या जगण्याची शक्यता नव्हतीच. पण कदाचित तिला अगोदरच दीर्घायुष्य होत की काय काय माहित ती काही दिवसात बरी झाली. तिला बांधलेले फडके काढून टाकले. जखम देखील भरत आलेली होती. त्यानंतर तिला पुन्हा एकदा मोकळ्या अंगणात सोडून दिले. रोजच्या सारखे दिवसभर चरून फिरुन ती संध्याकाळी घरी परतु लागली. आता या गोष्टीला खूप काळ लोटला. त्यावर अनेक पावसाळे, जत्रा, शे दोनशे रविवार आणी गिर्हाईक येऊन गेले. पण मावशीने अजून तिला सांभाळून ठेवले.

कुत्र्याच्या हल्ल्या पासून जीव बचावलेल्या कोंबडीने अनेक वर्षे अंडी तसेच नवीन नवीन कोंबड्या जन्माला घातल्या. ज्यातून मावशीला चार पैसेहि मिळत राहिले. 3 वर्षे झाली का घरात कोंबडी ठेवत नाहीत. पाव्हणा आला की तिचा बेत केला जातो. पण या कोंबडी सोबत असं काही करायची इच्छाच कोणाची झाली नाही. तिच्यामागून कितीतरी कोंबड्या आल्या आणी गेल्या. पण ही कोंबडी अजूनही घरात कायम आहे. आता या कोंबडीचे बऱ्यापैकी वय झाले आहे. तश्या कोंबड्या १०-१५ वर्षे जगू शकतात असे वाचण्यात आले होते. त्यामुळे कोंबडीचा जन्म घेऊनही इतक्या वर्षाचे आयुष्य लाभले म्हणजे नशीबचं म्हणावं लागेल.

ही छोटीशी पण न ऐकलेली गोष्ट कशी वाटली ते रिप्लाय मध्ये नक्की सांगा. तुम्ही वाचून रिप्लाय दिला तरच मला समजेल की कोणी कोणी वाचली आहे. आणी कधी आलात गावच्या घरी तर कोंबडी नक्की बघून जा. धन्यवाद !!!

लेखन – संतोष दिवाडकर

१६७० – एक रहस्यमय प्रवास; भाग पहिला

शिवाजी महाराज की जय !!! घोषणा देत दुर्गाडी किल्ल्यावरून मी माझ्या मित्रांसोबत निघालो. सोबत माझ्या चाळीतील काही शालेय शिक्षण घेणारी नवोदित पिढी होती. किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर शिवाजी महाराज या विषयावर आमच्या गप्पा सुरु होत्या. तसा शिवाजी महाराज हा विषय या अगोदरही आमच्यात सुरू होता. परंतु आजचा दिवस खास होता. हो आज शिवजयंती होतीच पण एक वेगळाच उत्साह आमच्या मध्ये होता. आता ते नेमकं काय ? हे पुढे तुम्हालाही समजणारच आहे.

मी, माझा मित्र सूरज, धिरज आणि चाळीतील काही शाळकरी मुलं चैतन्य, यश आणि आर्यन हे तिघे आमच्या सोबत होते. तशी आमची गॅंग खूप मोठी आहे पण या दिवशी सर्व व्यस्त होते. अलीकडे तर नेहमीच व्यस्त असत. ज्याठिकाणी आम्ही जाणार होतो ते ठिकाण अपरिचित होत. विज्ञानाच्या जगात आणि अज्ञानाच्या सावलीत अस वेगळं ते जग होत.

राघव शास्त्री हा एक आगळा वेगळा सर्वांपासून अलिप्त असलेला वैज्ञानिक भिवंडीत राहत होता. नासाला मागे टाकून त्याने स्वतःच वेगळंच जग तयार केलं होतं. ज्या गोष्टीची आपण फक्त कल्पना करतो व त्या वास्तवात नसतात त्या गोष्टी त्या व्यक्तीने सत्यात उतरवल्या होत्या. मात्र नासा आणि त्यातील संशोधना पासून तो चार हात दूर होता. यामुळेच तो सर्व सोडून भिवंडी सारख्या लहान शहरात राहत होता. तो अस काय जगावेगळं करत होता ? हे खरंतर आम्हालाही नव्हतं माहिती. पण जेव्हा सत्य समजलं तेव्हा या जगात सार काही शक्य आहे. कल्पनेपलीकडेही जग आहे हे समजले.

भिवंडी बायपासला झालेल्या दरोडेखोरांच्या एका हल्ल्यातून सूरजने त्याचे प्राण वाचवले असल्याने त्याने त्याचे सर्वात मोठे रहस्य सुरजला सांगितले. न राहवून सुरजने मला सांगितले. पण आता हे आणखी कुणाला कळू नये म्हणून आम्ही ते गुपित कायम ठेवले. मात्र आजच्या तारखेला ठरल्याप्रमाणे तो आमची एक इच्छा पुरी करणार होता. सूरजने त्याचे प्राण वाचविल्याची परतफेड त्याला करायची असल्याने तो यासाठी तयार झाला होता. फिरायला २ दिवस बाहेर जात आहोत असं घरी सांगून आम्ही भिवंडीत राघव शास्त्री कडे आलो.

“हॅलो राघव शास्त्री” दारातून सुरजने आवाज दिला.

“येस मिस्टर सूरज एन्ड टीम, प्लिज कम इनसाईड” असे म्हणत त्याने आम्हाला आत बोलावले.

आत गेल्यानंतर आम्ही तिथेच सोफ्यावर बसलो. आणि तो देखील आमच्या सोबत बसला.

“हम्म… तुम्ही सिक्रेट गोष्ट जर कुठे बोलाल तर मला सुसाईड करावं लागेल” असं त्याने आम्हाला स्पष्ट सांगितले.

“नो सर… आम्ही कुठेच बोलणार नाही.” मी त्याचा हातावर हात ठेवत वचन दिले.

राघव शास्त्री एक वैज्ञानिक होता. या पृथ्वीबाहेरील ग्रहांवर त्याचे संपर्क होते. त्याचा घरातील छुप्या लॅब मधून तो या सगळ्या गोष्टी करीत होता. आणि याची कल्पना बाहेरील जगाला नव्हती. ना नासाला ना इसरोला. तो जे करतो हे वास्तवात घडते यावर आमचा विश्वास नव्हता. पण आज तो आम्हाला विश्वास ठेवून प्रात्यक्षिक दाखवणार असल्याने आम्ही आतुर होतो.

“खरंतर सूरज मुळे मला नवा जन्म मिळाला. अन्यथा त्या दिवशी मी त्या हल्ल्यात बचावण्याची शक्यता नव्हतीच. मला वाटलं आता माझा एन्ड होणार पण सूरज मुळे वाचलो. याने वेळेवर येऊन त्याची बाईक पुढे आणून त्याच्या अंगावर चढवली जसा तो पडला मी पटकन सूरज बाईकवर बसलो. रॉकेट सारखी गाडी पळवली. म्हणून मी जीवावर उदार होऊन इथे बोलावलं आज तुम्हाला” असे म्हणत तो उठला. आणि आतल्या खोलीकडे जाऊ लागला. आम्ही देखील त्याच्या मागे उठलो.

“या आता माझ्या सोबत तुम्हाला लॅब मध्ये नेतो” असे म्हणत त्याने आम्हाला आतील खोलीत नेले. आतल्या खोलीत गेल्यानंतर त्याने त्याचा पलंग पुढे ढकलला. आणि जमिनीवर अंथरलेली रझई काढून बाजूला केली. आता समोर लाकडी प्लाउड दिसले. त्याने ते उचकटून बाजूला ठेवले. तोच आम्हाला खाली जाणारा अंधारा जिना दिसला. आम्ही मात्र आवक होऊन पाहतच राहिलो.

“चला माझ्या मागे ये. जस्ट फॉलो मी” शास्त्री उतरू लागला.

“संतोष दादा मी नाय येत. भीती वाटते” चैतन्य घाबरु लागला.

“अरे ये आम्ही आहोत ना सर्वे” धिरजने त्याला आधार दिला.

खरंतर पुढे काय आहे ? हे समजूनच आम्हाला भीती वाटत होती. कारण शास्त्री हा एक वयस्कर व्यक्ती होता. एक भिंगाचा चष्मा आणि पांढरा कोट घालून तो हळूहळू पुढे जिना उतरत होता. जिना उतरून झाल्यावर त्याने सेन्सर वर बोट टेकवले. तसे समोरील दरवाजा उघडला आणि आम्ही एक एक करून आत गेलो.

बापरे ! आत मधील दृश्य पाहून आम्ही हैराण झालो. काय ते दृश्य होते. सगळीकडे नुसता लखलखाट. अश्या वस्तू ज्या कधी पाहिल्या नाहीत त्या तिथे होत्या. काही रसायनं होती ज्यातून बुडबुडे निघत होते. तर काही हत्यार देखील होती.

“सर तुमचा लॅब खतरनाक आहे” सूरज म्हणाला.

“आईच्या गावात चैतन्य इकडे बघ काय आहे” यश काहीतरी दाखवू लागला.

“एक मिनिटं… कोणत्याही वस्तूला तुम्ही स्पर्श करू नका. मी दाखवेल तेच पहा आणि मी सांगेल तेव्हाच बोला. तुमचा आवाजही चालणार नाही.” शास्त्रीने सूचना दिली.

पण तो असं का म्हणला हे मी देखील त्याला खुणेने विचारले. यशने जे मशीन पाहिलं ते काहीसं विचित्रच होत. शास्त्रीने पुन्हा एक कोड दाबून मशीनची स्क्रीन ऑन केली. अचानक त्यावर एक बॉल दिसू लागला. आणि त्याने आम्हाला एक हेडफोन सारख यंत्र दिल जे त्याने आमच्या कानाला लावलं.

“हम्म आता तुम्ही बोलू शकता.” असे तो म्हणाला.

“सर हे काय आहे ? आम्ही का लावलं हे ? त्याशिवाय का नाही बोलू शकत?” मी विचारले.

“हा गोल दिसतोय ? हा एक ग्रह आहे मंगळ. जो मी तुम्हाला या लेबमधून दाखवतोय.” आणि तो आम्हाला दाखवू लागला.

“चू** बनवतो हा आपल्याला” आर्यन हळूच म्हणाला.

“ओ माय गॉड एलियन्स ?” चैतन्यने आश्चर्याने पाहत म्हटले.

“हिहीही दिस इज नॉट एलियन्स” शास्त्री हसून म्हणाला.

“सो मग हे कोण दिसत आहेत” धिरजने विचारले.

“एलियन्स हे नाव लोकांनी पाडलं आहे. मी खूप मोठ्या शोधातुन बाह्य जगाशी जोडलो गेलो आहे. मागील 20 वर्षे मी या जगातल्या लोकांचा एक ट्रस्टवर्थी पर्सन आहे.” तो सांगू लागला.

“म्हणजे यांना तुम्ही ओळखता?” यशने विचारले.

“हो प्रत्येक ग्रहाशी माझे सबंध आहेत” असे म्हणत पुढच्या क्षणी आम्हाला त्याने पर ग्रहावरील लोकांशी चर्चा करून दाखवली.

आम्हाला आमच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. हे स्वप्न आहे असेच वाटत होते. केवढं मोठं जग त्याच्या लॅब मध्ये आहे हे आम्हाला समजले. इतक्यात एका कोपऱ्यात असलेल्या चमकणाऱ्या काचेच्या कपाटावर माझी नजर गेली.

“सर ते काय आहे ? ग्रीन लाईट वाल?” मी विचारले.

“ते ना ? हा तेच ते टाइम मशीन. जी तुमची इच्छा पूर्ण करेन” तो म्हणाला.

“व्हॉट?” चैतन्यने विचारले.

“का विश्वास नाही?” त्याने हसून सवाल केला.

“हम्म सर मला विश्वास नव्हता. पण इतकं सर्व पाहतोय तर आता 100% विश्वास आहे. आणि आम्ही पूर्ण तयारीत आलो आहे.” मी सांगितले.

खरं तर मी सूरज आणि राघव शास्त्री मध्ये झालेलं बोलणं बाकीच्या तिघांना माहिती नव्हत. आणि जे बोलणं झालं होतं ते खरं ठरणार असा विश्वास झाल्याने आता आतुरता वाढली होती.

“ओके चला तुमची इच्छा मी पूर्ण करतो. परंतु त्यापूर्वी तुमच्या अंगावर असलेले किमती वस्तू, दागिने, मोबाईल सर्व काढून बाहेर ठेवा. एन्ड डोन्ट वरी. इथे कोणी येत नाही.” शास्त्रीने सांगितले.

“अरे हा चोर तर नाय ना ?” आर्यन हळूच बोलला.

“जर माझ्यावर विश्वास नसेल तर जाऊ शकता. किंवा वस्तू घेऊन आत या. पण मशीन मध्ये आल्या नंतर तुमच्या वस्तू अपोआप गायब होतील नष्ट होतील.” शास्त्री म्हणाला.

“नो सर आम्ही ठेवतो.” मी विश्वास दाखवला.

असे म्हणत आम्ही सर्वांनी आमचे फोन, पाकीट, दागिने, गाडीच्या चाव्या सर्व काही बाहेर ठेवले. आणि मशीनच्या जवळ आलो. थोड्या वेळात शास्त्री वेगळंच काहीतरी घालून आमच्या समोर आला. त्याला असा पाहून आम्ही घाबरलो.

“हा हा हा तुम्ही सर्व कपडे काढा?” शास्त्री म्हणाला.

“सर आता कपडे तरी राहुद्या” सूरज लाजून म्हणाला.

“अरे मग जाताना घालणार काय ? तुमचा शरीर सोडून शरीरावर असणारी प्रत्येक निर्जीव गोष्ट गायब होणार” शास्त्री म्हणाला.

लाजत काजत आम्ही त्याचे बोलणे ऐकले आणि त्याने दिलेला विचित्र जॅकेट घालून आम्ही मशीन जवळ आलो. त्याने दरवाजा उघडला आणि आत मध्ये प्रवेश केला. त्याच्या पाठोपाठ आम्ही देखील आत शिरलो. एक लिफ्ट सारखी ती जागा होती. सर्वत्र वेगवेगळ्या लाईट्स, वायरींचा गुंथा, रेडिओ सिग्नलचे आवाज. यामुळे आम्ही घाबरून गेलो होतो. इतक्यात त्याने एका कोपऱ्यात जाऊन काहीसे आकडे दाबले. वेगळीच भाषा होती ती. आणि मशीन मध्ये आवाज यायला लागला. तो आवाज मशिन सुरू झाल्याचा होता. मशीन बाहेर मिट्ट काळोख दिसत होता. कुठे आहोत कळत नव्हतं. मनात भीती होती की परत घरी जाऊ की नाही. सोबत जी मूलं होती त्यांचे चेहरे काळजीने आणि भीतीने गंभीर झाले होते.

“सर हा आवाज कसला होत आहे” सुरजने विचारले.

“तुम्ही सांगितले तिथे जात आहोत” शास्त्री हसून म्हणाला.

“म्हणजे सर आपण निघालो पण?” मी म्हणालो

“येस… आपण टाइम ट्रॅव्हल करतोय” त्याने सांगितले.

“ओ माय गॉड… खरं का काय ?” धिरज म्हणाला.

“सर म्हणजे आपण आता कुठे आहोत नक्की? म्हणजे आपली मशीन लॅब मध्ये आहे की अजून कुठे?” चैतन्यने विचारले.

“आपली मशीन लॅबमधून कधीच निघाली. आता आपण सर्व जगातून दूर आहोत. आपण कुठंच नाहीत. सध्या तरी हे मशीनच आपलं जग” शास्त्री म्हणाला.

“सर आधीच फाटली.. अस काय बोलू नका.” सूरज म्हणाला.

इकडे सर्वांचे चेहरे चिंताग्रस्त झाले होते.

“दादा मी तर बोलतो नको… आपण घरीच जाऊ. हे खूप डेंजर आहे” यश म्हणायला लागला.

“एक मिनिटं तुम्ही किती उड्या मारल्या तरी या मशीनचा दरवाजा माझ्या परवानगी शिवाय उघडत नाही” शास्त्री आणखीन घाबरवू लागला.

“सर प्लिज मुलं घाबरतील. तुम्हाला सवय आहे आमच्यासाठी हे खूप अजब आहे” मी सांगितले.

“माझे इंस्टा रील टाकायची वेळ झाली संतो” सूरजने मुद्दामच विनोद केला.

बराचवेळ मशीन मधून आवाज येत होते. ते आवाज शब्दात न सांगणारे होते. इतक्यात त्याने स्क्रीन पाहिली.

“हम्म…. पोरानो पोचलो बरं आपण” शास्त्री म्हणाला.

“कुठे पोचवल म्हाताऱ्या” भेदरलेल्या आर्यनने रागाने विचारले.

“तुझ्यामुळे मशीनवर लोड आला. तुला मी रिटर्न नेतच नाय बघ आता” शास्त्री म्हणाला.

“नो सर सॉरी सॉरी… ” आर्यन बोलला.

काही वेळ आम्हाला हसण्याची संधी मिळाली.

“सूरज… कुठे नेऊ तुम्हाला ?” शास्त्रीने विचारले.

“सर जिकडे तुम्हाला न्यायला सांगितले त्या काळात” सूरज म्हणाला.

“हो आपण त्याच काळात आहोत. पण कोणत्या ठिकाणी जायचे आहे? आपली मशीन आता त्याच काळात आहे.” शास्त्री म्हणाला.

“नेमकं कोणत्या जमान्यात आहोत सांगू शकाल का ?” मी विचारले.

“उमम…. हा… आपण 1670 मध्ये आहोत” त्याने स्क्रीन वाचून सांगितले.

“ओहह तेरी… म्हणजे 350 वर्षे मागे” सूरज म्हणाला.

“जिथे तुम्ही आन म्हणाला तिथे आलो. तुम्ही म्हणाले असते की आमचा लहानपण दाखवा तर पटकन दाखवले असते. 2 मिनिटात पोहोचलो असतो. त्यात 350 वर्षे मागे यायचे म्हणजे वेळ जाणार. शिवाय 500 वर्षा पेक्षा मागे मशीन येत नाही” शास्त्री म्हणाला.

“सर मला माझं फ्युचर बघायचं होत” चैतन्य म्हणाला.

“नेलं असत. 50 वर्षे पुढे आणि 500 वर्षे मागे चालते ही मशिन. बट सूरज म्हणाला तिथे मी आलो घेऊन” शास्त्रीने सांगितले.

“काय दादा पुढे समजले असते ना कसले कसले गेम्स खेळतात. आणि आपण कसे आहोत. आपली सिटी कशी आहे” आर्यन सुरजला म्हणू लागला.

“अरे आपलं फ्युचर आपल्याला नंतर पण दिसेल. पण ज्यांच्या मुळे आपण आज आहोत आणि उद्या फ्युचर बघणार आहोत. त्यांचा काळ कुठे बघायला मिळणार आहे आपल्याला पुढे?” मी म्हणालो.

“दादा नक्की काय आहे बाहेर?” धिरजने विचारले.

“तुम्हाला समजलं नाही का ? 1670 म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ” मी सांगितले.

“काय ??? म्हणजे शिवाजी महाराज असतील इथे ? खरोखरचे?” चैतन्यने तोंड वासून विचारले.

“हो मग” मी म्हणालो.

“ते ठीक पण सूरज नेमकं लॅन्ड कुठे करू मशीनला ? हे मशीन कोणाला दिसलं तर प्रॉब्लेम होणार” शास्त्रीने चिंता व्यक्त केली.

शास्त्रीने मशीनमध्ये पाहून नेमकं कुठे आहोत याबाबत सांगितले. पण सोईस्कर आणि कुणाला न कळणारी जागा मिळणे अवघड होते. शेवटी शास्त्रीने मशीनला एका ठिकाणी उतरवले आणि एलबर्टने पुन्हा स्क्रीनवरून पाहणी केली. आजूबाजूला कोणी नसल्याची त्याने खात्री केली.

“सर नक्की काय प्रॉब्लेम आता? आम्हाला लवकर पाहायचं आहे सर्व” मी आतुरता दाखवली.

“हे बघा तुम्हाला इथे प्रॉब्लेम येतील. कारण तुम्ही साधारण लोक नाहीत. तुम्ही 2022 मधून टाइम ट्रॅव्हल करून आलेले आहात. तेव्हा तुमची जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्हाला मला परत न्यायचं आहे.” शास्त्री म्हणाला.

शास्त्रीने मशिनला एका खड्ड्यात उतरवले. आणि काही वेळाने ग्रीन बटन प्रेस केले. बटन दाबताच मशिन बाहेर दिसणारा काळोख दूर झाला. आणि शास्त्रीने पुन्हा दार खोलले.

“तुम्ही इथेच थांबा. जोवर मी येत नाही कोणी हलणार नाही इथून” शास्त्री तिथून निघून गेला.

शास्त्री बराचवेळ झाला तरी परतत नव्हता. त्यामुळे आमच्या मनात वेगवेगळे विचार येत होते.

“काय सिन आहे सूरज दादा… हा माणूस कुठं गेला. नक्की आलोय शिवाजी महाराजांच्या काळात की चू** बनवतोय आपल्याला” आर्यन म्हणाला.

“कोण म्हणलं इथे काय आता?” आतमध्ये येत शास्त्रीने विचारले.

“सर तुम्ही खूप वेळ बाहेर होतात म्हणून पोर वैतागली असतील. जाउद्यात” सूरज म्हणाला.

“सर हे काय आणलंत ?” मी विचारले.

शास्त्रीने एका कापडात गुंडाळून काहीतरी आणले होते. त्यात कपडे होती त्या काळात घातली जाणारी. शिवाय काही चांदीचे दागिने, माळा, पटके असे साहित्य त्यात होते.

“ते जॅकेट काढा आणि पटापट ही कपडे घाला” शास्त्रीने सांगितले.

आम्ही पटापट सगळी कपडे घातली. आम्ही कसे दिसतो हे आम्हाला माहीत नव्हते. आम्ही फक्त एकमेकांना बघत होतो. पण स्वतः कसे दिसतो ही आतुरता होती. डोक्यावर पटके, अंगावर सदरा, पायजमा, हातात चांदीचं सलकडं, पायात तांब्याचे तोडे, आणि चामड्याच्या वहाणा असा आमचा पेहराव झाला.

“सर हे कुठून आणलं तुम्ही.” धिरजने विचारले.

“हे मशीन इथल्या बाजारपेठ पासून थोडंफार दूरच्या अंतरावर घनदाट झाडीत उतरवले आहे. मग बाजारात जाऊन तिथून एका दुकानातून चोरी करून आणले.” शास्त्री म्हणाला.

“सर आपण आलोय कुठे ? आणि तुम्ही चोरीने सुरुवात ?” मी विचारले.

“आपला नाईलाज आहे. त्याशिवाय मार्ग नाही. आपल्याकडे येथील चलन नाही” शास्त्री म्हणाला.

“चलन काय असत सूरज दा?” चैतन्यने विचारले.

“करन्सी रे” सूरज म्हणाला.

“बर आता आपण बाहेर पडुयात. आणि या खड्ड्यावर काहीतरी टाकून लपवूयात. सकाळ झाली की आपण कुठे तरी जाऊन राजगडावर जाण्याचा प्लॅन करू.” शास्त्री म्हणाला.

एक एक करून मशीन मधून सर्व जण बाहेर पडले. खड्ड्यातून बाहेर पडलो आणि एक नजर फिरवली. ही नजर 2022 मधून 1670 वर होती. आज माझ्या नजरेत मी 1670 पाहत होतो. अंधारी रात्र असल्याने फारस काही दिसत नव्हतं पण जाणवत होतं. ते म्हणजे कडाक्याची थंडी. सगळे कुडकुडत होते. पण आता शरीरात भिननारा प्रत्येक श्वास हा शिवकालीन होता. यामुळे थंडीचा विसर पडत होता. शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊ वाटत होत्या. पण शास्त्रीने आम्हाला असे काही न करण्यास व अतिउत्साहीपणा न करण्यास सांगितले होते.

“अरे दादा आपण निघालो तेव्हा दुपार झाली होती. आपल्याला 1 तास गेला. म्हणजे आपल्याकडे आता दुपारचा एक वाजला असेल. पण इकडे तर पहाट आहे.” चैतन्य पुन्हा केल्क्युलेशन करू लागला.

“सूरज दादा माझा जेवायचा टाइम झालाय” आर्यनने सांगितले.

“थोडा वेळ थांब आर्यन बाबा तू” सूरज हसून म्हणाला.

“सर आता पुढे काय ? महाराजांना कसं पाहणार भेटणार ?” मी आतुरतेने विचारू लागलो.

“काही वेळातच सकाळ होईल. माझा नाईलाज होता. म्हणून मी अंधारात मशीन लॅन्ड केलं. आणि तुमच्या जेवणाच खाण्याचं बघुयात कुठे काय होत का ? आणि नाहीच काय झालं तर आपण निघू परत.” शास्त्री म्हणाला.

“सर महाराजांना डोळे भरून पाहिल्या शिवाय कसं बर कोण निघेल? आणि 2 दिवस बाहेर आहोत हे सांगून आलोय ना आम्ही” मी सांगितले.

“ठीक आहे. पण बोलताना भाषा नीट वापरा. नायतर काही बोलू नका. बाकीचे कसे बोलतात तसे बोला.” शास्त्री म्हणाला.

“मराठीच बोलायचं ना पण ?” यशने विचारले.

“मराठीच बोलायचं पण भाषा शैली वेगळी. शुद्ध बोलू नका. त्या काळात असल्या सारखे बोला.” शास्त्री म्हणाले.

“म्हणजे कसं बोलायचं आम्हाला नाय जमणार सर” धिरज म्हणाला.

“अरे तू पावनखिंड बघितला ना ?” मी धिरजला विचारले.

“हो बघितला ना दादा. त्यात बोलतात तसं ना?” त्याने विचारले.

काहीवेळ बसून गप्पा मारल्यानंतर हळूहळू उजेड पडू लागला. दाही दिशा प्रकाशमय होऊ लागल्या. पक्षांचा किलबिलाट, वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज कानी पडू लागले. आणि तितक्यात 1670 च्या सूर्य नारायनाणे डोके वर केले आणि पहिले कवडसे आमच्या अंगावर पडले. त्याच प्रकाशात आम्ही दूरवर दिसणाऱ्या राजगडावर नजर मारली. मनात खूप आनंद होता. कधीही न पूर्ण होणार स्वप्न सत्यात उतरणार यामुळे आम्ही सर्व खूपच भारावून गेलो होतो. आणि आम्ही राजगडाच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली.

पायाला चावणार्या आणि सवय नसल्याने बोचणार्या चामड्याच्या चपला घालून चालताना सर्वच जण आतुरतेने एक एक पाऊल टाकत होते. महाराजांच्या काळातील माती आणि जमिनीवर आम्ही चालत असल्याने जवळपास जगातली सारी सुख प्राप्त झाल्याचं समाधान होत. पण आता पुढे काय होणार ? हे अजूनही आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही गावाच्या बाजारपेठे कडे चालत निघालो. जेणेकरून काही खाण्याचा बंदोबस्त व्हावा. इतक्यात आम्हाला समोर काही तरी दिसले.

आमच्या सारखाच पेहराव केलेली एक रांगडी व्यक्ती आमच्या समोर अचानक उभी राहिली. त्याच्या पिळदार मिशा आणि रुबाबदार चेहरा पाहून आम्ही अचंबित झालो. आम्ही सर्वे त्याच्या समोर उभे राहिलो. आणि तो आम्हा सर्वांकडे रोखून नजर फिरवत होता. आता पुढे काय होणार ? याची चिंता आम्हाला लागू लागली.

1670 मध्ये भेटलेली ती पहिली व्यक्ती कोण होती ? आणि पुढे काय घडणार ? यासाठी वाचा कथेचा दुसरा भाग.

क्रमशः ……

( Shivaji Maharaj Story )

Note : सदर कथा काल्पनिक असून ती तुम्हाला कशी वाटली ? याबाबत मला नक्की कमेंट द्या. कारण कथा तुम्ही वाचली आहे हे सांगितल्या शिवाय मला समजणार नाही. ती कथा तुम्हाला कशी वाटत आहे हे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तुमच्या कमेंट्स नुसार पुढचा भाग आणखीन रंगतदार व्हायला मदत मिळेल. जर मी मोठ्या कथा लिहू शकतो तर छोटीशी कमेंट लिहायला तुम्हाला कितीसा वेळ जातोय ? तुमची प्रतिक्रिया लाख मोलाची. धन्यवाद !!!

गाडी चोरीच्या उद्देशाने वाहन चालकाची हत्या; नऊ वर्ष कोर्टात चाललेल्या केसचा लागला निकाल

जवळपास नऊ वर्षापूर्वी म्हणजेच २०१२ साली कल्याण मधील टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाल्यांकडून शिर्डी साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी एक गाडी बुक झाली होती. मात्र या वाहनचालकाची हत्या झाली आणि संशयितांविरोधात कोर्टात खटला उभा राहिला. जवळ्पास नऊ वर्ष चाललेल्या या खटल्याचा निकाल लागला असून गुन्ह्यातील चारही आरोपींना आता कोर्टाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

कल्याण येथील टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारे रेवणकर यांच्याकडे वाहन चालक म्हणून घनश्याम पाठक हे काम करीत होते. २०१२ साली शिर्डी साईबाबा देवस्थानाचे दर्शन घेण्याकरिता चार जणांनी गाडी बुक केली आणि प्रवासाला सुरुवात केली. प्रवास सुरु असतानाच या चौघांच्या डोक्यात जी डाळ शिजत होती ती वाहनचालकाला अनाकलनीय होती. शिर्डीला जातानाच ओतूर येथे थांबून त्यांनी रश्शी विकत घेतली. ही रश्शी कशासाठी घेतली याची कल्पना ड्रायव्हरला मात्र नव्हती. शिर्डीला जाऊन त्यांनी दर्शन घेतले. आणि नंतर पेटपूजा करून परतीचा प्रवास सुरू केला.

नाशिक येथे आल्या नंतर आडबाजूला वाहन चालकाला गाडी थांबविण्याची सूचना त्या चौघांनी केली. कस्टमरच्या सुचनेचे पालन करीत वाहनचालक घनश्याम पाठक (५३) यांनी वाहन रस्त्याहून बाजूला केले. वाहन थांबवल्या नंतर रश्शीने या चारही आरोपींनी त्याचा गळा आवळला. ड्रायव्हरची जिवाच्या आकांताने तरफड सुरू होती. मात्र चौघांच्या कचाट्यातून त्याला मानेभोवती गुंडाळलेला मृत्यूचा दोर सोडवता आला नाही आणि त्यातच त्याने दम तोडला. चौघांपैकी एकाने गाडीवर ताबा घेतला आणि नाशिक ते कसारा प्रवास करीत असताना त्यांनी मृतदेहाला मधोमध बसवीले. पुढे गाडी कसारा घाटात आणली आणि वाहनचालक घनश्याम पाठकचा मृतदेह निर्दयीपणे खोल दरीत फेकून दिला.

इकडे वाहन चालक व वाहन दोन्ही गायब असल्याने टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या मालकांची चिंता वाढली. काहीही शोध लागत नसल्याने त्यांनी थेट महात्मा फुले चौक पोलिस ठाणे गाठले आणि आपली तक्रार नोंदवली. वाहनचालक विश्वासू असल्याने त्यांनी अपहरण झाल्या संदर्भात गुन्हा दाखल केला. वाहन व चालक मिळून येत नसल्याने महात्मा फुले चौक पोलिस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळा कुंभार व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी तांत्रिक माहिती व शिर्डी येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार आरोपींबरोबर वाहनचालक ही आढळून आल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र पोलिसांकडे या हत्येसंदर्भात प्रथमदर्शी असा कोणताही पुरावा नव्हता.

पोलिसांनी आपल्या गुप्त बातमीदारांमार्फत व तांत्रिक तपासावर शहापूर मध्ये राहत असणारे चारही आरोपी गजाआड करण्यात आले. आकाश गजानन साळुंखे, सचिन उर्फ बटाट्या उर्फ सुभाष नीचीते, सचिन उर्फ सच्या सुभाष नीचीते व दिनेश काळूराम फर्डे अशी त्या चौघांची नावे. यातील तीन जणांना कालांतराने न्यायालयाने जामिनावर सोडले होते. तर एक आरोपी कारागृहातच होता. केवळ गाडी चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली होती. शहापूर येथे राहत असणाऱ्या आरोपीच्या वतीने कल्याणातील २ ख्यातनाम वकील केस लढवित होते. तब्बल नऊ वर्ष कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.बी.कचरे यांच्या दालनात काल अंतिम सुनावणी झाली आणि इतक्या वर्षांनंतर मृत व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला. गुन्हा सिद्ध झाल्याने वाहनचालकाची हत्या करणाऱ्या शहापूर मधील चारही आरोपींना न्यायालयाने आता संपूर्ण जन्मभर तुरुंगवासाची सजा सुनावली आहे.

एक चारचाकी वाहन जे मिळवण्यासाठी चार व्यक्ती एका निष्पाप जीवाचा बळी घेतात. ज्यामुळे त्या व्यक्तीच कुटुंब देखील अंधारात येत. शिवाय काही लाखांच्या गाडीसाठी चार लोकांना आजन्म कारावास होऊन त्यांची कुटुंबाना देखील त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे चार पैसे मिळवण्याची ही हाव माणसाला कुठच्या कुठे घेऊन जाते हे या घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे नऊ वर्षाने का होईना अखेर न्याय निवाडा झालाच. सदर तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्यात २०१२ साली नोंदवली होती. मात्र नुकतेच तीन-चार दिवसांपूर्वी देखील याच पोलीस ठाण्यात अगदी अशीच तक्रार नोंदवली गेली आहे. ज्यात गाडी चोरी साठी उबेर चालकाची हत्या करून त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकला गेला आहे.

♏♓ वृत्तांकन :- रोशन उबाळे

♏♓ पुनर्लेखन :- संतोष दिवाडकर

गाडीच्या चोरीसाठी उबेर चालकाची हत्या. क्लिक करा खालील लिंकवर

https://mhmarathi.in/?p=1033

पवना लेक कॅम्पिंग – अमावस्येच्या काळोखातील एक चित्तथरारक प्रसंग ; भाग सहा

टीप :- ज्यांनी या आधीचे भाग वाचले नसतील त्यांनी नक्की वाचा अन्यथा कथा आपणास समजणार नाही.पूर्वसूत्र :- मागील भागात आपण पहिले कि ज्या मुलाला भूत समजून करिश्मा गौरव जंगलात पळतात तो भूत नसून शिकारी असतो. त्यांना शोधायला निघालेल्या माझ्या टीम सोबत तोही सामील होतो. करिश्मा गौरवचा सामना अजगराशी होतो. त्याच अजगराचा सामना लेखकाशी होतो. जंगलात गेलेल्या मुलाच्या शोधात कॅम्पिंग जवळ सर्व बैचेन होतात. जीवन,गणेश आणि काही लोक देखील शोधकार्यात पडतात. इतक्यात कोल्ह्यांचा एक टोळक लेखक आणि त्याच्या समवेत असणार्या लोकांच्या अंगावर येते. आता पुढे वाचा कथेचा शेवटचा टप्पा…..

त्या बारक्या पोरा माग आमची पळापळ सुरू झाली. आणि समोरून पाच सहा कोल्हे आमच्या दिशेने यायला लागले. बहुतेक आता आपलं खरं नाही असा विचार करून आम्ही सर्वे एकमेकांजवळ बिलगलो. एका कोल्ह्याने लांबूनच आमच्यावर झडप घातली. पुन्हा एकदा माझ्या कानाजवळून सपकन काही तरी गेल्याचा आवाज झाला. आणि मी पाहिले तर तो कोल्हा जमिनीवर तरफडू लागला होता. नंतर मला समजले की त्या बरक्याचा बाण पुन्हा एकदा माझ्या जवळून गेला. कारण तो आवाज दुसऱ्यांदा कानावर पडला होता. त्याच्या बाणाने थेट कोल्ह्याच्या तोंडाचा वेध घेतला होता. त्यानंतर तो मुलगा आमच्या पुढ्यात गुडघ्यावर बसला. त्याने पाठीमागे हात नेत एक बाण काढला आणि विजेच्या वेगाने समोर सोडला. एका मागोमाग एक त्याने आणखी दोन कोल्ही उतानी केली. ते पाहून बाकीची पळून गेली. आमच्या समोर तीन कोल्हे मरून पडले होते.”बारक्या तू नसता ना आज आमचं सगळ्यांच कामच झालं असत” अशोक त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला.”आज तुमच्या मुळ शिकार झाली. नायतर मी कोटम्याव रातभर बसून एक ससा नेला असता तेवढा.” तो ही खुश झाला. त्याने ते मेलेले कोल्हे एका ठिकाणी ठेवले. आणि आम्ही पुन्हा वनव्याकडे पळ काढला.

“एक मिनिटं सगळ्यांनी वरून व्हा” सखाराम आबाने पोरांना अचानकपणे थांबवले.”काय झालं आबा ?” गणेशने खांद्यावरची बंदूक काढली.”आर माझ्या कडचा बेटरीचा फोकस लय डेंजर. हे बघ काय” त्याने टॉर्च मारली.”आग बाबो… कसल मोठं जनवार आहे ते… हे तर माणूस गिटिन एखादा” एक मुलगा म्हणाला.”केमेरा पण नाही नाहीतर या अजगराचा फोटो व्हिडीओ घेतले असते. फोन पण नाही आणला शीट” जीवन तळमळ करू लागला.”पाव्हन माझा फोन देऊ का ?” गणेशच्या मित्राने विचारले.”अरे पण त्याच्या जवळ कोण जायचं. केमेरा असता तर झूम केलं असत.” जीवन म्हणाला.”चला वरून व्हा पोराव. लवकर बघू तिकड जाऊन” असे म्हणत पुन्हा पळापळ सुरू झाली.

करिश्मा आणि गौरव धावत धावत एका ठिकाणी आले. तिथे वणव्याची फिकीर नव्हती. पण उजेडावर त्यांना सर्व काही दिसत होते. आणि आम्हालाही ते दोघे दिसत होते.”आर दादा ते दोघ सापडले र” बारक्या पळता पळता थांबला.”कुठंय?” घामाने भिजलेले आम्ही धापा टाकत एक सुरात म्हणालो.”ते बघा तिकडं लांब पायथराला शिखराच्या” असे म्हणतात आम्ही वर पाहिले.वर जाणे आता शक्य नव्हते. वर आता एक उंच शिखर दिसत होते. आता वरती जायचं म्हणजे थेट शिखराच्याही वरती असे तो बारक्या म्हणत होता. “गौरव….” अंकुशने आवाज दिला. “दादा वणव्याचा आवाज हाय र… तिथं आवाज पोहोचायचा नाही.” बारक्या असे म्हणाला आणि त्या दिशेने निघाला. आम्ही त्याच्या मागे निघालो.

“देवा खंडोबा रक्षण कर र पोरांचं” खंडू बुवा सारखे भंडारा फुकत होते. “अहो शिंदे मला वाटतंय वणवा लागलाय रानात. दिसतंय का तुम्हाला?” असे म्हणत संदीप सर केम्पिंग पासूनच पाहू लागले. दूरचे पाहण्यासाठी शिंदे सरांनी चष्मा काढला आणि शर्टाला पुसू लागले. तोच पाठीमागून धक्का लागला आणि हातातला चष्मा सटकून तो खाली पडला. तसा त्याच्या काचा फुटल्या. “अहो मॅडम काय हो” शिंदे सर म्हणाले.”अहो अप्पा मी नाही मी इथे आहे” मोरे मॅडम म्हणाल्या.”मग मला धक्का कुणी दिला?” असे म्हणत शिंदे सर मागे वळले.हातात बाटली घेऊन ड्रायव्हर सम्राट डुलत डुलत पाहत होता. “ही ही ही सॉरी हा सर जी. गलती से मेरा पैर फिसला और धक्का लगा” ड्रायव्हर हसत बोलू लागला.शिंदे सरांनी त्याच्या हातातली बाटली खेचली आणि लांब धरणाकडे फेकून दिली.”हराम** तू काय ठरवलंय का मला त्रास द्यायचं” शिंदे सर वैतागले.”आरे बाबा तू जा इथून तुला हात जोडतो मी सम्राट जी” संदीप सरांनी त्याला पुन्हा तिथून जायला सांगितले. शिंदे सरांनी चष्म्याची फ्रेम उचलून खिशात ठेवली.

आता आम्ही देखील गौरव करिश्मा जवळ पोहोचलो होतो. “ए करिश्मा ताई…. ते बघ ते… संतोष,विशाल, संदेश… सगळे आलेत आपल्याला शोधत” गौरवने आम्हाला पाहिले.करिष्माने मान वळवली आणि आम्हाला पाहून ती रडायला लागली. तिला आम्हाला पाहून अश्रू अनावर झाले. दोघेही उठले आणि हळूहळू आमच्या दिशेने यायला लागले आणि आम्ही त्यांच्या. दमलो असल्याने अगदी हळुवारपणे आम्ही चालत होतो. वणव्याचा प्रकाशात सर्व काही दिसत होते. “ए बारक्या इथे हाड हाड का पडलेत रे बघावं तिथं” ऋषीने विचारले.”ओ या भागात कुणी येत नाही किंवा आलं नाही कधी. मी स्वतः पहिल्यांदा येतोय” तो बोलला.”बापरे आपण मग चांगलीच एडव्हेंचर केलंय आज” अंकुश म्हणाला.”आ…. आर दादा… शssss आवाज करू नका…” त्याने आम्हाला थांबवले आणि तो कावरा बावरा होऊन आजूबाजूला पाहू लागला. “ए बाबा काय झालं भुताडकी आहे का इथं?” मी विचारले.”आर दादा आपण शिखरा पाशी आलोय. आणि इथं हडक पण आहेत.” तो मागे पाहून म्हणाला.”म्हणजे?” विशालने विचारले.”म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे” असे म्हणत ऋषी हसायला लागला आणि खिशातील पुडी काढली.”बरोबर बोलला र दादा” बारक्याने ऋषीला सांगितले.”ए काय बरोबरे ? तुला काय म्हणायचंय ते सांग नक्की?” विशालने विचारले.”म्हणजे दादा इथं वाघ आहे” बारक्या दबक्या आवाजात म्हणाला.वाघ म्हणताच आम्हाला परत घाम फुटला. सर्वांना धड धड व्हायला लागली. आम्ही इकडे तिकडे नजर फिरवू लागलो.”म्हणजे आता नसेल ना तो?” विचारता विचारता ऋषीच्या हातातली पुडी निसटून खाली पडली. “आता हाड दिसतायत ना इथं. मग वाघ पण इथंच आहे” बारक्या म्हणाला.आम्ही पुरते घाबरलो. संदेशने दोघांना पटापट येण्याचा इशारा केला. “असू द्या घाबरू नका. आख जंगल हिंडलो. काय झालं का ? बारक्या सोबत आहे ना?” अशोकने धीर दिला.

गौरव आणि करिश्मा आमच्या दिशेने येत होते. आणि वाटेतच त्यांच्या डाव्या बाजूला एक भलेमोठे भगदाड होते. “अय्या हे काय ?” करिष्माने गौरवला ते भगदाड दाखवत विचारले.”काय माहिती ? भुयार बियार असेल” गौरव म्हणाला. “इथे खजिना असेल का रे?” करिश्माने हसतच विचारले.”हो का…. त्या लोकांना बघून लय जोर आला वाटत तुला?” गौरव म्हणला.ते पुढे निघणार तितक्यात आतून आवाज आला.”कसला आवाज हा ?” करिष्माने विचारले.”हा आवाज पहिल्यांदा ऐकलाय. पण हा आवाज ऐकल्या सारखे वाटते. पिक्चर मध्ये” गौरव म्हणाला.”गौऱ्या…. हे भुयार नाही…. ही गुहा आहे..” करिश्मा शांतपणे म्हणाली.”आणि तो आवाज नाही ती डरकाळी होती” गौरव देखील शांतपणेच म्हणाला.दोघेही जोरात ओरडले आणि आमच्या दिशेने पळू लागले.

“आरं ए गणेश खाली आरडाओरडा झाला का र ?” सखाराम आबाने कानोसा घेतला.”आबा आबा पोर दिसतायत पलिकडे” जीवन ओरडला.तसे वरच्या म्हणजेच गुहेच्या बाजूने ते सर्व धावत येऊ लागले. एक मोठी डरकाळी फोडत एक भलामोठा वाघ गुहेतून उडी घेऊन बाहेर आला. बापरे मी टीव्ही आणि राणीच्या बागेत पाहिला त्यानंतर आता पाहिला. एक पट्टेदार वाघ. अतिशय धिप्पाड. लांब लांब मिश्या , भलेमोठे तोंड. आणि तितकाच मोठा त्याचा जबडा व त्यातून दिसणारे सूळया सारखे त्याचे दात. पाहताक्षणी एखादा चक्कर यावा असा तो वाघ. तुम्ही या ठिकाणी मोगली चित्रपटातला शेरखान आठवलात तरी चालेल.

गौरव आणि करिश्मा पुढे पळत होते. त्या वाघाने एकवार नजर टाकली. पंजाने जमिनीवर पाय विखुरले आणि त्यांच्या पाठीमागे तो लागला. पळता पळता करिष्माचा पाय अडखळला आणि ती पडली. गौरव तिला उचलत होता. तोच वाघ त्यांच्या अगदी जवळ येऊन थांबला. दोघेही त्या वाघाकडे पाहत होते. त्यांच्यात जेमतेम दहा बारा पावलांचे अंतर उरले होते. वाघाने त्यांच्या कडे पाहत गदागदा मान हलवली आणि आकाशात पाहत डरकाळी फोडली. त्या आवाजाने सारे जंगल दुमदुमले.”ओह माय गोड” अंकुश उद्गारला.इतक्यात बारक्या गुडघ्यावर बसला. तसा आमच्या जीवात जीव आला.”कम ऑन बारक्या” कपाळावरून घाम टिपत संदेश म्हणाला.बारक्याने धनुष्य हातात धरला. आणि एक हात मागे नेत बाण चाचपडला.”बारक्या बाहुबली ची स्टाईल बंद कर आणि सोड बाण” अशोक बोलला.”आर दादा चार बाण होते… संपले” बारक्या पुन्हा उठला.”आरे तीन कोल्हे मारले… चौथा बाण काय केला ?” विशालने विचारले.”अहो दादा पहिलाच बाण तुमच्या बाजूने नाय का गेला?” त्याने माझ्या कडे पाहिले. आता म्हटलं काही खरं नाही. आता काय करावं सुचेना.

वाघाने चार पावले मागे घेतली.”चालला वाटत?” अंकुश हळूच म्हणाला. तितक्यात मला अक्षय कुमारचा डायलॉग आठवला.’शेर जब चार कदम पिछे जाता हे तो वो झपटने के लिये’ असं आठवलं आणि म्हटलं आता संपलं. तितक्यात वाघाने एक उंच झडप घेतली. त्या दोघांनी डोळे मिटले. आम्ही देखील माना वळवल्या. तोच एक जोरात बार झाला. आणि धाडकन वाघ कोसळला. आम्ही माना वर करून पाहिले. समोर पाहतो तर काय ? वाघाच्या मागे काही अंतरावर गणेश उभा आणि त्याच्या खांद्यावर बंदूक. नेम धरून तो तसाच उभा होता. वेळेवर येऊन त्याने आम्हाला वाचवले होते. करिश्मा गौरव दोघेही उठून उभे राहिले.

“आरे तुम्ही काय पागल आहेत का रे ? इथे कशाला आलात ?” जीवन वैतागून म्हणाला.”ओ जीवन शेठ इथं काय बोलू नका. खाली जाऊन बोलू. नक्की काय झालं ते तिथे गेल्यावरच समजेल.” विशालने जीवनला शांत केले. “ठेंक्स गणेश बरे झाले तू इथे आलास वेळेवर. नाहीतर आता आमचं काही खरं नव्हतं.” मी त्याचे आभार मानले.तो मात्र सैरभैर झाला होता.”संतोष चला इथून” त्याने सर्वांना चलायला सांगितले. “तू असा का पाहतोयस ?” मी विचारले.”अरे गोळी लागली पण वाघ कुठे गेला ?” गणेश असं म्हणताच सर्वांची पुन्हा एकदा घाबरकुंडी उडाली. फार काही न बोलता आम्ही तिथून पावलं उचलीत घाईने निघालो. “काय नाय गोळी लागल्यावर पळाला असेल” ऋषी घुटकी गिळत म्हणाला.पुन्हा एकदा माझ्या डोक्यात फिल्मी डायलॉग आला. ‘जखमी शेर और खतरनाक होता हे’ आम्ही सर्व काळजीपूर्वक चालत होतो.

अचानकच वरच्या बाजूने वेगाने वाघाने हल्ला केला आणि त्याने थेट गणेशवर झडप घातली. काही कळायच्या आतच गणेश खाली कोसळला आणि घरंगळत खाली गेला. त्याच्या खांद्यावरची बंदूक देखील निसटून एका बाजूला पडली. त्याच्या डोक्याला थोडा मार लागला व रक्त यायला लागले. वाघाच्या देखील पाठीला गोळी लागल्याने तो ही रक्तबंबाळ झालेला. दोघेही एकमेकांसमोर उभे होते. वाघ एक एक पाऊल त्याच्या दिशेने जात होता. तो एक एक पाऊल मागे टाकत होता. वरतून आम्ही सर्वे पाहत होतो. “आर यार दादाने आमचा जीव वाचवून स्वतःचा जीव धोक्यात घातला.” करिश्मा रडकुंडीला येत म्हणाली.गौरवने तिचे उद्गार ऐकले आणि त्यानेही खाली उडी घेतली. “गौऱ्या…. ” करिश्मा जोरात ओरडली.गणेशच्या हातातून निसटलेली बंदूक गौरवने उचलली. “ए पोरा बंदूक आन लवकर वर एकच बार आहे त्यात. डबल बारीची आहे ती. घालतो वाघावर. आन इथे” सखाराम आबाने हाक दिली. वरती आम्ही खाली वाघ आणि गणेश आणि मध्यभागी बंदूक घेऊन गौरव उभा असे चित्र होते. सगळं काही वनव्याच्या उजेडावरच सुरू होत आणि दिसत होत.

सखाराम आबा पर्यन्त बंदूक आणून देई पर्यन्त गणेशच्या नरडीचा घोट वाघ घेणार होता. म्हणून गौरवने बंदूक स्वताच्या खांद्यावर ठेवली. “ओ तेरी… हा काय करतोय ?” अंकुश आश्चर्य व्यक्त करीत एक पूल पुढे आला.”याला बंदूक चालवता येते ? हा वाघ मारेल का?” गणेशच्या एका मित्राने आम्हाला विचारले.”याने कधी ऑफिसमध्ये मुंगळा नाही मारला हा वाघ कधी मारणार ?” संदेश हळूच बोलला.”याने दिवाळीत पण बंदूक नाही चालवली” मी असं म्हणताच सखाराम आबा चक्कर येऊन खाली पडले. गणेशची पावलं थांबली. एका झाडाला येऊन गणेश थांबला. आता त्याला मागे जाता येईना. म्हणून त्याने गुडघ्यावर बसून घेतले आणि स्वतःला त्याच्या स्वाधीन केले. आता आमची दुसरी नजर गौरव वर खिळली. वाघ अगदी गणेशच्या जवळ गेला. गौरवच्या नेम धरणार पण थरकाप उडाल्याने त्याच्या खांद्यावरून बंदूक निसटली आणि खाली पडली. “अरे यार….” जीवनने डोक्याला हात लावला.

“सखाराम आबा खाली जा उठा” चक्कर येऊन पडलेल्या आबाला पोर उठवू लागली. गौरवने पुन्हा बंदूक उचलली. वाघाने गणेशच्या अगदी जवळ आला. त्याने गणेशचा वास घेतला. आणि जिभेने त्याच्या डोक्यावरचे रक्त चाटले. आणि तसाच तो मागे फिरला. पण आठ दहा पावले मागे वळताच गणेशने डोळे उघडले. मागे आलेला वाघ पुन्हा त्याच्या दिशेने धावला. एक उंच झेप त्याने घेतली. आणि डरकाळी फोडत गणेशच्या अंगावर झेपावू लागला. गणेशने डोळे पुन्हा मिटले आणि हात वर केले. इकडे मी जोरात ओरडलो.”गौरव किल….”किल शब्द ऐकताच गौरवने बंदुकीचा चाप ओढला. गोळी बंदुकीच्या नळीतून बाहेर पडली. काही कळण्याच्या आतच गोळी वाघाच्या डोक्यात शिरली. गोळी लागताच वाघ खाली कोसळला. आणि गतप्राण झाला.

“येह…. फट्टासा हेडशोट” असे म्हणत गौरव जोरात ओरडला. आम्ही सगळे काहीवेळ पाहतच राहिलो. गणेश देखील एक वेळ वाघाकडे, एकवेळ गौरवकडे आणि आमच्याकडे पाहू लागला. आम्ही सर्वांनी धपाधप खाली उड्या घेतल्या. गणेशच्या मित्रांनी गौरवला उचलून घेतले आणि नाचायला लागले. मी त्याच्या डोक्यावर जोरजोरात कुरवाळून शाबासकी दिली. आम्ही क्रिकेट मॅच सारखं सेलिब्रेशन करू लागलो. सखाराम आबा शुद्धीवर आले आणि त्यांना काय झाले कळेनाच. ते पुन्हा बेशुद्ध झाले. “आरे तू होळीला बंदूक वापरीत नाय. आन तुला कस जमलं हे ?” जीवन हसतच गौरवला विचारू लागला. “हा रे कसं काय ? ते पण डायरेक्ट डोक्यात हेडशोट ?” अंकुशने ही विचारले.

“भाई पबजी…. ” गौरव उद्गारला.”पबजी ??” विशालने विचारले.”पब्जीचा अनुभव कामी आला. संतोष किल म्हणाला आणि पब्जी समजून मी नेम धरला. किल….” गौरव म्हणाला.आम्ही सगळे हसायला लागलो. त्यानंतर आम्ही सर्वे उठलो आणि केम्पिंग कडे निघालो. रात्रभर काय झालं हे सगळं आम्ही केम्पिंग कडे येऊन कथन करीत होतो. आमची चित्तथरारक गोष्ट ऐकून सगळे भारावून गेले होते. जो तो आपला आपला किस्सा सांगत होता. की त्यांनी काय काय पाहिलं. जो ससा पाहून गौरव करिश्मा रानात गेले तो बारक्याच्या फासात अडकला होता. आणि बारक्याला घाबरूनच पुढे जे घडले ते घडले. बारक्याने गौरव आणि करिश्माला तो ससा दिला. आणि रान डुक्कर घेऊन तो त्याच्या घरी गेला. सकाळ होत आली. आम्हाला रात्रभर झोप नसल्याने आम्ही दमलो होतो. पण आता झोपलो तर केम्पिंग ची मजा येणार नव्हती. तरी गणेश म्हणाला तीन चार तास झोपा आपण करूच मजा. आणि आम्हाला रूम मध्ये बिछाना घालून दिला.

शिंदे सर टॉयलेट कडे गेले. पण पाहता तर आमचा ड्रायव्हर त्या संडासात पिऊन आडवा झालेला.”आरे बाबा तू काय माझी पाठ धरलीस ? चल उठ हो बाहेर” शिंदे सर जोरजोरात आरडाओरडा करू लागले. पुन्हा संदीप सर हसत हसत तिथे गेले आणि त्यांनी ड्रायव्हरला तिथून बाहेर नेले. दुसऱ्या दिवशी आम्ही केम्पिंग मध्ये खूप धमाल केली. पण खरं सांगतो खरं एडव्हेंचर ना रात्रीच आजमावल होत. अगदी जीवावर बेतणार एडव्हेंचर. जे आमच्या या आठवणीत कायम बसणार होत.धन्यवाद !

टीप :- वरील कथा पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा कसलाही संबंध नाही. कथेतील काही पात्र ही लेखकाच्या परिचयाची असून इतर पात्रे तयार करण्यात आली आहेत. मनोरंजनाच्या दृष्टीने लिहलेली ही कथा काल्पनिक असल्याने कोणत्याही वन्य प्राण्यांची हिंसा होणे देखील काल्पनिकच आहे. वन्य प्राण्यांची हत्या करणे कायद्याने गुन्हा असून आम्ही त्याचे समर्थन करीत नाही. याउलट प्राणी मित्र म्हणून आम्ही निसर्गाचे ऋणी आहोत. त्याचबरोबर २०२० ची हि शेवटची कथामालिका देखील इथेच संपत आहे. भेटूयात नव्या वर्षात नव्या उमेदीत आणि काही नव्या कथा व संकल्पनासह. तो पर्यंत धन्यवाद !!!!

पवना लेक कॅम्पिंग – अमावस्येच्या काळोखातील एक चित्तथरारक प्रसंग ; भाग पाच

टीप :- ज्यांनी सुरुवातीचे चार भाग वाचले नसतील त्यांनी नक्की वाचा अन्यथा कथा आपणास समजणार नाही.पूर्वसूत्र :- मागील भागात आपण पहिले कि करिश्मा आणि गौरव एका सश्याच्या पाठीमागे जाऊन जंगलात हरवतात. तिथे त्यांना एक दहा वर्षाचा लहान मुलगा दिसतो. ज्याला घाबरून ते जंगलात आणखी आत शिरतात. शेकोटी जवळ बसलेले त्यांच्या शोधात निघतात. कॅम्पिंग जवळ सर्वजण गायब झाल्याने सिनियर मंडळी चिंताग्रस्त होतात. आता पुढे….

सर्वांच्या मोबाईलचे टॉर्च सुरू होते. सगळ्यांना घेऊन मी वाट काढीत जंगलातून वरच्या बाजूला निघत होतो. आणि सपकन काहीतरी माझ्या कानाच्या बाजूने गेल्याचे जाणवले. “ए कोणे ? काये?” मी ओरडलो.तसे सगळे काय झालं म्हणून पाहू लागले.तितक्यात आम्हाला समोरून कोणी तरी येत असल्याचे जाणवले. अचानक समोर प्रकाश पेटला. तो प्रकाश एखाद्या जुन्या कंदिलाचा असावा. आणि एक दहा वर्षांचा मुलगा आमच्या दिशेने येऊ लागला. लांब सडक केस, कधीही न धुतलेले, उघडा बंब, मळकी चड्डी. तो आमच्या जवळ आला. “कोण रं तुम्ही ?” त्याने विचारले.”तू कोण आहेस ?” मी विचारले.”थोडक्यात वाचला रं दादा तू. आता माझा बाण लागला असता तुम्हाला. मला वाटलं जनावर आलं म्हणून मी सोडला बाण” तो त्यांच्या कातकरी ट्यून मध्ये म्हणाला.त्यावरून मी ओळखले हा एखादया कातकऱ्याचा मुलगा आहे आणि तो शिकारीला आला आहे. “शिकारीला आलाय का ?” मी विचारले.”शिकारीला आलोय पण काय भेटना आज. फासात तेव्हढा एक ससा गुतलाय. पण मोठं जनावर काय मिळत नाय आज” असे तो म्हणाला.”ए बारक्या इथे कुणी आलं होतं का रे ? म्हणजे एखादा माणूस आणि पोरगा पोरगी ?” अशोकने विचारले.”माणूस नाय ओ माहिती. पण पोरगा पोरगी आलथ इथं” तो म्हणाला”कुठं गेले ते?” संदेशने पटकन विचारले.”अहो इथं माझा फास होता म्हणून काय अडकल बघाय आलो तर मला एक पोरगा नी पोरगी दिसले” तो म्हणाला.”मग कुठे गेले ते ?” ऋषीने विचारले.”मी त्यांच्या जवळ जात होतो तर मला घाबरून इकड वरल्या बाजूला पळाले दोघे” तो म्हणाला.”अरे बारक्या तू दिसतोस असा भुता सारखा. तू आवाज देऊन थांबवायचं ना” विशाल म्हणाला.”आवाज ? आवाज दिला तर जनावर पळून जाईल की” तो म्हणू लागला.”एक काम कर आम्हाला दाखव ते कुठे गेले” स्वप्नील म्हणाला.”अहो हे इथून वर निघा या जाळकांडातुन वाकून पुढं निघा” त्याने बोट दाखवले.”तू चल ना बारक्या आम्हाला नाही ना माहिती” अशोक म्हणाला.”मी कशाला ? इथं जनावर येत. पाण्याचा कोटमा आहे इथं. इथंच असतो मी” तो काही येईना. “अरे चल ना बाळा. आम्हाला काही माहीत नाही रे. तुला पैसे देतो.” प्रसादने खिशातून दहाच्या नोटा काढल्या.”बर चला. माझा कंदील घ्या इकडे.” तो म्हणाला.ऋषीने त्याचा कंदील धरला तसे आम्ही त्याचा मागोमाग जंगलात वरच्या बाजूला निघालो.

“हे मोठं इपरित झालं म्हणायचं” खंडू बुवा म्हणाले.”तुमच्या मालकाला बोलवून घ्या” संदीप सर म्हणाले.”अहो तो मालक गावात राहतो. आणि गाव इथून काय जवळ नाय. एक काम करा तुम्ही तुमची गाडी काढा. आपण मालकाला आणू” खंडू बुवा म्हणाले.तसा जीवन गाडीकडे बघून आला.”अहो सर तो ड्रायव्हर गाडीत नाहीये. त्याला पण नेला वाटत अशोकने” जीवन म्हणाला.”कशाला आणला असला माणूस. ” शिंदे सर वैतागले.”आयला हि काय फालतूगिरीये ? ओ शिंदे सर बघुयात का आपण जाऊन ?” संदीप सर म्हणाले.”नाय नाय तसं करू नका. तुम्हाला माहिती नाय. आणि पोरं पण जाणकार नाय. ती १००% चुकणार आत. कारण जाणकार जरी गेला तरी तो आत गेल्याव सैरभैर होतो. वाट घवत नाय. थांबा आपण सखाराम आबा ला आणू त्याच घर हितून जवळे. ते पक्क हुशारे. रानातलं सगळं माहितीये त्याला.” असे म्हणत खंडू बुवा आत गेले आणि भंडारा घेऊन बाहेर आले. त्यांनी सर्वांच्या माथी भंडारा फासला. “देवा खंडोबा रक्षण कर र बाळ गोपाळाच” असे म्हणत थोडासा भंडारा जंगलाच्या दिशेने फुकुन दिला.

“गौरव मला वाटत आपण इथे दगडाच्या पाठी जरा सेफ आहोत.” असे करिश्मा म्हणते ना म्हणते तेच तिच्या हाताला कसलासा स्पर्श झाला. तिने हात मागे घेतला. “गौरव ? काय झालं?” तिने विचारले.”काही नाही ताई. मलाही वाटत आपण इथे सेफ आहोत. एक काम करू का ? मी ना इथे आग लावतो म्हणजे प्राणी येणार नाहीत” गौरव म्हणाला.दगडाला बिलगलेल्या करिश्माच्या मानेला पुन्हा स्पर्श झाला.”गौरव तू काय करतोयस ?” तिने थोडे रागात विचारले.”अग मी मघाशी बार्बेक्यू पेटवले ना तर माचीस खिशात राहील होत. थांब मी इथे गवत पेटवतो. म्हणजे इशारा मिळेल जो आपल्याला शोधेल त्याला.” उभे राहत गौरव म्हणाला.”गौरव तू तिकडे आहेस ? मग इथे माझ्या बाजूला कोण आहे?” असे म्हणत करिश्मा धावपळ करीत उठली. आणि त्याच्या सोबत उभी राहिली.”काय झालं दीदी आता?” गौरव म्हणाला.”अरे मला वाटलं की तुझा हात मला लागतोय पण तू तर इथे आहेस. तिथे अंधारात कोण आहे बघ बर. ते मघासच पोरग तर नसेल ?” करिश्मा म्हणाली.”अरे पण इथे मला तू दिसत नाहीस. आपण कुठे बसलो तेही दिसत नाहीये.” गौरव म्हणाला.”अरे हे काय इथे समोरच दोन पावलांवर बसलेलो आपण. तू ते माचीस पेटव आणि त्याच्या उजेडावर बघ” करिश्मा म्हणाली.”हा हा थांब” असे म्हणत गौरव ने माचीस पेटवले. आणि जवळ नेले. काहीतरी दिसले आणि तितक्यात माचीस विझले.”गौरव काय आहे तिथे?” करिश्मा घाबरून म्हणाली.”थांब यार काय नीट दिसले नाही.” गौरव म्हणाला.त्याने दुसरी काडी पेटवली. तसा उजेड पसरला. आणि त्या उजेडात त्यांनी जे पाहिले ते पाहून त्यांच्या पाया खालची जमीनच सरकली. दोघेही थरथर कपू लागले. ते दोघे बसलेल्या ठिकाणी एक भले मोठे अजगर बिळातून बाहेर येऊन बसले होते. एनाकोंडा पिक्चर मध्ये असावं अगदी त्यापेक्षा थोडं लहान. पुढ्यात असलेलं अक्राळ विक्राळ अजगर पाहून करिश्माला चक्कर येऊ लागली. दोघे पुन्हा एकदा धावायला लागले. गौरव अंधारातून वाट काढू लागला.

इकडे आम्ही आम्ही चालत चालत एका ठिकाणी आलो. बारक्या क्षणभर थांबला.”आर दादा…. इकड आण जरा कंदील. इथं रान डुक्कर हाय. कुणी मारलं असेल याला ? अर्ध खाल्लं आहे र. बिबट्याने खाल्लं असणार” असे म्हणत तो ते डुक्कर गोणीत भरू लागला.”काय बिबट्या ? पण तुझा केम्पिंगवाला मित्र तर म्हणाला इथं बिबट्या नसतो” संदेशने मला विचारले.”आरं दादा… रानात आलाय तुम्ही. इथे असणारच ना.” तो मुलगा म्हणाला.”ए बारक्या ते जाऊदे आता. ते दोघे कुठे आहेत ते बघू.” अशोक म्हणाला.” थांबा जरा मी गोणी झाडावर ठेवून येतो. मंग घरी जाताना नेता येईल.” तो सरसर झाडावर गेला आणि गोणी ठेवून आला. आणि आम्ही पुढे जायला निघालो.थोडं पुढे आल्यावर आम्हाला मोबाईलचा टॉर्च दिसला.”विशाल अरे मोबाईलचा टॉर्च दिसतोय.” ऋषी म्हणाला. आम्ही त्या उजेडाचा दिशेने निघालो.

इकडे शिंदे सर, जीवन आणि खंडू बुवा सखाराम आबा च्या घरी आले. सखाराम आबाने त्यांच्या नातवाला गाडीवर गणेशला बोलवायला पाठवले. मदतीला चार माणसं मागितली. आणि ते सर्वे वेताळबुवा च्या झाडा जवळ जमले.

“गौरव माझं ऐक. मला त्या एनकोंडा जवळ सोड. मला नाही जमणार आता पळायला. एकदाच काय ते होऊन जाऊ दे ना” करिश्मा रडायला लागली.गौरव देखील घाबरला होता.”ताई एक मिनिटं मी काही तरी करतो.” असे म्हणत त्याने माचीसची काडी ओढली आणि गवतात टाकली. एकच भडका उडाला. सरसर गवताने पेट घेतला. हवेमुळे आग पांगु लागली.

“अरे हा तर गौरवचा फोन आहे” अंकुशने खाली पडलेला फोन उचलला.”आता कुठे गेले असतील ?” अंकुश पुन्हा म्हणाला.”दादा मला वाटत शिकार झाली तव्हा ते इथच होते. म्हणजे ते इथून पळाले असतील. आणि घाबरून फोन पडला असेल.” तो बारक्या सांगू लागला.”तुला काय वाटत कुठे जातील तिथे चल” विशाल म्हणाला.”या माग माग” असे म्हणत आम्ही त्याच्या मागे निघालो.

खंडू आबा, मोरे मेम आणि श्वेता केम्पिंगच्या ठिकाणी काळजी करीत बसले होते.”बाई असं कशाला करायचं यांनी. नसतो आलं ते परवडले असते” मोरे मॅडम म्हणाल्या.”ओ बाबा सापडतील ना ते” श्वेताने विचारले.”हो… मालक आले वाटत बघा. तिकड फटफटीचा आवाज आला. आता घवतील पोर” खंडू बुवा म्हणाले.”काय झालं सर संतोष पण गेलाय का आत रानात ?” बाईकवरून उतरून झाडाखाली थांबलेल्या सरांना गणेशने विचारले.”हो ना… काय मूर्खपणा करताय काय माहीत. एकतर कुणाला काही माहिती नाही.” संदीप सर म्हणाले.पाठीमागून चार पाच टू व्हीलर आल्या. गणेश आठ-दहा पोर मदतीला घेऊन आला.”सर तुम्ही केम्पिंग पाशी थांबा. आम्ही बघतो.” असे म्हणत गणेश, सखाराम आबा आणि त्याचे काही मित्र रानात शिरले. “थांबा मी पण येतो जोडीला” असे म्हणत जीवन देखील त्यांच्या सोबत निघाला.

गौरवने लावलेली आग आता पूर्ण वाढली होती. आगीच्या भीतीने आसपासचे हिंसक प्राणी दूर पळाले होते. पण आता त्याच आगीत ते दोघेही अडकले होते. आगीच्या उजेडाने ते दूरपर्यंत पाहू शकत होते. आणि उजेडात वाट शोधण्याचा प्रयत्न करीत होते.

“आर ह्या काय ? आग लागली का काय ?” संदेशने आगीचा लोट पहिला.”आग लागली नाय र लावली आसल.” बारक्या वेगाने चालू लागला.”कुणी लावली?” अंकुशने विचारले.”तुमच्या मित्रांनी लावली असल. अशी लागत नाही आग. आणि दुसरं कोण येत नाय र इथं. तेच असतील” असे म्हणत आम्ही त्याच्या मागे चालत सुटलो.

जीवन, गणेश आणि त्याचे मित्र पाठीमागून वेगाने डोंगर चढत होते. काट्या कुट्यातून ते वाट काढीत होते.”आबा कुढ गेली असतील पोर ?” गणेशने विचारले.”आर हित जाळी मोडली आहे. वरच्या भागातच असतील. सायरीच्या रानात” असे म्हणत ते ही वाट काढू लागले. गणेशच्या खांद्यावर चापाची बंदूक लोड केलेली होती. अचानक होणाऱ्या कुठल्याही हल्ल्या पासून बचाव करण्यासाठी.

गौरव आणि करिश्मा आगीच्या विळख्यातुन स्वतःची सुटका करतात. दोघेही धुराने काळे झालेले असतात. परंतु ते जीव वाचवून पळत असतात. कारण वणवाही त्यांच्या पाठीमागे वेगाने येत असतो. जर हालचाल केली नाहीतर वणवा त्यांना गाठू शकत होता. नाविलाजाने त्यांनी आणखीन वरच्या बाजूला प्रवास सुरु केला. पाठीमागून येणाऱ्या वनव्याच्या उजेडावर ते पुढचे आणि पाया खालचे सर्व काही पाहू शकत होते.आम्ही देखील आता वनव्याच्या दिशेने पळत होतो. आणि तितक्यात माझा पाय अडखळला आणि मी तोंडावर आपटलो. पण तोंड वाचवण्यासाठी हात मध्ये आणला म्हणून माझ्या हाताला खरचटले. इतक्यात माझ्या पायाला कायतरी पटकन लपेटल्या सारखे झाले. हातातून निसलेला मोबाईल मी उचलला आणि पाहिले तर एका अक्राळ विक्राळ अजगराने माझ्या पायाला विळखा मारला होता.मी बोंबाबोंब सुरू केली. तसे ते पळणारे सर्व थांबले आणि मागे फिरले. अशोक माझ्या जवळ आला आणि तितकाच दूर गेला.भला मोठा अजगर पाहून कुणाचीच पाचावर धार राहिली नव्हती. त्या बारक्या मुलाने पटकन झडप दिली आणि अजगराचे मुंडके धरले.”आर बघू नका साप व्हडा. मी तोंड धरलय.” तो पोरगा ओरडू लागला.सगळे घाबरत होते. तरीही स्वप्नील, संदेश, अंकुश आणि ऋषीने जोर लावला. प्रसाद, अशोक आणि विशालची हिंमत होईना. पण बराच वेळ सुरू असलेली झटापट पाहुन त्या दोघानीही जोर लावला. काही वेळातच अजगर थकला आणि शांत झाला. तसा विळखा सैल झाला आणि मी माझा पाय खेचला.आवळला गेल्याने पायाला मुंग्या आल्या होत्या. “थांबा सोडू नका… मी सांगतो तव्हर.” त्याने सांगितले.तो एका बाजूला आला आणि त्याने एक इशारा केला तसे सर्वांनी अजगराला सोडले. अजगर देखील हळुवारपणे खालच्या बाजूला निघून गेला. मी देखील कसाबसा उभा राहिलो. आणि पुन्हा शोधमोहीम सुरू केली.

“त्या आईच्या गावात ? गण्या ए आरे हिकडं बघ रक्तये कुणाचं तरी?” त्याच्या मित्राने रक्त दाखवले.जीवन आणि गणेश सर्वच धावू लागले.”आर थांबा भ्येता कायला ? जनावरच दिसतंय. शिकार फिकार झाली आताच” सखाराम आबा म्हणाले.”आग बाबो… कसला र वणवा लागलाय. सायरीच्या रानाला?” एकाने वनव्याकडे लक्ष वळवले.”म्हणजे हे सर्व तिकडे आहेत” गणेश जीवन कडे पाहत म्हणाला.”तुम्हाला कस माहिती गणेशजी” जीवन ने विचारले.”जीवन जी हा वणवा अचानक लागू शकत नाही कुनी लावल्या शिवाय. हे सर्व तिकडेच आसपास असणार चला” गणेश म्हणाला आणि सर्व तिकडे चालू लागले.”त्याआयला पोर हिकडं काय रान पेटवून द्यायला आलीत का काय ?” सखाराम आबा देखील पळता पळता बोलू लागले.

त्या बारक्या पोरा माग आमची पळापळ सुरू झाली. आणि समोरून पाच सहा कोल्हे आमच्या दिशेने यायला लागले. बहुतेक आता आपलं खरं नाही असा विचार करून आम्ही सर्वे एकमेकांजवळ बिलगलो. आणि तितक्यात पापणी मिटायच्या आतच एका कोल्ह्याने लांबूनच आमच्यावर झडप घातली.

क्रमशः

पवना लेक कॅम्पिंग – अमावस्येच्या काळोखातील एक चित्तथरारक प्रसंग ; भाग चार

टीप :- ज्यांनी सुरुवातीचे तीन भाग वाचले नसतील त्यांनी नक्की वाचा अन्यथा कथा आपणास समजणार नाही.पूर्वसूत्र :- मागील भागात आपण पहिले कि कशाप्रकारे सर्व टीम कॅम्पिंग नाईट एन्जोय करते. सगळे झोपल्यानंतर शेकोटी करता करता करिश्मा गौरवला घेऊन वेताळबुवाच्या झाडाकडे जाते. पुढे काय होते ते तुम्हीच वाचा.————————————————–

इतक्यात झाडी मध्ये वरच्या बाजूला कसलासा आवाज झाला. दोघांनी पटकन टॉर्च तिकडे फिरवला.”ए गौऱ्या ससा आहे ना तो?” करिश्मा कुतुहुलाने बोलली.”दीदी ससाच आहे. पकडायचा का ? मी एकदा पकडला होता माझ्या गावी कोकणात” गौरव देखील पटकन म्हणाला.”हम्म बघ बरं..” करिश्माने त्याला पुढे ढकलत मानेने खुणावले.हळुवार पावलं टाकीत गौरव सशाच्या मागे जाऊ लागला. गौरव पुढे येताच ससा दोन पावले पुढे जायचा. असे करत करत गौरव आणि करिश्मा हळूहळू आत जंगलात शिरू लागले. त्यांचे लक्ष फक्त सश्यावरच होते. आपण त्याच्या नादात कुठ चाललोय याचं त्यांना भान न्हवत. आणि बरंच अंतर कापून पुढे आल्या नंतर गौरवने सश्यावर झडप मारली. सश्याने पटकन एका झाडीत उडी घेतली. गौरवने पुन्हा त्याच्या दिशेने टॉर्च मारली तर त्याच झाडीतून एक भेकर (हरणा सारखा प्राणी) उड्या मारीत लांब निघून गेले. आणि ससा मात्र कुठेही दिसेनासा झाला.

“वाव हरीण ??” करिष्मा ओरडली.गौरव मात्र कावराबावरा झालता.”ताई पण ससा ?” त्याने मागे वळून विचारले.”कुठे आहे तो ?” करिश्माने विचारले.”त्याने जिथे उडी मारली तिथून हा हरण आला” गौरव म्हणाला.”म्हणजे ? तुला काय म्हणायचंय ?” करिश्माने गंभीरपणे विचारले.”काही नाही चल परत जाऊ” गौरव म्हणाला.त्यानंतर ते दोघे माघारी जाण्यासाठी वळले.काही वेळ ते इकडे तिकडे टोर्च मारू लागले.”अरे पण जायचं कुठून ? इथून तर बाहेरच काहीच दिसत नाही. आणि आलोय कुठं ते पण माहीत नाही.” करिश्मा मागे टॉर्च फिरवत म्हणाली.”ए संतोषsssss. संदेशssss” गौरव आवाज देऊ लागला.”गौऱ्या मला वाटत आवाज जाणार नाही. आपण इथून मागून खाली खाली निघत जाऊ. धरण तर दिसणार नाही पण लाईट जरी दिसली ना तरी आपण बाहेर पडू.” करिश्मा म्हणाली. ते दोघेही चाचपडत चाचपडत वाट शोधू लागले. पण नेमकं कोणत्या दिशेला निघावं हे काही त्यांना कळेना. काट्या कुट्यातून ते वाट काढू लागले. “आह….” करिश्मा ओरडली.”काय झालं ताई ?” गौरवने विचारल.”काटा लागला वाटत” करिश्माने चपलीतला काटा काढला.इतक्यात झाडाच्या फांद्या गदागदा हलायला लागल्या. दोघेही वर पाहायला लागले.”कोणे ?” गौरवने विचारले.इतक्यात त्यांना पावलांचा आवाज कानावर पडला.

“एक मिनिटं… कोणीतरी इकडे येतंय वाटत” करिश्मा म्हणाली.”कोण असेल बरं ?” गौरवने विचारले.”शिंदे सर…. संदीप सर….” करिश्मा आवाजाच्या दिशेने पाहत म्हणू लागली.”संतोष…. संदेश….” गौरव देखील हाक मारू लागला.आणि अचानकच दोघांना अंधारात कसलीशी हालचाल दिसली. दोघांनी अंधारात नीट न्याहाळून पाहिले. त्यांच्या नजरेस काहीतरी पडत होते. काळीकुट्ट सावली त्यांच्या जवळ येतेय अस त्यांना भासल. अचानकपणे तिथे एक लक्ख प्रकाश पेटला आणि त्या प्रकाशात त्यांना आठ दहा वर्षांचा एक लहानसा मुलगा दिसला. त्याला पाहताच दोघांना घाम फुटला.”ए कोण आहेस तू ?” करिश्माने घाबरत विचारले.अंधारात तो एक एक पाऊल पुढे टाकीत त्यांच्या जवळ येऊ लागला.तसे ते दोघेही जोरात किंचाळले आणि वाट मिळेल तिथे पळत सुटले.

“हा हा हा हा…. शिंदे सरांनी कसली खेचली त्या ड्रायव्हरच्या कानाखाली” विशाल हसत हसत सांगत होता.”भाई करिश्मा पण म्हणत होती आता याला एक कानाखाली टेकवतेच. पण आधीच त्याला शिंदे सरांनी दिली ठेवून” संदेश म्हणाला.”अरे करिश्मा आणि गौरव अजून आले नाहीत” मी आठवण केली.तसे सर्व शांत झाले. आणि एकमेकांकडे पाहू लागले. आम्ही सर्व एकसाथ उभे राहिलो आणि ते दोघे गेले त्या दिशेला पाहू लागलो. मोबाईलचा कसलाही उजेड दिसत नव्हता. “भेंडी बोलायचा नादात लक्षात पण नाही आलं” ऋषी बोलला.”एक काम कर ना ते तंबूत आले का बघून ये बर… इथून मागच्या बाजूने गेले असेल तर” अशोक म्हणाला.”संदेश चल बर” मी आणि संदेश पाहून आलो.”अरे ते नाहीये तिथे… आणि गौरव पण नाही आला” संदेश म्हणाला.”अरे अशोक तुझा ड्रायव्हर पण गाडीत नाहीये” ऋषी गाडी कडे बघून आला.”च्यायला काय भानगड आहे ?” विशाल म्हणाला.”आज अमावस्या आहे. तरी तो म्हणत होता बाहेर नका पडू” मी म्हणालो.”अरे संतोष काय राव तू पण बोलतो. कशाची रे अमावस्या. चला इथं नका बोलू. कुणाला काही बोलू नका सर ओरडतील. आपणच जाऊन बघू” असे म्हणत आम्ही त्या वेताळ झाडा कडे निघालो. “मघाशी करिश्मा त्या ड्रायव्हरवर हसली ना रे. म्हणून मला जरा भीती वाटते” स्वप्नील म्हणाला.”त्याने जर शहाणपणा केला ना त्याला लय महागात जाईल” विशाल म्हणाला. आम्ही पटापट पुढे जाऊ लागलो.

करिश्मा आणि गौरव अंधारातच कुठेही पळत सुटले. आणि एका मोठ्या झाडाखाली येऊन थांबले. “गौऱ्या कोण होता तो ?” करिश्मा घामाने थबथबली होती आणि धापा टाकत होती.”मला कस माहिती… मला तर आता वेगळंच वाटू लागलय. इथे रेंज पण नाही. कुणाला कस बोलवायचं” गौरव पण घाबरला.”गौऱ्या 2 वाजलेत. आपल्याला कुणी बघायला का आलं नाही?” करिश्मा म्हणू लागली.”अरे आपण कुठे आलो आपल्यालाच माहीत नाही” असे गौरव म्हणाला.तोच पाठीमागून पुन्हा पाचोळ्याचा आवाज झाला. पाहतात तर काय एक रान डुक्कर त्यांच्या दिशेने येताना दिसला. त्या दोघांनी एकमेकांना पकडले. गौरव त्याच्या कडे डोळे फाडून पाहत होता. तो त्यांच्यावर हल्ला करणार म्हणून दोघांनी जमिनीवर बसून घेतलं. डुक्कर त्यांच्या दिशेने येण्या पूर्वी अचानकपणे झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुसंडी मारली आणि हवेत झेपावून थेट डुकराची मान धरली आणि त्याला लोळवले. धुराळा उडाला आणि करिश्मा गौरव तिथून जोरात पळू लागले. दोघेही ओरडत ओरडत निघाले.

“हेच ना रे ते वेताळ झाड ?” अशोकने मला विचारले.”आर बाबा ह्या काय ? यांनी अंडी फोडली इथ आणि हे गेले कुठं ?” संदेश इकडे तिकडे पाहू लागला.”साहेब हे जंगलात तर नसतील ना गेले ?” विशालने मला विचारले.”नाही असं का करतील ते ?” मी म्हणालो.”अशोक तुझ्या त्या ड्रायव्हरला बघ यार. मला तर त्याच्यावर डाऊट येतो आता फुल. सरांनी त्याला मारलं त्याचा राग काढायचा असेल तर तो काही करेल.” ऋषी बोलला.”हा यार अशोक पहिले त्या भडव्याला बघ” विशाल म्हणाला.”अरे इथं रेंज नाय फोनला. कुठे बघू ?” अशोक म्हणाला.”संतोष सर मला वाटत आपण इथे थोडं आत रानात शिरून आवाज द्यावा. काही समजलं तर इथेच समजेल. मला नाही वाटत ते दुसरीकडे कुठे जाऊ शकतात” प्रसाद मला म्हणाला.”करिश्मा….. गौरव….” संदेश आवाज देत होता.आम्ही देखील त्यांना शोधायला आत घुसलो.

दोघेही घनदाट झाडीतून वाट काढीत होते. आणि याच धावपळीत गौरवचा फोन देखील एका ठिकाणी पडला. बिबट्याच्या भीतीने तो न उचलता अंधारातच ते वाट काढत पळत सुटले.”गौऱ्या टॉर्च ?” करिश्मा म्हणाली.”आग ताई फोन पडला मधी” गौरव म्हणाला. “आरे आता अंधारात कसं काय जायचं ? मला तर तू पण दिसत नाहीस” करिश्मा घाबरत म्हणाली.”मी बाजूलाच आहे.” गौरव हात लावून म्हणाला.पळून पळून दोघेही घामाघूम झाले होते. दोघांना धाप लागली होती. बिबट्या मुळे दोघेही थरथर कापत होते. करिश्मा एका ठिकाणी खाली बसली.”गौऱ्या…. पाणी पाहिजे आता. नाहीतर मला चक्कर येईल” असे म्हणत डोळे मिटून ती खाली पडली.तसा गौरव खाली बसला.”आग ए ताई… अस नको करुस… चल उठ काय तरी रस्ता सापडेल. इथून चल बिबट्या यायचा इथं” गौरव तिला उठवत होता.

“च्या मारी ? जंगला कडे टॉर्च कुणाचे ?” बाथरूम साठी उठलेल्या जीवनने पाहिले. त्यानंतर त्याने सर्व तंबू पाहिले. त्याला कुणीच दिसले नाही. म्हणून त्याने थेट संदीप सर आणि शिंदे सरांना उठवले.”अहो सर ही पोर वाटत जंगला कडे गेली. मला मोबाईल टॉर्च दिसले. मी आता लगवीला उठलो तेव्हा” जीवन म्हणाला.”काय बोलता ? पोर इथं नाहीत?” संदीप सर पाहू लागले.”म्हणून मला वाटत होतं यांना आधी झोपून द्यायला पाहिजे होत. तो दिवाडकर घेऊन गेला असेल यांना” शिंदे सर वैतागले.बाहेर चाललेल्या आवाजामुळे मोरे मॅडम आणि श्वेता देखील बाहेर आले.”काय झालं आप्पा ? काही प्रॉब्लेम ?”मोरे मॅडमने विचारले.”काय नाय मॅडम ही पोर कशाला रानात गेली काय माहिती?” जीवन म्हणाला.”आग श्वेता…. करिश्मा कुठंय ?” संदीप सरांनी श्वेताला विचारले.”काय माहीत असेल तिच्या टेंट मध्ये” श्वेता म्हणाली.”काय माहीत काय ? जाऊन बघ पहिले” संदीप सर ओरडले.”ओ सर ती नाहीये आत” श्वेताने सांगितले.”आईचा घो… गेले कुठे हे सगळे ?” शिंदे सर टेन्शन मध्ये आले.”गौरव पण गेलाय वाटत. आता येऊ दे त्याला असा फोडतो ना. लय झाली त्याची नाटक. लहान भाऊ म्हणून जास्त शेफरलाय” संदीप सर वैतागले.”अहो संदीप जी येऊ द्या नाही. आडवा त्यांना. जंगलात काय? अमावस्याये आज. त्या म्हाताऱ्याला उठवा. नायतर त्या केम्पिंग वाल्याला फोन करा.” शिंदे सर म्हणाले.”अहो सर फोनला रेंज नाय. थांबा म्हाताऱ्याला उठवतो.” जीवन खंडू बुवाला उठवायला गेले.आणि त्याने दार वाजवले.”ओ आबा…. बुवा….” जीवन ने दरवाजा ठोकला.खंडू बुवाने दार उघडले.

“करिश्मा दीदी यार तू पण काय अशी करते. काही होणार नाही आपल्याला. तू हिंमत नको हारुस यार. उठ इथून थोडं लांब जाऊ.” गौरव म्हणाला.”नाही गौरव माझ्यात ताकद नाही. पुढे आणखीन जंगल दिसतंय. आपण खूप आत आलोय. आपलं काही खरं नाही वाटत. सकाळ व्हायलाही खूप वेळ आहे” करिश्मा बोलू लागली. इतक्यात कोल्हे भुकी झाली. आणि पाच सहा कोल्हे ओरडायला लागले. तसे ते दोघे एकमेकांना बिलगून एका मोठ्या दगडाच्या आडोशाला मुरून बसले. ज्या दिशेने गौरव जायचे म्हणत होता. नेमके तिथूनच तो आवाज येत होता. “मी म्हटलं ना गौरव. कुठेही पळ. आपण जंगलात आहोत.” करिश्मा म्हणाली.

सर्वांच्या मोबाईलचे टॉर्च सुरू होते. सगळ्यांना घेऊन मी वाट काढीत जंगलातून वरच्या बाजूला निघत होतो. आणि सपकन काहीतरी माझ्या कानाच्या बाजूने गेल्याचे जाणवले. “ए कोणे ? काये?” मी ओरडलो. तसे सगळे काय झालं म्हणू लागले.

क्रमशः