कल्याण १३ वर्षीय चिमुरडीच्या हत्ये प्रकरणी आरोपीला अटक

कल्याण : शहराच्या पूर्व भागातील चक्कीनाका परिसरात एक १३ वर्षीय चिमुरडी बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलीस स्थानकात नोंदवली होती. त्यानंतर बापगाव येथे एक मृतदेह मिळाल्याचे पोलिसांना समजल्यानंतर मुलीच्या वडिलांनी हा मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याचे पोलिसांना सांगितले. या अपहरण व हत्या प्रकरणा नंतर कल्याण पूर्वेत एकच खळबळ माजली.

सदर घटनेचे तीव्र पडसाद उमटत असताना पोलिसांनी २४ तासांच्या आत या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला शेगाव बुलढाणा येथून अटक केली आहे. गवळी याने तिचे अपहरण करून तिची हत्या करत तिचा मृतदेह रिक्षाचालकाच्या मदतीने बापगाव येथे विल्हेवाट लावण्यासाठी नेला असल्याचे सांगितले जात आहे. या चिमुरडीवर अत्याचार केला गेल्याचे सांगत या घटने विरोधात कल्याण पूर्वेत मूक मोर्चा काढण्यात आला होता.

प्राप्त माहिती नुसार, विशाल गवळी याच्यावर अगोदरही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. छेडछाड, बलात्कार, बलात्काराचा प्रयत्न, लहान मुलांचे लैंगिक शोषण यामुळे परिसरातील काही लोकांनी स्थलांतर केल्याचेही सांगितले जात आहे. विशाल गवळीला राजकीय वरदहस्त असल्याने त्याला पाठबळ देणाऱ्या राजकीय व्यक्तीलाही सहआरोपी बनवावे अशी मागणी आंदोलनकर्ते करू लागले आहेत. गवळी सह आणखीन दोघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती असून संपूर्ण घटनेचा पुढील तपास आता पोलीस प्रशासन वेगाने करीत आहे.

kalyan 13 year girl murder

Kalyan Dombivli Vidhansabha Result 2019 : कल्याण डोंबिवलीत मागील निवडणुकीत कुणाला किती मतं?

कल्याण : Kalyan Dombivli Vidhansabha Result 2019 च्या तुलनेत यंदाची निवडणूक काहीशी वेगळी ठरणार आहे. दोन प्रमुख पक्षांच्या विभाजनानंतर होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. सध्या मतदान प्रक्रिया पार पडली असून अंतिम निकाल हाती येण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. नवा निकाल हाती येण्यापूर्वी जरा मागील निकालावर एक नजर टाकूयात.

मागील विधानसभा निवडणुकीत कल्याण डोंबिवलीतील चारही मतदारसंघात भाजप, शिवसेना आणि मनसे या तीन पक्षांनी आपापले झेंडे रोवले. कल्याण पूर्वेत भाजपकडून गणपत गायकवाड, कल्याण पश्चिमेत शिवसेनेचे विश्वनाथ भोईर, कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील तर डोंबिवलीत भाजपचे रवींद्र चव्हाण आमदार म्हणून निवडून आले होते. यात भाजपच्या दोन्ही आमदारांची हॅट्रिक वगळता इतर दोन आमदार नव्यानेच लोकांना मिळाले होते.

यंदा होणाऱ्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांनाच किंवा त्यांच्या कुटुंबियांनाच पुन्हा उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात लढणारे उमेदवार यावेळी काहीसे वेगळे आहेत. मात्र त्यापूर्वी प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा मागील निकाल जाणून घेऊयात.

कल्याण पूर्व विधानसभा :-

मागील वेळी भाजपचे गणपत गायकवाड विरुद्ध अपक्ष (शिवसेना बंडखोर) धनंजय बोडारे यांच्यात थेट लढत झाली होती. यात गणपत गायकवाड यांना ६०,३३२ मते तर बोडारे यांना ४८,०७५ मते मिळाली होती. गायकवाड यांनी बोडारे यांचा १२,२५७ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत पक्षीय लढत पाहता ही जागा आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेसने लढली होती. ज्यात प्रकाश तरे यांनी १६,७५७ मते मिळवली होती. तर वंचीत बहुजन आघाडीच्या उमेदवार अश्विनी धुमाळ यांनाही १२,८९९ मते मिळाली होती. कल्याण पूर्वेत ३६९० जणांनी नोटा हा पर्याय निवडला होता. यासह १९ उमेदवारांच्या यादीत नोटा हा पर्याय पाचव्या क्रमांकावर पोहोचला होता.

कल्याण पश्चिम विधानसभा :-

सदर विधानसभा क्षेत्रात युतीकडून ही जागा शिवसेनेला देण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेले तेव्हाचे विध्यमान भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र तरीही विश्वनाथ भोईर यांनी ६५,४८६ इतकी मते मिळवून आमदारकी मिळवली होती. तर नरेंद्र पवार यांना ४३,२०४ मते मिळाली होती. तिसऱ्या स्थानी मनसेचे प्रकाश भोईर यांना ३८,०७५ लोकांनी पसंती दर्शवली होती. झालेल्या तिरंगी लढतेत विश्वनाथ भोईर यांनी २२,२२७ मतांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली होती. पक्षीय लढत पाहता युती विरोधात लढणाऱ्या आघाडीकडून ही जागा काँग्रेसचे सचिन पोटे लढवीत होते. ज्यांना २०,१६० मते मिळाली होती.

कल्याण ग्रामीण विधानसभा :-

या मतदारसंघात शिवसेनेने तेव्हाचे विध्यमान आमदार असलेल्या सुभाष भोईर यांचे तिकीट कापून रमेश म्हात्रे यांना निवडणूक लढण्याची संधी दिली होती. मात्र ही शिवसेनेची घोडचूक ठरली आणि याचा फायदा मनसेने उचलत शिवसेनेकडून ही जागा पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेतली. २०१९ निवडणुकीत मनसेच्या राजू पाटलांनी ७१५४ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. राजू पाटील यांना ९३,९२७ इतकी मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांना ८६,७७३ मते मिळाली होती. या विधानसभा क्षेत्रात २००९ पासूनच मनसे विरुद्ध शिवसेना अशी काटो की टक्कर पहायला मिळत आहे. पराभूत उमेदवार रमेश म्हात्रे यांचा २००९ मध्ये देखील मनसेच्या रमेश पाटील यांनी पराभव केला होता. मात्र रमेश पाटलांना २०१४ साली सुभाष भोईर यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. २०१९ साली शिवसेनेने विध्यमान आमदारांना थांबवून पुन्हा एकदा रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली आणि पुन्हा एकदा ते पराभूत झाले आणि ही जागा पुन्हा एकदा मनसेच्या ताब्यात गेली.

डोंबिवली विधानसभा :-

२०१९ च्या लढतीत रवींद्र चव्हाण यांनी ८६,२२७ मते मिळवून एकतर्फी विजय मिळवत आमदारकीची हेट्रिक साधली होती. तब्बल ४१,३११ मतांच्या फरकाने त्यांनी मनसेच्या मंदार हळबेंचा पराभव केला होता. मंदार हळबे यांना चव्हाण यांच्या जवळपास निम्मी ४४,९१६ इतकी मते मिळाली होती. २०१४ साली झालेल्या निवडणुकीतही त्यांनी असाच मोठा विजय मिळवला होता. ज्यात त्यांची लढत शिवसेनेच्या दीपेश म्हात्रे यांच्याशी झाली होती. १० वर्षांनंतर पुन्हा एकदा दीपेश म्हात्रे हेच त्यांचे प्रतिस्पर्धी ठरले आहेत. २००९ साली झालेली पहिली निवडणूक रवींद्र चव्हाण यांना चुरशीची गेली होती. यादरम्यान शहरात मनसेची मोठी लाट होती. त्यामुळे मनसेच्या राजेश कदम यांच्यासमोर त्यांना १२,३२७ मतांनी विजय मिळाला होता. आता ते चौथ्यांदा निवडणूक लढवीत असून चौथा निकाल काय असेल याकरिता काही तास वाट पहावी लागणार आहे.

कल्याण डोंबिवली मधील या चारही जागांवर कोण आमदार होणार? तुम्हाला काय वाटतं? हे कमेंट बॉक्समध्ये लिहा.

Kalyan Dombivli Vidhansabha Result 2019

MNS Exit Poll 2024 : आता एक आमदार नाही तर मनसे गाठू शकते पुन्हा डबल फिगर

MNS Exit Poll 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना झाल्यानंतरची मनसेची ही चौथी विधानसभा निवडणुक आहे. युती आघाड्यांना आवाहन देऊन मनसेने पहिल्याच लाटेत आपले १३ आमदार निवडून आणून विरोधी पक्षांना घाम फोडला होता. मात्र त्यानंतर पुढील विधानसभेत मनसेला फक्त एक आमदार निवडून आणता आला होता. बाकी मनसेच्या १३ आमदारांपैकी काही आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली तर काही आमदार पराभूत झाले. जुन्नर विधानसभा क्षेत्रात शरद सोनवणे हे मनसेचे २०१४ चे एकमेव आमदार ठरले होते. परंतु त्यांनीही पुढे पक्ष सोडला.

मोदी लाटेचा फटका मनसेला बसल्यानंतर मनसेने २०१९ ची निवडणूक मोदीं विरोधात उतरून लढली होती. मात्र मनसेच्या हाती शेवटी तोच निकाल आला आणि यावेळेस कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातुन राजू पाटील यांना एकमेव आमदार होण्याचा मान मिळाला. यानंतर कोरोनामुळे ग्रामपंचायत वगळता कोणत्याही निवडणुका महाराष्ट्रात पार पडल्या नाहीत. मात्र याच पाच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली.

मनसेने मागील दोन वेळेस फक्त खाते उघडले होते. मात्र आता मनसे २००९ प्रमाणे पुन्हा एकदा दुहेरी आकडा गाठू शकते असा अंदाज काही राजकीय विश्लेषक बांधून आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे राज्यातील पक्षांची बदललेली समीकरणे. दोन प्रमुख पक्षांचे झालेले दोन गट हे मनसेचा फायद्यात उतरण्याची शक्यता आहे. यंदाची निवडणूक सर्व पक्षांनी युती आघाडीमध्ये न लढवता स्वतंत्रपणे लढवली असती तर मनसेचा आकडा आणखीन मोठा ठरू शकला असता. परंतु आताही मनसेला राज्यातील पक्ष फुटीचा काहीसा फायदा होण्याची शक्यता आहे. कदाचित युती आघाडीत बरोबरीची लढाई झाली तर सत्ता स्थापने साठी मनसे किंगमेकरही ठरू शकते. मात्र शेवटचा कल हाती येण्यासाठी २३ नोव्हेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

MNS Exit Poll 2024 : This time MNS can reach double figure again

कल्याण पूर्व विधानसभा आणि मनसे

Kalyan East MNS : राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. त्यानंतर २००९ साली प्रथमच विधानसभा निवडून १३ आमदार निवडून आले. ज्यात २ आमदार हे कल्याण पश्चिम आणि ग्रामीणचे होते. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत मनसेची ताकद ही तेव्हापासूनच आहे असे दिसते. पण मनसेने इतकी ताकद असतानाही तेव्हा कल्याण पूर्वेत उमेदवार का दिला नाही? आणि अजूनही मनसे कल्याण पूर्वेत उमेदवार का उभा करीत नाही याबद्दल अजूनही मनसेमध्ये नाराजीची भावना कायम आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये मनसेचे सर्वाधिक ताकद असल्याचे मानले जाते. कारण २००९ साली याच भागात मनसेला मिळालेले २ आमदार आणि २०१० साली मनसेने महापालिका निवडणुकीत मिळवलेले भरघोस यश आणि २७ नगरसेवक. इतकेच नव्हे तर मनसेचे वाईट दिवस असतानाही मनसेने १० नगरसेवक २०१५ साली निवडून आणले होते. जर इतकी ताकद या शहरात मनसेची आहे तर महापालिका क्षेत्रातील सर्व चार जागा मनसेने लढवायला हव्यात असे राजकीय विश्लेषक म्हणतात.

डोंबिवलीत रवींद्र चव्हाण तर कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड हे २००९ पासून सलग निवडून येत आहेत. मागील निवडणूकित मनसेने डोंबिवलीची जागा लढवून रवींद्र चव्हाण यांना टक्कर दिली होती. मनसेचे उमेदवार मंदार हळबे जे आता भाजपात आहेत त्यांनी चांगले मतदान मिळवले होते. पण मनसेने मात्र कल्याण पूर्वेत उमेदवार दिला नव्हता. त्याअगोदर २०१४ साली सक्षम पर्याय असतानाही कल्याण पूर्वेत कमजोर उमेदवार मनसेने अचानकपणे उभा केला होता. तरीही मनसेने साडे सात हजार मते मिळवली होती.

२००९ साली मनसेची लाट असताना आणि कल्याण डोंबिवलीत प्रचंड ताकद असताना कल्याण पूर्वेत उमेदवार का दिला नाही असा प्रश्न अजूनही वारंवार विचारला जातो. मात्र मनसेतुन बाहेर पडलेले जुने समर्थक या ठिकाणी गौडबंगाल झाले असे अजूनही सहज सांगतात. इतकेच नव्हे तर यामागे कोणाचा हात आहे तेही सांगतात.

तर मनसेचे आले असते १४ आमदार… कल्याण पूर्वेत वारंवार निवडून येणारे गणपत गायकवाड हे पहिल्यांदाच कल्याण पूर्वेतून निवडणूक लढवीत होते. याच काळात मनसे जोरावर होती. जर मनसेने कल्याण पूर्वेत उमेदवार उभा केला असता तर कदाचित तो उमेदवार निवडणुही आला असता. मनसेची संख्या ही १३ ऐवजी १४ ही असली असती. तसेच कल्याण पूर्वेला गणपत गायकवाड हे नेतृत्व कदाचित तेव्हा मिळाले नसते असेही बोलले जाते.

कल्याण पूर्वेत आजही मनसेचे कट्टर कार्यकर्ते आणि समर्थक आहेत. मात्र आजवर मनसेला कल्याण पूर्वेत वाढू दिले जात नाही असे गंभीर आरोप ऐकावयास येतात. त्यामुळे कल्याण पूर्वेत मनसेची मत इतरांच्या पारड्यात टाकली जातात. जर मनसे ताकद नसलेल्या ठिकाणी उमेदवार देऊन राज्यात १३९ जागा लढवत आहे. मग ताकद असलेल्या कल्याण डोंबिवलीतील कल्याण पूर्वेत उमेदवार का देत नाही असा सवाल आजही कायम आहे.

यंदाच्या निवडणुकीत मनसे कल्याण पूर्वेची जागा लढवणार असल्याची चर्चाही होती. शिवाय इतर पक्षातील एक उमेदवार या भागातून मनसेतुन निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचेही बोलले जात होते. मात्र सरते शेवटी पुन्हा एकदा मनसेने ही जागा सोडली आणि कार्यकर्ते नाराज झाले असे चित्र आहे. आता हेच नाराज कार्यकर्ते आपले मत कुणाच्या पारड्यात टाकणार हे आता पहावे लागणार आहे.

Kalyan East Assembly and MNS

सकल ब्राह्मण समाजाचा रविंद्र चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा

डोंबिवली : आपल्या भारत देशाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा थोर इतिहास असून या दोन्ही ब्राह्मण तज्ञ मंडळींना भारतरत्न मिळायला हवे. पण त्यासाठी हिंदुत्व विचारांचा लोकप्रतिनिधी आपल्याला विधानसभा, लोकसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठिकाणी पाठवावा लागणार आहे. डोंबिवलीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना पक्षाने चौथ्यांदा उमेदवारी दिली असून हिंदुत्व वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यांना त्यांना आवर्जून मतदान करणे गरजेचे असल्याचे आवाहन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, प्रखर हिंदुत्ववादी नेते सुनील देवधर यांनी केले आहे.

ब्राह्मण सभेत जमलेल्या हजारो ब्राह्मण मंडळींनी चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचा सामूहिक निर्णय यावेळी घेतला. ब्राह्मण सभेत संपन्न झालेल्या सकल ब्राह्मण समाज मेळाव्यामध्ये सर्वानुमते तसे ठरवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. आयोजित सभेत भाजपलाच का मतदान द्यावे याबाबत देवधर यांनी जनजागृती केली. अर्थतज्ञ फडणीस यांनीही आपले विचार मांडले तसेच मोदीच का या त्यांच्या प्रसिद्ध असलेल्या १०१ कारणांपैकी काहींचा उल्लेख करून त्यांनी हिंदुत्व पटवून दिले.

मंत्री चव्हाण यांनी शहरातील अपप्रवृत्ती कशा वाढल्या होत्या, त्या समूळ नष्ट करायला किती वेळ गेला याबाबत उदाहरण देऊन माध्यमांनी जे लिहायला हवे ते परखड शब्दांत मांडले. शहरातील सर्व ब्राह्मण समाजाचे पदाधिकाऱ्यांचे मला सातत्याने मार्गदर्शन मिळते, त्यांचा मी ऋणी आहे असेही ते म्हणाले. यावेळी माधव घुले, प्रदीप जोशी, जे के जोशी, मनीषा धोपटकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष माधव जोशी, पद्माकर कुलकर्णी, सप्तर्षी, श्री गणेश मंदिर संस्थानाचे अध्यक्ष अलका मुतालिक, ऍड वृन्दा कुलकर्णी, ब्राह्मण सभा अध्यक्ष राहुल दामले, संदीप पुराणिक, प्रज्ञेश प्रभुघाटे, मानस पिंगळे, मधुकर कुलकर्णी, शशांक खैर, अमरेंद्र पटवर्धन, गौरी खुंटे, शमा भाट्ये, यांसह हजारो ब्राह्मण मंडळी उपस्थित होती.

Unconditional support of the entire Brahmin community to Ravindra Chavan

Kalyan : बोडारेंच्या प्रचाराला आल्या Sushama Andhare; पण प्रचार झाला महेश गायकवाडांचा?

Kalyan : शिवसेना उबाठा पक्षाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे ( Sushama Andhare ) यांनी नुकताच कल्याण लोकसभा क्षेत्राचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कल्याण डोंबिवलीत विधानसभा निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी प्रचारसभा केल्या. मात्र याच प्रचारसभेत त्यांनी उपस्थित केलेला एक मुद्दा कल्याण पूर्व अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांच्यासाठी चांगलाच पचनी पडला असून एक व्हिडिओ महेश गायकवाड समर्थक प्रचंड शेअर करीत आहेत.

कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपाकडून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड, शिवसेना उबाठा पक्षाचे धनंजय बोडारे आणि अपक्ष उमेदवार महेश गायकवाड हे तिरंगी लढत लढवत आहेत. पोलीस स्थानकातील गोळीबार या मुद्द्यावर कल्याण पूर्वेची निवडणूक सुरू असल्याचे वारंवार समोर येत असून महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारार्थ आलेल्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील कल्याण पूर्वेत सभा घेउन हाच मुद्दा उपस्थित केला. पोलीस स्थानकात गोळीबार करणाऱ्यांच्या कुटुंबीयांनाच भाजपा उमेदवारी देते का? असा सवाल करीत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

कल्याण पूर्व महाविकास आघाडी उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारार्थ सभा घेणाऱ्या अंधारे यांनी गोळीबार मुद्दा उपस्थित करताना अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचेही नाव घेतले. ही क्लिप महेश गायकवाड समर्थकांनी प्रचंड शेअर केली असून सुषमा अंधारे नेमक्या कुणाचा प्रचार करून गेल्या? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. बोडारे यांच्यासाठी घेतलेल्या सभेत सुषमा अंधारे यांनी महेश गायकवाड यांचे नाव घेतल्याने प्रचार सभेचे गणित उलटे फिरले असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Kalyan : Sushama Andhare came to campaign for Bodare; But Mahesh Gaikwad campaigned?

काय म्हणाल्या व्हिडिओ पहा
Election Dry Day : निवडणुकीमुळे चार दिवस दारूबंदी

Election Dry Day : भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांकरिता विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार बुधवारी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र देशी दारु नियम, १९७३ चे नियम २६ (१) (क) (१) व महाराष्ट्र विदेशी मद्य नियम (रोखीने विक्री, विक्री रजिस्टर इ.) नियम, १९६९ चे नियम ९ अ (२) (क) (1) तसेच महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि ताडीची झाडे (छेदणे) नियम, १९६८ चे नियम ५ अ (१) तसेच विशेष परवाने आणि अनुज्ञप्ती नियम, १९५२ मधील १० (ब) (क) (1) मधील तरतूदीनुसार तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ मधील कलम १४२ (1) नुसार सर्व ठोक व किरकोळ देशी विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या (सर्व नमुना एफएल-१, एफएल-२, एफएल-३, एफएल-४, एफएल-४ए. एफएल / बीआर-२ एफएलडब्ल्यु-१, नमुना ई. नमुना ई-२, सीएल-३, सीएल / एफएल टीओडी-३, टीडी-१) बंद ठेवण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहेत.

जारी करण्यात आलेल्या नियमानुसार १८ नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजल्यापासून दारूबंदी सुरू होणार असून २० नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजता संपणार आहे. या ४८ तासांत दारूची विक्री झाल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्याचबरोबर २३ नोव्हेंबर मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत दारूबंदी असणार आहे.

सर्व अबकारी अनुज्ञप्ती धारकांनी या आदेशाची नोंद घेण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्काने केले आहे. जे अनुज्ञप्तीधारक सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यास कुचराई करतील त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम ५४ व ५६ नुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Election Dry Day : Alcohol ban for four days due to election

डोंबिवलीत उडणार धमाल मजा मस्ती! रविवारी भरणार किलबिल फेस्टिव्हल

किलबिल फेस्टिव्हल : डोंबिवलीकर बाल दोस्तांच्या आतुरतेचा आवडीचा डोंबिवलीकर किलबिल फेस्टिवल रविवार, दि १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते १० वाजेपर्यंत डोंबिवली पश्चिमेतील बावन चाळ परिसरातील रेल्वे मैदानावर आयोजित करण्यात येणार असल्याचे डोंबिवलीकर प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे बच्चे कंपनीसाठी पुन्हा एकदा धमाल मजा मस्तीची संध्याकाळ डोंबिवलीत रंगणार आहे.

डोंबिवलीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वर्दळीत डोंबिवलीकर किलबिल फेस्टिवल म्हणजे बाळगोपाळांसाठी हक्काचा असतो. लहान मुलांना खेळा-शिका-स्वतः बनवा या संकल्पनेवर आधारित या धमाल कार्यक्रमाचे यंदाचे १२ वे वर्ष आहे. मौज मजा धमाल मस्तीचा अविस्मरणीय उत्सव त्यात धाडसी खेळांचे साहस रंगत आणतात. केवळ लहान मुलांच्या मनोरंजनासाठी बारा वर्षांपूर्वी डोंबिवलीकर किलबिल फेस्टिवलची संकल्पना सुरू करण्यात आली होती.

मुलांना चित्रकला, टॅटू, कॅरिकेचर यासोबत कुंभाराच्या चाकावर मातीची भांडी, वायरची खेळणी स्वतः बनवता येणार आहेत. तसेच बोलक्या बाहुल्या, मोझॅक आर्ट, जम्पिंग मून वॉक, बालनाट्य, जादूचे प्रयोग यासारखे कार्यक्रम ही पाहायला मिळणार आहेत. यंदा थाऊसंड हँड डान्स ग्रुप आणि झिरो डिग्री डान्स, हा अद्भुत नृत्य प्रकार बाळगोपाळांना आकर्षित करणार आहे. जायंट पांडा, टेडी बेअर, हेडलेस मॅन, अल्लाउद्दीनचा जिन असे विविध बहुरूपी छोट्या दोस्तांच्या चेहेऱ्यावर हास्य खुलवतील. तर साहसी खेळांमध्ये कमांडो ब्रिज, रिव्हर क्रॉसिंग, वॉल क्लायंबिंग असे थरारक प्रकार अनुभवायला मिळणार आहेत. यंदा दोन सेगवे व्हेइकल्सचा थरारही मुलांना अनुभवायला मिळणार आहे. तांदुळावर नाव कोरणे, मेहंदी तसेच लाखेच्या बांगड्या बनवून मिळणार आहेत. विशेष म्हणजे सर्व खेळ आणि सुविधा डोंबिवलीकर बाळ गोपाळांसाठी मोफत आहेत.

Kilbil festival will be held on Sunday in dombivli
डोंबिवलीत कमळच फुलणार म्हणत पुरोहित मंडळींनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना दिला जाहिर पाठिंबा

डोंबिवली : आपले सांस्कृतिक, अध्यात्मिक शहर आणि महायुती यांचा वैचारिक डीएनए एकच असून समस्त डोंबिवलीकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. असे म्हणत डोंबिवलीतील देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळातील सर्व सभासदांनी महायुती उमेदवार रवींद्र चव्हाण यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. तसेच “आपण प्रचंड मताधिक्याने निवडून याल” असे सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केला. यासोबतच “पुढील सामाजिक कार्यासाठी जय, यश, बल लाभो” असे आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या. या शुभाशीर्वादांमुळे निवडणूक लढवण्यासाठी शंभर हत्तींचं बळ मिळालं अशा प्रांजळ भावना चव्हाण यांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी पुरोहित मंडळाचे अध्यक्ष वेदमूर्ती अमोल विजय कुलकर्णी, संतोष पुराणिक, कोदंडपाणी कुलकर्णी, लक्ष्मण पारेकर, केदार पारेकर, राहुल शुक्ल, महेश जोशी, दिनेश उपासनी, श्री.यज्ञेश जोशी, कपिल भंडारी, सार्थक आराध्ये, श्रीपाद कुलकर्णी आणि श्री कुलकर्णी आदी सभासद उपस्थित होते.

डोंबिवलीत कमळच फुलणार !

शहरातील रामनगर येथील विविध संस्था आणि सोसायटी यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रामनगर मधील राजस्थान जैन संघ हॉल येथे संपन्न झाली.
या बैठकीमध्ये श्री राजस्थान जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघ, लोहाणा समाज, यादव समाज, बिलावल असोसिएशन, युवा आशापुरा मंडल इ. संस्था यांचा सहभाग होता. या बैठकीदरम्यान चव्हाण यांनी उपस्थितांशी संवाद साधला तसेच उपस्थितांनी रविंद्र चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सी.ए. जय जैन आणि ॲड. रोहन देसाई या युवकांचा सन्मान करण्यात आला.

सर्व उपस्थितांनी डोंबिवलीत कमळच फुलणार असल्याचे सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केला. आयोजित बैठकीला माजी नगरसेवक भाई देसाई, मंदार हळबे, मुकुंद पेडणेकर, माजी अध्यक्ष गिरीश साठे, युवा मोर्चा प्रदेश सचिव मिहिर देसाई, आशिष मौर्य, सिद्धांत घुले, सुनील वेताळ, स्वानंद भणगे आदी भाजपा पदाधिकारी तसेच किरण राजजी राणावत, प्रमोद ठक्कर, राजबहादूर यादव, लल्लन यादव, तगदराज राणावत, भावेश जैन, प्रदीप जैन, दिलीप कोठारी, सुखलाल जैन, तेजराज जैन आदी प्रमुख संस्था पदाधिकारी उपस्थित होते.

The priests gave their support to Minister Ravindra Chavan, saying that only lotus will bloom in Dombivli

Kalyan East : ‘हे’ १७ उमेदवार लढवणार कल्याण पूर्वेची जागा; निवडणूक चिन्हे मिळाली

Kalyan East : १४२ कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून जवळपास ३४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज छाननी व अर्ज माघारी झाल्यानंतर आता १७ उमेदवार रिंगणात उतरले असल्याचे निश्चित झाले आहे. त्याचबरोबर अपक्ष उभे राहणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह देखील आज देण्यात आले आहे.

  1. धनंजय बाबुराव बोडारे – शिवसेना उबाठा – मशाल
  2. ऍड.मिलिंद रविंद्र ढगे – बहुजन समाज पार्टी – हत्ती
  3. सुलभा गणपत गायकवाड – भारतीय जनता पार्टी – कमळ
  4. तृणेश अरूण देवळेकर- समता पार्टी – ट्रम्पेट
  5. प्रफुल रघुनाथ नानोटे – राईट टु रिकाॅल पार्टी – प्रेशर कुकर
  6. विशाल विष्णू पावशे – वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलेंडर
  7. शालीनी राजेंद्र वाघ – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) – आटो रिक्षा
  8. शैलेश राममूर्ती तिवारी – प्रहार जनशक्ती पक्ष – बॅट
  9. हरिश्चंद्र दत्तु पाटील – संघर्ष सेना – शिट्टी
  10. त्रिशला मिलिंद कांबळे – बहुजन समाज पार्टी (आंबेडकर)
  11. कैलाश रमेश लाल चैनानी – अपक्ष – दुरदर्शन
  12. ऍड. धनंजय बप्पासाहेब जोगदंड – अपक्ष – संगणक
  13. प्रविण महेश घोरपडे – अपक्ष – रबर स्टॅम्प
  14. महेश दशरथ गायकवाड – अपक्ष – अंगठी
  15. महेश प्रकाश गायकवाड – अपक्ष – पत्र पेटी
  16. विवेक श्रीकांत पांडे – अपक्ष – सिरिंज
  17. सीताराम अण्णासाहेब गायसमुद्रे – अपक्ष – शिवण यंत्र

वरील १७ उमेदवार उर्वरित १७ दिवस निवडणूकीच्या आखाड्यात आपल्या ताकदीनिशी उतरले असून २० नोव्हेंबर रोजी जनतेचा कौल मिळवणार आहेत. पक्षांची बदललेली राजकीय समीकरणे, मतदारसंघातील परिस्थिती यावर कोणता उमेदवार कल्याण पूर्वेच्या सर्वाधिक मतदारांच्या पसंतीस उतरतो यासाठी २३ नोव्हेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे. मात्र त्यापूर्वी २० नोव्हेंबर पर्यंत आपल्या पारड्याचे वजन वाढविण्यासाठी सर्वच उमेदवार जोर लावणार यात शंकाच नाही.

Kalyan East: ‘These’ 17 candidates will contest the seat of Kalyan East; Election symbols received