Thackrey in KDMC : कल्याण डोंबिवलीत ‘ठाकरे’ ब्रँड ठरू शकतो पॉवरफुल

Thackrey in KDMC : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष भरती प्रक्रियेत मग्न आहेत. काँग्रेससह दोन्ही ठाकरेंचे माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी गळाला लावण्याचे काम दोन्ही पक्षांकडून सुरू असल्याने शहरात दोनच पक्षांची चलती असल्याचे दिसून येत आहे. परंतु राजकारणात आजमितीला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्याअनुषंगाने आतापर्यंत शांत असलेल्या ठाकरेंचे पक्ष आता ‘वेट अँड वोच’च्या भूमिकेतून बाहेर पडले आहेत. मनसे शिवसेना उबाठा नेमकी काय रणनिती करीत आहे याचा अंदाजही ते इतर पक्षांना लागून देत नसून बुधवारी त्यांनी युतीची घोषणा केली आहे.

इनकमिंगचा फुगा फुटणार? : मागील काही दिवसांत मनसेचे माजी नगरसेवक शिवसेनेसह भाजपात गेलेले आहेत. शिवसेना उबाठाचेही माजी आमदार व आमदारकी लढवलेले काही मोठे चेहरे पक्षाला सोडून गेले आहेत. मात्र ज्या पक्षात इच्छूकांचे प्रचंड ट्रॅफिक जमले आहे, त्याच पक्षात आधीपासून असणाऱ्या पदाधिकार्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे एकाला धरताना, दुसरे निसटून जाण्याची भीती आता दोन्ही पक्षांना लागून आहे. तर हेच निसटलेले नाराज निष्ठावंत ठाकरेंच्या ताफ्यात आता सामावू शकतात.

आतापर्यंत ओढाओढी करून शिवसेना भाजपने शक्तिप्रदर्शन करून आपणच वजनात आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र इनकमिंग इतकी झाली की महायुतीच्या घोषणे नंतर नाराज मंडळी आउटगोइंगही सुरू करू शकतात. याच गोष्टीचा फायदा घेऊन आतापर्यंत शांत असलेले ठाकरेंचं वादळ कधी घोंगावून चित्र पालटवेल हे सांगू शकत नाही. आतापर्यंत या महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता असली तरीही शिवसेनेच्या विभाजनानंतर आता भाजप मोठा भाऊ बनून महापौर पदाचा दावा करीत आहे. अंबरनाथ, बदलापुरात तसे साध्यही केले आहे.

आतापर्यंत पक्षीय बलाबल : २०१५ च्या निवडणुकीत कल्याण डोंबिवलीत १२२ जागांपैकी ९४ जागा या शिवसेना भाजपने जिंकल्या होत्या. त्यातील सर्वाधिक ५२ नगरसेवक शिवसेनेचे होते. तर मनसेचेही दहा नगरसेवक विरोधी बाकावर बसले होते. आता शिवसेनेच्या विभाजनासह मनसेच्या काही माजी नगरसेवकांनीही पक्षांतर केल्याने ठाकरेंना नवे चेहरे द्यावे लागणार आहेत. याच नव्या चेहऱ्यात मनसेचे २०१० साली निवडणूक लढवलेले काही माजी नगरसेवक पुन्हा मनसेतून निवडणूक लढवणार आहेत.

ठाकरेंचं वादळ घोंघावणार ? : राजकीय पटलावर ठाकरे बंधू मागील काही दिवस शांत होते. मात्र ही शांतता वादळापूर्वीची शांतता असल्याचे ठाकरेंचे कार्यकर्ते म्हणत आहेत. दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने काय फरक पडू शकतो? यापेक्षा त्यांनी कोणती व्यूहरचना केली आहे? आणि कल्याण डोंबिवलीत नेमकी काय चाल चालणार? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी ६२ ही मॅजिक फिगर असून ठाकरे बंधूना मॅजिक फिगर गाठण्यासाठी सर्वप्रथम महायुतीलाच ६० च्या आत थोपवण्याचे आवाहन असणार आहे.

Thackrey in KDMC : ‘Thackrey’ brand can be powerful in Kalyan Dombivali

जनतेचे नाव पुढे करीत राजकारण्यांचे पक्षप्रवेश; पॅनलच्या जमवाजमवीसाठी पक्षनिष्ठा खुंटीला

कल्याण : महानगरपालिका निवडणुकीला अवघा चार आठवड्यांचा अवधी राहिला असून त्यापूर्वी पक्षप्रवेश सोहळे शहरात पार पडत आहेत. पॅनलमध्ये निवडून येण्यासाठी जो तो आपला विचार करीत असून इच्छूकांसह माजी नगरसेवकांनी शिवसेना भाजप मध्ये प्रवेश घेण्याची धडपड सुरू ठेवली आहे. मात्र हे पक्षप्रवेश करताना, “आम्ही जनतेच्या हितासाठी, प्रभागाच्या विकासासाठी प्रवेश करतोय” असा केविलवाणा निर्वाळा करीत स्वतःचे राजकीय स्वार्थ साधले जात असल्याचे उघडपणे दिसून येत आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत यंदा पॅनल पद्धत असल्याने सरसकट चार उमेदवारांना एकत्र लढत द्यावी लागणार आहे. त्यात महायुती, महाविकास आघाडी, मनसेसह अन्य घटकपक्ष आपले नशीब अजमावणार आहे. मात्र या पद्धतीत लहान पक्ष व अपक्ष लढणाऱ्यांना निवडणूक लढवणे अवघड होणार आहे. याच बाबीचा फायदा मोठ्या पक्षांना होणार आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा, मनसे, काँग्रेस पक्षांतील माजी नगरसेवक आपापल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना घेऊन जनतेच्या विकासाचे नाव पुढे करीत स्वतःचे राजकीय भवितव्य अबाधित ठेवण्यासाठी दलबदलू राजकारण करण्यास कोणताही कमीपणा ठेवत नाहीत. अशा परिस्थितीत सुगीचे दिवस असणाऱ्या पक्षांसोबत जाऊन पुन्हा नगरसेवक बनायचे हा एकमेव उद्देश साध्य करण्यासाठी पक्षनिष्ठा खुंटीला टांगून पक्ष बदलले जात आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपात झालेली प्रचंड ट्रॅफिक पाहता निवडणूक महायुतीत लढावी की स्वतंत्र लढावी असाही मोठा प्रश्न शिवसेना भाजपला पडलेला आहे. दोन्ही पक्षांत प्रचंड गर्दी झाल्याने उमेदवारी दिल्यानंतर पुन्हा नाराजीनाट्ये रंगणार आहेत. त्यामुळे ऐनवेळेस स्वतंत्र लढण्याची नामुष्की ओढवू शकते. याउलट दोन्ही ठाकरे एकवटले असून दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना महायुतीपुढे टिकायचे असेल तर ठाकरेंचे एकत्र लढणेच शहाणपणाचे ठरेल असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

✍️ संतोष दिवाडकर 8767948054

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणाला ‘आयपीएल लिलावा’ प्रमाणे रंग; राजकारण्यांच्या बेडूक उड्यांनी पक्षनिष्ठेला सुरुंग

कल्याण : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राजकीय पक्षप्रवेशांचा धडाका सुरू झाला आहे. किंबहुना एकाच युती आघाडी मधील राजकीय पक्ष एकमेकांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात खेचून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. विशेषतः कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि भाजप मध्ये आपसातच ही पक्षप्रवेशाची रस्सीखेच सुरू असून एकमेकांचे दिगग्ज पदाधिकारी व माजी नगरसेवक आपल्या पक्षात खेचून घेण्याचे काम सध्या सुरू आहे. नेत्यांच्या दलबदलू राजकारणामुळे सामान्य मतदार व कार्यकर्ते मात्र संभ्रमात अडकले आहेत.

महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वीच आयपीएल ट्रेड/लिलाव प्रमाणे शहरात राजकीय मंडळी या पक्षातून त्या पक्षात बेडूक उड्या घेत आहेत. पक्षनिष्ठा खुंटीला टांगून, पक्षातील प्रमुख नेत्यांचे विचार पायदळी तुडवून केवळ वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी हे प्रवेश होत असल्याचे मत सर्वसामान्य मतदारच व्यक्त करू लागले आहेत. याउलट पक्षप्रवेश घेतल्यानंतर “पक्षाच्या, साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन पक्ष प्रवेश केला” असे पक्षप्रवेश करणारे अजूनही रेटाळून म्हणतात. मात्र हे फक्त ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ असल्याचे आता सुजाण मतदार म्हणू लागले आहेत. तर काही पक्षप्रवेशामागे पक्षातील नाराजी, अंतर्गत वाद, हेवेदावे आणि अंशतः स्वाभिमान ही देखील कारणे पुढे केली जात आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेश करून घेण्यासाठी मोठं मोठी अमिषे आणि मोठ्या पदांची प्रलोभने दिली जातात. अशा परिस्थितीत पक्षनिष्ठेचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा फायदा पाहण्यामागे प्रथम प्राधान्य सध्याच्या काळात दिले जात आहे. ग्राउंड लेव्हलवर सुरू असलेल्या या राजकारणामुळे पाच वर्षांत पाच पक्षही फिरण्याचे विक्रम सहज शक्य होत आहेत. इतकेच नव्हे तर नेत्यांच्या सरड्याप्रमाणे सततच्या बदलणाऱ्या रंगांमुळे कार्यकर्त्यांनाही “कोणता झेंडा घेऊ हाती?” असे म्हणण्याची वेळ आली आहे. परंतु असे असले तरी, “खिसा गरम तर कशाची शरम?” असे म्हणून सारे काही आलबेल बनले आहे. शेवटी ‘जिथे भेळ तिथेच खेळ’.

  • संतोष दिवाडकर (पत्रकार)

In the backdrop of elections, city politics takes on the color of an ‘IPL auction’

उधारीच्या दुनियेतले साम्राज्य

उधार मागणे म्हणजे भीक मागणेच!

मिरची झोंबावी असं हे वाक्य आहे. होय पण हेच खरे आहे. उधार मागणे म्हणजे थोडक्यात तात्पुरत्या स्वरूपात मागितलेली भीकच. तात्पुरत्या का? तर आपण घेतलेले पैसे हे परत करणार असतो म्हणून. तात्पुरती पडलेली नड भागविण्यासाठी कुणाकडून तरी आपण कधी ना कधी पैसे घेत असतो. उधार घेणे हे काही गैर आहे हे असे अजिबात नाही. कारण प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा उधार घेण्याची गरज पडते. गडेगंज पैशावाल्या माणसालाही कोणत्यातरी गोष्टी साठी हात पसरावेच लागतात. पण जर काहींना ही उधारी मागण्याची सवय जडली असेल तर ती मात्र एक घाणेरडी सवय. आणि त्यात घेतलेले पैसे वेळेवर न देणे आणि समजा न देताच बुडवले तर? या सगळ्या उधारीच्या दुनियेची ही आज आपण गोष्ट करणार आहोत. अवश्य वाचा शेवट पर्यंत.

पूर्वीच्या काळी जगण्यासाठी माणूस स्वतः मेहनत करून स्वतःचे अन्न स्वतः मिळवत होता. मूलभूत गरजा भागविण्यासाठी पुढे प्रत्येकाने काम वाटून घेतले आणि एकमेकांना वस्तूंची आदान प्रदान केली. उदा.शेतकरी शेती करून पिकवलेले अन्नधान्य घेऊन शिंप्याकडे जाई आणि त्या बदल्यात कपडे घेई. शिंप्याला देखील कपड्याच्या बदल्यात अन्नधान्य मिळे. परंतु वस्तूंची किंमत कमी जास्त असल्याने पुढे चलन अस्तित्वात आले आणि इथूनच आले पैशाला महत्त्व.

पुढील अनेक वर्षे पैशाला फारसे मोल नव्हते. मात्र अलिकडल्या काळात पैशाला माणसापेक्षा जास्त किंमत आली आहे. श्रीमंत होण्यासाठी, सर्व सुविधांचा उपभोग घेण्यासाठी पैसा असणे महत्त्वाचे आहे हा समज आता रूढ झाला आहे. किंबहुना तो खराही आहे. ज्याच्याजवळ जितका पैसा तशी त्याची लाइफस्टाइल. यावरून श्रीमंत आणि गरीब असे दोन वर्ग तयार झाले. आज आपण स्वतःला ने मिडल क्लास म्हणवतो त्यातही दोन प्रकार मोडतात. एक म्हणजे पैसा बाळगून असलेला आणि दुसरा कर्जबाजारी झालेला. आता याच दोघांमधील जो दुवा आहे त्याबद्दल थोडं बारीक समजून घेऊयात.

ज्यांच्याकडे भरपूर पैसे असतात असे लोक कधीही उधारी मागत नाहीत. पण काहीवेळेस चुकून समजा सोबत पैसे घ्यायला विसरले किंवा आजच्या ऑनलाइन युगात कोड स्कॅन करण्यासाठी काही अडथळा येत असेल तर अशा लोकांना नाईलाजाने उधारी घ्यावी लागते. पण अशा लोकांना डोळे झाकून उधारी देतात कारण लागलीच परत मिळण्याची खात्री असते. पण त्याचं काय ज्यांच्याकडे पैसाच नाही? परिस्थितीने जर डोके वर काढू दिले नसेल तर अशा व्यक्तीला उधारी मागण्याचा नाईलाज असतो. अर्थात सुरुवातीलाच आपण म्हटलो आहे की उधारी मागणे गैर नाही. मग नेमकं चुकीचं काय आहे? तर जाणून बुजून परिस्थिती स्वतः आपणहून खराब करणे आणि उधारी मागण्याची सवय लावून घेणे. याच प्रकारातल्या लोकांबद्दल थोडं माहीत करून घेणार आहोत.

आजच्या पुरता विचार करून जगणारे उधारीच्या मार्गावरून अजिबात हटत नाहीत. त्यांना या गोष्टीची कसलीही शरम नसते. किंवा त्यांना या गोष्टीची सवय लागलेली असते. याच जगण्याला ते जीवन मानतात. ते एक ना अनेक उधाऱ्या करून ठेवतात. शिवाय केलेल्या काही उधाऱ्या बुडवूनही टाकतात. यात काही हितसंबंध खराब तर करून घेतातच शिवाय नावालाही बट्टा लावून घेत नशिबाला दोष देतात. आपण जे करतोय ते चुकीचं आहे असे त्यांना कधीच वाटत नाही. परिस्थिती भाग पाडते अशी मनाची समजूत काढून ते आला दिवस लोटून देतात.

घेतलेले पैसे फेडण्यास असमर्थ ठरलेले काही लोक तर पहिले कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज उचलतात. कर्ज कसे फेडू शकतो? याचे यांना काहीच माहीत नसते तात्पुरती नड भागावी हा एवढाच तात्पुरता विचार करून ते आणखीन एक डोंगर डोक्यावर चढवून ठेवतात. आणि मग होतं काय परिस्थिती आणखीन बिकट होत जाते. मग एक दिवस गोचिडाकडून गैरव्यवहारी कर्ज उचलावे लागते. गोचीड म्हणजे काय? तर अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे देणारे मंडळी. लाखभर रुपयांची उचल केल्यानंतर 5-10% प्रतिमाह व्याजदराने हे पैसे देतात. त्याकरिता समोरच्याची किंमती वस्तू ठेऊन घेतात. कर्ज घेणारा एक रक्कमी कर्ज फेडू शकत नाही. बऱ्याचदा तर व्याजाचे पैसे फेडणेही त्याला अशक्य होऊन बसते. पुढे जाऊन त्या व्यक्तीकडून चक्रवाढ व्याजाच्या नावाखाली प्रतिदिन व्याज लावले जाते. परतावा न केल्यास वस्तू ठेऊन घेणे, दमदाटी करणे, वेळ पडल्यास मारहाण करणे अशाही गोष्टी घडतात. बिचाऱ्याला पैसे फेडता न आल्याने त्याची वस्तूही हातातून निघून जाते. थोडक्यात पूर्वी जे जुलुमी सावकारी चालायची ती अजूनही काही ठिकाणी संपलेली नाही. नियमबाह्य पद्धतीने कसलेही गणिती ज्ञान नसलेले व्याजदर लावून फक्त लुटपाट केली जाते. म्हणून व्हायचं ते होऊद्यात पण अशा गोचिडाच्या तावडीत फसू नका. हळूहळू करून तुमचं रक्त पिणे हेच काम त्यांना ठाऊक असते.

अतिमहत्त्वाच्या विषयाकडे आपण आता आलेलो आहोत. आपल्याकडे कुटुंब पद्धत आहे. कुटुंब म्हणजे काय तर आई वडील भाऊ बहीण बायका मुलं. एका पूरुषाच्या खांद्यावर त्याचं कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी असते. आजच्या युगात तर महिलाही ती जबाबदारी उचलतात. आता या कुटुंब पद्धतीने जगत असताना प्रत्येक जण आपल्या कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी झटत असतो. भवितव्यासाठी, मुला, मुलींचे शिक्षण लग्न, दवाखाना, हौसमौज यासाठी पैसे उभे करीत असतो. म्हणजे थोडक्यात काय तर तो कुटुंबाचे आर्थिक नियोजन करीत असतो. यात जर त्याच्याकडे एखाद्याने उधारी मागितली तर तो शक्य असेल तर देतोही. पण जर त्याला ती वेळेवर परत मिळाली नाही तर मात्र याचे नुकसान म्हणून त्याच्या कुटुंबाला ते सोसावे लागते. त्यामुळेच सर्वांचेच कुटुंब आहे. जो तो त्याचे नियोजन करीत असतो. तुमच्या उधारीमुळे नकळत तुम्ही दुसऱ्याच्या कुटुंबाचेही आर्थिक गणित बिघडवून टाकता.

याउलट काय करता येईल? तर सर्वप्रथम उधारी घेण्याची सवय सोडायला हवी. आधी घेतलेली उधारी परत करावी मग स्वतःची हौसमौज बघावी. कारण तुम्हाला पैसे देणारा लवकर परत मिळण्याची आस लावून असता. तुम्ही उधारी रखडवता म्हणजे उधार घेणाऱ्याला अंधारात ठेवता. तुम्हाला त्याने वेळेवर केलेल्या मदतीची जाण नसते. तुम्हाला तुमच्या निरर्थक गोष्टींवरचा खर्च बंद करावा लागेल. परिस्थिती बदले पर्यंत दिखाव्याच्या मागे न जाता अंथरून आहे तितकेच पाय पसरवावे. आणि दुसरीकडे चार पैसे कसे जास्त कमवता येतील यासाठी मेहनत करावी. इकडून तिकडून घेतलेले पैसे व्यवस्थित नियोजन करून परत करावे. ज्यादिवशी संपूर्ण देणी संपतील तेव्हा तुम्ही उधारी घेणारे नाही तर उधारी देणारे व्यक्ती बनला आहात याची तुम्हाला जाणीव होईल.

आता इथे कुणालाही उधार देण्याची चूक करू नका. माणुसकी म्हणून तुम्ही दुसऱ्याला उधार देता. पण तुमचेच पैसे तुम्हाला भिकाऱ्यासारखे मागावे लागतात. तुम्ही कुणाची उधारी लांबवली असेल तर तुम्हाला नक्कीच ते माहीत असेल. जो व्यक्ती खूप उधाऱ्या करतो, बुडवतो, रखडवतो. पैसे न कमवता कशावरही उडवतो अशा व्यक्तीला उधारी बिलकुल देऊ नका. परिस्थिती खूपच बेताची असेल, खूपच अडचण असेल, परत मिळण्याची खात्री असेल आणि तुमच्याकडेही अतिरिक्त असतील तर माणुसकी म्हणून द्यायला हरकत नाही. पण उधारीची सवय असलेल्या उधारखोराला पैसे देण्याची चूक अजिबात करू नका. तुम्ही कष्टाने कमवता, तुमचे कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडू शकते. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी स्वतःला अडकवून घेऊ नका. हाताशी आलेला पैसा आजच्या पुरता विचार करून उडवू नका तो उद्यासाठी जपून ठेवा. कुणासमोर हात पसरायची वेळ येणार नाही निदान इतके तरी पैसे जवळ ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहा.

रमेश आणि सुरेश दोन मित्रांपैकी एका मित्राला रमेशला ४० हजार पगार आहे. आणि दुसऱ्या मित्राला सुरेशला त्याच्या निम्माच. पण गंमत अशी आहे की ४० हजार पगार असूनही तो महिन्याच्या शेवटी हजार रुपयांची उधारी हमखास बनवतोच. का बरं असे? वीस हजार पगार असणारा हजार रुपये उधारी कसे देऊ शकतो?

ज्याच्याकडे वीस हजार पगार आहे त्या सुरेशला उधारी मागणे पटत नाही. कुणापुढे हात पसरावे लागतील अशी वेळ येऊ नये याची तजवीज त्याने केलेली असते. दरमहा घरखर्चाला घरी दहा हजार रुपये देऊन त्याच्याकडे दहा हजार उरलेले असत. त्यातलेही तो पाच हजार स्वतःसाठी वापरी. त्यात मग त्याचे काही मजाहजा, खरेदी सगळं आलंच. आणि उरलेले पाच हजार तो पद्धतशीरपणे सेविंगला सोडत. रमेशचं मात्र तसं नाही. रमेशला पगार चाळीस हजार असला तरी महिन्याला त्याच्या सुट्ट्या होत असत. त्यामुळे तिथेच पाच हजार त्याचे कापले जाई. ज्या दिवशी सुट्ट्या होई तेव्हा रमेश कुठेतरी मजाहजा करण्यासाठी गेलेला असे. त्यामुळे त्याचे तिथे चार पाच हजार आरामात खर्च होई. पुढे रमेशची महागडी बाईक जीचा वापर फारसा होत नाही. कारण रमेश तर रेल्वेने प्रवास करी. सुट्टीच्याच दिवशी काय वापर होईल तेवढाच. बाकी ती बाईक फक्त हप्ते भरण्यासाठीच त्याने विकत घेतली समजा. आणखीन एक ईएमआय म्हणजे रमेशच्या खिशातल्या टॉप मॉडेल आयफोनचा. थोडी श्रीमंती दिसावी म्हणून रमेशने तोही हप्ता बांधलाच होता. सुरेश प्रमाणे घरात खरखर्चाला तोही दहा हजार देतच होता. आता त्याचं गणित कसं बिघडले बघा. सुट्ट्यांमुळे त्याच्या हातात येई 35 हजार. त्यातले हप्त्यांना गेले 15 हजार, घरात दिले 10 हजार. उरलेले 10 हजार रमेश असेच मजेहजेसाठी खर्च करी. मग ते स्टारबक्समध्ये जाऊन कोफी पिऊ, की बर्गर किंग मध्ये जाऊन पिझा चावू. का विकेंडला मित्रांमध्ये दोन दोन बडवायजर ढकलो. सोबत चकण्याला कबाब, तंदुरी, लॉलीपॉप. मज्जोनी लाईफ. अशी लाइफस्टाइल रमेश जगत असेल तर शेवटच्या विकेंडनंतर रमेश मोकळा होऊन जात. मग त्याला गरज पडे सुरेशची. मित्र पैशावाला आहे, शिवाय पगार झाला की आपल्याला फिक्स रिटर्न करणार यामुळे उधारी द्यायला काही चिंता नव्हती.

चिंता करावी तर रमेशनेच करावी. श्रीमंत दिसण्यावर व लाइफस्टाइल जगण्यावर तो जो काही खर्च करतोय तो त्याचा बेजबाबदारपणा आहे. पुढे जाऊन रमेश आणि सुरेश दोघांचीही नोकरी जाते. 5-5 हजार बाजूला काढून सुरेशकडे लाखभर रुपये जमलेले असतात. श्रीमंत लाइफस्टाइल साठी घालवलेल्या पैशामुळे मात्र रमेशच्या खात्यात फक्त चाळीस हजारच असतात. ईएमआय भरून घेतलेला आयफोन आता जुना झालेला असतो. अर्धी किंमतही द्यायला कुणी तयार नसतो. घेतलेली स्पोर्ट्स बाईक एवढं पेट्रोल पिते की रमेशला पायी पायी जाणं योग्य वाटायला लागतं. नवी नोकरी मिळेपर्यंत चाळीस हजारात कसे गुजराण करावे या विचारात रमेशला वेड लागायची पाळी येते. याउलट सुरेशचा कसलाही मोठा खर्च नसतो. शिवाय लाखभर रुपयात तो वर्षही आरामात काढू शकतो.

सांगायचं तात्पर्य हेच की आजचा विचार न करता उद्यासाठीची तजवीज करून ठेवा. वेळ काळ सांगून येत नाही. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. विचारांना मोठे करा. जीवनात चढ आणि उतार या दोन्ही गोष्टी असतातच. सर्व गोष्टींची तयारी ठेवा. परिस्थिती बदलत नाही म्हणून नशिबाला दोष देऊन रडत बसू नका. ती बदलण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करा. सौ बात की एक बात, तुमचे कर्म चांगले ठेवा. कारण तुम्ही आज जे काही करणार आहात त्याचेच परिणाम तुम्हाला उद्या दिसणार आहेत. धन्यवाद !!!

विचार पटले तर आचरणात आणून बदल बघा, नाहीतर आहे तसेच उधारी मागून रडत जगा.

टीप : या लेखातून आजच्या सत्य परिस्थितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. सत्य हे कडवट असल्यामुळे अनेकांना ह्या लेखामुळे कारल्याची चव चाखायला मिळाली असेल. म्हणजेच बोचलं असेल. हा लेख परिस्थितीमुळे हतबल होऊन उधारी घेणाऱ्यांसाठी नसून उधाऱ्या घेऊन स्वतःहूनच आपली परिस्थिती हतबल बनवणाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी होता. बाकी तुम्हाला लेख कसा वाटला नक्की कळवा.

Kalyan Dombivli Vidhansabha Result 2019 : कल्याण डोंबिवलीत मागील निवडणुकीत कुणाला किती मतं?

कल्याण : Kalyan Dombivli Vidhansabha Result 2019 च्या तुलनेत यंदाची निवडणूक काहीशी वेगळी ठरणार आहे. दोन प्रमुख पक्षांच्या विभाजनानंतर होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. सध्या मतदान प्रक्रिया पार पडली असून अंतिम निकाल हाती येण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. नवा निकाल हाती येण्यापूर्वी जरा मागील निकालावर एक नजर टाकूयात.

मागील विधानसभा निवडणुकीत कल्याण डोंबिवलीतील चारही मतदारसंघात भाजप, शिवसेना आणि मनसे या तीन पक्षांनी आपापले झेंडे रोवले. कल्याण पूर्वेत भाजपकडून गणपत गायकवाड, कल्याण पश्चिमेत शिवसेनेचे विश्वनाथ भोईर, कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील तर डोंबिवलीत भाजपचे रवींद्र चव्हाण आमदार म्हणून निवडून आले होते. यात भाजपच्या दोन्ही आमदारांची हॅट्रिक वगळता इतर दोन आमदार नव्यानेच लोकांना मिळाले होते.

यंदा होणाऱ्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांनाच किंवा त्यांच्या कुटुंबियांनाच पुन्हा उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात लढणारे उमेदवार यावेळी काहीसे वेगळे आहेत. मात्र त्यापूर्वी प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा मागील निकाल जाणून घेऊयात.

कल्याण पूर्व विधानसभा :-

मागील वेळी भाजपचे गणपत गायकवाड विरुद्ध अपक्ष (शिवसेना बंडखोर) धनंजय बोडारे यांच्यात थेट लढत झाली होती. यात गणपत गायकवाड यांना ६०,३३२ मते तर बोडारे यांना ४८,०७५ मते मिळाली होती. गायकवाड यांनी बोडारे यांचा १२,२५७ मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत पक्षीय लढत पाहता ही जागा आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेसने लढली होती. ज्यात प्रकाश तरे यांनी १६,७५७ मते मिळवली होती. तर वंचीत बहुजन आघाडीच्या उमेदवार अश्विनी धुमाळ यांनाही १२,८९९ मते मिळाली होती. कल्याण पूर्वेत ३६९० जणांनी नोटा हा पर्याय निवडला होता. यासह १९ उमेदवारांच्या यादीत नोटा हा पर्याय पाचव्या क्रमांकावर पोहोचला होता.

कल्याण पश्चिम विधानसभा :-

सदर विधानसभा क्षेत्रात युतीकडून ही जागा शिवसेनेला देण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेले तेव्हाचे विध्यमान भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र तरीही विश्वनाथ भोईर यांनी ६५,४८६ इतकी मते मिळवून आमदारकी मिळवली होती. तर नरेंद्र पवार यांना ४३,२०४ मते मिळाली होती. तिसऱ्या स्थानी मनसेचे प्रकाश भोईर यांना ३८,०७५ लोकांनी पसंती दर्शवली होती. झालेल्या तिरंगी लढतेत विश्वनाथ भोईर यांनी २२,२२७ मतांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली होती. पक्षीय लढत पाहता युती विरोधात लढणाऱ्या आघाडीकडून ही जागा काँग्रेसचे सचिन पोटे लढवीत होते. ज्यांना २०,१६० मते मिळाली होती.

कल्याण ग्रामीण विधानसभा :-

या मतदारसंघात शिवसेनेने तेव्हाचे विध्यमान आमदार असलेल्या सुभाष भोईर यांचे तिकीट कापून रमेश म्हात्रे यांना निवडणूक लढण्याची संधी दिली होती. मात्र ही शिवसेनेची घोडचूक ठरली आणि याचा फायदा मनसेने उचलत शिवसेनेकडून ही जागा पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेतली. २०१९ निवडणुकीत मनसेच्या राजू पाटलांनी ७१५४ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. राजू पाटील यांना ९३,९२७ इतकी मते मिळाली होती. तर शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांना ८६,७७३ मते मिळाली होती. या विधानसभा क्षेत्रात २००९ पासूनच मनसे विरुद्ध शिवसेना अशी काटो की टक्कर पहायला मिळत आहे. पराभूत उमेदवार रमेश म्हात्रे यांचा २००९ मध्ये देखील मनसेच्या रमेश पाटील यांनी पराभव केला होता. मात्र रमेश पाटलांना २०१४ साली सुभाष भोईर यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. २०१९ साली शिवसेनेने विध्यमान आमदारांना थांबवून पुन्हा एकदा रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली आणि पुन्हा एकदा ते पराभूत झाले आणि ही जागा पुन्हा एकदा मनसेच्या ताब्यात गेली.

डोंबिवली विधानसभा :-

२०१९ च्या लढतीत रवींद्र चव्हाण यांनी ८६,२२७ मते मिळवून एकतर्फी विजय मिळवत आमदारकीची हेट्रिक साधली होती. तब्बल ४१,३११ मतांच्या फरकाने त्यांनी मनसेच्या मंदार हळबेंचा पराभव केला होता. मंदार हळबे यांना चव्हाण यांच्या जवळपास निम्मी ४४,९१६ इतकी मते मिळाली होती. २०१४ साली झालेल्या निवडणुकीतही त्यांनी असाच मोठा विजय मिळवला होता. ज्यात त्यांची लढत शिवसेनेच्या दीपेश म्हात्रे यांच्याशी झाली होती. १० वर्षांनंतर पुन्हा एकदा दीपेश म्हात्रे हेच त्यांचे प्रतिस्पर्धी ठरले आहेत. २००९ साली झालेली पहिली निवडणूक रवींद्र चव्हाण यांना चुरशीची गेली होती. यादरम्यान शहरात मनसेची मोठी लाट होती. त्यामुळे मनसेच्या राजेश कदम यांच्यासमोर त्यांना १२,३२७ मतांनी विजय मिळाला होता. आता ते चौथ्यांदा निवडणूक लढवीत असून चौथा निकाल काय असेल याकरिता काही तास वाट पहावी लागणार आहे.

कल्याण डोंबिवली मधील या चारही जागांवर कोण आमदार होणार? तुम्हाला काय वाटतं? हे कमेंट बॉक्समध्ये लिहा.

Kalyan Dombivli Vidhansabha Result 2019

कल्याण पूर्व विधानसभा आणि मनसे

Kalyan East MNS : राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. त्यानंतर २००९ साली प्रथमच विधानसभा निवडून १३ आमदार निवडून आले. ज्यात २ आमदार हे कल्याण पश्चिम आणि ग्रामीणचे होते. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत मनसेची ताकद ही तेव्हापासूनच आहे असे दिसते. पण मनसेने इतकी ताकद असतानाही तेव्हा कल्याण पूर्वेत उमेदवार का दिला नाही? आणि अजूनही मनसे कल्याण पूर्वेत उमेदवार का उभा करीत नाही याबद्दल अजूनही मनसेमध्ये नाराजीची भावना कायम आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये मनसेचे सर्वाधिक ताकद असल्याचे मानले जाते. कारण २००९ साली याच भागात मनसेला मिळालेले २ आमदार आणि २०१० साली मनसेने महापालिका निवडणुकीत मिळवलेले भरघोस यश आणि २७ नगरसेवक. इतकेच नव्हे तर मनसेचे वाईट दिवस असतानाही मनसेने १० नगरसेवक २०१५ साली निवडून आणले होते. जर इतकी ताकद या शहरात मनसेची आहे तर महापालिका क्षेत्रातील सर्व चार जागा मनसेने लढवायला हव्यात असे राजकीय विश्लेषक म्हणतात.

डोंबिवलीत रवींद्र चव्हाण तर कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड हे २००९ पासून सलग निवडून येत आहेत. मागील निवडणूकित मनसेने डोंबिवलीची जागा लढवून रवींद्र चव्हाण यांना टक्कर दिली होती. मनसेचे उमेदवार मंदार हळबे जे आता भाजपात आहेत त्यांनी चांगले मतदान मिळवले होते. पण मनसेने मात्र कल्याण पूर्वेत उमेदवार दिला नव्हता. त्याअगोदर २०१४ साली सक्षम पर्याय असतानाही कल्याण पूर्वेत कमजोर उमेदवार मनसेने अचानकपणे उभा केला होता. तरीही मनसेने साडे सात हजार मते मिळवली होती.

२००९ साली मनसेची लाट असताना आणि कल्याण डोंबिवलीत प्रचंड ताकद असताना कल्याण पूर्वेत उमेदवार का दिला नाही असा प्रश्न अजूनही वारंवार विचारला जातो. मात्र मनसेतुन बाहेर पडलेले जुने समर्थक या ठिकाणी गौडबंगाल झाले असे अजूनही सहज सांगतात. इतकेच नव्हे तर यामागे कोणाचा हात आहे तेही सांगतात.

तर मनसेचे आले असते १४ आमदार… कल्याण पूर्वेत वारंवार निवडून येणारे गणपत गायकवाड हे पहिल्यांदाच कल्याण पूर्वेतून निवडणूक लढवीत होते. याच काळात मनसे जोरावर होती. जर मनसेने कल्याण पूर्वेत उमेदवार उभा केला असता तर कदाचित तो उमेदवार निवडणुही आला असता. मनसेची संख्या ही १३ ऐवजी १४ ही असली असती. तसेच कल्याण पूर्वेला गणपत गायकवाड हे नेतृत्व कदाचित तेव्हा मिळाले नसते असेही बोलले जाते.

कल्याण पूर्वेत आजही मनसेचे कट्टर कार्यकर्ते आणि समर्थक आहेत. मात्र आजवर मनसेला कल्याण पूर्वेत वाढू दिले जात नाही असे गंभीर आरोप ऐकावयास येतात. त्यामुळे कल्याण पूर्वेत मनसेची मत इतरांच्या पारड्यात टाकली जातात. जर मनसे ताकद नसलेल्या ठिकाणी उमेदवार देऊन राज्यात १३९ जागा लढवत आहे. मग ताकद असलेल्या कल्याण डोंबिवलीतील कल्याण पूर्वेत उमेदवार का देत नाही असा सवाल आजही कायम आहे.

यंदाच्या निवडणुकीत मनसे कल्याण पूर्वेची जागा लढवणार असल्याची चर्चाही होती. शिवाय इतर पक्षातील एक उमेदवार या भागातून मनसेतुन निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचेही बोलले जात होते. मात्र सरते शेवटी पुन्हा एकदा मनसेने ही जागा सोडली आणि कार्यकर्ते नाराज झाले असे चित्र आहे. आता हेच नाराज कार्यकर्ते आपले मत कुणाच्या पारड्यात टाकणार हे आता पहावे लागणार आहे.

Kalyan East Assembly and MNS

आजोबांच्या तरुणपणातला फोटो लागला हाती

आरसा हा आपला वर्तमान दाखवतो. पण आपला भूतकाळ जिवंत ठेवतो तो म्हणजे कॅमेरा. तो आता तर ज्याच्या त्याच्या हातातल्या मोबाईल फोनमध्ये आलेला आहे. पण पूर्वीच्या काळी कॅमेरा देखील फार दुर्मिळ असे. आज माझ्या वडिलांनी मला एक जुना फोटो दाखवला. जुन्या काळात जशी तैलचित्रे असायची तसा तो फोटो होता. कुणाचा फोटो होता हे अगोदर समजलेच नाही. अंदाजे 25 ते 30 वर्षांच्या तरुणाचा तो एक रुबाबदार फोटो पाहत असतानाच वडील म्हणाले की हा तुझा आजोबांचा फोटो आहे.

फोटो पाहून विश्वासच बसेना. कारण मी माझ्या आजोबांना लहानपणी पाहिले होते. 2000 साली ते देवाघरी गेले जेव्हा माझे वय 6 वर्षे होते. त्यानंतर एका फोटोमध्येच मी त्यांना पाहत होतो. जो त्यांचा अंदाजे 60 ते 65 वयाचा फोटो असेल. यावरून कल्पनाच करू शकणार नाही की ही फोटोतली तरुण व्यक्ती माझे आजोबा असतील. आखीव रेखीव भुवया आणि भेदक अशी त्यांची नजर होती. कायम वजनात राहायचं आणि रुबाबात जगायचं ही त्यांची स्वभावशैलीच होती. गावखेड्यात आता 21 व्या शतकात बदल होऊ लागले आहेत. त्यापूर्वी शहरी भाग म्हणजे जणू परराज्यात जाण्यासारखे होते. दिवसभराचा अपूर्ण प्रवास आणि कुठेतरी मुक्काम असे काही त्याकाळी (50 वर्षांपूर्वी) असायचे.

ऐन तारुण्यात आजोबांनी गावी राहून फोटो कसा काढला? असा प्रश्न माझ्या मनात आला. फोटो मध्ये सूट घातलेला व्यक्ती गावाला कसा असू शकतो हाही प्रश्न आला? त्यानंतर वडिलांकडून समजले की माझे आजोबा हे तरुणपणातच मुंबईत आले होते. साधारणपणे तो काळ असावा अंदाजे 1960 ते 1965 च्या दरम्यानचा. मुंबईत आल्यानंतर त्यांना रेल्वेमध्ये नोकरी करण्याची देखील संधी मिळाली होती. परंतु शहरापेक्षा गाव बरा असे त्यांना वाटले असावे किंवा कौटुंबिक जबाबदारी, अशा कोणत्यातरी कारणाने त्यांनी मुंबईतील वास्तव्य सोडून पुन्हा ते गावात आले. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात असलेल्या एका छोट्याशा खेडयात त्यांना राहणे जास्त सुकर वाटले. पुढे त्यांनी कायमस्वरूपी शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. दोन मुलं आणि तीन मुली असा त्यांचा प्रपंच होता. पत्नी पार्वताबाई यांच्या सोबत त्यांचा शिस्तीचा पण सुखाचा संसार झाला. पाठीवर एक भाऊ आणि दोन बहिणी तुकाराम, अंजुबाई आणि पप्पूबाई.

पप्पूबाई ही त्यांची बहीण कडक स्वभावाची होती. पुढे त्यांचाही विवाह झाला. मुळशी तालुक्यातील मौजे उरावडे गावात कांजणे घराण्यात त्यांना देण्यात आले. तर अंजुबाई यांनाही मुळशी तालुक्यातील मौजे आंबवणे गावात भावेकरांची सून म्हणून पाठविले. पुढे लहान भावाचा विवाह झाला. आणि धोंडिबा बाबांनी घराची वाटणी करून आपल्या संसाराचा गाडा हाकायला सुरुवात केली. त्यांची पाच अपत्ये असून माझे वडील नारायणराव हे थोरले सुपुत्र. यानंतर राजेंद्रराव, नंदाबाई, मंदाबाई, कुंदाबाई ही माझ्या वडिलांनी भावंडे.

मुंबईत वास्तव्यास असताना त्यांनी एका फोटो स्टुडिओमध्ये जाऊन स्वतःचा एक फोटो काढला होता. तो फोटो खरंतर ब्लॅक अँड व्हाईट होता. पण गावी येताना ते हा फोटो घेऊन आले होते. त्याकाळी स्वतःचा फोटो असणे ही खूप मोठी गोष्ट होती. गावात आल्यानंतर संपूर्ण गावाला त्यांनी तो फोटो दाखवला. फोटो पाहण्यासाठी गावकरी म्हणजेच त्यांचे सवंगडी घरीही येत होते. अनेक वर्षे होत गेली. धोंडीबारावांचं वय वाढू लागले. मुले मोठी होत गेली. थोरला मुलगा म्हणजे माझे वडील नारायणराव अंदाजे 12-13 वर्षांचे असतानाच त्यांना दमदाटी करन त्यांचे भाचे सुरेशराव भावेकर यांच्यासोबत मुंबईला नोकरीस पाठवून दिले. तो काळ होता 1962 चा. (वडिलांचा प्रवास नंतर लिहून प्रकाशित केला जाईल).

माझे वडील मुंबईत नोकरीस आल्यानंतर ते अजूनही मुंबईतच आहेत. गावाशी नाळ जोडली असल्याने बालपण गावी गेले असल्याने ते अधूनमधून गावी जातातच. तेव्हाही गावी गेले असताना आजोबांच्या जुन्या सामानात त्यांना आजोबांचा हा फोटो सापडला. त्यांनी तो फोटो मुंबईत आणून बदललेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये रंग भरले. आणि फ्रेम करून गावाला पाठवून दिली. पण फ्रेम फुटल्यानंतर फोटो व्यवस्थितपणे ठेऊन देण्यात आला. आता पुन्हा तो फोटो त्यांना मिळाला आणि त्यांनी तो मला दाखवला. म्हणून हा फोटो आणि फोटोमागची जेवढी समजली तितकी कहाणी सर्वांना समजावी यासाठी हा माझा बऱ्याच दिवसनांतर आलेला स्पेशल लेख.

धन्यवाद !!!

  • संतोष नारायण दिवाडकर (पत्रकार 8767948054)

सूचना : ज्यांनी कुणी हा लेख वाचला असेल ते जर मला ओळखत नसतील तर त्यांनी कृपया मला व्हॉट्सअप वर आपल्याला काय वाटलं ते कळवावे. आणि आणखीन काही जुन्या गोष्टी शेअर कराव्यात. अगदी निःसंकोचपणे बिनधास्तपणे सांगा.

Lagnachya goshti : लग्न पहावे करून; भाग पहिला

Lagnachya goshti : लग्न पहावे करून… यंदा कर्तव्य आहे… जुळल्या रेशीमगाठी… असल्या ओळी आता हमखास वाचायला मिळत आहे. शहरातील गल्लोगल्ली व गावातील वाडीवाडीत लग्न समारंभाचे सूर ऐकायला मिळत आहेत. म्हणून म्हटलं की हीच वेळ योग्य आहे लग्नावर लिहण्याची. बरेच दिवस हे डोक्यात घोंगवणारे विचार लिहायला मोकळीक मिळत नव्हती. म्हटलं आता थोडा वेळ काढुच आणि मग केली ही सुरुवात.

या नव्या लेख मालिकेतून मला आधुनिक लग्न समारंभाविषयी सांगायचे आहे. तसे विषय बरेच आहेत. जसे की लग्नाची ठरवा ठरव, बस्ता, पत्रिका, मानपान, भोजन समारंभ, पाहुण्यांचे रुसवे फुगवे, वरातीचा घाट, पूजा, जागरण गोंधळ आणि पुढचे काही दिवस. यातील प्रत्येक मुद्द्यावर मी निश्चितपणे बोलणार आहे.

दोन वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. त्यामुळे मी स्वतःच्या लग्नात अनुभव घेऊनच पुढे इतरांच्या लग्नातील सावळे गोंधळ सांगणार आहे. सुरुवात करायची झाली तर बघा बघी पासून. मुळात कोणत्याही लग्नाचा हा मुख्य पाया असतो. हा जर नीट नसेल तर त्या दोघांचे संपूर्ण आयुष्य हे तडजोड करण्यातच जातं. ज्यात सुखाचा शोध शोधून शोधून घ्यावा लागतो.

फार पूर्वी प्रेमविवाह म्हणजे गैर मानले जात होते. थोडक्यात पालकांना नाक कापले गेल्याचा आविर्भाव होत असे. आज हाच आविर्भाव अभिमान बनला आहे. आमक्या आमक्याच्या पोराने पोरगी पटकावली. तुमच्या पोराला काय जमत का नाय? किंबहूना आता पालक आपल्या मुलालाच म्हणतात की तुला मुलगी शोधता नाही येत का? की ते आता आम्हीच बघायचं? आता या प्रेमविवाहाच्या गोष्टी झाल्या. ज्या अजूनही काही घरांमध्ये मान्य नाहीत. जग काय म्हणेल? या एका प्रश्नामुळे कित्येक पालक आपल्या मुलांचे सुख हिरावून घेतात. तर काही मुलं घरातून पळून जाणे पसंद करतात.

पालकांना एक गोष्ट सांगायला नक्की आवडेल. देवाधिकानी देखील प्रेम केले आहे. यात गैर काय आहे ? शेवटी काय तर आयुष्याच्या जोडीदाराची निवडच ती. उगाच तुम्ही ठरवून दिलेल्या लग्नाचा मागे लागता आणि मुलांना ज्ञानाच्या गोष्टी सांगता. यामुळे होत असे की, ठरवून केलेलं लग्न हे यशस्वी होत की नाही हे सांगू शकत नाही. काही वेळेस मुलाला मुलीचे वागणे पटत नाही, मुलीला मुलाचा स्वभाव पटत नाही. काही वेळेस शांत स्वभावाच्या मुलाला नखाने ओरबाडून मांजरी सारखी चवताळणारी बायको मिळते. तर कधी गरीब गाई मुलीला दारुडा आणि मारझोड करणारा अन्यायकारी नवरा मिळतो. आणि मग पुढे काही दिवस घरच्यांच्या बैठका, वोर्निंग लेटर, सोडचिठ्ठया, भांडण, खर्चाची मागामाग असे खूप काही कुटाने होतात. पण हे तेव्हाच जेव्हा त्रास सहन करायची तयारी नसते.

आई वडिलांना त्रास नको म्हणून कित्येक लेकीबाळींनी नवऱ्याचा व सासरच्या लोकांचा जाच सहन केला आहे. बापाकडे फुलाप्रमाणे आयुष्य जगलेली मुलगी सासरी आल्यावर अक्षरशः पायपुसन देखील बनली आहे. हे समाजातील भीषण वास्तव्य आहे. परिस्थिती आज ना उद्या बदलेल या एका आशेवर कित्येक संसार अजूनही सुरू आहेत. पण जोपर्यंत पती पत्नी एकमेकांच्या सुखाचा विचार करीत नाहीत तोवर हे संसार कधीच बहरत नाहीत. म्हणून म्हटले की स्थळ शोधन ही लग्नाची पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. ही पसंद चुकली तर आयुष्याचा खेळ झाला. पण शेवटी खेळ तर नियतीचा पण आहे. जसं वालाह्याचा वाल्मिक ऋषी होतो तसंच काही.

म्हणजे सांगायचं हे की काही वेळेस पसंद चुकते सुरुवातीची काही वर्षे जाचात जातात पण कुठून तरी आशेची किरण जागी होतात आणि आयुष्याला कलाटणी मिळते. दुःखाचा संसार सुखाचा होतो जेव्हा वेळ चांगली होते. आणि बहुतेक वेळा ही चांगली वेळ आनण आपल्याही हातात असतं. अशा परिस्थितीत आपलं आयुष्य बरबाद झालं हा विचार सोडून आपलं आयुष्य सुंदर होणार आहे हा विचार करून संसाराचा गाडा पुढे हाकत रहावा. असे करणाऱ्याच्या आयुष्यात नक्कीच सोन्याचे दिवस येतात.

मुला मुलीचे लग्न जमवताना अगोदर त्यांच्या सुखाचा विचार केला जावा. कारण फक्त लग्न लावून देणं ही आपली जबाबदारी नाही. तर आपल्या मुलाबाळाचं सुख कशात आहे हे पाहूण आपली खरी जबाबदारी आहे. असो आता लग्न ठरल्यानंतर बातमी वाऱ्यासारखी नातेवाईकांमध्ये, शेजारीपाजारी, गावभर पसरते. मग चर्चा सुरू होतात. “हीच जमलं बरं का… कुठं दिली तिला?… बरीच लांब दिली… आता तिकडे कामं जमली तर बरी… अजून चांगलं स्थळ बघायला पाहिजे होतं… पोरगी लय शिकली पण पोराचं शिक्षण कमी आहे… पोर सावळी आहे पण नवरा गोरापान भेटला बुवा… सरकारी नोकरी आहे पोराची… तरी पण नीट चौकशी केली पाहिजे यांनी…” या अशा चर्चा ऐकायला मिळतात.

ऍरेंज मॅरेज… म्हणजेच ठरवून लग्न करण्यामागचे एकमेव कारण म्हणजे आमच्या मुला मुलीचे लग्न आमच्याच समाजात किंवा जाती जमातीत करून देण्याचा अट्टहास. मग जातीपुढे आयुष्याची माती का होईना. आम्ही जोखीम उचलायला तयार असतो. जो जातीचा नाही तो या मातीचा नाही अशा फुशारक्या करणारी चार पाच स्वयंघोषित विचारवंत टाळकी पुढे येतात आणि दुसऱ्याच्या आयुष्याचा सौदा करून सुपारी फोडून पान चावून कोपऱ्यात घाण करून निघून जातात. यांच्याबद्दल बोलायची आवश्यकता ही आहे की यांचे मोठेपण मिरवणे हे कुणाच्या तरी आयुष्याशी खेळ असतो. त्यामुळे आजच्या जगात जाती पाती पाहण्यापेक्षा तुम्ही मुलाचे विचार आणि आपल्या मुलीला तो कसा सुखी ठेऊ शकतो हे पाहण्याकडे प्राधान्य द्या. कारण जात जात करून उद्या जेव्हा संकट येईल तेव्हा कोणी पूढे येत नसतं. त्या संकटाला आपल्यालाच सामोरे जायचे असते. मग जी चार लोक तुमच्या गरजेला उपयोगी पडतील का नाही हे माहीत नाही ते काय म्हणतील या विचाराने मुलांच्या आयुष्याशी खेळू नका. जोडीदार निवडताना जात पात विसरा त्या जोडीदाराची गुणवत्ता पहा. सुखाचा संसार होईल अशी खात्री असेल तर द्या हातात हात.

तुमचं लग्न झालं आहे का? ठरलं आहे का? किंवा तुमच्या ऐकण्यात असे काही किस्से असतील तर नक्की कमेन्ट करा. किंवा मला पर्सनल मेसेज करून तुमचं मत नक्की कळवा. जेणेकरून मला हे कळेल की हा लेख कोण कोण वाचत आहे. आणि वाचकांना त्याबद्दल काय वाटते. आता पुढच्या भागात आपण जरा निमंत्रण पत्रिकां बद्दल बोलूयात. तो खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यावर व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. पत्रिका ऑनलाइन की ऑफलाइन द्याव्यात यावर व्यक्त होऊयात. वाट पहा… लवकरच पुढील भाग.

संतोष दिवाडकर (युवा पत्रकार 8767948054)

Lagnachya goshti : Lagna pahave karun; part 1

Subrata Roy : लाखो कुटुंबांचा ‘सहारा’ तुटला; मुळशी मावळचा पोशिंदा गेला

Subrata Roy : सहारा इंडिया ग्रुपचे प्रमुख, लोणावळ्या जवळील अँबी व्हॅली सिटीचे मालक सुबरोटो रॉय यांचे मंगळवारी वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांना बीपी आणि शुगर वाढण्याचा त्रास होता. हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर लखनऊ मध्ये अंतिम संस्कार करण्यात आला. त्यांच्या निधनाने मावळ व मुळशी तालुक्यातील भागांत हळहळ व्यक्त केली जात असून हजारो कुटुंबांचा पोशिंदा हरपल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली सुब्रतो रॉय यांचा बिहारमध्ये जन्म झाला. आणि त्यांचे शिक्षण कोलकाता आणि उत्तर प्रदेशात पूर्ण झाले. अत्यंत कमी वयात देश दौरा घडत असल्याने संपूर्ण देशच त्यांचे घर बनले होते. म्हणूनच ज्या काळात रस्ता, वीज अशा सोयी सुविधा नसतानाही मुंबई पुण्याच्या मध्यभागी असलेल्या लोणावळ्याच्या आतील बाजूस असणाऱ्या खेडोपाड्यात जाऊन त्यांनी आपले साम्राज्य उभे केले. ज्याला अँबी व्हॅली सिटी अथवा सहारा म्हणून ओळखले जाते.

अँबी व्हॅली सिटी आणि आर्थिक क्रांती :- ही सिटी बनविण्यासाठी त्यांनी जमीन खरेदी केली. त्यानंतर परदेशात असणाऱ्या सर्व हायजेनिक सोयी सुविधायुक्त शहरा प्रमाणे त्यांनी एक सुंदर असे शहर तयार केले. या शहराच्या निर्मितीपासून ते आतापर्यंत त्यांना मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागत होते. यासाठी त्यांनी येथील स्थानिक गावकऱ्यांना रोजगार उभा केला. यामुळे सहारा सिटी च्या आसपासच्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या हाताला काम लागले आणि गावातील लोकांना पैसा दिसू लागला. खिशात पैसे खेळू लागल्याने गावकऱ्यांचे राहणीमान सुधारले. मुलांची शिक्षणे झाली, मुलींची लग्न झाली. पैशाला पैसा जोडून शेतकरी व्यवसाय करू लागले.

अँबी व्हॅली सिटी मुळे जवळपास हजारो कुटुंबांचे जीवन सुखकर झाले. पुढील पिढ्यांचे भविष्य देखील सुधारले. आज या भागात अनेक धनदांडगे लोक आहेत. मात्र प्रत्येकाच्या सुरुवातीला सहाराचा सहारा आहे. केवळ अँबी व्हॅली सिटीच नव्हे तर सुब्रतो रॉय यांचे देशभरात अनेक व्यवसाय होते.

सुब्रतो रॉय यांची एकूण संपत्ती : त्यांची एकूण संपत्ती दोन लाख ५९ करोड रुपये असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर त्यांच्याकडे पाच कॅम्पस आणि जवळपास ३१ हजार एकर जमीन होती. सुब्रतो रॉय यांची जेट एअरवेज, एअर सहारा अशी स्वतःची एअरलाईन होती. लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये आलिशान हॉटेल्स, एक फॉर्म्युला वन टीम आणि आयपीएल मध्ये देखील त्यांनी पुणे वॉरीयर्स इंडिया नावाने टीम बनवली होती. इतकेच नव्हे तर पुण्यातील गहुंजे क्रिकेट स्टेडियम हे त्यांनी बांधलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम होते. काळाच्या ओघात ते त्यांच्याकडून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे आले.

भारताच्या क्रिकेट जर्सीवर २००१ ते २०१३ पर्यंत सहारा इंडिया असे नाव झळकत होते. १३ वर्षे त्यांनी भारतीय संघाला स्पॉन्सर केले होते. मात्र २०१४ पासून त्यांचा पडता काळ चालू झाला आणि त्यांना स्पॉन्सरशिप आणि आयपीएल टीम बंद करावी लागली. पूढे स्टेडियम देखील गमवावे लागले. सेबीचा ससेमिरा पाठी लागण्याने त्यांना दोन वर्षे कारागृहात देखील जावे लागले. यामुळे सहारा परिवार डबघाईला येऊ लागला होता. यानंतर सहारा परिवारने आजपर्यंत कठीण दिवसांचा सामना केला. अशा कठीण परिस्थितीतही सहारा पूर्णपणे बंद झाला नाही. त्यांनी अडखळत का होईना आपले साम्राज्य सुरूच ठेवले. वाढत्या वयात या काळाचा संघर्ष करीत असतानाच शेवटी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुब्रतो रॉय यांच्या जाण्याने दोन्ही तालुक्यातील भाग शोकसागरात बुडाले असून गावोगावी हळहळ व्यक्त केली जात आहे. बिहारमध्ये जन्मलेला एक तारा महाराष्ट्राच्या खेड्यात येतो. तेथील गरीब कष्टकरी गावकऱ्यांना रोजगार देऊन येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य बदलतो. म्हणून सुब्रता रॉय हा या भागाचा पोशिंदा होता असेही म्हणायला हरकत नाही. एकेकाळी काही नसणाऱ्या घरात आजसर्व काही आणि दारातही गाडी आहे. हजारो लाखो लोकांच्या डोक्यावर छत्रछाया देणाऱ्या सुब्रता रॉय यांच्या निधनानंतर सहारा ग्रुप देखील जणू बेसहारा झाला आहे. म्हणूनच आज लोक म्हणतात, “तो आला पण आम्हाला आणि आमच्या जगण्याला ‘सहारा’ देऊन गेला’.

अशा या लाखोंच्या पोशिंद्याला भावपूर्ण श्रद्धांजली !

संतोष दिवाडकर 8767948054

Subrata Roy passed away

Baipan Bhari Deva review ; बाईपण भारी देवा चित्रपट का गाजतोय ?

Baipan Bhari Deva review : बाईपण भारी देवा चित्रपट का गाजतोय ? हा अनेकांना पडलेला एक प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अनेकांचे पाय सध्या सिनेमागृहाकडे वळत आहेत. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी फक्त स्त्रिया गर्दी करीत असून जेमतेम १०% पुरुषच सिनेमागृहात हजेरी लावत आहेत ते ही आपल्या बायकोच्या इच्छेखातर.

केदार शिंदे दिग्दर्शीत हा चित्रपट रितेश देशमुखच्या वेड चित्रपटा नंतर महाराष्ट्रभरात गाजला असून या चित्रपटाने बॉलिवूडची मात्र महाराष्ट्रात चांगलीच वाजली आहे. पाच करोड खर्च करून बनवलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ३२ करोडचा पल्ला पार केला आहे. इतकेच कायतर कधी नव्हे ते सिनेमागृहात फक्त मराठी चित्रपटासाठी स्क्रीन लागत असून बॉलिवूड करिता पुरेश्या स्क्रीन मिळणे आणि चित्रपट चालणे अतिशय अवघड बनल्याचे भासू लागले आहे.

कल्याण मेट्रो मॉल मधील आयनॉक्स सिनेमा मध्ये या रविवारी हिंदी चित्रपटाला जेमतेम स्क्रीन मिळाल्या असून ‘बाई पण भारी देवा’ या मराठी चित्रपटाला तब्बल १६ स्क्रीन दिल्या असून ही अभिमानाची बाब आहे. याबद्दल प्रेक्षकांनाही तितकेच धन्यवाद द्यायला हवे.

चित्रपटाला फक्त महिलांची उपस्थितीच का ?

चित्रपटाच्या नावाप्रमाणेच हा चित्रपट महिलांचाच आहे अशी या चित्रपटाची ओळख पडली आहे. मुळात चित्रपटाचे कथानकच महिलांच्या जीवनातील रोजच्या संघर्षावर आधारित आहे. त्यामुळे चित्रपट पहायला येणारी प्रत्येक महिला स्वतःला कुठे ना कुठे त्या चित्रपटात पाहत आहे. असे असल्याने हा चित्रपट गाजत असून त्याची चर्चा महिलांमध्ये सुरू असते. म्हणून महिला एकत्रितपणे येऊन ग्रुप बनवून चित्रपट पाहत आहेत. काही महिलांच्या ग्रुपने तर संपूर्ण स्क्रीनच बुक केले आहे.

महिला आपल्या जीवनात कोणत्या खडतर वाटचालीतुन जात असतात? त्या कसा संघर्ष करीत असतात? त्यांची सुख त्यांची दुःख हे खर तर पुरुषांनाही समजणे तितकेच गरजेचे आहे. म्हणून हा चित्रपट केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांनी देखील पाहणे तितकेच गरजेचे आहे. हा चित्रपट सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत एक संघर्ष दाखवतो. ज्यात हसण्यासाठी कॉमेडी देखील समाविष्ट आहे. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात जाणारी स्त्री आणि सिनेमागृहातून बाहेर पडणारी स्त्री ही काहीशी वेगळी असते. सिनेमा पाहिल्या नंतर महिलांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास येत असल्याचे पाहायला मिळत असून ही सकारात्मक बाब महिलांच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी फायद्याची ठरू शकते.

संतोष दिवाडकर

Baipan Bhari Deva review ; Why is the movie Baipan Bhari Deva popular?